शरद जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शरद जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

शेतकरी चळवळ आणि मराठी साहित्य


शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा,जगाचा पोशिंदा शेतकरी दुःखी असतो, त्याचे प्रश्न, त्याच्या वेदना समजून घेतले नसल्यामुळे शेती अर्थव्यवस्थेचा चिरा ढासळत चालला आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वाधात महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवू पाहणारे लेखन केले. हाच शेतकऱ्यांचा मोठा एल्गार होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हरितक्रांती झाली पण त्याचे फ ळे शेतकऱ्यांना कधीच मिळाले नाहीत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, सरकारचा नाकर्तेपणामुळे आमचा शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच मारतो.हे चित्र बदलण्यासाठी शेतकरी चळवळी उभ्या राहिल्या.
मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे दैन्याचे प्रतिबिंब उमटू लागले. शेतकरी चळवळीला वेग येऊ लागला. शेतकऱ्यांचे पोरं लिहिते होऊ लागले. काळाच्या ओघात शेतकरी चळवळी मंदावली, शेतीतील भयवाह वास्तवाचे चित्रण मराठी साहित्यात जोरकसेपणे पुढे येत नसल्याचे सध्याचे वास्तव आहे.

इथल्या प्रत्येक माणसांचा शेती आणि मातीशी संबंध आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगला आहे. १६ व्या शतकात पडलेल्या दुष्काळाचे चित्रण ते आपल्या अभंगातून करतात. ही परंपरा महात्मा फुल्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येते. १८६५ च्या कालखंडात सूंपर्ण भारत दुष्काळाने होरपळून निघाला होता. जमीनदारांचे पिळवणूक आणि ब्रिटिश सरकारचे जुलूमी कायद्यापुढे शेतकरी अधिकाधिक कंगाल होत चालला होता. महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात कृषी अर्थव्यस्थेचे पडझडीचे चित्रण केले.



याविषयी डॉ. अशोक चौसाळकर म्हणतात, '' जोतीरावांच्या पुढे हा मुख्य प्रश्न होता की दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा, जगाचा पोंशिदा शेतकरी दुःखी आणि सरकारचा कामचोर,लाचखाऊ नोकरशहा सुखी असे का व्हावे? अवयव आणि बुध्दी सारखीच असताना समाजात विषमता का आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. आपल्या 'गुलमागिरी', ' शेतकऱ्यांचा आसूड', 'इशारा' वगैरे पुस्तकांतून त्यांनी यासंबंधी आपले विचार मांडले.''(१)
महात्मा फुले यांनी आपले शेती विषयासंदर्भातील क्रांतिकारक विचार आपल्या पुस्तकांतून मांडून शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी श्रीकांत देशमुख यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, ते म्हणतात-'' महाराष्ट्रात नव्हे तर एकूण देशाच्या संदर्भात म.फुले हे शेतकरी आणि शेती प्रश्नाचे पहिले प्रवक्ते. शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण समाजरचनेचा कणा असून जोपर्यंत त्याची स्थिती सुधारित नाही तोवर कोणतेही मौखिक स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन होण्याची शक्यता नाही, हे भाकित फुल्यांनी शंभर वर्षापूर्वी केले.आपल्या लेखनातून त्यांनी शेती आणि शेतकरी यासंबंधी जे विचारसूत्र मांडले त्याला प्रमाण मानूनच नंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात शेती प्रश्नाचा विचार होऊ लागला.''(२)

देशमुख यांच्या मतातून शेतकरी चळवळीच्या उदयाची पार्श्वभूमी लक्षात येते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या विविध भागांत शेतकरी चळवळीने आकार घ्यायला सुरूवात केली. त्यातूनच देशातील पाहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उद्यास आली. शहीद भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबचे शेतकरी एकत्र आले. या शेतकरी चळवळीच्या अनेक शहरात परिषदा झाल्या.

१९०७ साली मधील ल्यालपूर शेतकरी मेळाव्यात 'पगडी संभाल ओ जटृा'ही शेतकऱ्याला स्वाभिमनाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली.देशातील पहिले मोठे आंदोलन मात्र महाराष्ट्रात झाले. १८७५ मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव हे ते पहिले आंदोलन होय. दीडशे रूपयांच्या कर्जापायी काळूराम सावकाराने पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील करडे गावातील प्रतिष्ठित शेतकरी बाबासाहेब देशमुख यांची शेतीवाडी, स्थवर व जंगम मालमत्ता जप्त केली. सावकारांच्या जाचाविरूध्द पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हयांतील शेतकऱ्यांनी उठाव केला होता. करडे येथील घटनेची प्रतिक्रिया म्हणून ९ सप्टेंबर १८७५ रोजी पहिला संघर्ष झाला.

वि. रा. शिंदे यांनी शेतकरी वर्गाची हालखीची स्थिती लक्षात घेऊ न ती कशी सुधारावी यासाठी प्रयत्न केला. ही आस्था प्रमाण मानून वि.रा.शिंदे युरोपीय राष्ट्रात गेले तिथे त्यांनी शेतीची आणि शेतकरी वर्गाची अवस्था काय आहे याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी शेतकरी परिषदा घेतल्या. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली. १९२७ मध्ये गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी साराबंदीची अपूर्व चळवळ उभी केली. या चळवळीमुळे संबंध देशातील शेतकरी जागा झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूध व शेतमालाला योग्य दर आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी शेतकरी आंदोलने झाली. १९६० च्या दशकात देशात हरितक्रांती झाली. पंजाबपासून ते तामीळनाडूपर्यंतचा शेतकरी सुखू होत असल्याचे अभासी चित्र निर्माण केले. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेंधे, आण्णासाहेब शिंदे यांनी शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.

 १९७२ च्या दुष्काळात देशातील शेतकरी उध्दवस्त झाला. महाराष्ट्रात ही तिच परिस्थिती होती. जिथे पाणी आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला भाग अधिक संपन्न तर जिथे पाणी नाही असा विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कंगाल असल्याचे भौगोलिक चित्र निर्माण झाले. सुखी असलेला प.महाराष्ट्रातला शेतकरी ऊ साला भाव नाही म्हणून ओरडू लागला तर विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देत आहोत म्हणून आपला घसा कोरडा करू लागला. महाराष्ट्रात उरणचे आंदोलन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून चिरडले होते, विदर्भात, तेलंगणात भूमिहिनांचा, शेतकऱ्यांचा लढा झाला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे शेतकरी आंदोलन गाजले होते. १९९१-९२ साली आलेल्या जागतिकीकरणामुळे संबंध शेतकरी वर्ग यात भरडला गेला. सगळयाचे प्रश्न एकसारखेच झाले. १९७२ पासून ग्रामीण समाजात लोकप्रिय असलेले 'बळीराजा' हे पुण्याहून निघणारे शेतीविषयक मासिकाने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरूणाचे व्यासपीठ झाले. अनेक सुशिक्षित तरूण आपले शेतीविषयक अनुभूव या मासिकातून मांडू लागले. शेती,ग्रामीण समाज आणि साहित्य याबाबतचे प्रतिबिंब मासिकात उमटू लागले.या काळात शेतकरी चळवळ व ग्रामीण साहित्य चळवळीचे बळीराजा हे मासिक मुखपत्र बनले होते.

१९७२ च्या दुष्काळाने संपूर्ण ग्रामीण जीवनाकडे बघण्याकडे तरूण सुशिक्षितांचा दृष्टिकोन बदलला होता यातूनच फार मोठे स्थित्यंतर घडले. शेती, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण माणसांच्या जीवनासंबधी विचार होऊ लागला. व्यंकटेश माडगूळकर (बंडगरवाडी) रा.रं.बोराडे (पाचोळा,चारापाणी), विश्वास पाटील (झाडाझडती,पांगिरा), आनंद यादव (झोंबी), भास्कर चंदनशिव (लाल चिखल),सदानंद देशमुख (बारोमास,तहान), कृष्णात खोत (गावठाण), उत्तम बंडू तुपे (खुळी), द.ता.भोसले सारखे साहित्यिक शेतीचे भयावह वास्तव साहित्यातून प्रकट करू लागली. एकूणच मराठी साहित्याच्या क्षेत्रात ग्रामीण जीवन, साहित्य चळवळीविषयक एक पोषक वातावरण तयार झाले होते. गंभीरपणे शेती विषयांचे चिकित्सिकपणे चर्चा करणारे सुशिक्षित तरूण साहित्यिक पुढे येत होती.

याविषयी द.ता.भोसले म्हणतात,''आजच्या ग्रामीण साहित्यात भूक, द्रारिद्रय,अज्ञान,शोषण आणि उपेक्षा या गोष्टीतून उध्दवस्त झालेल्या जीवनाचे चित्रण येते आहे. या प्रेरक घटनांचा संदर्भ वेगळा असेल, भूक किंवा दारिद्रयाचे स्वरूप भिन्न असेल, त्याची तीव्रता कमी अधिक असेल, पण शेवटी त्या भावना म्हणून तशा एकच म्हणाव्या लागतील. या पाच बाबीचे चित्रण म्हणजे ग्रामीण साहित्य म्हणावे लागेल.''(3)

द.ता. भोसले यांच्या मताचा खोल विचार केल्यास खेडयातले बदलते जीवन, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक वास्तव साहित्यात उमटू लागले होते. शेती संदर्भात शेतकरी चळवळी उभी राहत होती. त्यातून नवे व वेगळे साहित्य जन्माला येत होते. १९८० च्या दशकात शेतकरी संघटनेचे प्रेणेते शरद जोशी यांनी ऊस, तंबाखू, कांदा, दूध, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून दर आंदोलन हाती घेतले. शरद जोशी यांच्या 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' या घोषणेने संबंध देशातील शेतकरी जागा झाला.

या चळवळीचे मूल्यमापन करताना श्रीकांत देशमुख म्हणतात,'' शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे ग्रामीण महाराष्ट्रात गतिमानता निर्माण झाली. लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेची अधिवेशने भरू लागली. शेतकरी संघटनेने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याच मुलभूत आर्थिक मागण्यावर भर दिला. सर्वच राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी धारणा शेतकऱ्यांत रूजवली. त्यामुळे शेतकऱ्यांत अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली. शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी, एवढया एका महासूत्रावर आधारित या चळवळीचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे ही चळवळ अज्ञ, अडाणी, शेतकऱ्यांना सहज कळते, आपलशी वाटते.''(4)

शेती आणि शेतकरी याविषयी शरद जोशी यांनी आपल्या चळवळीतून अर्थशास्त्रीय भूमिका मांडली. आजपर्यंत तसा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या पिढीतील साहित्यिक ही वास्तव भूमिका घेउन लिहिते झाले. भूमि अधिग्रहण, सेझ, बाजारभाव हे सर्व विषय साहित्यातून येत राहिली. 1995-2015 अशा वीस वर्षाच्या काळ शरद जोशी यांनी आपल्या शेतकरी आंदोलनाचा दरारा कायम ठेवला होता. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात एकवाक्यता, एकजिनसीपणा असलेली शेतकरी चळवळीकडे पाहिले जात होते. शरद जोशी यांच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य अंधारात सापडले आहेत. पाशा पटेल, राजू शेटटी, सदाभाउ खोत, रघुनाथदादा पाटील अनेक जाणते हे स्वतंत्र चूल निर्माण केल्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मर्यादा पडत आहेत. नुकत्याच झालेल्या पुणतांबा शेतकरी आंदोलनावरून हे सिध्द होते.

शेतकरी चळवळीच्या भवितव्याविषयी गंगाधर मुटे म्हणतात,'' आज शेतकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये कुठेही एकवाक्यता नाही. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबाजावणीची मागणी करतो, कुणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, असा अजेंडा पुढे रेटू पाहतो, तर कुणी शेतकऱ्यांनी सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतीचे प्रश्न सुटणार नसल्याची हाकाटी पिटतो.शेतीचे अर्थशास्त्र समजून न घेताच बेताल वक्तव्ये करण्याचेही सध्या पेवच फुटलेले आहे. डॉ.आंबेडकरांच्या निधनानंतर रिपब्लिकन चळवळीच्या वाटयाला आला, तसाच भोग शेतकरी चळवळीच्या वाटयाला येतो की काय, असा संभ्रम होण्यासारखी स्थिती आहे.''(5)

मुटे यांचे मत विचारता घेता, एकीकडे शेतकरी चळवळीची अशी वाताहात होत असतानाच शेतीसमारेचे प्रश्न आणखी बिकट होत चालल्याचे दिसून येते. आज शेती चळवळ जशी मंदावली आहे तशीच शेती प्रश्नावर अधिक सकस व वास्तववादी लिखाण होताना दिसत नाही. या मर्यादा का आहेत याचा शोध शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व साहित्यिकांनी घेतला पाहिजे.

विदर्भ व मराठवाडयात शेती व शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याविषयी तीव्रपणे आंदोलन होताना दिसत नाही. केवळ कर्जमाफी देवून हा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे असे आमचे साहित्यिक का सांगत नाहीत. भाजपाचे सरकार येण्यापूर्वी सिंचन घोटाळा निघाला. तो शेतीशी निगडीत आहे. हा प्रश्न समजून घेवून आमचे साहित्यातून याचे चित्रण येणे आवश्यक होते, तसे होताना दिसत नाही.यवतमाळ जिल्हयात कपासावर फवारणी मारताना अनेक शेतकरी दगावली. अनेक जणांना कायमचे अंधत्व आले याचा शोध आमचे साहित्यिक घेताना दिसत नाहीत.

आजचा तरूण शेतकरी चळवळी पासून दूरावला गेला आहे तो का दुरावला गेला आहे ? हे साहित्यिक कधी समजून घेणार. साहित्य हा समाजजीवनचा आरसा समजला जातो, आज शेतकरी चळवळ मंदावली असली तरी साहित्यिक कमी नाहीत, त्यांनी हया गोष्टींचा विचार करून साहित्याचे दालन समृध्द करणे आवश्यक आहे. औरंगाबादचा सरदार जाधव हा 'दूध'याविषयावर कादंबरी लिहितोय. ही प्रकाशित झाल्यास मराठी सारस्वताना या कादंबरीची नोंद घ्यावी लागेल. ऊस दर आंदोलन, कापूस,तूर,सोयाबीन आंदोलन सरकारकडून दडपली जात आहेत,या मागाचा राजकीय हेतू लक्षात घेउन साहित्यकृती जन्माला येणे गरजेचे आहे.

विकास पांढरे,9970452767
'(सदर लेख सोलापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादासाठी लिहिला होता. काही तांत्रिक कारणांमुळे सदर परिसंवाद रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा लेख ब्लॉगवर वापरत आहे.)

संदर्भ :-

-1) डॉ.अशोक चौसाळकर, महात्मा फु ले री चळवळ, लोकवाड्ःमय गृह प्रकाशन.पृष्ठ क्रं.1

2) श्रीकांत देशमुख, ग्रामवेद संपादक गणेश देशमुख पृष्ठ क्रं.173

3) तैत्रव, पृष्ठ क्रं182

4) द.ता.भोसले, ग्रामीण साहित्य ः एक चिंतन, मेहता प्र.पृ.क्रं.111

5) गंगाधर मुटे, लेख शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने महाराष्ट्र टाइम्स, 2 डिसेंबर 2016

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

शोकात्म नायक

एखाद्या चित्रपटातील शोकात्म नायकाप्रमाणे शरद जोशी जगले, शिवाय महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा मूळ आत्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून शरद जोशी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. मुळात ब्राह्मण असलेले शरद जोशी सामान्य माणसाचे जीवन जगता जगता अचानक एक असामान्य व्यक्तिमत्त्व बनले. चळवळीच्या माध्यमातून विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी शेतकरी बांधवांना दिलासा दिला, एवढेच नव्हे तर शेतीच्या प्रश्नांना आवाज प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली. बरबटलेल्या राजकारणात काही जण सोडून गेले तर, काही गळून पडले,तर काही कार्यकर्ते सत्तेत सहभागी आहेत. पण शरद जोशी या योध्दा शिलेदाराने आपली विचारसरणी ढळू दिली नाही.
  •  बळीराजाच्या समस्येसाठी सतत झटणारे शरद जोशी नावाचे चक्रीवादळ निवले. आयुष्यच्या उत्तरार्धात त्यांच्या संघटनेचा प्रभाव कमी झाला असला तरी, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान बहुमोल आहे. मी कुणब्याच्या पोटी जन्माला आल्याने शेतीबाबत आत्मियता तर होतीच शिवाय शेती व्यवहारात घडत असलेल्या प्रश्नांबाबत जनमानसात विशेषतः वर्तमानपत्रात बातम्या वाचायला मिळत.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्याविषयी भरभरून लिहिले जात असे. आमच्या पिढीने शरद जोशी यांचे आंदोलन, भाषणे पाहिले व ऐकले नसले तरी या व्यक्तीबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे शरद जोशी हे सामान्य शेतकरी ते सधन शेतकऱ्यांचे आधारवड वाटतात.बहात्तरच्या दुष्काळ ळानंतर राज्यातील शेती व्यवसाय धोक्यात अडकला होता. खेड्यातील तरुणाई पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात स्थलांतर करु लागली. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या समस्येकडे अधिक लक्ष देण्यासाठी शरद जोशी यांनी सनदी अधिकाऱ्यासारखी भली मोठी पगार सोडून,शेतकऱ्यांच्या जीवनात नवप्रकाश निर्माण करण्यासाठी १९७९ साली शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. १९७९ पासून शेतमालास रास्त भाव एककलमी कार्यक्रम, नाशिकचे दरवाढीचे आंदोलन, निपाणीचे तंबाखू आंदोलन, पिंपळगाव बसवंतीमधील कांदा आंदोलन, दूध, भात,कापूस इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व उभारले, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने घेऊन महाराष्ट्र ढवळून निघाले. त्यामुळे शेतकरी जागृत होऊ लागला. त्यानंतर शेतकरी नेते शरद जोशी यांचा प्रभाव पडत गेला. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचे कौशल्य, अफाट स्मरणशक्ती व संघटन कौशल्याच्या जोरावर शरद जोशी हे अल्पावधीत लोकप्रिय झाले. अनेक सुशिक्षित तरुण शेतकरी चळवळीत सहभागी होऊन आंदोलने करु लागली. माजी आमदार पाशा पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदी नेते जोशी यांच्या तालमीत घडलेले विद्यार्थी आहेत. जोशी यांना विदर्भातील शेतकऱ्यांनी साथ दिली. विशेष म्हणजे ८०च्या दशकात शरद जोशी यांना याठिकाणी जे यश मिळाले तितके अन्य विभागात मिळाले नाही. त्यामुळेच जोशी यांचा विदर्भात आजही काही प्रमाणात प्रभाव टिकून आहे. व्ही.पी.सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोशी यांनी देश पिंजून काढला तर रामजन्मभूमीच्या मुद्यावर भाजपसेनेवर टीकाही केली.
  • १९८४ साली त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. शरद जोशी यांची शेतकरी संघटना ज्या मायकल लिफ्टन यांच्या 'व्हँव पुअर पिपल स्टे पुअर केस ऑफ अरबन डेव्हलपमेंट' या पुस्तकावर आधारित आहे. याविषयी एका अंकात मिलिंद मुरुगकर म्हणतात, या पुस्तकातील प्राइस ट्विस्ट आयडोलाँजी इन रूरल अँन्ड अरबन डेव्हलपमेंट ही दोन प्रकरणी म्हणजे शेतकरी संघटनेचे वैचारिक अधिष्ठान आहे. हे लिफ्टन यांच्या पुस्तकाचे मुख्य सिध्दांत असा की, शेती मालाचे भाव पाडणे हे जगातील गरीब, विकसनशील देशांचे अधिकृत धोरण आहे. लिफ्टन हे ७० च्या दशकात लिहित होते,शेती मालाचे भाव पाहून शेतीत तयार होणारी संपत्ती औद्योगिक क्षेत्राकडे वळवल्यास औद्योगिकीकरण होऊन विकास साधला जाईल,अशी ही भूमिका होती.पण प्रत्यक्षात शेतीच्या शोषणाच्या या अधिकृत धोरणांमुळेच गरीबी हटण्याची प्रक्रिया मंदावली, अशी प्रभावी यांनी लिफ्टन करतात. मायकल लिफ्टन यांनी कंट्री व टाऊन या संकल्पना वापरून केलेली शेतीच्या शोषणाच्या सिध्दांताची मांडणी शरद जोशींनी मोठ्या कल्पतेने भारत व इंडिया ही संकल्पना वापरून भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली व शेतकऱ्यांची प्रबळ राजकीय ताकद उभी राहिली. यावरून त्यांच्या संघटनेचे स्वरूप लक्षात येते. १९९१ साली मुक्त अर्थव्यवस्थे संदर्भात शरद जोशी यांनी ''सरकार क्या समस्या सुलझायेगी? सरकार ही एक समस्या आहे ! अशी टोकाची भूमिका घेतली. तर याच काळातील डंकेल ड्राफ्टचे स्वागत केले असले तरी, हा संवेदनशील विषय शेतकऱ्यांना समजून सांगण्यास कमी पडले. त्यामुळे या संघटनेची पडझड होऊ लागली. 

  • ज्या पक्षाला विरोध करत राहिले त्याच पक्षाच्यावतीने राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळवले. अशी विसंगती दिसून येत असल्याने संघटनेतील मोहरे बाहेर पडले, संघटनेची एकसूत्रता ढासळू लागली. वेगवेगळ्या संघटना उदयास येऊ लागल्या. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे समीकरण कमी कमी होत गेले. पण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटने प्रमाणे देश ढवळून काढणारी संघटना निर्माण होऊ शकली नाही. शरद जोशी यांनी जी झुंज दिली आणि संघटना नावारूपाला आणली. पण एकेक मावळे स्वतःचा सावतासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकानेही बळीराजाचे स्पंदने ज्वलंत करण्यासाठी शेतकरी संघटनेची कावड उचलू शकले नाही. त्यामुळे शरद जोशी यांच्या विचारांची परवड झाली. जोशी यांच्या राजकीय व सामाजिक चळवळीत शेती आणि शेतकऱ्यांच्या परिवर्तनाची असंख्य स्पंदने आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात शरद जोशी यांनी शेती प्रश्नांसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. चळवळीतील साक्षीदार म्हणून राहिले, ते निघून गेले, स्वार्थाचे भागीदार बनले. त्यामुळेच शेतकरी संघटनेची शोकात्मकता झाली.  यांचे परिमार्जन म्हणजे शरद जोशी यांच्यासारख्या सच्चा नेत्याची झालेली परवड होय. जोशी यांचे अनेक कार्य अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना आपले कौशल्य पणाला लावतील का ? शेतकऱ्यांचे प्रश्न,त्यांच्या समस्या, त्यांच्या. हालअपेष्टा यासाठी आंदोलनाचे अंगार उभे करणारे शरद जोशी यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायीआहे. 

  • लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७  ( सदर लेख १३ डिसेंबर २०१५ रोजी दैनिक देशदूत,जळगाव मध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)


कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...