ठिकाण तुळजापूर वेस,वार मंगळवार, सकाळची वेळ, थोडीशी घाईबडीची, नोकरदार, कामगारांना कामांवर जाण्याची गडबड ... रस्त्यात एक चारचाकी बंद पडलेली... अचानक दोन पोलिस येतात... गाडीला परवाना नाही... तुमच्याकडे लायन्सेस नाही, अटक व्हा नाहीतर लाच द्या... नाष्टा माझ्याकडे बील तुमच्याकडे.... मोबाईल नंबर 99 सतरा कुठेही उतरा... लोकसंख्या दीडशे पुढारी तीनशे..... दंगल झाली की चाललो घरला... अशा एकाहून एक हजरजबाबी विनोदाने तुळजापूर वेस मधील नागरिक पोटभरून हसत होते, बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद मिळत होती. हा प्रसंग दोन वर्षापूर्वीचा सोलापूर शहरातला आहे.
महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ४२जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या,पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजनातू प्रबोधन करणाऱ्या बहुरूपी समाजाच्या लोककलेला शिवकाळापासून मानाचे स्थान आहे. छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला.
हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजार असावी असा अंदाज आहे.
![]() |
| छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला |
मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, नळदुर्ग शहराच्या बाजूला येडोळा गावात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतोय. उमरगा चौरस्ता वर समाजाचे दर्शन होते. सोलापूर शहरात समाजाचे वास्तव आहे. भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदाने करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचे धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे. बहुरूपी समाजातील महिलांचे स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येते पण चर्चेत सहभागी होता येत नाही.
![]() |
| बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता. |
शिवशाही काळापासून आपल्या कलेमधून लोकांचे मनोरंजन करत असलेल्या बहुरूपी समाज आज दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वीची काळी अभंग, भारूड हे जरी यातून मनोरंजन होत असले तरी, यामध्ये अधात्म जास्त होत असे, त्यामुळे सर्वसामान्य, अडाणी लोकांना बहुरूपी समाजाचे विविध रूपे हेच मनोरंजनाचे मुख्य साधने होती. सकाळ, दुपार अन संध्याकाळची एखाद वेळ साधायची नि घराघरात, दुकानात थेट धडक द्याचयी, अन गावचा पोलीस पाटील,सरपंच, कारभारी यांना गोळा करून, उपस्थितांचे मनोरंजन करायचे, कधी हनुमान तर कधी वाघ, पोटात खुपसलेल्या सुरा आणि विविध मुखवटे धारण करणारा हा बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता.
बहुरूप्यांच्या सोंगाना तितकीच दाद मिळायची अन बिदागी ही.आज गाव असो, वा शहर बहुरूप्यांना सोंगाना कुणी विचारत नाही. कारण आजच्या आत्याधुनिक मनोरंजनाच्या दुनियेत बहुरूप्यांची पारंपारिक कला जवळजवळ लोप पावत असून, केवळ हा सोंगात बाद झाला नाही तर गावगाडयातील या समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. हा समाज फिरस्ता असला तरी, त्याला हक्काचे घर आहे ना जागा, पोटासाठी सतत स्थलांतर होत असल्याने, ना कुटुंबाकडे लक्ष देता येत ना मुलांच्या शिक्षणाकडे. उपजत कलागुणांचा कलाविष्कार असताना चित्रपट माध्यमकर्मींचे लक्ष ही त्यांच्याकडे जात नाही. त्यातच मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे बहुरूपी समाज आणि त्याच्या कलेकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
![]() |
| बहुरूपी सुदाम साळुंखे,संतोष शिंदे |
शतकानुशतकापासून कलेवर पोट भरणाऱ्या बहुरूपी समाजाला आज अनेक संकटांना तोंड दयावं लागत आहे. स्वत:चे दु:ख लपवून लोकांचे मनोरंजन करणे ठीक आहे. या कलेतून पूर्वीसारखी बदागी मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे प्रश्न सोडवणे कठिण जात आहे. विशेष म्हणजे मुलं हुशार असूनही त्यांना म्हणावे तसे शिक्षण देता नाही अशी खंत बहुरूपी सुदाम साळुंखे यांनी व्यक्त केली.
![]() |
| बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद |
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाचे साधने वाढली असली तरी, आमच्या मुलांना पारंपारिक कला जिवंत राहावी यासाठी आम्ही त्याना धडे देत असतो, नवव्या पिढीपासून ही परंपरा जोपसण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया बहुरूपी संतोष शिंदे यांनी दिली.
मागील ६५ वर्षापासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती.समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला पण यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला आहे.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( सदर लेख सोलापूर तरुण भारत मध्ये दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)




