मंगळवार, १० जुलै, २०१८

पुणतांब्याच्या पाऊलखुणा...!


एक गाव मनात घर करून राहिले आहे. ते मनातून जाता जात नाही. तिथला निसर्ग, तिथले ऐतहासिक,धार्मिक वैभव पाहताना सुखद अनभुव येतो. काही दिवसांपासून या गावाविषयी लिहावे असे  मनात घोळत होते,पण की-बोर्डवर उतरत नव्हते, या गावाला आपण विसरून तर गेलो नाही ना? असा भास झाला. आज पुन्हा त्या गावाची आठवण आली आणि लिहायला बसलो. आजच्या 'ग्लोबल' युगातले हे गाव काळाच्या ओघात आपल्या पाऊलखुणा जपत आहे. होय, मी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा ( ता.कोपरगाव जि.नगर) या गावाविषयी बोलतोय!

सा.'विवेक'च्या कामानिमित्त जानेवारी (सन २०१८)महिन्यात नगर जिल्ह्यात प्रवास करता आला. या प्रवासात 'पुणतांबा' या गावात जाणे झाले. अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनामुळे हे गाव प्रसिध्द पावले. माध्यमांतून या गावातल्या शेतकरी संपाविषयी, आंदोलनाविषयी बातम्या वाचायला मिळत होत्या. या गावात जाता येईल, असे वाटले नव्हते. जेव्हा या गावात उतरलो तेव्हा इथला शेतकरी कसा असेल? पीक-पाणी कसे असेल याविषयी मनात प्रश्न उभे राहिले. पण आंदोलनाविषयी कोणी बोलत नव्हते.

शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. रेल्वे मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाची उत्तम सोय आहे. गावाच्या अंतरंगात शिरू लागलो. तेव्हा पडझड झालेल्या तटबंदी दिसू लागल्या. संपूर्ण पुणतांबा गावाला तटबंदी आहे. ठिकठिकाणी वेशी दिसू लागल्या. या तटबंदी,वेशी आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. अकरा वेशीने बनलेले हे गाव असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. माझ्या नजरतले असे हे पहिलेच गाव. गोदातरी वसलेल्या या गावाची कहाणी मला अधिक भावत गेली. मनात घर करत राहिली. बालकवींनी शब्दबध्द केलेल्या 'औदुंबर' कवितेची आठवण झाली. हिरवेगार शेतमळे, नागमोडी वळणे घेत घाट, मंदिराकडे जाणारी गोदामाईची पायवाट पाहताना मनात चैतन्य खळाखळते.  काळाश्या डोहात पाय ठेवताना मन पवित्र होते. गोदामाईचे पाणी गोड आहे. या गोडव्यामुळे या गावाला वैभव प्राप्त झाले असावे.
गोदातीर
 प्रतिष्ठित नागरिक सुभाष वहाडणे यांनी पुणतांब्याची सफर घडवली. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आणि गोदातीरावर हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी राजा विक्रमादित्य यांची राजधानीचे हे गाव होते. अशी मौखिक माहिती मिळते. चांगदेव महाराजांची समाधी मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, मामा-भाच्याचे मंदिर, खंडोबा मंदिर,कालभैरव मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, संत गंगागीर महाराज मंदिर असे गावात जवळपास ४००पेक्षा जास्त पुरातन मंदिरे आहेत. संत साईबाबा व संत जनार्दन स्वामी यांचे काही वर्षे पुणतांब्यात वास्तव होते. पेशवाईच्या काळात या गावाला वैभव प्राप्त झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट व मंदिराची उभारणी करून गावाला धार्मिक वैभव प्राप्त करून दिले. आजही हे घाट व मंदिर सुस्थितीत आहे.

गावात आलुतेदार-बलुतेदार पूर्वीपासून गुण्यागोंविदाने राहतात. धनगरवाडा, कुंभारवाडा, बामणवाडा अशा वेगवेगळया आळया आढळतात. काळाच्या ओघात जीवनपध्दती बदलत गेल्यामुळे आळया ( गल्ली) हा प्रकार राहिला नाही. पुणतांबेकर, वहाडणे, शेंडगे, चितळकर, मुळे, रोकडे, कुलकर्णी अशा विविध आडनावाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या २० हजारपेक्षा जास्त असली तरी शहराचे रूप गावाने पाघरले नाही. सका-सकाळी शेताकडे गुरे-ढोरे घेऊन जाणारे पशुपालक- शेतकरी नजरेस पडतात. गावात राष्ट्रीय व शेडयूल बँका आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्याची शाळा आहे. व्यापारी संकुल देखील आहे. सायंकाळी गावात भाजीपाल्याचा बाजार भरतो. भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकरी पुणतांब्यात येतात.

पुणतांबा व्यापारी संकुल


पुणतांबा - भाजीपाला बाजार

मी पहिल्यांदा श्री.खड्गधारी खंडेराय मंदिरात गेलो. झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' मलिकेत या मंदिराचा उल्लेख आला होता. त्यामुळे या मंदिराविषयी उत्सुकता होती. मंदिर छोटेच आहे.

कृत युगात पुरातन काळी मनी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी ऋषी मुनींचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनिचल पर्वतावर मोठे युध्द केले त्या युध्दात मनी दैत्य शरण आले आणि मल्ल दैत्याचा वध झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या अवतरला मल्हारी मार्तंड असे नाव मिळाले. ती विजय तलावर (खड्ग) देवाने भक्तांसाठी पुणतांबा गावास भेट दिली आहे. त्यात त्यांचा अंश आहे. अशी अख्यायिका असल्याची माहिती पुजारी शेंडगे यांनी दिली.
खंडोबा मंदिरातील विजयी तलवार समवेत मी आणि सुभाष वहाडणे
गोदावरी नदीत मल्हारी मार्तंड अंघोळीसाठी गेले असता तिथे ही विजयी तलवार त्यांनी पाण्यात फिरवली. आज त्या ठिकाणी चौकानी आकाराचा खड्डा पडला आहे. खरेच, अशा प्रकारचा खड्डा गोदावरी नदीत पहायला मिळतो. मी जेव्हा विजयी तलवार हातात घेतलो ती खूपच जड होती. दोन्ही हाताने उचलावी लागली. तलावर उंची ७ ते ८ फूट असावी.

गोदातीराच्या बाजूला अंबाबाईचे पुरातन मंदिर आहे. एखाद्या राजवाडयासारखे दिसणारे हे मंदिर पर्यटकांना मोहित करते. मंदिराची इनामी शेती आहे. शेतीत विविध पीके घेतली जातात. मंदिराच्या जीर्णोद्वाराची माहिती एका शिलालेखाद्वारे मिळते. मंदिराची आतील बाजू तितकीची चांगली दिसत नसली तरी बाहेरून हे मंदिर बघण्याजोगे आहे.
देवी मंदिर
मंदिराच्या इनामी जमीनीत बहरलेले गव्हाचे पीक

नदीच्या तीरावर कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. अहिल्यादेेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला. घडीव व कोरीव दगडाचे हे मंदिर आहे.मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही, त्याचे काही धार्मिक कारणे आहेत पण त्रिपुरारी र्पोर्णिमा व कृतिका नक्षत्रांत महिलांना देवाचे दर्शन घडते.  मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला नवग्रह मंदिराचे दर्शन घडते. काशीविश्वेश्वरांचे मंदिर ही सुस्थितीत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भलीमोठी पिंड आहे. नदीपात्रातील या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविक गर्दी करत असतात. दूरवरून ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलेला  दगडी पुल दिसतो. आजही हा पुल भक्कम स्थितीत आहे.
कार्तिक स्वामी मंदिर


काशी विश्वेश्वर मंदिर
पुरातन पिंड

ब्रिटिश कालीन रेल्वे पुल

पुणतांबा गावातच महायोगी चांगदेव महाराजांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज या गावातून गेले होते असे असल्याचे सांगण्यात आले. चांगदेवानी ज्यांना गुरू केले त्या संत मुक्ताबाईचे मंदिर इथेच आहे. या गावात मामा- भाच्याचे एक मंदिर आहे. मामा-भाचे या दोघांच्या प्रेमाची कहाणी इथे सांगितले जाते. देशात मामा-भाचे एक मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही.आगळेवगळे मंदिर असावे. सध्या या मंदिराची दुरावस्था झाली आहे. मंदिरातील मूर्त्या अडगळीला पडल्या आहेत. नंदीबैलाच्या मूर्तीची नासधूस झाली आहे. मंदिराची देखभाल करायला कोणी नाही.
चांगदेव मंदिर
समाधी दर्शन
मामा-भाचे मंदिर

अडगळीत पडलेली मूर्ती

मूर्तीची दुरावस्था

गावाची आध्यात्मिक परंपरा लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट बांधला आहे. हा घाट आजही उत्तम स्थितीत असून घाटावर उभारून गोदातीराचे विलोभनीय दर्शन घडते. घाटावर अनेक धार्मिक होतात. गावातच होळकरांचा मोठा वाडा आहे. आज या वाडयाची मोठी पडझड झाली आहे. होळकरांच्या वंशजांनी हा वाडा दुसऱ्या एका व्यक्तीला विकला असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले.

होळकर वाड्याची दुरावस्था


घाट

या गावाचे आणखीन वैशिष्टय म्हणजे दिवंगत संगीतकार सी.रामचंद्र, स्व.माजी खा.सूर्यभान वहाडणे, स्व.जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावातीलच होती. संगीतकार सी.रामचंद्र यांचे बालपण या गावतच झाले. ते ज्या वाडयात राहत होते. तो वाडा आजही सुस्थितीत आहे. आज या वाडयात त्यांचे पुतणे राहतात. माजी खा.सूर्यभान वहाडणे यांनी आपले कुलदैवत खंडेरायाचे मंदिर स्वतःच्या जागेत स्थापन केले आहे.

संगीतकार सी.रामचंद्र यांचा वाडा

सी.रामचंद्र यांच्या पुतण्यासमवेत


वहाडणे कुटुंबियांचे खंडोबा मंदिर

पुणतांबा गावाला जे वैभव प्राप्त झाले आहे. त्या वैभवाचे जतन व संवर्धन करणे आपली व सरकारची जबाबदारी आहे. पुणतांबा गावाचा विकास होण्यासाठी सरकारने हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आणले  पाहिजे. कारण इथला सर्व भाग हा पर्यटनाने व्यापला आहे. पुणतांब्याचे हे वैभव पर्यटकांना आकर्षित करील, हे मात्र नक्की.

-विकास पांढरे,९९७०४५२७६७

६ टिप्पण्या:

  1. विकास जी, खुपच उत्कृष्ट मांडणी केली आहे.
    प्रत्यक्षात पर्यटन करण्यात आली तर आम्ही सुद्धा आपल्या कार्यात हातभार लावू

    उत्तर द्याहटवा
  2. विकासजी आपण पुणतांबा गावाविषयी केलेला अभ्यास हा उलेखनीय आहे यातून गावाबदल ची तळ मळ जाणवते त्याबदल पुणतांबा गावचा वतीने आपले खुप आभार व धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. पुणतांबा गावा विषयी थोडक्यात पण महत्वपुर्ण माहिती

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच चागली माहिती वाचायला भेटली

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद , पुणतांब्याला ऐतिहासिक ,पौराणिक महत्त्व आहेच .प्रकाशित
    केल्याबद्दल आभार .

    उत्तर द्याहटवा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...