सोमवार, २० मार्च, २०१७

राजस्थानच्या शुष्क वाळवंटातील वृक्षपुरूष...!



ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा जास्त झाडे लावून, तन, मन, आणि धनाने जागविणार्‍या विष्णू लांबा या वृक्षप्रेमी तरूणाच्या कार्याला सलाम ठोकले पाहिजे.
देशात पर्यावरणाबद्दल जागरूकता आलेली आहे.  जसजशी लोकसंख्या वाढत आहे. नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे. त्याबरोबरीने पर्यावरण वाचावे. जंगल नष्ट होऊ नयेत आणि वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी विविध समाज संस्थेकडून
प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात वृक्ष, प्राणी पक्ष्यांचे महत्वाचे स्थान आहे.  पर्यावरणाचा समतोल राखावा,  वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी राजस्थान सारख्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाख झाडे लावून जगण्याचे अतुलनीय कार्य विष्णू लांबा या तरूणाने केले आहे.

 इतकेच नाहीतर तब्बल नऊ लाख झाडे तोडण्यापासून वाचविणारा लांबा हे राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ात वृक्षपुरूष म्हणून ओळखले जात आहेत.
लहानपणी आजूबाजूच्या लोकांनी लावलेली झाडे चोरून आणून आपल्या भागात लावण्यात ते पटाईत होते. एवढेच काय त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या रोपवाटिकेतून झाडे चोरून आणून आपल्या घरी लावली.


 लांबाचे काका यांनी त्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या घरी घेवून गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी चोरी करणे वाईट आहे,  मात्र झाडे लावणे चांगले आहे. असे म्हणत त्यांना काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी त्यांनी सात वर्षे घर सोडले.  पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागले.  समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल,  त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. लांबा यांच्या कार्याचा विषय प्रथम लोकांनी थट्टेवारी नेला.  पण त्यांच्या चांगुलपणाचा आणि निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व कळल्याने,  लांबा यांच्या कार्यास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  हाच लांबा आता राजस्थानच्या शुष्क वाळवंटात पर्यावरणाचा जतन करणारा आणि वृक्षलागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍यासाठी आयकॉन बनला आहे.



 बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,  अजय देवगण,  सुभाष घई, अनुराग कश्यप,  अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.  तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर,  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे,  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लांबा यांच्या कार्याचा गौरव केला आहे.  वृक्षमिञ म्हणून ओळख असलेल्या लांबा यांनी प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना पाच झाडे भेट देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
हुंड्यात मागितली झाडे
लांबा यांच्या भावाच्या लग्नासाठी हुंडा किती घ्यावा यावर चर्चा सुरू होती.  यावेळी लांबा यांच्या वडिलांनी विष्णू आमचा मोठा मुलगा आहे. हुंड्याचं त्यालाच विचारा असे सांगितल्यावर वधूकडील मंडळी अचंबित झाले.  लांबा ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी जातात तिथे वधु वराच्या हस्ते वृक्षारोपण करवतात.  त्यामुळे लांबा हे नाव राजस्थान मध्ये सर्वञ परिचित झाले आहे.

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्च २०१६ रोजी दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख )

..........................................

शनिवार, १८ मार्च, २०१७

हॅलो, मी साहेबराव करपे बोलतोय !


साहेबराव :-  हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय...

सरकार :   ....

साहेबराव :- सरकार... यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात माझी शेती होती.वाडा होता.घरात वारकरी संप्रदायाचा वारसा होता. येळ मिळेल तवा भजनात दंग व्हायचो. चाळीस एकर शेती मन लावून करायचो. माझी पत्नीही मला साथ द्यायची.. आपली शेती अन् भजन बरं! यातचं आम्ही समाधान मानायचो. ध्यानीमनी नसताना गावकऱ्यांनी मला सरपंच केलं.. अकरा वर्ष सरपंचपद भोगलो, पण आम्हा कुणब्याला यातलं काय समजलं नाय, काळी आईची सेवा करण्यात आमची जिंदगाणी गेली.. कुठलं आलं ते राजकारण..

सरकार :-  .....

साहेबराव  :- सरकार काय सांगू ? आमचा भाग दुष्काळी. हमखास पाऊस देणारी नक्षत्रं कोरडीच गेली होती. लोक हवालदिल झाली होती. घरात अन्न नव्हतं.. हातात पैसा नव्हता..डोक्यावरचं कर्ज वाढतच होतं..गुंठा गुंठा विकत गेलो पण कर्ज काय फिटलं नाय.. कापसाला भाव मिळत नव्हता.. वीजेचं बिल यायचं तेच फेडत बसायचो. सगळा इस्कोट व्हायचा.. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं घरात कधी सण साजरा केला नाय.दिवाळीत मात्र कालावाकालव व्हायची, माझ्या चिमुकल्याना ना नवीन कपडे ,ना फटाके दयायची ऐपत नसायची. चटणी भाकर खाऊन बछडे वाढवली. 

बायकोला ना कधी नवीन साडी घेऊन देता आली. या फाटक्या संसारात काळी आईची सेवा करत राहिलो. जित्राबात मन लागत होतं. माझ्या दोन खिल्लार बैलजोडीवर सर्व शेत नांगरत होतो. त्यांच्यामुळं बळ मिळायचं. पण कर्जापायी आठवडी बाजारात त्यांना विकून आलो. इथंही व्यापारी आणि दलालानं गंडवलं. असं सगळं सुरू होतं सर्व ते सहन होतं नव्हतं, सरकार, सर्व पुढे आक्रीतच घडत गेलं....

सरकार :-

साहेबराव :- "पावसाची वाट पाहून व्याकुळ झालो होतो, देणेकरी रोज दारात येऊन बसायचे, तुमच्या बँकेचे लोक यायचे. म्हणायचे- फेडता येत नाही तर घेता कशाला ? मी अगदी शांत ऐकायचो, थकीत वीज बिलापोटी वीज तोडणी करण्यात आली.  ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला होता.. कर्ज आणि बिल फेडण्याची चिंता लागून राहिली होती.
"ती" जमिनीत पाय रोवून उभी राहात म्हणायची,
"पाऊस येतोय न्हवं का"  आशाभूळत नजरेने आभाळाकडं एकटक बघायची. कधी कर्ज फेडू आणि सुखाचा संसार करू असं तिला वाटायचं, माझं पिल्लं ही खूप गोड होती. त्या निरागस बालकांना रानशीळ खूप आवडायची.. मातीच्या सुवासाने गंधित झालेला वारा, हिरवी मखमल पांघरलेले रान, रानात आपल्याच नादात ती सर्व जण खेळत, बागडत...रंगीबेरंगी पक्षी, गायवासरे, पक्षाची आणि जित्राबाची गोड सुरावट ऐकून ते आनंदित आसयाची. त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हर्षोल्हास व्हायचा, आज ३१ वर्षानंतर पुन्हा मन भरून आलं. आज माझ्या मुलांची लग्ने झाली असती. कुणी शेत, तर कुणी घराकडं लक्ष दिलं असतं, आम्ही दोघं म्हातारी, ढालजत स्वस्थ पडून बघायचं..एवढं स्वप्न आमच्या नशीबी नव्हतं.....

सरकार :-

   साहेबराव :- सरकार, काही तरी नवीन करावं? असं काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही पती-पत्नीनं  मनाशी ठरवलं.मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलो,
 १९ मार्च १९८६ रोजीचा दिवस. मी, पत्नी आणि चार मुलांसह कुष्ठधामात आलो. तिथं खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीनं भजने गायलो. सोबत आणलेल्या स्टोव्हवर बायकोनं भजी तळली. त्यात विषारी औषध मिसळलं. मुलांना भजी खायला दिलो.एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ बायकोसह मी ही जगाचा निरोप घेतला. आज या घटनेला ३१ वर्ष पूर्ण झाली. सरकार, मी कुणालाही दोष दिला नाही? तसं चिठ्ठीत लिहून ठेवलो होतो. त्यामुळं अनुदान, कर्जमाफी, तातडीची मदत असं काही अशा आणि अपेक्षा नव्हत्या, कारण, शेतकरी जात स्वाभिमानी असतीय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, मी जागतिकीकरणाचा पहिला बळी ठरलो, अशा बातम्या छापून यायच्या, ९० नंतर जागतिकीकरणाचं युग सुरु झालं. त्या काळात माध्यमांचं इतकं पेव फुटलं नव्हतं. शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार पूर्वापार चालत आलाय. शेतकरी आत्महत्या माझ्यापासून सुरु झाल्या अशी नोंद आहेत.पण माझ्या ही आधी कुणी तरी केली असेल, त्याची फक्त दखल घेतली नसेल?आज शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.  केंद्राचे पथक येऊन गेले.निधी मिळाला पण आत्महत्या काय कमी होत नाहीत. पी.साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणं २००५ पर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१७ पर्यंतचा आकडा सांगू नका?

मागे एकदा-
"पंतप्रधान म्हणाले,
घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात,
सरकार तुम्हीच सांगा?देशाचं आणि राज्याचं नियोजन जमलं नाही म्हणून तुम्ही आत्महत्या केल्या होत्या का ? कुणी साले म्हणाले, तर कुणी धरणात...काय काय?
सरकार :-
साहेबराव :- मायबाप सरकार, मला माहित आहे, कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात, सरकारला एकांगी, एककल्ली, एकदेशीय भूमिका घेता नाही.पण जिवंत माणूस जेव्हा आत्महत्या करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्य, न्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
नापिकी,दुष्काळ, वाढत्या उत्पादन खर्चामुळं न परवडणारी, ढासळून पडणारी कृषी व्यवस्था यामुळंच रोज एक 'बळी'चा बळी जातोय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, आमची अजून किती परवड होणार? .शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेची चावी किती वेळा घेता ?आज विरोधी पक्षात असलेले काल सत्तेत होती, आज सत्तेत असलेली मंडळी काल विरोधी पक्षात होती. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला परवडेल असा भाव द्या साहेब, भांडवलदार, उद्योगपती आमच्या जमीनी  कमी मोबदल्यात घेऊन  डल्ला मारतायेत,  जमीनविषयक नवे नवे कायदे आमचा घात करणारी आहेत. 

सरकार :-
साहेबराव :- सरकार, हरितक्रांती, धवल क्रांती चा मूठभर लोकांना फायदा झाला. मागे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफीचा आम्हाला कितपत फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. मायबाप सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. खेडी ओस पडताहेत. आमचा शेतकरी शेती, बैल, बारदाना, गुरे -ढोरे, गाई-वासरे, झाडे यांच्याशी अंत:करण पूर्वक जोडला गेलाय. आज त्यांच्या मुलांची शेतीकडे बघण्याचा कल बदलत चाललाय. माझा बाप शेतीत मेला, मी मरणार नाही, ही त्याची भूमिका बनत आहे. त्याची ही मानसिकता बरोबर आहे. पण माझी काळी आई कोण सांभाळेल. नव्या बदलांमुळं त्याचं होरफळलेलं मन फक्त तुम्हीच बदलू शकता तरच जगाचा पोंशिदा जगेल. एवढीच मागणी मान्य कराल, अशी अपेक्षा आहे.    
       धन्यवाद    
         आपला
 साहेबराव करपे, पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी

  लेखक - विकास पांढरे, मु.पो.इटकळ, ता.तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद. मो.९९७०४५२७६७ ईमेल आयडी : vikaspandhare3@gmail.com
(टिप : वरील आशय कल्पानिक आहे, त्यामुळे व्यक्तिंशा कुणी अर्थ काढू नये. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रकट केलेल्या भावना आहेत.)

फोटो :इंटरनेट सेवा

शनिवार, ११ मार्च, २०१७

यशवंतराव आणि उजनी धरण विस्थापितांचा विकास


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राच्या समृध्दीला कारणीभूत आहेत. त्यांच्या  संकल्पनेतून  साकार झालेली सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची निर्मिती हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे ‘दुष्काळी जिल्हा’ हा  सोलापूर  जिल्ह्यावर मारलेला शिक्का पुसला गेला. उजनी धरणनिर्मितीबद्दलचा विशाल दृष्टिकोन आणि पुनर्वसन संबंधित विचाराबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिशादर्शक विचार मांडले होते. आज उजनी धरणामुळे 52 गावे विस्थापित झाले आहेत. या गावांचा अद्याप मूलभूत विकास झाला नाही. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या विचारांतून विस्थापित गावांचा विकास होणे गरजेचे आहे.

 यशवंतरावांचे स्मरण

आपल्या  40 वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला  दिशा देण्याचे आणि समतोल व जातीभेदरहित राजकारणाचा  वारसा देण्याचे कार्य  स्व. चव्हाण यांनी केले. शेती, सहकार, पंचायत राज, साहित्य, उद्योग, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय असे योगदान दिले. त्यामुळेच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हटले जाते. 12 मार्च हा त्यांचा जन्मदिवस. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी जलायशाच्या निर्मितीमागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 उजनी धरणाची निर्मिती
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात 7 मार्च 1966 मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उजनी धरण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर 1976  मध्ये धरण पहिल्यांदा भरले. तेव्हापासून आजपर्यंत या महाकाय धरणाच्या लाभक्षेत्रात सातत्याने पाणीसाठा होत गेला आणि गावच्यागावे पाण्याखाली गेली. सुंदर पुरातन आणि देखण्या वास्तू, मंदिरे धरणग्रस्तांना जशाच्या तशा सोडून जाव्या लागल्या होत्या. त्याअगोदर सोलापूरवर ‘दुष्काळी जिल्हा’ असा शिक्का होता. तो पुसण्याचे कार्य स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 117 टीएमसी एवढ्या विशाल पाणी क्षमतेचे उजनी धरण बांधून सुरू केली.


उजनी धरणाचे संग्रहीत चित्र


उजनी धरण विस्थापित
विस्थापित गावांची ससेहोलपट
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आज पाण्यामुळे ऊस कारखानदारी वाढली आहे.  लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 52, पुणे 22, अहमदनगर जिल्ह्यांतील  तीन या विस्थापित गावांची काय अवस्था आहे?  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 52 गावात उजनी धरणामुळे विस्थापित झालेले लोक राहतात. त्यांच्या वाट्याला सुलतानी कारभारामुळे संघर्षच उभा राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील सहा विस्थापित गावांना ग्रामपंचायती व 11 गावांना महसुलीचा दर्जा मिळाला नाही.  धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे पंढरपूर, मोहोळ, माढा या तालुक्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.

             यशवंतरावांच्या दूरदृष्टितून विकास

शेतकरी आणि शेती समृध्द व्हावी हा मुख्य उद्देश उजनी धरणाच्या निर्मितीमागे होता. याबाबत  स्व.चव्हाण यांनी आपल्या ‘युगान्तर’ या ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. ते म्हणतात, भीमा नदी आडवावयाचे हे जे काम चालले आहे  ते तरी कशाकरता चालले आहे ? ही वाहत जाणारी नदी आम्हाला पाहवत नव्हती म्हणून हे काम चालले नसून या नदीच्या पाण्यात जे सामर्थ्य आहे त्याचा उपयोग आमच्या शेतीला झाला पाहिजे आणि त्या शेतीतून संपत्ती निर्माण झाली पाहिजे, असा या कामाचा अर्थ आहे. 
करमाळे तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली चालली आहेत आणि इंदापूर तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली जात आहेत. आणखीही काही गावे जाणार असतील. या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण हे सर्व घडेल आणि हे काम पुरे होईल, असा माझा स्वतःचा विश्‍वास आहे. या घटनेस चाळीस वर्षे पूर्ण झाली पण आपल्या राज्यकर्त्यांनी स्व. यशवंतरावांनंतर धरणग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विस्थापित गावांची ससेहोलपट दूर करण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधींनी व सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

■ राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उजनी धरणाची निर्मिती झाली. विस्थापितांना राज्यकर्त्यांनी वार्‍यावर सोडू नये, त्यांचा मूलभूत विकास करावा, असे विचार होते. आज या घटनेस 40 वर्षे उलटून गेले तरी विस्थापित 52 गावांचा विकास होऊ शकला नाही. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण झाले झाले आहे. विस्थापित गावांना बारमाही पाणी देणे आवश्यक आहे, तसे होत नाही.  शेती व उद्योगांना कॅनॉलमधून 1 जुलै ते 28 फेब्रुवारीपर्यंत पाणी देण्याची तरतूद आहे. या सर्व नियमांचे पालन होत नाही.
शिवाजी बंडगर, अध्यक्ष उजनी धरणग्रस्त समिती

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(साभार दैनिक पुढारी, सोलापूर १२ मार्च २०१७)

माझ्या जन्माची कहाणी




      गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा नाही. म्हणजे दुःखाला कंटाळून बसणे हे मला आवडत नाही. पण आज मन मोकळं करतोय. यात मी कुठेही कल्पनाविलासाचा वापर केला नाही.

माझ्या जन्माची तारीख काय आहे ? वार कोणता ? वेळ काय ? याबाबची माहिती मला काय माझ्या जन्मदात्यानाही नीट सांगता येणार नाही. कारण संपूर्ण जीवन खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियांनी बनलेले आहे. अठराविश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या इसमाला मास्तरांनी लावलेल्या जन्मतारीखवरच विसंबून राहावं लागतंय.

 १९८८चे वर्ष असावं.. श्रावण महिना..नागपंचमी जवळ आला होती..... वार शनिवार... अमावस्येची रात्र.... पाऊस धो धो कोसळत होता... वडील कुटुंबाची खळगी भरण्यासाठी शहरात कामाला गेले होते... त्या रात्रीच्या पावसाने तीन पञ्याच्या खोलीत पाण्याचा डोह उभारला होता... चिमणी मधेमधे बंद व्हायची.... अशावेळी आईची प्रसृतीची वेदना ही तीव्र झाल्या होत्या.... अशा या घरात आईला आधार देणारा माणूसच नव्हता.

आईनं कळा सोसत वाड्यातल्या चुलतीला खूप हाका मारल्या.. पण कुणीही जागं झालं नाही... तो पाऊसचं इतका भयानक होता...की घरातला आवाज बाहेर पडत नव्हता... नुसताच रिपरिप पावसाचा आवाज सुरू होता..आईची घालमेल झाली होती... काय करावं तिला कळेनासं झाले.. शेवटी सर्व वेदना सहन करून तिनं मला जन्म दिला.

पहाटेच्या वेळी पाऊस ओसरला होता... तेव्हा माझी आई बाहेर का येत नाही ? म्हणून चुलतीनं घरात डोकावून पाहिलं तर प्रसृतीचं चित्र दिसले. माझ्या अंगावर पावसाचं पाणी पडलं होतं. त्यामुळं मी थंडगार होऊन पडलो होतो. अंगावरची नाळ तशीच होती. आई ही त्या वेदनेतून बाहेर पडल्यानं माझ्याकडं पाहण्याची तिची शक्ती उरली नव्हती.

आयाबाया घरात आल्या.. मी जानवं घेऊन जन्माला आल्यानं खूप भाग्यवान आहे ? असं आयाबाया म्हणाल्या तर कुणी अमावस्येची राञ.... त्यात शनिवार त्यामुळं पोरगं चांगलं निघणार नाही ? असं त्या आतल्या आवाजात बोलू लागल्या.

पहाटे पाच सहा वाजता गावतल्या आत्याला कुणीतरी बोलावून घेतलं. तव्हा माझ्या अंगावरचं जानवं आणि नाळं तिनेचं काढलं.... चुलीवर गरम पाणी तपाला ठेवली पण सरपन पावसात भिजल्यानं चुल पेटतच होती.. कसबसं घासलेट टाकून तिनं पाणी तपावलं.. तिनंच दोघांना अंघोळ घातली. आईला चिमूटभर भात घातला.. घरातही पिठाचा कण नव्हता.. आईला त्या भाताच्या कण्या सुद्धा गोड लागत नव्हत्या..

त्या भयाण रात्री माझा जन्म झाला,असं माझ्या आईनं वीस वर्षापूर्वी सांगितलेली ही माझ्या जन्माची कहाणी. आज या गोष्टीचं स्मरण करताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

घरात शिकलेलं कुणीच नव्हतं.. पंचांग, जन्मकुंडली, नावरस नावं, शनि या गोष्टी पाहायच्या तर लांबच राहिल्या, त्यावेळी माझी जन्मतारीख लिहायलाही कुणाला वेळ मिळाला नाही ? कारण संपूर्ण कुटुंबचं अशिक्षित... तिथं कुठलं आलं ज्ञान ?

शेती पिकत नाही म्हणून नाना (बाप ) मिळेल ते काम करायचा. घरात दोनाची चार हात झाली होती. त्यामुळं पोटाची खळगी भरावी म्हणून तो महिना महिना बाहेर असायचा..

चार लेकरं सांभाळायची चिंता.. शेतात मूठभर दाणे निघायची नाहीत.. आई ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं कामाला जायची. मिळेल त्या पैशातून आपल्या पिलांना घास भरवित.. दिवाळी, दसरा कसा असतो ? माहीत सुद्धा नव्हता.

 पुढं मी रांगायला लागलो.. धडाधडा धावत होतो.. खेळत होतो,बागडत होतो.. अचनाक १९९२-९३ साली माझ्या अंगात भयंकर ताप आला... माझ्या गावात सरकारी दवाखाना होता पण डॉक्टर कधीच वेळेत नसतं.. आईनं, माझ्या अंगावरून मीठ मिरची उतरवली तरी काही झालं नाही...! परगावच्या, खासगी दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जवळ पैसेही नव्हते.

अंगात ताप वाढतच होता.. अन् मला पोलिओ झाला ! एक दोन काय झालं नाही ? काल धावणार पोरगं आज चालताना लगडत आहे हे पाहून त्यावेळी आई खूप रडली होती.

अन् उपाय करायला सुरुवात झाली.. मोठ्या दवाखान्यात दाखवण्यात नेण्यात येऊ लागले. बापानं,माझ्या पायासाठी लवकर इलाज व्हावा म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे शेअर्स अवघ्या पाच सहा हजारला विकले. आज या शेअर्सची किंमत तीन लाखाच्या घरात आहे, असो मी चांगलं चालावं यासाठी माझ्या पायाला राञराञ शेखत बसायची..! कुणाच्या तरी सांगण्यावरून माझा लंगडा पाय दोन तास उकिरड्यात पुरला होता. एवढं करूनही इलाज झाला नाही.

आजही ती माझ्या पायाला खूप जपते. कधी ओझं उचलू दिली नाही. माझ्या कुटुंबांचा आयुष्याचा बारोमास पावसावर अवलंबून असल्याने कधी पाऊस यायचा कधी नाही. त्यामुळं नानांनी शेताचा नांद सोडून दिला होता. आई आणि नानांनी मला खूप शिकवलं..

खूप हलाकीतून शिक्षण घ्यावं लागलं. माझ्या बहिणीला आणि भावाचं प्राथमिक शिक्षण देता आलं.मला ही कधी, पुस्तक, वह्या, कपडे कधी मुबलक मिळू शकले नाही. आठवीत असताना फक्त सहा वह्या मिळाल्या. दहावी कसाबसा पास झालो. अकरावी ते एम. ए पर्यंत एकाच कपड्यावर दिवस काढावे लागले. घासलेटच्या दिव्यावर एम.ए पर्यंत अभ्यास आणि वाचन केलो. एवढं असूनही महाविद्यालयात पहिला नंबरनी पास व्हायचो. याकाळात वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. स्कॉलरशिपच्या पैशातून जवळपास ६०० पुस्तके खरेदी केली त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. 

नानांना मी मास्तर व्हावं, अशी इच्छा होती. बी.एड च्या परीक्षेसाठी प्रयत्न करू लागलो. त्या अगोदर सेट नेटच्या सात आठ परीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकी वेळी ८ -१० गुणांचा फरक पडत गेला. त्यामुळे बी.एड कडे वळलो. सीईटी परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले. पहिल्याच यादीत पुण्यातील एस.पी.महाविद्यालयाच्या आवारातील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नंबर लागला. 
महाराष्ट्रातलं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून लौकिक होता. प्रवेश अर्ज, फीसची तजबीज करु लागलो. त्याकाळी ८ हजार फीस होती. इतरांच्या दृष्टीनं ही फीस फार किरकोळ होती. माझ्या दृष्टीनं डोंगराएवढी होती. २०११-१२ चं वर्षे असावं. आमच्याकडं भयानक दुष्काळ पडला होता. शेतातून चिपटभरं दाणे सुध्दा निघाले नाहीत. त्यामुळे बीएड ला प्रवेश घ्यायचं नाही. असं मनोमनी ठरवलो.

नानांनी एका व्यापाऱ्याला माझ्या शिक्षणासाठी एक बैल सहा हजाराला विकल्याची बातमी कळली. मी रानात जाईपर्यंत व्यापाऱ्यानं तो बैल घेऊन गेला होता. नानांनी त्या बैलाचे सर्व पैसे माझ्या हातात दिले आणि पुण्याला जाण्यासाठी मनधरणी करू लागले. नाईलाजाने मी बीएडला प्रवेश घेतला. इकडून तिकडून पैशाची तजबीज करून कसाबसा बीएडला प्रवेश घेतला. पुण्यात शिक्षण घेताना खूप हाल झाले. इथल्या आठवणी नंतर कधी तरी सांगेन.

बीएडला चांगल्या गुणांनी पास झालो, माझा मुलगा मास्तर होणार मी आई आणि नाना खुश असतं. पण कुठलं काय ? कशात काय आणि फाटक्यात पाय? अशी गत झाली. दोन वर्षे सलग सगळीकडे अर्ज करत होतो. मास्तर होण्यासाठी १५-२० वीस लाख रूपये मोजावी लागतात, असा वाईट अनुभव मिळाला. ताण-तणाव वाढत गेला.

तीन वर्षापूर्वी सोलापुरात पूर्णवेळ पञकार झालो.
इथे माणसं ओळखायला शिकलो. मान्यवर संपादक आणि पञकाराची वाहवा वाहवा मिळवत लिहीत राहिलो. काहींनी इथेही घाण्याच्या बैलासारखा वापर केला. काहींना माझा कमकुवतपणा सांगून ही त्यांनी गैरविश्वास दाखवला.या क्षेत्रात काम करताना खूप तणाव येतो हे लक्षात आले. बस्स आता प्रामाणिकपणे काम करत रहायचं,पुढे दिवस काढत राहिलो.

सध्या आयुष्याला वेगळे वळण लागतं आहे. ते म्हणजे चांगले काहीतरी सकारात्मक लिहायचं. त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे हीच माझी ऊर्जा आणि जन्मकुंडली असणार आहे. हीच माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( ११ मार्च २०१६ )
     

बुधवार, १ मार्च, २०१७

कहाणी एका ध्येडवेड्या तरुणाची...!



.......स्वामी विवेकानंदजी ने म्हटले  आहे की, ""मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत,आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर  मी हा पूर्ण देश बदलून टाकेन" आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरूण आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपीठ हवं आहे. त्यातील एक ध्येयवेडा तरूण म्हणजे उमाकांत मिटकर. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास परिषदेच्या एकलव्य  व पालावरच्या शाळेला जोडलेला हाडाचा कार्यकर्ता. त्यांचा पालावरच्या झोपडीपासून ते सरकारी खुर्चीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशा या ध्येयवेड्या तरूणाला  महाराष्ट्र सरकारचा  राज्यस्तरीय 'प्रेरणा युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने उमाकांत मिटकर यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत...!

महाराष्ट्रात भटके विमुक्त,पारधी, बहुरुपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 52 जातीं-जमाती. ज्यांची पाळमुळं रुजली आहेत,संस्कृतीच्या गडद-गूढ अंधारात. या अंधारलेल्या  समाजाला प्रकाशात आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेला यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथील एकलव्य प्रकल्प.

ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी या ‘यमगरवाडी पॅटर्न’चा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि  परिषद या दोन संस्थांच्या आधारे 1993 साली हे कार्य सुरू झाले. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं. यमगरवाडीच्या त्या झोपडीवजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली आज यमगरवाडीत जवळपास चारशे- पाचशे विद्यार्थी आहेत. हे चारशे विद्यार्थी म्हणजे चारशे कहाण्या आहेत,अंगावर शहारे उमटणार्‍या. अशा या माणूसपणाच्या शाळेविषयी प्रत्येकाला लळा लागणे साहजिकच आहे. पण ज्याची संवेदनशीलता अधिक तीव्र आहेत अशीच युवक समाजसेवेत येत असतात.  त्यामध्ये उमाकांत मिटकर मोडतात. नळदुर्गच्या बालघाट शिक्षण संस्थेत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पोटपाण्यासाठी धडपडत यमगरवाडीपर्यंत पोहोचलेला युवक पूर्णपणे वैचारिक दृष्ट्या बदलतो, समाजाच्या प्रश्‍नांविषयी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी विचार करू लागतो, तो युवक म्हणजे उमाकांत मिटकर. साधारण 35 वर्षाचा युवक. आज ते  समाजसेवेतील विविध शिखरे पादाक्रांत करत आहेत. संघटनेने सुरू केलेल्या पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. त्यात उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटके विमुक्तांना शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. अनेक मुलांमध्ये त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिले.

गेल्या दशकापासून  उमाकांत मिटकरांचे काम पाहण्याची संधी मिळत आहे. यमगरवाडीचा एकलव्य प्रकल्प आणि पालावरच्या शाळेचा हा पूर्णवेळ कार्यकर्ता. पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. यास उमाकांतने घेतलेली मेहनत मी अनुभवलो आहे. M.A,M,ed असलेले उमाकांतआता कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून यमगरवाडी येथे 2002 पासून कामास प्रारंभ केले. यमगरवाडी प्रकल्प,  उमरगा, बीड, किल्लारी या भागामध्ये मसणजोगी वस्तीत राहून समाजसेवेला त्यांनी वाहून घेतले.

त्याचबरोबर किनवट, धर्माबाद, नांदेड भागातील भिल्ल, आंध,कोलाम  समाजावर त्यांनी काम केले या समाजातील जाणिवा, प्रश्‍न यांचा सखोल अभ्यास करून पालावरची शाळा हा अभिनव प्रयोग उदयास आला. त्यासाठी उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटका समाज हा शिक्षणापासून पूर्णपणे अंधारात होता. त्यास मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालावरच्या शाळेचा महत्वाचा वाटा आहे. आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 35 समाजांमध्ये 48 पालावरच्या शाळा आहेत. यातून शिक्षण, आरोग्य,आत्मसन्मान, स्वावलंबन अशा गोष्टींवर धडे दिले जातात. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने ही याची दखल घेतली. त्याचबरोबर युनायटेट नेशन्स अ‍ॅन्ड कल्चरल ऑरगयायझेशन (युनिस्को) या संस्थेतर्फे अशिया पॉसिफिक विभागाकडून देण्यात येणारा एज्युकेशन इनोव्हेशन पुरस्कार ही मिळाला आहे.

उमाकांतजी आता येथेच थांबत नाहीत पालावरची शाळा, व्यसनमुक्ती, आरोग्य, बचतगट या कामाबरोबरच त्यांच्यावर आता राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण,महाराष्ट्रा शासन समिती सदस्यपदाची जबाबदारी आली आहे. पोलिस अत्याचार, गुन्हेगार आदी गुंतांगुंतीच्या विषयावर ते सक्षमपणे काम करत आहेत.  सतत ग्राऊंड लेव्हलला काम करणार्‍या या तरुणाला महाराष्ट्र सरकारचा 2014-15 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रेरणा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील 35 वर्षाच्या आतील युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी या पुरस्कार दिला जातो. गेल्या सोळा वर्षा पासून  भटके विमुक्त जाती-जमातींच्या कल्याणासाठी झटत असलेला ध्येयवेडा युवक उमाकांत मिटकर यांना मार्च 2017 च्या चौथ्या आठवड्यात महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुंबई विद्यापीठात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख५००००/-,गौरवपत्र,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मिटकर यांना यापूर्वी जिव्हाळा संस्थेचा (पुणे) राज्यस्तरीय समाजरत्न, हरित मित्र परिवार (पुणे)आदर्श नेतृत्व पुरस्कार,  राज्यस्तरीय युवा चेतना पुरस्कार, आदर्श सामाजिक कार्यकर्ता,ऊस्मानाबाद आयकाॕन असे विविध नामंकित पुरस्कार मिळाले आहेत. अशा या ध्येयवेडा तरूणाला सलाम..!

विकास पांढरे,सोलापूर

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...