शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

बिगारी : मदन देगावकर -दंदाडे


लेखकाने आत्मचरित्रामधून आपली व्यक्तिगत अनुभूती स्वाभाविक पणे प्रकट केलेली असते. त्यामुळे ’आत्मचरित्र’ हे आत्मनिष्ठ असते. स्वतः च्या जीवनाचे तटस्थपणे केलेले अवलोकन असते. बार्शी येथील संवेदनशील लेखक मदन देगावकर - दंदाडे यांनी आपल्या जीवनाचा आलेख ’बिगारी’ या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मदन देगावकर यांच्या ’बिगारी’ हे आत्मकथन मानवी मनाचे चित्रण करते. 112 पानांमधून लेखकाने आपले बालपण, तारूण्य आणि वैवाहिक जीवनात आलेल्या कडूगोड आठवणी सांगितल्या आहेत. ’बिगारी’ चे लेखन हे ओघवत्या शैलीत अवतरले आहे. बार्शी - मराठवाडयातील भाषा छोट्या छोट्या वाक्यातून अवतरली आहे. देगावकर यांनी ’बिगारी’ च्या मनोगतात स्पष्ट करताना म्हणतात की,’ आत्मचरित्र’ लिहिण्या एवढा मी काही मोठा प्रसिद्ध, प्रथित यश व्यक्ती नाही. कादंबरी किंवा कथासंग्रह लिहिण्याचा विचार करत होतो. तरीही मनाला सारखं वाटू लागलं जे आपण भोगलयं, जगलोय ते शब्दात मांडायला काय हरकत आहे.’अशी भूमिका विशद केली आहे.

’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिणाम येथील समाज मनावर झाला आहे. त्यातूनच माणसाला शिक्षणाची गोडी लागली. ’बिगारी’ मधील मदनाचा बिगारी ते लेखक हा प्रवास पहिला तर शिक्षणासाठी - नोकरीसाठी चाललेली धडपड लक्षात येते. मदनचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झाले आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने शैक्षणिक होरपळ झाली. परिस्थितीमुळे भावाचं शिक्षण झाले नाही. बिगार्‍याचा तो गवंडी झाला. लेखकाला शाळेत असताना संध्याकाळी चौकात हातगाड्यावर पेन विकणे, पेपर विकणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, पेपर टाकणे, येरमाळा व येडशीत नारळ विकणे अशी कामे करावी लागली.

लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने ते एम.ए. पर्यंत शिकून बीएड होऊन मास्तर होण्याचं स्वप्न पाहतात. त्याविषयी ते लिहितात, एम.ए.पूर्ण झालं.अन् बी.एड करायचे ठरवले पण पैसा आणायचा कुठून. दोन तीन ठिकाणी फॉर्म टाकले नंबर लागला.एवढे पैसे भरावे लागतात म्हणून समजले; आता काय करायचे ? रात्रभर विचार केला एकटाच भरपूर रडलो.अन सकाळी उठलो. भाकरी बांधल्या आत्तापर्यंत मिळालेली सर्व सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रे दोन पिशव्यात भरली. कागदपत्रे घेऊन एस टी स्टँण्ड वर आलो. सोलापूर गाडीत बसलो. सकाळी अकरा वाजता मी संस्थापकाच्या दारात.तिथल्या वॉचमन,नोकरांना वाटले मी कदाचित भंगारवाला असावा.विनवण्या करू मी संस्थापकांना भेटलो. त्यांना माझी कागदपत्रे दाखवली दोन पिशवी भरून आणलेली सन्मान चिन्हा दाखवली. माझ्याकडे पैसे नाहीत पण बी.एड.करायचे म्हणालो मला आलेलं पत्र दाखवलं. माझी मराठी भाषा त्यांना समजत नव्हती पण माझ्या भावना त्यांना समजत होत्या... ( पान क्र.19)

येडाई वर नारळ घेऊन विकायला जाणार म्हणल्यावर बाहेरच्यांनी तर येड्यात काढलेच होते पण घरचे ही तेवढे समाधानी वाटले नाहीत. पोरग मामलेदार, कलेक्टर व्हायची स्वप्न बघणार्या आईच्या डोळ्यात पाहायचं धाडस मला झालं नाही. (पान.33) शाळेच्या पुस्तकाने जेवढे शिकवले नाही तेवढे येणार्या परिस्थितीने शिकवले.
गरिबीमुळे शिक्षणात अडचणी आल्या पण शिक्षणामुळेच आपल्याला जगण्याचं आत्मभान कसं आले आहे, याचं वास्तव ते मान्य करतात.

लेखकाने आपले वैवाहिक जीवन अतिशय तरलतेने मांडले आहे. लग्न जमवताना हुंड्याचा विषय न काढण्याचा ते सांगतात. मुलीच्या जन्मानंतर लेखकाचे हळवे पण मनाला चटका लावणारे आहे. आजीचा दवाखाना, राणू शेळी यांच्या बाबतीत ते भरभरून बोलतात.

बाळ खूपच अशक्त त्यात बाळाच्या आईला कसलेच दूध नाही. त्यामुळे बाळ सारखे रडायचे. दोन दिवसांनी एका डाँक्टरला दाखवले, डॉक्टर म्हणाले, मुलीच्या नाकातून नळ्या सोडून औषधं व दूध वगैरे देता येईल, तरीही वजन वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. दोन तीन महिने बाळाला व आईला दवाखान्यात अँडमिट व्हावे लागेल. तरीही मी काही गँरटी देऊ शकत नाही.....आम्ही पती - पत्नी दोघेही मनसोक्त रडलो.. (पान 110,111)
लेखकाला गाण्याची आणि संगीताची आवड असल्याचे बोलून दाखवतात. शामराव देशपांडे यांच्याकडे मोफत शिक्षण घेणारे एकमेव विद्यार्थी.
’बिगारी’ त ’मदन’ हेच पात्र केंद्रस्थानी आहे. आण्णा, आई, भाऊ काँलेजला आणि गायनात मदत करणारे तरुण मित्र आणि शिक्षकाचे चित्रण लेखक करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुख: दु:खात सदैव मोलाची साथ देणार्‍या आपल्या पत्नीला लेखकांनी विशेष स्थान दिले आहे.
लेखकाने कथेचा शेवट ही सुंदर केला आहे ते म्हणतात,

आता ही बिगारी इनशर्ट करून सुटाबुटात राहतोय. पण तरीही मनाला वाटतयं अजून अरे ! आपण गड्याचा फक्त गवंडी झालोय. अजूनही आपल्याला खूप उंच इमले बांधायचे आहेत. आत्तापर्यंतच्याआयुष्यात खूप चांगली माणसं भेटली. जे वाईट भेटले ते ही चांगलेच होते.म्हणायचे. त्या परिस्थितीत जगत असताना शिकलेल्या लोकांपेक्षा अडाणी लोकांचे तत्वज्ञानचं जगण्याची प्रेरणा देऊन गेलं. हा संघर्ष अविरत चालूच राहिलं कारण माझ्यातला बिगारी अजूनही संपलेला नाही..

एकूणच ही आत्मकथा वाचकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करते. संवेदनशील मनाला काही प्रसंग चटका लावतात. बार्शी सारख्खा खेडे गावातील एका तरूणाची कथा प्रेरणा देणारी आहे तेवढीच अंतमूर्ख करायला लावते.
- विकास पांढरे,सोलापूर 9970452767
बिगारी
मदन देगावकर - दंदाडे,9922973614
युगंधर प्रकाशन, पुणे
---------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...