सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरात निकाल आणि मतमतांतरे



गुजरात विधानसभा निवडणुकीचे रण अखेर संपले. भाजपाने सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन केले. या निकालामुळे समाजमाध्यमातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बीबीसी मराठीला मुलाखत देताना गुजरात मध्ये एका अर्थाने भाजपाचा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी गुजरातमधील नवीन काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे,असे ट्विटर वर मत व्यक्त केले आहे. समाज माध्यमातून गुजरात निकालाबाबत पत्रकार आणि  विश्लेषकांनी मते मांडली आहेत.

दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार सुकृत करंदीकर म्हणतात, "सलग सहाव्यांदा भाजप सरकारचा हा मोठा जय आहे. याआधी फक्त डाव्यांनी बंगाल सलग सातवेळा जिंकले होते". या पोस्ट ला देताना करंदीकर यांनी उपकमेंट दिली आहे, ती विचारत घेणे आवश्यक आहे. "जागा किती, मतांची टक्केवारी किती, प्रचारात किती फौजफाटा उतरवला होता यासारखे मुद्दे निर्रथक असतात. कारण, युद्धाला उतरताना तयारी किती करावी, याचं स्वातंत्र्य दोन्ही बाजूला असतेच. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अंतिम निकाल महत्त्वाचा. यावेळचा विजय भाजपने मोठ्या कष्टाने खेचून आणला, ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदींचा वैयक्तीक करीश्मा आणि अमित शहा या टास्क मास्टरचे परिश्रम या दोन्हीचा यात मोठा वाटा आहे. कॉंग्रेसने गुजरात जिंकण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. कॉंग्रेसच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाली हे खरे. पण गंमत म्हणजे भाजपच्या जागा गेल्यावेळपेक्षा कमी असल्या तरी त्यांचीही मताची टक्केवारी गेल्या वेळेपेक्षा वाढली आहे."

"जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर हे दोन नेते निवडून आले तर ते राष्ट्रीय पातळी वरील नेते बनू शकतात.  तसे घडले तर भारतीय राजकारणाला गुजरातची ही मोठी देणगी ठरेल",असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुनील तांबे यांना वाटते.

लातूर येथील 'बातमीमागची बातमी' या साप्ताहिकाचे संपादक महारूद्र मंगनाळे म्हणतात,"गुजरात विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल काहीही येवोत. जिग्नेश मेवाणी हा तरूण कार्यकर्ता १८ हजारावर मतांनी विजयी झाला,ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. जिग्नेशने गुजरातमधील उना दलित अत्याचारानंतर जी लढाई लढली होती, ती यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे,जिग्नेशने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली .सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. जिग्नेशच्या पराभवासाठी भाजपाने काहीच करायचे शिल्लक ठेवले नव्हते.प्रत्येक जातीसाठी वेगवेगळी पत्रकं काढून, जिग्नेशच्या बदनामीची मोहिम आखली होती. या सगळ्या प्रतिकूलतेवर  मात करून तो निवडून आला.एक प्रामाणिक,लढावू कार्यकर्ता निवडणुकीतही विजयी होऊ शकतो, हा जिग्नेशने दिलेला संदेश मोलाचा आहे.एक जिग्नेश भाजपाची पोलखोल करायला पुरेसा आहे".असे मंगनाळे यांनी फेसबुकवर म्हटले आहे.

"बहुमतातही पराभव आणि पराजयातही विजय शोधता येणे हा गुजरात निवडणुकीने दिलेला राजकीय विश्लेषणाचा नवा पॅटर्न"! असल्याचे मत लोकसत्ताचे पत्रकार दिनेश गुणे यांनी व्यक्त केले आहे.

फेसबुक युजर अरुण दीक्षित म्हणतात, "काँग्रेसला हरण्या सारखे काहीच नव्हते. १२-१५ सीटचा फायदा आणि १०% मतात वाढ ही एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून मिळालेले यश हे विरोधकांच्या गडात घुसून शांतपणे त्याला आव्हान द्यायचे आणि गडात त्याला घाबरवून सोडायचे ही योग्य रणनीती यशस्वी झाली आहे".

"गुजरातमध्ये काँग्रेस बहुमत न का मिळवेना, भाजपची बऱ्यापैकी फाटली ! प्रबळ विरोधी पक्ष असणे आपल्या लोकशाहीसाठी आवश्यकच आहे. काँग्रेसचे मनोबल वाढेलच, भाजपने ही फार स्वप्नात न राहता सर्व प्रकारच्या लोकसमूहाच्या आशा आकांक्षाची दखल घेऊन संघटनात्मक काम केले पाहिजे, पुढच्या निवडणूका नक्कीच अधिकाधिक कठीण होत जातील,असे धनंजय भिडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केले आहे.

फेसबुकवर प्रसिद्ध असलेले युजर्स प्रसाद राऊत, अभिजित पानसे व पुण्याचे तुषार दामगुडे यांनी विनोदी ढंगाने गुजरात निवडणूक निकालाविषयी भाष्य केले आहे. 

प्रथम प्रसाद राऊत काय म्हणतात हे पाहुयात, गुजरात युद्धाचा निकाल लागलाय. सेनापती रागा यांच्या नेतृत्वाखाली जानवेसेना, वाघोजीराजेंची उठासेना, पटेलांची हार्दिकसेना, ठकोरांची अल्पसेना, जिग्नेसभायची मेवासेना... आदी सेनांनी कालकेय मोदींचा पराभव केला.  राजमाता सोनियागामींनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे जो कोणी राजकुमार मोदीचा पराभव करेल त्याला गुजरात देशाचं सिंहासन मिळणार होतं. त्यामुळे स्वतः आघाडीवर उतरत वाघोजीराजांनी मुसंडी मारली होती. पण इकडे त्यांच्या जहागिरीच्या प्रदेशात मोदी सेनेने वाघोजीराजेंना सुभेदारी बहाल केली. आणि मग वाघोजीराजे युद्धमैदानावर उगाच इकडे -तिकडे घोडा दौडवत राहीले. उठासेना गळफटलेली बघून युवराज रागा यांनी जानवेसेनेला मुसंडी मारायचा आदेश दिला. जानवेसेनेने जोरदार हल्ला चढवला. जानवेसेनेचे अनुभवी सरदार केतकर, कुबेर, सरदेसाई यांनी प्रचंड धाडसी हल्ला चढवत मोदीसेनेची विनाशक शस्त्रे - इव्हिएम ताब्यात घेतली. इव्हिएम अस्त्रे शत्रूच्या ताब्यात गेल्यामुळे मोदीसेना दुबळी झाली. मोदीसेनेचे सेनापती
अमितभाय यांनी माघार घ्यायला सुरुवात केली. सेनापतीने माघार घेतल्याने मोदी सरळ दिल्लीला निघून गेला. प्रचंड पराभव ! मोदीसेनेचा प्रचंड पराभव!
आता सगळ्यांना असे लागली होती ती गुजरात देशाचा नवीन राजा कोण असणार? राजकुमार वाघोजीराजेंनी ऐन युद्धभूमीवर टंगळमंगळ केल्यामुळे राजमाता सोनियागामींनी राजकुमार रागा यांच्या राज्याभिषेकाची घोषणा केली. या निर्णयामुळे वाघोजीराजे व संजयप्पा कमालीचे नाराज, उद्विग्न झाले. त्याच उद्विग्नतेतून त्यांनी भर राजसभेत सत्तेला लाथ मारण्याची धमकी दिली. आधीच युद्धभूमीवर टाइमपास वर सत्तेला लाथ मारेन अशी राजसत्तेच्या विरोधातली भाषा.. नवनिर्वाचित महाराज रागा संतापाने लाल झाले, आणि त्याच संतापाच्या भरात त्यांनी आदेश दिला. "युवराज वाघोजीराजे यांना राजशिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी गुजरात देशातून शून्य देऊन निष्कासित करण्यात येत आहे." 
आदेशाची तत्काल अंमलबजावनी करण्यात आली.आणि अशा प्रकारे गुजरात देशाचे राजेपद तर गेलेच सोबतीला सत्तेला लाथ मारेन या डायलोगच्या अति हव्यासामुळे सेनापती पदाचा पदभार सांभाळताना "वाघोजीराजे ठाकरे यांनी की में.... " हा अजरामर डायलोग हाणन्याची संधीसुद्धा गेली. 
सहसंपादक - साहेब... उठा... अग्रलेख देताय ना? 
संजयप्पा - हो. अर्ध्या तासाने ये. पाडतो तो पर्यंत अग्रलेख. 
सहसंपादक निघून गेल्यावर संजयप्पा लिहायला घेतात - राहुल गांधी हेच देशाचे भावी पंतप्रधान,असे उपहात्मक भाष्य प्रसाद राऊत यांनी केले आहे.

अभिजित पानसे हे उपहात्मक भाष्य केले आहे, ते म्हणतात,
गुजरात  निवडणूकचे निकाल बघता ही काही वर्षातील (रिजल्ट्स वरून) सगळ्यात सकारात्मक निवडणूक  क्रिकेट मॅच वाटतेय. दोन्ही टीम्सला यातुन सकारात्मक शिकायला मिळालं आहे.

"होम पिच" वर टॉस जिंकून पहिली बॅटींग बीजेपीने घेतली. संपूर्ण शक्तीने सर्व "कॅबिनेट टीम" खेळवली.
एका आदर्श , टिपिकल टेस्ट मॅच प्रमाणे 'सकाळी' #अँटीइंकंबन्सी'च्या धुक्यात, थंडीत ,नव्या कोऱ्या चेंडूने अलपेश , जिग्नेश, आदर्शने आणि राहुल गांधींच्या जबरी 'स्पिन' (जनेऊ धारी, शिव भक्तीचं #वळण) बॉलिंगच्या नेतृत्वात जबरदस्त, बॉलिंग करीत होम पिच वाल्यांची पूर्णपणे तारांबळ उडवली! 
आऊट साईड ऑफ स्टंप्स बॉलिंग केली , बौन्सर टाकलेत विकेट्स घेतल्यात. 
होमपीच असलेल्या भाजपासाठी सकाळ , पहिलं सत्र खूप वाईट ठरलं!
सकाळी काँग्रेस एकवेळ ९०+  तर बीजेपी ८४ + वर अडकलेली होती.
पण सकाळचं सत्र आटोपलं, धुकं हटलं, सूर्य डोक्यावर आला आणि टिपिकल '#राजकोट'ची पिच टिपिकल "पाटा बॅटींग पिच " झाली.
तिथून बीजेपीने जबरदस्त बॅटींग करत  'आघाडी' घेत 'मॅच'  जिंकली.
आणि काँग्रेसने हाती आलेली संधी गमावली. 'इतिहास' रचता रचता "इति ऱ्हास"  झाला.
पण यामुळे  भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे हे नक्की. सत्तेचा माज आणि लोकांना गृहीत धरु नये हे कळलं. "होम पिच"वरही अवस्था बिकट होऊ शकते हे त्यांना समजलं,असं पानसे यांना वाटतं.

तुषार दामगुडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गुजरात निकालाविषयी मत व्यक्त केले आहे,  ते म्हणतात,

" ऐक ना, आय लव यु, मै तेरे बिना जी नही सकता  " तो 

" Oh No.... " ती

" काय झालं ?" तो 

" मी तुझ्या बरोबर भरपुर खाल्ले पिले, फिरले पण मी आजपर्यंत तुला "त्या" नजरेने कधी पाहिलं नाही " ती

" मग आता बघ" तो

" प्लिज रागवू नकोस , I Like You so much but माझ्या जोडीदारा बद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या मध्ये तु बसत नाहीस, पण तु शेवटपर्यंत माझा बेस्ट फ्रेंड म्हणून राहशील.....  " ती

तात्पर्य : याला म्हणतात सगळी बिलं मोठ्या आशेने भरून सुद्धा शेवटी "नैतिक विजय" पदरी पडणे.असे दामगुडे यांनी फेसबुकवर पोस्ट  शेअर केले आहे.

पुणे येथील पत्रकार अश्विनी सातव -डोके यांनी गुजरात निकालाचे वर्णन सुरेश भटांच्या ओळीत केले आहे. 
"आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यासत्व, 
विजय तो कसला जखम उरावर जो करणार नाही".

एकूणच गुजरात निवडणूक निकालांबाबत विविध राजकीय विश्लेषकांचे भाष्य, रविवारीय पुरवणी मधून काय समोर येईल, यावरून निकालाचे आणखीन गूढ समजून घेता येईल.

विकास पांढरे,९९७०४५२७६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...