यशोगथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यशोगथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

गोष्ट एका शिक्षकाच्या चांगुलपणाची

सध्या शिक्षकांमधील चांगुलपणा,सामाजिक भान हरवत चालला आहे, अशी ओरड होत असते.पण काही शिक्षक समाजासमोर दीपस्तंभासारखे काम करताहेत.आदिवासी भागात जन्माला आलेल्या एका तरुण शिक्षकाने नोकरी लागल्यापासून समाजसेवक बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' संस्थेच्या संलग्नित महारोगी सेवा समितीला हजार रूपये पाठवून चांगुलपणा जपला आहे. त्यामुळे इतर शिक्षकांनी हा आदर्श घेण्यासारखा आहे.

एकनाथ रामकिसन नैताम असे त्या शिक्षकाचे नाव आहे. काटगाव ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.किनवट तालुक्यातील शामपूर (मिनकी) या आदिवासी पाड्यात एकनाथ यांचा जन्म झाला. आजही या पाड्यात त्यांचे आई-वडील,भाऊ राहतात. आदिवासी पाड्यात आजही ना शिक्षणाची सोय आहे ना कोणत्या सेवा सुविधा. जंगल हेच त्यांचे विश्व. एकनाथ नैताम हे त्यातील एक घटक. हालाखीच्या परिस्थितीमुळे एकनाथ यांना लहानपणी गाई,गुरे ,बकऱ्या चरण्याठी रानात घेऊन जावं लागे. रानमोळ हिंडताना किनवट च्या घनदाट जंगलाचे दर्शन होत असे. सोबत ते बाराखडीचे पुस्तक घेऊन जात. यातून त्यांना मुळाक्षराची ओळख झाली. बाराखडीच्या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टी ते वाचू लागले. शिक्षणाचा लळा लागू लागला पण घरात कुणीच शिकलेले नव्हते. त्यात अठराविश्व दारिद्रय. ना भाऊ,ना,वडील,ना काका शिकलेला होता. अशा अंधारकमय जीवनात प्रकाशाची वाटा पाहणाऱ्या एकनाथ यांच्या अडाणी आई-वडिलांनी आपल्या मुलाला शिकवून मोठे करण्याचा खूणगाठ बांधली. जमेल तसे एकनाथांच्या धडपडीला साथ देऊ लागले. आई-वडिलांच्या अथक प्रयत्नामुळे एकनाथांना तलाईगुंडा (ता.किनवट) येथील शासकीय आदिवासी आश्रमात प्रवेश मिळाला. आश्रमात राहून एकनाथ यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यापुढचा मार्ग त्यांना निवडाचा होता. आपल्या कुटुंब व बांधवांना नवी दिशेने न्यायचे असेल तर पुढील शिक्षण घेणे आवश्यक होते. दहावीनंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी डीएडचा मार्ग पत्करला. पैशाअभावी हे शिक्षण पूर्ण करणे अवघड होते. डीएडची प्रवेश फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. वैजापूर जि.औरंगाबाद येथील अध्यापक विद्यालयात अत्यंत हालखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१२ साली इटकळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले.
शिक्षक एकनाथ नैताम
नोकरीला लागल्यापासून 'आनंदवना'ला का?पैसे पाठवत आहे. याविषयी सांगताना एकनाथ म्हणाले,"माझी घरची परिस्थिती बेताची होती,संस्कार काय असतात हे मला माहीत नाहीत. आश्रमात शिक्षणासाठी आलो तेव्हा लाजरा होतो, आपल्यापेक्षा काही लोक अधिक पटीने सुधारले आहेत याची जाणीव झाली. तिथे माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले.आम्ही सर्व आदिवासी मुलं-मुली एकत्र भावडांप्रमाणे राहायचो. इथे घरच्याप्रमाणे वागणूक दिली गेली. समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांनी आदिवासी पाड्यात केलेल्या कामामुळे हा  सामाजिक बदल घडून येतोय हे हळूहळू कळत गेले. त्यामुळेच आमटे कुटुंबिय माझे आयडॉल आहेत. लहानपणी आदिवासी मुलांचे पाहिलेले दु:ख,वेदना मनात टोचत होत्या. आपण प्रवाहाबरोबर असल्याची जाणीव होत होती. पण आमच्या समाजात आमुलाग्र बदल घडवणारे डॉ.बाबा आमटे हे आमचे दैवत आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने आणखीन प्रभावित झालो. आदिवासींच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असलेले समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्यामुळे आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षण मिळाले. त्यामुळे आपण शिकून शिक्षक होऊ शकलो. शिक्षक झाल्यापासून न चुकता महारोगी सेवा समिती वरोरा जि.चंद्रपूर या संस्थेला आर्थिक मदत देण्याची जबाबदारी स्वीकारली. अविरतपणे ही मदत चालू ठेवणार असल्याचे एकनाथ नैताम यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात एकनाथ यांच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती दिली होती. हा संदेश पै-पाहुण्यांना आवडला होता. एकनाथ हे शाळेच्या कामातही आघाडीवर आहेत. ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून इटकळ येथे ठसा उमठवला आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध परिक्षेत गुणवान ठरले आहेत.


देवभूमी केरळमध्ये प्रलयंकारी जलसंकट आले. आपत्तीग्रस्त बांधवांना मदत म्हणून जि.प. प्रा .शाळा काटगाव ता. तुळजापूर येथील इ.३री तुकडी (ब )मधील विद्यार्थांनी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मूल्यवर्धन या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांसाठी काहीतरी सहकार्य करावे या भावनेतून खारीचा वाटा उचलला आहे. यामध्ये  वर्गशिक्षक श्री. एकनाथ नैताम यांनी १ हजार रूपये व सर्व विद्यार्थ्यांनी मिळून २०० रु असे एकूण १२०० रुपयांची मदतनिधी केरळ सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन निधी म्हणून पाठवले आहे. विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना समजावी व त्यांनी एकमेकांना नेहमी सहकार्य करावे,हा आपला हेतू असल्याचे नैताम यांनी सांगितले.

एका साध्या शिक्षकाने आपण जे भोगलो, ते भोग आपल्या बांधवांना येऊ नये, या संवेदनेतून एकनाथ नैताम यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद तर आहेच शिवाय अनुकरणीय देखील सुध्दा आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७

एकनाथ नैताम - ९५५२००५२७२
( सदर लेख १२ जानेवारी २०१७ रोजी दैनिक पुढारी, सोलापूर मध्ये प्रसिद्ध झाला आहे. शेवटचा मुद्दा नाव्याने भर घातला आहे.)

शनिवार, १७ मार्च, २०१८

एका जिद्दीची कहाणी



नवरा अपंग तर बायको अंध तरीही या दोघांचा संसार सुखाचा आहे. कुणाचा आधार नाही, ना कुणाचे कर्ज स्वत:चा विकास स्वतः करणे यातच खरा पुरूषार्थ आहे, असं प्रमाण मानून सोलापूरच्या पूर्व भागात अंध आणि अपंग दाम्पत्य काळ्या बाहुल्या तयार करून त्यावर गुजराण करणारे चित्र दृष्टीक्षेपास पडते.

या दाम्पत्याची शहरात कुठे मालकीची जागा नाही ना हक्काचे घर नाही. घर नाही म्हणून सारं जीवनच असुरक्षित, अशा असुरक्षित आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या या अंध अपंग दांम्पत्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाचाही आधार न घेता गेल्या २५ वर्षापासून काळया बाहुल्या तयार करून त्यावर पोट भरतायेत.
महागाईमुळे त्यांच्या जगण्याची परवड होतीय. ही कहानी आहे दोन्ही पायाने अपंग असलेल्या फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई यांची.

फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील पद्मनगरच्या वळणार एक पाल आहे. या पालीत फुलचंद जाधव आणि मंगलाबाई गेल्या पंचवीस वर्षापासून राहतात. आज फुलचंदचे वय ६५ हून अधिक झालंय तर मंगलाबाई साधारण ५८ वर्षांच्या असतील. त्या पालीमध्ये या दोघांनी आपला छोटासा संसार मांडलाय. फुलचंद मुळचे अकलूजचे. दोन्ही पायाने अपंग आहेत. लहानाचे मोठे अकलूज मध्ये झाले. फुलचंद याचे वय वाढलें तसे कुटुंबाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. फुलचंद यांच्यातील जगण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. निराशेला न डगमगता ते १९७२ साली सोलापूर शहरात आले. छोटे मोठे काम करू लागले. मिळणाऱ्या पैशातून पोट भरणे ही मुश्कील होते.

काही दिवस भीक मागून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला पण भीक मागणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले. स्वत: काही तरी कला शिकल्या शिवाय जगण्याला आकार येणार नाही म्हणून काळया बाहुल्या बनविणे, पिंजरे, झाडू, गंगावण अशा वस्तू तयार करू लागले. त्यातून दोन पैसे मिळू लागले.त्यांचा स्वाभिमान आणखीन ज्वलंत होऊ लागला. यातून आपण स्वावलंबी जीवन जगू शकतो याचा अभिमान वाटू लागला.
या दरम्यान दोन्ही डोळयांनी अंध असलेली मंगला खंदारे नावाची युवती भेटली. तेही जगण्यासाठी धडपडत करत होती. दोघांची चांगली ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले पुढे या दोघांनी विवाह केला. यातून या दोघांच्या आयुष्याचा संसार सुरू झाला.

काळ्या बाहुल्या करताना फुलचंद व मंगलाबाई

छोट्याशा व्यवसायातून दोघांचे पोट भरणे कठीण झाले अनेक वेळा त्यांना उपाशी राहावे लागले. मंगला ही तशी तेलूगू भाषिक तर फुलचंद मराठी.
त्यामुळे या दोघांना संवाद साधताना अडचण यायची. पुढे ते एकमेकांच्या भाषा बोलू लागले. शब्दांचा, भाषेचा नवा सूर जुळून आला.

या दोघांनी काळया बाहुल्यांचा व्यवसाय नेटाने उभा केला. संसाराला आकार येऊ लागला. मंगलाबाईची उद्योगजकता स्वस्थ बसू देत नव्हती. तिने बांगडयांचा व्यवसाय सुरू केला.पण समाजातील महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्याने, या व्यवसायावर पाणी फिरले. मंगलाबाईने जिद्द न हरता, आपल्या पतीला साथ देत आजही काळया बाहुल्या बनविण्यासाठी मदत करतायेत. या दोघांची कमाईतून ८० ते १०० रूपये मिळतात.

आमवस्या आणि पौर्णिमेला थोडी जास्त कमाई होते. पण रेशन, घासलेट आणि औषध पाण्यामुळे जगण्यात आनंद वाटत नाही, त्यातही ना हक्काचे घर आहे ना जागा, स्वयंजरोजगार करावा यासाठी जवळ शिधापत्रिका आहे ना शिक्षण. पोटासाठी रोज मर मर मरायचे,कधी गिऱ्हाईक नाही आले तर अर्धपोटी उपाशी रहावे लागते. बाहुल्या बनविण्यासाठी रबर, दोरा, खिळा, लिंबू आदी वस्तू विकत घेताना नाकी नऊ होते,असे ते म्हणतात.

"कलेवर पोट भरणे अवघड होत आहे. त्यातच महागाईमुळे आज अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. त्यामुळे सध्या आम्हाला शासनाची मदतीचे गरज आहे. आमच्या व्यवसायाला अधिक हातभार लावण्यासाठी बँकानी आर्थिक सहाय्य करून, आमची परवड थांबवावी" असे, फुलचंद जाधव आणि त्यांच्या पत्नी मंगलाबाई सांगतात.

या दांम्पत्यांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करायचा आहे पण कोणतीही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे कुठलीच तारण नसल्यामुळे बँकाचा आशिर्वाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. समाजात स्थान नाही, गावात वा शहरात हक्काची जागा नाही, शहराशिवाय अस्तित्व नाही, त्यामुळे सतत भाकरीचा चंद्र शोधण्यसाठी या अंध अपंग दांम्पत्याची परवड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काळया बाहुल्या विकून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबाची कहानी प्रेरणादायी आहे.

शहरी असो वा ग्रामीण याठिकाणी अपंग नजरेस पडत असतात. काही अपंग शिक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळत नाही ना पगार. काहीजण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपंगात्वावर मात करून, स्वावलंबी बनत आहेत. पण त्यांना स्थिरता देण्यासाठी बँकेकडून काहीच मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( साभार :अपंग सहायता दिनानिमित्त १६ मार्च २०१६ रोजी तरूण भारत,सोलापूर मध्ये मी लिहिलेला हा लेख आहे)

सोमवार, २६ जून, २०१७

माणदेशी शेतकरी कन्या





सध्या पावसाळी दिवस असल्याने जिकडे तिकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे बळीराजा शेतीची मशागत करून काळया आईची ओटी भरताना दिसतोय. अशातच सध्या एक छायाचित्र सामाजिक माध्यमातून सर्वत्र व्हायरल झालंय. हे चित्र पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटतं, शिवाय एक शिकलेली पोरगी चक्क दोन बैलांचं औत ओढताना पाहून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही, इतके जिवंत चित्र आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेल्या माण तालुक्यातील गटेवाडी इथे बारावीत शिकत असलेल्या मनीषा खरात हिची ही कहाणी..

माणदेश म्हटलं की डोळयासमोर येतो तो दुष्काळ, दूरदूरपर्यंत ना झाडं दिसतं, ना सावली, ना पाणी, ना बागायती शेती.. दिसतं फक्त कुसळी गवत, शुष्क माळरान अन माळरानावर चरणाऱ्या मेंढया. थोर ग्रामीण साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी 'माणदेशी माणसं' या आपल्या कथासंग्रहातून माणदेशी माणसांचं आणि प्रदेशाचं रसभरित वर्णन केलं आहे. त्याचबरोबर माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या कादंबरीची नायिका शकू जशी आपल्या मेंढया सांभाळून शेती करते, अगदीअशाच प्रकारचं वास्तववादी चित्र माण तालुक्यातील गटेवाडी इथल्या मनीषा खरात हिच्या बाबतीत घडलंय. साधारण चौदाशे लोकवस्तीचं गाव.. गावात पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेतीवर अवलंबून राहता येत नाही, शिकून मोठं व्हावं असं ठरवलं तर शिक्षण घेता येत नाही.. अशीच परवड मनीषा खरात हिच्या वाटयाला आलीय. मेंढीपालन हाच मनीषाच्या कुटुंबाचा व्यवसाय. गावात वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतात विहीर आहे, पण पाणी नाही. पावसाळयात विहिरीला पाणी असतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीयांना शेळया-मेंढयांवर गुजराण करावी लागते. काळ बदलला असला तरी खरात कुटुंबीयांचं मेंढयावरचं जिणं मात्र काही थांबलं नाही. आपल्या पोराबाळांना चांगलं शिकवावं अशी त्यांची मनीषा आहे. त्यासाठी ते जिवाचं रानं करताहेत..

ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता या गावाहून त्या गावाला सतत स्थलांतर करणाऱ्या खरात कुटुंबाने आपल्या पिलांना गावात जरी ठेवलं असलं, तरी त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करणारी ऊर्जा दिलीय. अशा या वातावरणात चुणचुणीत दिसणारी मनीषा आपल्या लहान भावंडांसह आजी-आजोबांजवळ राहते. मनीषाला दोन बहिणी व एक लहान भाऊ आहे. मनीषा सगळयात मोठी. घरातील काम असो वा शेतातलं, ती मोठया मेहनतीने करते. शिक्षणातही ती कमी नाही. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिने 73 टक्के मिळवले आहेत. यंदा ती दहिवडी येथील कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. मेहनती, अभ्यासू व गुणवान विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये तिचा लौकिक आहे.

तिचे आई व वडील भीमराव खरात हे सध्या शेंळया-मेंढया घेऊन बाहेरगावी गेले आहेत. विशेषतः इथली माणसं मेहनती आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या या मंडळींना घराकडे व आपल्या काळया आईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मनीषा खरातच्या घरातही हीच परिस्थिती आहे.

आई व वडील भीमराव हे अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत झाली नाही. यंदा वरुणराजाने लवकर हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी झाला असला, तरी वर्षानुवर्षं दुष्काळाच्या छायेत वावरत असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करत असलेल्या खरात कुटुंबातील मनीषासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं - आपली पेरणी कोण करणार? मशागतीला उशीर झाला, तर पेरणीला विलंब लागेल; अशातच आई-वडिलांना गावाकडे यायचं झालं, तर त्यांना खूप उशीर होईल... असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. अशा वेळी काळया आईची ओटी भरणं आवश्यक आहे, असं तिला मनोमन वाटू लागलं. क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या नातेवाइकांकडे गेली. आपल्या घरात कर्ता माणूस नसताना, शेताची मशागत करण्यासाठी तिने बैलजोडीची मागणी केली. मनीषावर असलेल्या नातेवाइकांच्या विश्वासामुळे त्यांनी बैलजोडी दिली. त्या मिळालेल्या बैलजोडीचं तिने सोनं केलं. मनीषाने स्वतः बैलजोडी व अवजारं घेऊन औत मारायला सुरुवात केली. जवळपास दोन ते तीन एकर शेत तिने मशागत करून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली. आजूबाजूचे लोक मनीषाच्या कर्तबगारीकडे पाहून तिची पाठ थोपटत होते. शिकलेली मुलगी औत मारत असल्याची चर्चा माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे मनीषा खरात हिची सामाजिक माध्यमांत चर्चा होत आहे. तिच्या जिद्दीची कहाणी नवतरुणांना चेतना देणारी आहे.

कुठून मिळते त्यांना ही ऊर्जा?


आज शेती क्षेत्रात विविध संकटं निर्माण झाली आहेत. त्यातच शेतकरी कर्जमाफीवरून असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असताना माणसारख्या दुष्काळी भागात एक सुखद बातमी येते. आजच्या काळातील मुली शाळा आणि घर यामध्ये बंदिस्त असताना बारावीत शिकत असलेली हुशार मुलगी बैलजोडी घेऊन शेतीची मशागत करते, ही गोष्ट प्रेरणा देऊन जाते. खेडयातल्या या मुलीमध्ये इतकी संवेदनशीलता व ऊर्जा कुठून मिळते, हा एक संशोधनाचा भाग आहे. मनीषा खरातसारखी मुलगी भारतीय कृषी क्षेत्राला ऊर्जा देणारी आहे. तिच्या कर्तबगारीला सलाम तर केलाच पाहिजे, शिवाय कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी मनीषासारख्या मुलींना पाठबळ दिलं पाहिजे.

शेती क्षेत्रातील कर्तबगार महिला

चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली महिला आज विविध क्षेत्रांत झेप घेत आहे. पारंपरिक व्यवसाय असलेल्या कृषी क्षेत्रात महिला क्वचितच उतरत आहेत. मनीषा खरात ही त्यातीलच. त्यांची शेती जरी पारंपरिक असली, तरी पुरेशा पैशाअभावी त्या आधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाहीत. आज महाराष्ट्रात शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कर्तबगार महिला आहेत.

मेहनत, कुटुंबातील सुसूत्रता, मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा ध्यास घेत नगर जिल्ह्यातील महिला शेतकरी मंगल शंिदे यांनी आपल्या 10 गुंठयातील शेतीत रोपवाटिका तयार करून त्या सुमारे साठ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करतात.


चंद्रपूर जिल्ह्यात जागृत महिला समाज ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्रविकास, स्वावलंबन गट, सिंचनव्यवस्था, जीवविविधता आदी क्षेत्रांत प्रयोग करीत आहे. या भागात या शेतकरी महिलांनी जवळपास अकरा महसुली गावांतील शेतकरी महिलांमध्ये आत्मभान निर्माण केलं आहे. यामुळे हजारो महिला शेतकऱ्यांनी कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारून जमीन धारणा, सिंचनाची साधनं, खत, पशुधन, पीकपध्दती, शेतीवर होणारा खर्च व मिळणारं उत्पन्न, तसंच पूरक व्यवसाय या संदर्भात अभ्यास केला आहे. कणकवली तालुक्यातील भातडेवाडी येथील श्री कुर्ली देवी महिला बचत गटाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन गटाच्या महिलांनी भात व नाचणी शेती केली आहे. बचत गटातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गावातील पडीक जमीन भाडयाने घेऊन शेतीत बदल घडवून आणला आहे.

शेतीत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा

आपल्या देशात शेतीकामात महिलांचा 70 ते 80 टक्के सहभाग आहे. नांगरणी, ट्रॅक्टर, बैलजोडी, शेती विकणं, पाणी वळवणं, व्यवहार ही पुरुषांची कामं, तर महिलांची कामं म्हणजे निंदणी, वेचणी, काडी-कचरा, बी-बियाणं लावणं, चारापाणी करणं आणि घरातील कामं करणं. पण आज महिलांनी यात पुढे येणं गरजेचं आहे. आज शेतीतलं संकट हे शेतात काम करणारी महिला समजू शकते आणि तिच्या आवडीनिवडी, कौशल्यावर तिला शेती क्षेत्रातलं ज्ञान आणखी विकसित करता येईल. त्यामुळे महिला शेतकरी शाश्वत शेतीकडे नेणारी एक महत्त्वाची कडी आहे.


''शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास करणार!''


देशाच्या अर्थकारणात एकेकाळी शेतीचा पहिला नंबर लागत होता. देशात हरितक्रांती व श्वेतक्रांती झाली असली, तरी शेतीचा म्हणावा तितका विकास झाला नाही. शेतीची झालेली पीछेहाट काय हे मी समजून घेईन. काळानुरूप शेतीचा विकास करण्यावर माझा व माझ्या कुटुंबीयांचा भर असेल. एक मुलगी म्हणून शेती करण्यात कसलीही लाज वाटत नाही. सध्या मी बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत आहे. पुढे चांगले गुण मिळाल्यास पदवीसाठी शेती व अर्थकारणाचा अभ्यास करणार आहे. सध्या आपल्या राज्यात शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी सरकार वेगवेगळया धोरणांचा विचार करत आहे. सरकारने गरजू व गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.

- मनीषा खरात

माणदेशी शेतकरी कन्या

विकास पांढरे,९९७०४५२७६७


सोमवार, २० मार्च, २०१७

राजस्थानच्या शुष्क वाळवंटातील वृक्षपुरूष...!



ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा जास्त झाडे लावून, तन, मन, आणि धनाने जागविणार्‍या विष्णू लांबा या वृक्षप्रेमी तरूणाच्या कार्याला सलाम ठोकले पाहिजे.
देशात पर्यावरणाबद्दल जागरूकता आलेली आहे.  जसजशी लोकसंख्या वाढत आहे. नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे. त्याबरोबरीने पर्यावरण वाचावे. जंगल नष्ट होऊ नयेत आणि वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी विविध समाज संस्थेकडून
प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात वृक्ष, प्राणी पक्ष्यांचे महत्वाचे स्थान आहे.  पर्यावरणाचा समतोल राखावा,  वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी राजस्थान सारख्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाख झाडे लावून जगण्याचे अतुलनीय कार्य विष्णू लांबा या तरूणाने केले आहे.

 इतकेच नाहीतर तब्बल नऊ लाख झाडे तोडण्यापासून वाचविणारा लांबा हे राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ात वृक्षपुरूष म्हणून ओळखले जात आहेत.
लहानपणी आजूबाजूच्या लोकांनी लावलेली झाडे चोरून आणून आपल्या भागात लावण्यात ते पटाईत होते. एवढेच काय त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या रोपवाटिकेतून झाडे चोरून आणून आपल्या घरी लावली.


 लांबाचे काका यांनी त्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या घरी घेवून गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी चोरी करणे वाईट आहे,  मात्र झाडे लावणे चांगले आहे. असे म्हणत त्यांना काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी त्यांनी सात वर्षे घर सोडले.  पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागले.  समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल,  त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. लांबा यांच्या कार्याचा विषय प्रथम लोकांनी थट्टेवारी नेला.  पण त्यांच्या चांगुलपणाचा आणि निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व कळल्याने,  लांबा यांच्या कार्यास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  हाच लांबा आता राजस्थानच्या शुष्क वाळवंटात पर्यावरणाचा जतन करणारा आणि वृक्षलागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍यासाठी आयकॉन बनला आहे.



 बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,  अजय देवगण,  सुभाष घई, अनुराग कश्यप,  अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.  तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर,  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे,  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लांबा यांच्या कार्याचा गौरव केला आहे.  वृक्षमिञ म्हणून ओळख असलेल्या लांबा यांनी प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना पाच झाडे भेट देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
हुंड्यात मागितली झाडे
लांबा यांच्या भावाच्या लग्नासाठी हुंडा किती घ्यावा यावर चर्चा सुरू होती.  यावेळी लांबा यांच्या वडिलांनी विष्णू आमचा मोठा मुलगा आहे. हुंड्याचं त्यालाच विचारा असे सांगितल्यावर वधूकडील मंडळी अचंबित झाले.  लांबा ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी जातात तिथे वधु वराच्या हस्ते वृक्षारोपण करवतात.  त्यामुळे लांबा हे नाव राजस्थान मध्ये सर्वञ परिचित झाले आहे.

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्च २०१६ रोजी दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख )

..........................................

बुधवार, १ मार्च, २०१७

कहाणी एका ध्येडवेड्या तरुणाची...!



.......स्वामी विवेकानंदजी ने म्हटले  आहे की, ""मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत,आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर  मी हा पूर्ण देश बदलून टाकेन" आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरूण आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपीठ हवं आहे. त्यातील एक ध्येयवेडा तरूण म्हणजे उमाकांत मिटकर. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास परिषदेच्या एकलव्य  व पालावरच्या शाळेला जोडलेला हाडाचा कार्यकर्ता. त्यांचा पालावरच्या झोपडीपासून ते सरकारी खुर्चीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशा या ध्येयवेड्या तरूणाला  महाराष्ट्र सरकारचा  राज्यस्तरीय 'प्रेरणा युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने उमाकांत मिटकर यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत...!

महाराष्ट्रात भटके विमुक्त,पारधी, बहुरुपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 52 जातीं-जमाती. ज्यांची पाळमुळं रुजली आहेत,संस्कृतीच्या गडद-गूढ अंधारात. या अंधारलेल्या  समाजाला प्रकाशात आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेला यमगरवाडी (ता.तुळजापूर) येथील एकलव्य प्रकल्प.

ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी या ‘यमगरवाडी पॅटर्न’चा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि  परिषद या दोन संस्थांच्या आधारे 1993 साली हे कार्य सुरू झाले. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं. यमगरवाडीच्या त्या झोपडीवजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली आज यमगरवाडीत जवळपास चारशे- पाचशे विद्यार्थी आहेत. हे चारशे विद्यार्थी म्हणजे चारशे कहाण्या आहेत,अंगावर शहारे उमटणार्‍या. अशा या माणूसपणाच्या शाळेविषयी प्रत्येकाला लळा लागणे साहजिकच आहे. पण ज्याची संवेदनशीलता अधिक तीव्र आहेत अशीच युवक समाजसेवेत येत असतात.  त्यामध्ये उमाकांत मिटकर मोडतात. नळदुर्गच्या बालघाट शिक्षण संस्थेत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पोटपाण्यासाठी धडपडत यमगरवाडीपर्यंत पोहोचलेला युवक पूर्णपणे वैचारिक दृष्ट्या बदलतो, समाजाच्या प्रश्‍नांविषयी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी विचार करू लागतो, तो युवक म्हणजे उमाकांत मिटकर. साधारण 35 वर्षाचा युवक. आज ते  समाजसेवेतील विविध शिखरे पादाक्रांत करत आहेत. संघटनेने सुरू केलेल्या पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. त्यात उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटके विमुक्तांना शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. अनेक मुलांमध्ये त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिले.

गेल्या दशकापासून  उमाकांत मिटकरांचे काम पाहण्याची संधी मिळत आहे. यमगरवाडीचा एकलव्य प्रकल्प आणि पालावरच्या शाळेचा हा पूर्णवेळ कार्यकर्ता. पालावरच्या शाळेने राज्याला नवा संदेश दिला आहे. यास उमाकांतने घेतलेली मेहनत मी अनुभवलो आहे. M.A,M,ed असलेले उमाकांतआता कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून यमगरवाडी येथे 2002 पासून कामास प्रारंभ केले. यमगरवाडी प्रकल्प,  उमरगा, बीड, किल्लारी या भागामध्ये मसणजोगी वस्तीत राहून समाजसेवेला त्यांनी वाहून घेतले.

त्याचबरोबर किनवट, धर्माबाद, नांदेड भागातील भिल्ल, आंध,कोलाम  समाजावर त्यांनी काम केले या समाजातील जाणिवा, प्रश्‍न यांचा सखोल अभ्यास करून पालावरची शाळा हा अभिनव प्रयोग उदयास आला. त्यासाठी उमाकांत मिटकर यांनी घेतलेली मेहनत खूप महत्वाची आहे. भटका समाज हा शिक्षणापासून पूर्णपणे अंधारात होता. त्यास मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालावरच्या शाळेचा महत्वाचा वाटा आहे. आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 35 समाजांमध्ये 48 पालावरच्या शाळा आहेत. यातून शिक्षण, आरोग्य,आत्मसन्मान, स्वावलंबन अशा गोष्टींवर धडे दिले जातात. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने ही याची दखल घेतली. त्याचबरोबर युनायटेट नेशन्स अ‍ॅन्ड कल्चरल ऑरगयायझेशन (युनिस्को) या संस्थेतर्फे अशिया पॉसिफिक विभागाकडून देण्यात येणारा एज्युकेशन इनोव्हेशन पुरस्कार ही मिळाला आहे.

उमाकांतजी आता येथेच थांबत नाहीत पालावरची शाळा, व्यसनमुक्ती, आरोग्य, बचतगट या कामाबरोबरच त्यांच्यावर आता राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण,महाराष्ट्रा शासन समिती सदस्यपदाची जबाबदारी आली आहे. पोलिस अत्याचार, गुन्हेगार आदी गुंतांगुंतीच्या विषयावर ते सक्षमपणे काम करत आहेत.  सतत ग्राऊंड लेव्हलला काम करणार्‍या या तरुणाला महाराष्ट्र सरकारचा 2014-15 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रेरणा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील 35 वर्षाच्या आतील युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी या पुरस्कार दिला जातो. गेल्या सोळा वर्षा पासून  भटके विमुक्त जाती-जमातींच्या कल्याणासाठी झटत असलेला ध्येयवेडा युवक उमाकांत मिटकर यांना मार्च 2017 च्या चौथ्या आठवड्यात महामहीम राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुंबई विद्यापीठात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख५००००/-,गौरवपत्र,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मिटकर यांना यापूर्वी जिव्हाळा संस्थेचा (पुणे) राज्यस्तरीय समाजरत्न, हरित मित्र परिवार (पुणे)आदर्श नेतृत्व पुरस्कार,  राज्यस्तरीय युवा चेतना पुरस्कार, आदर्श सामाजिक कार्यकर्ता,ऊस्मानाबाद आयकाॕन असे विविध नामंकित पुरस्कार मिळाले आहेत. अशा या ध्येयवेडा तरूणाला सलाम..!

विकास पांढरे,सोलापूर

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...