आंतरराष्ट्रीय महिला दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आंतरराष्ट्रीय महिला दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ मार्च, २०१८

तिची कहाणी


रोजच्या जगण्यातून, ओळखीचा,अनोखेळीचा रास्ता पार करताना मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली,अफाट संघर्ष करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या आयाबाया भेटल्या, विशेष,स्वतःची बुध्दी व ऊर्जा समाज हितासाठी वापरणाऱ्या सुजाण महिलांही नजरेस पडल्या. या प्रत्येक महिलांची एक स्वतंत्र अशी कहाणी आहे, गाथा आहे. ही गाथा विस्ताराने मांडणे आवश्यक आहे. पण आज फक्त या आयाबायांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करेन. या आयाबाया स्वतः तर मोठे कार्य घडवतातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.

दीड एक वर्षापूर्वी मयुरी खैरे ही तरूणी भेटली. गंभीर आजाराला तोंड देत असतानाही सकारात्मक दृष्टीने आनंदी आयुष्य जगणारी आणि मध्य प्रदेशात शिंपल्याची यशस्वी शेती करणाऱ्या मयुरीने भुरळ घातली. मयुरीची कहाणी संघर्षशील आहे.

बुलढाणा जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात मयुरीचा जन्म झाला. अकरावीत असताना तिला किडनीच्या दुर्दम्य आजारांनी ग्रासले.ऐन उमेदीचे चार पाच वर्षे आजारपणात निघून गेली.  आजारपणात तिने काँलेलजा न जाता पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात मयुरीने अनेक महनीय व्यक्तीचे चरित्रे वाचून काढली. समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने तिच्यातली ऊर्जा बाहेर पडली,आणि दिशाच बदलली.

पदवी नंतर ती आजारपणाला विसरून गेली. पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जाऊ लागली. इथेच तिला समविचारी मित्रांची ओळख झाली. या तरुणांनी ऊर्मी नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. ही संस्था समाजाच्या हितासाठी काम करु लागली. एकदिवशी तिच्या वाचनात 'मोत्याची शेती' हा लेख आला. या लेखाने ती झपाटून गेली. तिच्या घरी शेती नव्हती,शेतीबद्दल तिला फारसे काही माहिती ही नव्हते. तरीही तिने ही नवी वाट धरली.

एक ते दीड वर्षाच्या रिसर्च  नंतर तिने मध्य प्रदेश मधील नर्मदा नदीच्या काठी मोत्यांची शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी शुभम पाटीदार युवकाने मोलाची साथ दिली.


मयुरी सांगत होती, "आम्ही, आता पर्यंत एक मोत्याच पिक यशस्वीरित्या काढलं आहे. बाजारात डिझायनर मोत्यांची प्रति नग सरासरी किंमत २५०-३०० रुपये आहे. आमचा आज पर्यंतचा खर्च वजा करता चागल्या प्रकारे प्रॉफिट राहिल आहे. अगदी काही हजारांच्या भांडवलावर सुरु होणारी ही मोत्यांची शेती लाखोच्या घरात प्रॉफिट कामवून देते.

मार्गदर्शन करताना मयुरी खरे


त्यामुळे "low investment and high profit चा हा bussiness" आहे असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी हा आमचा प्रयत्न आहे."

शिंपल्याची शेती उद्योग

सध्या हा प्रोजेक्ट मध्य-प्रदेश आणि गुजरात मध्ये सुरु आहेत. लवकरच महाराष्ट्रात हा प्रोजेक्ट सुरु करण्याचा तिचा मानस आहे.

इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूमची कहाणी तर अफलातून आहे.  दोन वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. नवऱ्याने सोडून दिलेली बायको म्हणून समाजाकडून मिळालेली अवहेलना पाहून त्या अस्वस्थ व्हायच्या.

भय,भीती,भोग, बाईपण तिने सर्व सोसले, यातनेतून तिला सूर गवसला. न डगमगता, समाजाची तमा न बाळगता त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या. रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना करून अनेक परित्यक्ता, घटस्फोटित, पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

मोर्चाचे नेतृत्व करताना दिव्या मगदूम

"आईबापाची परिस्थिती हालाखीची.नीट शाळा ही शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं.तव्हा १४ वर्षाची असेन. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाचं काय माझं नशीबचं फुटकं. नवऱ्याकडून चांगली वागणूक कधीच मिळाली नाही. तीन-चार महिन्याचे गरोदर होते तव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आईबापाचं अस्सं..कुठं जायचं ठरवलं तर जवळ पैसे नव्हते. कधी कधी जीव देऊन मरुन जावं,असं वाटायचं. पोटात गोळा होता.त्याला वाढवयाचं ठरवलं. 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांची नजर ही वाईट असायची. न डगमगता पुढे जात राहिले, सूर गवसला, विस्कटलेली घडी सावरू लागली. बचत गटाची कामे करू लागली. पैसे मिळत गेले, बचत होत गेली. माणसे भेटत गेली. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला आहेत, त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले, तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. पीडित महिलांचा मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. १३०० बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केले आहे. २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला आहे. निराधार महिलांसाठी 'जिव्हाळा' आश्रमाची निर्मिती करण्यात आली असं दिव्या मगदूम यांनी सांगितले.

पुरस्कार स्विकारताना दिव्या मगदूम


रणरागिणी क्रांती सेनेचे काम १३ जिल्ह्यात चालते. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी हक्कांचे व्यासपीठ बनले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्या हस्ते त्यांना महिलेचा पुरस्कार मिळाला आहे.

अमरावती (मोर्शी) येथील महिला पत्रकार संगीता ढोके यांची यशोगाथा प्रेरणा देणारी आहे. पाच वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. त्या 'हिंदुस्थान समाचार' ला महिला रिपोर्टर काम करत होत्या.

 पत्रकारितेत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि मानधनावर ती समाधानी नव्हती. पत्रकारितेवर कुटुंबांचा सांभाळ होऊ शकत नाही, ही जाणीव तिच्यात निर्माण झाली. मुक्त पत्रकारिता करत करत ती शेळीपालन व्यवसायाकडे वळली. ही नवीन वाट पार करताना खडतर सामना करावा लागला. शिकली-सवरलेली मुलगी शेळीपालन करत असल्याचे पाहून त्यांना बघून आजूबाजूच्या बाया हसायच्या. संगीताने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या हिंमतीने शंभर शेळ्यांचा शेड उभा केला अन्  व्यवसायाला कलाटणी मिळाली. आज त्यांचा व्यवसाय अर्ध्या कोटीत गेला आहे.निव्वळ नफा म्हणून वर्षाला ती २० ते २५ लाख रूपये मिळवत आहेत.
संगीता ढोके

"पत्रकारिता सोडून शेळी व्यवसायाचा मार्ग पत्कारले तेव्हा आजूबाजूचे लोक नावं ठेवू लागली. घरातला पाठिंबा असल्यामुळे सर्व गोष्टीवर मात करत गेले. अमरावती, यवतमाळ, पुसद,नागपूर, वर्धा येथील जनावर बाजारात मी सारखी दिसू लागली तेव्हा व्यापारी लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघत. काही लोक धंद्यात फसवणूक करत. जनावर बाजारात एकटी बाई काय करत आहे हे पाहून बायामाणसं ठकमक बघत. या व्यवसायात मी समाधानी असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरावे, यासाठी मी प्रयत्न करत आहे." असं संगीता ढोके यांनी सांगितले.

आटपाडी, बार्शी, अहमदनगर, नांदेड, वाशीम आदी ठिकाणी ती शेळ्या विकण्यासाठी आणि घेण्यासाठी येत असते. संगीता हिच्या कामाची दखल घेऊन विविध संस्थेकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

औरंगाबादची सविता काळे यांची ह्दयद्रावक कहाणी आहे. त्यांचा जालना शहरातल्या एका घरंदाज कुटुंबात झाला. पाच वर्षापूर्वी यांची ओळख झाली.

सविता काळे

तिला एक भाऊ व तीन बहिणी आहेत. सविता ही शेवटची मुलगी. घरचा डोलारा सांभाळण्यासाठी  आजी -आजोबांना मुलगा हवा होता. पण त्यांच्या आईला मुलगाच होत नव्हता. सवितांच्या आजी आजोबांनी अनेक मुली जिवंत पुरल्या आहेत. हा भोग सविता हिच्या वाट्याला आला. पण तिच्या भावाने त्यांना वाचवले. सविता जन्माला आल्या त्यादिवशी, प्रसुत आई झोपेत असताना घरातल्या मोठ्या लोकांनी ( वडील सहभागी नव्हते) तिला कापडात गुंडाळून दूर खड्ड्यात पुरत असताना तिच्या मोठ्या भावाने आरडाओरडा करून त्यांना वाचवले. सवितांच्या मोठ्या भावाला समज आली होती, आजपर्यंत आपल्या एक दोन बहिणी आपल्याच लोकांनी पुरल्या आहेत याची जाणीव त्याला झाली होती. आता आपली जन्माला आलेली बहिण मारू द्यायची अशी हिंमत बाळगली. त्यामुळे सविता त्या दुर्देवी प्रसंगातून वाचल्या नसत्या तर आज एका नामांकित वसतिगृहाची अधिक्षका झाल्या नसत्या.

आई समवेत सविता काळे


"आज मी ज्या ठिकाणी आहे, समाधानी आहे. यामध्ये माझ्या भावाचा मोठा वाटा आहे. भावामुळेच मी वाचू शकले. आपल्या समाजात मुलींना किती दुय्यम स्थान आहे. हे माझ्या बालपणीच्या कटू प्रसंगातून लक्षात येते. आजही आपल्या समाजात मुलींचा जन्म झाला की, तिचा बळी दिला जातो.
दहावीत असताना माझं लग्न झाले. वडिलांचे अकाली छत्र हरपल्याने मला प्रेम मिळाले नाही. पण माझ्या भावाने मला कधीच काही कमी केले नाही. मला मरणाच्या दांडेतून वाचवले,तो माझ्यासाठी देवच होता.देवानेही त्याला लवकर वर बलावले. आज तो असता तर खूप आनंदी झाला असता."अशी सविता आपली आपबीती सांगत होत्या.

सविता या संवेदनशील व्यक्तीमत्व असून, तिने अकाली निधन पावलेल्या भावाच्या मुलांचे संगोपन करून लग्न लावून दिले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

अँड. विंदा यांनी सावित्रीबाई विद्यापीठ, पुणे येथून एल.एल.एम चे शिक्षण पूर्ण केले आहे. स्वतः उच्चशिक्षित असूनही ती आदिवासी महिलांसाठी काम करत आहे. दोन वर्षांपासून तिच्या संपर्कात आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कोलाम व पानशेत भागातील कातकरी या दोन आदिवासी जमातातील महिलांचे प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

                                                 आदिवासी महिला समवेत अँड.विंदा
  • या महिलांच्या समस्येचा मूळापासून शोध घेण्यासाठी त्या किनवट,पानशेत व इतर आदिवासी भागात फिरत असतात. पानशेत भागातील कातकरी समाजाला जमीन उपलब्ध करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत.
"माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये महत्त्वाचा संबंध आहे. आदिवासी बांधवांचा निसर्गाशी अधिक नातं आहे. तो जंगलात जन्मतो आणि जंगलातच मरतो. या समूहाचा बाह्य जगाशी संबंध आला नाही, म्हणून तो मागे आहे. आज जंगलतोड वाढत आहे. माणूस आणि निसर्गाचे अंतर कमी झाले आहे. आदिवासी बांधवांचे जगण्याची उमेद आपण हिरावून घेतलो आहे. या समाजाच्या विकासासाठी हातभार लागला पाहिजे, या मानवी भावनेतून या समाजाशी माझे नाते निर्माण झाले आहे."असे विंदा यांनी सांगितले.
अँड. विंदाचा अनेक समाज संस्थाशी परिचय आहे. त्यातून त्या संशोधन करत आहेत.

मुंबईत आल्यावर वैदू समाजातील  दुर्गा गुडिले या तरूणीची ओळख झाली. वैदू समाजातील जातपंचायतीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वर्षभरापूर्वी दुर्गाने बंड पुकारला होता. ठरलेला बालविवाह मोडीत काढून तिने पंचाचा फतवा धुडकावून लावला होता. दुर्गा मुंबईत राहणाऱ्या वैदू समाजासाठी काम करत आहे.

विदेशी नागरिकांनी वैदू वस्तीला भेट दिली

समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी झटत आहे. जनजागृती करत आहे. समाजातील ११२ शाळा बाह्य मुलांना मुख्य प्रवाहात तिने आणले आहे. बचतगटाच्या माध्यमातून ५८ महिलांना एकत्र आणून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रात्रीच्या वेळी ती प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवते. स्विझरलँड येथील नागरिकांकडून वैदू समाजातील काही मुलांना शैक्षणिक मदत मिळाली आहे.
                                                       पुरस्कार स्विकारताना दुर्गा
दुर्गा हिच्या कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मानाचा रुक्मिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नागपूरचे महिला क्राईम रिपोर्टर नीता सोनवणे हिचे कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. महाविद्यालयात असताना तिने हे क्षेत्र निवडले. दहा पंधरा वर्षापूर्वी फिल्डवर जाऊन पत्रकारिता करणाऱ्या महिला निगैण्य असायच्या. क्राईम पत्रकारितेमध्ये महिलांना संधी नसायची. नीताने सर्व आव्हाने स्विकारून आपली पत्रकारिता यशस्वी करून दाखवली. उपराजधानी नागपुरात ती एकमेव महिला क्राईम रिपोर्टर असावी. कायद्याचा प्रचंड अभ्यास, प्रचंड जनसंपर्क, अधिकाऱ्यांशी,आरोपींशी संवाद साधण्याची शैली लाजवाब आहे. तिचे ओळख पाच सहा वर्षापूर्वी झाली.

                                                              नीता सोनवणे
दक्षता, पोलीस टाइम्स आणि कालीगंगा सारख्या नामांकित दैनिक व साप्ताहिकात तिच्या गुन्हेगारी जगताविषयीच्या स्टोऱ्या प्रसिद्ध होत असतात.
क्राईम जगतात महिला पत्रकार म्हणून नाव कमावलेल्या नीताने आपली संवेदनशीलता जपत अनेक पिडीत महिला व पुरूषांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्टीग करत असते. लोकांना कायदा म्हणजे काय? कलमे, पोलीस ठाण्याचा संपर्क, अशी माहिती मिळावी म्हणून तिने एक पुस्तक लिहिले आहे.

  .                                                 पुस्तक प्रकाशन करताना नीता व इतर
या सर्व महिलांना आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले. कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या कर्तुत्ववान महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सलाम..!

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
Vikaspandhare3@gmail.com

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...