साहेबराव करपे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहेबराव करपे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ मार्च, २०१७

हॅलो, मी साहेबराव करपे बोलतोय !


साहेबराव :-  हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय...

सरकार :   ....

साहेबराव :- सरकार... यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात माझी शेती होती.वाडा होता.घरात वारकरी संप्रदायाचा वारसा होता. येळ मिळेल तवा भजनात दंग व्हायचो. चाळीस एकर शेती मन लावून करायचो. माझी पत्नीही मला साथ द्यायची.. आपली शेती अन् भजन बरं! यातचं आम्ही समाधान मानायचो. ध्यानीमनी नसताना गावकऱ्यांनी मला सरपंच केलं.. अकरा वर्ष सरपंचपद भोगलो, पण आम्हा कुणब्याला यातलं काय समजलं नाय, काळी आईची सेवा करण्यात आमची जिंदगाणी गेली.. कुठलं आलं ते राजकारण..

सरकार :-  .....

साहेबराव  :- सरकार काय सांगू ? आमचा भाग दुष्काळी. हमखास पाऊस देणारी नक्षत्रं कोरडीच गेली होती. लोक हवालदिल झाली होती. घरात अन्न नव्हतं.. हातात पैसा नव्हता..डोक्यावरचं कर्ज वाढतच होतं..गुंठा गुंठा विकत गेलो पण कर्ज काय फिटलं नाय.. कापसाला भाव मिळत नव्हता.. वीजेचं बिल यायचं तेच फेडत बसायचो. सगळा इस्कोट व्हायचा.. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं घरात कधी सण साजरा केला नाय.दिवाळीत मात्र कालावाकालव व्हायची, माझ्या चिमुकल्याना ना नवीन कपडे ,ना फटाके दयायची ऐपत नसायची. चटणी भाकर खाऊन बछडे वाढवली. 

बायकोला ना कधी नवीन साडी घेऊन देता आली. या फाटक्या संसारात काळी आईची सेवा करत राहिलो. जित्राबात मन लागत होतं. माझ्या दोन खिल्लार बैलजोडीवर सर्व शेत नांगरत होतो. त्यांच्यामुळं बळ मिळायचं. पण कर्जापायी आठवडी बाजारात त्यांना विकून आलो. इथंही व्यापारी आणि दलालानं गंडवलं. असं सगळं सुरू होतं सर्व ते सहन होतं नव्हतं, सरकार, सर्व पुढे आक्रीतच घडत गेलं....

सरकार :-

साहेबराव :- "पावसाची वाट पाहून व्याकुळ झालो होतो, देणेकरी रोज दारात येऊन बसायचे, तुमच्या बँकेचे लोक यायचे. म्हणायचे- फेडता येत नाही तर घेता कशाला ? मी अगदी शांत ऐकायचो, थकीत वीज बिलापोटी वीज तोडणी करण्यात आली.  ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला होता.. कर्ज आणि बिल फेडण्याची चिंता लागून राहिली होती.
"ती" जमिनीत पाय रोवून उभी राहात म्हणायची,
"पाऊस येतोय न्हवं का"  आशाभूळत नजरेने आभाळाकडं एकटक बघायची. कधी कर्ज फेडू आणि सुखाचा संसार करू असं तिला वाटायचं, माझं पिल्लं ही खूप गोड होती. त्या निरागस बालकांना रानशीळ खूप आवडायची.. मातीच्या सुवासाने गंधित झालेला वारा, हिरवी मखमल पांघरलेले रान, रानात आपल्याच नादात ती सर्व जण खेळत, बागडत...रंगीबेरंगी पक्षी, गायवासरे, पक्षाची आणि जित्राबाची गोड सुरावट ऐकून ते आनंदित आसयाची. त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हर्षोल्हास व्हायचा, आज ३१ वर्षानंतर पुन्हा मन भरून आलं. आज माझ्या मुलांची लग्ने झाली असती. कुणी शेत, तर कुणी घराकडं लक्ष दिलं असतं, आम्ही दोघं म्हातारी, ढालजत स्वस्थ पडून बघायचं..एवढं स्वप्न आमच्या नशीबी नव्हतं.....

सरकार :-

   साहेबराव :- सरकार, काही तरी नवीन करावं? असं काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही पती-पत्नीनं  मनाशी ठरवलं.मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलो,
 १९ मार्च १९८६ रोजीचा दिवस. मी, पत्नी आणि चार मुलांसह कुष्ठधामात आलो. तिथं खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीनं भजने गायलो. सोबत आणलेल्या स्टोव्हवर बायकोनं भजी तळली. त्यात विषारी औषध मिसळलं. मुलांना भजी खायला दिलो.एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ बायकोसह मी ही जगाचा निरोप घेतला. आज या घटनेला ३१ वर्ष पूर्ण झाली. सरकार, मी कुणालाही दोष दिला नाही? तसं चिठ्ठीत लिहून ठेवलो होतो. त्यामुळं अनुदान, कर्जमाफी, तातडीची मदत असं काही अशा आणि अपेक्षा नव्हत्या, कारण, शेतकरी जात स्वाभिमानी असतीय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, मी जागतिकीकरणाचा पहिला बळी ठरलो, अशा बातम्या छापून यायच्या, ९० नंतर जागतिकीकरणाचं युग सुरु झालं. त्या काळात माध्यमांचं इतकं पेव फुटलं नव्हतं. शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार पूर्वापार चालत आलाय. शेतकरी आत्महत्या माझ्यापासून सुरु झाल्या अशी नोंद आहेत.पण माझ्या ही आधी कुणी तरी केली असेल, त्याची फक्त दखल घेतली नसेल?आज शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.  केंद्राचे पथक येऊन गेले.निधी मिळाला पण आत्महत्या काय कमी होत नाहीत. पी.साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणं २००५ पर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१७ पर्यंतचा आकडा सांगू नका?

मागे एकदा-
"पंतप्रधान म्हणाले,
घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात,
सरकार तुम्हीच सांगा?देशाचं आणि राज्याचं नियोजन जमलं नाही म्हणून तुम्ही आत्महत्या केल्या होत्या का ? कुणी साले म्हणाले, तर कुणी धरणात...काय काय?
सरकार :-
साहेबराव :- मायबाप सरकार, मला माहित आहे, कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात, सरकारला एकांगी, एककल्ली, एकदेशीय भूमिका घेता नाही.पण जिवंत माणूस जेव्हा आत्महत्या करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्य, न्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
नापिकी,दुष्काळ, वाढत्या उत्पादन खर्चामुळं न परवडणारी, ढासळून पडणारी कृषी व्यवस्था यामुळंच रोज एक 'बळी'चा बळी जातोय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, आमची अजून किती परवड होणार? .शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेची चावी किती वेळा घेता ?आज विरोधी पक्षात असलेले काल सत्तेत होती, आज सत्तेत असलेली मंडळी काल विरोधी पक्षात होती. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला परवडेल असा भाव द्या साहेब, भांडवलदार, उद्योगपती आमच्या जमीनी  कमी मोबदल्यात घेऊन  डल्ला मारतायेत,  जमीनविषयक नवे नवे कायदे आमचा घात करणारी आहेत. 

सरकार :-
साहेबराव :- सरकार, हरितक्रांती, धवल क्रांती चा मूठभर लोकांना फायदा झाला. मागे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफीचा आम्हाला कितपत फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. मायबाप सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. खेडी ओस पडताहेत. आमचा शेतकरी शेती, बैल, बारदाना, गुरे -ढोरे, गाई-वासरे, झाडे यांच्याशी अंत:करण पूर्वक जोडला गेलाय. आज त्यांच्या मुलांची शेतीकडे बघण्याचा कल बदलत चाललाय. माझा बाप शेतीत मेला, मी मरणार नाही, ही त्याची भूमिका बनत आहे. त्याची ही मानसिकता बरोबर आहे. पण माझी काळी आई कोण सांभाळेल. नव्या बदलांमुळं त्याचं होरफळलेलं मन फक्त तुम्हीच बदलू शकता तरच जगाचा पोंशिदा जगेल. एवढीच मागणी मान्य कराल, अशी अपेक्षा आहे.    
       धन्यवाद    
         आपला
 साहेबराव करपे, पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी

  लेखक - विकास पांढरे, मु.पो.इटकळ, ता.तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद. मो.९९७०४५२७६७ ईमेल आयडी : vikaspandhare3@gmail.com
(टिप : वरील आशय कल्पानिक आहे, त्यामुळे व्यक्तिंशा कुणी अर्थ काढू नये. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रकट केलेल्या भावना आहेत.)

फोटो :इंटरनेट सेवा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...