पुणे, मुंबई, नाशिक, पालघर भागात वरूणराजा मनमोकळा बरसला..धरणी ओलेचिंब झाली आहे. डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. कडेकपारीतून फेसाळ धबधबे आनंदाने उचंबळून वाहू लागले आहेत...शेतातील इवली इवली रोपे वाऱ्यावर डोलू लागले आहेत. हे पाहून संवेदनशील मन तृप्त होते.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यात पाऊस चक्क धो..धो कोसळला. या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना महापूर आला. कोयना धरणातून त्याच्या क्षमतेपेक्षा किेतीतरी पाणी सोडून द्यावे लागत आहे. अनेक गावांना पुराचा वेढा आहे. पुलुस जवळील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून अनेकांना प्राण गमवावा लागला. शेकडो लोक पुरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.
कोल्हापूर, साताऱ्यातील हीच परिस्थिती आहे. लाखो लोक पुरात अडकले आहेत. लाखोचे पशुधन पुरात वाहून गेले आहे. गावची गाव पाण्याखाली गेली.. रस्ते हरवले.. शेतात पाणीच पाणी... हळद रूसली आहे..बेदाणा सुकला आहे.. गूळ नासला आहे..ऊस मूळासकट वाहून गेला... नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे..
अशी आपत्ती पूर्वी ही आली होती.. आता ही आली आहे...पूर्वीच्या आपत्तीतून काय शिकलो? इथल्या नागरिकांना अस्मानी संकटातून बाहेर काढण्याासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, सरकार,नागरिक जीवाचे रान करत आहे. सर्वांच्या प्रयत्नाना यश मिळत आहे.
या पावसाच्या हाहाकाराने नागरिक हवालदिल झाला आहे.. विस्कटलेला सगळा संसार कसा उभा करायचा? पुरानंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची? असा प्रश्न इथल्या कुटुंबकर्त्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
आज ना उद्या पूर ओसरेल.. आपत्तीग्रस्तांना मदत मिळेल..आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा होईल.. लेख छापून येतील.. पुढे सगळे विसरले जाईल..पुन्हा प्रश्न उभा राहिल?
या अरिष्टाचे परिणाम त्याची व्याप्ती आणि तीव्रता बघता अरिष्ठ निवारण हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे.. थोडक्यात सांगायाचे झाले तरी आज सर्वांनी अरिष्टग्रस्त व सरकार यंत्रणा यांना जोडणाऱ्या पुलाचे काम करायला हवे. अशाप्रकारे सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचलला तरच अरिष्टग्रस्तांना दिलासा मिळेल.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावरचे काळे ढग जाता जात नाहीत तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यात अजूनही पांढरे ढग आहेत. काही दिवस, काही महिने उलटून गेले तरी अजूनही वरूणराजा या भागावर रूसून बसला आहे.
या भागात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची नुसतीच भुरभुर सुरू आहे. जायकवाडी वगळता अनेक धरणे कोरडी आहेत. नदीनाले सुकून गेली आहेत. रान ओसाड आहे.अल्प पावसावर जी पेरणी झाल्यावर त्यावर रोग पडू लागला आहे. कपाशीवर मावा पडला आहे. मका लष्करी अळींच्या विळख्यात सापडली आहे.
एक आनंदाची गोष्ट आज दुपारी समजली. मराठवाड्यात कृत्रिम प्रयोग पाडण्यासाठी विमान आकाशात झेपावले आहे.कृत्रिम पावसाचा आधार हा शाश्वत नसला तरी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.
विकास पांढरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा