शनिवार, २१ एप्रिल, २०१८

कृत्रिम पावसाचा 'आधार'


                   
परवा, कृत्रिम पावसा संदर्भात सकारात्मक बातमी वाचण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने सोलापूर येथे कृत्रिम  पावसाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी येत्या जून महिन्यापासून या प्रयोगाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना याचा फायदा होणार आहे. सरकारने उचलले हे एक चांगले पाऊल आहे.

सोलापूर हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा जिल्हा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीशी सामना करतोय, अशी परिस्थिती सांगोला,मंगळवेढा, अक्कलकोट आणि दक्षिण व उत्तर,बार्शी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात असते. उर्वरित तालुके उजनी धरणामुळे हरित झाले आहेत. बाराही महिने, दुष्काळ असो वा सुकाळ इथे हिरवीगार ऊसाचे मळे दिसून येतात. सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहेत.
शेती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यात कोरडवाहू रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र व हवामान विभाग कार्यरत आहे. आता कृत्रिम पावसाचा प्रायोगिक प्रकल्प सुरु होतोय. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पाचा शेजारील उस्मानाबाद आणि लातूर या मराठवाड्यातील दोन जिल्ह्याला कितपत फायदा होणार आहे ? हे पाहणे आवश्यक आहे.

राज्यात आघाडी सरकारच्या काळात (सन २००३)साली कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग  'प्रकल्प वर्षा'या नावाने १५ सप्टेंबर ते १४ डिसेंबर २००३या कालवधीत राबविला गेला. या प्रयोगात सोलापूर, अहमदनगर, बीड,उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. आपल्या देशात १९५७ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यास सुरूवात झाली. उत्तर प्रदेशातील रिहाद जलाशय परिसरात असा कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग पहिल्यांदा झाला. त्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, राजस्थानसारख्या राज्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग केला. चीन,उत्तर अमेरिका, कुवैत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इस्त्रायल आदी जगभरातील ५०हून अधिक देशात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

आजपर्यंत कोणताच देशाला या प्रयोगामुळे दुष्काळावर मात होता आले नाही. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी असा प्रयोग निश्चितच फायदेशीर आहे पण यामध्ये काही अडथळे आहेत. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी ज्या परिसरात पावसाची गरज आहे. त्या परिसरावर पावसाचे ढग दाटून आले पाहिजेत. विशेष म्हणजे ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी, ढगापर्यंत पोहचण्यासाठी राँकेटची मदत घेतली जाते. रसायनाचे ढगात बीजारोपण केला असता, बाष्पाचे प्रमाण अल्प असेल तर त्या परिसरात पाऊस पडू शकत नाही. हा प्रयोग अयशस्वी होण्यामागचा महत्त्वाचा मुख्य अडथळा आहे.

डॉ. राजा मराठे या अभियंत्याने आठ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील सुललेगाव येथे कृत्रिम पावसावर प्रयोग केले. दहा प्रयोगात नऊ वेळा पाऊस झाल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी 'वरुण यंत्र'विकसित केले आहे.

दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. ती मैदानावर ठेवली जाते. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो,असे यंत्राचे स्वरूप आहे.

वरूण यंत्र

या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे,अशी कृती केल्यास तासभरात पाऊस पडायला सुरूवात होते,असा दावा डॉ. मराठे यांनी काही वर्षापूर्वी केला होता. हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आह,असेही त्यांचे म्हणणे होते. म्हणजेच हे वरूण यंत्र देखील कृत्रिम पावसाच्या यंत्रासारखे आहे.

केवळ कृत्रिम पावसावर विसंबून चालेल का?

पाणी अडवणे, साठवणे, जिरवणे, जपून व काटेकोरपणे वापरणे आणि छोटे व मोठे बंधारे, बांधबंदिस्ती, राखीव वन्यक्षेत्रे, राखीव कुरणे, कुर्‍हाडबंदी-चराईबंदी, तळी-तलाव अशा सूक्ष्म प्रयत्नातून दुष्काळावर मात करता येते, हे आपण पाहिलो आहे. जोपर्यंत दुष्काळ भागात वनसंपदा वाढत नाही तोपर्यंत पावसाचे प्रमाण कमी अधिक असणार आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळापासून आपल्या देशात दुष्काळाची समस्या आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येत असतात.पावसाचा प्रत्येक थेंब किती महत्त्वाचा असतो याची जाणीव दुष्काळग्रस्तांना असते. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी 'कृत्रिम' विचार करून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत  'आधार' शोधावा लागणार आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...