शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

दंगलीतले दोन दिवस


मंगळवार,२ जानेवारी २०१८

कार्यालयीन कामासाठी मी १ जानेवारी पासून नगर जिल्ह्याच्या (उत्तरेला) ग्रामीण भागात फिरत होतो. मजल-दरमजल करत या गावाहून त्या गावात जाऊन काही महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन पुढचा रस्ता शोधत होतो. रात्रभर प्रवास सुरु होता. रात्री श्रीरामपूरला मुक्काम ठोकला. सकाळी सात वाजताच उठलो. अंघोळ केली. पुन्हा शहरातील काही व्यक्तींची भेट घेऊन पुढच्या प्रवासाचा बेत आखला.  श्रीरामपूर बसस्थानक समोरच्या कँटीनमध्ये नाष्टा केला. सोबत स्थानिक जिल्हा दैनिक जिल्ह्यातील घडामोडी नजरेत भरत होतो. चहावाला चहा करत होता, पानवाला पानाला कात लावत होता, भज्जीवाला कडईत भजी तळत होता, बाजारहाटसाठी परगावचे लोक येत होती, शाळा,काँलेजला जाण्यासाठी विद्यार्थी एसटीमधून उतरत होती,अशी काही लगबग सुरु होती. खरेतर, श्रीरामपूर हे व्यापारी पेठ. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच. 

दीड दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या झहीर खानचे हे गाव. त्यामुळे या शहराविषयी उत्सुकतेने  कँटीन चालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "झहीर खान हा आमच्या गावचा आहे,त्याचा मला अभिमान आहे." सध्या झहीरचे कुटुंब मुंबईत राहते, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील श्रीरामपूरला आले होते, असे ऐकायला मिळते.
खरे,सांगायचे झाले तर श्रीरामपूरला ना मोठा इतिहास आहे ना भूगोल. इंग्रजी काळात  मध्य रेल्वेचे जंक्शन (बेलापूर) निर्माण झाल्यामुळे येथे मानवी वस्ती वाढली. पुढे साखर कारखाना सुरु झाल्याने झपाट्याने श्रीरामपूरचे गावात,शहरात, तालुक्यात आणि आता जिल्ह्याचे रूप धारण करत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मधून मारवाडी जैन आले,गुजरात, राजस्थान च्या सीमाभागातून काही मुसलमान आले,  ख्रिश्चन मिशनाऱ्याने आपले बस्तान बसवले, पंजाब हरियाणा मधून शीख बांधव आले असे हे संमिश्र शहर आहे.

 महाराष्ट्रीयन समाजाचे स्थान क्वचित मोठे आहे पण आर्थिक स्थिती सक्षम नाही,असे तो कँटीनचालक सांगत होता. बघता बघता घड्याळात दहा वाजून गेले हे कळलेच नाही. मला ऊसतोड कामगार हाँस्पिटल परिसरात एकाची भेट घेऊन मुलाखत घ्यायची होती. मी संभाषण कमी करून रस्ता धरला. अचानक भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली असून एका युवकाचा बळी गेला असल्याची वार्ता हाहा म्हणताच श्रीरामपूर मध्ये धडकली. सकाळी अकरा वाजपर्यंत शांत असलेले शहर अचानक अशांत झाले. भीमा कोरेगावचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमठले. या प्रकरणाची शाहनिशा न करता काही  तरूणांनी दगडफेक केली. शहरातील मध्यवर्ती (शिवाजी चौकात) ठिकाणी काही तरूण एकत्र जमा होऊन घोषणाबाजी करत होते. श्रीरामपूर शहर बंद करत आले. टिव्ही चँनल आणि समाज माध्यमात भीमा कोरेगाव प्रकरणावरून तुंबळ वादसंगर चालू झाला. कोण, कुणाची डोके भडकवत होता? कोण,कुणाला शांत करत होता ? कुणी, पराचा कावळा करून दोन मने दुभंग करत होता. यामागचा हेतू काय आहे  कळायला मार्ग नव्हता.

    शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. चौकाचौकात पोलिसांचा पहारा उभा होता. हा गोंधळ लक्षात घेऊन मी बसस्थानकात येऊन बसलो शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकात जमले होते. एसटी विभागाने बससेवा बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थी मित्राच्या घरी,काही विद्यार्थी होस्टेलवर,कुणी नातेवाईकांकडे राहण्याचा बेत करत होते. ज्याला कुणीच नाही, असे बसस्थानकात ताटकळत बसले होते. गावावरुन कुणी तरी आपणाला न्यायला येईल, या विचारात काही विद्यार्थी मग्न होते. शहर रिक्षा बंद असल्यामुळे इच्छित स्थळी कसे पोहोचावे, असाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.दंगलीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने काही काळ शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुग्ध संस्था व आरोग्य सेवा वगळता तातडीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संपूर्ण शहरात कफ्यू लावण्यात आली होती. त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते पण अनामिक भीती वाटत होती. पण सर्व जण जीवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक ज्येष्ठ नागरिकांनी श्रीरामपूर मध्ये १९८६ साली झालेल्या दंगलीचे कथन केले. तर एकाने २०१६ साली श्रीरामपूर दंगलीत ३४ दुकाने कशी जाळली गेली, आणि ती धग संपत असताना अचानक घडलेल्या अघटीत घटनेचे भाव त्या इसमावर उमठले होते. एक महिला आपल्या शेतातील भाजी विकण्यासाठी श्रीरामपुरात आली होती. दंगलीच्या पडसादामुळे ती ना बाजारात पोहचली ना तिची कुणी भाजी घेतली. गावाकडे कसे जायचं हा तिच्यापुढे उभा राहिला होता. जसजशा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसे रस्तावर कुणी नजरेस पडत नव्हते. दुकाने बंद झाली होती, घोटभर पाणी प्यावे म्हटले तर हाँटेल ही बंद झाली होती. दिवसाढवळ्या रस्ते ओस पडू लागली होती. मी एका रिक्षाचालकास आगाऊ पैसे देऊन एका घरी पोहोचलो.

बुधवार, ३ जानेवारी २०१८

भीमा कोरेगावची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. आदल्या दिवशीच श्रीरामपूरहून बेलापूरला जायचे ठरवले. दुपारचे चार वाजले असतील शहरात बंद शांतता होती. श्रीरामपूरहून बेलापूर आठ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रवास सोयीचा वाटला. एका खासगी वाहन चालकास विणवणी केल्यामुळे तो मला बेलापूरला सोडायला तयार झाला. त्या आठ किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये मोजावे लागले,असो. रात्रीचा मुक्काम पुण्यनगरीचे वार्ताहर विष्णु डावरे यांच्याकडे केला. सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक जिल्हा दैनिक वाचत असताना एक बातमी नजरेत भरली. त्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे श्रीरामपूर मध्ये शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. मॉडेल इंग्लिश स्कूल मधील तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रद्धा आदिक (८वर्ष) ही विद्यार्थिनी घरी पोहचलीच नसल्याची ती बातमी होती.
शाळेतील स्कूल बसने संबंधित मुलीला खानापूर येथे सोडले होते. शाळा लवकर सोडल्याची कल्पना शाळा प्रशासनाने पालकांना दिली नाही. तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेत या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता ही मुलगी पनवेल येथे सुखरूप सापडली,असे बातमीचे शेवट आहे. एका दंगलीचा या निरागस बालिकेने कसा सामना केला असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे राहताना अंगावर काटा उभा राहतो.

बेलापूरहून मला पुणतांब्याला यायचे होते. बेलापूर सारखे छोटे गाव बंद होते. विष्णुपंत डावरे यांच्या दुचाकीवरून कोल्हारला गेलो. तिथे  आदल्यादिवशी बंद पुकारण्यात आला होता.  दुपारचे तीन वाजले होते.हळूहळू रस्त्यावर वाहने दिसू लागली होती. त्या जिल्हा रस्त्यावर दंगलीची धग तेवढी जाणवत नव्हती. मला पुणतांबा येथे जाण्यासाठी श्रीरामपूरला यावे लागले. श्रीरामपूर ते पुणतांबा अंतर १८ किलोमीटर आहे. हे अठरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी चार तास लागले. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतली असल्याची बातमी समाज माध्यमातून कळली,तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...