गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

कहाणी एका नगरसेविकेची

पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक ७ मधून राजश्री काळे भाजपच्या तिकिटावर सहा हजार मते घेऊन निवडून आल्या. पारधी समाजातील त्या पहिल्या नगरसेविका ठरल्या. २०१० साली मी भटके विमुक्त समाजातील महिलांच्या जीवनावर आयाबाया नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची एक नायिका राजश्री काळे होती. आज तिच्या विजयाने पुन्हा एकदा त्या लेखाची आठवण झाली.



ट्रेन लोणावळयाच्या दिशेने चालली होती. पुणे... शिवाजीनगर... एकामागून एक स्टेशने मागे पडत होती. ट्रेनच्या गतीबरोबर तिच्या आनंदालाही अधिक वेगाने भरती येत होती. तिला चिंचवडला उतरायचे होते. चिंचवड प्रभुणे काकांचे गाव. त्यांनीच आधार दिला आणि ती भटकंती सोडून चिंचवडात आली. तेथेच राहिली आणि आज तिच्या आयुष्यातील एक सोन्याचा क्षण... ज्यांच्या प्रतीक्षेत तिने अनेक वर्षे घालवली. छळ सहन केला, गुरासारखे कष्ट उपसले, तो क्षण गरवारे कॉलेजमधील नोकरीचा पहिला दिवस. राजश्री नोकरीचा पहिला दिवस भरून संध्याकाळी चिंचवडकडे परत निघाली होती. तिला काकांना भेटायचे होते. दिवसभराचा अनुभव काकांना सांगायचा होता. आपणही सर्वसामान्यांसारखे जगू शकतो, मारामाऱ्या,चोऱ्या, जेल या कचाटयातून मुक्त होऊ शकतो,स्वत:च्या कष्टावर पोट भरू शकतो. हा काकांनी जागवलेला आशावाद खरा झाला होता. ट्रेनच्या वेगाने राजश्री आपल्या पूर्वायुष्यातील आठवणीच्या प्रदेशात पोहचली. मनातल्या मनात वास्तवाचे जळजळीत तुकडे जोडण्याचा प्रयत्न करू लागली. आठवणी असल्या तरी त्यांनी भोगलेल्या भंगार आयुष्याचे चटके पुन:पुन्हा राजश्रीच्या मनाला बसू लागले.  राखेच्या आत निखारा जसा बसलेला असतो तशी या आठवणीत ही आग होती.  आयुष्यभर पायाला वाट दिसेल तिकडे पळत राहण्याची सवय... कधी पोलिसांची गोळी चुकवण्यासाठी तर कधी पोलिसांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी, फक्त पळणे हाच जीवनातील जास्तीचा भाग. जीव वाचवत घृणा सहन करत राजश्रीच्या मनात अशा विचाराचा, आठवणींचा कल्लोळ चालला होता. ती आठवणीच्या खोल खोल गर्तेत उतरत गेली. स्वत:च्या आयुष्याचे काच तुकडे जमवून एकसंध चित्र पाहण्याचा प्रयत्न करू लागली.

****

पारधी... सांगायला गाव नाही... राहायला घर नाही. मोकळया आकाशाखाली गाववेशीबाहेर पाल ठोकून राहायचे गावाच्या आसऱ्याने ... राजश्रीचे आईवडीलही त्याला अपवाद नव्हते. गणपत भोसले राजश्रीचे वडील, पाच पोरी आणि एक पोरगा असे चिल्या-पिल्याचे लेंढार सांभाळत जगत होते. पोटाची आग विझवायला बाकी पारधी करतात तेच काम करत होते, पण पोरांनी शिकावे, मोठे व्हावे हे स्वप्न त्यांच्याही डोळयांत होते. कोणत्या बापाला वाटेल की आपल्या पोरांनी रानोमाळ भटकावे, चोऱ्या कराव्यात, खून पाडावेत, गणपत भोसलेंनी पोरांना शाळेत घातलं. बाकीच्या बहिणीबरोबर राजश्रीही शाळेला गेली... पहिली... दुसरी... तिसरी... चौथी... राजश्री चौथीत होती. एक दिवस पालावर पोलिसांची धाड पडली... चोरी झालेली... आरोपी गणपत भोसलेला मारझोड करतच पोलिसांनी पालाबाहेर काढले. बेडया घालून घेऊन गेले. एकच गलका झाला... गणपतला पोलिसांनी धरला... साऱ्या पारध्यात पळापळ झाली... राजश्रीचे वय ते किती दहा-अकरा वर्षांचे. हबकली... बापाला पोलीस घेऊन गेले... कशासाठी? चोरी केली म्हणून? पुरावा काय? पारध्याने पुरावा द्यायचा नसतो. सरळ गुन्हा कबूल करून शिक्षा भोगायची असते,नाहीतर पोलीस मरेपर्यंत  मारतात. पण मरू देत नाहीत...  पायाच्या शिरा तोडतात, गुडघ्याची वाटी फोडतात. जायबंदी करतात. एकदा अटक झालेला पारधी स्वत:च्या पायावर सहसा उभा राहत नाही. त्यातूनही सुटला तर पोलीस आवई उठवतात,  हा फितूर आहे...  मग सारे पारधी त्यांच्याशी फटकून वागतात. माणसाला शिवलेल्या कावळयाला जसे बाकीचे कावळे टोचून टोचून मारतात ना अगदी तसे... हे  सारे चित्र राजश्रीच्या डोळयांसमोरून सरकन् पुढे गेले. धक्काबुक्की करत गणपत भोसलेला गाडीत कोंबले, घेऊन गेले. रानोवनी पांगलेले पारधी पुन्हा पालाकडे आले. आपण  वाचलो  याचे समाधान आणि गणपतला अटक यांचे दु:ख दोन्ही एकाच वेळी मग सगळयांच्या चेहऱ्यावरून ओघळले. पुढे कधीतरी केस उभी राहते. न्याय होतो आणि गणपत भोसलेला चोरीच्या गुन्ह्यासाठी सजा झाली. गुलबर्गाच्या जेलमधील भोसले दहा वर्षांसाठी गेला.

****

राजश्रीच्या बापाला ज्या वर्षीसजा झाली त्याच वर्षी तिचं लग्न झालं, ज्ञानेश्वर काळेशी. एक दिवस ज्ञानेश्वर आला आणि सरळ मागणी घातली राजश्रीला. राजश्रीच्या आईनेही होकार दिला. ज्ञानेश्वरचे वडील वारलेले.  आई दुसऱ्या पोराकडे राहत होती.  एका जागी स्थिर होता. पोरगा पाहण्यातला. पोरगीचे नशीब उजळले होते. लग्न नक्की झाले, पण हुंडा आणि जात पारध्यांत पोटभेद आहे. गावपारधी आणि गायपारधी या दोघांत सोयरीक होत नाही.  गावपारधी नवरा हुंडा घेतो,  तर गायपारधीमध्ये नवरीचे आई-वडील हुंडा घेतात. ज्ञानेश्वर गावपारधी आणि राजश्री गायपारधी. दोघंबी एकमेकांना कमी समजणाऱ्या जातीचे. जुळणार कुठून? आणि हुंडा... तो कुठून देणार.  बाप जेलमध्ये सजा भोगतोय. कुठून आणायचे पैसे. तेही थोडेथोडे का हवेत. लाखात हुंडा मोजावा लागणार. राजश्रीची आई हवालदिल झाली, पण ज्ञानेश्वर काळे. त्याने निर्णय घेतला, हुंडा घ्यायचा नाही. राजश्रीच्या आईचा जीव भांडयात पडला. लगीन जुळले. अक्षता पडल्या आणि राजश्री भोसले राजश्री ज्ञानेश्वर काळे झाली. गायपारधी-गावपारधी यांच्यात लगीन लागले. पारध्यांच्यात खळबळ माजली. राजश्रीच्या आईबरोबरच सारे राहू लागले. पोट भरण्यासाठी ज्ञानेश्वराने दारूची भट्टी पेटवली.

****

ज्ञानेश्वर दारूची भट्टी चालवू लागला आणि मदतीला राजश्री. तीही शिकली दारू गाळायला. रोज 400 ते 500 रुपये यायचे. पैसा हातात खुळखळायचा. कधीकधी ज्ञानेश्वर स्वत:ही प्यायचा, तर कधी पोलिसांची धाड पडायची. मग तोडपाणी. प्रत्येक वेळी हजार-दीड हजार खिशात घातल्याशिवाय पोलीस माघारी फिरत नसत. पोलीस हप्ता बांधून घेत. वेळोवेळी येऊन दारू पीत.  पैसे देण्याचे नाव नाही. उलट शिव्यांची लाखोली आणि दंडुक्याचा फटका. दिवस चालले होते. ज्ञानेश्वर-राजश्रीने दोन वर्षे भट्टी चालवली. पण त्या काळात बऱ्याच घटना घडल्या होत्या, ज्या राजश्रीला नकोशा होत्या.

****

''जात बाटवली.''

''गावपारध्याने गायपारध्याची बाईल केली?''

''कुळाला बट्टा लावला.''

''हे खपवून घ्यायचे नाय.''

बारा तोंडी बारा बाता... खवळलेले पारधी... जातीला बट्टा लावणाऱ्यांना जिवंत ठेवायचे नाही. आपसातील कुजबुज. राजश्रीच्या कानी आली. धीराची बाई.  पोरगी जावयाला सोबत घेऊन जगत होती, कष्ट करत होती. पोरगा ज्ञानेश्वर भोसले रंगकाम करायचा... तसा लहानच होता, पण आईला मदत करायचा.  गणपत भोसलेला जेल झाली आन् सारा कुटुंबकबिला धरमगावाकडे गेला. मंगळवेढा सोडला. बापाला पोरांनी शिकावे असे वाटायचे. आईने ते पुरे करायचे ठरवलं. राजश्री आन् तिची बहीण  शाळंला जाऊ लागल्या. पुन्हा अक्षरं गिरवू लागल्या.  शाळेत अंतर पडले होते. चौथीनंतर शाळा थांबलेली. आईने जिद्द केली. पोरांना शाळेला घातले.  राजश्री शिकू लागली. पाचवी, सहावी, सातवी. राजश्रीचे शाळेचे अनुभव विलक्षण. शाळेत पोरे छळायची. वाटेने छेड काढायची, जवळ बसू देत नव्हती. पण राजश्रीने जिद्द केली. शाळेला जात राहिली. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली होती. प्रत्येकजण आपापल्या डबा खात होता. राजश्रीला कुणी जवळ करीना. केविलवाणी झाली. मराठा,सुतार, धनगर जातीची पोरे-पोरी राजश्रीला जवळ घेईनात. पारधी ना ती... पेन्सिलीची चोरी केली तर? पुस्तकांची चोरी केली तर? त्यांच्या मनात शंका असे.

शाळेच्या बाई मात्र राजश्रीच्या जिद्दीचे कौतुक करत. मायेने जवळ घेत. हवे नको ते पाहत. राजश्री कबड्डी चांगली खेळायची. अनेक वेळा शाळेच्या संघातून ती खेळली. संघ जिंकला. अशा वेळी बाईचा ऊर भरून येत असे. संघ जिंकला की बाई राजश्रीला बक्षिसे देत. वह्या,पेन शाळेसाठी लागणारी साधने.

****

हूल उठली. जात बाटवणाऱ्यांना खतम करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर काळेला ठार करणार. राजश्री आणि ज्ञानेश्वर दोघेही सावध झाले. पारध्याची जात शब्दांना फिरणार नाही. दारूची भट्टी चालवून दिवस काढत असताना आता तर मोठे संकट समोर होते. त्यातच ज्ञानेश्वर काळेच्या नातेवाईकांत काहीतरी बिनसले. तो राजश्रीला तिच्या आईकडे सोडून निघून गेला. पण पूर्वी निसर्गाने त्यांचे काम केले होते. राजश्रीच्या पोटात गर्भ वाढला होता आणि ज्ञानेश्वर राजश्रीला सोडून गेलेला. जीव हवालदिल. अशा वेळी नवरा जवळ हवा. तो निघून गेलेला. पण जास्त दिवस नाही. आला परत. मालू पवारचा मर्डर झाला आणि ज्ञानेश्वर परत आला. राजश्री व ज्ञानेश्वरने विचार केला, हे पारधी आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत. इथून पळाले पाहिजे. एक दिवशी दोघे अचानक गायब झाले. कुठे गेले? कसे गेले? कुणाला कळले नाही. पण पारध्यांत आवई उठली. ज्ञानेश्वर काळेला राजश्रीसोबत मारून टाकले? हे काम कोणाचे? गावपारध्याचे की गायपारध्याचे?दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले. पोलीस कम्प्लेंटपर्यंत मजल गेली. एकमेकांविरुध्द काठया-कुऱ्हाडी उठल्या. जात-पंचायत बसवू,आव्हाने, प्रतिआव्हाने झाली. पण राजश्री व ज्ञानेश्वर दोघेही सापडली नाहीत. दोघेही हुबळीला पोहोचली होती. एका आजीबाईच्या सहाऱ्याने तेथे राहिले. पण महिन्याभराने पुन्हा आपल्या माणसांची ओढ लागली. एक महिन्यानंतर दोघेही परतली. तेव्हा कुठ वादळ शांत झाले. मग ख्रोबापूरला पाल टाकले. दोन वर्षे तेथेच राहिले. दारूची भट्टी लावली. शिवानीचा जन्म झाला. संसारात एकाची भर पडली.

****

यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली होती. परभुणे काका, गडेकर गुरुजी, सोलापूरचे अण्णा व्हटकर पालापालावर फिरत होते. देवकामावशीनेच प्रभुणे काकांची आईशी भेट घालून दिली. मंगळवेढयाला रमेश काळे, प्रभू काळे हत्याकांड झाले. रमेश काळे राजश्रीच्या आईचा मामेभाऊ तर प्रभू काळे आईचा मामा. रमेश काळेचा पोलीस अत्याचारात जीव गेला,तर प्रभू काळेच्या गुप्तांगात जंतू झाले. पोलिसांनी त्याला लाईटचा करंट लावला होता. या प्रकरणात प्रभुणे काकांनी पुढाकार घेतला. अन्याय, अत्याचाराचे प्रकरण कलेक्टरसमोर धसास लावले. रमेश काळेच्या कुटुंबीयाला सरकारी मदत मिळाली आणि पारध्यांचे प्रश्न,त्यांचे पुनर्वसन यांची गरज अधिक तीव्रपणे जाणवू लागली.

महाराष्ट्रात तेव्हा युतींचे शासन होते. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघ कार्यकर्त्यांनी जोर लावला. पाहता पाहता प्रथम वसनाचा प्रयोग यशस्वी झाला. सय्यद वरवडयाला पारध्याचे प्रथमवसन झाले. ज्यांना सांगायला गाव नव्हते, त्यांना गाव मिळाले. राजश्री ज्ञानेश्वर काळेंची झोपडी ही या प्रथमवसनात वसली.

****

स्वत:चे घर बांधायचे, सन्मानाने राहायचे,प्रभुणे काकांनी सांगितले, पण त्यासाठी अवघड अट घातली. चोरी न करता घरासाठी पैसे जमवायचे, पैसा पैसा स्वत:च्या कष्टाचा आणि सच्चाईचा हवा. चोरी, दरोडे टाकून घर बांधू नका. सय्यद वरवडे येथे 45 एकर जमीन सरकारकडून मिळाली. येथे प्रथमवसन व्हायचे होते. पक्की घरे स्वत:च्या कष्टातून उभारायची,असे काका नेहमी सांगत. सय्यद वरवडेला झोपडया उभारल्या गेल्या आणि पारधी कुटुंबे तेथे राहू लागली. पारध्याची पोरं यमगरवाडीच्या आश्रमात शिकू लागली. पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा तर पोराबाळांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक होते. यमगरवाडी हे हक्काचे आणि आधाराचे स्थान वाटू लागले. यमगरवाडी. तेथील महाशिवरात्रीचा स्नेहमेळावा. भटकेश्वराची जत्रा. सारे भटके येथे जमा होत. सय्यद वरवडे येथीलही पारधी येत स्नेहमेळाव्याला.  एक वेळ राजश्रीही आली. महाशिवरात्री आदली रात्र म्हणजे भटकण्याची जागरण रात्र. भटक्यांनी विविध कला सादर कराव्यात, संस्कृतीचे गोडवे गावेत. यासाठी या कार्यक्रमाची योजना. गाण्यातून, पोवाडयातून राजश्रीला आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान इतिहास, वारसा, परंपरा कळत गेला. आपण चोर नाही, दरोडेखोर नाही. देशाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी आपल्या वीर पुरुषांनी बलिदान केले आहे.  मग का आली अशी जन्मासोबत भटकंती. पोलीस गोळीवर लिहिलेले नाव. का? कशासाठी? असंख्य प्रश्नाचे भुंगे राजश्रीचा मेंदू पोखरू लागले. इतके दिवस जगलेले भणंग आयुष्य तिला नव्याने कळू लागले. आपण जे जगलो ते आपल्यावर लादले गेले होते. आपण मुक्त होऊ शकू  का या जाचातून. कितीतरी वेळ राजश्री विचारचक्रात गुंतून पडली.

हे संघाचे लोक. प्रभुणे काका, किती भटकंती करत आहेत आपल्या लोकांसाठी आणि हे यमगरवाडी, मुक्तिनगर, सय्यद वरवडेचे प्रथमवसन किती केले या लोकांचे कशासाठी?तर आपण सर्व एका भारतमातेचे पुत्र आहोत, या भावनेच्या पूर्ततेसाठी संघ काम करतोय. हे सर्वच कार्यकर्ते नि:स्वार्थीपणे काम करत आहेत. सामाजिक परिवर्तनाचा विश्वास त्यांनी कामातून जागवला आहे. संघशक्ती नक्कीच भटके- विमुक्तांचे जीवन बदलेल. आपणही त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी मार्ग शोधला आहे...  संघविचाराने आपण विश्वासाने त्यांच्यासोबत जायचे, मार्गक्रमण करायचे. संघाची माणसं चांगली आहेत. देव माणसं ही. तेच घडवतील आपले पुढचे आयुष्य आणि थांबवतील आपले भटके जगणे.

यमगरवाडीचा स्नेहमेळा संपला. जमलेले भटके परत फिरले. राजश्रीही सय्यद वरवडेला परत गेली. तिथे तिची झोपडी... गावात मोलमजुरी करून दिवस काढत होती. प्रथमवसन झाल्यापासून दारूची भट्टी बंद केली होती. मजुरी करूनही अर्धपोटी राहावे लागत होते. कामासाठी दारोदार भटकावे लागत होते. पारध्याची जात आडवी येत होती. चोरी करील म्हणून कोण काम देत नव्हते. दिले तर सक्त पहारा असे. एक दिवस प्रभुणे काका सय्यद वरवडेला प्रवासात आले. सर्वांची विचारपूस झाली. बोलत बोलत प्रभुणे काका राजश्रीच्या झोपडीपर्यंत आले. सर्वजण भोवती गोळा झाले. हाताला काम पाहिजे. पण चोऱ्या करायच्या नाहीत.कष्ट करायचे पण दारूची भट्टी चालवायची नाही. सन्मानाने जगायचे, पण कसे? प्रश्न बिकट होता. काका सांगत, नवे काहीतरी शिका. सहज शक्य आहे असे प्रशिक्षण घ्या. हस्तकला, हस्तव्यवसाय शिका. मसाले,पापड, लोणची, शिलाई असे कितीतरी व्यवसाय शिकण्यासारखे आहेत. पुण्यात, मुंबईत असे व्यवसाय शिकवले जातात. तुमच्यापैकी कोण कोण शिकायला जाईल? शिकण्यात तर फायदा तुमचाच. विचार करा. तुमच्या नेहमीच्या जीवनापेक्षा हे काम वेगळे आहे. पण शिकण्याला पर्याय नाही. काका बोलताना थांबले. काकांचा सल्ला उपयुक्त होता. नव्या जीवनाची सुरुवात करणारा होता. राजश्री,ज्ञानेश्वर दोघेही तयार झाले.

****

काकांनी काम केले. राजश्री व ज्ञानेश्वरला पुण्याला बोलावले. पुण्याच्या खादी ग्रामोद्योग भवनात म्हणजे आगाखान पॅलेसमध्ये त्यांची प्रशिक्षण व्यवस्था केली. पण चांगल्या कामात खूप मोडते असतात. तसेच झाले. राजश्रीला प्रवेश नाकारला. कारण राजश्रीच्या पोटचा गर्भ. राजश्रीला दिवस गेले होते. गर्भवती अवस्थेत शिलाई मशीन प्रशिक्षण शक्य नव्हते. आगाखान पॅलेसमधील प्रवेश हुकला. राजश्री हबकली,निराश झाली. आता काय करायचे? सय्यद वरवडे सोडून येताना किती स्वप्ने आणली आपण सोबतीला. शिकू. स्वत: कमावू, कुणाच्या आधाराशिवाय जगू, पण प्रवेश नाकारला. आता काय? आपण जातीपेक्षा वेगळे करतोय. पारध्याची बाई असं प्रशिक्षण, शिक्षण घेत नाही. पारध्याची बाई म्हणजे पापाचे मूळ. आपण धाडसाने आलो. पारधी समाजातील बंडखोरी. समाज कसा स्वीकारेल मला... राजश्री विचारात गर्क  झाली.

****

पुन्हा काकांची धावपळ, शोधाशोध, कुठे प्रशिक्षण द्यायचे, तोपर्यंत राजश्री चिंचवडला प्रभुणे काकांच्या घरी राहिली. प्रयत्न चालू होते. शेवटी शिरूर तालुक्यातील पाबळ येथे प्रशिक्षण मिळू शकते असे लक्षात आले. काका पोहोचले तेथे. संस्थाचालकांना विनंती केली. घेऊन या म्हणाले. काका राजश्रीला घेऊन पोहोचले.

''हिला प्रशिक्षण हवं आहे. काखेत शिवानीला घेतलेल्या राजश्रीकडे पाहत संस्थाचालक म्हणाले.

''हो.'' काका.

''हिला तर मुलगी आहे आणि पुन्हा गरोदर...''संस्थाचालक.

''असे आहे खरं, पण प्रशिक्षणही गरजेचे आहे''काका. ''गरोदर अवस्थेत शिलाई प्रशिक्षण अशक्य असते. गर्भाला धोका पोहोचू शकतो.''

''आणि गर्भच नसेल तर? तर द्याल प्रशिक्षण?''इतक्या वेळ शांतपणे ऐकणारी राजश्री बोलली. सारेच अवाक् झाले. काकाही... ती पुढे बोलली, ''मला प्रशिक्षण हवं आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.''

''आपण विचार करू या.'' प्रभुणे काका.

''काका... मला जर इथे प्रशिक्षण मिळणार असेल तर मी पोट खाली करून घेईन. माझा विचार पक्का आहे.''

राजश्री बोलली. काका विचारात पडले. काय करायचे?

एक नवसृजनाची हत्या की राजश्रीच्या नवजीवनाला सुरुवात? खरं तर निर्णय तिने घ्यायचा आहे. आपण  फक्त आधार व्हायचे. तिचा तीच निर्णय घेईल.  लहान नाही राजश्री आता. ठरवू देत तिलाच. आपण पाठीमागे भक्कम उभे राहू. राजश्रीचा निर्णय तिने कृतीत आणला. प्रशिक्षण सुरू झाले.

पाबळला प्रशिक्षण मिळू लागले, पण राहायची सोय संस्थेत नव्हती. राजश्रीला शिलाईकाम तर ज्ञानेश्वरला गवंडीकामाचे प्रशिक्षण मिळत होते. गावात खोली भाडयाने घेऊन तेथे राहत होते. प्रशिक्षण घेता घेता बाहेर मोलमजुरी करत होते. दिवस जात होते. मशीनच्या चाकाबरोबर राजश्रीच्या भाग्याची चाके गतिमान होत होती. राजश्री शिकली मेहनत करून, बंड करून जिद्दीने शिकली. ज्ञानेश्वरची साथही तशीच आश्वासक होती. दोघेही सय्यद वरवडेला परतले. सर्वांच्या नजरा रोखलेल्या. कुजबुज चाललेली. काहींनी धाडस केलेच. राजश्रीला हटकले.

''का गं. पोट खाली का केले?''

''शिकण्यापायी पोट पाडलंस?''

''आम्ही सांभाळले असते पोराला...''

''तुला एवढं जड जात व्हतं व्हय.''

''अगं पोरं देवाची देण. तेच तू पाडलंस.''

चारी बाजूंनी प्रश्नांचा भडिमार... जीवघेणा दबाव...  पारधी बाई कधी गर्भपात करत नाही. राजश्रीने केला. आधीच प्रशिक्षणासाठी जातीच्या परंपरा तोडल्या, पुन्हा गर्भपात. तेही पारध्याची परंपरा मोडणारे. सय्यद वरवडेला प्रथमवसनात राजश्रीला या भयाण वास्तवाचा सामना करावा लागला. त्यातूनच कुणीतरी ज्ञानेश्वरचे कान भरले. ''बाईल हातातून गेली तुझ्या'', ''आत्ताच विचार कर, नंतर पस्तावशील.''राजश्रीला हे कळत होते. सय्यद वरवडे गावापासून प्रथमवसन दोन किलोमीटर दूर गावात जाऊन शिलाईचे काम आणण्याचा प्रयत्न राजश्रीने सुरू केला. पण गावात आधीच दोन-तीन टेलर्सची दुकाने. काम किती मिळणार?पुन्हा मोलमजुरी. कधीतरी काका सय्यद वरवडेला  येतात. पुन्हा राजश्रीचे गाऱ्हाणे. काय करूया? काकांपुढचा प्रश्न. करूया. बघूया... दिवस जात असतात. पुन्हा कधीतरी काका निरोप देतात- राजश्री यमगरवाडीला ये. तेथे बघू. यमगरवाडी भटक्या -विमुक्ताचे आधुनिक तीर्थक्षेत्र. राजश्री, ज्ञानेश्वर,  शिवानी तिघेही यमगरवाडीला पोहोचले. वसतिगृहातील मुलींना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याची सूचना काकांनी केली. वसतिगृहात भोजन- निवासाची व्यवस्था झाली. कपडालत्ताही मिळू लागला, वर मानधन म्हणून 300 रुपयेही मिळू लागले.

****

राजश्री यमगरवाडीत रुळली. शबरीमाता वसतिगृहातील मुलींना शिलाईकाम शिकवू लागली. ज्ञानेश्वरही सोबत होता. पारधी पुरुष कमालीचा संशयी, हलक्या कानाचा. ज्ञानेश्वर त्याला अपवाद नव्हता. आसपासच्या परिसरात जाऊन तो गवंडीकाम करायचा. एक दिवस अचानक तो निघून गेला. राजश्री यमगरवाडीला. ज्ञानेश्वर त्याच्या आईकडे. पारध्याने बाईला सोडून जाणे म्हणजे फारकत. न बोलताही समजणारे वास्तव. राजश्री चिंतातुर झाली, पण काही दिवसच. ज्ञानेश्वर परत आला. चुकलो म्हणाला. पुन्हा असे करणार नाही असे सांगून राजश्रीची समजूत घातली. प्रभुणे काका अधूनमधून यमगरवाडीला येत. एकदा राजश्रीच्या पुढच्या शिक्षणाबद्दल बोलले. राजश्रीने धाराशिवला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. खंडित झालेली ज्ञानसाधना सुरू झाली.

****

यमगरवाडीची संध्याकाळ... वसतिगृहातील चिमणीपाखरं भोजनगृहाकडे जात होती आणि अचानक गाेंधळ झाला. ज्ञानेश्वरने राजश्रीला मारहाण सुरू केली.  कारण काय? माहीत नाही. राजश्री मार सहन करत होती. शिवानी केविलवाण्या नजरेने आपल्या मार खाणाऱ्या आईकडे आणि मारझोड करणाऱ्या बापाकडे पाहत होती. ज्ञानेश्वर बेभान झाला होता. मारत राहिला. राजश्रीचा चेहरा काळानिळा झाला. मारझोड करून ज्ञानेश्वर निघून गेला. पुन्हा राजश्री एकटी? नाही तिच्या पोटात गर्भ होता. चिमुरडी शिवानी सोबत होती. ज्ञानेश्वर मात्र या सर्वांना सोडून निघून गेला.

****

दिवस पूर्ण झाले. धाराशिवच्या रुग्णालयात राजश्रीने मुलीला जन्म दिला. यमगरवाडी प्रकल्पावर  पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या गौरीताई कानिटकर तिच्यासोबत होत्या. प्रकाश ढवळे हॉस्पिटलमध्ये येत होते. या बाळंतपणाच्या काळात राजश्रीने निर्णय घेतला. तिने अनुभवले होते अठरा विश्व दारिद्रयात जगणारे पारध्याचे जिणे. दहा-बारा पोरांचे लेंढार सांभाळायचे. पोटाला अन्न नाही. अंगाला वस्त्र नाही. धड सांभाळता येत नाहीत तर कशाला हवीत ढीगभर पोरे. आपण हे थांबवायचे. आपण संतति नियमन करायचे. स्वत:चा निर्णय स्वत: घ्यायचा. राजश्रीने निर्णयाची अंमलबजावणी केली. छोटी मुलगी. शिवानीला घेऊन राजश्री यमगरवाडीला आली. राजश्री बाळंत झाल्याचे कळताच ज्ञानेश्वर यमगरवाडीला पोहोचला. मुलगी झाली यापेक्षा राजश्रीने ऑपरेशन केले याचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. लहान बाळाला न पाहताच तो म्हणाला, ''मला मुलगा पाहिजे होता.''

''पण ही मुलगी आहे.''

''मला मुलगा हवा होता. तू ऑपरेशन का केलेस?''

''तुला मुलगा देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्रीने उत्तर दिले. ''तुम्हाला मुलगा पाहिजे तर दुसरे लग्न करा, माझी ना नाही...''पण मला या जाचातून मोकळे व्हायचे होते म्हणून मी ऑपरेशन करून घेतले.''

बंडखोरी. राजश्री बंडखोरी करते आहे समाजाशी. स्वत:च्या नवऱ्याशी. ज्ञानेश्वरचा संताप अनावर झाला. मारझोड करून पुन्हा तो निघून गेला.

****

ज्ञानेश्वरचे असे मारझोड करून निघून जाणे,मनाला येईल तेव्हा परत येणे, हक्क गाजवणे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. प्रभुणे काका यमगरवाडीत असताना एक दिवस ज्ञानेश्वर आला. काकांनी त्याची समजूत घातली. राजश्रीलाही बोलावली.

''काका, यांना जर मला सोडायचे असेल तर सोडू देत. मला आता मार सहन होत नाही. यांना मुलगा पाहिजे. ती देण्याची कपॅसिटी माझ्यात नाही. हे दोन्ही पोरींनासांभाळणार असतील तर ठीक. नाहीतर मी स्वत: त्यांना सांभाळीन. शेवटी मी आई आहे त्यांची.'' राजश्री बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावर तेज होते. स्वतंत्र व्यक्तित्वाचा तो प्रकाश होता. राजश्री पुढे म्हणाली, ''त्यांनी दुसरं लग्न करावं. माझी आडकाठी नाही.'' ''मी नाही दुसरं लग्न करणार.'' ज्ञानेश्वर.

''मारझोड... तीही सहन करण्याची कपॅसिटी माझ्यात नाही.'' राजश्री.

''नाही. मी लिहून देतो काका... मी राजश्रीला मारणार नाही... तिला सोडून जाणार नाही. तिच्यासोबतच राहीन.'' ज्ञानेश्वर भूतकाळातील चुका डोळयासमोर आणत बोलला. काकांना आनंद झाला. ज्ञानेश्वरने काकांच्या साक्षीने लिहून दिले. राजश्री आणि दोन मुलींबरोबर ज्ञानेश्वर यमगरवाडीला राहू लागला.

****

दिवस जात होते. राजश्रीचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शिक्षण संपत आले. यमगरवाडीच्या प्रकल्पावर मिळणारे तीनशे रुपये खूप मोलाचे होते, पण त्यात भागत नव्हतं. राजश्री जगली जाती भटक्याचे आयुष्य, पण तिला मुलीच्या आयुष्याला घडवायचे होते.  शिक्षण चालू असताना गौरीताईंशी हितगुज करी. शिक्षण झाल्यावर काय काम करता येईल याचा विचार करी... तिला माहीत होते... प्रभुणे काका... भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते आपल्याला नक्की मदत करतील. कुठले कोण?पण नात्यातील माणसासारखा व्यवहार करतात. प्रभुणे काका तर वडिलांसारखी माया करतात. बाप जेलमध्ये गेला. त्यांची माया नाही मिळाली. आधार नाही मिळाला. पण प्रभुणे काकांनी तो दिला. पुढेही तेच मदत करतील.

****

चिंचवड स्टेशन आले होते. राजश्री उतरली. धावतपळत सावरकर नगरमध्ये प्रभुणे काकांच्या घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. प्रभुणे काका, काकू दोघेही आनंदले. राजश्रीने नोकरीचा पहिला दिवस भरला. पालावरची पोरे. गरवारे महाविद्यालयात नोकरी करू लागली याचा आनंद प्रभुणे काकांनाही झाला. तो श्रमसाफल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भटके-विमुक्त विकास परिषद आणि संघविचारांच्या कामाची ही पोचपावती होती.

नोकरीला लागून तीन महिने झाले होते. राजश्री प्रभुणे काकाकडेच राहत होती. दररोज बस, रेल्वेचा प्रवास करून पुण्याला जात होती. दिवसभरातील नवेनवे अनुभव सांगत होती.

''राजश्री, आता तू घर कर.'' काका.

''मलाही तसेच वाटते.'' प्रभुणे काकू.

राजश्रीसाठी चिंचवडमध्ये घर शोधण्यास गेले. डिपॉझिटचे पैसे प्रभुणे काका आणि गौरीताई कानिटकरांनी दिले. छोटयाशा खोलीत राजश्रीने संसार थाटला. ज्ञानेश्वरही आला. दोन मुली... राजश्री असा चौकोनी संसार सुरू झाला. नोकरी चालू होती. ज्ञानेश्वर पुण्यात, चिंचवडात, पिंपरीत जिथे मिळेल तेथे गवंडीकाम करत होता. रंगकामाची छोटी-मोठी कामे घेत होता. दिवस चालले होते. मुक्त होणे म्हणजे बंध तोडणे असा अर्थ राजश्रीला मान्य नसावा. पूर्वायुष्यात कधीही मदतीला न येणारी सासू, ज्ञानेश्वरची आई, हिलाही चिंचवडला राजश्रीने आणले. सून आणि लेक सन्मानाने जगत आहेत. स्वकष्टाच्या कमाईवर चार घास सुखाने खात आहेत. हे पाहून त्या माऊलीचे डोळे भरून आले. काही दिवस राजश्रीकडे राहून त्या परत गेल्या.

****

हंगामी कर्मचारी म्हणून गरवारे कॉलेजमध्ये नोकरीला लागलेली राजश्री तेथे कायम झाली. पगार वाढला. हाती पैसा येऊ लागला. पैसा येण्याची वाट एक, पण तो कसा खर्च करायचा याच्या वेगवेगळया वाटा असतात. राजश्रीच्याही होत्या. स्वत:साठी मर्यादित खर्च करणारी, बस रेल्वेचा धावपळीचा प्रवास करणारी राजश्री. मुलीबाबत मात्र जागरूक होती. पहिला पगार आला सहा हजार रुपये. राजश्रीने दोन्ही मुलींची,नवऱ्याची ङ.ख.उ. पॉलिसी काढली... मुलीच्या भवितव्याचा विचार आईच अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. त्यांचे शिक्षण, लग्न यांची तरतूद राजश्रीने केली. स्वत: मात्र साधीच राहिली. न थकता काम करत राहिली. पैसा पैसा जमवत राहिली. ज्ञानेश्वरही आता गवंडीकामात स्थिर होत होता.  पुण्यात त्याला चांगल्या प्रकारे काम मिळत होते. राजश्रीने साठवलेल्या पैशातून ज्ञानेश्वर काळेला मोटरसायकल घेऊन दिली... ज्ञानेश्वर पुणे, चिंचवड मोटर सायकलवरून प्रवास करू लागला. राजश्री मात्र चिंचवड, पुणे रेल्वे आणि बसमधूनच दररोज येत-जात राहिली. शिवानी शाळेत जाऊ लागली. तिच्या सर्व गरजा,राजश्री पुऱ्या करू लागली... चिखलात उगवलेले कमळ जशी आपली मुळं घट्टपणे चिखलात रुजवते तशी राजश्रीही शिकली,नोकरीला लागली, पण आपली पार्श्वभूमी विसरली नाही. नातेवाईक, आई, सासू, भाऊ,दीर, नणंद यांच्याशी फारकत न घेता, त्यांच्याशी संबंध ठेवून राहिली. ज्ञानेश्वर भोसले राजश्रीचा भाऊ.. त्याला खुनाच्या खोटया आरोपाखाली अटक झाली. त्याला सोडवायला केसचा खर्च20 ते 22 हजार रुपये राजश्रीनेच केला. राजश्री नाती, संस्कार विसरली नाही.

****

समाज बदलतो. प्रयत्न हवेत. राजश्री हे त्यातीलच एक उदाहरण. संघविचार आणि समर्पित कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून यमगरवाडीचे माळरान फुलले. राजश्रीसारखी जीवन घडवण्याची कार्यशाळा अव्याहतपणे चालू आहे. ही कार्यशाळा माणूस घडवते, त्याला खंबीरपणे उभे करते. संघ-विचार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. मग त्यांच्या यशाची क्षितिजे झळाळून उठतात. क्षितीज हाती आले तरी मातीचे भान आणि नात्याची जाण कायम हृदयात ठेवण्याचा वसाही याच कार्यशाळेत दिला जातो.
रवींद्र गोळे

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

गरिबांची गाय


महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. म्हशींचे विचारुच नका. आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांना शेळी आणि कोंबड्या हाच एक आधार.

       काल आमच्या शेळीने ( उस्मानाबादी जात) चार पिले दिले. पिले ठणठणीत आहेत. अगोदर तिने तीन तीन पिले दिली आहेत. वर्षभरात ३० हजारांचे उत्पन्न दिले आहे. आता चार पिले मिळून उत्पन्नाचा अकडा वाढतच जाणार आहे. त्यामुळे घराला थोडासा आधार मिळाला आहे. भविष्यात शेळीपालन करण्याचा मानस आहे.

संबंध आशिया खंडात उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध आहे. भौगोलिक वातावरण, हवामान या घटकांमुळे उस्मानाबादी शेळीचे महत्व आहे.भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळतो.

शेळी पालनाचे फायदे

अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो.

शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.

शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.

शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.

शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.

शेळयांचे खत उत्तम असते.
आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.

शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.

शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.

विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

परिचारक, ओमबाबा...!

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही सैनिकांना देशाच्या संरक्षणासाठी लढावे लागते. याच भारत मातेसाठी हजारो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आपला देश, देशातील जनता सुरक्षित राहण्यासाठी अहोरात्र पहारा देणारे जवान, सीमेवर लढणारा प्रत्येक जवान हा भारतीयांचा श्वास आहे. हा श्वास ज्यावेळी बंद होईल त्यावेळी  काय अनर्थ होईल, याची कल्पना करवत नाही. १९४७-४८, १९६२,१९७२,१९९९ च्या युध्दात मराठी मातीतले अनेक जवान शहीद झाले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर भागात‘घरटी एक तरी मिलिटरीवाला पाहिजेच!’ या ध्येयानं झपाटलेल्या असंख्य गावांच्या वेशीवर हुतात्मा सैनिकांच्या नावानं कमानी उभारल्या गेल्या आहेत.  काही गावांची ओळख तर‘फौजीवाल्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सैनिक, वीर जवान आणि नागरिक यांच्यामध्ये प्रेमाचा, स्नेहाचा सेतू बांधण्याचे काम हे नेत्यांचे असते. नेते, कलाकार, लेखक नव्हे तर समाजातील सर्व घटक जर जवानांविषयी आदरभाव, अभिमान बाळगून असतील तर राष्ट्रप्रेम आणखीन ज्वलंत होते.

 परवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राचारात आमदार  प्रशांत परिचारक यांनी भारतीय जवानांच्या पत्नीबद्दल कथित वक्तव्य करून टीकेची झोड ओढून घेतलीे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी ही मागितली आहे. पण सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेऊन काही घटक या घटनेचा बाजार करून राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परिचारक यांच्या वक्तव्याने जवानांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांची पक्षातून हाकलपट्टी करावी, त्यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या सर्व मागण्या रास्त आहेत.  पण पुढे काय ?

आमचे दिवगंत ओमबाबा पुरी यांनी देखील जवानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. समाज आणि माध्यमांनी याची तितकी दखल घेतली नाही. आमच्या डाव्या मित्रमंडळींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. शेवटी पुरी यांनी डोळ्यात अश्रू आणून माफी मागितली. एवढेच नव्हेतर मागे  कन्हैयाने  भारताचे जवान काश्मिरी स्त्रीवर बलात्कार करतात,असे वक्तव्य केले होते. ही गोष्ट किती जणांना माहित आहे. हा संशोधनाचा विषय आहे.
उलट पाकिस्तान धार्जिण भारतीय जवानांचा ड्रेस घालून तेथील स्त्रीवर बलात्कार करतात. ही गोष्ट माहित असून आम्ही सोयीस्कर दुर्लक्ष केलोे.
© विकास पांढरे

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

सुरवंट



मराठीत स्त्रीवादी साहित्याने फार मोठी मोलाची भर घातली आहे यात शंका नाही. २०१० नंतर स्त्री जीवनाची घुसमट प्रकर्षाने मांडणारी नवोदित लेखिका म्हणून अर्चना डावखर- शिंदे यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या 'सुरवंट' या कादंबरीने असंख्य वाचकांचे मन जिंकले आहे. जे पुस्तक वाचताना तहान, भूक विसराला लावते, अशीच कलाकृती ही अभिजात असते. आजच्या फेसबुक आणि व्हाँटसअपच्या दुनियेत 'सुरवंट' ही वाचकाला पहिल्या पानापासून ते शेवटपर्यंत खेळवून ठेवते. २६४ पानाची कादंबरी वाचताना मला पंधरा दिवस लागले, यातच या कादंबरीची गुणवत्ता लक्षात आले.

                कादंबरीच्या सचित्रावरुन  'सुरवंट' ही कशावर आधारित आहे हे लक्षात येते. रूढ अर्थाने सुरवंट हा फुलपाखराचा अळी अवस्थेतील किड्याचा प्रकार होय. त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान असते. किड्यामुंगासारखेच स्त्रीचे जीवन आहे, असं अर्चना डावखर-शिंदे यांनी आपल्या 'सुरवंट' या कादंबरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी 'मी' या आत्मनिवेदन प्रकारची सर्व वैशिष्ट्ये दर्शवणारी आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील छोटेसे विळद गावाच्या चंदाच्या जीवनाची शोकांतिका म्हणजे सुरवंट होय.

विळद हे गाव शहरापासून जवळ आहे. मुख्य म्हणजे आर्मीचे प्रशिक्षण केंद्र जवळच असल्यामुळे तोफांचा आवाज,  बंदुकीचा सराव हा नेहमीच ऐकू येतो. या छोट्याशा परिघात घडणारी ही कहाणी. या कहाणीची नायिका आहे ती चंदा. तिचा बाप देशमुखांच्या घरातच चंदाचं लग्न लावून द्यायचं ठरवतो। त्यासाठी वर मुलगा चाळीशी पर्यंत जावूनही चंदाचं विवाह लावतो.  आपल्या खोट्या इंभ्रतीपुढे निरागस चंदाकडे न पाहणारा बाप समोर येतो. तर दुसरीकडे चंदाचा नवरा श्रीनिवासराव वयाने खूप मोठा, वेडसर आहे पण रात्रीच्या वेळी बायको म्हणून चंदाच्या कोवळ्या देहाची चिरफाड करणारा आहे. तिसरीकडे तिचा सासरा हा वारकरी आहे. दिंडीत हजारोंच्या पंगती करणारा आहे पण घरातील उपाशी सूनेकडे दुर्लक्ष करणारा सासरा नजरेस पडतो, असे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.

       मानव हा चंदाचा दुसरा पती. जातीपातीच्या भिंती तोडून नव्या समाजरचेनेचे भाग बनतात. मानव हा चंदाचा योगटिचर. पुढे ते दोघेही एम.ए.च्या पहिल्या वर्षाला अँडमिशन घेतात. इथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मानवला माहीत आहे तिचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगी आहे. चंदा  मोठ्या घरची आहे. चंदाचं वागणं, बोलणं, शांत स्वभाव, तिचे राहणीमान हे मानवला मनापासून आवडत. पुढे हे दोघे एकमेकांशी बिलगतात.  मानव हा ध्येयवेडा आहे. लहानपणी सोसलेले गरिबीचे चटके मानवला स्वस्थ बसू देत नाहीत. चंदाला मानवचा आधार हवाहवासा वाटतो. तर दुसरीकडे तिला स्व- जाणीव होऊ लागते. अशा  द्विधा मनस्थितीत ती अडकते. तिच्या मनाची स्थिती अगदी झाडात गुंतलेल्या पतंगाच्या दोराला जणू पंख गुंतून जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या चिमणीसारखी होते. चंदाची होणारी घुसमट हे कथेचे दुसरे सूत्र.

   लेखिका अर्चना डावखर-शिंदे आपल्या कादंबरीतून महिलांची होणारी हेळसांड, विविध गुंतागुंती, ताण- तणाव चित्रित करतात. चंदाच्या जगण्यातील हरवलेली नैसर्गिकता आणि त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक पातळीवरचा खोटेपणा चंदाला कसा तिला छळू लागतो हे प्रकर्षाने मांडले आहे.

 सगळी नाती मेली असली तरी तिच्यात एका बायकोचं नातं तग धरून होतं.अगदी सुकलेल्या सरोवरातलं शेवटच्या क्षणालाही त्या खडकाला धरून बसलेलं शेवाळ जसं", आयुष्याच्या शेवटी जर्जर झालेल्या क्षणी
त्या सोसाव्या लागलेल्या वेदनांच्या जखमांचा हिशोब कोठेच ....कसा दिसत नव्हता.  तसं  पाहिलंतर तिच्या ललाटावरच्या रेषाही प्रत्येक गतक्षणांचा सारीपाट मांडत होत्या.पण मनातली सय दिसत नव्हती,फक्त मनाला सारखी बोचत होती. या आत्मसंवादातून वाचकांना तिच्या जगण्याविषयी धारणा लक्षात येते.  लेखिकेने चंदाच्या मनातील उलाढालींचे वर्णन करत असताना संवाद, आत्मसंवाद, चिंतन यांचा योग्य वापर केला आहे. कधी कधी प्रसंगातून तिची मानसिकता वाचकांसमोर ठेवतात. कादंबरीतील प्रत्येक प्रसंग, घटना, संवाद ही चंदाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू वाचकांसमोर कुशलपणे वापरलेल्या आहेत.

बाळ जन्मल्यावर मेलं काय अन आज मेलं काय ,एकच आहे ! पण तिला आई होण्याची संधी तर मिळेल... घरची माणसं चांगली नाहीत,निदान तिला वांझुटी तरी कुणी बोलणार नाही. " या बोलण्यातून  लेखिका चंदाच्या बकाल आयुष्याचे सूचन करतात. तिच्या वाट्याला आलेले सडके जीवन चित्रित करतात. त्यांमुळे ही कादंबरी मानसशास्त्रीय अभ्यास समोर ठेवून आकलन करणे आवश्यक आहे.

         लेखिका अर्चना डावखर यांनी शेती जीवनाचा खुबीने वापर केला आहे. बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी संकटाने गुडघे ठेकाला लावले आहे. यांचे दर्शन कादंबरीत घडते.
मागल्या साली पावसाअभावी पिकं निघाली नाही अन औंदा सुध्दा सारं मोलामाघाचं बी भरण मातीत गुदमरलें होतं.सारंगाचा दोन एक्कर कांदा तालुक्याच्या मार्केटला गेला. भाव पण चांगला मिळाला . लोक म्हणत, अरं सारंगा कादं मार्केटला नेया घाई काव्हून करतोया? अरं, अजून वाट बघ. शंभराच्यावर भाव जाईल बघू."
पर सारंगाला वाटे, भावापाई सारा माल तसाच ठेवू अन मध्येच भाव कमी झालास तर पदरात जे पडायचं ते राहून जाईल.  यावरून 'सुरवंट' ही कादंबरी केवळ स्त्री दु:ख सांगत नाहीतर असंख्य मानवी मनाचा वेध घेत शेती प्रश्नावर भाष्य करते.

          ही संपूर्ण कादंबरी चंदा आणि मानव या पात्राभोवती फिरत असली तरी श्रीनिवास, सारंग, शांताकाकू, सावित्रीबाई, चंदाची आई, वडील, सासरा ही पात्रे कादंबरीला उभारी देणारी आहेत. ही कादंबरी मनोरंजन करायला लावत नाही तर  वाचकांना गंभीर आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी कादंबरी आहे.

परीक्षण :- विकास पांढरे - ९९७०४५२७६७

सुरवंट

अर्चना डावखर - शिंदे

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे ३०

मे २०१६

मूल्य - रु.२६०/-
-----------------------------------------

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

चिवरी यात्रा : श्रध्दा की अंधश्रद्धा



               माणूस हा श्रध्देवर जगत असतो, भलेही तो नास्तिक असो वा अस्तिक. काही प्रमाणात त्यांच्या अंगी श्रध्देने घर केलेले असते. श्रध्दा म्हणजे काय ? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे ? या जटील प्रश्नाची उत्तरे देणे सोपे नाही. कारण अंधश्रध्देबद्दल कितीही प्रबोधन केले तरी, माणसाची मानसिकता बदलत नाही तर  वाढतच आहे. हे चिवरी ( ता.तुळजापूर) येथील महालक्ष्मी यात्रेवरुन लक्षात येते.

       मंगळवार ( १४ फेब्रुवारी) रोजी पशुहत्येसाठी प्रसिध्द असलेल्या चिवरीची यात्रा पार पडली.  पहाटे चार वाजता  देवीच्या मूर्तीला पालखीसह सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात आले. यावेळी पोतराज, जान्या, आराधिनी या हलग्याच्या कडकडाटात, मोकळे केस सोडून बेधूंद होऊन नाचत होत्या. देवीला अभिषेक, अलंकार पूजा करण्यात आली. यात्रेचे मुख्य विशेष म्हणजे असंख्य नवीन पोतराज, जान्या, आराधिनी यांना दीक्षा देण्यात आली.  त्यानंतर हजारो कोंबडे, शेकडो बकरे व रेड्यांची खुलेआम कत्तल करण्यात आली.  मंगळवारी चतुर्थी असूनही मोठ्या प्रमाणात बकरे, कोंबड्याची बळी देण्यात आली.

 याठिकाणी वर्षातून दोन तीन वेळा इथं यात्रा भरत असते. नव्हे दर मंगळवार आणि शुक्रवारी जत्रेचे स्वरूप असते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत, नेत्यांपासून ते महानेत्यापर्यंत, शिपायापासून ते क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत देवीची भक्त आहेत. अणदूरपासून काही हाकेच्या अंतरावर असलेली ही देवी डोंगर कपारीत वसली आहे. देवी नवसाला पावणारी आहे, देवीचा नवस पूर्ण नाही केले तर तिचा कोप होतो, अशी अंधश्रद्धा आहे. दर बुधवारी रात्री मंदिर परिसरात भुताची यात्रा भरते असा नागरिकांचा समज झाला होता. तो आता दूर झाला आहे. १९८७-८८ साली याविषयी माध्यमांनी आवाज उठविला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, सि.ना.आलुरे गुरूजी यांनी काही कार्यकर्त्यांच्या मदतीने चिवरीच्या अघोरी प्रथेविरूध्द आवाज उठविला. 

तेव्हापासून रेड्याचा बळी थांबला, भुत मशाली घेऊन नाचायचा बंद झाला. शेवटी ती माणसाचं होती, हे लक्षात आले. या प्रबोधनास पंचवीस वर्षे पूर्ण झाली असतील. डॉ. दाभोलकर यांनी काही काळ प्रबोधन केले पण यात्रा पशुहत्या विना पार पडली नाही. भक्तांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. यात्रेत महिलांच्या अंगात येणे , नवीन पोतराज, आराधिनी, जान्या यांना दीक्षा देण्याची संख्या ही वाढतच आहे. येथे येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे भक्तांची देवीवर असणारी श्रध्दा डोळस आहे की आंधळी हा एक संशोधनाचा विषय आहे.
 कारण संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात:-
पाषाण देव पाषाण पायरी !
पूजा एका वरी पाय ठेवी !!
मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे "मानावे" लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? असा जटील प्रश्न बनला आहे.

    सरतेशेवटी अनिसचे याकडे कितीपत लक्ष आहे हे पाहणे आवश्यक आहे. शनि शिंगणापूर पासून ते कोल्हापूर पर्यंत महिलेला मंदिर प्रवेश देण्यात यावा यासाठी आंदोलन करून प्रसिद्धीझोतात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्‍ती देसाई यांचे चिवरी यात्रेकडे लक्ष कधी जाणार ? की अजून मंदिर प्रवेश करत बसणार.  आराधिनी, जान्या या प्रथेत अडकलेल्या असंख्य महिला तुमची वाट पाहत आहेत.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

दिंडेगावचा प्राचीन वारसा


प्राचीन संस्कृतीचे संदर्भ दाखवणारे दिंडेगाव ( ता.तुळजापूर ) येथील अत्यंत सुंदर बांधकाम असलेले यादवकालीन शिवशंकर व कालभैरवनाथ मंदिरास भेट देण्याचा योग आला. हे गाव 'संत शिवरामबुवा 'यांच्या सान्निध्याने नटलेले आहे. पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त म्हणून शिवरामबुवाची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी विठ्ठल भक्तीचा अविष्कार दाखविला. पुढे मराठवाडय़ाची 'धाकटी पंढरी' म्हणून या गावचा लौकिक वाढला. महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भााविक मोठ्या संख्येने येत असतात.


या गावावर वारकरी संप्रदायाचा जसा प्रभाव आहे. तसा इथला प्राचीन वारसा आपल्या अस्तित्वाताच्या पाऊलखुणा जपत आहे. राजा रामदेवराय यांच्या मंत्रीमंडळातील हेमाद्री पंडित नावाच्या प्रधानांनी या दोन प्राचीन मंदिराची उभारणी केली असल्याची अख्यायिका स्थानिक नागरिकांकडून ऐकायला मिळाली.

काळभैरवनाथ म्हणजे शिव शंकराच्या जटा मधून निर्माण झालेले अष्टभैरव. त्यातीलच हा एक काळभैरवाचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून गावाचे ग्रामदैवत आहे. श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे.



मंदिराभोवती फिरत असताना असे दिसून आले की, हे मंदिर हेमांडपंथी पध्दतीच्या स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून कलावैभव, सौंदर्य आणि चौरसाकृती छत ही मंदिराचे वैशिष्ट्ये. शिवाचे उग्ररुप असणारा कालभैरवनाथ हा भीषणाचे प्रतिक मानले जाते. तर शंकर हे अनचा उग्ररुप आहे. अनु म्हणजे विध्वसंक, रौद्ररुप दाखवणे हा आहे. या दोन्ही मूर्तीच्या पाठीमागे भीषण व रौद्ररुप दाखवणे हा मूर्तीच्या निर्मितीमागचा उद्देश असावा, असे दिसून येते.


शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग प्रचंड आकाराचे असून, मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर विविध कलात्मक मूर्त्या आहेत. मंदिराचा गाभारा भव्य असून त्याचबरोबर दगडावर कोरल्या गेलेल्या शिल्पकृतीमध्ये देव आणि दानव यांच्यातील युद्धाच्या प्रसंगांचे चित्रण करण्यात आले आहे. यावरून राजा रामदेवराय यांच्या सामर्थ्याचे, संपत्तीचे, शिवभक्तीचे चित्र स्पष्ट होते.


आकर्षक मूर्ती

मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. उत्कृष्ट भित्तीचित्रे, प्रमाणबध्द शरीरे, बोलके डोळे, भावपूर्ण चेहरे, सुचक हालचाली व विविध विषयांवरून त्या काळातील चित्रकलेच्या विकासाच्या प्रगतीचे आपल्याला ज्ञान होते. या मूर्त्या उत्कृष्ट कलाकुसरीने युक्त अशा प्रभाव लयाने अंगालि चिकटून बसलेल्या पारदर्शक वस्त्राने व उष्णीवात गोळा केलेल्या विशिष्ट केशरचनेमुळे कलात्मक नयन मनोहर व चित्ताकर्षक हालचालींमुळे मूर्तीच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक भाव दिसून येतो. त्यामुळे या मूर्ती आजही सजीव वाटतात.



आजच्या सारख्या क्रेन्स, ट्रक्स नसतानाही त्या काळातील चित्रकार, मूर्तीकारांनी एखाद्या प्रचंड शिळीची ने -आण करुन मंदिराची निर्मिती कशी केली असेल याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. भारतीय समाजातील चढ-उतारांचा साक्षीदार असलेली ही दोन मंदिराच्या आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. काळभैरवनाथ व शंकर देवाचे मंदिर दिंडेगावचे भूषण नाहीतर संबंध मानव जातीचा वारसा ठरतील आशा आहेत.

काळाच्या ओघात मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीना तडे पडले असून पुढील काळात मंदिर पडण्याची भीती आहे. पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण  हा प्राचीन वारसा इतिहासाचे संशोधन करणाऱ्या संशोधकास नक्कीच संशोधनाचा विषय ठरू शकतो.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७ 



शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

वेडात मराठे वीर दौडले सात


   गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात जातीयवाद अधिक घट्ट होऊ पाहत आहे. संवेदनशील मने संवादपर्वास लिहिते होत नाहीत.  तटस्थपणे पाहणार्‍या मतीतून काही ठोस पडत येत नाही.  एकूणच पुरोगामी राज्यात जातीचे बंड योग्य की अयोग्य ?

पहिली प्रचिती

याची पहिली सुरूवात स्वातंञ्यपूर्व काळात झाली.  जे शोषित व पीडित होते.  त्यांना लोकशाहीत स्वातंञ्य दिले, त्या समाजाने त्या शक्तीचा उपयोग करून घेतला.  कायदा किंवा चालीरीती,  रूढी यांच्या विरूद्ध बंड करावे, असे वाटत होते  ते त्यांनी केले. हे आपणास मंडल आयोग,  खैरलांजी आदी तत्सम घटना प्रकारातून  दिसून आले आहे.

 दुसरी प्रचिती

        आम्हीच आदिम आहोत,  आम्हीच खूप वेदना सोसल्या,  सोसत आहोत.  त्यासाठी आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या, या मागणीसाठी एकसंघ होऊन धनगर समाजाने आंदोलने केली. अजून या समाजाचे प्रश्न सुटला नसल्याने इथे कधीही ठेणगी उडू शकते.

तिसरी प्रचिती

आपण एकेकाळी श्रीमंत होतो, सुखाची व स्वास्थ्याची साधने जवळ होती.  नंतर काळ बदलला,  राजकीय स्थित्यंतर झाली आपणाभोवती गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.  त्यात आपण अडकलो आहोत.  याची जाणीव मराठा समाजाला झाली आहे. त्यासाठी आपल्या गटाचे धोरण व भवितव्य ठरविण्यात आपल्या कुवतीनुसार भाग घेत आहेत. त्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय सामाजिक दुःखे मिटवू शकत नाही. अशी धारणा बनली असल्याने राज्यात समाजाच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.  पुढे सोलापूर,  लातूर,  सातारा व मुंबई शहरातही समाजाचे सामर्थ्य दिसून येणार आहे.

सैद्धांतिक भूमिका

         कोपर्डी प्रकरणावर या समाजाची खदखद समोर आली आहे. पण कायद्याविरूध्द ( अॅट्रासिटी) विरूद्ध बंड करावे,  असे त्यांना अनेक वर्षापासून वाटत आहे.  सामाजिक वृत्ती प्रबळ नसल्याने,  त्या वास्तवात उतरल्या नाहीत.  आता त्या वृत्ती उचंबळून आल्या आहेत. मूक मोर्चातून अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

ही कोंडी कशी फोडायची ?

          राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा असलेल्या या राज्यात सासातत्याने विविध जातींची बंड होत आहेत.  विद्वान लोकही या चक्रात अडकले आहेत. त्यांनी चाकोरीत फिरणे योग्य आहे का?  सर्वांना शांतीने क्रांती करायची आहे. भुका समाज बदल व्हावा म्हणतो , तर भरल्या पोटाचा बदल नको म्हणतोय.  त्यामुळे ही कोंडी कशी फोडायची?

समरसताधिष्ठित शासनपध्दतीचा अंत
  लोकशाहीत स्वातंञ्यांचा उपयोग करून घेणे प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे.  पण प्रत्येक जातीच्या समूहाने शासन पध्दतीवर दबाव आणला तर  समरसताधिष्ठित शासनपध्दतीचा अंत होतो.  आपसात यादवी न माजली तरी राष्ट्रीय ऐक्य तरी नष्ट होते यात शंका नाही.  विकासाबरोबर भेदही येतात.  आपल्या जातीचा अधिक कसा विकास होईल अन् दुसर्‍या जातीचे कसे नुकसान होईल,  अशी धारणा बळावत जाते. यात भरडला जातो तो सामान्य माणूस.  नाहीतर गरिबाला सिंहाने खाल्ले काय किंवा उदरांनी  येऊन खाल्ले काय सारखेच.

वेडात मराठे वीर दौडले सात

छञपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगू पाहणार्‍या या मराठी मुलूखात असे काय घडू पाहत आहे.  ज्यामुळे जाती पातीच्या दावणीला बांधून नवे स्वप्ने साकार करण्याची मनिषा निर्माण होत आहे.
आमच्या शिवरायांचे वादळ सत्याची ढाल होती.  ही ढाल कोसळून जातीचे बंगलेच्या बंगले अशीच तयार  होत राहिली तर पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या रक्षणासाठी वेडात मराठे वीर दौडले सात यांना या भूमीत जन्म घ्यावा लागेल.
© विकास पांढरे, 9970452767

शेतकरी आत्महत्या की खून ?

  • देशभरातील वाढत्या अतिरेकी काभारतात प्रत्येक तासाला 18 ते 25 आत्महत्यांची नोंद आजमितीस होत आहे. विशेष म्हणजे  महाराष्ट्रात गेल्या दोन दशकापासून वर्षापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. मुळात शेतकर्‍यांचा आत्महत्या  सर्वात मोठा जागतिक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. या आत्महत्या रोखण्यासास  शासनस्तरावरून  कितीही प्रयत्न होत असेल तरी,  विषयाकडे गांभीर्यपणे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळत नसल्याची खंत आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या ‘आत्महत्या नसून खूनच’ आहे असे संबोधावे लागेल.  जागतिक आत्महत्याविरोधी दिनानिमित्त घेतलेला हा वेध. 

  •  जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण व त्यामुळे वाढणार्या  ताण-तणावातून  शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास कोणालाच सवड-फुरसत  मिळत  नाही, तर  कोणीही तसा प्रयत्नही करीत नाही.आत्महत्या, शब्दोच्चार देखील भीतिदायक वाटतो तितकाच   गंभीर. आत्महत्येस प्रवृत्त करते मन.  मनाभोवती अत्यंत दाट खिन्नता, डिप्रेशन व नाराजीचे वलय निर्माण होते. या जगात, समाजात, कुटुंबात आता जीवन जगण्यातील अर्थच संपला, म्हणून स्वत:ला संपण्यासाठी मन प्रवृत्त होऊन आत्महत्या केली जाते. 

  •  यात प्रामुख्याने भरडला जातोय तो जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी.  दुष्काळी फेरा, नापिकी, कर्ज,  मुलांचे शिक्षण,  लग्न यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणाच मोडला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना  राबवल्या जात असताना आत्महत्यांचा आकडा उत्तरोत्तर वाढत चालला आहे. वर्षभरात देशातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 40  टक्क्यांनी वाढल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक येतो. 

  •  अनुशेषाचे योग्यवाटप नाही

  • सर्वाधिक  आत्महत्या या मराठवाडा आणि विदर्भात होत आहेत.  या भागाचा विकास करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहेत.  पण अनुशेषाचे योग्यवाटप होत नसल्या कारणामुळे येथील शेतकरी विकासापासून वंचित आहेत. या भागातील शेतकर्‍यांच्या मुलभूत गरजा कोणत्या आहेत .
  • याकडे गांभीर्याने घेणे हे अजून तरी तेथील स्थानिक नेत्यांना सुचले नाही. मराठवाडा, विदर्भ या भागांविषयी तेथील कोणताच नेता पोट तिडकीने बोलल्याचे येथील जनतेला आठवत नाही. हे कोणाचे दुर्दैव? प्रशासन यावर उपायात्मक मार्ग काढण्यासाठी असफल ठरली आहे.

  • पाऊस झाला की दुर्लक्ष

  • पाऊस झाला की सरकार शेतकर्यांच्या आत्महत्या विसरून जातो.  तिथेच खरी गल्लत होते.  शेतकर्यांच्या आत्महत्येवरील उपाययोजना ही दीर्घकालीन असली पाहिजे.  त्यासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे.  ते पैसे काटेकोरपणे खर्च केले पाहिजेत.  तरच आजचे चित्र बदलू शकते.

  • आत्महत्येचा फुगा वाढतोय

  •      आपल्या देशात ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत   दुष्काळ पडत  आहे. 1972 साली लोकशाहीतील सर्वात मोठा दुष्काळ पडला.  त्यानंतर नव्वदच्य ा दशकापासून दुष्काळाने पाठ फिरवली नाही.  2015-16  सालात दुष्काळाने शीग गाठली आहे.  दुष्काळे कामे झाली,  पण विदर्भ व मराठवाड्यात  आत्महत्येचे सञ सुरूच आह 1995 ते 2011 पर्यंत देशात 2 लाख 940 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो सांगतो,  यापैकी महाराष्ट्रातील आत्महत्येची आकडेवारी 53 हजार 818 इतकी आहे.

  • आत्महत्येची ठळक प्रमुख कारणे 

  •  नापिकी व कर्जबाजारीपणा
  •   सातत्याने उद्भभवत असलेली दुष्काळी परिस्थिती 
  •  खासगी संस्था, सावकार यांच्या वसुलीच्या तगादा
  •  मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न येण
  •   मुलाला शिकविले परंतु त्याला नोकरी न लागणे
  • सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे लोण
  • शेजारच्या मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्येने थैमान घातले असताना, याचे लोण सोलापूरातही पोहोचले आहे. सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे सधन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या हा विषय विदर्भ व मराठवाड्यात सीमित न राहता प. महाराष्ट्रात पोहोचले आहे.


  • महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या  आकडेवारी

  • वर्षे                  संख्या
  • 2000              3022
  • 2001              3536
  • 2002              3695
  • 2003              3836
  • 2004              4147
  • 2005             3926
  •   2006             4453
  • 2007                4238
  •   2008              3802
  • 2009               2872
  • 2010               3141
  • 2011             3337
  • 2012             4300
  • 2013              3146
  • 2014              4004
  • 2015              1841
  • (जागतिक आत्महत्याविरोधी दिन विशेष.दै.पुढारी10सप्टेंबर 2016)
  • सोलापूर : विकास पांढरे

मराठवाडय़ाला नोटाबंदी नवीन नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात साद- पडसाद उमटत आहेत. असाच एक निर्णय झाला होता. हैदराबाद संस्थान विलीन झाले अन उस्मानिया सिक्का रुपयात बदलला होता. त्यामुळे निजामी राजवटीत असलेल्या मराठवाड्यातील जनतेला नोटाबंदीचा निर्णय नाही. याविषयी

मंगळवार दिनांक १३/१२/२०१६ रोजीच्या दैनिक पुढारी ( सोलापूर ) मध्ये घेतलेला शोध.

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

हस्तिदंती मनोऱ्यातून

"हस्तिदंती मनोर्‍यातून .........!"
    महाराष्ट्रात अगदी दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून साहित्यनिर्मितीची हौस उपाडू लागलेली आहे.  ती पूर्णःता प्रफुल्लित होईल असे वातावरण उत्पन्न झाले तर माझ्यासारख्याला आज वाटणारी निराशा पार नाहीशी होईल. दूर खेड्यात वा तालुक्याच्या गावी असलेल्या या उमलत्या साहित्यिकांना नागरी तरूणाइतकी विचित्र निराशा अजून आलेली नसावी.  त्या साहित्यिकांना आणि प्रतिभेचे देणे लाभलेल्या सर्वच तरूणांना मी असे आवाहन करू इच्छितो की, नवसाहित्याच्या लाटेत वाहून जाण्याआधी तुम्ही जुन्या वाङमयाचे परिशीलन करा. त्यातले काही तुमच्यातला स्वाभिमान प्रकर्षाने जागृत करील. साहित्यिक नावाच्या मनोर्‍यातून तुमच्या मनाला  खाली उतरवील.
                          ग. दि. माडगूळकर
          ( यवतमाळ- 1973, अध्यक्षीय भाषणातून)
विकास  पांढरे

बिगारी : मदन देगावकर -दंदाडे


लेखकाने आत्मचरित्रामधून आपली व्यक्तिगत अनुभूती स्वाभाविक पणे प्रकट केलेली असते. त्यामुळे ’आत्मचरित्र’ हे आत्मनिष्ठ असते. स्वतः च्या जीवनाचे तटस्थपणे केलेले अवलोकन असते. बार्शी येथील संवेदनशील लेखक मदन देगावकर - दंदाडे यांनी आपल्या जीवनाचा आलेख ’बिगारी’ या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मदन देगावकर यांच्या ’बिगारी’ हे आत्मकथन मानवी मनाचे चित्रण करते. 112 पानांमधून लेखकाने आपले बालपण, तारूण्य आणि वैवाहिक जीवनात आलेल्या कडूगोड आठवणी सांगितल्या आहेत. ’बिगारी’ चे लेखन हे ओघवत्या शैलीत अवतरले आहे. बार्शी - मराठवाडयातील भाषा छोट्या छोट्या वाक्यातून अवतरली आहे. देगावकर यांनी ’बिगारी’ च्या मनोगतात स्पष्ट करताना म्हणतात की,’ आत्मचरित्र’ लिहिण्या एवढा मी काही मोठा प्रसिद्ध, प्रथित यश व्यक्ती नाही. कादंबरी किंवा कथासंग्रह लिहिण्याचा विचार करत होतो. तरीही मनाला सारखं वाटू लागलं जे आपण भोगलयं, जगलोय ते शब्दात मांडायला काय हरकत आहे.’अशी भूमिका विशद केली आहे.

’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिणाम येथील समाज मनावर झाला आहे. त्यातूनच माणसाला शिक्षणाची गोडी लागली. ’बिगारी’ मधील मदनाचा बिगारी ते लेखक हा प्रवास पहिला तर शिक्षणासाठी - नोकरीसाठी चाललेली धडपड लक्षात येते. मदनचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झाले आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने शैक्षणिक होरपळ झाली. परिस्थितीमुळे भावाचं शिक्षण झाले नाही. बिगार्‍याचा तो गवंडी झाला. लेखकाला शाळेत असताना संध्याकाळी चौकात हातगाड्यावर पेन विकणे, पेपर विकणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, पेपर टाकणे, येरमाळा व येडशीत नारळ विकणे अशी कामे करावी लागली.

लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने ते एम.ए. पर्यंत शिकून बीएड होऊन मास्तर होण्याचं स्वप्न पाहतात. त्याविषयी ते लिहितात, एम.ए.पूर्ण झालं.अन् बी.एड करायचे ठरवले पण पैसा आणायचा कुठून. दोन तीन ठिकाणी फॉर्म टाकले नंबर लागला.एवढे पैसे भरावे लागतात म्हणून समजले; आता काय करायचे ? रात्रभर विचार केला एकटाच भरपूर रडलो.अन सकाळी उठलो. भाकरी बांधल्या आत्तापर्यंत मिळालेली सर्व सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रे दोन पिशव्यात भरली. कागदपत्रे घेऊन एस टी स्टँण्ड वर आलो. सोलापूर गाडीत बसलो. सकाळी अकरा वाजता मी संस्थापकाच्या दारात.तिथल्या वॉचमन,नोकरांना वाटले मी कदाचित भंगारवाला असावा.विनवण्या करू मी संस्थापकांना भेटलो. त्यांना माझी कागदपत्रे दाखवली दोन पिशवी भरून आणलेली सन्मान चिन्हा दाखवली. माझ्याकडे पैसे नाहीत पण बी.एड.करायचे म्हणालो मला आलेलं पत्र दाखवलं. माझी मराठी भाषा त्यांना समजत नव्हती पण माझ्या भावना त्यांना समजत होत्या... ( पान क्र.19)

येडाई वर नारळ घेऊन विकायला जाणार म्हणल्यावर बाहेरच्यांनी तर येड्यात काढलेच होते पण घरचे ही तेवढे समाधानी वाटले नाहीत. पोरग मामलेदार, कलेक्टर व्हायची स्वप्न बघणार्या आईच्या डोळ्यात पाहायचं धाडस मला झालं नाही. (पान.33) शाळेच्या पुस्तकाने जेवढे शिकवले नाही तेवढे येणार्या परिस्थितीने शिकवले.
गरिबीमुळे शिक्षणात अडचणी आल्या पण शिक्षणामुळेच आपल्याला जगण्याचं आत्मभान कसं आले आहे, याचं वास्तव ते मान्य करतात.

लेखकाने आपले वैवाहिक जीवन अतिशय तरलतेने मांडले आहे. लग्न जमवताना हुंड्याचा विषय न काढण्याचा ते सांगतात. मुलीच्या जन्मानंतर लेखकाचे हळवे पण मनाला चटका लावणारे आहे. आजीचा दवाखाना, राणू शेळी यांच्या बाबतीत ते भरभरून बोलतात.

बाळ खूपच अशक्त त्यात बाळाच्या आईला कसलेच दूध नाही. त्यामुळे बाळ सारखे रडायचे. दोन दिवसांनी एका डाँक्टरला दाखवले, डॉक्टर म्हणाले, मुलीच्या नाकातून नळ्या सोडून औषधं व दूध वगैरे देता येईल, तरीही वजन वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. दोन तीन महिने बाळाला व आईला दवाखान्यात अँडमिट व्हावे लागेल. तरीही मी काही गँरटी देऊ शकत नाही.....आम्ही पती - पत्नी दोघेही मनसोक्त रडलो.. (पान 110,111)
लेखकाला गाण्याची आणि संगीताची आवड असल्याचे बोलून दाखवतात. शामराव देशपांडे यांच्याकडे मोफत शिक्षण घेणारे एकमेव विद्यार्थी.
’बिगारी’ त ’मदन’ हेच पात्र केंद्रस्थानी आहे. आण्णा, आई, भाऊ काँलेजला आणि गायनात मदत करणारे तरुण मित्र आणि शिक्षकाचे चित्रण लेखक करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुख: दु:खात सदैव मोलाची साथ देणार्‍या आपल्या पत्नीला लेखकांनी विशेष स्थान दिले आहे.
लेखकाने कथेचा शेवट ही सुंदर केला आहे ते म्हणतात,

आता ही बिगारी इनशर्ट करून सुटाबुटात राहतोय. पण तरीही मनाला वाटतयं अजून अरे ! आपण गड्याचा फक्त गवंडी झालोय. अजूनही आपल्याला खूप उंच इमले बांधायचे आहेत. आत्तापर्यंतच्याआयुष्यात खूप चांगली माणसं भेटली. जे वाईट भेटले ते ही चांगलेच होते.म्हणायचे. त्या परिस्थितीत जगत असताना शिकलेल्या लोकांपेक्षा अडाणी लोकांचे तत्वज्ञानचं जगण्याची प्रेरणा देऊन गेलं. हा संघर्ष अविरत चालूच राहिलं कारण माझ्यातला बिगारी अजूनही संपलेला नाही..

एकूणच ही आत्मकथा वाचकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करते. संवेदनशील मनाला काही प्रसंग चटका लावतात. बार्शी सारख्खा खेडे गावातील एका तरूणाची कथा प्रेरणा देणारी आहे तेवढीच अंतमूर्ख करायला लावते.
- विकास पांढरे,सोलापूर 9970452767
बिगारी
मदन देगावकर - दंदाडे,9922973614
युगंधर प्रकाशन, पुणे
---------------------------------------

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...