शनिवार, २६ एप्रिल, २०२५

एका पथिकाची वाटचाल



पद्मश्री गिरीश प्रभुणे काका महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. भटके विमुक्त चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा या व्यक्तिमत्वाच्या अनेक मनोज्ञ छटा रवींद्र गोळे लिखित ' गिरीश प्रभुणे जसे कळले तसे' या चरित्रात वाचायला मिळतात.


२०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष. याचवेळी एका स्वयंसेवकाचा अमृतमहोत्सव सुरू आहे. हे स्वयंसेवक म्हणजे गिरीश प्रभुणे काका. त्यांची (प्रभुणे काका)उंच शिडशिडीत शरीरयष्टी व पांढरी शुभ्र दाढी पाहून आपणांस एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व नजरेस पडते. होय, समाज परिवर्तनाच्या वाटेतील ते एक पथिक आहेत. त्यांचे भटके विमुक्त विषयावरचे कार्य आणि जीवन उलगडून वाचायला लागलो की एका क्षणात आपण त्या विषयाकडे खेचलो जातो. 'लाटांखाली संथ पाणी', 'पारधी' व 'पालांवरचं जिणं' 'लोक आणि संस्कृती' हे साहित्यलेखन त्यांच्या व्यासंगाची झलक दाखवणारी आहेत.

गिरीश प्रभुणे काका शांत, उपेक्षितांचे अंतरंग समजून घेणारे व संवेदनशीलतेचे अपूर्व वरदान लाभलेले स्वयंसेवक आहेत. बारामतीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जडणघडणीचा काळ चिपळूणमध्ये गेला. सहाव्या वर्षी त्यांना संघाचा परिसस्पर्श झाला. संघशाखेत त्यांची सामाजिक दृष्टी विकसित झाली.अठरापगड जाती जमाती म्हणजे काय? गावगाडा कसा चालतो? अशा गोष्टी त्यांनी आपल्या निरीक्षणातून शिकून घेतल्या. 'क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती', श्री.ग. माजगावकर यांच्या 'ग्रामयान' ची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावगाड्याशी आंतरिक धागा घट्ट होत गेला. पुढे 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' ते 'सामाजिक समरसता मंचा'च्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष साधतात.

रवींद्र गोळे गिरीश प्रभुणे यांचे जीवनचरित्र मांडले खरे, पण यासाठी त्यांनी वाङ्मयीन आकृतिबंध वापरला नाही. या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे चरित्र प्रभुणे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत नाही; तर भटक्या विमुक्त समाजाचे हुंदके, आक्रोश आणि परिवर्तनाचे प्रतिबिंब मटविणारे हे पुस्तक आहे.

साधारणतः अडीच दशकांपूर्वी गोळे गिरीश प्रभुणे या विभूतीच्या संपर्कात आले. या पंचवीस वर्षांत प्रभुणे जसे त्यांना कळले, अनुभवले याचा सहजस्फूर्त आविष्कार म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. या पुस्तकातून साध्या, सहज सोप्या शब्दात प्रभुणे आपल्याला कळतात.

प्रभुणे यांचा पारधी, वडार, बेलदार, कुंभार, लोहार, शिकलगार, घिसाडी, ओतारी, लमाण, वैदू समाजाशी संबंध आला. या उपेक्षित समाजाचे मन व मत जुळविताना त्यांनी केलेला संघर्ष, जिद्द, अनंत ध्येयासक्ती विलक्षण आहे.त्यामुळेच त्यांच्या मनात समतेचा व समरसतेचा विचार दृढ झाला. 

या संदर्भात त्यांची मुलगी मनस्विनी यांनी एक प्रसंग सांगितला आहे. "चिंचवड गावात चापेकर चौकात जुना बस स्टॅण्ड होता. या बस स्टँडच्या मागे मनपा शाळेच्या भिंतीला टेकून एक म्हातारे आजोबा, तिथेच आडोसा घेऊन एकटे राहायचे. चप्पल शिवून देणे हे त्यांचे काम. बहुतेक वेळा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर यायची. चिंचवड गावात चप्पल शिवून देणारे ते एकमेव होते. त्यामुळे बहुतेक सर्व जण त्यांच्याकडून चप्पल शिवून घेत. पण ते बऱ्याच वेळा उपाशी पोटी झोपतात, हे फक्त बाबांच्या लक्षात आले. त्यानंतर बाबा त्यांना रोज पोळी-भाजी देऊ लागले. मी आणि मुकेश मनपा शाळेत जाऊ लागलो आणि पोळी-भाजी पोहोचवण्याचे काम आमच्याकडे आले. आम्ही ते काम करत असू. एक दिवस माझ्या वर्गातील मुलीने मला विचारले, "ते तुमचे कोण आहेत?" मी ठामपणे सांगितले, "ते आमचे आजोबा आहेत." आणि अख्ख्या वर्गात बातमी पसरली - 'रस्त्यावर राहणारे, चप्पल शिवणारे मनस्विनीचे आजोबा आहेत.' हे चप्पल शिवणारे गृहस्थ आपले कुणीच नाहीत, असे त्या वयात कधी वाटले नाही. बाबा त्यांना रोज पोळी-भाजी द्यायला सांगतात म्हणजे ते नक्कीच आपले आहेत, हा भाव मनात निर्माण झाला होता. कोण होते ते आजोबा ? आमचे आणि त्यांचे काय ऋणानुबंध ? जातीच्या चौकटीपलीकडचा विचार आणि कृती करण्याचा संस्कार बाबांनी नकळत आमच्या मनात रुजवला होता." (पृष्ठ क्र.२२)एखाद्या कादंबरीत शोभेल असा हा उतारा आहे. समजा , काही कारणाने हे संपूर्ण पुस्तक वाचणे तुम्हाला शक्य झाले नाही, तर किमान एवढा उतारा जरी वाचला तरी अंत:करणात समता व समरसतेचा भाव जागा होईल.

अनेकदा कठीण परिस्थितीशी सामना करताना प्रभुणे यांनी स्वतः च्या व्यक्तिमत्वात नकारात्मकता येऊ दिली नाही, विपरीत परिस्थितीतूनही ऊर्जा स्वीकारली आणि तिचे सकारात्मक परिवर्तन केले. 'असिधारा' नियतकालिकाचा आतबट्ट्याचा प्रयोग असो की, क्रांतिवीर चापेकर वाड्यातील समाजविघातक प्रवृत्तीकडून झालेली तोडफोड किंवा मिनार एक्स्प्रेस दरोडा प्रकरणात दाखविलेला धीरोदात्तपणा प्रेरणा देणारा आहे .

समाजाने गावकुसाबाहेर कुजत ठेवलेल्या पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध प्रभुणे उभे राहतात, परिणामी, प्रश्नांचा गुंता ही सोडवतात. (उदाहरणार्थ- आझाद मैदानावर पारधी आंदोलन, नागपूर येथील पारधी धर्मांतर प्रकरण.)

 यमगरवाडी व चिंचवडमधील 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' आज एक यशस्वी संस्था म्हणून नावारूपाला येत आहेत, त्यांचे मुख्य कारण म्हणजे प्रभुणे यांनी घेतलेली मेहनतीची, कामाची, परिश्रमाची आणि दूरदृष्टीची पोचपावती आहे. निमगाव म्हाळुंगी येथील 'ग्रामायन' चा प्रयोग यशस्वी करण्यात प्रभुणे यांनी बहुमोल योगदान दिले आहे. हे व इतर कार्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

शेवटी हे पुस्तक कशासाठी..? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शतकांपूर्वीचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिले आहेत. अनेकांचा उपेक्षित, भटक्या सारखे जीवन जगणाऱ्या समाजाशी व लोकांशी दूरान्वयाने सुद्धा संवाद झाला नाही, अशांनी या समाजाचे अंतरंग समजून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.
- विकास पांढरे,९९७०४५२७६७

चौकट
गिरीश प्रभुणे 
जसे कळले तसे
लेखक : रवींद्र गोळे 
प्रकाशन : साप्ताहिक विवेक 
आवृत्ती: प्रथम (एप्रिल २०२५)
पृष्ठ संख्या :११२
मूल्य: रू.२२५/-

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

महामानवाचे 'कृषी माॅडेल'



महामानवाचे 'कृषी माॅडेल' "शेती हा भारताचा राष्ट्रीय उद्योग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा विकास झाल्याशिवाय इतर सुधारणा अशक्य आहेत. त्यासाठी भारतीय शेती उत्पादकतेत वाढ होणे आवश्यक आहे" -डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांना वाटणारी चिंता म्हणजे जगातील एका कृषिचिंतकाच्या दूरदृष्टीपणाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती होती. डॉ.आंबेडकरांचा कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक संबंधाचा अभ्यास सूक्ष्म आणि वैज्ञानिक होता. या देशात कृषी संबंधित घटकांचा अधिकचा विचार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,लोकहितवादी, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख आणि शरद जोशी यांनीच केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतातला लाभलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. भारताच्या नवनिर्मितीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे.त्यांनी भारतीय शेतीचे केलेले चिंतन महत्त्वपूर्ण आणि देशाला आर्थिक संपन्नतेच्या दिशेने घेऊन जाणारे आहे.

 डॉ. आंबेडकरांनी विविध विषयांवर शोध निबंध लिहिली, धोरणे आखली. त्यातील कृषी धोरण हे प्रकाशात आले नाही. भारताला आज ज्या शेती समस्या सतावत आहेत त्यांची उकल करण्यासाठीचा मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी मांडलेल्या त्याकाळात मांडलेल्या विचारांतून मिळू शकतो. बाबासाहेबांनी देशातील शेती आणि शेतकरी यांच्या समस्यांचे संशोधन करून 'स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अॅण्ड देअर रेमेडीज' (लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय संदर्भ -द जर्नल आॅफ इंडियन इकॉनॉमी सोसायटी- सप्टेंबर १९१८) लिहिलेला हा शोधनिबंध अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. शेती, पाणी, ऊर्जा, ग्रामविकास (औद्योगिक ) या शिवाय शेतकऱ्यांचा, भूमिहीनांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी इंग्रज सरकारच्या निदर्शनास आणून दिले. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी' कृषी विकासाचे माॅडेल' विकसित करता येण्यासाठी दिशादर्शन केले‌. बाबासाहेबांच्या कृषी माॅडेलनुसार, लोकसंख्या वाढीचा शेतीवर दूरगामी परिणाम होतो, हे त्यांनी अभ्यासाअंती जाणले. जमीन विभाजनाचे कारण वारसाहक्क नसून प्रचंड लोकसंख्या वाढ हेच कारण आहे, असे त्यांचे मत आहे. देशातील वारसाला प्रत्येक जमिनीच्या प्रकारात हिस्सा देण्यात येत असल्याने जमिनीचे तुकडे होतात. त्यामुळे मानवी श्रम, जनावरांचे श्रम आणि बांधा मुळे जमीन वाया जाते. शेतकऱ्यांचे शेतीवरचे लक्ष कमी होते. परिणामी, शेतमालाचे उत्पादन आणि उत्पादकतेत घट होते. आणि शेतीचे व व शेतकऱ्यांचे नुकसान होते, भारतीय शेती समस्येचे हे उगमस्थान आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. फ्रेंच राज्यक्रांती नंतरही तेथील शेती लहान लहान तुकड्यात विभागली गेली, हीच समस्या हाॅलंड व डेन्मार्कची होती. हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने ओळखले होते. बाबासाहेबांनी भारतीय शेती समस्येचे अचूक निदान केले. शेती हा दीर्घकाळ सुरू असणारा, चालणारा उद्योग आहे. तो फायदेशीर बनविण्यासाठी शेतीत भांडवली गुंतवणूक कशी वाढेल? यासाठी त्यांनी सामूहिक शेती व्यवस्थापनाचे माॅडेल तयार केले आहे. लहान लहान तुकड्यात विभागलेल्या जमिनीचे विस्तारीकरण करणे, त्याचे सामूहिक शेतीत रूपांतर करणे शेतीचे राष्ट्रीयकरण करणे)असा दृष्टिकोन ठेवतात. शेतीचा विस्तार करणे म्हणजे जमिनीच्या धारण क्षेत्रात वाढ करणे, त्यासाठी जमिनीच्या तुकड्याचे एकत्रिकरण करावे , असे म्हणतात. एकत्रिकरण करणे म्हणजे सामूहिक शेती करणे किंवा शेतीचे राष्ट्रीयकरण होय. शेतीच्या उत्पादकतेत वाढीला तुकडीकरण नव्हे तर पाणी, तंत्रज्ञान, सरकारी गुंतवणूक इ. घटक जबाबदार आहेत, आणि त्या अनुषंगाने उपाय ही सूचवतात. 'सामूहिक शेती'तून होते. भांडवल निर्मिती होते आणि याद्वारे शेतीच्या औद्योगिककरणाला वेग येईल, असा त्यांचा क्रांतिकारक विचार आहे. शेतीच्या औद्योगिककरणातून (शेतमाल प्रक्रिया उद्योग) शेती, शेतकऱ्यांचे भले होणार आहे, याखेरीज भूमिहीनांचा प्रश्न निकाली लागून जमीनदार,कुळ व शेतमजूर असा भेद संपुष्टात येईल, अशी त्यांची धारणा होती. रशियाप्रमाणे भारतात देखील सामूहिक शेती पद्धतीचा स्वीकार केल्यास जमीन धारण क्षमतेत वाढ, उत्पादन व उत्पादकतेत वाढ आणि भांडवल निर्मिती होईल, याचा त्यांना अंदाज आला होता. शेतीच्या औद्योगिकीकरणातून शेतमाल प्रक्रिया उद्योगास चालना दिल्यास ग्रामीण लोकांची शहराकडील धाव कमी होईल, ( शहराकडे चला! डॉ . आंबेडकर स्वतंत्र विचार आहे) असा त्यांचा एक उदारमतवादी विचार ही समोर येतो. याठिकाणी मला डॉ.बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात मला एक मूलभूत फरक जाणवतो. गांधींजी, 'खेड्याकडे चला व पारंपरिक शेती करा!' असा सल्ला देतात, तर आंबेडकर, नव्या तंत्रज्ञानाचा (औद्योगिकीकरण -प्रक्रिया उद्योग) मार्ग खुला करण्यास सांगतात. आंबेडकर हे एकूणच शेतीकडे व्यावसायिक (प्रोफेशनल) अंगाने पाहतात. गावांमधील उद्योजकीय विकासामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास मदत होईल, आणि गावची दुर्दशा संपेल, असे डॉ.आंबेडकरांना वाटते. 

बाबासाहेबांच्या सखोल चिंतना मागे असलेला हा अर्थशास्त्रीय विचार अभ्यासकांनी अधिकपणे अभ्यासणे आवश्यक आहे. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, औद्योगिक क्रांतीनंतर (१९२०) शेतीच्या व्यापारीकरणाला सुरवात झाली. ब्रिटिशांनी ऊस, कापूस, तंबाखू,चहा,नीळ इ. नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना भाग पाडले. त्याची विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळतो, हे शेतकऱ्यांना समजले. तत्पूर्वी बाबासाहेबांनी १९१८सालीच ब्रिटिशांना 'भारतीय शेतीचे अर्थशास्त्र' समजावून सांगितले होते, हे विशेष. बाबासाहेबांनी आपल्या विचारांतून कृषी क्षेत्रातील अनेक अंगभूत बलस्थाने दाखवून दिले आहेत. ज्या धरणांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 'आधुनिक भारताची मंदिरे' म्हणतात, त्यांच्या पायाभरणीचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जलविषयक धोरणातून केली होती. १९४२ते१९४६ या कालावधीत डॉ.आंबेडकरांनी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात 'सिंचन' व 'ऊर्जा' ही महत्त्वाची खाती सांभाळली. या दरम्यानच्या काळात त्यांनी ऊर्जा व जलनीती क्षेत्रात भरीव योगदान दिले. नदी खोरे प्राधिकरणाच्या माध्यमातून ओरिसा राज्यातील महानदीवर बांधलेले 'हिराकूड धरण' जगातील सर्वात मोठे धरण ठरले. तर 'दामोदर नदी खोरे प्रकल्प', 'सोन नदी' प्रकल्पांची 'ब्लू प्रिंट' ही डॉ.आंबेडकरांनीच तयार केली होती. आंबेडकरांनी आपल्या जलविषयक धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर देऊन नदीजोड प्रकल्पावर भर दिला आहे. त्यामुळे ते भारतीय नदीजोड प्रकल्पाचे जनक ठरतात. बंगाल आणि बिहार या दोन राज्यांना जोडणाऱ्या दामोदर नदीवर धरण बांधणे हा एक मोठा धाडसी निर्णय होता. धरण निर्मितीमुळे बिहार, बंगाल व ओरिसा वासियांना महापुरापासून संरक्षण मिळाले. १९४६साली मध्यप्रदेशात वाहत जाऊन गंगेला मिळणाऱ्या सोननदीवर प्रकल्प उभा राहिला. पुढे या आधुनिक मंदिरांचा फायदा हरितक्रांतीसाठी झाला.

 आंबेडकरांची ही जलनीती तत्कालीन कारणासाठी उपयोगी ठरली. औद्योगिकीकरणासाठी विजेची निर्मिती करण्यासाठी त्यांनी नव्याने ऊर्जा धोरण आखले. ८नोव्हेंबर १९४४साली 'केंद्रीय तांत्रिक ऊर्जा मंडळा' ची स्थापना केली. धरणांवर वीज प्रकल्पाची उभारणी केली. डॉ.आंबेडकरांचे जल विषयक म्हणजे विचार देशासाठी भविष्याचे वेध घेणारे दिर्घकालीन धोरण आहे. आज देशात 'जल' विषयावरील गुंतागुंत कायम आहे. 'गंगा -कावेरी जोड प्रकल्प' असो किंवा 'महाराष्ट्र - कर्नाटकचा कृष्णा नदी पाणी' संघर्ष, 'महाराष्ट्र -आंध्र -गोदावरी पाणी 'वापर संघर्ष हा सतत भेडसावत असतो. डॉ. आंबेडकर यांचे जल विषयक दीर्घकालीन विचारांचा अंगीकार केल्यास देशातील पाण्याची गुंतागुंत अधिक सैल करता येईल. डॉ. आंबेडकरांना शेती प्रश्नांची जाण होती, हे त्यांच्या कृषी,जल आणि ऊर्जा धोरणातून लक्षात येते. २०१५-१६च्या भारतीय कृषी जनगणनेनुसार, सुमारे ८६ टक्के शेतकऱ्यांचे वर्गीकरण लहान आणि अत्यल्प शेतकरी म्हणून केले जाते.

 आजच्या काळात एकत्रित कुटुंब पद्धत विस्कळीत झाली आहे. त्यातून जमिनींची विभागणी होत आहे, यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शेती पूरक व्यवसाय केले जात असत. त्यातून कुटुंबाच्या गरजा भागविल्या जायच्या. आज शेतीतून कुटुंबाच्या गरजा भागविणे कठीण झाले आहे. एक एकर, अर्धा एकर जमीन असलेले शेतकरी उपजिविकेसाठी शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेतीच्या तुकडी करण्याची समस्या किती चिंताजनक झाली आहे, हे डॉ.बाबासाहेबांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या चिंतनातून अधोरेखित केले आहे.

 आज जगाच्या पाठीवर भारत आणि ब्राझील असे दोन देश आहेत की, त्यांच्या भौगोलिक विविधतेमुळे कोणत्याही पिकास अनुकूल वातावरण आहे. अमेरिका व युरोपीयन देश शेतकऱ्यांना भरपूर अनुदान देतात, शेजारील चीन तर शेतकऱ्यांना अल्पदरात लहान अवजारे, कृषी उपकरणे उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढत आहे. भारताची कृषी क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करण्यासाठी भारताला तशी रणनीती आखावी लागणार आहे. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितलेल्या राजमार्गाचा अवलंब करावा लागेल. -विकास पांढरे, ९९७०४५२७६७ १४ एप्रिल २०२४ (महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती) महामानवास विनम्र अभिवादन!! 🙏🏻

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

समरसतेचा वारकरी

‘सा.विवेक’ चे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ ( डॉ.हेडगेवार रूग्णालय) यांच्यावतीने दिला जाणारा डॉ.भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.

रवींद्र विष्णू गोळे हे मराठी समरसता साहित्य प्रवाहातील महत्त्वाचे कार्यकर्ता, लेखक आहेत. साहित्यातील विविध प्रकार हाताळून त्यांनी समसरता साहित्य प्रकारात मोलाची भर घातली आहे. गोळे हे पेशाने पत्रकार आहेत,पण त्यांच्यामध्ये एक प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ता दडलेला आहे याची प्रतिची त्यांच्या साहित्य लेखनातून प्रकट होताना दिसते. 'माणूस' हा साहित्याचा केंद्रबिंदू ठेवून ते लिखाण करताना दिसतात. भटक्या समाजातील स्त्रिया, जनजाती समूहाचे प्रश्न आणि जीवन त्यांनी आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केले आहे. पत्रकरिता आणि साहित्यातील आजपर्यंतचे त्यांचे हे कार्य जरी उल्लेखनीय असले तरी, त्या पाठिमागे त्यांचे संघर्षमय जीवन आहे. त्यांच्या या संघर्षमय जीवनातून त्यांची साहित्यनिर्मिती उभी राहिलेली दिसते.


रवींद्र गोळे यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९७४ साली सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील हातगेघर या छोट्याशा गावात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. वडील मुंबईत टपाल खात्यात काम करीत. आई गावाकडे शेती आणि घर सांभाळायची. रवींद्र यांचे प्राथमिक शिक्षण हातेघरमध्ये, तर तांत्रिक हायस्कुलचे शिक्षण साताऱ्यात झाले. बाल वयात त्यांना देशपांडे काकूमुळे पुस्तक वाचनाचे वेड लागले. विविध विषयांवरील शेकडो पुस्तके त्यांनी हातावेगळी केली. बालवयातच त्यांच्या वाचनात ‘उपरा’ हे पुस्तक आले. या पुस्तकानी त्यांना वेगळी दृष्टी दिली. या वयातच अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुलंच्या कथा, नारायण सुर्वेच्या कविता त्यांच्या मनावर परिणाम करत होत्या. पुढे ते संघ विचारांच्या सानिध्यात आले. या विचारधारेतील बिनीचे शिलेदार, लेखक, विचारवंत रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर, गिरीश प्रभुणे यांच्या बरोबरच बन्सिधर घोडेस्वार, विजयराव कापरे यांच्या सहवासात जीवनाची घडण झाली. भीमराव गस्ती यांच्या ‘बेरड’ या आत्मकथनाने त्यांना समाजाकडे बघण्याची दृष्टी विकसित झाली. भीमराव गस्ती समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष असताना कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी रवीद्र गोळे यांना लाभली, दोघांचा स्नेह संबंध निर्माण झाला.
दोन दशकांपूर्वी शिक्षण पूर्ण करून रवीद्र गोळे मुंबईत आले. त्यानंरतचा वायरमन ते सा.विवेक चे कार्यकारी संपादक पर्यंतचा हा त्यांचा अनोखा प्रवास ध्येयपथावर अविरत चालणाऱ्या पथिकांसाठी प्रेरक आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने चळवळीकडे प्रवास सुरू झाला. वायरमन म्हणून महानगरातला भवताल त्यांच्या नजरेत भरत होता.त्याच बरोबर सामाजिक समरसतेच्या चळवळीत त्यांच्यातला एक सच्चा कार्यकर्ता घडत गेला. डोंगराएवढी' माणसे त्यांना भेटीत गेली. त्यांच्या विचारांनी ते अधिक संघाकडे ओढले गेले.
सा. विवेकचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रभर फिरू लागले, उपेक्षितांचे अंतरंग समजून घेऊ लागले. नाकारलेल्या, गावकुसाबाहेरच्या माणसाच्या सुख: दुखाची कहाणी ऐकून त्यांच्यातला संवेदनशील कार्यकर्ता, लेखक घडत गेला. त्यामुळेच सामाजिक विषयांना हात घालण्याची ताकद मिळाली असावी. या कामाचे फलित म्हणजे ‘आयाबाया’ व ‘यमरगवाडीची गोष्ट हे दोन पुस्तक होय.


लेखक म्हणून गोळे यांचे कर्तृत्व मोठे आहे.'माणूस' हा साहित्याचा, पत्रकरितेचा केंद्रबिदू ठेवून ते लिखाण करताना दिसतात. माणूस समजून घेणे, माणसाला चेहरा प्राप्त करून देणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्यै. 'आयाबाया’ हे भटक्या जाती-जमातीतील महिलांच्या वेदनेची व कर्तृत्वाची कहाणी सांगणारे असेच एक पुस्तक आहे. भारताबाई देवकर, सखुबाई बंडीधनगर, जयश्री भोसले, राजश्री काळे, कांचन मालन काळे, सुजाता गणवीर, सरस्वतीबाई माने, अयोध्याबाई उपाध्ये आदी या नवदुर्गेची गाथा 'आयाबाया'त आली आहे. यात केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत तर उमेदीच्या, यशाच्या कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे चित्र सकारात्मक रितीने रेखाटलेले मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे.


‘आयाबाया’ काय किंवा अलीकडे प्रकाशित झालेले ‘यमरगवाडीची गोष्ट’ या पुस्तकातून ते माणसातल्या माणुसकीला साद घालतात. त्यामुळे त्यांचे लिखाण काळजाला भिडते. मराठी साहित्याचा अभिरूचीचा पोत बदलण्याचे काम या दोन पुस्तकाने केले. मानवतेच्या, समरसतेच्या अंगाने ही दोन्ही पुस्तके प्रत्येकांनी वाचावित, समजून घ्यावीत.
गोळे यांच्या साहित्ययात्रेतील आणखीन एक महत्त्वाचे विशेष म्हणजे बालसाहित्य. महामानवाचे कर्तृत्व, विचार लहान मुलांना समजेल, उमजेल अशा भाषेत त्यांनी बालकांसाठी चरित्र लिखान केले आहे. याठिकाणी ही 'माणूस' हेच त्यांच्या साहित्याचे प्राणत्व असल्याचे दिसून येते. चरित्र लेखनाद्वारे ते मानवतावादी, शोषित, पीडित, उपेक्षित माणसांचे भावविश्व सााकारताना दिसतात. ‘प्रिय बराक ओबामा, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘सयाजीराव गायकवाड’, ‘संत गाडगेबाबा’, ‘माणुसकीच्या गोष्टी, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ संताची समरसता त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकली आहे.
गोळे हे विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन करणारे संपादक आहेत. ‘राष्ट्रद्रष्टा दिनदयाळ उपाध्याय’, ‘वनजन गाथा’, ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’,‘समर्थ भारत, स्वप्न विचार-कृती’, ‘सहकारातून सामाजिकतेकडे’, ‘कर्मवीर दादा इदाते गौरव ग्रंथ’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’, आदी महत्त्वपूर्ण ग्रंथाचे गोळे यांनी संपादन केले आहे.


‘दीपस्तंभ’, ‘पथिक’, ‘अष्टपदी’, ‘कृतार्थ’, ‘झंझावत’, ‘समाज धन्वंतरी’, ‘जनता जनार्दन वामनराव परब’, ‘प्रेरणादीप’ या व्यक्तिचरित्रात्मक पुस्तकांतून गोळे यांच्या लिखाणाचे आणखी विशेष समोर येते. अशा प्रकारे चरित्रात्मक साहित्यलेखनापासून ते संपादित ग्रंथापर्यंतचा असा भिन्न विषय, आशयाच्या वैविध्येतून रवींद्र गोळे यांच्यातील लेखक, पत्रकार, संपादक, कार्यकर्ता वाचकांसमोर येतो.
रवींद्र गोळे यांच्याकडे लेखनशैलीप्रमाणे वक्तृत्वशैली पहायला मिळते. अवघड विषय ते सहज आणि सोप्या भाषेत सांगतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक महत्त्वाच्या व्याख्यानात, समारंभात प्रमुख वक्ता म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. आंबेडकरी साहित्य- विचार, समरसता साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संविधान आदी विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणांना,व्याख्यानास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे रवींद्र गोळे हे एक साहित्यिक व उत्कृष्ट वक्ता म्हणून समाजाला परिचित झाले आहेत.
रवींद्र गोळे यांनी साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महात्मा फुले चरित्र साहित्य साधन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. समरसता साहित्य परिषद चे कार्यवाह म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्यवाह म्हणून काम केले आहे.साहित्यासाठी आणि पत्रकरितेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार (२०१६), भारतीय स्त्री शक्तिचा काव्य लेखनासाठी पुरस्कार (२००१) प्राप्त झाला आहे. यासह विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. सध्या ते मराठी साहित्य समरसता साहित्य पत्रिकेचे संपादक पदाची धुरा सांभाळत आहेत.
गोळे यांच्या साहित्याचा, पत्रकारितेचा अभ्यास करताना त्यांच्या लेखनशैलीचे वेगळेपण स्पष्ट होते. त्यांचे सर्व साहित्य हे अनुभवावर, वास्तवावर आधारलेले आहे. शोषित समाजातील माणूस हाच त्यांच्या साहित्याचा प्राण आहे.
- विकास पांढरे, ९९७०४५२७६७

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

दुष्काळी भागावर फळतेय ‘ड्रॅगन फ्रूट’ शेती

 


जत तालुक्यातील जालिहाळ ब्रद्रुक येथील ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या सामाजिक संस्थेतर्फे शेतकर्‍यांना कमी पाण्यात येणार्‍या ‘ड्रॅगन फ्रूट’ या विलायती फळाच्या माहितीसह लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात 750 एकरांवर ‘ड्रॅगन फ्रूट’चे क्षेत्र विस्तारले आहे. शेतीतला हा नवीन प्रयोग शेतकर्‍यांना ‘आर्थिक वरदान’ ठरत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याची ओळख कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी आहे. येथे ना पूर्णपणे फुललेली शेती पहायला मिळते, ना निसर्गरम्य वातावरण. आढळते ते दगड-गोटे, काटेरी खुरटी झाडी. एकूणच दुष्काळसदृश परिस्थिती. अशा या वातावरणात जीवन कंठत असणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवनात आनंदाची पालवी फुटली ती ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या संस्थेमुळे. 1972 सालच्या भीषण दुष्काळात संस्थेचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यांनीच एकत्र येऊन 1976 साली सांगली शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जालिहाळ बुद्रुक (ता. जत) या ठिकाणी ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ची स्थापना केली. सध्या ही संस्था जत तालुक्याच्या दुष्काळी भागातील 22 गावांत शेती, पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आदी क्षेत्रांत काम करीत आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या तीस एकर हलक्या पडीक जमिनीवर पथदर्शक पीक प्रात्यक्षिके होत असतात. कडधान्ये, फळबागा, ठिबक व तुषार सिंचन पद्धत, सौर ऊर्जा, हायड्रोपोनिक चारा याची प्रात्यक्षिके संस्था प्रथम आपल्या शेतात राबविते. त्यानंतर ते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविले जाते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादकता कशी मिळेल यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.

ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग

डाळिंब आणि द्राक्ष या भागाची हुकमी पिके. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि बागांवर पडणारे रोग यांमुळे इथला फळ बागायतदार मेटाकुटीला आला होता. दरम्यान, येरळा संस्थेचा पर्यावरणाला अनुकूल पर्यायी पीक-फळाचा अभ्यास सुरू होता. या संदर्भात अनुभव सांगताना संस्थेचे सचिव नारायण देशपांडे म्हणाले, “ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारे पीक समजले जाते. व्हिएतनाम, थायलंड, तैवान देशांत याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी खर्चात परवडणारे हे पीक आहे, शिवाय शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने जालिहाळ बुद्रुक येथील दीड एकरावर ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी सहा वर्षे संशोधन केले. 2014 साली प्रायोगिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रूट शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकर्‍याकडून रोपे मागविण्यात आली. एका एकरात 550 पोल बसले. सहा बाय दहाचे अंतर करून प्रत्येक पोलवर चार रोपांची लागवड केली. एकरी 2800 रोपे लागली. रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होत गेली. जानेवारी ते मे या कालावधीत फळाला अतिशय कमी पाणी लागते. त्यामुळे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरू शकणारे आणि रोगप्रतिकारक्षम फळ असल्याचे आमच्या लक्षात आले. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. पहिल्या वर्षी रोपांची चांगली उगवण झाली. दुसर्‍या वर्षापासून फळधारणा सुरू होते आणि चौथ्या वर्षापासून एकरी जवळपास सहा ते सात टन उत्पादन निघाले.



हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही लागवड ते काढणीपर्यंतची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले. हजारो शेतकर्‍यांना ते वितरित करण्यात आले. संस्थेने स्वत: रोपवाटिका तयार करून रोपे उपलब्ध करून दिली आहेत. संस्थेच्या प्रक्षेत्रावरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर तो पाहण्यासाठी आले आणि बघता बघता जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील 750 एकर क्षेत्र ड्रॅग्रन फ्रूटखाली आले आहे. त्यासाठी ‘इंडियन ड्रॅगन फ्रूट ग्रोअरगट स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे 400 ड्रॅगन फ्रूट शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे.”


शेतकर्‍यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन

संस्थेने सर्व शेतकर्‍यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार केला आहे. ड्रॅगन फ्रूट हे नवीन पीक आहे. त्यामुळे या पिकांची सविस्तर माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. या पिकांची शास्त्रीय माहिती संस्थेने संकलित केली आहे. संस्थेचे अनुभवी शेतकरी नवीन शेतकर्‍यांना ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती देत असतात. संस्थेने फळाविषयीचे तंत्रज्ञान विकसित करून लागवडीपासून काढणी, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन याविषयी शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले आहे.

विक्री व्यवस्थापन

नारायण देशपांडे सांगतात, “या नवीन फळासाठी ग्राहक मिळविणे एक मोठे आव्हान होते. त्याचे आहारातील महत्त्व पटवून देणारी हजारो घडीपत्रके संस्थेने थेट किरकोळ फळविक्रेत्यांपर्यंत व ग्राहकांपर्यंत वितरित केली. सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, वाशी येथील व्यापार्‍यांशी संपर्क साधून विक्रीचा प्रश्न सोडविला.”

विक्रमी उत्पादन व निर्यात

 उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे संस्थेच्या शेतकर्‍यांनी दाखवून दिले आहे. 2018-19 या काळात 400 टन, 2019-20मध्ये 525 टन, तर 2020-21 साली 700 टन ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन एकट्या जत तालुक्यातून घेण्यात आले. यातून सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या वर्षी लागवडीचा खर्च साडेतीन लाख रुपये एकरी आला. खते, छाटणी, पाणी व्यवस्थापन याचा एकरी खर्च 32 हजार रुपये आला. सरासरी 80 ते 100 रु. किलो रुपये असा भाव मिळाला आहे. या भागातून युरोपमध्ये व अरब राष्ट्रात प्रथमच फळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.



उत्कृष्ट रोपवाटिका

महाराष्ट्राच्या विविध भागांत ड्रॅगन फ्रूटची लागवड होत असली, तरी बहुतांश ठिकाणी या फळाच्या रोपवाटिका उपलब्ध नाहीत, ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्कृष्ट सहा रोपवाटिका विकसित केल्या आहेत. यामुळे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. वर्षभरातून एका रोपवाटिकेतून दहा हजारांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते.

 शेतकरी समाधानी

कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 25 वर्षे नफा मिळवून देणारी ही शेती आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत.

 लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजाराम देशमुख म्हणाले, “मी पूर्वी द्राक्ष व ऊस शेती करत होतो. नवीन पीकपद्धतीचा अभ्यास करून व येरळा संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर 2015 साली 25 गुंठ्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यातून 11 टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सरासरी आठ लाखाचे उत्पन्न मिळाले. 2020 साली पुन्हा ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढवले. सध्या मी दीड एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.”

 तडसर (ता. कडेगाव) येथील शेतकरी व महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव पवार सांगतात, “2014 साली येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांचा फोन आला. पिलीव (ता. माळशिरस) येथील शेतकरी जाधव यांनी दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेतीतून 27 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन चर्चा करण्याची विनंती देशपांडे यांनी केली. पुढे आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीला भेट दिली. एक-दोन वर्षे या शेतीचा अभ्यास केला.


2016 साली मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. दोन ओळींतील अंतर 12 फूट व दोन रोपांतील अंतर 7 फूट अशी रचना करून 30 गुंठ्यांत लागण केली. प्रारंभी कमी पाणी दिल्यामुळे म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे 2017 साली कमी उत्पन्न - म्हणजे 400 किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत व जीवामृत यांचा वापर केला. 2018 साली 1309 किलो, 2019 साली 2460 व 2020 साली 7389 किलो व 2020-21 या काळात 8541 किलो उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता 6 लाख 44 हजार 145 रुपयांचे उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी 2021मध्ये 2 एकरांमध्ये रेड रेड व जंबो रेड या व्हरायटीची लागवड केली आहे. कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणारे हे नगदी पीक आहे. उसाएवढा खर्च केला, तरी उसाच्या दुप्पट उत्पन्न देणारे हे पीक आहे. शिवाय द्राक्षासारखी फार रिस्क घ्यावी लागत नाही.”

देशमुख व पवार या दोन्हीही शेतकर्‍यांनी प्रथमच दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केली आहे. या निर्यातीमुळे त्यांना 110 रुपये प्रतिकिलो किलो भाव मिळाला आहे.

आगामी योजना

ग्राहकांपर्यंत ड्रॅगन फ्रूटचे महत्त्व पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी शीतगृहातील साठवणक्षमता वाढवण्यासाठी परदेशी संस्थांशीदेखील संपर्क केला आहे. या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सातासमुद्रापार पिकणार्‍या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती असा दुष्काळग्रस्त भागात फुलविला गेलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकर्‍यांसाठी नवा आदर्श ठरला आहे.

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

दीड एकरांतून घडविली क्रांती


धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली बाळासाहेब घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड एकरात मिश्र पीक पद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल उभे केले आहे. महिला शेतकर्‍यांना एकत्र आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची निर्मिती करून जणू क्रांती घडवून आणली आहे. शेती आधारित अन्य उपक्रमात व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे त्या अनेकींना आत्मनिरर्भरतेची प्रेरणा देत आहेत.

ही कहाणी आहे. जिद्दीची आणि मेहनतीची. अतिशय गरीब परिस्थिीतही शेतीतून प्रगती साधली, त्यासाठी आतोनात त्रास, अडचणी सहन केल्या, पण थांबल्या नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचल्या, अशा प्रगतशील महिला शेतकरी वैशाली बाळासाहेब घुगे यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे वैशालीताईंचे सासर. लग्नापूर्वी पुण्यात काकांच्या घरी वाढलेल्या, तिथेच नववीपर्यंत शिकल्या. सोळाव्या वर्षी त्याचं बाळासाहेबांशी लग्न झालं. नवरा (बाळसाहेब) पदवीधर असूनही त्याच्या हाताला काम मिळत नव्हते.  त्यातच संसाराच्या रहाटगाड्यात सासरांनी चार एकर शेती विकली. पुढे परिस्थितीत हतबल होत गेली. पुढे वैशालीताईंनी संसार सावरला. अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण  केले.
आत्मनिर्भरतेचा असा एक प्रवास
अतिशय हलाखीचे दिवस सहन करीत पुढे आलेल्या वैशालीताई जीवनातील अनुभव सांगताना म्हणाल्या,‘‘ घरात कुणीच कामाला जात नव्हते. त्यामुळं घरखर्च कसा करायचा? त्यात नवरा कमवता नव्हता, या विचारानं सासर्‍यानं दीड एकर शेत, एक म्हैस आणि चार पत्रे देऊन आम्हाला घराबाहेर (विभक्त केले) काढले. शेतात दगडाची खिळपट रचून आणि त्यावर पत्रे टाकून घर उभे केले. पदरात मूल होतं. नवरा कमवत नव्हता, पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. म्हैशीचे दूध व शेतातील भाजीपाला विकून संसाराला चार पैसे मिळत होते. अशातच काळोख्या रात्री, वादळी वार्‍यात घराववरचे पत्रे उडून गेले.
लहान बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत बाहेर पडले. या भीषण प्रसंगामुळं मी जगणं शिकले. खंबीर होऊन पुढे आले. संसार सांभाळला, शेतात भाजीपाला लावला, बाजारात, वस्तीवर, गल्लीत भाजी विकू लागले, घरंदाज, दिसायला चांगली रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचं पाहून आयाबाया माझ्याकडं टकमक बघायच्या, हसायच्या, बोलायच्या, माझ्यापुढं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, काही महिलांचं मार्गदर्शन मिळालं.. वस्तीवरच्या महिलांचा गट बनवला.. चार पैसे मिळत गेले, शेतीत सूर गवसू लागला. खर्‍या इथूनच माझ्या ‘आत्मनिर्भरते’ला सुरवात झाली.’’

मिश्र पिकांतून फुलवली शेती
शहरात वाढलेल्या वैशालीताईंना शेतीमातीचा कसलाही गंध नव्हता. शेती समजून घेण्यासाठी त्यांनी चार वर्ष खर्ची घालवली. वैशालीताई सांगतात,‘‘२०११-१२ पासून मी शेती करू लागले.  शेती समजून घेत होते. पहिल्यांदा शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात पूर्वांपार पासून पिकाची एक पद्धत होती. या पद्धतीत मी बदल केला. ऊस, सोयाबीन पिकांऐवजी मिश्र पीक पद्धत अंगीकारली. पहिल्यांदा घरच्यांनी विरोध दर्शवला. नंतर या पीक पद्धतीतून मिळालेल्या समाधनाकारक उत्पन्नातून विरोध मावळला.  उडीद,तूर,बाजारी, मूग,चवळी, सोयाबीन आदी कडधान्याच्या लागवडीतून दीड एकरांची शेती फुलवली आहे.’’
 कमी पाण्यात व कमी कालावधीत येणार्‍या पिकांची लागवड हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. कडधान्याबरोबर गहू, ज्वारी आदी देशी बियांणापासून समाधानकारक उत्पन्न काढतात. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेत घेतलेल्या शेती प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. यामुळे सभेत बोलू लागल्या, महिलांना, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करू लागल्या.
दुष्काळ निमुर्लनात सहभाग
२०१३, २०१४ आणि २०१५ हे सलग तीन वर्षे दुष्काळाचे होते. मराठवाड्यात चारापाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी आपले जनावरे चारा छावणीत पाठवित होते.  शासनाकडून दुष्काळ निर्मुलनासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू झाले होते. या अंतर्गत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘निकृष्ट चार्‍यातून उत्कृष्ट चारा निर्मिती’ कशी होते.  या संदर्भात वैशालीताईंना प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून त्यांनी आपल्या शेतात हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरवात केली. या चार्‍यातून त्यांनी स्वतःची १०जनावरे जगवली.  मुख्य म्हणजे वाड्या वस्त्यातील महिला शेतकर्‍यांना  कमी पाण्यातील चारा निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

गांडूळ खत निर्मिती
गांडूळ खत, गांडूळ कल्चर व गांडूळ पाणी या संदर्भातील विविध प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. हे प्रयोग करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या बाबत बोलताना वैशालीताई म्हणाल्या,‘‘२०१३ साली मी सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च ही माझ्या आवाक्याबाहेरचा होता. प्रशिक्षणानंतर गांडूळ खत बेड टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी अडीच हजार रूपये खर्च अपेक्षित होते. याला पर्याय म्हणून मी  जुने पोती (गोनी) फाडून व्यवस्थित बेड तयार केला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसायचे आणि पुढे जायचे. बेडमधील पहिला खात माझ्या शेतात टाकला. शेतातून चांगले उत्पन्न निघू लागले. पुढे गांडूळ खताचे बेड वाढवले. आज माझ्याकडे गांडूळाचे दहा बेड आहेत. गांडूळाचे व्हर्मीबेड वाढवले. त्यातून मिळणार्‍या व्हर्मीवाशची द्राक्ष व फळबागायतदारांकडून मागणी वाढली आहे. यातून वर्षांकाठी १०टन गांडूळ खत तयार होतोय. शून्य गुंतवूणकीतून मला वर्षाकाठी मी दीड लाख रूपये उत्पन्न मिळू लागले आहे.’’


शाश्वत शेतीचा पर्याय

शेतीला जोडधंदा म्हणून वैशालाताईंनी आपल्या शेतीपुढे गावरान कुक्कुटपालनाचा पर्याय ठेवला आहे. २०१४-१५ साली ९०हजारांची गुंतवणूक करून त्यांनी शंभर कोंबड्याचे शेड उभा केले. पहिल्या वर्षी त्यांना ३५हजार रूपयांचा नफा मिळाला. आज त्यांच्याकडे ४५० गावरान  कोंबड्या आहेत. यातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांनी  दोन हजार कोंबड्याचे शेड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
या शिवाय त्यांच्याकडे १४म्हशी व दोन देशी गायी आहेत. शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट बांधला आहे. गोमोत्रापासून जीवामृत तयार करतात.  बयोगॅस, मुरघास, कडबाकुट्टी, जीवामृत, नर्सरी, पिठाची मशिन अशा विविध शेतीपूरक उद्योगातून वर्षांला सात ते आठ लाखांचे उत्पन्न त्या मिळवितात.
विविध फळझाडांची लागवड
वैशालीताई आपल्या दीड एकरांच्या शेतात विविध प्रयोग करतात. फळबाग हा त्यातील एक भाग. पूर्वी त्यांच्याकडे केशर आंब्याचे ९ झाडे होती. यातून त्यांना वर्षांकाठी २५ते३० हजार रूपये उत्पन्न मिळते.  हे उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर गतवर्षी एक एकरांत केशर आंब्याची ३५० झाडे लावली आहेत.याशिवाय शेवगा १५, लिंबू २५, नारळ ५, पपई २, पेरू २, हदगा २, अशा झाडांची बाग त्यांनी तयार केली आहे. पिक व फळझाडांना आच्छादन, ठिंबकचा जास्तीत जास्त वापर त्या करतात.

विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची उभारणी
वैशालीताईंनी २०१७साली तुळजापूर तालुक्यातील २० गावातील महिला शेतकर्‍यांना एकत्रित आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीच्या १हजार महिला सभासद आहेत. कंपनीमार्फत महिला शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, बियाणे साठवण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक विषयी मार्गदर्शन केले जाते. कंपनीने शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेती पूरक व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्यावतीने भाजीपाला साठवण शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
डाळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी
कडधान्याची लागवड करणे व त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यासाठी  प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. उडीद, मूग,हरभरा डाळीवर काम होत असते. या अंतर्गत कंपनीकडून‘उरवा’ या ब्रॅडखाली केरळ येथे १०टन डाळ निर्यात करण्यात आली होती. डाळीपासून पापड निर्मिती तर हळदीपासून पावडर तयार करण्यात काम सुरू आहे.
एक लाख शेतकर्‍यांना प्रशिक्षण
वैशालीताई यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संस्था, पुणे) या संस्थेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २७ जिल्ह्यातील १लाखाहून अधिक शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती,गांडुळखत निर्मिती, विक्री, गांडुळ कल्चर, गांडुळपाणी, दाळ प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला लागवड आदी विषया संदर्भात प्रशिक्षण दिले आहे.

शेती, शेतीपूरक व्यवसायातील यशाचे गमक स्वतः पुरते मर्यादित न ठेवता इतरांना त्याचा लाभ मिळावा, या हेतूने त्यांनी २०१८ साली आपल्या शेतात वैशाली महिला शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी एकाच वेळी ५०प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात.अतिशय हलाखीतून शेती व्यवसायला सुरूवात केलेल्या आणि त्यात नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या वैशालीताईंची कहाणी सर्वांना प्ररेणा देणारी आहे.
-विकास पांढरे -९९७०४५२७६७
साभार : एकता मासिक (आत्मनिर्भर भारत विशेषांक- आँगस्ट २०२२)
संपर्क
वैशाली बाळासाहेब घुगे
मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव
मो.नं. : ७९७२८०६०५५
ईमेल : Vaishalighuge112@gmail.com


सोमवार, २० जून, २०२२

‘परिसांचा संग’-



सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी जी जी माणसे पाहिली, अनुभवली त्या माणसांच्या अंतरंगाचा पट ‘परिसांचा संग’ या पुस्तकात अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने रंगवला आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या साहित्याचा, समाज जीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे सर्वाथाने असणारे माणसांवरील प्रेम. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानता त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, जोडत आहेत.एकूणच  त्यांचा पिंडच ‘माणुसकी’ने भरलेला आहे.

 सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणसांबद्दलची ओढ यातून त्यांनी‘ परिसाचां संग’ या पुस्तकातून अनेकविध व्यक्तींचे दर्शन घडविले आहे. प्रभुणे यांची आत्मनिष्ठा ही निरामय, उत्कट व अविचल झालेली पहायला मिळते, त्यामुळे त्यांच्या या संग्रहात पुढील बाबी प्रकर्षांने जाणवतात.
१. व्यक्तींचे समाजातील स्थान व व्याप्ती
२. व्यक्तीचे समाजातील कार्य
३. व्यक्तीचा समाजावर होणारा परिणाम
४. व्यक्तीला सामाजिक दस्तऐवज म्हणून कसे पाहावे याचे दर्शन घडते.

प्रभुणे यांच्या जीवनात जी माणसे आली, मनावर अमीट असा ठसा उमठवला,त्या माणसाचे जीवन सौंदर्याचे ओळख करून देणे हाच या पुस्तकामागील मुख्य हेतू आहे. त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या विषयासाठी निवडलेल्या व्यक्ती या वेगवेगळ्या स्तरातल्या, विविध विचारधारेतल्या, पठडीतल्या निवडल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभुणे यांनी या संग्रहातील सर्व व्यक्तीचे बाह्यांगाचा परिचय करुन न देता अंतरंगाची ओळख करून दिलेली आहे. 

त्यापैंकी मोरोपंत पिंगळे, किशाभाऊ  पटवर्धन, दत्तोपंत ठेंगडी, नाना नवले, बाळासाहेब देवरस, डॉ.अशोक कुकडे, रमेश पतंगे, नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे, आर.आर.पाटील, डॉ.कालबाग, डॉ.देवदत्त दाभोळकर, नरेंद्र जाधव, सुनील देशपांडे, भीमराव गस्ती, धर्मपाल, कवी ग्रेस, गो.नी.दांडेकर, आनंद यादव, रवींद्र शर्मा,  शाहीर आसाराम कसबे, इंदुमती काटदरे अशा ४३ व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले लेख प्रस्तुत संग्रहात आहेत.

ही सारीच माणसं निर्विवादपणे मोठी आहेत. मात्र सगळ्यांच्याच कामाची हवी तशी दखल समाजाने घेतलेली नाही. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांच्या कामाची, त्यांच्यातल्या वेगळेपणाची माहिती असलेच, असे नाही. राजश्री काळे, सुजाता गणवीर, महादेव सरडे, रावसाहेब कुलकर्णी, डॉ.सुवर्णा रावळ, डॉ.कालबाग, शाहीर असाराम कसबे हे त्यातील ठळक उदाहरणे. पारधी समाजात जन्माला आलेल्या राजश्री काळे यांची कहाणी चित्तथरारक आहे. यमगरवाडीत त्यांना मिळालेली दिशा यातून राजश्री यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. आज त्या पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका आहेत. मूळच्या नागपूरच्या पण सध्या यमगरवाडीच्या मातीत रमून गेलेल्या सुजात गणवीर यांचे साधे-सरळ जगणे लेखकाला कसे आपलेसे वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. अनेेक गोष्टी शिकवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अवितरपणे काम करणारे असंख्य संघ स्वयंसेवक एक प्रकारे समाजऋण फेडत असतात. महादेवराव सरडे व रावसाहेब कुलकर्णी हे त्यापैंकीच एक. या दोन व्यक्तींनी यमगरवाडी प्रकल्पासाठी घेतलेले कष्ट, सोसलेला संघर्ष प्रभुणे आपल्या सिद्धहस्त लेखनीतून सांगतात.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी पाबळच्या टेकडीवर विज्ञान आश्रम् सुरू करणारे व दुष्काळी भागात कौशल्यावर आधारित शिक्षणाचे प्रयोग करणारे व ‘ विज्ञान आश्रम’   या आगळ्यावेगळ्या आधुनिक गुरूकुलाचे जनक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्याबद्दलही सामान्य वाचकाला फारशी मिाहती नाही. डॉ.कलबाग यांनी यमगरवाडीला दिलेला भेट आणि यातून निर्माण झालेला स्नेहाचा धागा याविषयाीचे चित्रण वाचायला मिळते.

समाजाप्रती समर्पण भावनेने काम करणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व आर.आर.पाटील यांच्याविषयी आठवणी प्रभुणे आपल्या पुस्तकातून सांगितलेल्या आहेत. ‘संघात न आलेला स्वयंसेवक ’या शीर्षकातून  आर.आर.पाटी यांच्या ऋजू स्वभावाचे दर्शन घडविले आहे. पक्ष-विचारधारा याविषयी कोणताही भेद न करता आर.आर.आबांना गुरूकुलम संस्थेच्या मान्यतेचा आग्रह धरला, याविषयी मनस्वी व्यक्तिमत्वाच्या आबांच्या स्वभावातले अनेक पैलू प्रभुणे यांनी अत्यंत सुरेखपणे उलगडून दाखविले आहेत. सतत आपल्या कामात बुडालेले आणि सतत समाजाच्या भल्यासाठी सतत धडपड करणारे आर.आर.पाटील हे संघात कधीही न आलेले, शाखेत न आलेला संघ स्वयंसेवक म्हणून आबांचे वर्णन केलेले आहे.

देवदत्त दाभोळकर हे तसे समाजवादी. पण त्यांच्या जगण्यात कुठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश नाही, विचारवंत असूनही अहंकाराचा कुठेही स्पर्श न झालेल्या या व्यक्तिमत्वाचे दर्शन प्रभुणे यांनी घडविले आहे. नितीन गडकरी, विनोद तावडे, लता मंगेशकर, सुनील देशपांडे, विष्णू वाकणकर, गो.नी.दांडेकर, सुभाष अवचट आदीं व्यक्तींचा मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न प्रभुणे यांनी केलेला आहे.

 नेटके आणि गोळीबंद लेखण करणारे प्रभुणे यांची लेखनशैली ओघवती, सच्ची, सुगम असल्याने, त्यांचे पुस्तक अगदी सामान्य वाचकाला आपलेसे करते. पुस्तकातील व्यक्तींचे रेखाचित्र आणि त्याला साजेशे शीर्षके हे पुस्तकाचे आणखीन एक बलस्थान. मराठी साहित्यात प्रथमच विविध विचारधारेतील, विषयांतील व्यक्तित्वाचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे. त्यामुळेच विषयाच्या वेगळेपणामुळे आणि अनुभवांच्या अस्सलपणामुळे, नेटक्या मांडणीमुळे हे पुस्तक सर्वांगानी उठून दिसते.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७

परिसांचा संग
लेखक : पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रकाशन : साप्ताहिक विवेक
पृष्ठ संख्या : २००
मूल्य : ३००/-
संपर्क : ९५९४९६१८५८

गोड उसाची कडू कहाणी

 


दरसाल उसाचा हंगाम सुरू झाला की दोन प्रश्न नेहमी ऐरणीवर येतात - पहिला ऊस दर आंदोलनाचा आणि दुसरा अतिरिक्त ऊस गाळपाचा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम संपूनही मराठवाड्यात एक ते दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना आहे. या समस्येला नेमके जबाबदार कोण? याचे मूळ शोधणे गरजेचे आहे.

‘ऊस’ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक. राज्यात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यात या पिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकतेमध्ये आणि साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल राहत आला आहे. महाराष्ट्रात एकूण 95 सहकारी आणि 93 खाजगी कारखाने आहेत, तर जवळपास 48 कारखाने बंद अवस्थेत आहेत. 1 जून 2022 अखेर राज्यात 1316.8 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 1369.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळते. उसाचा सर्वसाधारण बारा महिन्यांचा कालावधी संपूनही मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आदीसह काही जिल्ह्यांतील ऊस फडातच आहे.

ही समस्या केवळ बिगर सभासदांची नाही, तर जे कारखान्याचे सभासद आहेत, त्याचीही हीच गत आहे. या समस्येमुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतरही काही भागात साखर कारखाना ऊस नेत नाही म्हणून काहींनी ऊस पेटवून दिला. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत गेली. सध्या त्या त्या भागातील कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले, तरी मान्सून सुरू झाल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

अतिरिक्त ऊस गाळपासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून पडणार्‍या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 2022-23 या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढेल, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केलीे. एक कारखानदार म्हणून उसाखाली किती क्षेत्र आणायचे? बंद पडलेले साखर कारखाने कसे सुरू करायचे? याविषयी ते बोलणे आवश्यक होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी मूळ समस्येकडे दुर्लक्षच केले.



अतिरिक्त ऊस प्रश्न - एक अन्वयार्थ

सध्या प. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला असला, तरी मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला आहे. अवर्षणग्रस्ततेचा कायमचा शाप असलेल्या या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळेच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खात्रीचे उत्पन्न, उसाची ‘एफआरपी’ (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर) निश्चितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळत आहेत. 2021-22 हंगामात या विभागात सहा लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. या संपूर्ण उसाची भिस्त केवळ 58 कारखान्यांवर अवलंबून आहे.

यंदा सभासदांइतकीच बिगरसभासदांनी उसाच्या एकरी लागवडीत वाढ केली आहे. त्यामुळे कारखानदारांना ऊस तोडणीचे व गाळपाचे नियोजन करता आले नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. परिणामी, मजुराअभावी शेतकर्‍यांचा ऊस फडातच राहिला. वाढत्या तापमानात काळात उसाला तुरे फुटले. पावसामुळे शेतकर्‍यांसमोर उसाच्या शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उभा राहिला असला, तरी आता गोड ऊस ‘कडू’ वाटत आहे. संपूर्ण ऊस गाळप झाला, तरीही यातून उत्पादन खर्च निघेल की नाही, याविषयी शंका आहे.


घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नारायण देवकाते म्हणाले, “गोदावरी पट्ट्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे राजेटाकळी, भादली, मंगू जळगाव परिसरात जवळपास 25 हेक्टरहून अधिक ऊस गाळपाविना शिल्लक आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस नाही झाला, तर बर्‍याच प्रमाणात ऊस गाळप होईल.”

एकूणच, अतिरिक्त ऊस गाळपाचे चक्र पावसावर अवलंबून आहे. येत्या काळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, तर अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाला कालव्याने पाणी दिले. मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण, उसासाठी होणारा पाण्याचा अपव्यव लक्षात घेता, या भागातील शेतकर्‍यांनी उसाशिवाय इतर नगदी पिके कशी घ्यावी, याविषयी धोरणकर्त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

विकास पांढरे

https://www.evivek.com/Encyc/2022/6/14/Sweet-sugarcane-The-story.html

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...