मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

नक्षलवाद समजून घेताना


छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले. तर आणखी काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मन विषण्ण झाले. आपल्या देशातील गद्दार देशद्रोह करून सामाजिक विषमता कुलुषित करत करत आहेत. आपल्या देशाला नक्षलवाद्याचे हे आव्हान नवीन नाही. यापूर्वी भारतीय जवानांवर झाले आहेत. नक्षलवाद म्हणजे काय? स्वरूप, व्याप्ती आणि एकूणच भारत देशावर झालेला परिणाम समजून घेण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे नक्षलवादाचे आव्हान चीनचे भारताशी छुपे युद्ध हा ग्रंथ उपयुक्त ठरला. मुळात लेखक लष्करात राहून भारत चीन सीमा, भारत पाकिस्तान सीमा, काश्मीर, ईशान्य भारत, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात ३६ वर्षे सेवा केली आहे. या प्रदीर्घ अनुभवाची अनमोल शिदोरी म्हणजे हे पुस्तक होय.

पुस्तकाचे अतरंग 

३२४ पानाच्या या पुस्तकात भारताची अंतर्गत, बाह्य सुरक्षा आणि इतर आव्हाने, माओवाद्यांचा भारतात प्रसार आणि सध्याची परिस्थिती:नक्षलवाद आणि आपली व्यवस्था, माओवादाचा पूर्वइतिहास,देशात पसरण्याची कारणे आणि सरकारचा प्रतिसाद, माओवाद्यांचे अड्डे वने आणि आदिवासी-सरकारला काय हवे ? अहिंसात्मक सत्याग्रह की माओवाद ?, माओवाद्यांचे अत्याचार आणि भयभीत रक्तबंबाळ आदिवासी, माओवाद्याचे रक्तरंजीत थैमान आणि सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधाड्या,माओवाद्यांचे डावपेच,संघटना आणि लढण्याची पध्दती, माओवाद्यांचे अर्थकारण आणि खंडणी राज्ये, आँपरेशन ग्रीन हंट विरुद्ध रेड काँरीडाँट,एक थंडावलेली मोहीम, निवडणुका,लोकशाही आणि बुलेट वि.बँलेटची लढाई, माओवादी भरकटलेले विचारवंत आणि प्रसार माध्यमे, माओवाद्यांचे मानवी हक्क आणि इतर पैलू, माओवाद्यांचा चक्रव्युहात हरवलेले पोलीस आणि अर्धसैनिक बले, सलवा जुडूम,एसपीओज,c-७० कंमोडाज अदिवासी पोलिसांविरूध्द अदिवासी नक्षलवादी, माओवाद्यांची लढाई, वाटाघाटी : काही आशेचे किरण, माओवादी विदेशी सहकार्य आणि चीनचे भारताशी छुपे युद्ध, भारताची बाह (सीमा) ची सुरक्षा : १९६२ च्या घोडचुकांपासून आपण काय काही शिकलो का ? माओवाद्यांश लढाई :सेना शेवटचा उपाय, माओवाद संपविण्यासाठी व्यापक सर्व समावेशक उपाय आणि माओवाद थांबविण्यासाठी वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या अशा महत्त्वाच्या घटकांवर चिंतनशील विचार वाचायला मिळतात.

नक्षलवादाचे स्वरूप 

 नक्षलवाद्याचे उगमस्थान हे पश्चिम बंगाल, १९६७ साली कानु सन्याल आणि चारू मुझुमदार यांच्या ( नक्षलबारी गाव ) नेतृत्वाखाली नक्षलवाद उद्यास आला. १९७२ साली त्याचा बिमोड करण्यात आला. त्यानंतर १९८७ साली नक्षलवादाचा पुन्हा जन्म झाला.२०११ साली देशभर १६००हून अधिक नक्षलवादी हल्ले झाले. पाकिस्तान आणि चीनने तेल ओतण्याचा प्रयत्न केला. सध्या देशातील १६ राज्यात,२३२ जिल्ह्यात,१४ हजार खेड्यामध्ये नक्षलवाद कार्यरत आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड दंडकारण्यामध्ये दहा हजार च्या आसपास नक्षली आहेत. गेल्या पाच वर्षात ९ हजार ८२९ जण नक्षलवाद्यांच्या  गोळ्यांचे शिकार झाले आहेत.

नक्षलवाद्यांची संघटना :

       नक्षलवाद्यांच्या एकूण तीन संघटना आहेत. एक राजकीय,दुसरी सशस्त्र आणि तिसरी दलम. दलम ही नक्षलवादी कारवायांच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाची संघटना. प्रत्येक दलामध्ये दहा ते पंधरा तरुण असतात. त्यात तीन ते चार युवतींचा सहभाग असतो. एके ४७,३०३,३१२,१२ बोअर,हातबाँम्ब,देशी बनावटीच्या रायफल्स अशा शस्त्रांचा वापर केला जातो.

नक्षलवाद्यांचे अर्थकारण :-

आपल्या देशाचे बजेट नेहमी घाट्यात चालते पण माओवाद्यांनी बँकेमध्ये इतर ठिकाणी प्रचंड पैसा गोळा करून ठेवला आहे. खंडणी वसूल करणे, अफुची शेती,वनसंपत्तीचे स्मगलिंग करणे,याशिवाय परदेशातून माओवाद्यांना पैसा मिळतो. माओवाद्यांसाठी लढणाऱ्यांना चार ते पाच हजार रूपये पगार मिळतो.

नक्षलवाद्यांचा दहशतवाद :

महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या सर्व राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे विविध गट काम करत आहेत. जोपर्यंत नक्षलवाद्यांचा बिमोड होत नाही. तोपर्यंत पुढची शंभर वर्षे नक्षलवादी असेच उपद्रव देत राहतील.

नक्षलवाद्यांचे समर्थन म्हणजे रोगापेक्षा इलाज गंभीर :
आज तथाकथित विचारवंत,लेखक नक्षलवाद्यांचे समर्थन करत असतात. आतापर्यंत तीन नक्षलवाद समर्थक नेत्यांना रँमन मँगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाचा घात करण्याचा प्रकार तथाकथित मंडळी करत आहेत.

लष्करी कारवाई करण्याची वेळ :

१९६७-७० मध्ये प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे यांनी लष्करी दलाच्या सहाय्याने चळवळ मोडून काढली होती. पण त्यांची व्याप्ती लहान होते. आज ही चळवळ फोफावली आहे. तिचा निप्पात करण्याची वेळ आली आहे. जेथे जेथे अशा कारवाया होत आहेत. तेथे तेथे सशस्त्र दलांची संख्या वाढवून तिचा बिमोड करावा लागणार आहे.

सारांश :-
              लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपल्या ग्रंथातून भारतातील नक्षलवादी चळवळीला चीनचे कसे सहकार्य मिळते यावर मंथन केले आहे. माओवाद संपविण्यासाठी सर्व समावेशक उपाय देखील त्यांनी सांगितले आहेत. एकूणच भारतातील माओवाद-नक्षलवाद समजून घेण्यासाठी हा ग्रंथ सुजाण वाचक,विद्यार्थी, अभ्यासक यांना उपयुक्त आहे.
 ©विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७

नक्षलवादाचे आव्हान
चीनचे भारताशी छुपे युद्ध
लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन
०२२६ ८५१७८३,९०९६७०१२५३
प्रकाशन : नचिकेत प्रकाशन,नागपूर-४४००१५

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

जेव्हा माणूस जागा होतो..!


 गावगाड्यात स्थान नाही, गावकुसाबाहेरही जागा नाही,  गावाशिवाय अस्तित्व नाही,  गावाच्या शुष्क माळावर झोपडी टाकून राहणारा पारधी समाज आजही प्रवाहापासून दूर आहे. इंग्रजांनी माथी मारलेला गुन्हेगारचा शिक्का आजही ठळक आहे.  या समाजाच्या झोपडीत अजूनही लाईट पोहोचली नाही, ना नळाला पाणी, ना गॅस, ना शेंगडी.. मातीवरच्या चुलीवर आयुष्याचा संसार मांडलेल्या आणि चोरीचा शिक्का मारलेल्या या समाजाला ना हक्कानं काय करता येतं, पण हा बदल घडवून दाखवलाय याच समाजातील ज्ञानेश्‍वर भोसले या तरूणाने.

जेव्हा सगळचं संपून गेलयं, असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी  करून दाखवण्याचे. हे ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या कथेतून समोर येते. विठूरायाच्या पंढरपूर नगरीमधील ताडगावच्या जंगलात त्यांचा जन्म झाला. आई- वडील जंगलातील शिकार करून पोटाची खळगी भरायचे. दारिद्रय ही या समाजाची परवड. हातावर मागून घ्या, हातावरचा खा आणि त्यासाठी अनेकविध ताणतणाव सहन करा.  आयुष्यभर भूकेचे जाळे विणत असताना, जीवनाला स्थैर्य नाही, स्थैर्य नसल्याने उत्पन्नाची साधनं नाहीत, त्यामुळे वेळप्रसंगी चोरी करणे, चलाखी करून अन्न मिळविणे हे त्यांच्या जीवनात अपरिहार्य होऊन बसले होते. समाजाचे अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करा, हे त्यांच्या वाट्याल्या समाज व्यवस्थेने दिलेली भयानक वागणूक.  
या चौकटीनेच ज्ञानेश्‍वरच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. त्यात त्यांना सात वर्षांची जेल झाली. वडिलांच्या तुरूगांत जाण्यानं त्यांच्या आईनं आपले बस्तान गुंडाळले अन दामाजी पंथाची मंगळवेढा नगरी गाठली. 

अज्ञानाच्या अंधारात असणार्‍या भोसले कुटुंबात ज्ञानेश्‍वरची शाळा सुरू झाली. आई-वडिलांनी लावलेले शिक्षणाचे वेड, दारिद्रय आणि त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत ज्ञानेश्‍वरने दहावीपर्यंतचे कसे बसे शिक्षण पूर्ण केले. अश्‍वत्थाम्यासारखी दु:खाची भळभळती जखम आणि अंत:करणामध्ये अनुभवांची आग घेऊन शिकणे आणि जगणे चालू होते. अशातच बुध्दीची भूक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी त्याचा संघर्ष चालूच होता. अशातच पोलिसांकडून या समाजावर होणार्‍या अत्याचाराला सीमा नव्हती. पोलिसांनी ज्ञानेश्‍वरला एका गुन्ह्यात अडकवले. केसमध्ये अडकल्याने विद्येचा लळा तुटू लागला. पुढे त्याच्यावर डबल मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला या गुन्ह्यात तेरा महिने चौदा दिवसांची शिक्षा झाली.

 अशा विचित्र कोंडीत ज्ञानेश्‍वर अडकला गेला. जो गुन्हा त्यांने केलाच नव्हता, त्याची शिक्षा ज्ञानेश्‍वरला भोगावी लागली. वकिलाची फी जमा करण्यासाठी बहिण दारोदारी फिरली. अपर्णा रामतीर्थकर, दादा इदाते, अरूण करमरकर, गिरीश प्रभुणे आदींनी मोलाची साथ दिल्यामुळे ज्ञानेश्‍वरची सुटका झाली.

आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का का आणि कुणी मारला व पशुतुल्य जीवन आमच्यावर का लादले? या प्रश्‍नापासून असंख्य प्रश्‍नांचे मोहोळ उठवीत ज्ञानेश्‍वराला अस्वस्थ करून सोडले. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, खोट्यानाट्या केसेस टाकून नाडल्या गेलेल्या जातीबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी 1997 मध्ये भारतमाता आदिवासी पारधी समाज आणि भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या समाजाला मानाचे स्थान मिळवण्यासाठी ज्ञानेश्‍वर धडपड करू लागला. सन 2008 मध्ये सोलापूरमध्ये दोनशे चौर्‍याऐंशी गावांत पारधी समाजाचे शिबिर लावून चाळीस हजार लोकांना मतदार ओळखपत्रे, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखले अशी विविध कागदपत्रे मिळवून देण्यास ज्ञानेश्‍वरने  मोलाचा वाटा उचलला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर विधायक सहकार्य केले.

माणसाला शिक्षण मिळाले की,  माणूस बदलून जातो.  त्याच्यात परिवर्तन होते. या भावनेने प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे, असे ज्ञानेश्‍वरला वाटले. जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या सहकार्याने मोहोळमध्ये दहा गुंठ्यावर पारधी मुलांची  शाळा सुरू केली.  शहरातल्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल असे दर्जेदार शिक्षण इथे मुलांना दिले जात आहे. शिक्षणाचा कोणताही गंध नसलेल्या, जन्मतारीख नाही, गाव माहीत नाही, आई-वडील काय करतात याचा पत्ता नसलेल्या या समाजातील मुले-मुली  शिक्षण घेऊन त्यांच्यात उमेद निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे. अनेक मुले चांगले शिक्षण घेऊन उच्चपदावर पोहोचत आहेत. गावकुसाबाहेरच्या ते  आदर्शवत काम करतायेत. शिवाय शिक्षण, आरोग्य, बचतगटाच्या माध्यमातून या समाजाला  नवी आशा, नवी दिशा प्राप्त करून देण्याचे कार्य ज्ञानेश्‍वर भोसले करत आहेत.

दारिद्रय, दु:ख, लाचारी, अन्याय, अत्याचार या अनुभवाने होरपळून गेलेल्या या समाजाला स्थिरता देण्यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पारधी या भटक्या विमुक्त जमातीमध्ये शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही. शाळेत जाण्यासाठी कुटुंब एका ठिकाणी स्थिर असावे लागते आणि पारधी समाजाला स्वत:चे गाव नाही. रोज या गावाहून त्या-त्या गावाला भटकणारा हा समाज आहे. कुठल्या तरी गावी पालं टाकायची आणि  पोलिस पाटलाकडे नोंदी करून तीन दिवस राहायचे असा शिरस्ता असलेल्या या समाजातील मुलांना ज्ञानेश्‍वर शिक्षण देत आहे. गरज आहे शासनाच्या अनुदानाची. यास अनुदान मिळाल्यास अभियानाला आणखीन फलित मिळेल. 

पारधी समाजातील अज्ञानाच्या अंध:कारात आणि गुन्हेगारीच्या कोंडीत सापडलेल्या जमातीमध्ये जन्मलेल्या ज्ञानेश्‍वर भोसले यांनी आपले जीवन तसेच न ठेवता बदलून घेतले आहे. त्यांनी या समाजातील अन्याय, अत्याचाराविरूध्द, दैन्य दास्याविरूध्द संघर्ष केला आहे. समाजात त्यासाठी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पारधी समाजाच्या मुक्ततेच्या अशा चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्‍वर भोसले यांना पाहणे आवश्यक आहे. कारण या समाजातील तरूण तरूणींना आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानेश्‍वर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. त्यामधून हजारोंना रोजगार मिळाला आहे. याशिवाय इंदिरा आवास योजनेतून आदिवासींसाठी असलेल्या प्रकल्पांतर्गत अनेकांना घरे मिळवून देण्यात त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या विधायक कामामुळे या समाजाला जगण्याचे बळ मिळाले आहे. एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतात आणि त्यावर मात करतात. जसजसे या समाजात जागृती वाढत आहे, तेव्हापासून हा समाज प्रवाहात येण्याची संख्या वाढू लागली आहे. या समाजाला आत्मसन्मानाने जगता  यावे यासाठी सरकार दरबारी बावीसशे हेक्टर जमीन मिळावी यासाठी ज्ञानेश्‍वर प्रयत्न करत आहे.

 सोलापूर जिल्ह्यात पारधी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानेश्‍वर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. हेच त्यांच्या अभियानाचे फलित होय. राज्य सरकारने ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेला अनुदान देऊन आत्मसन्मान करणे गरजेचे आहे.   

 (दैनिक पुढारी, सोलापूर १३ एप्रिल २०१७)
लेखक- विकास पांढरे,९९७०४५२७६७।                   
  सामाजिक कार्यकर्ता- ज्ञानेश्वर भोसले - ९९२३९६९१९८


गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

पारधी मुलांत तिने जागवली 'उमेद'

आजच्या तरूणाईला सामाजिक भान नाही, समाजाच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील नाही अशी ओरड ऐकावयास मिळत असते. पण काही तरूण प्रसिध्दीपासून दूर राहून सामाजिक कार्याचा वसा चालवत असतात. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. त्यातच महिलांच्या सामाजिक कार्याला माध्यमांतून क्ववचित प्रसिध्दी मिळत असते. महिला आर्थिक विकास महामंडळात उच्च पदाचा राजीनामा देऊन पारधी समाजातील मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणार्‍या मंगेशी मून या तरूणीची कहाणी प्रेरणादायी आहे.

 मंगेशी मून या मूळच्या वर्धा जिल्ह्यातला. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक होत्या. लहानपणापासून समाजसेवेची त्यांना आवड. नोकरीत राहून समाजाचे म्हणावे तसे काम करता येत नसल्याची खंत त्यांना वाटत होती. त्यातच मुंबईतील रस्त्यावर दिसणारी वंचित घटकातील मुलांविषयी काही तरी करायचे असा मनोमनी दृढनिश्‍चय करून ते साध्य होत नव्हते. त्यामुळे मंगेशी मून यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पारधी समाजातील मुलांच्या कार्यकर्त्या बनल्या आहेत.

 समाजात नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या पारधी समाजाची आजही परिस्थितीत बदलली नाही. ना हक्कांचे घर आहे ना जागा, कोणतेही अघटित घटना घडली की पोलिसांची नजर या समाजाकडे जात असते. अशा या वंचित समाजातील मुलांची अवस्था तर फार बिकट असते. या निरागस बालकांना जगात काय चालले आहे, याचे भानही त्यांना नसते. बाजारपेठा, बसस्थानक, सिग्नल जवळ भीक मागत फिरणे  एवढेच त्यांच्या नशिबी असल्याची जाणीव होत असते. हा समाज रानावनात भटकणारा आहे. तो कुठेही स्थिर नाही. 

समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे सर्व बदल घडविण्यासाठी शिक्षण आणि संस्काराची गरज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंगेशी मून ही तरूणी मुंबई येथील महिला आर्थिक महामंडळातील नोकरीचा राजीनामा देऊन व सुखी जीवन सोडून पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्धा (रोठा) येथे उमेद फाऊंडेशनची स्थापना केली आहे. कोणतीही सरकारी मदत न घेता पारधी समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यात यश मिळाले आहे. ती आपल्या गावापासून सुरूवात केली आहे.

त्याचबरोबर या समाजातील महिलांच्या अंगी उमेद जागविण्याचा प्रयत्न केला आहे. वर्धात पारधी समाजाच्या  मुलांसाठी काम करण्यासाठी आल्या आहेत. आपल्या गावात पारधी समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. असे कळल्यावर त्यांनी येथील पारधी वस्तीवर गेल्या वर्षापासून काम करत आहेत. वस्तीवरचा त्यांचा अनुभव भयानक आहे. तितकाच संवेदनशील. 
जेव्हा त्या वस्तीत गेल्या तेव्हा दारूचा वास येत होता. सुरूवातीला नाकाला रूमाल लावून त्या काम करू लागल्या. 

आजूबाजूला सर्व मंडळी दारूच्या नशेत बोलत असे. तरीही एक महिला विचित्र अवस्थेत होती. त्यामुळे तिच्या जवळ जाऊन बसल्या असत्या. त्या पारधी महिलेच्या तोंडात तंबाखूचा गोळा होता. अंगावर मळकट साड्या, केस न विंचरलेले असं काही चित्रविचित्र अनुभव होता, असे मंगेशी मून यांनी सांगितले. बर्‍याच मुलांना अक्षरांचा गंधही नव्हता. अशा मुलांना शिक्षणाची गोडी लागत नव्हती. अनेकांनी शिव्या दिल्या. पण जिद्द न हारता दीडशे मुलांचे पालकत्व र्धेर्याने त्या स्वीकारल्या आहेत. या मुलांना आजच्या समाजाशी समरस होण्यासाठी वसतिगृह काढण्याचा प्रयत्न करतायेत. त्यासाठी देवराजी पुसाटे यांनी दोन एकर जागा उमेद संस्थेला दान केली आहे.

  आजच्या तरूणाईसमोर आदर्श

कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न मानता समाजासाठी कार्य करता येते. याचे ज्वलंत उदाहरण मंगेशी मून आहे. पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिची धडपड उमेद निर्माण करणारी आहे. वर्धा जिल्ह्यात तिचे सुरू असलेले काम आजच्या तरूण-तरूणीसमोर प्रेरणादायी आहे. मंगेशी मून हिच्या कार्यासाठी संवेदनशील  तरूण-तरूणींच्या हातांची गरज आहे.

( दैनिक पुढारी, सोलापूर ६ एप्रिल २०१७ )
लेखक-विकास पांढरे, सोलापूर-9970452767
मंगेशी मून, वर्धा -9987156930

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

समाजसेवेचा वसा घेतलेले गुरुजी




ज्याला काही करून दाखवयाचे असते तो, कुणाची वाट पाहत बसत नाही. दृढनिश्‍चयी मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काढत पुढे जात असतात.हेच पहा ना नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक विश्‍वनाथ बुक्के गुरूजी हे सामाजिक भान असलेले हाडाचे शिक्षक.  नांदेड आणि आष्टुर परिसरात लोक त्यांना 'गुरूजी' नावाने ओळखतात. समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन, आपले जीवन समाजासाठी वाहिलेले आहे. संत गाडगेबाबा महाराजाचा वसा चालण्याचे काम ते गेल्या साठ हून अधिक वर्षापासून करतात. प्रसिध्दीपासून चार हात लांब राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी यांचे कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे आहे.

 नांदेड जिल्ह्यातील आष्टूर या गावात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्मा झाला. वडील तिसरी असताना वारले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठे आभाळ कोसळले. जगण्याची परवड न करता त्यांच्या आईने मोठ्या हिंमतीने आपल्या मुलांना शिक्षण शिकवले. विश्‍वनाथ हे तिसरे अपत्य. मुलांचे पाय पाळण्यात दिसावे, तसे त्यांचे व्यक्तिमत्व दिसून येत येते. शाळेत ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे. गावात भजन असो इतर धार्मिक कार्यक्रम त्यात ते सहभागी असायचे विशेष: म्हणजे संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज हे आष्टूर व परिसरात प्रवचनास आले की, ते नेहमी हजर असायचे.त्यामुळे त्यांना लहानपणीच वैचारिक भान आले. 

सातवी आठवीत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन, विश्‍वनाथ गुरूजी यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन ’भारत वाचनालय’ची स्थापना केली. गीता, रामायण, दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरी या धार्मिक ग्रंथाबरोबरच महापुरूषांचे चरित्र व इतर वैचारिक ग्रंथ याठिकाणी वाचनात आल्यामुळे विश्‍वनाथ गुरूजीचे जडणघडण होत गेली. "आधी केले मग सांगितले" या उक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्या संताने जनसमूहाला हाती टाळ- मृदृग नव्हे तर झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले ते म्हणजे संत गाडगेबाबा. गाडगेबाबांचे स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन त्यांनीही गाव स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. दहावीत शिकणारा हा पोरं. शिकून मोठे व्हायचं सोडून हातात झाडू घेऊन गावभर हिंडत असल्याचे पाहून बुक्के कुटुंबिय वैतागून गेले होते.

अशिक्षित आणि सुशिक्षित दोन्ही समाजाला खर्‍या अर्थाने सुसंस्कृत करण्यासाठी विश्‍वनाथ बुक्के गुरूजीचे ही धडपड आजही अविरत चालू आहे. शिक्षकी पेशीतून सेवानिवृत्त होऊन, त्यांना वीस वर्षे झाले,  आज त्याचे वय 79 आहे. प्रकृती मात्र ठणठणीत आहे. प्राणायाम, योगासन ते न चुकता रोज करतात.  नांदेडहून दर सोमवारी आष्टुर मध्ये येऊन खराटा घेऊन गाव स्वच्छ करण्याचे अखंड वृत्त ते आजपर्यंत जोपासत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आष्टूर गावातील महिला घरातील कचरा रस्त्यावर कधीच टाकत नाहीत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर आहे. गावात एकीचे वातावरण आहे. एवढेच काय राजकीय पुढारी देखील त्यांचे शब्द प्रमाण मानून गावाचा विकास कसा होईल, विचार करतात. गावातील प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होत असतात. त्यामुळे ते कधीच पेरके वाटत नाहीत. 

 'स्वाध्याय'परिवाराच्या माध्यमातून गावातील लोकांना संस्कारित करण्याचा प्रयत्न ते करतात. बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून बाल मनावर चांगले संस्कार रूजवण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. कोणत्याही विषयाच्या मनात भय न आणता विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे असे ते सांगतात. विविध महापुरूषांच्या गोष्टी, संस्कारक्षम विचार, लोकगीते, साने गुरूजींच्या कथा अत्यंत रसाळपूर्ण वाणीत ते सांगत असल्यामुळे आबालवृध्दाचे लाडके बनले आहेत. गुरूजींच्या सहवासामुळे गावात भक्तींचे वातावरण निर्माण झाले आहे. एकादशीचे भजन, भक्तिफेरी, भगवद्गीतेवरील प्रवचन असे विविध कार्यक्रम होत असतात. गावातील तरूणांना एकत्रित करून, त्यांनी विधायक कामात कसे झुकून द्यावं याविषयी मागदर्शन करतात. अनेक तरूण गुरूजींच्या कार्याची प्रेरणा घेऊन श्रमदान, व्यसनमुक्ती चळवळ अंधश्रध्दा चळवळीसह राजकारणात यशस्वीपणे काम करत आहेत. आष्टुर गावाला बुक्के गुरूजीमुळे वैचारिक परिपक्वता आली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही हतबल न होता दोन हात करण्याची प्रेरणा बुक्के गुरूजींच्या प्रेरणेतून मिळत असल्याचे गावात समाजसेवा करत असलेला तरूण बाबासाहेब पाटील बाबर यांनी सागितले.



प्रत्येकाने आपले तीर्थक्षेत्र स्वत:च शोधायचे असते आणि तेही अंतस्थताच तोच आपला अंतर्यामी गाभारा आहे, असे साधं तत्वज्ञान सांगतात. सध्या प्रसिध्दीचा जमाना आहे. कणभर काम करायचे आणि मणभर प्रचार करायचा असा नवा पायंडा अनेकांनी आपलासा केला आहे. परंतु विश्‍वनाथ बुक्के गुरूजींनी प्रसिध्दीपासून दूर राहून आयुष्यभर निरपेक्षपणे समाजजागृतीचे मणभर काम करत आहेत. साठ वर्षापूर्वी हातात झाछू हाती घेतला. परंतु,फोटो कधी काढला नाही, कुणी काढला तर त्यास विरोध केला. कुणी बातमी करण्याचा प्रयत्न केला असता, मला प्रसिध्दीची हौस नाही, कृपया वर्तमानपत्रात माझ्या कार्याचे वृत्त प्रसिध्द करू नका, असे गावातील लोकांनाा तेे सांगतात. हे एक महान कार्य आहे. लोकांनी यात स्वच्छेने सहभागी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. समाजाकडून तसेच मुलांकडून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षक हा सर्वांगीण विकास आणि विविध जबादार्‍यांच्या भाराने दबल्याचे आज दिसत आहे. त्यामुळे आजचा शिक्षक बहुआयामी असला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. 

आज शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त होऊन, घरी बसणारे भरपूर आहेत. अनंत काणेकरांच्या दोन मेणबत्ता लघुनिबंधात वाक्य आहे, स्वत:साठी जगलास तर मेलास, दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, जगणं आणि मरणं म्हणजेच माणुसकी. सतत दुसर्‍याच्या सुखासाठी झटणारे, प्रसिध्दीपासून दूर राहून समाजासाठी व्रतस्थपणे काम करीत राहणारे विश्‍वनाथ बुक्के गुरूजी कार्य प्रेरणादायी आहे. 32 वर्षे नोकरी सांभाळली असली तरी संत गाडगेबाबा महाराज यांचा कार्यकर्ता म्हणून काम पाहले. गुरूजींच्या कार्याममुळे आष्टूर गावाला एक नवी दिशा मिळाली आहे.आदर्श समाजसेवक कसा असावा याचे मूर्तीमंत उदारहण सर्वासमोर ठेवले आहे.

लेखक - विकास पांढरे, 9970452767
विश्‍वनाथ बुक्के गुरूजी : 8605028190
(पूर्वप्रसिध्द ज्येष्ठपर्व त्रैमासिक)


सोमवार, २० मार्च, २०१७

राजस्थानच्या शुष्क वाळवंटातील वृक्षपुरूष...!



ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असं राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाखापेक्षा जास्त झाडे लावून, तन, मन, आणि धनाने जागविणार्‍या विष्णू लांबा या वृक्षप्रेमी तरूणाच्या कार्याला सलाम ठोकले पाहिजे.
देशात पर्यावरणाबद्दल जागरूकता आलेली आहे.  जसजशी लोकसंख्या वाढत आहे. नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे. त्याबरोबरीने पर्यावरण वाचावे. जंगल नष्ट होऊ नयेत आणि वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी विविध समाज संस्थेकडून
प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात वृक्ष, प्राणी पक्ष्यांचे महत्वाचे स्थान आहे.  पर्यावरणाचा समतोल राखावा,  वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी राजस्थान सारख्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तब्बल पाच लाख झाडे लावून जगण्याचे अतुलनीय कार्य विष्णू लांबा या तरूणाने केले आहे.

 इतकेच नाहीतर तब्बल नऊ लाख झाडे तोडण्यापासून वाचविणारा लांबा हे राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ात वृक्षपुरूष म्हणून ओळखले जात आहेत.
लहानपणी आजूबाजूच्या लोकांनी लावलेली झाडे चोरून आणून आपल्या भागात लावण्यात ते पटाईत होते. एवढेच काय त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या रोपवाटिकेतून झाडे चोरून आणून आपल्या घरी लावली.


 लांबाचे काका यांनी त्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या घरी घेवून गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी चोरी करणे वाईट आहे,  मात्र झाडे लावणे चांगले आहे. असे म्हणत त्यांना काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी त्यांनी सात वर्षे घर सोडले.  पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागले.  समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल,  त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. लांबा यांच्या कार्याचा विषय प्रथम लोकांनी थट्टेवारी नेला.  पण त्यांच्या चांगुलपणाचा आणि निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व कळल्याने,  लांबा यांच्या कार्यास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  हाच लांबा आता राजस्थानच्या शुष्क वाळवंटात पर्यावरणाचा जतन करणारा आणि वृक्षलागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍यासाठी आयकॉन बनला आहे.



 बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,  अजय देवगण,  सुभाष घई, अनुराग कश्यप,  अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.  तर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर,  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे,  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लांबा यांच्या कार्याचा गौरव केला आहे.  वृक्षमिञ म्हणून ओळख असलेल्या लांबा यांनी प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना पाच झाडे भेट देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
हुंड्यात मागितली झाडे
लांबा यांच्या भावाच्या लग्नासाठी हुंडा किती घ्यावा यावर चर्चा सुरू होती.  यावेळी लांबा यांच्या वडिलांनी विष्णू आमचा मोठा मुलगा आहे. हुंड्याचं त्यालाच विचारा असे सांगितल्यावर वधूकडील मंडळी अचंबित झाले.  लांबा ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी जातात तिथे वधु वराच्या हस्ते वृक्षारोपण करवतात.  त्यामुळे लांबा हे नाव राजस्थान मध्ये सर्वञ परिचित झाले आहे.

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(जागतिक वन दिनानिमित्त २१ मार्च २०१६ रोजी दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख )

..........................................

शनिवार, १८ मार्च, २०१७

हॅलो, मी साहेबराव करपे बोलतोय !


साहेबराव :-  हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय...

सरकार :   ....

साहेबराव :- सरकार... यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात माझी शेती होती.वाडा होता.घरात वारकरी संप्रदायाचा वारसा होता. येळ मिळेल तवा भजनात दंग व्हायचो. चाळीस एकर शेती मन लावून करायचो. माझी पत्नीही मला साथ द्यायची.. आपली शेती अन् भजन बरं! यातचं आम्ही समाधान मानायचो. ध्यानीमनी नसताना गावकऱ्यांनी मला सरपंच केलं.. अकरा वर्ष सरपंचपद भोगलो, पण आम्हा कुणब्याला यातलं काय समजलं नाय, काळी आईची सेवा करण्यात आमची जिंदगाणी गेली.. कुठलं आलं ते राजकारण..

सरकार :-  .....

साहेबराव  :- सरकार काय सांगू ? आमचा भाग दुष्काळी. हमखास पाऊस देणारी नक्षत्रं कोरडीच गेली होती. लोक हवालदिल झाली होती. घरात अन्न नव्हतं.. हातात पैसा नव्हता..डोक्यावरचं कर्ज वाढतच होतं..गुंठा गुंठा विकत गेलो पण कर्ज काय फिटलं नाय.. कापसाला भाव मिळत नव्हता.. वीजेचं बिल यायचं तेच फेडत बसायचो. सगळा इस्कोट व्हायचा.. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं घरात कधी सण साजरा केला नाय.दिवाळीत मात्र कालावाकालव व्हायची, माझ्या चिमुकल्याना ना नवीन कपडे ,ना फटाके दयायची ऐपत नसायची. चटणी भाकर खाऊन बछडे वाढवली. 

बायकोला ना कधी नवीन साडी घेऊन देता आली. या फाटक्या संसारात काळी आईची सेवा करत राहिलो. जित्राबात मन लागत होतं. माझ्या दोन खिल्लार बैलजोडीवर सर्व शेत नांगरत होतो. त्यांच्यामुळं बळ मिळायचं. पण कर्जापायी आठवडी बाजारात त्यांना विकून आलो. इथंही व्यापारी आणि दलालानं गंडवलं. असं सगळं सुरू होतं सर्व ते सहन होतं नव्हतं, सरकार, सर्व पुढे आक्रीतच घडत गेलं....

सरकार :-

साहेबराव :- "पावसाची वाट पाहून व्याकुळ झालो होतो, देणेकरी रोज दारात येऊन बसायचे, तुमच्या बँकेचे लोक यायचे. म्हणायचे- फेडता येत नाही तर घेता कशाला ? मी अगदी शांत ऐकायचो, थकीत वीज बिलापोटी वीज तोडणी करण्यात आली.  ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला होता.. कर्ज आणि बिल फेडण्याची चिंता लागून राहिली होती.
"ती" जमिनीत पाय रोवून उभी राहात म्हणायची,
"पाऊस येतोय न्हवं का"  आशाभूळत नजरेने आभाळाकडं एकटक बघायची. कधी कर्ज फेडू आणि सुखाचा संसार करू असं तिला वाटायचं, माझं पिल्लं ही खूप गोड होती. त्या निरागस बालकांना रानशीळ खूप आवडायची.. मातीच्या सुवासाने गंधित झालेला वारा, हिरवी मखमल पांघरलेले रान, रानात आपल्याच नादात ती सर्व जण खेळत, बागडत...रंगीबेरंगी पक्षी, गायवासरे, पक्षाची आणि जित्राबाची गोड सुरावट ऐकून ते आनंदित आसयाची. त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हर्षोल्हास व्हायचा, आज ३१ वर्षानंतर पुन्हा मन भरून आलं. आज माझ्या मुलांची लग्ने झाली असती. कुणी शेत, तर कुणी घराकडं लक्ष दिलं असतं, आम्ही दोघं म्हातारी, ढालजत स्वस्थ पडून बघायचं..एवढं स्वप्न आमच्या नशीबी नव्हतं.....

सरकार :-

   साहेबराव :- सरकार, काही तरी नवीन करावं? असं काहीच नव्हतं, त्यामुळं आम्ही पती-पत्नीनं  मनाशी ठरवलं.मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलो,
 १९ मार्च १९८६ रोजीचा दिवस. मी, पत्नी आणि चार मुलांसह कुष्ठधामात आलो. तिथं खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीनं भजने गायलो. सोबत आणलेल्या स्टोव्हवर बायकोनं भजी तळली. त्यात विषारी औषध मिसळलं. मुलांना भजी खायला दिलो.एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ बायकोसह मी ही जगाचा निरोप घेतला. आज या घटनेला ३१ वर्ष पूर्ण झाली. सरकार, मी कुणालाही दोष दिला नाही? तसं चिठ्ठीत लिहून ठेवलो होतो. त्यामुळं अनुदान, कर्जमाफी, तातडीची मदत असं काही अशा आणि अपेक्षा नव्हत्या, कारण, शेतकरी जात स्वाभिमानी असतीय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, मी जागतिकीकरणाचा पहिला बळी ठरलो, अशा बातम्या छापून यायच्या, ९० नंतर जागतिकीकरणाचं युग सुरु झालं. त्या काळात माध्यमांचं इतकं पेव फुटलं नव्हतं. शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार पूर्वापार चालत आलाय. शेतकरी आत्महत्या माझ्यापासून सुरु झाल्या अशी नोंद आहेत.पण माझ्या ही आधी कुणी तरी केली असेल, त्याची फक्त दखल घेतली नसेल?आज शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.  केंद्राचे पथक येऊन गेले.निधी मिळाला पण आत्महत्या काय कमी होत नाहीत. पी.साईनाथ यांच्या म्हणण्याप्रमाणं २००५ पर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१७ पर्यंतचा आकडा सांगू नका?

मागे एकदा-
"पंतप्रधान म्हणाले,
घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं
नियोजन करता येत नाही
म्हणून शेतकरी आत्महत्या करतात,
सरकार तुम्हीच सांगा?देशाचं आणि राज्याचं नियोजन जमलं नाही म्हणून तुम्ही आत्महत्या केल्या होत्या का ? कुणी साले म्हणाले, तर कुणी धरणात...काय काय?
सरकार :-
साहेबराव :- मायबाप सरकार, मला माहित आहे, कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात, सरकारला एकांगी, एककल्ली, एकदेशीय भूमिका घेता नाही.पण जिवंत माणूस जेव्हा आत्महत्या करायला सुरुवात करतो, तेव्हा सत्य, न्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं.
नापिकी,दुष्काळ, वाढत्या उत्पादन खर्चामुळं न परवडणारी, ढासळून पडणारी कृषी व्यवस्था यामुळंच रोज एक 'बळी'चा बळी जातोय.

सरकार :-

साहेबराव :- मायबाप सरकार, आमची अजून किती परवड होणार? .शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेची चावी किती वेळा घेता ?आज विरोधी पक्षात असलेले काल सत्तेत होती, आज सत्तेत असलेली मंडळी काल विरोधी पक्षात होती. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला परवडेल असा भाव द्या साहेब, भांडवलदार, उद्योगपती आमच्या जमीनी  कमी मोबदल्यात घेऊन  डल्ला मारतायेत,  जमीनविषयक नवे नवे कायदे आमचा घात करणारी आहेत. 

सरकार :-
साहेबराव :- सरकार, हरितक्रांती, धवल क्रांती चा मूठभर लोकांना फायदा झाला. मागे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफीचा आम्हाला कितपत फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. मायबाप सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. खेडी ओस पडताहेत. आमचा शेतकरी शेती, बैल, बारदाना, गुरे -ढोरे, गाई-वासरे, झाडे यांच्याशी अंत:करण पूर्वक जोडला गेलाय. आज त्यांच्या मुलांची शेतीकडे बघण्याचा कल बदलत चाललाय. माझा बाप शेतीत मेला, मी मरणार नाही, ही त्याची भूमिका बनत आहे. त्याची ही मानसिकता बरोबर आहे. पण माझी काळी आई कोण सांभाळेल. नव्या बदलांमुळं त्याचं होरफळलेलं मन फक्त तुम्हीच बदलू शकता तरच जगाचा पोंशिदा जगेल. एवढीच मागणी मान्य कराल, अशी अपेक्षा आहे.    
       धन्यवाद    
         आपला
 साहेबराव करपे, पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी

  लेखक - विकास पांढरे, मु.पो.इटकळ, ता.तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद. मो.९९७०४५२७६७ ईमेल आयडी : vikaspandhare3@gmail.com
(टिप : वरील आशय कल्पानिक आहे, त्यामुळे व्यक्तिंशा कुणी अर्थ काढू नये. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून प्रकट केलेल्या भावना आहेत.)

फोटो :इंटरनेट सेवा

शनिवार, ११ मार्च, २०१७

यशवंतराव आणि उजनी धरण विस्थापितांचा विकास


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राच्या समृध्दीला कारणीभूत आहेत. त्यांच्या  संकल्पनेतून  साकार झालेली सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची निर्मिती हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे ‘दुष्काळी जिल्हा’ हा  सोलापूर  जिल्ह्यावर मारलेला शिक्का पुसला गेला. उजनी धरणनिर्मितीबद्दलचा विशाल दृष्टिकोन आणि पुनर्वसन संबंधित विचाराबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिशादर्शक विचार मांडले होते. आज उजनी धरणामुळे 52 गावे विस्थापित झाले आहेत. या गावांचा अद्याप मूलभूत विकास झाला नाही. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या विचारांतून विस्थापित गावांचा विकास होणे गरजेचे आहे.

 यशवंतरावांचे स्मरण

आपल्या  40 वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला  दिशा देण्याचे आणि समतोल व जातीभेदरहित राजकारणाचा  वारसा देण्याचे कार्य  स्व. चव्हाण यांनी केले. शेती, सहकार, पंचायत राज, साहित्य, उद्योग, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय असे योगदान दिले. त्यामुळेच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हटले जाते. 12 मार्च हा त्यांचा जन्मदिवस. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी जलायशाच्या निर्मितीमागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 उजनी धरणाची निर्मिती
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात 7 मार्च 1966 मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उजनी धरण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर 1976  मध्ये धरण पहिल्यांदा भरले. तेव्हापासून आजपर्यंत या महाकाय धरणाच्या लाभक्षेत्रात सातत्याने पाणीसाठा होत गेला आणि गावच्यागावे पाण्याखाली गेली. सुंदर पुरातन आणि देखण्या वास्तू, मंदिरे धरणग्रस्तांना जशाच्या तशा सोडून जाव्या लागल्या होत्या. त्याअगोदर सोलापूरवर ‘दुष्काळी जिल्हा’ असा शिक्का होता. तो पुसण्याचे कार्य स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 117 टीएमसी एवढ्या विशाल पाणी क्षमतेचे उजनी धरण बांधून सुरू केली.


उजनी धरणाचे संग्रहीत चित्र


उजनी धरण विस्थापित
विस्थापित गावांची ससेहोलपट
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आज पाण्यामुळे ऊस कारखानदारी वाढली आहे.  लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 52, पुणे 22, अहमदनगर जिल्ह्यांतील  तीन या विस्थापित गावांची काय अवस्था आहे?  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 52 गावात उजनी धरणामुळे विस्थापित झालेले लोक राहतात. त्यांच्या वाट्याला सुलतानी कारभारामुळे संघर्षच उभा राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील सहा विस्थापित गावांना ग्रामपंचायती व 11 गावांना महसुलीचा दर्जा मिळाला नाही.  धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे पंढरपूर, मोहोळ, माढा या तालुक्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.

             यशवंतरावांच्या दूरदृष्टितून विकास

शेतकरी आणि शेती समृध्द व्हावी हा मुख्य उद्देश उजनी धरणाच्या निर्मितीमागे होता. याबाबत  स्व.चव्हाण यांनी आपल्या ‘युगान्तर’ या ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. ते म्हणतात, भीमा नदी आडवावयाचे हे जे काम चालले आहे  ते तरी कशाकरता चालले आहे ? ही वाहत जाणारी नदी आम्हाला पाहवत नव्हती म्हणून हे काम चालले नसून या नदीच्या पाण्यात जे सामर्थ्य आहे त्याचा उपयोग आमच्या शेतीला झाला पाहिजे आणि त्या शेतीतून संपत्ती निर्माण झाली पाहिजे, असा या कामाचा अर्थ आहे. 
करमाळे तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली चालली आहेत आणि इंदापूर तालुक्यातील वीस गावे या योजनेखाली जात आहेत. आणखीही काही गावे जाणार असतील. या सगळ्या गावांच्या पुनर्वसनाची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण हे सर्व घडेल आणि हे काम पुरे होईल, असा माझा स्वतःचा विश्‍वास आहे. या घटनेस चाळीस वर्षे पूर्ण झाली पण आपल्या राज्यकर्त्यांनी स्व. यशवंतरावांनंतर धरणग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विस्थापित गावांची ससेहोलपट दूर करण्यासाठी आजच्या लोकप्रतिनिधींनी व सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

■ राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उजनी धरणाची निर्मिती झाली. विस्थापितांना राज्यकर्त्यांनी वार्‍यावर सोडू नये, त्यांचा मूलभूत विकास करावा, असे विचार होते. आज या घटनेस 40 वर्षे उलटून गेले तरी विस्थापित 52 गावांचा विकास होऊ शकला नाही. राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना यशवंतरावांच्या विचारांचे विस्मरण झाले झाले आहे. विस्थापित गावांना बारमाही पाणी देणे आवश्यक आहे, तसे होत नाही.  शेती व उद्योगांना कॅनॉलमधून 1 जुलै ते 28 फेब्रुवारीपर्यंत पाणी देण्याची तरतूद आहे. या सर्व नियमांचे पालन होत नाही.
शिवाजी बंडगर, अध्यक्ष उजनी धरणग्रस्त समिती

© विकास पांढरे, ९९७०४५२७६७
(साभार दैनिक पुढारी, सोलापूर १२ मार्च २०१७)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...