दुष्काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुष्काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

उद्याचा दुष्काळ टाळण्यासाठी...



राज्यावर अस्मानी संकट उभे राहिले आहे.पिके करपली आहेत, पाणी आटले आहे, जनावरांचा चारा महागला आहे, दावणीचे गुरे सांभाळणे मुश्किल झाले आहे, शेतकऱ्यांचे मने कोमजली गेली आहेत. सरकारपुढे आव्हान उभे राहिले आहे. दुष्काळ सांगून येत नसला तरी तो आमच्याच वाट्याला का येतोय? यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. उत्तरे शोधली पाहिजेत, नाहीतर येणारा काळ आपणाला माफ करणार नाही.

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाची गडद छाया आहे. १८० तालुक्यात अस्मानी संकट उभे राहिले आहे. रब्बीची जमतेम पेरणी झाली आहे. खरीप हाताला लागणे कठीण आहे. मराठवाड्यात ही भीषणता अधिक आहे. काही गावात पाणीटंचाई सुरू आहे. परंड्यात पाच रूपयेला घागरभर पाणी मिळत आहे. राज्यात लातूरसारखी परिस्थिती उद्भभवू शकते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता उर्वरित जिल्ह्याला काही प्रमाणात दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात  फळबागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपडतोय. सध्याचा काळ कठीण असला तरी हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी शर्थीचे प्रयत्न करतोय. अशीच भीषणता एप्रिल-मे पर्यंत राहिली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार आहे. हे वर्ष उजाडले की लगेचच लोकसभा-विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे दुष्काळ हा राजकारणाचा मुद्दा बनेल.दुष्काळाला मूठमाती देण्यासाठी कुणाचेही लक्ष नसेल. आता सजग नागरिकांनी पुढे आले पाहिजे, दुष्काळावर विजय मिळवला पाहिजे.

आपल्याच वाटयाला दुष्काळ का येतोय?

 मानवी जीवाला जगण्यासाठी निसर्ग, पाणी व माती हे तीन घटक अतिशय महत्वाच्या असतात. नैसर्गिक घटक जिवंत असतील तर मानवी जीवन सुखकर असते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीतून वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचे महत्व विशद केले आहे.

नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी
महावने लावावी ! नानाविधे

१२व्या शतकात जे ज्ञानेश्वर महाराज यांनी कळले होते ते समजून घेण्यासाठी आपल्याला ८००वर्षे लागत आहेत. आज पाणी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.आपल्याकडील काही राज्यकर्त्यांनी लहान मोठ्या जलाशयांची, कालव्यांची, धरणांची, बारवांची सामाजिक गरजेनुसार निर्मिती केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीत १८६७साली स्वतंत्र पाटबंधारे विभागाची स्थापना झाली. १८७०मध्ये कृष्णा कालवा सिचंन कामाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील पहिले सिंचन प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात लहानमोठ्या मिळून ४००च्या आसपास नद्या आहेत. गोदावरी, तापीसारख्या नद्यावर धरणे उभारली गेली आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निम्यांहून अधिक धरणे आहेत. तरीही या राज्याच्या वाटयाला दुष्काळ असेल तर तो दुष्काळ अस्मानी नसून तर नियोजनाचा, सरकारी अनास्थेचा दुष्काळ आहे. गोदावरी नदीवरच केवळ दोनच ठिकाणी पाणी अडविले जाते. बाकीचे पावसाचे पाणी आंध्र -तेलंगणामध्ये जाते. कृष्णा आणि भीमा नदीचे हे असेच आहे. या नद्यांचे पाणी कर्नाटक जाते. उन्हाळा आला की महाराष्ट्र कोरडा असतो. त्यामुळे ना जनावरांना पाणी मिळते ना नागरिकांना. पुन्हा दुष्काळ जाहीर करावा लागतो, असे कित्येक वर्षांपासून चालत आले आहे. ना निसर्गाचे पाणी अडवता येते ना धरणातल्या पाण्याचे नियोजन करता येते.

आपल्या देशात सरासरी ५०से.मी पाऊस पडतो. बदलत्या हवामानांमुळे हे प्रमाण कमी झाली आहे, असो. इस्त्रायल हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षा खूप लहान देश आहे. या देशात केवळ १६से.मी इतकाच सरासरी पाऊस पडतो. तरीही हा देश अन्नधान्य आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. कृषि क्षेत्रात अव्वल तर दुध उत्पादनात अग्रेसर आहे. इतकेच नव्हेतर धान्य निर्यातही एक पाऊल पुढे आहे. भारतात पावसाचे प्रमाण सरासरी ५० से.मी म्हणजे इस्त्रालय देशाच्या पाचपट असूनदेखील आपल्याकडे दरसाल दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी इस्त्रायल धडपडत आहे. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून शेती क्षेत्रात अभिनव प्रयोग घडवून आणण्यात आहे. इस्त्रायल मध्येही दरसाल दुष्काळ पडतो. हा देश दुष्काळाचे राजकारण न करता शाश्वत सिंचनावर विचार करतात, त्यासाठी सर्व क्षेत्रातील जाणते एकत्र येतात, चर्चा करतात, कायदा करतात. आपल्याकडे असे का होत नाही?  एका अभ्यासाद्वारे असे लक्षात आले की, भारतात ४००दशलक्ष हेक्टर पाऊस पडतो व २०दक्षलक्ष पाऊस हेक्टर पाणी बाहेरून वाहून येते या ४२०दक्षलक्ष लिटरपैंकी नद्यांमध्ये १६०व ६७दक्षलक्ष हेक्टर लिटर पाणी भूजलाच्या रूपात आहे. २४७ दक्षलक्ष हेक्टर पाण्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याच्या वापराबद्दल व पाण्याच्या दुरूपयोगात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे पाणी वापराबाबत या देशात एकसारखा कायदा नाही.यावरुन आपण इस्त्रायलपेक्षा किती मागासलेले आहोत हे लक्षात येते. म्हणूनच आजपर्यंत भारत दुष्काळावर मात करू शकला नाही.

आपल्याकडे भूगर्भाताील पाणी उपसव्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच देशातील पाणी प्रश्न अधिक बिकट बनला आहे. आपल्यासारख्याच दक्षिण अफ्रिकेत दुष्काळ पडतो. या देशाने १९९८ साली नॅशनल वॉटर ऍक्ट तयार केला आहे. या ऍक्टनुसार गंभीर दुष्काळ पडला असला शेतीला पाणी वापरता येत नाही. लोकसंख्येच्या मागणीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येते. युनायटेट स्टेट्समधील राष्ट्रे पर्जन्यमान, पाणी वापर आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत खूप जागृत आहेत. हे देश दुष्काळी राज्यात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करतात.शेतीसाठी शाश्वत पाण्याचा शोध घेतात. नुसत्या सांडपाण्यावर ऑस्ट्रोलियात ४२०० हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. या सांडपाण्यावरच जनावरे पुसली जातात. ऑस्ट्रोलिया हा असा देश आहे  की  ७५टक्के पाण्याचा पुनर्रवापर करण्याचा प्रयत्न करतोय.

शेतीला शाश्वत सिंचनाची जोड हवीच

मराठवाडयात सिंचनाची सुविधा केवळ १८टक्के शेती क्षेत्राला उपलब्ध आहे. उर्वरित ८२टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्राचे ४८टक्के तर विदर्भाचे २८टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमीच आहे. सिंचन सुविधेच्या अपुऱ्या विकासामुळे विदर्भ-मराठवाडा हा भाग मागे आहे. आंध्रप्रदेश हा देशातील पहिले राज्य आहे की ज्या राज्याने भविष्यातील जलसिंचन संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणले. हिमाचल प्रदेशमध्ये 'कोहीली' शेतकऱ्यांमार्फत सिंचन व्यवस्था केली जाते. शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन केली जाणारी पध्दत हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिध्द आहे. हा पध्दतीत शेतकरी काम करतात. जवळजवळ एक शतकाहून अधिक काळ ही पध्दत रूढ आहे.

महाराष्ट्राला 'जाणते'नेते लाभूनही सिंचनात आपण स्वयंपूर्ण बनू शकलो नाही. राळेगणसिध्दी, शिरपूर, हिवरेबाजार, पळसखेडा, कडवंची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे पाणलोट कामात अग्रेसर आहेत. या गावांनी पाण्यातून प्रगती साधली आहे उर्वरित गावांचे काय? याकामात सरकार कमी पडत आहे की लोकांची इच्छाशक्ती. सिंचनासाठी आतापर्यंत ५आयोगांनी काम पाहिले आहे. आयोगाच्या शिफारशी राज्यकर्त्यांनी स्विकारल्या का? पाणलोट अंतर्गत जी कामे झाली ती बहुतेक ठिकाणी 'माथ्याकडून पायथ्यांकडे' या तत्वानुसार कामे न करता जिथे जागा मिळेल त्याठिकाणी कामे केली गेली आहेत. मृद व जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे याविषयी प्रभावी शिक्षण-प्रशिक्षण होण्याची गरज होती, ती गरज पूर्ण झाली नाही. रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या पाणलोट कामांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना ही तात्कालिक उपाययोजना ठरत आहे असे काही जलतज्ज्ञांचे मत आहे. हे वास्तव आहे.कारण जलयुक्त शिवार योजनेतून झालेली सर्व कामे ही लहानसहान नाला-ओढयांवर झालेली आहेत. एखाद्या वर्षात पाउस नाही पडला तर  ते पात्र कोरडे पडते. हे आजच्या दुष्काळावरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळावर रामबाण उपाय नाही.त्यामुळे सरकारला ठोस उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्यातील भौगोलिक रचना, पर्जन्यमान, भृपृष्ठ स्थिती, लोकांचे पाणी वापराचे नियोजन, बाष्पीभवनाचे नियोजन या घटकांचा विचार करून पाणी अडवा, पाणी जिरवा, माथा ते पायथा सारख्या कार्यक्रमांचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
चितळे आयोगाच्या अहवालानुसार ''राज्यातील लागवडी योग्य क्षेत्रांपैंकी १३टक्के क्षेत्र पाण्याच्या दृष्टिने अतितुटीचे,३२टक्के क्षेत्र तुटीचे ३४टक्के क्षेत्र सर्वसाधारण पाणी उपलब्धतेचे,६टक्के क्षेत्र विपूल पाणी असलेले तर १५ टक्के अति विपूल पाण्याचे आहे. अतितुटीच्या खोऱ्यात जास्तीचे पाणी असलेल्या खोऱ्यातील पाण्याचे वहन करण्याच्या योजना राबविण्याची गरज आहे.''

''राज्यातील कृषिक्षेत्र हे केवळ पावसावर अवलंबून न राहता, सिचंनाच्या आधारावर शेती केली जावी असे कौटिल्याचे मत होते. त्यासाठी तलाव बांधणे, सिंचन व्यवस्थांचे संरक्षण करणे, पाण्यानुसार पीक पध्दत आखणे.'' असे विचार कौटिल्याने मांडले होते.

रंगनाथन समितीच्या अहवालनानुसार मराठवाडयातील६९ टक्के भाग हा दुष्काळी आहे. सध्यास्थितीत १००हून अधिक प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. मराठवाड्याचा गोदावरी खोऱ्यात ८८टक्के भाग येतो तर कृष्णा खोऱ्यात १०टक्के भाग येतो. नैसार्गिक न्यायाने मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे, आजपर्यंत तसे झाले का? त्यामुळे दुष्काळ हा मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. एकूणच महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करायचे झाले तर शेतीसाठी शाश्वत पाणी शोधणे, नद्या वाचवणे, झाडे लावणे,
पाण्याचे समन्यायी वाटप करणे,  सिंचन विकास, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याचे ताळेबंद तयार करणे, ठिंबक सिंचनाचा प्रभावी वापर करणे,शेडनेटचा वापर करणे, आदींचा गंभीर विचार करणे आवश्यक आहे तरच उद्याचा दुष्काळ टळणार आहे.
-विकास पांढरे,९९७०४५२७६७



बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

काळ तर मोठा कठीण आला









विकास पांढरे

 १८८९ च्या कालखंडात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची धग इतकी मोठी होती की शेतकऱ्यांचं जीणं मुश्कील झालं होतं. ही दैनिवस्था आधुनिक मराठी कथेचे जनक हरिभाऊ आपटे यांनी आपल्या 'काळ तर मोठा कठीण आला'या कथेतून मांडली आहे. आज २०१७ चं वर्ष चालू आहे. इतक्या वर्षानंतरही आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके तितक्याच प्रकर्षानं जाणवत आहेत. आपल्या राज्यकर्त्यांना अद्यापही यावर तोडगा काढता आला नाही ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. आज मराठवाडा आणि दुष्काळ समीकरण होऊन बसलंय. यंदाही पावसानं दीर्घकाळ खंड टाकला. शेतकऱ्यांवर दुबार,तिबार पेरणीची वेळ आली. शेवटी आँगस्ट महिना निम्म्या झाल्यावर पावसाची समाधानकारक सर कोसळली पण तोपर्यंत पिकं वाळून गेली होती, शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवायला सुरुवात केली होती. वाळलेल्या पिकांवर पाऊस पडून काहीच फायदा नव्हता, सगळचं स्वप्नं धुळीस मिळाले होते. आता फक्त ४७ लाख १६२ हजार क्षेत्रावर 'पालापाचोळा'शिल्लक राहिला आहे. त्याचं खत तयार होईल,भूईला समाधान होईल, पण शेतकऱ्यांचा जीव मात्र झाडाला टांगला जातोय.खरीप पिकांची धूळधाण आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळं आपल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. सहा ते १३ आँगस्ट २०१७ च्या आठवड्याभरात तब्बल ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही या भागातील शेतकरी आत्महत्येचा शाप संपत नाही. त्यामुळं या विभागात 'काळ तर मोठा कठीण आला' आहे असं, म्हणावं लागेल.


पिकांचा पालापाचोळा

मुंबईच्या रूटीन जीवनाला थोडसं बाजूला ठेवून मी १३ आँगस्ट रोजी आमच्या मराठवाड्यात गेलो. आमची वस्ती रानात असल्यानं माझं पहिलं पाऊल काळ्या मातीत पडलंं. पावसाळ्यात हिरवंगार दिसणार शेत यंदा मात्र भयान शुष्क वाळवंटासारखं  दिसलं,काही क्षण विचारात पडलो. फेसबुकवर याबाबत फक्त मत व्यक्त करत होतो. प्रत्यक्ष पहिल्यावर मात्र अंगावर काटा उभा राहिला.

 माझ्या वडिलांना म्हणजे नानांना (दत्ता) चार भाऊ. शिवाजी अण्णा, तानाजीदादा,पंडीत अप्पा, अण्णाराव नाना आणि आमचे वडील दत्तानाना असे पाच भावडं. अण्णा, दादा हे सत्तरी पार केले आहेत.अप्पाचं ही सत्तरीकडं वय झुकलंय. अण्णाराव (बारका नाना) हा सगळ्यात धाकला. प्रत्येकाला दहा एकर जमीन हिस्साला आली होती. परिस्थितीमुळं काही वर्षापूर्वी आमचं शिंद्याचं शेत विकावं लागलं. थोड्या उरलेल्या पैशातून विहीर, बोअर घेतली,पाणी लागलं.शेत पिकू लागलं. पण गेल्या दहा बारा वर्षापासून असमानी आणि सुलतानी संकटांमुळं शेती तोट्यात येऊ लागली आहे ती आजपर्यंत त्याच अवस्थेत आहे.

घरी सकाळी अंघोळ केल्यावर शेतावर फेरफटका  मारला. आमचे नाना बोअरच्या वायरचं काम करत होते. मिरच्याचं रोपं आणलं होतं. त्या धांदलीत ते होते. "कवा आलास, मुंबईकडं भरपूर पाऊस हाय म्हणं," आपल्याकडं पाऊस नसल्यानं,आपलं मूग,सोयाबीन वाया गेलं बघ,गेलंसाली धो,धो पाऊस पडला सोयाबीन वाहून गेलं. यंदा पाऊस नाही, सगळं पिकं  जळून गेलंय, हे सांगताना त्यांचा चेहरा हताश झाला होता.

साळीच्या पट्टीत बरका नाना दिसला. हा सगळ्यात धाकला चुलता. यंदा रोहिण्यात चांगला पाऊस पडल्यानं कधी नव्हं यंदा बासमती तांदळाची लागवड केलीे. सकाळी साळी हिरव्यागार दिसत होत्या. दुपारच्या येळला सुकुलेल्या अवस्थेत होत्या. काही साळीवर कोळपे फिरवून रान रिकामं करताना ते दिसले. नाना, मला बघताच, उपसत असलेली साळी हातातून खाली टाकली, बोलू लागले, मुंबई मोठं शहर हाय म्हणं जपून राहा. असा धीराचा सल्ला दिला. 
मी पावसा पाण्यावर बोलू लागलो, तेव्हा नाना म्हणाला, काय सांगू पोरा, शेती आपल्याला परवडत नाय, पण तिला सोडून कसं चालणार, वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे. खेटत जगू,पण शेती सोडणार नाही. यंदा सोयाबीन, मूग बेस्ट आलंय,पाऊस पडला असता तर रानातं चांगलं घर बांधलं असतं. दीड महिना झालं पावसानं दडी मारलीय, सोयाबीनात जनावरं सोडलोय जावून बघ, आता पाऊस पडला तरबी काहीच हाती लागणार नाही, साळी तवढ्या हाती लागल्या तर बरं होईल, असं म्हणून ते आपल्या कामाला लागले.
    तीनकुनीत दादा,नामभाऊ आणि मीरा वहिनी उडीद,मका उपसून काढत असल्याचे चित्र दिसले. या पत्रकार साहेब,आमच्या व्यथा तुम्ही तर मांडा, असं नामभाऊनं थट्टेवारी पण गंभीर होत माझं स्वागत केलं. यंदा पेरणी सगट वीस पंचवीस हजार खर्च आला. पावसानं काहीच करामत केली नाही म्हणून करपत असलेलं उडीद, सोयाबीन हाताने काढतोय. मंजूर लावून काढा,असं मी म्हणालो, विकू,अख्खा शेतात एक पायलीभर उत्पन्न निघणार नाही. मजूरीला पैसे कुठून आणू? असा प्रतिप्रश्न केला. दादा,म्हणाला,पोरा तुझं खरंय, तुझ्या पुढच्या पिढीचं कसं, त्यांना आधार देणारा कोण आहे ? तू तिकडं राहतूस.आमचा जीव शेताकडं बघून कासावीस होतं बघ. दादाचे बोल ऐकून माझे डोळे पाणावले.

 आँगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी पावसाचा पत्ता नव्हता.त्यामुळं शेतीची माती आणि पिकांचा पाचोळा झाला होता. ही व्यथा फक्त पांढरे कुटुंबा पुरता मर्यादित नाही तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड,औरंगाबाद, जालना,परभणी आणि हिंगोली  जिल्ह्यातील असंख्य बळीराजाची ही वेदना आहे.

 मराठवाड्यात १३ आँगस्ट पर्यंत केवळ ३२.७ टक्के पाऊस पडला होता. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक कमी २४.०९ इतका पाऊस झाला. मराठवाड्यातील ४९ लाख १०९ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४७ लाख १६२ हजार क्षेत्रावर प्रत्यक्ष खरीप पेरणी झाली म्हणजे जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. या क्षेत्रावरील संपूर्ण पिके पावसा अभावी वाया गेली असून शेतकऱ्यांची संपूर्ण मदार रब्बी हंगामावर आहे. मात मराठवाड्यात रब्बी रब्बी हंगामाचं क्षेत्र अल्प आहे. एकूणच हा हंगाम ही मराठवाड्याला अस्मानी संकटात घेऊन गेला.

आत्महत्येचा फास सुटेना

 मराठवाडा हा भाग गेली दोन दशके दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय,कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीने इथला शेतकरी कंगाल होतोय.२०१५-१६ च्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी उठतोय न उठतोय तोपर्यंत यंदा पुन्हा अस्मानी संकटानं नवं संकट उभं केलं. यंदा शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून खरीपाची पेरणी केली, हाती मात्र काहीचं लागलं नाही. वरुणराजाच्या दडून बसण्यानं असंख्य घरं उध्वस्त झाली. गावातली माणसं शहराकडं स्थलांतरित झाली. गावात आता फक्त होरपळून गेलेली मने नजरेस पडतात. सरकारचं कुचकामी धोरणामुळं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांपुढ कोणतीच किरणे दिसतं नाहीत, दिसतोय फक्त अंधार. अंधारात चाचपडत असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचं उजेड दाखविण्यात आला, पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही, हे पुन्हा आत्महत्येच्या आकडेवारी वरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांपुढं दरसाल अस्मानी व सुलतानी उभं राहतंच आहे. आपली अवस्था मात्र कर्जमाफीच्या पुढे जायला काही तयार नाही. कर्जमाफीचं फक्त आमिष दाखवत राहायचं, निवडणुका जिंकायच्या अन् राजकारण करत जायचं. यामुळं  सामान्य शेतकरी भरडला जातोय याकडं कुणाचंही लक्ष नाही. शेतकरी आत्महत्येची फुगणारी आकडेवारी सुध्दा लक्षात घेतली जात नाही.

 २००२ पासून मराठवड्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू झाले ते थांबायचं नाव घेत नाही. २००२ मध्ये सात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच २००३ मधे १४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. २००४ मध्ये आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा ९२पर्यंत पोचला. त्यानंतर मात्र आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण वाढलं. २००६ मध्ये ३७९ शेतकर्‍यांनी आणि २००७ मध्ये सव्वातीनशे शेतकर्‍यांनी या विभागात आत्महत्या केल्या आहेत.

२००८ मध्ये २८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. २००९ मध्ये २२६ शेतकर्‍यांनी, २०१० मध्ये १८२ शेतकर्‍यांनी आणि २०११ मध्ये १६२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. 
२०१२ मध्ये १९८ शेतकऱ्यांनी तर २०१३ मध्ये २०७ आणि २०१४ मध्ये ५६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर जानेवारी ते ७ नोव्हेंबर २०१५ यामध्ये ३११ दिवसांमध्ये शेतकरी आत्महत्यांची संख्या ९२४ पर्यंत गेली होती. १ जानेवारी ते १२ डिसेंबर २०१६ या काळात तब्बल १००३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.
 यंदाही शेतकरी आत्महत्येचा फास सुटता सुटेना झाला आहे.
सहा ते १३ आँगस्ट २०१७ च्या आठवड्याभरात तब्बल ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. १ जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ या सात महिन्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात तब्बल ५३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ३५३ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले असून ८१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


१ जानेवारी ते ३० जुलै २०१७ शेतकरी आत्महत्या आकडेवारी


जिल्हे                  आत्महत्या

१) औरंगाबाद   -         ७४

 २)  बीड        -           १०३

 ३) नांदेड       -           ८४

४)  उस्मानाबाद  -        ७४

५)  परभणी      -       ६६

६) लातूर       -       ५१

७) जालना     -        ४७

८)  हिंगोली     -        ३२

     एकूण -               ५३१


कर्जमाफी आणि पीक विमा

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंतचं कर्ज माफी जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू केलीय. मराठवाड्यातील या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना  कितपत फायदा होईल, हे सांगणं अवघडय. सरकारनं शेतकऱ्यांना आँनलाईनच्या दारात उभं केलंय,  भलेही आजाचा नागरिक इंटरनेटशी जोडला गेला असला तरी गावाचा सामान्य शेतकऱ्यांला साधा मोबाईल ही हातात धरता येत नाही, त्याला नेटवर अर्ज कसा भरता येईल, भलेही सरकार महा ई सेवा केंद्राच्या मदतीनं कर्जमाफीचा अर्ज भरून घेत असला तरी ही इंटरनेट यंत्रणा सक्षम आहे का ?  लोक रात्रदिवस केंद्रात बसून आहेत.आँगस्ट महिन्याच्या
अखेरीस ही अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत. सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
मराठवाड्यातील पीक परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं आता शेतकऱ्यांची पीक विम्यावरच भिस्त अवलंबून आहे. मराठवाड्यातील २४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा उतरविला आहे. हा पीक विमा तातडीनं मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित राहल्यानं असंख्य शेतकऱ्यांना
पीक विम्या पासून वंचित राहावं लागलंय. अशा शेतकऱ्यांची गावनिहाय यादी करून त्यांना मदत मिळवून देणे गरजेचं आहे.

मराठवाडा नव्हे टँकरवाडा

२०१६ च्या दुष्काळात लातूरकरांना काय संघर्ष करावा लागला हे सर्वांना माहीत आहे. पाण्यावरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लातूर जिल्हया मधील काही गावांमध्ये लातूर प्रशासनाने संचारबंदी लागू करण्यात आली होती. मिरजेवरून रेल्वेने पाणी आणावं लागलं. 
यंदाही मराठवाड्यात जून,जुलै आणि आँगस्टचा पहिला आठवडा झाला तरी पावसाचा एक थेंब पडला नाही. त्यामुळं या भागातील ८३२ लघु, मध्य, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात केवळ एक टक्काच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्यानं ऐन पावसाळ्यात ही या जिल्ह्यात ३५१ गावे आणि बारा वाड्या वस्त्यांवर टँकरने १८आँगस्ट पर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. नागद तांडा ( ता.कन्नड जि.औरंगाबाद) येथे जूलै अखेर पर्यंत बारा हजार लिटरचे दोन टँकर सुरू होते. या तांडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या २०११ च्या जनगणेनुसार एक हजार ६२५ दाखविली आहे पण सध्या नागद तांडाची लोकसंख्या तीन हजार १९९ आहे, ग्रामपंचायतीने स्व खर्चानं पाणीपुरवठा करावे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं गावकरी हतबल झाले होते. त्यामुळं मराठवाडा हा भाग टँकरवाडा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले.
      महावितरणकडं अनामत रक्कम भरूनही काही वर्षे लोटली तरी जालना जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. मराठवाड्यात दुष्काळ परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दुध उत्पादनात घट निर्माण झालीय. नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता, आता पावसाअभावी शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलंय. २१ आँगस्ट रोजी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडलाय.त्यामुळं चारा पाण्याचा प्रश्न मिठलाय, आगामी काळात पावसानं आणखीन जोर धरला तर या भागातील सर्व धरणे भरतील.

१२९ प्रकल्प रखडले

मराठवाड्याचं दुष्काळ पण दूर करण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढवलं पाहिजे.
सिंचनाचा प्रादेशिक असमतोल ही चिंतेची बाब आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे मागासलेपण अधिकच वाढले आहे. मराठवाड्यातील १२९ प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत, मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हजारो कोटींची गरज आहे. मराठवाड्यातील सिंचन जेमतेम २० टक्के आहे. ही तफावत दूर करण्यासाठी मराठवाड्यात ४८७ हजार हेक्टर एवढे सिंचन निर्माण करण्यास अग्रक्रम देणे आवश्यक आहे.

२१ टीमएस पाण्याचे भिजत घोंगडे

 कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याचा दहा टक्के भूभाग आहे. मराठवाड्याच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर न्यायिक हक्क आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातील नेते कृष्णा खोऱ्यातील किमान २१ टीएमसी हक्काचं पाणी मराठवाड्याला देण्यासाठी सातत्याने विरोध करतायेत. प्रादेशिक एकात्मतेस छेद देणारी ही बाब आहे. मराठवाड्यात सातत्यानं संघर्ष केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी २००१ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिली. याचं भूमिपूजन आठ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये झाले. कृष्णा खोऱ्यातील २३ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत ४ हजार २०० कोटी रुपये होती. आता भाववाढीमुळे या प्रकल्पाची किंमत ७ हजार कोटी रुपयांपर्यंत गेलीय. अतिरिक्त पाणीसाठी निर्माण करण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची गरज निर्माण झाली आहे. हे पाणी मिळण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी विधानसभेत आवाज उठविताना दिसत नाहीत, त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना काळ तर मोठा कठीण आला आहे !असं म्हटल्याशिवाय गंत्यतर नाही.


शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आता शेतीपुढची नेमकी आव्हाने काय आहेत, याचा धांडोळा घेऊन पुढची वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी शेतीत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या तज्ज्ञांना सोबत घ्यावे लागणार आहे. जागतिक पातळीवर शेती क्षेत्रात संशोधन आणि उत्पादकता वाढीमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या इस्रायलची त्यासाठी मदत घेणे आवश्यक आहे. आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची बीजे पेरली पाहिजेत. शेतीपूरक उद्योग निर्माण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांनी  माहिती तंत्रज्ञानासह सर्व आधुनिक सोयी-सुविधांचा विकसित केल्या पाहिजेत. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आता  शेतीकडं उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. मान्सूनवर अवलंबून असणारी शेती आणि त्यात कमी शेती धारण क्षमता लक्षात घेता, यापुढील काळात हवामानावर आधारित शेती महत्त्वाची ठरणार आहे.   

9970452767
{ प्रकाशित चपराक दिवाळी अंक २०१७}

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...