शनिवार, २१ एप्रिल, २०१८

कृत्रिम पावसाचा 'आधार'


                   
परवा, कृत्रिम पावसा संदर्भात सकारात्मक बातमी वाचण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने सोलापूर येथे कृत्रिम  पावसाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी येत्या जून महिन्यापासून या प्रयोगाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना याचा फायदा होणार आहे. सरकारने उचलले हे एक चांगले पाऊल आहे.

सोलापूर हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा जिल्हा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीशी सामना करतोय, अशी परिस्थिती सांगोला,मंगळवेढा, अक्कलकोट आणि दक्षिण व उत्तर,बार्शी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात असते. उर्वरित तालुके उजनी धरणामुळे हरित झाले आहेत. बाराही महिने, दुष्काळ असो वा सुकाळ इथे हिरवीगार ऊसाचे मळे दिसून येतात. सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहेत.
शेती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यात कोरडवाहू रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र व हवामान विभाग कार्यरत आहे. आता कृत्रिम पावसाचा प्रायोगिक प्रकल्प सुरु होतोय. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पाचा शेजारील उस्मानाबाद आणि लातूर या मराठवाड्यातील दोन जिल्ह्याला कितपत फायदा होणार आहे ? हे पाहणे आवश्यक आहे.

राज्यात आघाडी सरकारच्या काळात (सन २००३)साली कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग  'प्रकल्प वर्षा'या नावाने १५ सप्टेंबर ते १४ डिसेंबर २००३या कालवधीत राबविला गेला. या प्रयोगात सोलापूर, अहमदनगर, बीड,उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. आपल्या देशात १९५७ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यास सुरूवात झाली. उत्तर प्रदेशातील रिहाद जलाशय परिसरात असा कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग पहिल्यांदा झाला. त्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, राजस्थानसारख्या राज्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग केला. चीन,उत्तर अमेरिका, कुवैत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इस्त्रायल आदी जगभरातील ५०हून अधिक देशात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

आजपर्यंत कोणताच देशाला या प्रयोगामुळे दुष्काळावर मात होता आले नाही. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी असा प्रयोग निश्चितच फायदेशीर आहे पण यामध्ये काही अडथळे आहेत. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी ज्या परिसरात पावसाची गरज आहे. त्या परिसरावर पावसाचे ढग दाटून आले पाहिजेत. विशेष म्हणजे ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी, ढगापर्यंत पोहचण्यासाठी राँकेटची मदत घेतली जाते. रसायनाचे ढगात बीजारोपण केला असता, बाष्पाचे प्रमाण अल्प असेल तर त्या परिसरात पाऊस पडू शकत नाही. हा प्रयोग अयशस्वी होण्यामागचा महत्त्वाचा मुख्य अडथळा आहे.

डॉ. राजा मराठे या अभियंत्याने आठ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील सुललेगाव येथे कृत्रिम पावसावर प्रयोग केले. दहा प्रयोगात नऊ वेळा पाऊस झाल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी 'वरुण यंत्र'विकसित केले आहे.

दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. ती मैदानावर ठेवली जाते. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो,असे यंत्राचे स्वरूप आहे.

वरूण यंत्र

या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे,अशी कृती केल्यास तासभरात पाऊस पडायला सुरूवात होते,असा दावा डॉ. मराठे यांनी काही वर्षापूर्वी केला होता. हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आह,असेही त्यांचे म्हणणे होते. म्हणजेच हे वरूण यंत्र देखील कृत्रिम पावसाच्या यंत्रासारखे आहे.

केवळ कृत्रिम पावसावर विसंबून चालेल का?

पाणी अडवणे, साठवणे, जिरवणे, जपून व काटेकोरपणे वापरणे आणि छोटे व मोठे बंधारे, बांधबंदिस्ती, राखीव वन्यक्षेत्रे, राखीव कुरणे, कुर्‍हाडबंदी-चराईबंदी, तळी-तलाव अशा सूक्ष्म प्रयत्नातून दुष्काळावर मात करता येते, हे आपण पाहिलो आहे. जोपर्यंत दुष्काळ भागात वनसंपदा वाढत नाही तोपर्यंत पावसाचे प्रमाण कमी अधिक असणार आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळापासून आपल्या देशात दुष्काळाची समस्या आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येत असतात.पावसाचा प्रत्येक थेंब किती महत्त्वाचा असतो याची जाणीव दुष्काळग्रस्तांना असते. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी 'कृत्रिम' विचार करून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत  'आधार' शोधावा लागणार आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७

शनिवार, १७ मार्च, २०१८

एका जिद्दीची कहाणी



नवरा अपंग तर बायको अंध तरीही या दोघांचा संसार सुखाचा आहे. कुणाचा आधार नाही, ना कुणाचे कर्ज स्वत:चा विकास स्वतः करणे यातच खरा पुरूषार्थ आहे, असं प्रमाण मानून सोलापूरच्या पूर्व भागात अंध आणि अपंग दाम्पत्य काळ्या बाहुल्या तयार करून त्यावर गुजराण करणारे चित्र दृष्टीक्षेपास पडते.

या दाम्पत्याची शहरात कुठे मालकीची जागा नाही ना हक्काचे घर नाही. घर नाही म्हणून सारं जीवनच असुरक्षित, अशा असुरक्षित आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या या अंध अपंग दांम्पत्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाचाही आधार न घेता गेल्या २५ वर्षापासून काळया बाहुल्या तयार करून त्यावर पोट भरतायेत.
महागाईमुळे त्यांच्या जगण्याची परवड होतीय. ही कहानी आहे दोन्ही पायाने अपंग असलेल्या फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई यांची.

फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील पद्मनगरच्या वळणार एक पाल आहे. या पालीत फुलचंद जाधव आणि मंगलाबाई गेल्या पंचवीस वर्षापासून राहतात. आज फुलचंदचे वय ६५ हून अधिक झालंय तर मंगलाबाई साधारण ५८ वर्षांच्या असतील. त्या पालीमध्ये या दोघांनी आपला छोटासा संसार मांडलाय. फुलचंद मुळचे अकलूजचे. दोन्ही पायाने अपंग आहेत. लहानाचे मोठे अकलूज मध्ये झाले. फुलचंद याचे वय वाढलें तसे कुटुंबाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. फुलचंद यांच्यातील जगण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. निराशेला न डगमगता ते १९७२ साली सोलापूर शहरात आले. छोटे मोठे काम करू लागले. मिळणाऱ्या पैशातून पोट भरणे ही मुश्कील होते.

काही दिवस भीक मागून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला पण भीक मागणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले. स्वत: काही तरी कला शिकल्या शिवाय जगण्याला आकार येणार नाही म्हणून काळया बाहुल्या बनविणे, पिंजरे, झाडू, गंगावण अशा वस्तू तयार करू लागले. त्यातून दोन पैसे मिळू लागले.त्यांचा स्वाभिमान आणखीन ज्वलंत होऊ लागला. यातून आपण स्वावलंबी जीवन जगू शकतो याचा अभिमान वाटू लागला.
या दरम्यान दोन्ही डोळयांनी अंध असलेली मंगला खंदारे नावाची युवती भेटली. तेही जगण्यासाठी धडपडत करत होती. दोघांची चांगली ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले पुढे या दोघांनी विवाह केला. यातून या दोघांच्या आयुष्याचा संसार सुरू झाला.

काळ्या बाहुल्या करताना फुलचंद व मंगलाबाई

छोट्याशा व्यवसायातून दोघांचे पोट भरणे कठीण झाले अनेक वेळा त्यांना उपाशी राहावे लागले. मंगला ही तशी तेलूगू भाषिक तर फुलचंद मराठी.
त्यामुळे या दोघांना संवाद साधताना अडचण यायची. पुढे ते एकमेकांच्या भाषा बोलू लागले. शब्दांचा, भाषेचा नवा सूर जुळून आला.

या दोघांनी काळया बाहुल्यांचा व्यवसाय नेटाने उभा केला. संसाराला आकार येऊ लागला. मंगलाबाईची उद्योगजकता स्वस्थ बसू देत नव्हती. तिने बांगडयांचा व्यवसाय सुरू केला.पण समाजातील महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्याने, या व्यवसायावर पाणी फिरले. मंगलाबाईने जिद्द न हरता, आपल्या पतीला साथ देत आजही काळया बाहुल्या बनविण्यासाठी मदत करतायेत. या दोघांची कमाईतून ८० ते १०० रूपये मिळतात.

आमवस्या आणि पौर्णिमेला थोडी जास्त कमाई होते. पण रेशन, घासलेट आणि औषध पाण्यामुळे जगण्यात आनंद वाटत नाही, त्यातही ना हक्काचे घर आहे ना जागा, स्वयंजरोजगार करावा यासाठी जवळ शिधापत्रिका आहे ना शिक्षण. पोटासाठी रोज मर मर मरायचे,कधी गिऱ्हाईक नाही आले तर अर्धपोटी उपाशी रहावे लागते. बाहुल्या बनविण्यासाठी रबर, दोरा, खिळा, लिंबू आदी वस्तू विकत घेताना नाकी नऊ होते,असे ते म्हणतात.

"कलेवर पोट भरणे अवघड होत आहे. त्यातच महागाईमुळे आज अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. त्यामुळे सध्या आम्हाला शासनाची मदतीचे गरज आहे. आमच्या व्यवसायाला अधिक हातभार लावण्यासाठी बँकानी आर्थिक सहाय्य करून, आमची परवड थांबवावी" असे, फुलचंद जाधव आणि त्यांच्या पत्नी मंगलाबाई सांगतात.

या दांम्पत्यांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करायचा आहे पण कोणतीही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे कुठलीच तारण नसल्यामुळे बँकाचा आशिर्वाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. समाजात स्थान नाही, गावात वा शहरात हक्काची जागा नाही, शहराशिवाय अस्तित्व नाही, त्यामुळे सतत भाकरीचा चंद्र शोधण्यसाठी या अंध अपंग दांम्पत्याची परवड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काळया बाहुल्या विकून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबाची कहानी प्रेरणादायी आहे.

शहरी असो वा ग्रामीण याठिकाणी अपंग नजरेस पडत असतात. काही अपंग शिक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळत नाही ना पगार. काहीजण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपंगात्वावर मात करून, स्वावलंबी बनत आहेत. पण त्यांना स्थिरता देण्यासाठी बँकेकडून काहीच मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( साभार :अपंग सहायता दिनानिमित्त १६ मार्च २०१६ रोजी तरूण भारत,सोलापूर मध्ये मी लिहिलेला हा लेख आहे)

गुरुवार, १५ मार्च, २०१८

गावकडचा माणूस



पोटासाठी माणसाला मजल दरमजल करताना, माणूस आपल्या गावापासून, माणसापासून दूर जातो, तिथली माती, तिथली माणसं आणि तिथल्या खुणावणाऱ्या गोष्टी विषयी एक आत्मियता बाळगत असतो.
गावाकडचं पाखरू जरी भेटले तरी जितका आनंद होतो,तितका आनंद शब्दांत शब्द व्यक्त करता येत नाही. माणूसच माणसाला खेचत असतो. इतकी गावकडच्या माणसात ताकद असते. मग तो आपल्या जातीचा असो वा कोणत्या धर्माचा अन् कोणत्या रंगाचा आहे. ही सर्व विशेषणे गळून पडतात, त्यातला आपलेपणा आणि सच्चेपणा हा मातीशी घट्ट नाते निर्माण करत असतो.
आज माझ्या मातीतल्या,माझ्या गावाच्या माणसाशी नाते अधिक घट्ट झाले. ध्यानीमनी नसताना, हा आलोवा निर्माण झाला तो व्यक्ती म्हणजे शंकरराव दुपारगुडे(मूळ गाव अणदूर ता.तुळजापूर).ते दैनिक 'प्रभात'साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी म्हणून चार वर्षापासून काम पाहतात. कोपरगाव मध्ये त्यांचे गेल्या दहा वर्षापासून वास्तव्य आहे.कोपरगाव तालुक्यात स्थानिक सी न्युज वाहिनी सुरू करण्यात सिंहाचा वाटा आहे.
आज दिवसभर कोपरगाव शहरात काही महनीय व्यक्तींच्या भेटीसाठी फिरत असताना अचानक शंकररावांचा फोन आला. त्यांना पाहताच या अनोळखी शहरात आपले तरी कोणी आहे याची जाणीव झाली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
शंकररावांनी दुपारच्या सुमाराला अस्सल कोपरगावी भोजनाचा बेत रचला आणि सुरू झाल्या गप्पा. गावमाती,शेती आणि माणसांवर भरभरून बोललो.
शंकररावांनी, तालुक्याच्या ठिकाणी राहून सुसज्ज दैनिक प्रभात आणि सी न्युज चँनलचे कार्यालय निर्माण केले आहे.
गावकडे असताना दुसऱ्याच्या शेतात पडेल ते काम करणाऱ्या शंकररावांनी अचंबित असे काम केले आहे. या शहरात कसलीही पार्श्वभूमी नसताना, कोणीही नातेवाईक वा जवळची माणसे नसताना त्यांनी आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
शेवटी कोपरगावचे ऐतिहासिक आणि महत्त्व सांगितले. तपस्वी शुक्राचार्य यांना 'संजीवनी'विद्या ज्या ठिकाणी प्राप्त झाली ते ठिकाण म्हणजे कोपरगाव. कच आणि देवयानी यांचे हे ठिकाण. कच यांनी संजीवनी विद्या प्राप्त ठिकाणी ही हेच शहर. हे ऐकून आणि स्थळे पाहून आवाक झालो.


शेवटी रघोबादादांना ज्या वाड्यात कैद करून ठेवण्यात आले होते तो वाडा ही याच शहरात आहे. पुरातत्व खात्याने डागडुजी जे काम हाती घेतल्याने वाड्यात प्रवेश बंदी आहे. 'ध'च 'मा' हा शब्द ही इथेच रूढ झाला. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी, कोपरगावच्या वाड्यात असताना आनंदीबाईने एका माणसाला पकडून माझ्यासमोर पकडून हजर करण्याचा आदेश सैनिकाला दिला होता,तेव्हा सैनिकांनी त्या माणसाला पकडून आणण्या ऐवजी मारुन टाकले. त्यामुळे 'ध'चा 'मा' झाला. असा शब्द इथून रूढ झाला,अशी माहिती शंकररावांनी दिली.
गावाकडच्या माणसांकडून केवळ भोजन मिळाले नाही तर इथल्या सांस्कृतिक,ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पाऊलखुणाचे दर्शन झाले. त्यामुळे आजचा दिन अधिक सार्थकी लागला.
© विकास पांढरे
स्थळ: कोपरगाव जि.अहमदनगर
१३ मार्च २०१८

बुधवार, ७ मार्च, २०१८

तिची कहाणी


रोजच्या जगण्यातून, ओळखीचा,अनोखेळीचा रास्ता पार करताना मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली,अफाट संघर्ष करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या आयाबाया भेटल्या, विशेष,स्वतःची बुध्दी व ऊर्जा समाज हितासाठी वापरणाऱ्या सुजाण महिलांही नजरेस पडल्या. या प्रत्येक महिलांची एक स्वतंत्र अशी कहाणी आहे, गाथा आहे. ही गाथा विस्ताराने मांडणे आवश्यक आहे. पण आज फक्त या आयाबायांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करेन. या आयाबाया स्वतः तर मोठे कार्य घडवतातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.

दीड एक वर्षापूर्वी मयुरी खैरे ही तरूणी भेटली. गंभीर आजाराला तोंड देत असतानाही सकारात्मक दृष्टीने आनंदी आयुष्य जगणारी आणि मध्य प्रदेशात शिंपल्याची यशस्वी शेती करणाऱ्या मयुरीने भुरळ घातली. मयुरीची कहाणी संघर्षशील आहे.

बुलढाणा जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात मयुरीचा जन्म झाला. अकरावीत असताना तिला किडनीच्या दुर्दम्य आजारांनी ग्रासले.ऐन उमेदीचे चार पाच वर्षे आजारपणात निघून गेली.  आजारपणात तिने काँलेलजा न जाता पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात मयुरीने अनेक महनीय व्यक्तीचे चरित्रे वाचून काढली. समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने तिच्यातली ऊर्जा बाहेर पडली,आणि दिशाच बदलली.

पदवी नंतर ती आजारपणाला विसरून गेली. पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जाऊ लागली. इथेच तिला समविचारी मित्रांची ओळख झाली. या तरुणांनी ऊर्मी नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. ही संस्था समाजाच्या हितासाठी काम करु लागली. एकदिवशी तिच्या वाचनात 'मोत्याची शेती' हा लेख आला. या लेखाने ती झपाटून गेली. तिच्या घरी शेती नव्हती,शेतीबद्दल तिला फारसे काही माहिती ही नव्हते. तरीही तिने ही नवी वाट धरली.

एक ते दीड वर्षाच्या रिसर्च  नंतर तिने मध्य प्रदेश मधील नर्मदा नदीच्या काठी मोत्यांची शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी शुभम पाटीदार युवकाने मोलाची साथ दिली.


मयुरी सांगत होती, "आम्ही, आता पर्यंत एक मोत्याच पिक यशस्वीरित्या काढलं आहे. बाजारात डिझायनर मोत्यांची प्रति नग सरासरी किंमत २५०-३०० रुपये आहे. आमचा आज पर्यंतचा खर्च वजा करता चागल्या प्रकारे प्रॉफिट राहिल आहे. अगदी काही हजारांच्या भांडवलावर सुरु होणारी ही मोत्यांची शेती लाखोच्या घरात प्रॉफिट कामवून देते.

मार्गदर्शन करताना मयुरी खरे


त्यामुळे "low investment and high profit चा हा bussiness" आहे असं म्हणायला हरकत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी हा आमचा प्रयत्न आहे."

शिंपल्याची शेती उद्योग

सध्या हा प्रोजेक्ट मध्य-प्रदेश आणि गुजरात मध्ये सुरु आहेत. लवकरच महाराष्ट्रात हा प्रोजेक्ट सुरु करण्याचा तिचा मानस आहे.

इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूमची कहाणी तर अफलातून आहे.  दोन वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. नवऱ्याने सोडून दिलेली बायको म्हणून समाजाकडून मिळालेली अवहेलना पाहून त्या अस्वस्थ व्हायच्या.

भय,भीती,भोग, बाईपण तिने सर्व सोसले, यातनेतून तिला सूर गवसला. न डगमगता, समाजाची तमा न बाळगता त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या. रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना करून अनेक परित्यक्ता, घटस्फोटित, पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

मोर्चाचे नेतृत्व करताना दिव्या मगदूम

"आईबापाची परिस्थिती हालाखीची.नीट शाळा ही शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं.तव्हा १४ वर्षाची असेन. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाचं काय माझं नशीबचं फुटकं. नवऱ्याकडून चांगली वागणूक कधीच मिळाली नाही. तीन-चार महिन्याचे गरोदर होते तव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आईबापाचं अस्सं..कुठं जायचं ठरवलं तर जवळ पैसे नव्हते. कधी कधी जीव देऊन मरुन जावं,असं वाटायचं. पोटात गोळा होता.त्याला वाढवयाचं ठरवलं. 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांची नजर ही वाईट असायची. न डगमगता पुढे जात राहिले, सूर गवसला, विस्कटलेली घडी सावरू लागली. बचत गटाची कामे करू लागली. पैसे मिळत गेले, बचत होत गेली. माणसे भेटत गेली. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला आहेत, त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले, तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. पीडित महिलांचा मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. १३०० बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केले आहे. २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला आहे. निराधार महिलांसाठी 'जिव्हाळा' आश्रमाची निर्मिती करण्यात आली असं दिव्या मगदूम यांनी सांगितले.

पुरस्कार स्विकारताना दिव्या मगदूम


रणरागिणी क्रांती सेनेचे काम १३ जिल्ह्यात चालते. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी हक्कांचे व्यासपीठ बनले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्या हस्ते त्यांना महिलेचा पुरस्कार मिळाला आहे.

अमरावती (मोर्शी) येथील महिला पत्रकार संगीता ढोके यांची यशोगाथा प्रेरणा देणारी आहे. पाच वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. त्या 'हिंदुस्थान समाचार' ला महिला रिपोर्टर काम करत होत्या.

 पत्रकारितेत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आणि मानधनावर ती समाधानी नव्हती. पत्रकारितेवर कुटुंबांचा सांभाळ होऊ शकत नाही, ही जाणीव तिच्यात निर्माण झाली. मुक्त पत्रकारिता करत करत ती शेळीपालन व्यवसायाकडे वळली. ही नवीन वाट पार करताना खडतर सामना करावा लागला. शिकली-सवरलेली मुलगी शेळीपालन करत असल्याचे पाहून त्यांना बघून आजूबाजूच्या बाया हसायच्या. संगीताने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या हिंमतीने शंभर शेळ्यांचा शेड उभा केला अन्  व्यवसायाला कलाटणी मिळाली. आज त्यांचा व्यवसाय अर्ध्या कोटीत गेला आहे.निव्वळ नफा म्हणून वर्षाला ती २० ते २५ लाख रूपये मिळवत आहेत.
संगीता ढोके

"पत्रकारिता सोडून शेळी व्यवसायाचा मार्ग पत्कारले तेव्हा आजूबाजूचे लोक नावं ठेवू लागली. घरातला पाठिंबा असल्यामुळे सर्व गोष्टीवर मात करत गेले. अमरावती, यवतमाळ, पुसद,नागपूर, वर्धा येथील जनावर बाजारात मी सारखी दिसू लागली तेव्हा व्यापारी लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघत. काही लोक धंद्यात फसवणूक करत. जनावर बाजारात एकटी बाई काय करत आहे हे पाहून बायामाणसं ठकमक बघत. या व्यवसायात मी समाधानी असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसायात उतरावे, यासाठी मी प्रयत्न करत आहे." असं संगीता ढोके यांनी सांगितले.

आटपाडी, बार्शी, अहमदनगर, नांदेड, वाशीम आदी ठिकाणी ती शेळ्या विकण्यासाठी आणि घेण्यासाठी येत असते. संगीता हिच्या कामाची दखल घेऊन विविध संस्थेकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

औरंगाबादची सविता काळे यांची ह्दयद्रावक कहाणी आहे. त्यांचा जालना शहरातल्या एका घरंदाज कुटुंबात झाला. पाच वर्षापूर्वी यांची ओळख झाली.

सविता काळे

तिला एक भाऊ व तीन बहिणी आहेत. सविता ही शेवटची मुलगी. घरचा डोलारा सांभाळण्यासाठी  आजी -आजोबांना मुलगा हवा होता. पण त्यांच्या आईला मुलगाच होत नव्हता. सवितांच्या आजी आजोबांनी अनेक मुली जिवंत पुरल्या आहेत. हा भोग सविता हिच्या वाट्याला आला. पण तिच्या भावाने त्यांना वाचवले. सविता जन्माला आल्या त्यादिवशी, प्रसुत आई झोपेत असताना घरातल्या मोठ्या लोकांनी ( वडील सहभागी नव्हते) तिला कापडात गुंडाळून दूर खड्ड्यात पुरत असताना तिच्या मोठ्या भावाने आरडाओरडा करून त्यांना वाचवले. सवितांच्या मोठ्या भावाला समज आली होती, आजपर्यंत आपल्या एक दोन बहिणी आपल्याच लोकांनी पुरल्या आहेत याची जाणीव त्याला झाली होती. आता आपली जन्माला आलेली बहिण मारू द्यायची अशी हिंमत बाळगली. त्यामुळे सविता त्या दुर्देवी प्रसंगातून वाचल्या नसत्या तर आज एका नामांकित वसतिगृहाची अधिक्षका झाल्या नसत्या.

आई समवेत सविता काळे


"आज मी ज्या ठिकाणी आहे, समाधानी आहे. यामध्ये माझ्या भावाचा मोठा वाटा आहे. भावामुळेच मी वाचू शकले. आपल्या समाजात मुलींना किती दुय्यम स्थान आहे. हे माझ्या बालपणीच्या कटू प्रसंगातून लक्षात येते. आजही आपल्या समाजात मुलींचा जन्म झाला की, तिचा बळी दिला जातो.
दहावीत असताना माझं लग्न झाले. वडिलांचे अकाली छत्र हरपल्याने मला प्रेम मिळाले नाही. पण माझ्या भावाने मला कधीच काही कमी केले नाही. मला मरणाच्या दांडेतून वाचवले,तो माझ्यासाठी देवच होता.देवानेही त्याला लवकर वर बलावले. आज तो असता तर खूप आनंदी झाला असता."अशी सविता आपली आपबीती सांगत होत्या.

सविता या संवेदनशील व्यक्तीमत्व असून, तिने अकाली निधन पावलेल्या भावाच्या मुलांचे संगोपन करून लग्न लावून दिले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

अँड. विंदा यांनी सावित्रीबाई विद्यापीठ, पुणे येथून एल.एल.एम चे शिक्षण पूर्ण केले आहे. स्वतः उच्चशिक्षित असूनही ती आदिवासी महिलांसाठी काम करत आहे. दोन वर्षांपासून तिच्या संपर्कात आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कोलाम व पानशेत भागातील कातकरी या दोन आदिवासी जमातातील महिलांचे प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

                                                 आदिवासी महिला समवेत अँड.विंदा
  • या महिलांच्या समस्येचा मूळापासून शोध घेण्यासाठी त्या किनवट,पानशेत व इतर आदिवासी भागात फिरत असतात. पानशेत भागातील कातकरी समाजाला जमीन उपलब्ध करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत.
"माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये महत्त्वाचा संबंध आहे. आदिवासी बांधवांचा निसर्गाशी अधिक नातं आहे. तो जंगलात जन्मतो आणि जंगलातच मरतो. या समूहाचा बाह्य जगाशी संबंध आला नाही, म्हणून तो मागे आहे. आज जंगलतोड वाढत आहे. माणूस आणि निसर्गाचे अंतर कमी झाले आहे. आदिवासी बांधवांचे जगण्याची उमेद आपण हिरावून घेतलो आहे. या समाजाच्या विकासासाठी हातभार लागला पाहिजे, या मानवी भावनेतून या समाजाशी माझे नाते निर्माण झाले आहे."असे विंदा यांनी सांगितले.
अँड. विंदाचा अनेक समाज संस्थाशी परिचय आहे. त्यातून त्या संशोधन करत आहेत.

मुंबईत आल्यावर वैदू समाजातील  दुर्गा गुडिले या तरूणीची ओळख झाली. वैदू समाजातील जातपंचायतीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वर्षभरापूर्वी दुर्गाने बंड पुकारला होता. ठरलेला बालविवाह मोडीत काढून तिने पंचाचा फतवा धुडकावून लावला होता. दुर्गा मुंबईत राहणाऱ्या वैदू समाजासाठी काम करत आहे.

विदेशी नागरिकांनी वैदू वस्तीला भेट दिली

समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी झटत आहे. जनजागृती करत आहे. समाजातील ११२ शाळा बाह्य मुलांना मुख्य प्रवाहात तिने आणले आहे. बचतगटाच्या माध्यमातून ५८ महिलांना एकत्र आणून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. रात्रीच्या वेळी ती प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवते. स्विझरलँड येथील नागरिकांकडून वैदू समाजातील काही मुलांना शैक्षणिक मदत मिळाली आहे.
                                                       पुरस्कार स्विकारताना दुर्गा
दुर्गा हिच्या कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मानाचा रुक्मिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नागपूरचे महिला क्राईम रिपोर्टर नीता सोनवणे हिचे कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. महाविद्यालयात असताना तिने हे क्षेत्र निवडले. दहा पंधरा वर्षापूर्वी फिल्डवर जाऊन पत्रकारिता करणाऱ्या महिला निगैण्य असायच्या. क्राईम पत्रकारितेमध्ये महिलांना संधी नसायची. नीताने सर्व आव्हाने स्विकारून आपली पत्रकारिता यशस्वी करून दाखवली. उपराजधानी नागपुरात ती एकमेव महिला क्राईम रिपोर्टर असावी. कायद्याचा प्रचंड अभ्यास, प्रचंड जनसंपर्क, अधिकाऱ्यांशी,आरोपींशी संवाद साधण्याची शैली लाजवाब आहे. तिचे ओळख पाच सहा वर्षापूर्वी झाली.

                                                              नीता सोनवणे
दक्षता, पोलीस टाइम्स आणि कालीगंगा सारख्या नामांकित दैनिक व साप्ताहिकात तिच्या गुन्हेगारी जगताविषयीच्या स्टोऱ्या प्रसिद्ध होत असतात.
क्राईम जगतात महिला पत्रकार म्हणून नाव कमावलेल्या नीताने आपली संवेदनशीलता जपत अनेक पिडीत महिला व पुरूषांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्टीग करत असते. लोकांना कायदा म्हणजे काय? कलमे, पोलीस ठाण्याचा संपर्क, अशी माहिती मिळावी म्हणून तिने एक पुस्तक लिहिले आहे.

  .                                                 पुस्तक प्रकाशन करताना नीता व इतर
या सर्व महिलांना आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले. कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या कर्तुत्ववान महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सलाम..!

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
Vikaspandhare3@gmail.com

शनिवार, ३ मार्च, २०१८

होळी आणि कृषी संस्कृती



होळी हा सण जसा पौराणिक कथेशी निगडीत आहे तसाच कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. आमच्या मराठवाड्यात होळीला 'शिमगा' म्हणतात.   दिवशी कुणब्याच्या घरी  'मायर्‍हाणी' असते. कुणबी म्हणजे शेतकरी. 'मायर्‍हाणी' म्हणजे काळी आई. सुवासिनीची ओटी भरली जाते म्हणून तिला 'मायर्‍हाणी'म्हणतात.

शेतातून निघालेल्या धान्याची पुजा केली जाते आणि शिमग्याच्या दिवशी चुलीवर गहू भाजून , हा गहू जात्यावर भरडला जातो. गुळ आणि गहू यांचे मिश्रण केले (मराठवाड्यात याला साझुरा म्हणतात) जाते. या साझुऱ्याची पोळी केली जाते. मराठवाडा व सोलापूर भागात या पोळीला 'ठेलची'म्हणतात.

होळीला या ठेलचीचे  नैवेद्य दाखवून पुजा केली जाते. त्यानंतर होळीला अग्नि दिला जातो. होळीतील गवरीच्या राखेवर खोबरे भाजून खाण्याची पध्दत आहे. शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपतात. थंडीपासून रक्षण व्हावे, हा यामागील हेतू आहे. 'वेळ अमावस्येला' गावात आलेली थंडी शिमग्यापासून संपते. 

यातील आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, गावातील नागरिक आपले शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणापासून जपत आलोय. शहरात आल्यानंतर मला या गोष्टीचा आनंद घेता आला नाही.


होळीचा सण संपला की, गावशिवारात ज्वारीच्या काढणीला वेग येतो. याकाळात थंडी ही दूर झालेली असते. पहाटेच्या वेळी शेतकरी बांधव आपल्या शेतात जाऊन ज्वारीची पात धरतो. सगळे शिवार शेतकऱ्यांनी फुलून गेलेले असते. ज्वारीची काढणी अगोदर मराठवाडा व बार्शी परिसरात 'डाव्हारा' करण्याची जुनी पध्दत आहे. डाव्हारा म्हणजे 'पशुबळी' देणे.  'ईडापिडा टाळो' म्हणून ही पध्दत आहे. काळाच्या आघोत ही प्रथा बंद पडत आहे. यामुळे अंधश्रद्धा दूर झाली आहे, असं म्हणता येईल

होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी आता सारखे रंगबेरंगी रंग नव्हते. त्यामुळे शिवारात बहरलेल्या पळसाच्या पानांचा रस एकत्र करून रंग तयार केला जायचा. हा रंग नैसर्गिक रंग असल्याने शरीरामध्ये शितलता निर्माण होते. शेतकरी बांधव दोन दिवस अगोदर पळसाच्या पाने तोडून, उखळात काढून रंग तयार करायचे.

धुलिवंदन आणि गावोगावच्या परंपरा

धुलिवंदन म्हणजे रंगाचा उत्सव. या उत्सवाचे आपल्या महाराष्ट्रातील काही गावामध्ये आगळेवेगळे वैशिष्ट आपणांस पहावयास मिळते. गावगाड्यातील चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यानुसार धुलिवंदन साजरी करण्याची परंपरा लाभली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयांचीची गाढवावरून मिरवणुक काढण्याची ७५ वर्षाची परंपरा आहे. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख आहे.


 वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांपासून जावयांचीची धिंड काढण्याची आगळवेगळी परंपरा आहे.


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांपासून जावयाची धिंड काढण्याची आगळवेगळी परंपरा आहे. 'धुलिवंदन ते रंगपंचमी' अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून वाजत गाजत धिंड काढली जाते.

अशीच परंपरा बारगाव नांदर ( ता.राहुरी जि.नगर) सुरु होती. या गावात अनेक वर्षांपासून जावयांची धिंड काढण्याची परंपरा होती. आजची सामाजिक व व्यक्तिगत जीवनमूल्ये बदलल्यामुळे ही प्रथा खंडित झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील 'भोयरे' गावात एकमेकांना दगड मारून रक्ताची धुळवड साजरी करण्याची अघोरी परंपरा आहे. यादिवशी दिवसभर गावातील तरुण दगड,गोटे गोळा करतात व संध्याकाळी एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो व दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडांचा वर्षाव करून रक्तरंजित धुळवड साजरी करतात. ग्रामदैवत आई तुळजाभवानी मातेला आनंदी ठेवण्यासाठी ही परंपरा सुरु आहे.



 भोयरे गावात एकमेकांना दगड मारून रक्ताची धुळवड साजरी करण्याची अघोरी परंपरा आहे. 


सोलापूर शहरात रजपूत समाजाच्यावतीने धुळवडीनिमित्त रंगगाड्याची मिरवणुक काढण्याची अडीचशे वर्षापासून परंपरा आहे. बैलगाड्यांवर रंगाचे पिंप ठेवून रस्त्याच्या दुतर्फा रंग उडवण्याची ही प्रथा आहे

कोकणातील 'पिरकोन' या गावात धुलिवंदनाच्या दिवशी तळा मारण्याची प्रथा आहे. गावकऱ्यांना एकत्र करुन मत्स्योत्सव साजरी करणे म्हणजे तळा मारणे. तळा म्हणजे तलाव.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गाव धुळवडीनिमित्त पाटलांच्या मांडांवर शिमग्याचा खेळ करण्याची प्रथा आहे. हाहा पाच, सात, नऊ दिवस चालतो.
गुहागर - चिपळूण मार्गावरील उमराठ या गावात शिमगोत्सवात ग्रामदेवतांची रूपे श्री नवलाई मंदिरात लावली जातात. त्यानंतर पालखी सहाणेवर आणली जाते. पौर्णिमा व प्रतिपदा यामधील काळाला 'भद्रा' म्हणतात. त्यावेळी होम होतो. होमाची विभूती धुलिवंदनाच्या दिवशी ढोलाच्या तालावर गावात घरोघर फिरते. त्यानंतर भराडा भेटीचा कार्यक्रम रंगतो.
नंदुरबार, यवतमाळ, अमरावती,नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधव होळी सण मोठ्या भक्तिभावात साजरा करतात.

घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले आदिवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाला भूरळ घालतात.

बंजारा समाजातही धुळवड साजरी करण्याची मोठी परंपरा आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रंगाविना धुलिवंदन साजरे करणारे गाव म्हणून वर्धा जिल्ह्यातील 'सुरगाव' या गावाची ओळख आहे. गेल्या दोन दशकांपासून या गावाने आपली आदर्शवत परंपरा जोपासली आहे.
नाथपंथांमधील प्रमुख नाथ असलेले कानिफनाथ महाराज यांच्या मढी (जि.नगर) येथे शिमगोत्सवात यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भटक्या जमातीच्या 'जातपंचायती' येथे भरतात.
एकूणच शिमगा हा सण विविध अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण कसा आहे याचे दर्शन होते, हेच भारतीय संस्कृतीचे आगळेवेगळे रूप आहे.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

धनगराचे पारंपरिक विज्ञान





गोष्ट तशी जुनी आणि मौखिक आहे. महाबळेश्वरच्या थंडीच गुपितं उलघडण्यासाठी काही इंग्रज अधिकारी या भागात आले होते. तापमानाच्या नोंदी घेऊन अधिकारी त्या घनदाट जंगलात वेधशाळा कुठे स्थापित करायची यासाठी चाचपणी करत होते.

या जंगलात एक धनगर आपल्या मेंढ्या चारत होता. काही क्षणात पाऊस पडणार म्हणून तो धनगर आपल्या मेंढ्या घेऊन घराकडे निघाला. इंग्रजाने त्या धनगराला हटकले. "अरे, एवढ्या लवकर मेंढ्या घेऊन घराकडे का निघतोय?"यावर त्या धनगराने दिलेले उत्तर आजही चक्रावून टाकणारे आहे.

धनगर म्हणतो-"साहेब, घराकडे चला,आता जोराचा पाऊस पडणार आहे"

"तुला,कसं माहीत आता पाऊस पडणार? असं त्या इंग्रजांने धनगराला विचारले.

धनगर म्हणाल्या, "साहेब, माझी मेंढरं जमिनीच्या वासावरून, भवताल लक्षात घेतात आणि त्या नंतर मेंढरं एक होऊन गोळा होतात. मेंढरांना पावसाची चाहूल लक्षात येते. एवढचं काय? सगळ्या जित्रांबाना येणारं संकट लगेच कळतं.." काही वेळातच धो धो पाऊस सुरूवात होतो..

धनगराचे हे पारंपरिक ज्ञान पाहून ते इंग्रज हवामान तज्ज्ञ आवाक झाले. पुढे सर माल्कम यांनी महाबळेश्वरात हवामान खात्याची वेधशाळेची उभारणी केली. येथूनच आज आपल्याला भारतीय हवामानाची माहिती मिळते.

आज सर्व आठवण्याचे कारण की, आज जागतिक विज्ञान दिवस. विज्ञानामुळे आमची भौतिक प्रगती झाली; पण आमचे पारंपरिक ज्ञान नष्ठ झाले.

चातक पक्ष्याने संकेत दिला की पावसाला सुरुवात होणार हे आमच्या शेतकऱ्याच्या लक्षात येते. पूर्वी बि-बियाणे भोपळ्यात ठेवण्याची पध्दत होती. कारण भोपळ्याला कधीच कीड लागत नाही. आज भोपळ्याचा गुणधर्म लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवाय पारंपरिक ज्ञानसंकलन करून विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे.


© विकास पांढरे,९९७०४५२७६७

फोटो साभार - अंतरजाल

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

छत्रपती शिवाजी महाराज आणि कृषी धोरण



'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांचे आहे, महाराजांचे शेती, माती आणि माणसांविषयीचे विचार  आज्ञापत्र, बखरीमधून दर्शन होते.  स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आज ह्या महापुरूषाची जयंती संबंध मराठी मुलुखात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कृषी धोरणाचे घेतलेले दर्शन.

महापुरुषांचे विचार इतिहासाला पाठबळ देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचे दृष्टेपण वर्तमानात अंगीकारावी लागतात.साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजकीय, मुलकी,न्याय, आरमार, लष्कर, वतन आदी धारणाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण आजही वर्तमान आणि भविष्यकाळाला प्रेरक आहे.


महाराजांना जिंजीपासून ते सालेरी पर्यंत राज्य निर्माण करण्यासाठी मोगलांपासून ते स्वकीया पर्यंत संघर्ष करावा लागला. या महापुरुषांची इतकी चिकाटी होती की, स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेकांना पुरुन उरले,असो. खरेतर, महाराज ज्या काळात जन्माला आले,तो काळ राजकीय संघर्षाचा काळ समजला जातो. जसेजसे मोठे होऊ लागले, तसतशा त्यांच्या जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. एका मोठ्या सरदारांचा मुलगा कुणब्याच्या मुलांबरोबर खेळतोय, बागडतोय, शेती समजून घेतोय, गुरेढोरे राखतोय, गावगाड्यातील  अर्थशास्त्र समजून घेतोय हीच गोष्ट प्रजेसाठी आपुलकीची गोष्ट होती. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी आशा छोट्या छोट्या गोष्टींमधून रयतेची पायाभरणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. महाराज जमतेम ५० वर्षे जगले. त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रात विपुल असे प्रेरणादायी कार्य केले आहे. भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो. सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात. त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत. हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती. महाराजांच्या आदेशावर शत्रूवर तुटून पडत होती. महाराजांचेही प्रजेवर अतूट प्रेम होते.


शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. "शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी' हे सूत्र महाराजांना समजले होते. त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता. शिवाजी महाराजांनी कृषी,भूमी,जलसाठे सारख्या बाबींवर गहन विचार केला होता.पावसाचे पाणी आडवावे व वर्षभर पशुपालन आणि शेतीच्या विविध कामांसाठी त्याचा उपयोग करावा,असा त्यांचा आग्रह असे. पुणे शहरातील पर्वतीजवळ आंबील ओढा नावाच्या झऱ्याजवळ आणि कोंढवा येथे त्यांनीच बांध घातला होता,आजही हे बांध पाहणे जोगे आहेत.
कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शिवाजी महाराजांनी पावसाच्या काळात आपल्या मावळ्यांना शेती काम करण्यासाठी मुभा दिली होती.

महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम अभंगात म्हणतात, "मढे झाकूनिया करती पेरणी"  त्या काळात शेतीला किती महत्त्व होते, हे लक्षात येते. रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे, अशी पध्दत होत. आज शेतकऱ्यांनाच स्वतःच मढे होण्याची वेळ आलीय,असो.

 पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत. त्याकाळी नांगरणी, कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार, व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण एके ठिकाणी म्हणतात,

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली. प्रथम सन १६३९ मध्ये दादोजी कोंडदेवाच्या वेळी नतंर १६४९ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्याभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी १६७८ मध्ये स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले. बिघा, पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत. तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले, यालाच ‘पीक पाहणी’ असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे. ब्रिटिश शासनाने या पध्दतीची नक्कल केलेली आहे.

शिवरायांनी प्रत्येक जमिनीचा प्रतवारीनुसार शेतसारा म्हणजे महसूल आकारला जात असे. स्वराज्यात शेतसारा दोन प्रकारे स्वीकारला जात असे. एक नख्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरुपात. बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरुपात स्वीकारला जात असे. शिवाजी महाराजांचे सारा वसूल करणार्‍या अधिकार्‍यास कुलकर्ण्यास म्हणजे आजच्या तलाठ्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश असत. पत्रकाप्रमाणे सारा वसूल करावा. जादा ही नाही आणि कमीही नाही. सरकारी महसूल सरकारी खजिन्यात वेळेत जमा करण्यात यावा. चूक करणार्‍या अधिकार्‍यास तात्काळ शिक्षणा केली जात असे. त्यामुळे सहसा चूक होण्याचा संभवच नसे"
 वरील मतांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतीविषयक धोरण किती कल्याणकारी होते याची जाणीव होते.

छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला ५ सप्टेंबर १६७६ ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात ,"इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे " 
याच पत्रात ते पुढे म्हणतात,
"ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल, नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी "
छत्रपतींच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात. म्हणूनच संत रामदास स्वामी यांना शिवरायांच्या रूपाने 'जाणता राजा' दिसतो तर संत तुकाराम महाराज यांना शेतकऱ्यांचा कल्याण करणारा लोककल्याणकारी राजा नजरेस पडतो. महात्मा फुले यांना कुळवाडी भूषण दिसतो.

प्रा.डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी आज्ञापत्रातील एक आणखी एक दाखला दिला आहे, तो दाखला असा:-

 ‘दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस, अन्यथा उंदिर दिव्यातील पेटती ज्योत पळवतील. कडब्याच्या गंजी पेट घेतील. गुरा-ढोरांना चारा मिळणार नाही. गुरे-ढोरे दूध देणार नाहीत. माझ्या रयतेची बालके दुधापासून वंचित राहतील. माझा भावी महाराष्ट्र दुबळा होईल. तरी दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस’ यावरून शिवरायांची प्रजेबद्दलची काळजी पालकासारखी असल्याचे स्पष्ट होते. 

आपल्या राज्यातली रयत सुखी असेल तरच राजाही सुखी असेल, असा शिवरायांच्या राज्य कारभाराचा दस्तूर होता. कोणत्याही परिस्थितीत लष्कराने किंवा महसुली अधिकार्‍यांनी शेतकर्‍याकडून धान्य, भाजीपाला फुकट घेऊ नये, असे त्यांचे सक्त आदेश होते. चिपळूणच्या सुभेदाराला लिहिलेेल्या पत्रात, त्यांनी लष्कराची छावणी सध्या आपल्या भागात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घोड्यासाठी पुरेशी वैरण जमा करून ठेवावी. ती जपून ठेवावी. अन्यथा वैरणीची टंचाई झाल्यास तुम्ही रयतेकडून ती घ्याल. कुणी धान्य मागेल, कुणी भाजीपाला, कुणी लाकूडफाटा. रयतेलाच तोशिस पडेल. मग रयत म्हणेल, मोगल तो यापेक्षा वेगळे काय होते. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, ती केली नाही, तर मराठ्यांची इज्जत राहणार नाही, अशी जरबही त्यांनी दिली होती. गोव्यातल्या बारदेश भागातून स्वस्त मिठाची आयात सुरू झाल्यामुळे, कोकणातल्या मिठागारावर परिणाम व्हायला लागला. तेव्हा शिवरायांनी गोव्यातल्या मिठावर जबर कर बसवा आणि स्वराज्यापेक्षा ते महाग होईल, असे पहा, असा आदेश देतानाच, मिठाचा मामला लाख मोलाचा, असे लिहिले आहे. 

कोकणपट्टी स्वराज्यात आल्यावर आदिलशहाच्या सनदेनुसार चिंचवडच्या मोरया गोसावी संस्थानाचे लोक कोकणात भाताची स्वस्त खरेदी करण्यासाठी गेेले, तेव्हा स्वराज्याच्या अधिकार्‍यांनी त्यांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीत भाताच्या खरेदीला मनाई केली. हे प्रकरण शिवरायांच्यापर्यंत गेले. तेव्हा त्यांनी चिंचवडच्या संस्थानाला राज्याच्या कोठारातून उत्सवासाठी धान्य देणगीदाखल द्यावे, असे आदेश दिले. पण, रयतेच्या हिताचे रक्षण केले. केवळ स्वराज्यातल्याच नव्हे, तर शिवरायांचे लष्कर स्वार्‍यांवर शत्रूंच्या प्रदेशातून जात असताना, तिथल्या रयतेलाही त्रास देवू नये असा त्यांचा दंडक होता. पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी रयतेची काळजी घेतली त्यामुळेच ते सर्वार्थाने रयतेचे राजे झाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक विचार लक्ष विचारात घेण्याबरोबरच  राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा वेध घेणे आवश्यक आहे. महाराजांनी राज्यभिषेकासाठी ६ जुन ही तारीखच का निवडली ? ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस. कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस. देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही. महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात. म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात बळीराजाच्या सोयीचे जावे व त्याचा एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणून त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणून ६ जून हा दिवस निवडला गेला. त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांना पण सोयीचे होते, याला म्हणतात दूरदृष्टीपणा, यालाच म्हणतात महापुरुष.

महाराजांच्या काळात सेंद्रीय शेती केली जात असे आज ती रासायनिक खतांच्या प्रभावाखाली आली आहे. त्याकाळात शेतकरी आत्महत्या होत नसत,आज शेतकरी आत्महत्येचा विषय गहन झाला आहे. जगात कापौरेट शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काही कंपन्यांनी भारतातील शेती गिळंकृत करण्यात डाव साधला आहे. जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना आपलं मूत्र प्राशन करण्याची वेळ आली. वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यास योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याची पाळी आली.


 एकूणच आजचे शेतीचे अर्थकारण बिघडलेले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. ही कर्जमाफी तत्कालीन काळासाठी आधार देणारी असली तरी 'शाश्वत' पर्याय असू शकत नाही. त्यामुळे ही दरी संपुष्टात आणण्यासाठी विदर्भ मराठवाड्यात सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. शेती मालास योग्य भाव मिळाला पाहिजे, पशुधन वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला शेतकरी सुखी होईल.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७


संदर्भ

१) प्रा.डॉ. शिवाजीराव चव्हाण -लेख शिवाजी महाराजांचे कृषी धोरण, दैनिक ऐक्य, ६ जून २०१७

२) आज्ञापत्र - अनंत सभासद


३) छत्रपती शिवाजी आणि सुराज्य -अनिल माधव दवे

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...