ओबीसीत समावेश करून मराठा समाजास शिक्षण आणि नोकर्यात २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी रोखठोक भूमिका समन्वय समितीने छत्राखाली एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या दहा संघटनांनी घेतली आहे. सर्वच समाजघटकात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याची भूमिका घेतानाच मराठा समाजास आरक्षणाच्या समर्थनार्थ राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटकात मागासांना अनुक्रमे ६५, ६९ आणि ७२ टक्के आरक्षण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सकल मराठा समाजाने जे अभूतपूर्व मोर्चे काढले त्यामागे या समाजातील तरुणाईचा फार मोठा आहे. त्यांची स्वप्ने, त्यांच्या आकांक्षा आणि आशा, त्यांच्या ऊर्मी, त्यांची वैफल्ये याचा विचार आजपर्यंत कुणी केला नसल्यामुळे हा तरुण रस्त्यावर उतरला.
नेते, महानेत्याकडे अक्षम्य दुर्लक्ष
मराठा समाजातील तरूणांनी मोर्चा च्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला एकत्र आणले. पणगांभीर्याने विचार सुरू झाला. राज्यात सत्तेसोबतच शिक्षणसम्राट, उद्योगमहर्षी, सहकारसम्राट, साखरसम्राट, यासारखी सम्राटांची बिरूदावली मराठा समाजाकडेच आहे, बारामतीच्या पवारांपासून पतंगराव कदमांपासून दत्ता मेघेंपर्यंत आणि विखे पाटलांपासून मोहिमे पाटलांपर्यंत ते मराठवाडय़ातल्या देशमुख, चव्हाण, निलंगेकर, दानवे मराठ्यांनी शिक्षण, सहकार या क्षेत्रात स्वतः चा विचार केल्यामुळे या नेता आणि महानेत्यांना तरुणांनी आंदोलनापासून दूर ठेवले. पण थोर महापुरूषाचा विसर पडू दिला नाही ही आंदोलनातून सकारात्मक बाब समोर आली. पुढील काळात आंदोलने काढण्याची वेळ आली तर राजकीय नेत्यांना डावलायचे, अशी तरूणांची मानसिकता आहे.
तरूणाईच्या ज्वलंत लाव्हा
सकल मराठा आंदोलनात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग सामील झाला. या आंदोलनाविषयी कुणाच्या मनात संशयाची पाल चुकचुकण्याचे कारण नाही. कारण आरक्षणामुळेच आपला पिचलेला समाज पुढे जावू शकतो असे त्यांना वाटत. त्यासाठी रस्त्यावर उतरणारी, जल्लोषाने पेटलेली तरूणाई नजरेस पडली.
नगरची घटना केवळ निमित्तमात्र झाले. आर्थिक समस्येनी पिचलेली जनता, शिक्षण, नोकरी यामुळे आतल्या आत खदखदणारा तरुण या असंतोषातून मुक्त होऊ इच्छित होत. त्याला वाट करून दिली ती मराठा क्रांती मोर्चाच्या ज्वालामुखीने! आज या ज्वालामुखातून तरूणाईच्या ज्वलंत लाव्हा उत्सर्जित होत आहे, आंदोलनातील न्याय मागण्यासाठी चळवळ जिवंत ठेवणे हे काम करत आहे.तरूणाई घोषणा देत उठली नाही महत्वाचे आहे. तिला कशी पेटवायची, पेटवत ठेवायची याचा विचार करत आहे.
लोकशाहीतला सर्वात मोठा अघात
जगातल्या प्रत्येक क्रांतीचा नायक हा तरुणच होता. त्या त्या क्रांतीने जगाला नायक दिले हा आजपर्यंतचा इतिहास आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा सुध्दा तरूणांच्या बंडाने भरलेला आहे. काँग्रेसची मुहूर्तमेढ इथेच रोवली. इंग्रजाविरुध्द लढणारा पहिला तरुण इथलाच. हिंदु तरुणांचे संघटन करणारे केशव बळीराम हेडगेवार, कम्युनिस्ट तरुणांची एकत्रित मूठ बांधणारे डांगे, दलित तरुणांच्या अस्तित्वाला आणि वेदनेला विद्रोहाची फुंकर घालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भूमिगत तरुणांना एकत्र करून बंड पुकारणारे बाळासाहेब ठाकरे, तरुणांना राजकीय नेतृत्व उपलब्ध करून देणारे शरद पवार हे सर्व जण मराठी मातीतले मोहरे.
महाराष्ट्र व देशात ज्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक उलथापालथ झाली त्यातून एक आशादायी तरुण चेहरा समोर आला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच सकल मराठा समाजाने क्रांती मोर्चात ना आवाज, ना नारेबाजी, ना घोषणा, पाच पाच किलोमीटरची मोठी रांग काढून भारतीय आंदोलनाला नवा आयाम प्राप्त करून दिला. या आंदोलनातून स्व-नेतृत्व देशापुढे आणण्याची गरज होती, ते पुढे येऊ शकले नाही. हा भारतीय लोकशाहीवर झालेला सर्वात मोठा अघात आहे. कारण आज देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला आणखीन आश्वासक तरुण नायक- नायिकांची गरज आहे. भारतातला सर्वात मोठा मोर्चा निघाला पण त्यास चेहरा मिळाला नाही ही फार मोठी खंत आहे.
वैफल्यग्रस्त तरुण आणि संघटना
अस्मानी आणि सुलतानी कचट्यात अडकलेली शेती, डिग्री आहे पण नोकरी नाही अशा वैफल्य अवस्थेतील मराठा समाजातील तरूणांची मानसिकता आहे.
वैफल्यावस्था आलेल्या तरुण पिढी संभाजी ब्रिगेड, छावा, शंभूराजे युवाक्रांती यासारख्या संघटनांच्या छत्रछायेखाली जावे लागत आहे. लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मुखर्जी यांच्यावर हल्ला करून छावा संघटना गावोगाव पोहोचली. तर
पुण्याच्या भांडारकर प्राचविद्या संधोधन संस्थेवर हल्ला करून मोठे वादळ उठविणा-या संभाजी ब्रिगेडने शिवछत्रपतींच्या बदनामीविरोधात रणशिंग फुंकून बंडखोर, विद्रोही मराठा मानसिकता काय आहे, हे दाखवून दिले. पण या प्रकरणात अडकलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 'त्या' तरूणांची काय अवस्था झाली आहे याकडे कुणी लक्ष देत नाही. मराठा तरुणांची मानसिकतेचा कुणी अभ्यास करत नसल्याचे दिसून येते. मराठा तरुणांच्या मानसिकेतत समाज शास्त्रीय बदल घडवून आणणे गरजेचे आहे. कारण तथाकथित संघटनांच्या मागे लागून स्वतःची वाताहात करून घेऊ नये. अंधारात चाचपडत असलेल्या या तरुणांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे.
लातूरची ठेंणगी आणि संयम
मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होत असताना लातुरात एका युवतीने प्रक्षोभक भाषण करून मराठा तरुणांचे मन दुखावले. या भाषणास टाळ्या मिळल्या. एकीकडे जातिअंताच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे जातिद्वेष पेरणारे विधाने करायची, यातून काय बोध घ्यायचे. हे प्रक्षोभक भाषण समाज माध्यमात फिरत आहे. याबाबत मराठा तरूणांनी संयम दाखवून ना कुठे निषेध नोंदविला, ना कुठे जाळपोळ. त्यामुळे कुठेच अनर्थ घडना घडली नाही. तरुणांची मानसिकता नव्या चळवळीला मूल्य प्राप्त करून देणारी आहे.
मराठा समाजाच्या मोर्चाला प्रतिकार म्हणून दलित समाजाने मोर्चे काढू नयेत, असे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आवाहन महत्त्वाचे ठरले.
क्रांतीकडून जातीकडे
महाराष्ट्रात सकल मराठा समाज क्रांती मोर्चा यशस्वी झाला असला तरी गावोगावी जातीयवाद फोफावला आहे. तरुणांची मानसिकता महापुरूषांकडे बघण्याची दूष्टी बदलत आहे. धनगर, मराठा, लिंगायत, दलित, ओबोसी अशी तरुणांचे गट पडले आहेत. त्यामुळे कमालाची कट्टरता वाढत आहे. मोर्चा यशस्वी झाल्यावर आपल्याच जातीच्या दुकानात व्यवहार करा, असा अप्रचार सुरू आहे, यास तरुण पुढे आहेत. आधी जात्युच्छेक करणारा तरूण ही यात अडकला आहे. त्यामुळे त्यास कोण मार्गदर्शक असा प्रश्न आहे. या सर्व घटकात 'जात' ही अपरिहार्य पणे पुढे आली आहे. जात अस्मिता कमालीची टोकदर बनत असून जाती जातीत कप्पेबंद विभागणी होत आहे. मराठा समाजासह सर्व जातीतील तरुणांना जातीतून बाहेर काढणे आवश्यक आहे.
आरक्षणामुळे प्रश्न सुटणार का?
ज्या वर्गांसाठी आरक्षण राबवण्यात आले, त्या वर्गांची अद्याप पुरेशी प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे आणखी काही काळ आरक्षणाचे सूत्र पुढे चालूच ठेवावे लागणार, आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास त्याचा लाभ खरोखर मराठा समाजातील गरीब तरुणांना मिळणार का? मराठा समाजातील प्रस्थापित मंडळी आपल्याच वंचित, गरीब, पिचणाऱ्या तरूणांचा घास पळवून घेतील. साखरसम्राट, सहकारसम्राट आणि शिक्षण सम्राटकडून जास्त भीती आहे.
आधुनिक शेतीकडे वळावे
मराठा समाजाच्या समस्येचे मूळ शेतकऱ्यांची झालेली होरपळ होय. ६५ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. सध्या शेती परवडणारी नसली तरी समाजाला स्थिरत्व देण्यासाठी शेतीपुरक उद्योग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्याच्या मराठा तरुणांची शेतीकडे बघण्याचा दूष्टीकरण बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' संकल्पना पुढे आणली आहे. मराठा समाजातील तरूणांनी ही योजना समजून घेऊन इतरांना प्रेरणा द्यावी. शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करून कमी खर्चात जास्त नफा कसा मिळेल असा विचार करावा.
शकणार नाही. शेतीत गुंतवणूक वाढवावी लागेल. 20% लोकांना शेतीपूरक व्यवसायात न्यावं लागेल. शेतीच्या क्षेत्रात स्किल निर्माण करावे लागेल.
हमखास नोकरी देणारे शिक्षण
मराठा समाजाला आरक्षण महत्वाचं आहे पण शैक्षणिक मागासलेपण दूर झाले पाहिजे. खासगी शिक्षणामुळे अनेक तरूण कौशल्य असूनही शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य आले आहे.काही कोर्सेस असे की शिकणाऱ्या मुलाला स्किल मिळत नाही, नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण बेकार आहेत. आजच्या तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. या समाजातील तरुणांना नोकरी मिळेल असे कोर्सेस निर्माण करणे आवश्यक आहे.
विकासाच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञान
मराठा समाजात तरूण तरुणीची संख्या जास्त असूनही विकास का झाला नाही, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. यासाठी सर्व प्रथम विविध क्षेत्रातील विकासाच्या संधी शोधावी लागतील, मराठा समाजातील तरुण हा दोन विभागात मोडतो. एक प्रगतशील दुसरा अप्रगतशील. अप्रगतशील तरुणांकडे पैसा आणि ज्ञानाचा अभाव आहे. प्रगतशील तरुणांनी अप्रगतशील तरूणांना विकासाच्या ज्या ज्या संधी आहेत, त्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण विभाग न करता समानतेने विकासाची संधी निर्माण करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्राची योग्य सांगड घालावी लागणार आहे. कारण तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज माणसाला पूर्वी उपलब्ध नसलेल्या विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत हे मराठा तरूणांनी समजून घेतले पाहिजे.
सारांश, आज मराठा समाजाला तरुण भांबावलेला आहे. जागतिक करणाच्या ओघामुळे तो सावरु शकला नाही. आरक्षण हाच आपल्या भवितव्याचा मार्ग आहे, असे त्यांना वाटत आहे. भरकटलेल्या संघटनेच्या मागे लागून तरुणांच्या हाती सागरगोटे पडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.



























