गुरुवार, ६ जुलै, २०१७

यमगरवाडीचे आबा





कुणीतरी म्हटले की,जीवनातील नाती ही नियतीने बनवलेल्या असतात. ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. आबा ऊर्फ फुलाजी ताटीकुंडलवार हे त्यातील एक व्यक्तिमत्त्व. यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या प्रकल्पातील मितभाषी, विद्यार्थी प्रिय वसतिगृह अधीक्षक म्हणून ते परिचित आहेत.
      यमगरवाडी( ता.तुळजापूर) येथे सामाजिक समरसता मंचाने 'भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून १९९२-९३ पारधी समाजातील या एका जातीच्या २५ मुलांना घेवून पहिली शाळा सुरू केली.२५ मुले तीन झोपड्या आणि माळरान असे काही चित्र होते. यासाठी अनेक हातांनी काम केले.त्यांचे योगदान, त्याग हा समाजाला आदर्श घालून देणारा आहे. शिक्षण, स्वावलंबन, सन्मान व सुरक्षा या चतुसूत्रीचा अंगीकार करण्यात आला. त्यामुळे आज २५ वर्षात यमगरवाडी हे भटके विमुक्तांचे मुख्य केंद्र बनले आहे. माझं गाव यमगरवाडी पासून अवघ्या १५ किलोमीटरवर असल्याने प्रतिष्ठानच्या विविध कामाची लवकर माहिती व्हायची. गिरीश प्रभुणेकाकांनी घेतलेली मेहनत, लेख वाचनात येत असतं.त्यामुळे यमगरवाडी विषयी आपसूकच ओढ लागली. महाशिवरात्री असो व इतर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सवय लागली.
  प्रकल्पाची विविध माहिती घेत असताना ओळख झाली ती आबाची. आबा ऊर्फ फुलाजी ताटीकुंडलवार यांच्या भोवती सतत मुलांचा गराडा पाहून चकित झालो होतो. आबा तसे धर्माबाद -किनवट या वनवासी भागातले. नोकरीनिमित्त यमगरवाडीला आले पण पगारी नोकरदार म्हणून कधीच पाहिले नाहीत.

भटके विमुक्तातील अनेक समाजातील जसे,डोंबारी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मसनजोगी, ब‌हुरुपी,भिल्ल, पारधी, वैदू, वडार, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरीआईवाले, मेंडंगी-जोशी, सरोदे, शिकलकार, कोल्हाटी, धनगर, यासह २८ जातीच्या भटक्या समाजातील बांधवाचे
असंख्य मुले आणि मुली यमगरवाडीत शिक्षण घेत आहेत. ही सर्व मुले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. काही मुलांना तर कुटुंबाचा आधार नाही, ना घर ना मायबाप, ज्याचे आहेत ते वर्षे - सहा सहा महिने मुलांकडे येतील असे नाही. कारण ते ही आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी सतत स्थलांतर करत असतात. काही मुलांना प्रकल्पात आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. ज्या मुलांना आपल्या आई वडिलांची सतत आठवण येते. त्यांच्यासाठी आबा हा एक आधार वाटतो. काही मुलांना काय हवे असेल तर ते अगोदर आबांकडे हट्ट धरतात. यावरून आबा किती विद्यार्थी प्रिय आहेत हे लक्षात येते. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठवणेअसो वा सायंकाळी शाखेवर हजर करण्यासाठी आबा नेहमी तत्पर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची शिस्त लागली आहे. आबाच्या रूपात यमगरवाडी प्रकल्पाचा कर्तव्यदक्ष वसतिगृह अधीक्षक मिळाला आहे. अशा या व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
©विकास पांढरे, सा.विवेक मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...