शनिवार, २१ मार्च, २०२०

'प्लेग ते कोरोनापर्यंतचा प्रवास'


काही वर्षीपूर्वी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हाँकींग यांनी सांगितले होते, ‘‘मानवजातीसह जीवसृष्टीला शंभर वर्षांपेक्षा जास्त भवितव्य आहे असे वाटत नाही.’’

एका मुलाखतीत बिल गेट्स म्हणतात, "रोगराई मुख्यत्वे साथीचे रोग. पोलिओ, मलेरिया, एचआयव्ही, क्षयरोग इत्यादी सारखे असे रोग ज्यांना आम्ही समूळ घालविले आहे किंवा निंयत्रणात आणले आहे. त्यांना शुन्यवत करण्यासाठी दृढसंकल्प केला पाहिजे जोवर त्यावर आम्ही पूर्ण नियंत्रण प्राप्त करत नाही."

ही त्यांना वाटणारी चिंता म्हणजे जगातील विचारशील माणसाची अस्वस्थ अभिव्यक्ती होती.

विज्ञानाने मानवी जीवन सुखी आणि आनंदी बनवले आहे तसेच मानवासमोर आव्हाने देखील निर्माण केले आहेत. एड्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू यासारखे आजार वैद्यकशास्त्रासमोर आव्हान बनून उभे आहेत.
आज कोरोना’  या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला भयभयीत करून टाकले आहे. चीनमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा रोग आता जगभरातील दीडशेहून अधिक देशात पसरला आहे. विषाणूजन्य रोगामुळे भारतालाही फटका बसला आहे. देशात शंभरहून अधिक नागरिक या रोगाने बांधित झाले आहे. महाराष्ट्रात पुणे शहरात सर्वांधिक संख्या आढळून आली आहे. याबाबत केेद्र व राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या रोगामुळे जागतिक अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे.  चालू आर्थिक वर्षाच्या या शेवटच्या तिमाहीत जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोसळेल अशी भीती ओईसीडीने (आर्थिक सहयोग व विकास संघटना) व्यक्त केली आहे.'

कोरोना हा रोग चीनमधून आला आहे म्हणून अमेरिका व इतर राष्ट्रे चीनला दोषी ठरवत आहेत, चीन हा तसा धूर्त आणि लबाड देश म्हणून ओळखला जातो. असो, आपला देश आजाराने ग्रस्त असावा,असं कोणत्याही देशाला वाटत नाही, तसे चीनलाही वाटत नसावे. आरोग्याच्या बाबतीत हा देश तसा सजग समजला जातो.

 सन १९४५ मध्ये झालेल्या परिसंवादात प्रथम ब्राजील आणि चीनच्या प्रतिनिधींनी युनोत आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापन करावी असा विचार मांडला होता. त्यानंतर १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली.

हा सर्व इतिहास अभ्यासताना माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले. चीनवर अशी कोणती आपत्ती कोसळली होती, जेणेकरून चीनला आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, हा शोध घेता घेता प्लेग ते कोरोनापर्यंतचा इतिहास जाणून घेता आला.

जागतिक पटलावर गेल्या २० वर्षांमध्ये एक प्रबळ महासत्ता म्हणून चीनचा उदय झाला आहे.  आर्थिक महासत्तेबरोबरच सामरिक महासत्ता बनण्याच्या दिशेनेही चीनने दमदार पावले टाकली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर या देशाने जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. चीनच्या मॉडेलचे अनुकरण करण्याचा अनेक देशांना मोह अवरला नाही. सध्या हा देश 'कोरोना आणि बर्ड फ्लूने' ग्रस्त आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

आता आपण माहिती करून घेऊया अशाच काही महाभयंकर साथीच्या आजारांबद्दल...

प्लेग, देवी, पटकी, टायफॉईड, डेंग्यू, पोलिओ,एड्स आशा विविध साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला चितेंत टाकले होते. यातील प्लेग आणि देवी या दोन रोगांवर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. १९७५ साली देवी रोगाचा भारतात रूग्ण आढळला होता. २००१ सालानंतर दूषित पाणी पिण्याने होणारा नारू हा रोग सापडलेला नाही. मार्च २०१४साली जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.आता एड्स, चिकुनगुनिया आदी साथी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

‘प्लेग’ हा रोग ऐकताना आणि वाचताना अंगावर काटा उभा राहतो. युरोप खंडात तिसर्‍या शतकापासून या साथीचा डंका वाजत आला आहे. जगाच्या इतिहासात या रोगामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. १८९० पर्यंत आपल्या भारतात या रोगाचा शिरकाव झाला नव्हता. १८५५मध्ये चीनमध्ये सुरू झालेली प्लेगची साथ सर्वांत मोठी समजली जाते. ती सुमारे आठ वर्षे चालली आणि त्यात सुमारे एक कोटी नागरिकांचा जीव गेला. चीनमध्ये आलेली ही साथ भारतभर पसरली. या रोगाने युरोपमध्ये २५ टक्के जनता दगावली,  १८६४मध्ये वर्षभरात पाऊणलाख रुग्णांचा जीव गेला.

 पुण्यात प्लेगची साथ १८९७ मध्ये पसरली होती. त्यात असंख्य रूग्णांचा जीव गेला. संपूर्ण पुण्यात जीवघेणी साथ पसरल्यानंतर ब्रिटिशांनी १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू केला. 
( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महामारी रोग कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे.COVID-१९ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी संशयितांवर पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने आदेश दिला आहे.)
पुण्यातील कॅन्टोनमेंट क्षेत्र आणि उपनगरातील उंदीर नष्ट करण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वाँल्टर चार्ल्स रँडने लष्कराची मदत घेतली. इंग्रज जवान घरात जबरदस्तीने फवारणी करून घेऊ लागले. आरोग्याच्या दृष्टिने ही जबरदस्ती योग्य वाटत असली तरी, दुसरीकडे फवारणीच्या नावाखाली इंग्रज घरातील संपत्ती लुटत, आयाबहिणीच्या अब्रुवर हात घालत असे अनेक पुरावे इतिहासात आढळतात. 

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून इंग्रजांच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे’ हा अग्रलेख याच संदर्भातला आहे.. पुढे काय झाले ? हे तुम्हाला माहितच आहे. रँडच्या जुलमी कारभाराचा बदला चाफेकर बंधूंनी घेतला.

सामाजिक, शैक्षणिक कार्यात हिरहिरीने सहभागी असणार्‍या सावित्रीबाई फुले यांना प्लेगपीडितांचे हाल पहावले नाहीत. त्यासाठी त्यांनी पीडितांसाठी पुणे शहराजवळ असलेल्या ससाणे यांच्या शेतात दवाखाना सुरू केला. स्वतः सावित्रीबाई फुले यांनी पीडितांची सेवा केली, एवढेच नव्हेतर पीडितांग्रस्तांच्या कुटुंंबांना धीर देण्यासाठी घरोघरी जात. ही सेवा करता करता सावित्रीबाईंनाच प्लेगची लागण झाली यात त्यांचा अंत झाला. समाजाची सेवा करताना सावित्रीबाईंना एकप्रकारे वीरमरणच आले.

९०चे दशक. महाराष्ट्रात १२ आँगस्ट १९९४ साली बीड जिल्ह्यातील मामला गावात प्लेगचा रुग्ण सापडला होता. तत्कालीन सचिव एन.रघुनाथ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या ८१ होती. त्यात मामला गावात ४७ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली होती. याचकाळात शेजारच्या गुजरात राज्यात असे रूग्ण आढळून आले होते.

‘डेंग्यू’ हा चीनमधून शिरकाव झालेला हा विषाणू जन्य आजार आहे. हा आजार प्रथम चीनमधील ‘जीन’ या राजवंशात आढळून आला. इतिहासाच्या दप्तरात १७ व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे सापडतात इ.सन १७७९आणि १७८०मध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आले.  या आजारामुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या खंडांत मोठी जीवित हानी झाली होती. हा आजार जगभरातील १०० हून अधिक देशात पसरला आहे.

भारतात १९६३ साली कोलकाता येथे डेंग्यूची पहिली मोठी साथ आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात या रोगाचा प्रादुर्भाव झाला. चार वर्षांपूर्वी आपला महाराष्ट्र डेंग्यूंचा विळख्खात सापडला होता. हजारोहून अधिक नागरिक डेंग्यूने ग्रसले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात डेंग्यूचे १९०दशलक्ष रुग्ण आहेत, त्यापैकी ९६ दशलक्ष रुग्णांना उपचारांची आवश्यकता आहे. आपल्या भारत देशात डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य ते उपाय न केल्यामुळे दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २५टक्क्यांनी वाढ होते, अशी आकडेवारी सांगते.

‘स्वाइन फ्लू’  ह्या रोगाचा मुद्दामहून उल्लेख करत आहे, रोग तसा अमेरिकेतून आला आहे.  २००९साली भारतात या रोगाने हाहाकार माजवला होता. पुणे व मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने या रोगाने ग्रसले होते.

चीन हा जगात डुकराच्या मांसाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. सन २०१८साली या देशात आफ्रिकन स्वाइन ताप पसरण्याच्या भीतीने १४५०० डुकरांची कत्तल करण्यात आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये चीनमध्ये आफ्रिकन स्वाइन तापाचा रुग्ण सापडला होता तेव्हापासून चीनमधील अनेक शहरांत डुकरांमध्ये हा विषाणू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी संसर्ग झालेले पशुधन व डुकरे नष्ट करणे हा एकमेव मार्ग असतो. चीन सरकारने ही काळजी घेत निर्जन जागी डुकरांची कत्तल केल्या आहेत,

तात्पर्य असे की, चीन हा आपला शेजारच्या देश आहे, त्यामुळे इथून कोणत्याही हा रोग आपल्याकडे शिरकाव करू शकतो.

‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल’ मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या माहितीनुसार १ डिसेंबर २०१९पर्यंत महाराष्ट्रात २ हजार २७९रूग्णांना स्वाइन फ्लूवर उपचार करण्यात आले . त्यापैंकी  २४२रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर राजस्थान २०८आणि मध्य प्रदेश मध्ये १६५ रूग्ण स्वाइन फ्लूने दगावली गेल्याची माहिती आहे.  १जानेवारी ते १डिसेंबर २०१९ दरम्यान पुणे शहरात १७५रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती.

‘बर्ड फ्लू’ हा चीनमधून प्रादुर्भाव झालेला रोग आहे. हा रोग प्रथम चीनी बदकांमध्ये आला आणि त्यानंतर कोंबड्यांना याची लागण झाली. २००३-०४ साली चीनमध्ये या रोगाने थैमान घातले होते. बाधित पक्ष्याचे विषाणू मानवाच्या शरीरात जात असल्यामुळे असंख्य नागरिक या रोगांने ग्रस्त झाले होते. या रोगांमुळे भारतातला पोल्ट्री व्यवसाय कोलमोडून पडला होता. लाखो कोंबड्यांना ठार मारण्यात आले होते. आजची परिस्थिती लक्षात घेता भारतातील  छोट्या-मोठ्या पोल्ट्री धारक व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या १ फेब्रुवारी २०२० च्या बातमीनुसार, हुनान प्रांतामधील शायोयांग शहरातील एका पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूची लागण झाल्याची चीनच्या कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. फार्ममधील ७८५०कोंबड्यांपैकी ४५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून तसेच बर्ड फ्लूमुळे एकूण १७हजार ८२८ प्रांण्याना ठार करण्यात आले, अशी बातमी आहे.

सध्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे वायू प्रदूषण. जर्मनीतील मेन्झ येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे प्रमुख लेखक जोस लेलीवेल्ड यांच्या मते, "वायू प्रदूषणाचा एक (साथीचा रोग) सर्वत्र जगभरात जगण्याचे प्रमाण तीन वर्षांनी कमी होते आणि यामुळे दरवर्षी ८.दशलक्ष लोक अकाली मृत्यू होतात."पुढे म्हणतात, सर्वाधिक फटका बसणारा भाग आशिया आहे, जिथे सरासरी आयुष्यमान चीनमध्ये १.२ वर्षे, भारतात ९.९ वर्षे आणि पाकिस्तानमध्ये ८वर्षे कमी होते.

२०१४ सालच्या सुमारास मुंबईत दररोज सरासरी वीसजणांचा टीबीने मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने प्रसिध्द केला होता. टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूची मुंबई ही भविष्यात राजधानी होईल, असा निष्कर्षही या संस्थेने काढला होता.

या जगात असे अनेक आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्‍चर्य वाटेल. ते आपल्या सामन्य आजारांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यावरचे उपाय देखील. 

 कोरोना' आजारातून संपूर्ण जगाची सुटका होण्यासाठी  प्रार्थना करूया.
सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय

©विकास पांढरे

संपर्क :-९९७०४५२७६७
संदर्भ माहिती : आंतरजालावरून 

(तळटीप - मी आरोग्य क्षेत्रातील जाणकार नाही. अथवा इतिहास अभ्यासक देखील नाही. त्यामुळे वरील उपलब्ध माहिती, आकडेवारीमध्ये चुका झाल्या असतील तर क्षमा असावी.)

मंगळवार, १० मार्च, २०२०

माझ्या जन्माची कहाणी - भाग 3


तो दिवस आजही मला स्पष्टपणे आठवतोय. त्या दिवशी घरात एक नवीनच असा प्रसंग घडत होता. तो आमच्या वाट्याला कधीही असा आला नव्हता.. त्या प्रसंगाने आई आणि नानाच्या चेहर्‍यावर ‘हसू आणि अश्रू’ हे दोन्ही भाव दाटून आले होते. घरातला एक आर्थिक कोपरा ढासळू पाहत होता. नाना पहिल्यांदाच घरात असं येरझार्‍या मारत होता... नानाच्या पायाला पाणी सुटलं होतं..घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. सारखं ट्रगतलं कागद शोधत होता.. त्या ट्रगतले छोटे छोटे कागद काढत होता.. पण एक कागद सापडत नव्हता म्हणून आतून चिडत होता..
त्या कागदाच्या माध्यमातून आपण घरातली एक मौल्यवान वस्तू विकतोय या विचारानं नाना एकदम बैचेन झाला होता.. या सगळ्या प्रसंगामुळे आमच्या रोजच्या जगण्यातले क्षण विखुरले गेले होते.. त्याला कारण ही मीच होतो..
****

माझ्यामुळे आई आणि नानाला खूप वनवास सोसावा लागला. मी लुळा होऊन पडलो होतो.. माझा इलाज व्हावा म्हणून नाना रोज एका दवाखान्यात जात होता.. आठवड्यातून तीन-चार वेळा सोलापूरला नाना मला घेऊन जात असे.. डॉक्टर माझी नाडी बघत, आणि पैसे उकळत.. हे रोजच होत चाललं होतं.. माझ्यात कसलाही फरक जाणवत नव्हता. ‘आपलं पोरगं आज ना, उद्या तुरूतुरू चालेल, उठेल!’ या आशेने नाना दवाखान्याला पाण्यासारखा पैसा ओतत होता..

डॉक्टर म्हणायचे, ‘मुलगा बरा व्हायचा असेल तर त्याच्या पायाचे ऑपरेशन केलं पाहिजे. त्यासाठी दहा-पंधरा हजार रूपये लागतील..’ 

डॉक्टराचे म्हणणे ऐकून नानाची कंबर बसली होती. एवढे पैसे आणायचे कुठून? शेतीचा काही आधार नव्हता..ना कुठल्या रोजगाराचा.. ना घरात कुणी कमावत.. पै-पाहुणे ही मदतीला धावून येतील अशी त्यांची ही परिस्थिती नव्हती.. आता काय करावे? या विचाराने नाना अधिकच चिंतेत पडला होता.

दुपार झाली होती.. माथ्यावर आलेला सूर्य अधिकच चटका देत होता..दावणीला बांधलेली जनावरं हंबरंडा फोडायला लागली होती. जनावरांना चारापाणी करून येतो, म्हणून नाना, शेताकडे गेला.. जनावरांना लवणाला पाणी पाजून, त्यांना चिंचेच्या झाडाखाली बांधली. नानाच यात कशातच मन लागत नव्हतं. शेवटी घराकडं घासभर खाऊन येण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला.

दिवस मावळतीला आला.. रानात चरायला गेलेली गुरे-ढोरे गावाच्या दिशेने निघाली होती.. नाना मात्र माझ्याच विचारात गुंग होता. या विचाराच्या तंद्रीने नानाला अस्वस्थ करून टाकलं होतं.

गावातल्या सावकाराला एकरभर शेत विकायचं आणि माझं ऑपरेशन करायचं! असं नानाच्या मनात घोळू लागलं. पदारात चार लेकरं आहेत.. पुढं त्याचं कसं व्हायचं?  शेवटी काही तरी केलेच पाहिजेच ना.. हा इचार सतत नानाला भेडसावत होता.

आपली 'शेतीमाय' इकायची नाही, असं  दुसरं मन ही नानाला सावरत होतं. मागचा-पुढचा इचार करत नाना मोठ्या कष्ठानं घेतलेलं दुर्गाच्या (नळदुर्ग) तुळजाभवानी साखर कारखान्याचं ‘शेअर्स’ विकायचं मनात ठरवलं. नानाला हा इचार पटला हेाता. यातून आपलं काही मोठं आर्थिक नुकसान होणार नाही. असे मनोमनी नानाला पटले. यामुळे नानाला मोठा धीर आला होता.

सांज झाल्यावर नाना घराकडं आला.. आई चुली समोर बसून काठवटीत भाकरी थापत होती. ती कोरडं पिठं पसरून दोन्ही हात काठवटीत गोल गोल फिरवत बडबड करत होती.

कवा आलावं? ‘कायबी करा माझं पोरंग चांगलं करा...’
नानाचा चेहरा हळवा झाला होता..  ‘माझ्या चितेला अग्नि देती का आता?’  ‘मला काय समजत नाय? रानात गेलो तर,तिथं मन लागतं नाय? माळावर जनावरं राखायला घेऊन गेलो की तिथं बी करमत नाय?’   ‘पोराचं कसं होईल? हाच इचार मनाला सतावत हाय?’ 
नाना गहिवरून म्हणाला..

नानाचं आणि आईचं थोडं ‘तू तू मैं मैं झाली..’

मी कारखान्याचं शेअर्स इकायचं ठरवलंय?  गावात कुणी शेअर्स घेतं का बघून येतो. नानाच्या मनाच्या मोठेपणाचं आईला कौतुक वाटलं. आपल्या पोराच्या सुखासाठी बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं पाहून आईला मनोमन आनंद झाला होता.
***

नानाला, ना दारूचे व्यसन होते ना, कसल्या विकाराचे..पण माझ्यामुळे नानाला चितेंच्या विकाराने ग्रासले होते. आपण शेअर्स विकतोय? यात कोणी फसवणुक करू नये? यासाठी सल्लामसलत म्हणून जाणत्या माणसाकडे जाऊन विचारपूस केली. आपण 'शेअर्स' विकतोय कारणामुळे नानांनी पाच-सहा रात्री जागून काढल्या असतील.

नानाची अशी धावपळ सुरू झाली होती, दरम्यान एक दिवस आमच्या शेताच्या बाजूल्या असलेल्या एका कारखान्याच्या मालकाला आमच्या घरची होणारी तारांबळ लक्षात आली. नानाची आणि त्या मालकाची अगोदरपासून ओळख होती. दुपारच्या वेळेस त्या मालकांनी नानाला ऑफिसमध्ये बोलवून घेेतले. मालकांनी माझ्या पायाची विचारपूस केली. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल निश्‍चित राहा, असं बोलून,  मालकांनी नानाला धीर दिला.

मालकाच्या धीराच्या बोलण्याने नानालाही थोडं बरं वाटलं. 
दत्तोबा, ‘तुमची परिस्थिती लक्षात घेता मी शेअर्स घ्यायला तयार आहे.’, असं मालक म्हणाला.

 नानाला, शेअर्स विकतोय? हे मालकाला कोणी सांगितलं? याचा थांगपत्ता लागला नाही. आपल्या संकटात, देवच आपल्यासाठी धावून आला. या विचाराने नानांनी मालकाला शेअर्स विकत असल्याचा होकार दिला.

‘सध्याची शेअर्सची किंमत पाहता मी दहा हजार रूपये द्यायला तयार आहे.’, असं तो मालक म्हणाला.
नानाला ही रक्कम कमी वाटली.

‘मालक दहा हजार रूपयांत पोराचं ऑपरेशन कसं होणार? सोलापूरचे डॉक्टर म्हणतायेत,  ऑपरेशनसाठी कमीतकमी पंधरा हजार रूपये लागतील.’ असं नाना मालकाला म्हणाला.

मालक म्हणाला, दत्तोबा, ‘तुम्हाला एवढे पैसे कोणी देणार नाही. तुमची नड पाहून मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतोय. त्यापुढे मला जास्त किंमत देता येणार नाही.’

नाना या गोष्टीला तयार होत नव्हता. त्यासाठी मालकानी नानाला आपल्या स्वतःच्या कारने सोलापूरला घेऊन गेला. नानाला माझ्या पायाच्या ऑपरेशनसाठी ओळखीच्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचे आश्‍वासने दिले. त्यामुळे नानाला थोडा धीर आला.
नानाचा बदलेला मूड लक्षात येताच मालकाने एक संधी साधली.

दत्तोबा, ‘‘शेअर्स विकून काय होणार नाही. तुझं साळीचं तुकडं मला विक..पाच-पन्नास हजार सहज देईन. तुझी, यातून सहज गरज भागेल.. शिवाय शिल्लक राहिलेल्या पैशातून घरासाठी काही करता येईल?'’

नानाला मालकाचा हा 'भांडवली डाव' लक्षात आला. संकटात असलेल्या माणसाचा 'धुर्त माणसं' कसं फायदा उचलतात, हे नानाच्या लक्षात आले.

‘‘मालक आम्ही गरीब असलो, म्हणून काय झालं? आता आमची नड हाय,म्हणून कारखान्याचे शेअर्स इकतोय. कारखान्याकडून हा शेअर्स घेताना मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. डगमगलो नाही, मी खरा शेतकरी आहे. शेती आमची माय आहे. या मायेला तुमच्या स्वाधीन करणं माझ्या इचारत नाय. तुम्ही माझं शेअर्स विकत घ्या अथवा न घ्या. मला त्याची पर्वा नाय.. मी दुसरा चांगला माणूस शोधतो.. तो घेईल माझं शेअर्स..’’

नानांची ही खंबीरता लक्षात आल्यानंतर त्या मालकाने आपला विचार बदलला आणि शेअर्स घेण्यासाठी स्वतःहून नानांपुढे विणवणी करू लागला. नानाचा स्वभाव दिलेला शब्द पाळणारा होता. रितसर पध्दतीने नानांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले ‘शेअर्स’कवडीमोलाने त्या मालकाच्या घश्यात घातले.

नाना मनातल्या मनात पुटपुटत होता, कस काय? आपण या मालकाच्या साखळीत अडकलो हे कळलेच नाही? आयुष्यात 'परवड' झालेल्या माणसाला कोणकोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे ह्या प्रसंगावरून नानाच्या लक्षात आलं होतं.

माणसाला आपलं मिळालेलं आयुष्य गोड मानून 'तडजोड' करत जगता आलं पाहिजे, असं म्हणतं नानांनी त्या मालकासोबत ‘शेअर्स' बद्दलचा व्यवहार पूर्ण केला. आज त्या शेअर्सची किंमत 'लाखात' आहे, असं थोडं लक्षात आलं की मागचं सारं आठवतं राहतं.
(अपूर्ण )
विकास पांढरे -९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...