बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आठवणीतला येळवस


आज आमच्या भागात (उस्मानाबाद) शेती मातीशी नातं सांगणारा 'येळवस'सण साजरा केला जातोय, यातून लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्या जात आहेत. या सणांविषयी मला नेहमीच आकर्षण राहिले आहे, गेल्या तीन-चार वर्षांपासून या सणाचा आनंद घेता आला नाही. यानिमित्ताने काही आठवणी ताज्या झाल्या.

मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्या दिवशी 'येळवस' सण साजरा केला जातो. गावातला जमीनदार, संपन्न शेतकरी, गरीब कुणबी, मजूर शेतकरी येळवसाचा सण जिव्हाळ्याने साजरा करतो.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरेमध्ये एक मिलाफ आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरा या मिळत्या जुळत्या आहेत. ह्या परंपरा शेतीशी निगडीत आहेत. थंडीचा महिना सुरू झाला की, पिकं पोटर्यात आले की आम्हा पोरांना 'येळवस'ची चाहूल लागायची, गावात कुंभार आला की या सणाची उत्सुकता शिगेला पोहोचायची, असा हा सण.

कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण म्हणून ‘येळवस' ओळखला जातो. या सणात कुंभाराच्या मडक्यापासून ते रानभाज्या, फळापर्यंत समावेश असतो. येळवसाला लागणाऱ्या भाज्या आणण्यासाठी रानात जायाचो, भाजी खुडण्यासाठी आईला मदत करायचो, चिंचेच्या झाडावर चढून गाबुळ्या चिंचा काढायचो! गोड बोरीची झाड शोधायचो... 

आई सकाळी लवकर उठून मडक्यात आबिंल भरायची मडक्यात भरलेले अंबिल नानाच्या (वडील) डोक्यावर घेऊन शेतात जात.. शेतातल्या झाडाला कडब्याच्या पेंड्याची खोप करून बांधत असत आजही परंपरा अशीच आहे. समोर दगडाचे पाच पांडव व एक द्रौपदी ठेवत, या दगडाला चुना व कावाने रंगवले जात, दगड रंगवण्याचे काम माझ्याकडे असायचे. नवैद्य म्हणून भज्जी,अंबिल,बाजारीचे उंडे, भात, वांग्याचे भरीत, केळ आणि जांब पाच पांडवासमोर ठेवली जात. रानातल्या पिकांचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करायचो..


शेतकरी सुखा व्हावा, शेतात बरकत यावी म्हणून, "ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ! यासाठी हर हर महादेव,चावर चावर चांगभलं ! म्हणतं एका ताब्यात आबिंल घेऊन रानभर पिकांवर शिंंपडायचो, रानात डोलणाऱ्या पिकांवर रोग पडू नये अशी यामागील धारणा आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार देवाच्या नावाने दुमदुमून जात, प्रत्येकाच्या शेतातून ही हाक कानी पडायची...


शेताजवळच्या म्हसोबाला...महादेवाला.. विहिरीला, बोअरला, इंजिनाला, पाण्याच्या मोटारीला, नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे असायची.

नैवेद्य दाखवली की, सगळेजण एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात जेवण करायचो, रात्रभर जागरण करून आई शेंग्याच्या पोळ्या, बाजरीचे उंडे, वरण भात, खिचडी, भज्जी तयार करून ठेवायची. मला भज्जी खूप आवडायची, आजही आवडते. ही भज्जी म्हणजे सर्व पालेभाज्या व फळभाज्या एकत्र करून केलेली भाजी होय. जेवण झाल्यावर प्यायला आबिंल मिळायचे, रानातचं आई दगडाची चूल तयार करायची, रानाल्या गवर्या गोळा करून एका मडक्यात दूध तापवायला ठेवायची.


दुपारच्या येळला दोस्तांबरोबर शिवारात मोहोळ झाडत फिरायचो, त्यासाठी सगळे शिवार पालथे घालायचो, एकदा मला म्हवळाची माशी चावली होती.. क्षणात डोळा सुजला.. तरीही धुराचा ठेंभा करून मोहोळ झाडतच फिरलो. यादिवशी मध खाल्ले पाहिजे अशी धारणा आहे.

कुणाच्या तरी शेतात हुरडा असेल तर याचाही आस्वाद घ्यायचो, विहिरीत पोहायचो, सुरपारंबा खेळायचो, विंडी दांडू खेळायचो..अशा कितीतरी आठवण आजही फक्त मनात घर करून बसल्या आहेत.
कडूस पडले की गावचा पाटील हेंडगा घेऊन मारुतीच्या देवळासमोर यायचा, गावातली सगळी पोरं गोळा व्हायची, हेंडग्याच्या पाठीमागे आम्ही पोरं उभे राहून चांगभलं म्हणतं, मंदिराला प्रदक्षिणा घालायचो,थंडीपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून मारुतीच्या देवळासमोर हेंडगा ठेवला जातो. कडूसं पडलं की एकेक शेतकरी रानातून घराकडे परतत असत, आबालवृद्धांच्या चेहर्यावर तेज दिसून येत असत.


निसर्ग आणि शेती यांच्यात आदिम नाते आहे. लोकसंस्कृती नेहमी निसर्गन्मुख जीवनशैलीतून साकार झाली आहे. शेतकरी नेहमीच मातीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगत आला आहे. पाणी, पशु - पक्षी, झाडे, नद्या यांच्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते, याची जाणीव शेतकर्यांना असते.

म्हणूनच येळवस हा सण आजही टिकून आहे. त्याचे मूळ आदिम आहे. या सणाचे अंश आमच्या पिढीमध्ये पाझरत आहेत. म्हणूनच शहरात राहूनही, विज्ञानाने सारे कवेत घेतले असतानाही या सणांविषयी यत्किंचितही महत्त्व कमी झाले नाही. ही नाळ अधिकाधिक घट्ट राहील,अस प्रयत्न करत राहीन.
©विकास पांढरे
फोटो- समाज माध्यमातून
(५जानेवारी२०१९)

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

कांद्याची गोष्ट



आज सकाळी गावाकडच्या एका तरूण शेतकरी मित्राचा फोन आला.  त्याच्या बोलण्यात आनंद  होता. तो आपल्या कांद्याची गोष्ट सांगू लागला.''यंदा पावसानं चांगलीच कमालच की राव.. शेतात पाणीच पाणी होतं.. खरीपाचं पिकं हाती लागलं नाही. जे हाती आलं त्याचा खर्च ही निघाला नाही. खरीपाकडं मोठी आशा लावून धरलो होतो.. तेही वाहून गेलं होतं. अतिवृष्टीनंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची असा प्रश्न उभा होता..सगळचं इस्कटून गेलं होतं.. दिवाळी साजरी करता आली नाही.. लेकरांना कपडे घेता आले नाहीत.. असा विस्कटलेला संसार कसा उभा करायचा ? हे एक मोठं आव्हान होतं. उरल्यासुरल्या कांद्यावर आशा ठेवून होतो. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाला.  खर्चवजा जाऊन हातात चांगले पैसे आले. यामुळं नवीन दिवस येतील असं नाही. पण मी समाधानी आहे...

'कांदा कधी हसवतो तर कधी रडवतो'मागच्या साली व्याजाने पैसे काढून कांद्याची लावण केली पण दोन रूपये भाव मिळाला आणि सगळं गणितचं बिघडलं. काय करावं ? समजत नव्हतं. थोडसं सावरलं. पुन्हा जोमानं शेतात उतरलो.. पुन्हा कांदा लावला.. यंदा समाधानापेक्षा जास्त कांद्याला भाव मिळाला..
ज्याच्या कांदा अजून रानात आहे त्यांना ही  चांगला भाव मिळावा...येत्या महिना, दोन महिन्यात शेतातला आणखीन कांदा बाहेर येणार आहे.  बाजारात  आवक वाढली तर या कांद्याला कवडीची किंमत मिळणार नाही. ज्यांनी व्याजाने पैसे काढून कांदा लावला आहे आशांचे अश्रू पुसायला कोणी येणार नाही.  शेतीचं जग समजून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर यावं लागेलं.''खरंच या तरूण शेतकरी  मित्राचे बोल ऐकून मी  थोडा वेळ स्तब्ध झालो आणि  विचार करू लागलो..

मी शेतकरी कुटुंबातला आहे. शेतीचे प्रश्न जास्त मला समजतात असे नाही. वाढत्या वयाबरोबर  हे प्रश्न अधिकाधिक समजून घेऊ लागलो. त्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र मांडण्याची कुवत माझ्यात नाही. 'आज शेती परवडत नाही आणि सोडता ही येत नाही' अशी परिस्थिती आहे.

कधी नव्हे यंदा कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचे कारण नैसर्गिक आहे. या भाववाढीबद्दल बाजारात चांगलीच चर्चा होत आहे. किलोभर कांदा विकत घेणे  सर्वसामान्य माणसाच्या आवक्यात राहिलेले नाही. या महागाईला जबाबदार कोण? हा ठरलेला प्रश्न सहज ऐकायला मिळत आहे.तर दुसऱ्या बाजूला इतर वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत याबद्दल कोणीही काहीही बोलायला तयार नाही... कांद्यावरच जास्त चर्चा होतीय, असे का?

कांदा हा कंद वर्गातील भाज्यामधील महत्वाचे पीक समजले जाते. भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा आविभाज्य भाग बनला आहे. म्हणूनच कांदा हे एक व्यापारीदृष्टया महत्वाचे नगदी पीक आहे. एकाच वर्षी अनेकवेळा उत्पादन घेणारे हे पीक आहे. मे ते ऑगस्ट महिन्यात कांद्याचा भाव कमी असतो. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत कांद्याला कधी जास्त भाव तर कधी कमी भाव मिळतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.  त्याला  शासकीय धोरणे कारणीभूत आहेत.
महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य समजले जाते. देशातील एकूण कांदा उत्पादनापैंकी 25 ते 30 टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा क्षेत्र हे एकटया नाशिक जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही कांदा बाजारासाठी आशिया खंडात प्रसिध्द आहे. सोलापूर, नगर, धुळे  ह्या बाजारपेठाही कांदा विक्रीसाठी महत्वाच्या समजल्या जातात.

 महाराष्ट्रात तीन प्रकारच्या कांद्याची लागवड केली जाते. संगमनेर, माण,  फलटण या तालुक्यातील शेतकरी हळवा कांद्याची लागवड करतात. मे महिन्यात रोपे टाकून पुर्नलागवड केली जाते. उर्वरित महाराष्ट्रात पोळ कांदा लावला जातो. जून महिन्यात रोपे टाकून ऑगस्ट महिन्यात या जातीच्या कांद्याची लागवड केली जाते.  त्यानंतर रांगडा कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात या कांद्याची रोपे टाकून जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात पुर्नलागवड केली जाते. साधारणतः ज्याच्याकडे मुबलक पाणी आहे,  आशांसाठी या कांद्याची लागवड करणे सोयीस्कर आहे.

 कांद्यावर फुलकिडे व करपा या दोन रोगाचा प्रार्दुभाव होत असतो. लहरी हवामान, अवकाळी पाऊस या नैसर्गिक कारणामुळे शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे अवघडच बनले आहे, असे असले तरी महाराष्ट्रात कांद्याची विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारण यातून शेतकऱ्यांना कधी नफा मिळतो तर कधी तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्याला कांदा विक्री खूप काळजीपूर्वक करावी लागते. आपल्या कांद्याला अधिकतेचे उत्पन्न मिळविण्यासाठी त्याला योग्य बाजारपेठाचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला कांद्याची प्रतवारी करताना सडलेले कांदे, काळपट पडलेले कांदे फेकून द्यावे लागतात, असे काही सगळे करावे लागते.

जो शेतकरी आपल्या कांद्याची विक्रीचे व्यवस्थापन करतो त्याला समाधानकारक भाव मिळतो. पण बाजारातील अपूर्णता व शेतीमलाचे नाशवंत स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मागच्या वर्षी शेतकऱ्याला कांद्याला दोन रूपये भाव मिळाला.शहरात कांदा दोन किलोने मिळाला का? यात व्यापार आणि दलालाची चांगलीच कमाई होते. तोच कांदा व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा रूपयाला विकला. कांदा प्रश्न कधी कळीचा मुद्दा कधी बनला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 1980 च्या दशकात चाकण बाजार समितीत कांद्याला निच्चांकी दर मिळाला म्हणून शेतकरी संघटनेचे प्रेणते शरद जोशी यांनी कांदा आंदोलन केले होते. त्यानंतर कांदा हा विषय माध्यमात चर्चेला येऊ लागला. अटलजींच्या काळात कांदा 80 रूपये किलोवर गेला होता. त्यामुळे त्याचे सरकार गडगडले असाही एक अंदाज वर्तवला जातो.  यामुळे कांदा हा विषय किती संवेदनशील झाला आहे हे लक्षात येते.

 आज अनेक वर्षानंतर कांद्याला विक्रमी दर मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे तर सर्वसामान्य ग्राहक दुखावला गेला आहे. आज शेती, शेतकरी विविध संकटात सापडला आहे, गावे ओस पडू लागली आहेत, गावातील मजूर शहराकडे धाव घेऊ लागला आहे. शेती अवजारे, खते आणि औषधे दुपट्टीने वाढले आहेत. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. पाण्याचा पंपाची किंमत वाढलीय, मजूरांच्या रोजंदारीत वाढ झालीय यावर कुणी चर्चा करत नाही. याला कोणी महागाई म्हणत नाही. भाववाढ झाली म्हणून कोणी आंदोलनही करत नाही. शेतकरी आमची लाज राखतो... तो आम्हाला वस्त्र पुरवतो.. अन्नधान्य पुरवतो.. तरीही आमच्या बांधवांना  शेतीमालाचे भाव वाढले की फटका बसतो.. हे कुठे तरी  थांबले पहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही.  भाव व भांडवल या दृष्टचक्राचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय.

  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर त्यालाच पुरेसे भांडवल उभा करता येईल. त्यातून त्याचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावेल. त्यासाठी  शेतीमालाला संरक्षण मिळण्यासाठी बाजार ठिकाणाच्या गावात गोदामे, शीतगृहे व वखारी बांधल्या पाहिजेत.

विशेष म्हणजे आपल्या राज्यात कांदा हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते आणि कांद्याचे वर्षभरातील भाव लक्षात घेता या पिकावर छोटया-मोठया गावात प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा उद्योग उभा केला तर कांद्याच्या बाजाराभर नियंत्रण आणता येईल, विशेष म्हणजे भाव वाढवण्यास व स्थिर राहण्यासाठी मोठी मदत होईल.
©विकास पांढरे, ९९७०४५२७६७







कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...