शेतकरी आत्महत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकरी आत्महत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ मार्च, २०१७

हॅलो, मी साहेबराव करपे बोलतोय !


साहेबराव :-  हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय...

सरकार :   ....

साहेबराव :- सरकार... यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात माझी शेती होती.वाडा होता.घरात वारकरी संप्रदायाचा वारसा होता. येळ मिळेल तवा भजनात दंग व्हायचो. चाळीस एकर शेती मन लावून करायचो. माझी पत्नीही मला साथ द्यायची.. आपली शेती अन् भजन बरं! यातचं आम्ही समाधान मानायचो. ध्यानीमनी नसताना गावकऱ्यांनी मला सरपंच केलं.. अकरा वर्ष सरपंचपद भोगलो, पण आम्हा कुणब्याला यातलं काय समजलं नाय, काळी आईची सेवा करण्यात आमची जिंदगाणी गेली.. कुठलं आलं ते राजकारण..

सरकार :-  .....

साहेबराव  :- सरकार काय सांगू ? आमचा भाग दुष्काळी. हमखास पाऊस देणारी नक्षत्रं कोरडीच गेली होती. लोक हवालदिल झाली होती. घरात अन्न नव्हतं.. हातात पैसा नव्हता..डोक्यावरचं कर्ज वाढतच होतं..गुंठा गुंठा विकत गेलो पण कर्ज काय फिटलं नाय.. कापसाला भाव मिळत नव्हता.. वीजेचं बिल यायचं तेच फेडत बसायचो. सगळा इस्कोट व्हायचा.. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं घरात कधी सण साजरा केला नाय.दिवाळीत मात्र कालावाकालव व्हायची, माझ्या चिमुकल्याना ना नवीन कपडे ,ना फटाके दयायची ऐपत नसायची. चटणी भाकर खाऊन बछडे वाढवली. 

बायकोला ना कधी नवीन साडी घेऊन देता आली. या फाटक्या संसारात काळी आईची सेवा करत राहिलो. जित्राबात मन लागत होतं. माझ्या दोन खिल्लार बैलजोडीवर सर्व शेत नांगरत होतो. त्यांच्यामुळं बळ मिळायचं. पण कर्जापायी आठवडी बाजारात त्यांना विकून आलो. इथंही व्यापारी आणि दलालानं गंडवलं. असं सगळं सुरू होतं सर्व ते सहन होतं नव्हतं, सरकार, सर्व पुढे आक्रीतच घडत गेलं....

सरकार :-

साहेबराव :- "पावसाची वाट पाहून व्याकुळ झालो होतो, देणेकरी रोज दारात येऊन बसायचे, तुमच्या बँकेचे लोक यायचे. म्हणायचे- फेडता येत नाही तर घेता कशाला ? मी अगदी शांत ऐकायचो, थकीत वीज बिलापोटी वीज तोडणी करण्यात आली.  ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला होता.. कर्ज आणि बिल फेडण्याची चिंता लागून राहिली होती.
"ती" जमिनीत पाय रोवून उभी राहात म्हणायची,
"पाऊस येतोय न्हवं का"  आशाभूळत नजरेने आभाळाकडं एकटक बघायची. कधी कर्ज फेडू आणि सुखाचा संसार करू असं तिला वाटायचं, माझं पिल्लं ही खूप गोड होती. त्या निरागस बालकांना रानशीळ खूप आवडायची.. मातीच्या सुवासाने गंधित झालेला वारा, हिरवी मखमल पांघरलेले रान, रानात आपल्याच नादात ती सर्व जण खेळत, बागडत...रंगीबेरंगी पक्षी, गायवासरे, पक्षाची आणि जित्राबाची गोड सुरावट ऐकून ते आनंदित आसयाची. त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हर्षोल्हास व्हायचा, आज ३१ वर्षानंतर पुन्हा मन भरून आलं. आज माझ्या मुलांची लग्ने झाली असती. कुणी शेत, तर कुणी घराकडं लक्ष दिलं असतं, आम्ही दोघं म्हातारी, ढालजत स्वस्थ पडून बघायचं..एवढं स्वप्न आमच्या नशीबी नव्हतं.....

सरकार :-

   साहेबराव :- सरकार, काही तरी नवीन करावं? असं काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही पती-पत्नीनं  मनाशी ठरवलं.मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलो,
 १९ मार्च १९८६ रोजीचा दिवस. मी, पत्नी आणि चार मुलांसह कुष्ठधामात आलो. तिथं खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीनं भजने गायलो. सोबत आणलेल्या स्टोव्हवर बायकोनं भजी तळली. त्यात विषारी औषध मिसळलं. मुलांना भजी खायला दिलो.एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ बायकोसह मी ही जगाचा निरोप घेतला. आज या घटनेला ३१ वर्ष पूर्ण झाली. सरकार, मी कुणालाही दोष दिला नाही? तसं चिठ्ठीत लिहून ठेवलो होतो. त्यामुळं अनुदान, कर्जमाफी, तातडीची मदत असं काही अशा आणि अपेक्षा नव्हत्या, कारण, शेतकरी जात स्वाभिमानी असतीय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, मी जागतिकीकरणाचा पहिला बळी ठरलो, अशा बातम्या छापून यायच्या, ९० नंतर जागतिकीकरणाचं युग सुरु झालं. त्या काळात माध्यमांचं इतकं पेव फुटलं नव्हतं. शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार पूर्वापार चालत आलाय. शेतकरी आत्महत्या माझ्यापासून सुरु झाल्या अशी नोंद आहेत.पण माझ्या ही आधी कुणी तरी केली असेल, त्याची फक्त दखल घेतली नसेल?आज शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.  केंद्राचे पथक येऊन गेले.निधी मिळाला पण आत्महत्या काय कमी होत नाहीत. पी.साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणं २००५ पर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१७ पर्यंतचा आकडा सांगू नका?

मागे एकदा-
"पंतप्रधान म्हणाले,
घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात,
सरकार तुम्हीच सांगा?देशाचं आणि राज्याचं नियोजन जमलं नाही म्हणून तुम्ही आत्महत्या केल्या होत्या का ? कुणी साले म्हणाले, तर कुणी धरणात...काय काय?
सरकार :-
साहेबराव :- मायबाप सरकार, मला माहित आहे, कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात, सरकारला एकांगी, एककल्ली, एकदेशीय भूमिका घेता नाही.पण जिवंत माणूस जेव्हा आत्महत्या करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्य, न्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
नापिकी,दुष्काळ, वाढत्या उत्पादन खर्चामुळं न परवडणारी, ढासळून पडणारी कृषी व्यवस्था यामुळंच रोज एक 'बळी'चा बळी जातोय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, आमची अजून किती परवड होणार? .शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेची चावी किती वेळा घेता ?आज विरोधी पक्षात असलेले काल सत्तेत होती, आज सत्तेत असलेली मंडळी काल विरोधी पक्षात होती. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला परवडेल असा भाव द्या साहेब, भांडवलदार, उद्योगपती आमच्या जमीनी  कमी मोबदल्यात घेऊन  डल्ला मारतायेत,  जमीनविषयक नवे नवे कायदे आमचा घात करणारी आहेत. 

सरकार :-
साहेबराव :- सरकार, हरितक्रांती, धवल क्रांती चा मूठभर लोकांना फायदा झाला. मागे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफीचा आम्हाला कितपत फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. मायबाप सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. खेडी ओस पडताहेत. आमचा शेतकरी शेती, बैल, बारदाना, गुरे -ढोरे, गाई-वासरे, झाडे यांच्याशी अंत:करण पूर्वक जोडला गेलाय. आज त्यांच्या मुलांची शेतीकडे बघण्याचा कल बदलत चाललाय. माझा बाप शेतीत मेला, मी मरणार नाही, ही त्याची भूमिका बनत आहे. त्याची ही मानसिकता बरोबर आहे. पण माझी काळी आई कोण सांभाळेल. नव्या बदलांमुळं त्याचं होरफळलेलं मन फक्त तुम्हीच बदलू शकता तरच जगाचा पोंशिदा जगेल. एवढीच मागणी मान्य कराल, अशी अपेक्षा आहे.    
       धन्यवाद    
         आपला
 साहेबराव करपे, पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी

  लेखक - विकास पांढरे, मु.पो.इटकळ, ता.तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद. मो.९९७०४५२७६७ ईमेल आयडी : vikaspandhare3@gmail.com
(टिप : वरील आशय कल्पानिक आहे, त्यामुळे व्यक्तिंशा कुणी अर्थ काढू नये. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रकट केलेल्या भावना आहेत.)

फोटो :इंटरनेट सेवा

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

शेतकरी आत्महत्या की खून ?

  • देशभरातील वाढत्या अतिरेकी काभारतात प्रत्येक तासाला 18 ते 25 आत्महत्यांची नोंद आजमितीस होत आहे. विशेष म्हणजे  महाराष्ट्रात गेल्या दोन दशकापासून वर्षापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. मुळात शेतकर्‍यांचा आत्महत्या  सर्वात मोठा जागतिक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. या आत्महत्या रोखण्यासास  शासनस्तरावरून  कितीही प्रयत्न होत असेल तरी,  विषयाकडे गांभीर्यपणे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळत नसल्याची खंत आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या ‘आत्महत्या नसून खूनच’ आहे असे संबोधावे लागेल.  जागतिक आत्महत्याविरोधी दिनानिमित्त घेतलेला हा वेध. 

  •  जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण व त्यामुळे वाढणार्या  ताण-तणावातून  शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास कोणालाच सवड-फुरसत  मिळत  नाही, तर  कोणीही तसा प्रयत्नही करीत नाही.आत्महत्या, शब्दोच्चार देखील भीतिदायक वाटतो तितकाच   गंभीर. आत्महत्येस प्रवृत्त करते मन.  मनाभोवती अत्यंत दाट खिन्नता, डिप्रेशन व नाराजीचे वलय निर्माण होते. या जगात, समाजात, कुटुंबात आता जीवन जगण्यातील अर्थच संपला, म्हणून स्वत:ला संपण्यासाठी मन प्रवृत्त होऊन आत्महत्या केली जाते. 

  •  यात प्रामुख्याने भरडला जातोय तो जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी.  दुष्काळी फेरा, नापिकी, कर्ज,  मुलांचे शिक्षण,  लग्न यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणाच मोडला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना  राबवल्या जात असताना आत्महत्यांचा आकडा उत्तरोत्तर वाढत चालला आहे. वर्षभरात देशातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 40  टक्क्यांनी वाढल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक येतो. 

  •  अनुशेषाचे योग्यवाटप नाही

  • सर्वाधिक  आत्महत्या या मराठवाडा आणि विदर्भात होत आहेत.  या भागाचा विकास करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहेत.  पण अनुशेषाचे योग्यवाटप होत नसल्या कारणामुळे येथील शेतकरी विकासापासून वंचित आहेत. या भागातील शेतकर्‍यांच्या मुलभूत गरजा कोणत्या आहेत .
  • याकडे गांभीर्याने घेणे हे अजून तरी तेथील स्थानिक नेत्यांना सुचले नाही. मराठवाडा, विदर्भ या भागांविषयी तेथील कोणताच नेता पोट तिडकीने बोलल्याचे येथील जनतेला आठवत नाही. हे कोणाचे दुर्दैव? प्रशासन यावर उपायात्मक मार्ग काढण्यासाठी असफल ठरली आहे.

  • पाऊस झाला की दुर्लक्ष

  • पाऊस झाला की सरकार शेतकर्यांच्या आत्महत्या विसरून जातो.  तिथेच खरी गल्लत होते.  शेतकर्यांच्या आत्महत्येवरील उपाययोजना ही दीर्घकालीन असली पाहिजे.  त्यासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे.  ते पैसे काटेकोरपणे खर्च केले पाहिजेत.  तरच आजचे चित्र बदलू शकते.

  • आत्महत्येचा फुगा वाढतोय

  •      आपल्या देशात ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत   दुष्काळ पडत  आहे. 1972 साली लोकशाहीतील सर्वात मोठा दुष्काळ पडला.  त्यानंतर नव्वदच्य ा दशकापासून दुष्काळाने पाठ फिरवली नाही.  2015-16  सालात दुष्काळाने शीग गाठली आहे.  दुष्काळे कामे झाली,  पण विदर्भ व मराठवाड्यात  आत्महत्येचे सञ सुरूच आह 1995 ते 2011 पर्यंत देशात 2 लाख 940 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो सांगतो,  यापैकी महाराष्ट्रातील आत्महत्येची आकडेवारी 53 हजार 818 इतकी आहे.

  • आत्महत्येची ठळक प्रमुख कारणे 

  •  नापिकी व कर्जबाजारीपणा
  •   सातत्याने उद्भभवत असलेली दुष्काळी परिस्थिती 
  •  खासगी संस्था, सावकार यांच्या वसुलीच्या तगादा
  •  मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न येण
  •   मुलाला शिकविले परंतु त्याला नोकरी न लागणे
  • सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे लोण
  • शेजारच्या मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्येने थैमान घातले असताना, याचे लोण सोलापूरातही पोहोचले आहे. सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे सधन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या हा विषय विदर्भ व मराठवाड्यात सीमित न राहता प. महाराष्ट्रात पोहोचले आहे.


  • महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या  आकडेवारी

  • वर्षे                  संख्या
  • 2000              3022
  • 2001              3536
  • 2002              3695
  • 2003              3836
  • 2004              4147
  • 2005             3926
  •   2006             4453
  • 2007                4238
  •   2008              3802
  • 2009               2872
  • 2010               3141
  • 2011             3337
  • 2012             4300
  • 2013              3146
  • 2014              4004
  • 2015              1841
  • (जागतिक आत्महत्याविरोधी दिन विशेष.दै.पुढारी10सप्टेंबर 2016)
  • सोलापूर : विकास पांढरे

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...