गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात जातीयवाद अधिक घट्ट होऊ पाहत आहे. संवेदनशील मने संवादपर्वास लिहिते होत नाहीत. तटस्थपणे पाहणार्या मतीतून काही ठोस पडत येत नाही. एकूणच पुरोगामी राज्यात जातीचे बंड योग्य की अयोग्य ?
पहिली प्रचिती
याची पहिली सुरूवात स्वातंञ्यपूर्व काळात झाली. जे शोषित व पीडित होते. त्यांना लोकशाहीत स्वातंञ्य दिले, त्या समाजाने त्या शक्तीचा उपयोग करून घेतला. कायदा किंवा चालीरीती, रूढी यांच्या विरूद्ध बंड करावे, असे वाटत होते ते त्यांनी केले. हे आपणास मंडल आयोग, खैरलांजी आदी तत्सम घटना प्रकारातून दिसून आले आहे.
दुसरी प्रचिती
आम्हीच आदिम आहोत, आम्हीच खूप वेदना सोसल्या, सोसत आहोत. त्यासाठी आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या, या मागणीसाठी एकसंघ होऊन धनगर समाजाने आंदोलने केली. अजून या समाजाचे प्रश्न सुटला नसल्याने इथे कधीही ठेणगी उडू शकते.
तिसरी प्रचिती
आपण एकेकाळी श्रीमंत होतो, सुखाची व स्वास्थ्याची साधने जवळ होती. नंतर काळ बदलला, राजकीय स्थित्यंतर झाली आपणाभोवती गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. त्यात आपण अडकलो आहोत. याची जाणीव मराठा समाजाला झाली आहे. त्यासाठी आपल्या गटाचे धोरण व भवितव्य ठरविण्यात आपल्या कुवतीनुसार भाग घेत आहेत. त्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय सामाजिक दुःखे मिटवू शकत नाही. अशी धारणा बनली असल्याने राज्यात समाजाच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पुढे सोलापूर, लातूर, सातारा व मुंबई शहरातही समाजाचे सामर्थ्य दिसून येणार आहे.
सैद्धांतिक भूमिका
कोपर्डी प्रकरणावर या समाजाची खदखद समोर आली आहे. पण कायद्याविरूध्द ( अॅट्रासिटी) विरूद्ध बंड करावे, असे त्यांना अनेक वर्षापासून वाटत आहे. सामाजिक वृत्ती प्रबळ नसल्याने, त्या वास्तवात उतरल्या नाहीत. आता त्या वृत्ती उचंबळून आल्या आहेत. मूक मोर्चातून अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
ही कोंडी कशी फोडायची ?
राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा असलेल्या या राज्यात सासातत्याने विविध जातींची बंड होत आहेत. विद्वान लोकही या चक्रात अडकले आहेत. त्यांनी चाकोरीत फिरणे योग्य आहे का? सर्वांना शांतीने क्रांती करायची आहे. भुका समाज बदल व्हावा म्हणतो , तर भरल्या पोटाचा बदल नको म्हणतोय. त्यामुळे ही कोंडी कशी फोडायची?
समरसताधिष्ठित शासनपध्दतीचा अंत
लोकशाहीत स्वातंञ्यांचा उपयोग करून घेणे प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे. पण प्रत्येक जातीच्या समूहाने शासन पध्दतीवर दबाव आणला तर समरसताधिष्ठित शासनपध्दतीचा अंत होतो. आपसात यादवी न माजली तरी राष्ट्रीय ऐक्य तरी नष्ट होते यात शंका नाही. विकासाबरोबर भेदही येतात. आपल्या जातीचा अधिक कसा विकास होईल अन् दुसर्या जातीचे कसे नुकसान होईल, अशी धारणा बळावत जाते. यात भरडला जातो तो सामान्य माणूस. नाहीतर गरिबाला सिंहाने खाल्ले काय किंवा उदरांनी येऊन खाल्ले काय सारखेच.
वेडात मराठे वीर दौडले सात
छञपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगू पाहणार्या या मराठी मुलूखात असे काय घडू पाहत आहे. ज्यामुळे जाती पातीच्या दावणीला बांधून नवे स्वप्ने साकार करण्याची मनिषा निर्माण होत आहे.
आमच्या शिवरायांचे वादळ सत्याची ढाल होती. ही ढाल कोसळून जातीचे बंगलेच्या बंगले अशीच तयार होत राहिली तर पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या रक्षणासाठी वेडात मराठे वीर दौडले सात यांना या भूमीत जन्म घ्यावा लागेल.
© विकास पांढरे, 9970452767

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा