शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

कृषिसेवाव्रती-डॉ.बी.व्ही.निंबकर

शेळी व मेंढ्यांचा सूक्ष्म अभ्यास व संशोधन करणारे, वसंत ज्वारी, करडई, कापूस बियाणांच्या संशोधनात बहुमोल योगदान देणारे पद्मश्री डॉ.बनबिहारी विष्णू निंबकर यांची २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्राणज्योत मालवली. ‘नारी संस्था’ व ‘निंबकर सीड्स’च्या माध्यमातून कृषक समाज उत्थनाासाठी कार्य करणाऱ्या या कृषिसेवाव्रतीच्या कार्याविषयी उजाळा देणारा हा लेख. 

महाराष्ट्रात आजही शेती हाच प्रमुख उद्योग आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती शेतीवर अवलंबून आहे. शेतीतील प्रगती ही प्रामुख्याने पाणी, खते, बियाणे, पशू, कीटकनाशके व मागशतीचे तंत्रज्ञान या गोष्टींवर अवलंबून आहे. या घटकांत भरीव संशोधन झाले पाहिजे, शेतीची प्रगती झाली पाहिजे हा ध्यास घेऊन कार्यरत राहणारे महाराष्ट्रात जी कृषिसेवाव्रती होऊन गेले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे पद्मश्री डॉ.बनबिहारी निंबकर हे होय. डॉ.निंबकर यांचा जन्म १७ जुलै १९३१ रोजी मडगाव (गोवा) येथे झाला. शालेय व माध्यममिक शिक्षण भारतात झाले, पुढील शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतले. १९५६ साली अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून एम.एस्सी (कृषी) पदवी संपादन केली. त्यानंतर १९५७ साली ते मातीचे पांग फेडण्यासाठी भारतात परतले. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण या अवर्षणग्रस्त भागातील १०० एकर जमीन कसण्यास घेतली. या संपूर्ण जमिनीत त्यांनी नवक्रांतीचे बीज पेरले.

 निंबकर कृषी संधोधन संस्थेची उभारणी व कार्य 

 महाराष्ट्रात नवीन उन्नत पीक-बियांणाची निर्मिती व्हावी, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून डॉ.निंबकर यांनी फलटण येथे १९६८ साली ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’ची स्थापना केली. प्रसिद्ध संशोधक डॉ.आनंद कर्वे यांच्या मदतीने संस्थेने अनेक वाणांच्या जाती विकसित करून कृषी संशोधानात भर घातली. या काळात देशात संकरित बियाणे निर्माण करणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या होत्या. पण त्या सरकारी संशोधनातून निर्मिलेल्या वाणांचीच विक्री करत असत. एखाद्या बीजोत्पादक कंपनीने स्वतः संशोधित केलेले वाण बाजारात आणावे यासाठी १९७१ साली ‘निंबकर सीड्स प्रा.लि.कंपनी’ची स्थापना केली. या दोन्ही संस्थांमुळे गेल्या चाळीस वर्षांत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. डॉ.निंबकरांनी कापूस, सूर्यफूल, करडई, ज्वारी, मका यासारख्या पिकांच्या विविध जाती निर्माण केल्या. कापसाचे नवे वाण विकसित करून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचे दार उघडले. 

  वसंत -१ वाणाची निर्मिती

निंबकर सीड्सने विकसित केलेले ‘वसंत-१ व २’ हे ज्वारीचे वाण महाराष्ट्रात फारच लोकप्रिय झाले. यासोबत गोड ज्वारीवरही संशोधन करण्यत आले होते. या ज्वारीच्या धाटात उसाप्रमाणे साखर साठविण्याची क्षमता होती. उन्हाळी व खरीप हंगामात धाटे उंच वाढत असल्याने त्यांच्यापासून साखर काढावी व हिवाळ्यात हे पीक बुटके राहात असल्याने त्याच्या खोडव्यापासून धान्य पीक घ्यावे, अशा प्रकारचे वाण कंपनीकडून विकसित करण्यात आले होते.

  को-७४० ऊस वाण 

 १९६९ ते १९७२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या ‘को-७४० ऊस’ वाणाची निर्मिती करण्यात आली होती. पण या वाणावर सर्वत्र मोझेक व्हायरसचा प्रार्दुभाव झाला होता. पुढे या संस्थेत कार्यरत असलेले संशोधक डॉ.आनंद कर्वे यांनी व्हायरसवर संशोधन करून व्हायरसमुक्त रोपे तयार केली. पुढे या प्रयोगाचा बोलबाला झाला. या वाणांचे बेणे तयार होऊन विक्री करण्यात आली. सरकारी चौकटीबाहेर राहून शेतकरी वर्गाच्या उपयोगी पडेल अशा प्रकारचे कृषिसंशोधन करणारी निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्टिट्यूट ही त्यावेळी एकमेव संस्था असावी. 

  करडई

कोरडवाहू व अल्पसिंचन गटातील शेतकऱ्यांचा विचार करून करडई पिकाचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला. निंबकर संस्थेतील शास्त्रज्ञांनी करडईच्या सुमारे १३०० वाणांचा अभ्यास करून त्यापैकी कोणत्या वाणांमध्ये रोग व कीटकांचा प्रतिकार करण्याची क्षमता असते याचा सूक्ष्म अभ्यास करून ‘करडई मातृ-पितृ’ हे वाण विकसित केले. डॉ.निंबकर यांनी फलटण परिसरात कमी पाण्यात येणारे, कमी लांबीच्या धाग्याच्या कापूस लागवडीचा प्रयोग ही राबविला. त्यासाठी आपल्या संस्थेत कापूस पिकांवर संशोधन केले.

  पशु-संवर्धन विभागाची स्वतंत्र स्थापना

   उत्तम दूध देणारी, उत्तम पैदास देणारी व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दरामध्ये अल्पखर्चात सहजरित्या सांभाळता येईल अशी जात निर्माण करण्यासाठी कार्य सुरू केले. १९९० मध्ये निंबकर कृषी संस्थेत पशु-संवर्धन विभागाची स्वतंत्र स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी डॉ.निंबकर यांची १९८८ मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉ.निंबकर यांना ‘शेळी व मेंढीपालनामधील समस्या व उपाय’ या आयोगावर अध्यक्षपदी नेमले. या आयोगाच्या अभ्यासातून महाराष्ट्र शेळीव मेंढी संशोधन व विकास संस्थेची निर्मिती झाली. विशेष म्हणजे लोकप्रिय दुग्धपेयाला 'एनर्जी'हे नावही त्यांनीच दिले.

शेळ्यांच्या जाती विकसित

महाराष्ट्रात उस्मानाबादी व मडग्याळ या जातीच्या शेळ्या-मेंढया होत्या. डॉ.निंबकर यांनी १९९३ मध्ये ऑस्ट्रोलिया सरकारच्या सहकार्याने बोअर शेळ्यांचे भ्रूण व वीर्यमात्रा आणल्या. या भ्रूणांचे रोपण स्थानिक ‘सिरोही’ शेळ्यांमध्ये करून १९९४ च्या सुमारास संस्थेचा ‘पहिला बोअर शेळ्यांचा कळप’ विकसित केला. पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील ‘गरोला’ मेंढयाच कळप फलटण येथील प्रकल्पात आणून त्यांची पैदास व संवर्धन सुरू केले. सतत १० वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या नारी सुवर्णा या वाणाची निमिर्ती केली गेली. 

  जलव्यवस्थापनात मौलिक कार्य 

 वीर धरण हे महाराष्ट्रातील नीरा नदीवरचे मोठे धरण आहे. या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कलवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यांमधून जातो. उजवा कालव पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे यासाठी डॉ.निंबकर यांनी नीरा खोरे पाणी योजना कार्यक्रम अंतर्गत सहकारी तत्त्वावर पाणी पुरवठा योजना तयार करून या भागातील शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याचे महान कार्य डॉ.निंबकर यांच्यामुळे शक्य झाले.



 ‘निंबकर कृषी संशोधन संस्था’ व ‘निंबकर सीड्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले तर तर ‘मॅफको’, महाराष्ट्र ‘शेळी व मेंढी आयोगा’चे अध्यक्ष, ‘सेंट्रल बॅक ऑफ इंडिया’च्या कृषी विभाागचे संचालकपद ही सहजपणे भूषवली. त्यांचे हे सर्व कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने २००६ चा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. 

 डॉ.निंबकर यांचे शेती, संशोधनातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी हे जे कार्य केले आहे, ते त्यांच्या पश्चात अधिक जोमाने व समर्थपणे चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे संशोधनपर लेखन, निंबकर संस्थेचे संशोधित कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रकाशात आणणे हे आपले उत्तरदायित्व असले पाहिजे हीच डॉ.निंबकर यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. 

मुंबई तरूण भारत, आसमंत पुरवणी
२९/०८/२०२१

  -विकास पांढरे, ९९७०४५२७६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...