प्राचीन संस्कृतीचे संदर्भ दाखवणारे दिंडेगाव ( ता.तुळजापूर ) येथील अत्यंत सुंदर बांधकाम असलेले यादवकालीन शिवशंकर व कालभैरवनाथ मंदिरास भेट देण्याचा योग आला. हे गाव 'संत शिवरामबुवा 'यांच्या सान्निध्याने नटलेले आहे. पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त म्हणून शिवरामबुवाची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी विठ्ठल भक्तीचा अविष्कार दाखविला. पुढे मराठवाडय़ाची 'धाकटी पंढरी' म्हणून या गावचा लौकिक वाढला. महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भााविक मोठ्या संख्येने येत असतात.
या गावावर वारकरी संप्रदायाचा जसा प्रभाव आहे. तसा इथला प्राचीन वारसा आपल्या अस्तित्वाताच्या पाऊलखुणा जपत आहे. राजा रामदेवराय यांच्या मंत्रीमंडळातील हेमाद्री पंडित नावाच्या प्रधानांनी या दोन प्राचीन मंदिराची उभारणी केली असल्याची अख्यायिका स्थानिक नागरिकांकडून ऐकायला मिळाली.
काळभैरवनाथ म्हणजे शिव शंकराच्या जटा मधून निर्माण झालेले अष्टभैरव. त्यातीलच हा एक काळभैरवाचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून गावाचे ग्रामदैवत आहे. श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे.
मंदिराभोवती फिरत असताना असे दिसून आले की, हे मंदिर हेमांडपंथी पध्दतीच्या स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून कलावैभव, सौंदर्य आणि चौरसाकृती छत ही मंदिराचे वैशिष्ट्ये. शिवाचे उग्ररुप असणारा कालभैरवनाथ हा भीषणाचे प्रतिक मानले जाते. तर शंकर हे अनचा उग्ररुप आहे. अनु म्हणजे विध्वसंक, रौद्ररुप दाखवणे हा आहे. या दोन्ही मूर्तीच्या पाठीमागे भीषण व रौद्ररुप दाखवणे हा मूर्तीच्या निर्मितीमागचा उद्देश असावा, असे दिसून येते.
![]() |
| शिवलिंग |
![]() |
| आकर्षक मूर्ती |
मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. उत्कृष्ट भित्तीचित्रे, प्रमाणबध्द शरीरे, बोलके डोळे, भावपूर्ण चेहरे, सुचक हालचाली व विविध विषयांवरून त्या काळातील चित्रकलेच्या विकासाच्या प्रगतीचे आपल्याला ज्ञान होते. या मूर्त्या उत्कृष्ट कलाकुसरीने युक्त अशा प्रभाव लयाने अंगालि चिकटून बसलेल्या पारदर्शक वस्त्राने व उष्णीवात गोळा केलेल्या विशिष्ट केशरचनेमुळे कलात्मक नयन मनोहर व चित्ताकर्षक हालचालींमुळे मूर्तीच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक भाव दिसून येतो. त्यामुळे या मूर्ती आजही सजीव वाटतात.
आजच्या सारख्या क्रेन्स, ट्रक्स नसतानाही त्या काळातील चित्रकार, मूर्तीकारांनी एखाद्या प्रचंड शिळीची ने -आण करुन मंदिराची निर्मिती कशी केली असेल याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. भारतीय समाजातील चढ-उतारांचा साक्षीदार असलेली ही दोन मंदिराच्या आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. काळभैरवनाथ व शंकर देवाचे मंदिर दिंडेगावचे भूषण नाहीतर संबंध मानव जातीचा वारसा ठरतील आशा आहेत.
काळाच्या ओघात मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीना तडे पडले असून पुढील काळात मंदिर पडण्याची भीती आहे. पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा प्राचीन वारसा इतिहासाचे संशोधन करणाऱ्या संशोधकास नक्कीच संशोधनाचा विषय ठरू शकतो.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा