शनिवार, १७ मार्च, २०१८

एका जिद्दीची कहाणी



नवरा अपंग तर बायको अंध तरीही या दोघांचा संसार सुखाचा आहे. कुणाचा आधार नाही, ना कुणाचे कर्ज स्वत:चा विकास स्वतः करणे यातच खरा पुरूषार्थ आहे, असं प्रमाण मानून सोलापूरच्या पूर्व भागात अंध आणि अपंग दाम्पत्य काळ्या बाहुल्या तयार करून त्यावर गुजराण करणारे चित्र दृष्टीक्षेपास पडते.

या दाम्पत्याची शहरात कुठे मालकीची जागा नाही ना हक्काचे घर नाही. घर नाही म्हणून सारं जीवनच असुरक्षित, अशा असुरक्षित आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या या अंध अपंग दांम्पत्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाचाही आधार न घेता गेल्या २५ वर्षापासून काळया बाहुल्या तयार करून त्यावर पोट भरतायेत.
महागाईमुळे त्यांच्या जगण्याची परवड होतीय. ही कहानी आहे दोन्ही पायाने अपंग असलेल्या फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई यांची.

फुलचंद लक्ष्मण जाधव आणि त्यांची अंध पत्नी मंगलाबाई

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील पद्मनगरच्या वळणार एक पाल आहे. या पालीत फुलचंद जाधव आणि मंगलाबाई गेल्या पंचवीस वर्षापासून राहतात. आज फुलचंदचे वय ६५ हून अधिक झालंय तर मंगलाबाई साधारण ५८ वर्षांच्या असतील. त्या पालीमध्ये या दोघांनी आपला छोटासा संसार मांडलाय. फुलचंद मुळचे अकलूजचे. दोन्ही पायाने अपंग आहेत. लहानाचे मोठे अकलूज मध्ये झाले. फुलचंद याचे वय वाढलें तसे कुटुंबाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. फुलचंद यांच्यातील जगण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. निराशेला न डगमगता ते १९७२ साली सोलापूर शहरात आले. छोटे मोठे काम करू लागले. मिळणाऱ्या पैशातून पोट भरणे ही मुश्कील होते.

काही दिवस भीक मागून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला पण भीक मागणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले. स्वत: काही तरी कला शिकल्या शिवाय जगण्याला आकार येणार नाही म्हणून काळया बाहुल्या बनविणे, पिंजरे, झाडू, गंगावण अशा वस्तू तयार करू लागले. त्यातून दोन पैसे मिळू लागले.त्यांचा स्वाभिमान आणखीन ज्वलंत होऊ लागला. यातून आपण स्वावलंबी जीवन जगू शकतो याचा अभिमान वाटू लागला.
या दरम्यान दोन्ही डोळयांनी अंध असलेली मंगला खंदारे नावाची युवती भेटली. तेही जगण्यासाठी धडपडत करत होती. दोघांची चांगली ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले पुढे या दोघांनी विवाह केला. यातून या दोघांच्या आयुष्याचा संसार सुरू झाला.

काळ्या बाहुल्या करताना फुलचंद व मंगलाबाई

छोट्याशा व्यवसायातून दोघांचे पोट भरणे कठीण झाले अनेक वेळा त्यांना उपाशी राहावे लागले. मंगला ही तशी तेलूगू भाषिक तर फुलचंद मराठी.
त्यामुळे या दोघांना संवाद साधताना अडचण यायची. पुढे ते एकमेकांच्या भाषा बोलू लागले. शब्दांचा, भाषेचा नवा सूर जुळून आला.

या दोघांनी काळया बाहुल्यांचा व्यवसाय नेटाने उभा केला. संसाराला आकार येऊ लागला. मंगलाबाईची उद्योगजकता स्वस्थ बसू देत नव्हती. तिने बांगडयांचा व्यवसाय सुरू केला.पण समाजातील महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्याने, या व्यवसायावर पाणी फिरले. मंगलाबाईने जिद्द न हरता, आपल्या पतीला साथ देत आजही काळया बाहुल्या बनविण्यासाठी मदत करतायेत. या दोघांची कमाईतून ८० ते १०० रूपये मिळतात.

आमवस्या आणि पौर्णिमेला थोडी जास्त कमाई होते. पण रेशन, घासलेट आणि औषध पाण्यामुळे जगण्यात आनंद वाटत नाही, त्यातही ना हक्काचे घर आहे ना जागा, स्वयंजरोजगार करावा यासाठी जवळ शिधापत्रिका आहे ना शिक्षण. पोटासाठी रोज मर मर मरायचे,कधी गिऱ्हाईक नाही आले तर अर्धपोटी उपाशी रहावे लागते. बाहुल्या बनविण्यासाठी रबर, दोरा, खिळा, लिंबू आदी वस्तू विकत घेताना नाकी नऊ होते,असे ते म्हणतात.

"कलेवर पोट भरणे अवघड होत आहे. त्यातच महागाईमुळे आज अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. त्यामुळे सध्या आम्हाला शासनाची मदतीचे गरज आहे. आमच्या व्यवसायाला अधिक हातभार लावण्यासाठी बँकानी आर्थिक सहाय्य करून, आमची परवड थांबवावी" असे, फुलचंद जाधव आणि त्यांच्या पत्नी मंगलाबाई सांगतात.

या दांम्पत्यांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करायचा आहे पण कोणतीही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. कारण त्यांच्याकडे कुठलीच तारण नसल्यामुळे बँकाचा आशिर्वाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. समाजात स्थान नाही, गावात वा शहरात हक्काची जागा नाही, शहराशिवाय अस्तित्व नाही, त्यामुळे सतत भाकरीचा चंद्र शोधण्यसाठी या अंध अपंग दांम्पत्याची परवड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काळया बाहुल्या विकून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबाची कहानी प्रेरणादायी आहे.

शहरी असो वा ग्रामीण याठिकाणी अपंग नजरेस पडत असतात. काही अपंग शिक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळत नाही ना पगार. काहीजण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपंगात्वावर मात करून, स्वावलंबी बनत आहेत. पण त्यांना स्थिरता देण्यासाठी बँकेकडून काहीच मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( साभार :अपंग सहायता दिनानिमित्त १६ मार्च २०१६ रोजी तरूण भारत,सोलापूर मध्ये मी लिहिलेला हा लेख आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...