पवळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पवळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

शाहीर पठ्ठे बापूराव

मराठी शाहीर परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. बापूराव यांची यंदा दिडशेवे जयंती वर्ष सुरु आहे. या शाहीराच्या कलेचे स्मरण व्हावे म्हणून हा प्रपंच.

शाहीर पठ्ठे बापूराव
 मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि परंपरा म्हटले की,संत, पंत आणि तंत परंपरेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहीर परंपरेचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी साहित्य परंपरेच्या दालनात मोलाची भर घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे 'लावणीसम्राट' होत.
पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून  त्याला तमाशात पेश करायचे काम पवळाने केले म्हणून १९ शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिले जाते.

 पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे वाळवे तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या छोट्याशा गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले हे पोरं. लाडाने त्याला बापू म्हणत. पुढे हाच बापू तमाशा क्षेत्रातला तेजस्वी तारा बनला. जेमतेम चौथी पर्यंत शिकलेले हे पोरं शब्दरचना करण्याच्या नादात औंध संस्थानातील नोकरी सोडून तमाशाच्या फडात कवने करू लागला. बापू ( श्रीधर) ने तमाशाचा नाद सोडवा, यासाठी त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न करून पाहिले. यातून बाहेर काढण्यासाठी शिंगणापूरच्या शंभू महादेव बडव्याची मुलगी सरस्वती हिच्याशी श्रीधरचे  लग्न उरकून टाकले. लग्नानंतरही संसाराच्या जबाबदारीत बापूला आपले कवित्व स्वस्थ बसू देत नव्हते. त्याकाळी त्याने सरळ मुंबई गाठून किसनदादा गवळी,  आशन्ना कामाठी यांच्या तालमीत काम करू लागला. बालपणापासून कवितेची आवड असलेल्या बापूचे नाव अल्पावधीतच मुंबापुरीत गाजू लागले. बापू अनेक लढती जिंकू लागल्याने रसिक प्रेक्षकातून 'शाब्बास पठ्ठे ! बापूराव शाब्बास' अशी आरोळी ऐकू येऊ लागली.

 तेव्हापासून मराठी लोक परंपरेत पठ्ठे बापूराव हे नाव परिचित झाले. याच काळात हिरकणी पवळा हिच्याशी त्याची ओळख झाली.  तमाशात हे दोघे जोडीने काम करू लागले. पुढे हीच जोडी १९ व्या शतकातील तमाशा क्षेत्रातील अजरामर जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. संगमनेरजवळील हिवरगावच्या तबाजी महाराची ही मुलगी. देवाला मुरळी म्हणून सोडलेली पवळा दिसायला गोरीपान होती.
पवळा

ऐन तारुण्यात पठ्ठे बापूराव आणि पवळा यांची जोडी जमली. बघता बघता या दोघांची अदाकारी पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होऊ लागली. पुढे एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रितीरिवाज पाळण्याच्या काळात बापूराव आणि पवळाची प्रेमकहाणी गाजत होती. बापूराव ब्राह्मण तर पवळा महार. यामुळे लोकांत वितंडवाद झाला. भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा ही सुद्धा ठरली.

 या प्रकरणामुळे बापूराव - पवळाचा फड काही दिवस बंद पडला. हातावरचे पोट असलेल्या बापूरावांनी कंञाटदारांना एकञ बोलावून शेवटी म्हणाले, "आम्हाला विकत तरी घ्या किंवा आमचा लिलाव करा" शेवटी एल्फिन्स्टन थिएटरचे मालक अबुशेट यांनी बापूराव -पवळा यांचा दरमहा नऊशे रूपयांवर लिलाव घेतला. कलावंत साथ देत नसल्याने बापूराव हतबल झाले. बापूराव,अबूशेटला म्हणाले, आम्हाला नुसते बघायलाही लोक फार येतात.  तेव्हा आम्हा उभयतांना पाहाण्यासाठी तिकिट लावले तरी गल्ला जमेल, असे सांगितले.अबूशेटने तसेच केले आणि दोन आण्याच्या तिकिटांची दररोज दोन चारशे रुपयांचा गल्ला जमू करू  लागले. गर्दी वाढू लागल्याने बंदोबस्ताची गरज भासू लागली.  त्यातच लोकात बाटला की न बाटलाचा वाद चालू होता. पोलिसात तक्रारी गेल्या आणि या सार्‍याला कारणीभूत तुम्ही आहात, तुम्हाला हद्दपार का करू नये, अशी नोटीस होऊन खटला कोर्टात गेला. ११ आॅक्टोबर १९०५ पर्यंत हा खटला चालला. पुढे कोर्ट स्वतः बापूरावांचा तमाशा बघायला आले. बापूरावांनी यावेळी स्टेजवर स्वतःचे जीवन चरित्रे सांगितले.

 "ब्राह्मणाचे महार होता येईल ; पण महाराचा ब्राह्मण होता येणार नाही. नामचंद पवळाने मला महार होण्याची अट घातली आणि ती मान्य केली, हे फक्त जाणते लोकच जाणतील. मग ती आता महार झालो आहे, तो ठीक आहे". याची प्रचिती म्हणून काय, पवळाने बापूरावाला आपल्या हाताने जेऊ घातले. मग हा वाद संपला. पुढे या दोघांनी मिळून  'मिठराणी' हा सुप्रसिद्ध वग तयार केला. कोल्हापूरात छञपती शाहू महाराजांच्या समोर हा वग सादर करून महाराजांचे मन जिंकले. या दोघांनी पुण्यात काही काळ राहून रेठर्‍यात आले. पवळाने बापूला बाटवले म्हणून तिचा तिरस्कार होऊ लागला. पवळा नाराज होऊन पुण्याला निघून गेली. गावकर्‍यांनी वर्गणी करून तीन हजार जमा करून  बापूरावाला काशीला जाऊन धर्मांतर शुध्द होऊन जातीत यावे म्हणून पैसे दिले. बापूराव काशीला न जाता पुण्याला आले. त्यांनी ते तीन हजार रूपये पवळाला दिले आणि म्हणाले, "एकदा महार झालो तो झालो. आता धर्मांतराची जरूरी काय? पण पवळाचे मन विटले होते. या दर्दभरी कहाणीचा शेवट शोकात्म होत होता.  दोघांमध्ये चिडचीड सुरू होऊ लागली आणि एकदिवशी हे दोन पाखरे विभक्त झाली. पवळाने तमाशाला रामराम ठोकून आयुष्य जगू लागली. पुढे हे दोघेही अत्यंत हलाखीत जीवन कंठीत होते.स्वतःचे जीवन लावणीत सांगताना पठ्ठे बापूराव म्हणतात :-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण, असूनी सोवळे ठेवले घालून घडी !
मशाल धरली हाती तमाशाची लाज लाविली देशोधडी !
असे जीवन चरित्र असलेल्या पठ्ठे बापूरावाची लावणीरचना दोन लाखांहून अधिक आहे. तर रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली.
संग्रहीत चित्र

पवळा हिच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशाप्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात  याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तर बापूरावविषयी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे 'लावण्यांचे विद्यापीठ' असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला 'ओलेती' या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल, पारंपरिक स्वरसाज... सारेच काही और!
"श्रीरंग सारंगधरा, लाजुनी धरिते उरा
चला नेते माझ्या मंदिरा
हो, उडवा रंग, रंग, रंग
तुम्ही माझ्या महाली चला ना
थाट विलासी केला भला ना
गुलाबाच्या फुलांचा झेला
जागोजागी मी खोविला पहिला
तुम्हा पचला, तर मग उचला
नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग...'
त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार "मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग' अशा बेहोषीच्या उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात.
यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व लक्षात येते.

लेखक - विकास पांढरे,९९७०४५२६७
       
शाहीर पठ्ठे बापूराव
जन्म नोव्हेंबर ११, १८६६
रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
मृत्यू२२ डिसेंबर १९४५
पुणे


संदर्भ :-
 १)मराठीचे लोकनाट्य तमाशा  कला आणि साहित्य : लेखक नामदेव व्हटकर
२) प्रतिष्ठान खंड २

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...