माणसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माणसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

सोलापूरच्या 'हौसाबाई'ची गोष्ट

आज दुपारी फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होतो. तसा हा रस्ता नेहमी गजबजलेला. कपड्याची, चपलाच्या दुकानात गर्दी बरीच दिसली. मी विमनस्क मनस्थितीत हा रस्ता पार करत पुढे जात होतो.माथ्यावर ऊन वाढत होतं. रस्त्याच्या कडेला उखळ, जात विकणाऱ्या वृद्ध महिलेकडे माझी नजर गेली. बराच वेळ ती गिऱ्हाईकाची वाट पाहत होती. कोणी तरी यावं आणि आपल्या वस्तू घ्याव्यात, असं तिला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून ती चिडलेली होती. तिच्या बोलण्यात सोलापूर भाषेचा लकब होता. मी ही याच भागातला असल्यानं तिच्या जवळ थांबून बोलू लागलो. "आजी नाव काय तुझं?" हौसाबाई - हौसाबाई धोत्रे "गाव कुठलं?" "सोलापूर"
"अस्स.. मला वाटलचं..तुझी भाषा सोलापूरी..." मध्यम उंची, भेदक नजर, नऊवारी साडी, उतारवयाकडे झुकलेले शरीर.. डोक्यावर पिकलेले पांढरे केस.. हौसाबाईचं बाह्यरूप..हौसाबाईच्या अंतरंगाचा शोध घेणं ही एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. हौसाबाईचा अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. वस्तू घेतात आणि निघून जातात. पण तिच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. म्हणून ती थोडी चिडली..मी ही सोलापूरकडचा आहे म्हटल्यावर नरमाई घेतली.. आणि बोलू लागलो..

 "आजी, पुण्यात कधीपासून राहते आणि कुठे राहते?' मी म्हणालो- ती म्हणाली, "चाळीस वर्षे होऊन गेली. दुष्काळाच्या भयानं पुणं गाठलं. सुरवातीला पाल करून राहत होतो.. आता आम्ही वनदेवी (कर्वेनगर) परिसरात राहतोय. लेकर लहानाची मोठी इथेच झाली. आमचं वडारच काम. पाटा,वरवंटा, जात, उखळ, खलबत्ता तयार करणं आमचं काम" दगडावर छन्नी हातोडीचे घाव घालून त्याला आकार देणाऱ्या हौसाबाईच्या संसाराला याच व्यवसायाने आकार दिला. 

हौसाबाई म्हणाल्या, "४०-५० वर्षांपूर्वी सोलापूर एक गावचं होतं. पोट भरणं मुश्किल होतं. डोक्यावर दगड घेऊन गावोगावी भटकत राहिली. आम्ही नवराबायको दगडाचे वरवंटे, पाटे, खलबत्ते घडवले. पुण्यात संसार मांडला, फुलला, स्वतःचं हक्काचं घर घेतलं" कधीही शाळेची पायरी न चढलेल्या हौसाबाई पैशाचा व्यवहार चोखपणे करतात. माझ्याकडे दुर्लक्ष करून ती गिऱ्हाईकडे लक्ष देऊ लागली. तिचं व्यवहारशास्त्र तिच्या मेहनतीचे फळ होतं. "व्यवसायाला लॉकडाऊन फटका कसा बसला?" असं मी प्रश्न विचारला. हौसाबाई म्हणाली, " काय सांगू बाबा! एवढा मोठा रोग मी कधी बघितला नाही. दुष्काळात माणसं शहराकडे धावत होती. कोरोनानं माणसं गावाकडे धावू लागली. आता वर्ष होत आलं. अजूनही माणसं गावाकडे हायती!"
पुढे म्हणाली, "महाकाय संकटामुळे आमचा धंदा कोलमडून पडला. परिस्थिती ओसरली असली तरी या धंद्यात म्हणावा तसा पैसा येत नाही. आता आमचा निभाव कसा लागेल..?" "असं का?" मी म्हणालो. "दगड काढणं, दगडाची गिट्टी फोडणं अशी सर्व कामं आज यंत्रानं होत आहेत. दगडाचं सर्व काम वड्डर समाजाच्या हातून निघून गेली आहेत. ज्याच्याकडं यंत्र आहेत. त्या महागड्या वस्तू म्हणून कोणी घेत नाही. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या समाजाचं कसं होईल?" हौसाबाई आपल्या समाजाची चिंता बोलून दाखवली. 

वडार समाज गावगाड्यातील (जागतिकीकरणामुळे गावगाडा संपला आहे) एक महत्त्वाचा घटक आहे. हा समाज बांधकाम क्षेत्रात काही अंशी स्थिरस्थावर झाला असला तरी, गाव-खेड्यात राहणाऱ्या समाजाची अवस्था बिकट आहे. जे शहरात आले आहेत, त्यांच्या समोर नवीन आव्हाने उभे आहेत. हे हौसाबाईच्या कथेतून लक्षात आलं. 
 © विकास पांढरे बुधवार, ३ मार्च २०२१ पुणे

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कष्टाची कमाई


स्व.मोहन धारिया यांच्या 'वनराई' संस्थेला भेट देण्याचा योग आला. दुपारची वेळ.. वातावरणात थंडी जाणवत होती.. वनराई बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या नाल्याच्या कोपऱ्यात चप्पल दुरुस्तीचे काम करीत असलेल्या महिलेवर नजर गेली. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातले हे दृश्य पाहून कुतूहल निर्माण झाले. चप्पल शिवणे हे खरे तर पुरूषांचे काम पण जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीही नाही हे या महिलेने दाखवून दिले आहे. मंजुषाताई कैलास रावखंडे असे या महिलेचे नाव आहे.
गोरा रंग, कपाळावर कुंकू, काळेभोर डोळे असलेल्या मंजुषाताईचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. मंजुषाताईंच्या घरात चप्पल शिवणे परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे घरातल्या माणसांकडून त्यांना या व्यवसायाची आवड निर्माण झाली. व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. यानिमित्ताने मंजुषाताईंची जीवनाची कहाणी थोडक्यात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मंजुषाताई सांगत होत्या.. "माझं शिक्षण सातवी पर्यंत झालं. पुढं शिकावं वाटत होतं पण तसं घडलं नाही!"
"आम्ही मुळचे सातारचे. मंगळवार पेठेत आमचं घर आहे." सासऱ्यानं पोटासाठी पुण्याची वाट धरली. पर्वती दर्शन शेजारी सासऱ्यानं घेतलेलं घर आहे आम्ही तिथेच राहतो.. नवरा ड्रायव्हर आहे. चपलाचा व्यवसाय करणे त्यांना जमलं नाही.. त्याला आजची परिस्थिती कारणीभूत आहे."

" पूर्वीसारखा आमचा व्यवसाय राहिला नाही. गावाकडं बलुतं मिळायचं! आता कुठंय आलंय बलुतं-फलुतं? नव्या यंत्रानं तर आमचं जीणचं मुश्किल केलयं."
"मी धीटपणे उभी राहिली! हातात चप्पल शिवायला घेतली.. लाज कसली यात? घरातली चूल बंद झाली तर कोणी मदतीला येतं का? कष्टाची कमाई करायला लाजायचं कशाला?
मंजुषाताई मनातून बोलत होत्या.. मी ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो.
(नुसत्या 'चांभार चौकशा'करत नव्हतो! 😊)
"गेल्या पंधरा वर्षांपासून मी इमानेइतबारे हा व्यवसाय करतीय, सरकारच्या मदतीने टपरी मिळालीय. मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. थोरला मुलगा विरेन एमसीए झालाय. तो नोकरीच्या शोधात आहे. धाकटा दहावी शिकलाय. तो टू व्हिलर गाड्यांना कव्हर बसवून देण्याचं काम करतोय. मुलगी दहावीत शिकत आहे."

"रोजच्या कामातून मला दोन-तीनशे रूपये मिळतात, मुलांचे शिक्षण, घरखर्च सांभाळणे कठीणच आहे. त्यात नवऱ्याला कधी काम मिळते कधी नाही! सासऱ्याने घेतलेलं घर आहे पण ते फारच छोटं आहे. बाहेरची चार माणसं आली तर अवघडच होतं. त्यासाठी स्वतःचं हक्काचं घर असावं! असं मला वाटतं.. मुलामुलींचे शिक्षण, लग्न, संसार यामुळे स्वतःचं घरं होईल की नाही हे सांगणं कठीणच आहे."
"आज आमची कला यांत्रिकीकरणामुळं हातून निसटून मोठमोठ्या व्यावसायिकांच्या हातात गेली आहे. त्यातून मूठभर लोकांनी संपत्तीचा डोंगर उभा केलाय, त्याचवेळी या कलेचा खरा मानकरी मात्र दारिद्रयाच्या अंधारात चाचपडत आहे."
मंजुषाताईचे शेवटचे बोल ऐकून अंगावर काटा उभा राहिला. कारण इतरांच्या पायांची काळजी घेणाऱ्या चर्मकाराचे आयुष्य आज यांत्रिकीकरणामुळे मातीत जाण्याची वेळ आली आहे. या समाजाला आज पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे समाजाचे, शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.

पोटाच्या वीतभर खळग्यासाठी नाल्याच्या कडेला ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबाचा चरितार्थ पेलवत असणाऱ्या मंजुषाताई रावखंडे यांचे कार्य निश्चितच प्रंशसनीय आहे.
©विकास पांढरे, पुणे

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...