सध्या पावसाळी दिवस असल्याने जिकडे तिकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे बळीराजा शेतीची मशागत करून काळया आईची ओटी भरताना दिसतोय. अशातच सध्या एक छायाचित्र सामाजिक माध्यमातून सर्वत्र व्हायरल झालंय. हे चित्र पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटतं, शिवाय एक शिकलेली पोरगी चक्क दोन बैलांचं औत ओढताना पाहून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही, इतके जिवंत चित्र आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेल्या माण तालुक्यातील गटेवाडी इथे बारावीत शिकत असलेल्या मनीषा खरात हिची ही कहाणी..
माणदेश म्हटलं की डोळयासमोर येतो तो दुष्काळ, दूरदूरपर्यंत ना झाडं दिसतं, ना सावली, ना पाणी, ना बागायती शेती.. दिसतं फक्त कुसळी गवत, शुष्क माळरान अन माळरानावर चरणाऱ्या मेंढया. थोर ग्रामीण साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी 'माणदेशी माणसं' या आपल्या कथासंग्रहातून माणदेशी माणसांचं आणि प्रदेशाचं रसभरित वर्णन केलं आहे. त्याचबरोबर माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या कादंबरीची नायिका शकू जशी आपल्या मेंढया सांभाळून शेती करते, अगदीअशाच प्रकारचं वास्तववादी चित्र माण तालुक्यातील गटेवाडी इथल्या मनीषा खरात हिच्या बाबतीत घडलंय. साधारण चौदाशे लोकवस्तीचं गाव.. गावात पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेतीवर अवलंबून राहता येत नाही, शिकून मोठं व्हावं असं ठरवलं तर शिक्षण घेता येत नाही.. अशीच परवड मनीषा खरात हिच्या वाटयाला आलीय. मेंढीपालन हाच मनीषाच्या कुटुंबाचा व्यवसाय. गावात वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतात विहीर आहे, पण पाणी नाही. पावसाळयात विहिरीला पाणी असतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीयांना शेळया-मेंढयांवर गुजराण करावी लागते. काळ बदलला असला तरी खरात कुटुंबीयांचं मेंढयावरचं जिणं मात्र काही थांबलं नाही. आपल्या पोराबाळांना चांगलं शिकवावं अशी त्यांची मनीषा आहे. त्यासाठी ते जिवाचं रानं करताहेत..
ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता या गावाहून त्या गावाला सतत स्थलांतर करणाऱ्या खरात कुटुंबाने आपल्या पिलांना गावात जरी ठेवलं असलं, तरी त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करणारी ऊर्जा दिलीय. अशा या वातावरणात चुणचुणीत दिसणारी मनीषा आपल्या लहान भावंडांसह आजी-आजोबांजवळ राहते. मनीषाला दोन बहिणी व एक लहान भाऊ आहे. मनीषा सगळयात मोठी. घरातील काम असो वा शेतातलं, ती मोठया मेहनतीने करते. शिक्षणातही ती कमी नाही. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिने 73 टक्के मिळवले आहेत. यंदा ती दहिवडी येथील कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. मेहनती, अभ्यासू व गुणवान विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये तिचा लौकिक आहे.
तिचे आई व वडील भीमराव खरात हे सध्या शेंळया-मेंढया घेऊन बाहेरगावी गेले आहेत. विशेषतः इथली माणसं मेहनती आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या या मंडळींना घराकडे व आपल्या काळया आईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मनीषा खरातच्या घरातही हीच परिस्थिती आहे.
आई व वडील भीमराव हे अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत झाली नाही. यंदा वरुणराजाने लवकर हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी झाला असला, तरी वर्षानुवर्षं दुष्काळाच्या छायेत वावरत असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करत असलेल्या खरात कुटुंबातील मनीषासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं - आपली पेरणी कोण करणार? मशागतीला उशीर झाला, तर पेरणीला विलंब लागेल; अशातच आई-वडिलांना गावाकडे यायचं झालं, तर त्यांना खूप उशीर होईल... असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. अशा वेळी काळया आईची ओटी भरणं आवश्यक आहे, असं तिला मनोमन वाटू लागलं. क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या नातेवाइकांकडे गेली. आपल्या घरात कर्ता माणूस नसताना, शेताची मशागत करण्यासाठी तिने बैलजोडीची मागणी केली. मनीषावर असलेल्या नातेवाइकांच्या विश्वासामुळे त्यांनी बैलजोडी दिली. त्या मिळालेल्या बैलजोडीचं तिने सोनं केलं. मनीषाने स्वतः बैलजोडी व अवजारं घेऊन औत मारायला सुरुवात केली. जवळपास दोन ते तीन एकर शेत तिने मशागत करून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली. आजूबाजूचे लोक मनीषाच्या कर्तबगारीकडे पाहून तिची पाठ थोपटत होते. शिकलेली मुलगी औत मारत असल्याची चर्चा माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे मनीषा खरात हिची सामाजिक माध्यमांत चर्चा होत आहे. तिच्या जिद्दीची कहाणी नवतरुणांना चेतना देणारी आहे.
कुठून मिळते त्यांना ही ऊर्जा?
आज शेती क्षेत्रात विविध संकटं निर्माण झाली आहेत. त्यातच शेतकरी कर्जमाफीवरून असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असताना माणसारख्या दुष्काळी भागात एक सुखद बातमी येते. आजच्या काळातील मुली शाळा आणि घर यामध्ये बंदिस्त असताना बारावीत शिकत असलेली हुशार मुलगी बैलजोडी घेऊन शेतीची मशागत करते, ही गोष्ट प्रेरणा देऊन जाते. खेडयातल्या या मुलीमध्ये इतकी संवेदनशीलता व ऊर्जा कुठून मिळते, हा एक संशोधनाचा भाग आहे. मनीषा खरातसारखी मुलगी भारतीय कृषी क्षेत्राला ऊर्जा देणारी आहे. तिच्या कर्तबगारीला सलाम तर केलाच पाहिजे, शिवाय कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी मनीषासारख्या मुलींना पाठबळ दिलं पाहिजे.
शेती क्षेत्रातील कर्तबगार महिला
चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली महिला आज विविध क्षेत्रांत झेप घेत आहे. पारंपरिक व्यवसाय असलेल्या कृषी क्षेत्रात महिला क्वचितच उतरत आहेत. मनीषा खरात ही त्यातीलच. त्यांची शेती जरी पारंपरिक असली, तरी पुरेशा पैशाअभावी त्या आधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाहीत. आज महाराष्ट्रात शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कर्तबगार महिला आहेत.
मेहनत, कुटुंबातील सुसूत्रता, मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा ध्यास घेत नगर जिल्ह्यातील महिला शेतकरी मंगल शंिदे यांनी आपल्या 10 गुंठयातील शेतीत रोपवाटिका तयार करून त्या सुमारे साठ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करतात.
चंद्रपूर जिल्ह्यात जागृत महिला समाज ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्रविकास, स्वावलंबन गट, सिंचनव्यवस्था, जीवविविधता आदी क्षेत्रांत प्रयोग करीत आहे. या भागात या शेतकरी महिलांनी जवळपास अकरा महसुली गावांतील शेतकरी महिलांमध्ये आत्मभान निर्माण केलं आहे. यामुळे हजारो महिला शेतकऱ्यांनी कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारून जमीन धारणा, सिंचनाची साधनं, खत, पशुधन, पीकपध्दती, शेतीवर होणारा खर्च व मिळणारं उत्पन्न, तसंच पूरक व्यवसाय या संदर्भात अभ्यास केला आहे. कणकवली तालुक्यातील भातडेवाडी येथील श्री कुर्ली देवी महिला बचत गटाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन गटाच्या महिलांनी भात व नाचणी शेती केली आहे. बचत गटातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गावातील पडीक जमीन भाडयाने घेऊन शेतीत बदल घडवून आणला आहे.
शेतीत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा
आपल्या देशात शेतीकामात महिलांचा 70 ते 80 टक्के सहभाग आहे. नांगरणी, ट्रॅक्टर, बैलजोडी, शेती विकणं, पाणी वळवणं, व्यवहार ही पुरुषांची कामं, तर महिलांची कामं म्हणजे निंदणी, वेचणी, काडी-कचरा, बी-बियाणं लावणं, चारापाणी करणं आणि घरातील कामं करणं. पण आज महिलांनी यात पुढे येणं गरजेचं आहे. आज शेतीतलं संकट हे शेतात काम करणारी महिला समजू शकते आणि तिच्या आवडीनिवडी, कौशल्यावर तिला शेती क्षेत्रातलं ज्ञान आणखी विकसित करता येईल. त्यामुळे महिला शेतकरी शाश्वत शेतीकडे नेणारी एक महत्त्वाची कडी आहे.
''शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास करणार!''
देशाच्या अर्थकारणात एकेकाळी शेतीचा पहिला नंबर लागत होता. देशात हरितक्रांती व श्वेतक्रांती झाली असली, तरी शेतीचा म्हणावा तितका विकास झाला नाही. शेतीची झालेली पीछेहाट काय हे मी समजून घेईन. काळानुरूप शेतीचा विकास करण्यावर माझा व माझ्या कुटुंबीयांचा भर असेल. एक मुलगी म्हणून शेती करण्यात कसलीही लाज वाटत नाही. सध्या मी बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत आहे. पुढे चांगले गुण मिळाल्यास पदवीसाठी शेती व अर्थकारणाचा अभ्यास करणार आहे. सध्या आपल्या राज्यात शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी सरकार वेगवेगळया धोरणांचा विचार करत आहे. सरकारने गरजू व गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.
- मनीषा खरात
माणदेशी शेतकरी कन्या
विकास पांढरे,९९७०४५२७६७

