गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

कहाणी एका शाकाहारी गावाची

 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्टयपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. आज आपण परंपरेने शाकाहारी राहिलेल्या गावाची ओळख करून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात जोतिबाची वाडी हे गाव आहे. साधारण सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. वाचून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयांतल्या या जिल्ह्याच्या बातम्या माध्यमांत नेहमी वाचायला मिळतात.

जोतिबाची वाडी

जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथून 16 किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. साधारण सतराशे लोकसंख्या. गावात जोतिबाचे जागृत मंदिर आहे. 95 टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजाची चार घरे आहेत. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. गावातील साठ तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. 

निसर्गाची साथ मिळत नसली, तरी इथला शेतकरी समाधानी आहे. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातले तंटयाचे/मतभेदाचे विषय गावातच मिटविले जातात. आजपर्यंत कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी  पोलीस ठाण्यात गेले नाही. सर्व जण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. गावात देशी दारूचे व बिअरचे दुकान नाही. मटनाचे दुकानही कोसावर कुठे लावण्यात आले नाही. त्यामुळे हे गाव आजही गुण्यागोंविदाने नांदत असताना दिसते. या गावात जुन्या पध्दतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी आहे. गावकरी याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. दुष्काळात या आडाचे कधीही पाणी आटले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नाही.
जोतिबाच्या वाडीतील चित्र

जागृत मंदिर व शाकाहाराची आख्यायिका

जोतिबाची वाडी हे गाव दोन कारणांसाठी प्रसिध्द पावले आहे. पहिले कारण म्हणजे येथील बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री जोतिबाचे जागृत मंदिर व दुसरे या मंदिरामुळे गावकऱ्यांची शाकाहारी राहण्याची परंपरा. मांसाहार करणे आरोग्यासाठी चांगले नाही या विचाराने गावकरी शाकाहारी राहिलेले नाहीत, तर गावाला असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते मांसाहार करत नाहीत. त्यामागे एक कहाणी आहे. ही कहाणी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवतेला जोडणारा सेतू आहे.

कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून जोतिबाची वाडी येथील जागृत जोतिबा मंदिर देवस्थान ओळखले जाते. हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवास मांसाहार चालत नाही. दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावात मोठा उत्सव भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे माहात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. यात्रेला अहमदनगर, धाराशिव, बीडसह राज्यातील लाखो भाविक येतात.

 श्री जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. गावात अजूनही एकाही चुलीवर, गॅसवर व स्टोव्हवर मटन शिजलेले नाही. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी ज्येष्ठ नागरिक आबासाहेब पवार व शिक्षक शिवाजी भराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे जागृत मंदिर असल्यामुळे गावात कोणी आतापर्यंत कुणी कोंबडे व बकरे कापले नाही. जोतिबावर असलेली श्रध्दा ही आजपर्यंत चालत आली आहे.''

जोतिबाची वाडी निजाम राजवटीतले गाव. या परिसरातील गावांत रझाकाराच्या सैनिकांनी मोठा छळ केला. मात्र जोतिबाचे जागृत देवस्थान असल्यामुळे रझाकाराने या गावाला कधीही त्रास दिला नाही, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे व त्या श्रध्देपोटी गावकरी पिढयान्पिढया शाकाहारी राहिले आहेत. शाकाहाराची ही परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे, पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत.

रगावी जाऊन मांसाहार

संपूर्ण गाव शाकाहारी आहे. काही जण माळकरी आहेत. जे काही लोक आहेत, त्यापैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटन खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. असे लोक आंघोळ करूनच गावात प्रवेश करतात. पुणे-मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

श्रावणमासातील तिसऱ्या रविवारी यात्रेचे स्वरूप

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जोतिबाच्या वाडीत श्री जोतिबाचे जागृत मंदिर असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरला जातो. या दवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केलीहोती . श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. अर्धा कोटीच्या लोकवर्गणीतून जोतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

पंचक्रोशीत जोतिबाची वाडीचा लौकिक


जोतिबाची वाडी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असले, तरी हे गाव शुध्द शाकाहारी गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. गावात व्यसनाचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आबासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. या छोटयाशा गावातून एवढया मोठया संख्येने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दर वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. या निमित्ताने स्पर्धेकरिता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू या छोटयाशा गावात येतात. या स्पर्धेमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे.

काळाच्या ओघात जोतिबाची वाडीच्या ग्रामस्थांनी शाकाहारी राहण्याचे वेगळेपण आजही जपलेच आहे, शिवाय पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचेही कार्य ते करत आहेत. जोतिबाची वाडीचे कार्य अनुकरणीय आहे.

विकास पांढरे

99970452767
 (सदर लेख साप्ताहिक विवेक, वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे.)

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

दंगलीतले दोन दिवस


मंगळवार,२ जानेवारी २०१८

कार्यालयीन कामासाठी मी १ जानेवारी पासून नगर जिल्ह्याच्या (उत्तरेला) ग्रामीण भागात फिरत होतो. मजल-दरमजल करत या गावाहून त्या गावात जाऊन काही महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पुढचा रस्ता शोधत होतो. रात्रभर प्रवास सुरु होता. रात्री श्रीरामपूरला मुक्काम ठोकला. सकाळी सात वाजताच उठलो. अंघोळ केली. पुन्हा शहरातील काही व्यक्तींची भेट घेऊन पुढच्या प्रवासाचा बेत आखला.  श्रीरामपूर बसस्थानक समोरच्या कँटीनमध्ये नाष्टा केला. सोबत स्थानिक जिल्हा दैनिक जिल्ह्यातील घडामोडी नजरेत भरत होतो. चहावाला चहा करत होता, पानवाला पानाला कात लावत होता, भज्जीवाला कडईत भजी तळत होता, बाजारहाटसाठी परगावचे लोक येत होती, शाळा,काँलेजला जाण्यासाठी विद्यार्थी एसटीमधून उतरत होती,अशी काही लगबग सुरु होती. खरेतर, श्रीरामपूर हे व्यापारी पेठ. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच. 

दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या झहीर खानचे हे गाव. त्यामुळे या शहराविषयी उत्सुकतेने  कँटीन चालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "झहीर खान हा आमच्या गावचा आहे,त्याचा मला अभिमान आहे." सध्या झहीरचे कुटुंब मुंबईत राहते, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील श्रीरामपूरला आले होते, असे ऐकायला मिळते.
खरे,सांगायचे झाले तर श्रीरामपूरला ना मोठा इतिहास आहे ना भूगोल. इंग्रजी काळात  मध्य रेल्वेचे जंक्शन (बेलापूर) निर्माण झाल्यामुळे येथे मानवी वस्ती वाढली. पुढे साखर कारखाना सुरु झाल्याने झपाट्याने श्रीरामपूरचे गावात,शहरात, तालुक्यात आणि आता जिल्ह्याचे रूप धारण करत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मधून मारवाडी जैन आले,गुजरात, राजस्थान च्या सीमाभागातून काही मुसलमान आले,  ख्रिश्चन मिशनाऱ्याने आपले बस्तान बसवले, पंजाब हरियाणा मधून शीख बांधव आले असे हे संमिश्र शहर आहे.

 महाराष्ट्रीयन समाजाचे स्थान क्वचित मोठे आहे पण आर्थिक स्थिती सक्षम नाही,असे तो कँटीनचालक सांगत होता. बघता बघता घड्याळात दहा वाजून गेले हे कळलेच नाही. मला ऊसतोड कामगार हाँस्पिटल परिसरात एकाची भेट घेऊन मुलाखत घ्यायची होती. मी संभाषण कमी करून रस्ता धरला. अचानक भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली असून एका युवकाचा बळी गेला असल्याची वार्ता हाहा म्हणताच श्रीरामपूर मध्ये धडकली. सकाळी अकरा वाजपर्यंत शांत असलेले शहर अचानक अशांत झाले. भीमा कोरेगावचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमठले. या प्रकरणाची शाहनिशा न करता काही  तरूणांनी दगडफेक केली. शहरातील मध्यवर्ती (शिवाजी चौकात) ठिकाणी काही तरूण एकत्र जमा होऊन घोषणाबाजी करत होते. श्रीरामपूर शहर बंद करत आले. टिव्ही चँनल आणि समाज माध्यमात भीमा कोरेगाव प्रकरणावरून तुंबळ वादसंगर चालू झाला. कोण, कुणाची डोके भडकवत होता? कोण,कुणाला शांत करत होता ? कुणी, पराचा कावळा करून दोन मने दुभंग करत होता. यामागचा हेतू काय आहे  कळायला मार्ग नव्हता.

    शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. चौकाचौकात पोलिसांचा पहारा उभा होता. हा गोंधळ लक्षात घेऊन मी बसस्थानकात येऊन बसलो शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकात जमले होते. एसटी विभागाने बससेवा बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थी मित्राच्या घरी,काही विद्यार्थी होस्टेलवर,कुणी नातेवाईकांकडे राहण्याचा बेत करत होते. ज्याला कुणीच नाही, असे बसस्थानकात ताटकळत बसले होते. गावावरुन कुणी तरी आपणाला न्यायला येईल, या विचारात काही विद्यार्थी मग्न होते. शहर रिक्षा बंद असल्यामुळे इच्छित स्थळी कसे पोहोचावे, असाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.दंगलीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने काही काळ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संपूर्ण शहरात कफ्यू लावण्यात आली होती. त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते पण अनामिक भीती वाटत होती. पण सर्व जण जीवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक ज्येष्ठ नागरिकांनी श्रीरामपूर मध्ये १९८६ साली झालेल्या दंगलीचे कथन केले. तर एकाने २०१६ साली श्रीरामपूर दंगलीत ३४ दुकाने कशी जाळली गेली, आणि ती धग संपत असताना अचानक घडलेल्या अघटीत घटनेचे भाव त्या इसमावर उमठले होते. एक महिला आपल्या शेतातील भाजी विकण्यासाठी श्रीरामपुरात आली होती. दंगलीच्या पडसादामुळे ती ना बाजारात पोहचली ना तिची कुणी भाजी घेतली. गावाकडे कसे जायचं हा तिच्यापुढे उभा राहिला होता. जसजशा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसे रस्तावर कुणी नजरेस पडत नव्हते. दुकाने बंद झाली होती, घोटभर पाणी प्यावे म्हटले तर हाँटेल ही बंद झाली होती. दिवसाढवळ्या रस्ते ओस पडू लागली होती. मी एका रिक्षाचालकास आगाऊ पैसे देऊन एका घरी पोहोचलो.

बुधवार, ३ जानेवारी २०१८

भीमा कोरेगावची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. आदल्या दिवशीच श्रीरामपूरहून बेलापूरला जायचे ठरवले. दुपारचे चार वाजले असतील शहरात बंद शांतता होती. श्रीरामपूरहून बेलापूर आठ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रवास सोयीचा वाटला. एका खासगी वाहन चालकास विणवणी केल्यामुळे तो मला बेलापूरला सोडायला तयार झाला. त्या आठ किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये मोजावे लागले,असो. रात्रीचा मुक्काम पुण्यनगरीचे वार्ताहर विष्णु डावरे यांच्याकडे केला. सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक जिल्हा दैनिक वाचत असताना एक बातमी नजरेत भरली. त्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कूल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) ही विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्याची ती बातमी होती.
शाळेतील स्कूल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले होते. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता ही मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली,असे बातमीचे शेवट आहे. एका दंगलीचा या निरागस बालिकेने कसा सामना केला असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे राहताना अंगावर काटा उभा राहतो.

बेलापूरहून मला पुणतांब्याला यायचे होते. बेलापूर सारखे छोटे गाव बंद होते. विष्णुपंत डावरे यांच्या दुचाकीवरून कोल्हारला गेलो. तिथे  आदल्यादिवशी बंद पुकारण्यात आला होता.  दुपारचे तीन वाजले होते.हळूहळू रस्त्यावर वाहने दिसू लागली होती. त्या जिल्हा रस्त्यावर दंगलीची धग तेवढी जाणवत नव्हती. मला पुणतांबा येथे जाण्यासाठी श्रीरामपूरला यावे लागले. श्रीरामपूर ते पुणतांबा अंतर १८ किलोमीटर आहे. हे अठरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार तास लागले. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतली असल्याची बातमी समाज माध्यमातून कळली,तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...