सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

शोकात्म नायक

एखाद्या चित्रपटातील शोकात्म नायकाप्रमाणे शरद जोशी जगले, शिवाय महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा मूळ आत्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून शरद जोशी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. मुळात ब्राह्मण असलेले शरद जोशी सामान्य माणसाचे जीवन जगता जगता अचानक एक असामान्य व्यक्तिमत्त्व बनले. चळवळीच्या माध्यमातून विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी शेतकरी बांधवांना दिलासा दिला, एवढेच नव्हे तर शेतीच्या प्रश्नांना आवाज प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली. बरबटलेल्या राजकारणात काही जण सोडून गेले तर, काही गळून पडले,तर काही कार्यकर्ते सत्तेत सहभागी आहेत. पण शरद जोशी या योध्दा शिलेदाराने आपली विचारसरणी ढळू दिली नाही.
  •  बळीराजाच्या समस्येसाठी सतत झटणारे शरद जोशी नावाचे चक्रीवादळ निवले. आयुष्यच्या उत्तरार्धात त्यांच्या संघटनेचा प्रभाव कमी झाला असला तरी, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान बहुमोल आहे. मी कुणब्याच्या पोटी जन्माला आल्याने शेतीबाबत आत्मियता तर होतीच शिवाय शेती व्यवहारात घडत असलेल्या प्रश्नांबाबत जनमानसात विशेषतः वर्तमानपत्रात बातम्या वाचायला मिळत.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्याविषयी भरभरून लिहिले जात असे. आमच्या पिढीने शरद जोशी यांचे आंदोलन, भाषणे पाहिले व ऐकले नसले तरी या व्यक्तीबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे शरद जोशी हे सामान्य शेतकरी ते सधन शेतकऱ्यांचे आधारवड वाटतात.बहात्तरच्या दुष्काळ ळानंतर राज्यातील शेती व्यवसाय धोक्यात अडकला होता. खेड्यातील तरुणाई पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात स्थलांतर करु लागली. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या समस्येकडे अधिक लक्ष देण्यासाठी शरद जोशी यांनी सनदी अधिकाऱ्यासारखी भली मोठी पगार सोडून,शेतकऱ्यांच्या जीवनात नवप्रकाश निर्माण करण्यासाठी १९७९ साली शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. १९७९ पासून शेतमालास रास्त भाव एककलमी कार्यक्रम, नाशिकचे दरवाढीचे आंदोलन, निपाणीचे तंबाखू आंदोलन, पिंपळगाव बसवंतीमधील कांदा आंदोलन, दूध, भात,कापूस इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व उभारले, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने घेऊन महाराष्ट्र ढवळून निघाले. त्यामुळे शेतकरी जागृत होऊ लागला. त्यानंतर शेतकरी नेते शरद जोशी यांचा प्रभाव पडत गेला. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचे कौशल्य, अफाट स्मरणशक्ती व संघटन कौशल्याच्या जोरावर शरद जोशी हे अल्पावधीत लोकप्रिय झाले. अनेक सुशिक्षित तरुण शेतकरी चळवळीत सहभागी होऊन आंदोलने करु लागली. माजी आमदार पाशा पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदी नेते जोशी यांच्या तालमीत घडलेले विद्यार्थी आहेत. जोशी यांना विदर्भातील शेतकऱ्यांनी साथ दिली. विशेष म्हणजे ८०च्या दशकात शरद जोशी यांना याठिकाणी जे यश मिळाले तितके अन्य विभागात मिळाले नाही. त्यामुळेच जोशी यांचा विदर्भात आजही काही प्रमाणात प्रभाव टिकून आहे. व्ही.पी.सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोशी यांनी देश पिंजून काढला तर रामजन्मभूमीच्या मुद्यावर भाजपसेनेवर टीकाही केली.
  • १९८४ साली त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. शरद जोशी यांची शेतकरी संघटना ज्या मायकल लिफ्टन यांच्या 'व्हँव पुअर पिपल स्टे पुअर केस ऑफ अरबन डेव्हलपमेंट' या पुस्तकावर आधारित आहे. याविषयी एका अंकात मिलिंद मुरुगकर म्हणतात, या पुस्तकातील प्राइस ट्विस्ट आयडोलाँजी इन रूरल अँन्ड अरबन डेव्हलपमेंट ही दोन प्रकरणी म्हणजे शेतकरी संघटनेचे वैचारिक अधिष्ठान आहे. हे लिफ्टन यांच्या पुस्तकाचे मुख्य सिध्दांत असा की, शेती मालाचे भाव पाडणे हे जगातील गरीब, विकसनशील देशांचे अधिकृत धोरण आहे. लिफ्टन हे ७० च्या दशकात लिहित होते,शेती मालाचे भाव पाहून शेतीत तयार होणारी संपत्ती औद्योगिक क्षेत्राकडे वळवल्यास औद्योगिकीकरण होऊन विकास साधला जाईल,अशी ही भूमिका होती.पण प्रत्यक्षात शेतीच्या शोषणाच्या या अधिकृत धोरणांमुळेच गरीबी हटण्याची प्रक्रिया मंदावली, अशी प्रभावी यांनी लिफ्टन करतात. मायकल लिफ्टन यांनी कंट्री व टाऊन या संकल्पना वापरून केलेली शेतीच्या शोषणाच्या सिध्दांताची मांडणी शरद जोशींनी मोठ्या कल्पतेने भारत व इंडिया ही संकल्पना वापरून भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली व शेतकऱ्यांची प्रबळ राजकीय ताकद उभी राहिली. यावरून त्यांच्या संघटनेचे स्वरूप लक्षात येते. १९९१ साली मुक्त अर्थव्यवस्थे संदर्भात शरद जोशी यांनी ''सरकार क्या समस्या सुलझायेगी? सरकार ही एक समस्या आहे ! अशी टोकाची भूमिका घेतली. तर याच काळातील डंकेल ड्राफ्टचे स्वागत केले असले तरी, हा संवेदनशील विषय शेतकऱ्यांना समजून सांगण्यास कमी पडले. त्यामुळे या संघटनेची पडझड होऊ लागली. 

  • ज्या पक्षाला विरोध करत राहिले त्याच पक्षाच्यावतीने राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळवले. अशी विसंगती दिसून येत असल्याने संघटनेतील मोहरे बाहेर पडले, संघटनेची एकसूत्रता ढासळू लागली. वेगवेगळ्या संघटना उदयास येऊ लागल्या. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे समीकरण कमी कमी होत गेले. पण शरद जोशी यांच्या शेतकरी संघटने प्रमाणे देश ढवळून काढणारी संघटना निर्माण होऊ शकली नाही. शरद जोशी यांनी जी झुंज दिली आणि संघटना नावारूपाला आणली. पण एकेक मावळे स्वतःचा सावतासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकानेही बळीराजाचे स्पंदने ज्वलंत करण्यासाठी शेतकरी संघटनेची कावड उचलू शकले नाही. त्यामुळे शरद जोशी यांच्या विचारांची परवड झाली. जोशी यांच्या राजकीय व सामाजिक चळवळीत शेती आणि शेतकऱ्यांच्या परिवर्तनाची असंख्य स्पंदने आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात शरद जोशी यांनी शेती प्रश्नांसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. चळवळीतील साक्षीदार म्हणून राहिले, ते निघून गेले, स्वार्थाचे भागीदार बनले. त्यामुळेच शेतकरी संघटनेची शोकात्मकता झाली.  यांचे परिमार्जन म्हणजे शरद जोशी यांच्यासारख्या सच्चा नेत्याची झालेली परवड होय. जोशी यांचे अनेक कार्य अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना आपले कौशल्य पणाला लावतील का ? शेतकऱ्यांचे प्रश्न,त्यांच्या समस्या, त्यांच्या. हालअपेष्टा यासाठी आंदोलनाचे अंगार उभे करणारे शरद जोशी यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायीआहे. 

  • लेखक विकास पांढरे,९९७०४५२७६७  ( सदर लेख १३ डिसेंबर २०१५ रोजी दैनिक देशदूत,जळगाव मध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...