मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

शिवराय : शेाध आणि बोध




छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत. ज्यांनी राजकारण व समाजकारण यांची अतुलनीय सांगड घातली. द्रष्टेपणाने राज्यव्यवहार केला. राजे म्हणून जितके भावतात तेवढेच ते ‘लोक कल्याणकारी राजा’ म्हणून नावाजले जातात. या लोककल्याणकारी राजाच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध प्रशांत बबनराव लवटे यांनी आपल्या   ‘पराक्रमापलीकडले शिवराय’या पुस्तकातून घेतला आहे. 


 मनुष्याच्या कुतहूलाचा, जिज्ञासेचा सर्वांत मोठा विषय मनुष्य हाच आहे. मनुष्याला जाणून घेणे आवडत असते. त्यातला त्यात धीरोदत्त नायकाला, महापुरूषाला अधिक जास्त जाणून घेणे ही एक दुर्दम जिज्ञासा असते. त्यातील एक नाव म्हणजे छ.शिवाजी महाराज. महाराजांचेे जीवन, त्यांचा पराक्रम व संपूर्ण चरित्र याविषयी विपुल साहित्य उपलब्ध असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेता येणारे पुस्तक मोजकेच आहेत आणि हा विषय मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण काम प्रशांत लवटे यांनी  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले आहे.

प्रशांत लवटे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे. सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या जगण्यात व वागण्यात शिवरायांबद्दल ओतप्रोत प्रेम दिसून येते. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, इतिहास संकलन करणे हा त्यांचा छंद. शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून धडपडत असतात. त्याचेच एक मूर्त रूप म्हणजे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ हे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने चरित्र पुस्तक नाही. यात  काळ, सनावळ्या नाहीत. काही ठिकाणी सालाचा उल्लेख येतो.

शिवराय हे आदर्श राज्याची रचना करून ते उत्तमप्रकारे चालवणारे प्रजाहित दक्ष राजे होते. राजे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून रयतेवर वेगळी छाप पडत असत. आपल्या प्रत्येक मोहिमेची आखणी ते बारकाईने आणि अंतिम विजयाच्या दृष्टीने करत. याचा शोध आणि बोध लेखक प्रशांत लवटे यांनी घेतला आहे. 

१४२ पानांच्या या पुस्तकात शिवरायांचे वेगळेपण, विचारधारा, प्रेरणास्थळे, जडणघडण, नेतृत्व, चारित्र्य, कल्याणकारी राजे, शिवराय नक्की कोणाचे आदी लेखातून शिवरायांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवरायांचा व्यक्तिमत्वाचा / मनोव्यापरांचा सखोल अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण शिवरायांचे असामान्य व्यक्तिमत्व तपासणे, त्याचा शोध घेणे,  त्या उपयोगितेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून शिवरायांच्या जीवनाचे आकलन करणे तसे अवघड काम आहे. हे अवघड कार्य लेखकाने लिलया पार केले आहे. 

आपल्या प्रतिभेने शिवरायांचे अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. यात कुठेही रंजकता आणत नाहीत शिवाय ऐतिहासिक वास्तव उलटेपालटे करून वाचकांला संभ्रम करणारे विधान ते करत नाहीत,याचे भान लेखकाने सांभाळले आहे.
व्यक्तिच्या जीवनात संस्काराची गरज असते. शिवरायांच्या कार्याची निर्मिती ही प्रामुख्याने पिता शहाजी आणि माता जिजाऊच्या संस्काराच्या आणि कार्याच्या प्रेरणेतून झाली आहे. त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तयार झाले. वैचारिक दृष्टीने जडणघडण होत गेली. 

शिवरायांनी समाजासाठी केलेले कार्य व त्यांचे विचार आजच्या पिढीला, एक जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी, एक आदर्श समाज बनविण्यासाठी उपकारक ठरतील, असे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.

महाराजांचे व्यक्तिमत्व लेखक म्हणून मला किती भावले हे प्रत्ययकारी मांडताना दिसतात. त्या संदर्भात राजांच्या जीवनातील प्रसंगविशेषाचा उल्लेख करतात. या प्रसंगातून आपणाला काय शिकता येईल, त्या प्रसंगातून नवा अर्थ व्यक्त करताना दिसतात. म्हणजेच शिवरायांवर निष्ठा ठेवून आणि स्वतःचे आकलन मांडतात.
शिवरायांमधील समय सूचकता, असमान्य कल्पकता, द्रष्टेपणा आदी गुणांचा उल्लेख करून लेखकाने त्यावर विचार मांडले आहेत.   या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला प्रेरित करते आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या गुणाचे आपल्यामध्ये बीजारोपण करते. 




तारूण्यातील जडणघडण’ या प्रकरणात आजची तरूणाची अवस्था कशी आहे यावर भाष्य केले आहे. ‘‘आजचा तरूण थोडे कोणतेही संकट आले की स्वतःची अवस्था भिजलेल्या मांजरासारखी करून घेतात. विचार करा शहाजीराजांना ज्यावेळी आदिलशहाने अटक केली आणि शिवरायांपुढे सर्व किल्ल्यांची मागणी केली त्यावेळी किती मोठे धर्मसंकट त्यांच्यापुढे उभे होते. एका बाजूला वडील आणि दुसर्‍या बाजूला उभे केलले छोटसं राज्य. राज्य वाचवावं तर वडिलांचा जीव धोक्यात आणि वडिलांचा जीव वाचवाा तर पूर्ण राज्य हातून निसटणार. परंतू, अजिबात न डगमगता आणि स्वतःचा समतोल योग्य पद्धतीन राखून योग्य ती राजकीय खेळी करून वडिलांना सोडवलेच ना?’’


शिवरायांच्या व्यवस्थापनाचे रहस्य काय ? संकटावर मात कशी करावी, संयम, चिकाटी, उच्च कार्यक्षमता आदी गुण शिवरायांमध्ये कसे सामावलेले होते आणि या गुणांचे आपण कसे अनुकरण करावे यावर लेखकाने मार्गदर्शन केलेले आहे.

शिवरायांचे वेगळेपण कशात आहे याविषयी लेखकाने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य आहे पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती शिवरायांनी.’’ 

आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने, कौशल्याने, चातुर्याने, साहसाने शिवराय हे युगप्रवर्तक ठरले. शिवरायांचा एक व्यापक विचार प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतो. यामुळेच इतिहास अभ्यासकाची, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती सशक्त करणारे हे मराठी ऐतहासिक साहित्यातील एक महत्वपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही.

आजपर्यंत शिवकाळावर विपूल लेखन झाले असले तरी स्वराज्याची खरी प्रेरणा ज्यांच्यापासून मिळाली, असे शहाजीराजे उपेक्षित राहिले अशी  खंत लेखकांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत लवटे यांचा पुस्तक लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न खरोखर यशस्वी झाला आहे  ‘पराक्रमापलीकडले शिवराय’ या पुस्तकाला वाचकांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. शिवरायांचे वेगळेपण पुरेशा तागदीने समाजसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अवघ्या पंधरा महिन्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांच्या हाती आली आहे. लेखक लवटे यांनी शिवरायांचा केलेला अभ्यास वाचकांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. साधी सरळ भाषा, संशोधकवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक सर्वांना आपलेसे करून टाकते आणि प्रत्येकांनी संग्रहीत ठेेवावे असे हे पुस्तक आहे. 
-विकास पांढरे, ९९७०४५२७६७ 

पराक्रमापलीकडले शिवराय
लेखक : प्रशांत बबनराव लवटे
प्रकाशक : प्रशांत बबनराव लवटे, ९८८१९५५१६१
पृष्ठ : १४२
 मूल्य :२००/-

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आठवणीतला येळवस


आज आमच्या भागात (उस्मानाबाद) शेती मातीशी नातं सांगणारा 'येळवस'सण साजरा केला जातोय, यातून लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपल्या जात आहेत. या सणांविषयी मला नेहमीच आकर्षण राहिले आहे, गेल्या तीन-चार वर्षांपासून या सणाचा आनंद घेता आला नाही. यानिमित्ताने काही आठवणी ताज्या झाल्या.

मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्या दिवशी 'येळवस' सण साजरा केला जातो. गावातला जमीनदार, संपन्न शेतकरी, गरीब कुणबी, मजूर शेतकरी येळवसाचा सण जिव्हाळ्याने साजरा करतो.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीडसह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरेमध्ये एक मिलाफ आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरा या मिळत्या जुळत्या आहेत. ह्या परंपरा शेतीशी निगडीत आहेत. थंडीचा महिना सुरू झाला की, पिकं पोटर्यात आले की आम्हा पोरांना 'येळवस'ची चाहूल लागायची, गावात कुंभार आला की या सणाची उत्सुकता शिगेला पोहोचायची, असा हा सण.

कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण म्हणून ‘येळवस' ओळखला जातो. या सणात कुंभाराच्या मडक्यापासून ते रानभाज्या, फळापर्यंत समावेश असतो. येळवसाला लागणाऱ्या भाज्या आणण्यासाठी रानात जायाचो, भाजी खुडण्यासाठी आईला मदत करायचो, चिंचेच्या झाडावर चढून गाबुळ्या चिंचा काढायचो! गोड बोरीची झाड शोधायचो... 

आई सकाळी लवकर उठून मडक्यात आबिंल भरायची मडक्यात भरलेले अंबिल नानाच्या (वडील) डोक्यावर घेऊन शेतात जात.. शेतातल्या झाडाला कडब्याच्या पेंड्याची खोप करून बांधत असत आजही परंपरा अशीच आहे. समोर दगडाचे पाच पांडव व एक द्रौपदी ठेवत, या दगडाला चुना व कावाने रंगवले जात, दगड रंगवण्याचे काम माझ्याकडे असायचे. नवैद्य म्हणून भज्जी,अंबिल,बाजारीचे उंडे, भात, वांग्याचे भरीत, केळ आणि जांब पाच पांडवासमोर ठेवली जात. रानातल्या पिकांचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करायचो..


शेतकरी सुखा व्हावा, शेतात बरकत यावी म्हणून, "ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ! यासाठी हर हर महादेव,चावर चावर चांगभलं ! म्हणतं एका ताब्यात आबिंल घेऊन रानभर पिकांवर शिंंपडायचो, रानात डोलणाऱ्या पिकांवर रोग पडू नये अशी यामागील धारणा आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार देवाच्या नावाने दुमदुमून जात, प्रत्येकाच्या शेतातून ही हाक कानी पडायची...


शेताजवळच्या म्हसोबाला...महादेवाला.. विहिरीला, बोअरला, इंजिनाला, पाण्याच्या मोटारीला, नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी ही माझ्याकडे असायची.

नैवेद्य दाखवली की, सगळेजण एकत्र बसून निसर्गाच्या सान्निध्यात जेवण करायचो, रात्रभर जागरण करून आई शेंग्याच्या पोळ्या, बाजरीचे उंडे, वरण भात, खिचडी, भज्जी तयार करून ठेवायची. मला भज्जी खूप आवडायची, आजही आवडते. ही भज्जी म्हणजे सर्व पालेभाज्या व फळभाज्या एकत्र करून केलेली भाजी होय. जेवण झाल्यावर प्यायला आबिंल मिळायचे, रानातचं आई दगडाची चूल तयार करायची, रानाल्या गवर्या गोळा करून एका मडक्यात दूध तापवायला ठेवायची.


दुपारच्या येळला दोस्तांबरोबर शिवारात मोहोळ झाडत फिरायचो, त्यासाठी सगळे शिवार पालथे घालायचो, एकदा मला म्हवळाची माशी चावली होती.. क्षणात डोळा सुजला.. तरीही धुराचा ठेंभा करून मोहोळ झाडतच फिरलो. यादिवशी मध खाल्ले पाहिजे अशी धारणा आहे.

कुणाच्या तरी शेतात हुरडा असेल तर याचाही आस्वाद घ्यायचो, विहिरीत पोहायचो, सुरपारंबा खेळायचो, विंडी दांडू खेळायचो..अशा कितीतरी आठवण आजही फक्त मनात घर करून बसल्या आहेत.
कडूस पडले की गावचा पाटील हेंडगा घेऊन मारुतीच्या देवळासमोर यायचा, गावातली सगळी पोरं गोळा व्हायची, हेंडग्याच्या पाठीमागे आम्ही पोरं उभे राहून चांगभलं म्हणतं, मंदिराला प्रदक्षिणा घालायचो,थंडीपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून मारुतीच्या देवळासमोर हेंडगा ठेवला जातो. कडूसं पडलं की एकेक शेतकरी रानातून घराकडे परतत असत, आबालवृद्धांच्या चेहर्यावर तेज दिसून येत असत.


निसर्ग आणि शेती यांच्यात आदिम नाते आहे. लोकसंस्कृती नेहमी निसर्गन्मुख जीवनशैलीतून साकार झाली आहे. शेतकरी नेहमीच मातीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगत आला आहे. पाणी, पशु - पक्षी, झाडे, नद्या यांच्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते, याची जाणीव शेतकर्यांना असते.

म्हणूनच येळवस हा सण आजही टिकून आहे. त्याचे मूळ आदिम आहे. या सणाचे अंश आमच्या पिढीमध्ये पाझरत आहेत. म्हणूनच शहरात राहूनही, विज्ञानाने सारे कवेत घेतले असतानाही या सणांविषयी यत्किंचितही महत्त्व कमी झाले नाही. ही नाळ अधिकाधिक घट्ट राहील,अस प्रयत्न करत राहीन.
©विकास पांढरे
फोटो- समाज माध्यमातून
(५जानेवारी२०१९)

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

कांद्याची गोष्ट



आज सकाळी गावाकडच्या एका तरूण शेतकरी मित्राचा फोन आला.  त्याच्या बोलण्यात आनंद  होता. तो आपल्या कांद्याची गोष्ट सांगू लागला.''यंदा पावसानं चांगलीच कमालच की राव.. शेतात पाणीच पाणी होतं.. खरीपाचं पिकं हाती लागलं नाही. जे हाती आलं त्याचा खर्च ही निघाला नाही. खरीपाकडं मोठी आशा लावून धरलो होतो.. तेही वाहून गेलं होतं. अतिवृष्टीनंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची असा प्रश्न उभा होता..सगळचं इस्कटून गेलं होतं.. दिवाळी साजरी करता आली नाही.. लेकरांना कपडे घेता आले नाहीत.. असा विस्कटलेला संसार कसा उभा करायचा ? हे एक मोठं आव्हान होतं. उरल्यासुरल्या कांद्यावर आशा ठेवून होतो. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाला.  खर्चवजा जाऊन हातात चांगले पैसे आले. यामुळं नवीन दिवस येतील असं नाही. पण मी समाधानी आहे...

'कांदा कधी हसवतो तर कधी रडवतो'मागच्या साली व्याजाने पैसे काढून कांद्याची लावण केली पण दोन रूपये भाव मिळाला आणि सगळं गणितचं बिघडलं. काय करावं ? समजत नव्हतं. थोडसं सावरलं. पुन्हा जोमानं शेतात उतरलो.. पुन्हा कांदा लावला.. यंदा समाधानापेक्षा जास्त कांद्याला भाव मिळाला..
ज्याच्या कांदा अजून रानात आहे त्यांना ही  चांगला भाव मिळावा...येत्या महिना, दोन महिन्यात शेतातला आणखीन कांदा बाहेर येणार आहे.  बाजारात  आवक वाढली तर या कांद्याला कवडीची किंमत मिळणार नाही. ज्यांनी व्याजाने पैसे काढून कांदा लावला आहे आशांचे अश्रू पुसायला कोणी येणार नाही.  शेतीचं जग समजून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर यावं लागेलं.''खरंच या तरूण शेतकरी  मित्राचे बोल ऐकून मी  थोडा वेळ स्तब्ध झालो आणि  विचार करू लागलो..

मी शेतकरी कुटुंबातला आहे. शेतीचे प्रश्न जास्त मला समजतात असे नाही. वाढत्या वयाबरोबर  हे प्रश्न अधिकाधिक समजून घेऊ लागलो. त्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र मांडण्याची कुवत माझ्यात नाही. 'आज शेती परवडत नाही आणि सोडता ही येत नाही' अशी परिस्थिती आहे.

कधी नव्हे यंदा कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचे कारण नैसर्गिक आहे. या भाववाढीबद्दल बाजारात चांगलीच चर्चा होत आहे. किलोभर कांदा विकत घेणे  सर्वसामान्य माणसाच्या आवक्यात राहिलेले नाही. या महागाईला जबाबदार कोण? हा ठरलेला प्रश्न सहज ऐकायला मिळत आहे.तर दुसऱ्या बाजूला इतर वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत याबद्दल कोणीही काहीही बोलायला तयार नाही... कांद्यावरच जास्त चर्चा होतीय, असे का?

कांदा हा कंद वर्गातील भाज्यामधील महत्वाचे पीक समजले जाते. भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा आविभाज्य भाग बनला आहे. म्हणूनच कांदा हे एक व्यापारीदृष्टया महत्वाचे नगदी पीक आहे. एकाच वर्षी अनेकवेळा उत्पादन घेणारे हे पीक आहे. मे ते ऑगस्ट महिन्यात कांद्याचा भाव कमी असतो. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत कांद्याला कधी जास्त भाव तर कधी कमी भाव मिळतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.  त्याला  शासकीय धोरणे कारणीभूत आहेत.
महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य समजले जाते. देशातील एकूण कांदा उत्पादनापैंकी 25 ते 30 टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा क्षेत्र हे एकटया नाशिक जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही कांदा बाजारासाठी आशिया खंडात प्रसिध्द आहे. सोलापूर, नगर, धुळे  ह्या बाजारपेठाही कांदा विक्रीसाठी महत्वाच्या समजल्या जातात.

 महाराष्ट्रात तीन प्रकारच्या कांद्याची लागवड केली जाते. संगमनेर, माण,  फलटण या तालुक्यातील शेतकरी हळवा कांद्याची लागवड करतात. मे महिन्यात रोपे टाकून पुर्नलागवड केली जाते. उर्वरित महाराष्ट्रात पोळ कांदा लावला जातो. जून महिन्यात रोपे टाकून ऑगस्ट महिन्यात या जातीच्या कांद्याची लागवड केली जाते.  त्यानंतर रांगडा कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात या कांद्याची रोपे टाकून जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात पुर्नलागवड केली जाते. साधारणतः ज्याच्याकडे मुबलक पाणी आहे,  आशांसाठी या कांद्याची लागवड करणे सोयीस्कर आहे.

 कांद्यावर फुलकिडे व करपा या दोन रोगाचा प्रार्दुभाव होत असतो. लहरी हवामान, अवकाळी पाऊस या नैसर्गिक कारणामुळे शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे अवघडच बनले आहे, असे असले तरी महाराष्ट्रात कांद्याची विक्रमी उत्पादन घेतले जाते. कारण यातून शेतकऱ्यांना कधी नफा मिळतो तर कधी तोटा सहन करावा लागतो. शेतकऱ्याला कांदा विक्री खूप काळजीपूर्वक करावी लागते. आपल्या कांद्याला अधिकतेचे उत्पन्न मिळविण्यासाठी त्याला योग्य बाजारपेठाचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला कांद्याची प्रतवारी करताना सडलेले कांदे, काळपट पडलेले कांदे फेकून द्यावे लागतात, असे काही सगळे करावे लागते.

जो शेतकरी आपल्या कांद्याची विक्रीचे व्यवस्थापन करतो त्याला समाधानकारक भाव मिळतो. पण बाजारातील अपूर्णता व शेतीमलाचे नाशवंत स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मागच्या वर्षी शेतकऱ्याला कांद्याला दोन रूपये भाव मिळाला.शहरात कांदा दोन किलोने मिळाला का? यात व्यापार आणि दलालाची चांगलीच कमाई होते. तोच कांदा व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा रूपयाला विकला. कांदा प्रश्न कधी कळीचा मुद्दा कधी बनला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 1980 च्या दशकात चाकण बाजार समितीत कांद्याला निच्चांकी दर मिळाला म्हणून शेतकरी संघटनेचे प्रेणते शरद जोशी यांनी कांदा आंदोलन केले होते. त्यानंतर कांदा हा विषय माध्यमात चर्चेला येऊ लागला. अटलजींच्या काळात कांदा 80 रूपये किलोवर गेला होता. त्यामुळे त्याचे सरकार गडगडले असाही एक अंदाज वर्तवला जातो.  यामुळे कांदा हा विषय किती संवेदनशील झाला आहे हे लक्षात येते.

 आज अनेक वर्षानंतर कांद्याला विक्रमी दर मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे तर सर्वसामान्य ग्राहक दुखावला गेला आहे. आज शेती, शेतकरी विविध संकटात सापडला आहे, गावे ओस पडू लागली आहेत, गावातील मजूर शहराकडे धाव घेऊ लागला आहे. शेती अवजारे, खते आणि औषधे दुपट्टीने वाढले आहेत. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. पाण्याचा पंपाची किंमत वाढलीय, मजूरांच्या रोजंदारीत वाढ झालीय यावर कुणी चर्चा करत नाही. याला कोणी महागाई म्हणत नाही. भाववाढ झाली म्हणून कोणी आंदोलनही करत नाही. शेतकरी आमची लाज राखतो... तो आम्हाला वस्त्र पुरवतो.. अन्नधान्य पुरवतो.. तरीही आमच्या बांधवांना  शेतीमालाचे भाव वाढले की फटका बसतो.. हे कुठे तरी  थांबले पहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही.  भाव व भांडवल या दृष्टचक्राचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय.

  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर त्यालाच पुरेसे भांडवल उभा करता येईल. त्यातून त्याचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावेल. त्यासाठी  शेतीमालाला संरक्षण मिळण्यासाठी बाजार ठिकाणाच्या गावात गोदामे, शीतगृहे व वखारी बांधल्या पाहिजेत.

विशेष म्हणजे आपल्या राज्यात कांदा हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते आणि कांद्याचे वर्षभरातील भाव लक्षात घेता या पिकावर छोटया-मोठया गावात प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा उद्योग उभा केला तर कांद्याच्या बाजाराभर नियंत्रण आणता येईल, विशेष म्हणजे भाव वाढवण्यास व स्थिर राहण्यासाठी मोठी मदत होईल.
©विकास पांढरे, ९९७०४५२७६७







शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

काळे ढग पांढरे ढग


 पुणे, मुंबई, नाशिक, पालघर भागात वरूणराजा मनमोकळा बरसला..धरणी ओलेचिंब झाली आहे. डोंगररांगा हिरव्यागार झाल्या आहेत. कडेकपारीतून फेसाळ धबधबे आनंदाने उचंबळून वाहू लागले आहेत...शेतातील इवली इवली रोपे वाऱ्यावर डोलू लागले आहेत. हे पाहून संवेदनशील मन तृप्त होते.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यात पाऊस चक्क धो..धो कोसळला. या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना महापूर आला. कोयना धरणातून त्याच्या क्षमतेपेक्षा किेतीतरी पाणी सोडून द्यावे लागत आहे. अनेक गावांना पुराचा वेढा आहे. पुलुस जवळील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून अनेकांना प्राण गमवावा लागला. शेकडो लोक पुरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.

कोल्हापूर, साताऱ्यातील हीच परिस्थिती आहे. लाखो लोक पुरात अडकले आहेत. लाखोचे पशुधन पुरात वाहून गेले आहे. गावची गाव पाण्याखाली गेली.. रस्ते हरवले.. शेतात पाणीच पाणी... हळद रूसली आहे..बेदाणा सुकला आहे.. गूळ नासला आहे..ऊस मूळासकट वाहून गेला... नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे..

अशी आपत्ती पूर्वी ही आली होती.. आता ही आली आहे...पूर्वीच्या आपत्तीतून काय शिकलो? इथल्या नागरिकांना अस्मानी संकटातून बाहेर काढण्याासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, सरकार,नागरिक जीवाचे रान करत आहे. सर्वांच्या प्रयत्नाना यश मिळत आहे.

या पावसाच्या हाहाकाराने नागरिक हवालदिल झाला आहे.. विस्कटलेला सगळा संसार कसा उभा करायचा? पुरानंतर शाबूत राहिलेल्या जमिनीवर लावणी काय करायची? असा प्रश्न इथल्या कुटुंबकर्त्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

आज ना उद्या पूर ओसरेल.. आपत्तीग्रस्तांना मदत मिळेल..आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा होईल.. लेख छापून येतील.. पुढे सगळे विसरले जाईल..पुन्हा प्रश्न उभा राहिल?

 या अरिष्टाचे परिणाम त्याची व्याप्ती आणि तीव्रता बघता अरिष्ठ निवारण हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे.. थोडक्यात सांगायाचे झाले तरी आज सर्वांनी अरिष्टग्रस्त व सरकार यंत्रणा यांना जोडणाऱ्या पुलाचे काम करायला हवे. अशाप्रकारे सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचलला तरच अरिष्टग्रस्तांना दिलासा मिळेल.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावरचे काळे ढग जाता जात नाहीत तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यात अजूनही पांढरे ढग आहेत. काही दिवस, काही महिने उलटून गेले तरी अजूनही वरूणराजा या भागावर रूसून बसला आहे.

या भागात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची नुसतीच भुरभुर सुरू आहे. जायकवाडी वगळता अनेक धरणे कोरडी आहेत. नदीनाले सुकून गेली आहेत. रान ओसाड आहे.अल्प पावसावर जी पेरणी झाल्यावर त्यावर रोग पडू लागला आहे. कपाशीवर मावा पडला आहे. मका लष्करी अळींच्या विळख्यात सापडली आहे.

एक आनंदाची गोष्ट आज दुपारी समजली. मराठवाड्यात कृत्रिम प्रयोग पाडण्यासाठी विमान आकाशात झेपावले आहे.कृत्रिम पावसाचा आधार हा शाश्वत नसला तरी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

विकास पांढरे

शनिवार, २० एप्रिल, २०१९

'मोन्सॅन्टो' एक महाकाय भूत



देशात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. माध्यमात राजकीय विषयांवर भरभरून लिहिले आणि बोलले जात आहे. त्यामुळे या काळात घडलेल्या काही घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातील एका दुर्लक्षित विषयाला स्पर्श करण्याचा हा प्रयत्न. मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेतल्या वृत्तपत्रात एक बातमी झळकली. ही बातमी 'मोन्सॅन्टो' या रासायनिक कंपनीच्या  ( Monsanto Agrochemical Company) विश्वासहर्तला धक्का देणारी ठरली. 

मोन्सॅन्टो' या महाकाय अमेरिकन कंपनीचा वावर जगभर असला तरी कंपनीच्या गुणवत्तेवर नेहमीच शंका उपस्थित होत असते. अमेरिकेतल्याच एडविन हर्डेमन ह्या नागरिकाला कर्करोग होण्यामागे मोन्सॅन्टो' कंपनीचे ग्लायफोसेट हे तणनाशक कारणीभूत असल्याचा दावा सॅन फ्रॅन्सिस्को जिल्हा न्यायालयाने मान्य केला आहे. त्यासाठी सुमारे ८० दशलक्ष अमेरिकी डाँलरपेक्षा (५५०कोटी) जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिला आहे. एडविन हे सत्तर वर्षीय गृहस्थ आहेत. गेल्या २६ वर्षांपासून  ते आपल्या मालकीच्या जागेत मोन्सॅन्टो कंपनीच्या तणनाशकाचा वापर करतात. २०१५ साली त्यांना लक्षात आले की आपल्याला कर्करोग झाला आहे. या वर्षाच्या अगोदर जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग आंतराष्ट्रीय संशोधन संस्थेने 'ग्लायफोसेट'च्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो असे जाहीर केले होते. या आधारावर एडविन यांनी 'मोन्सॅन्टो' कंपनी विरोधात न्यायालयीन लढा उभारला आणि जिंकलाही. एडविन यांच्या वकिलांनी 'मोन्सॅन्टो' सर्व प्रकारचे संशोधनात्मक पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. 

एडविन हर्डेमन
मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेतच ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापरामुळे एका शेतकऱ्याला कॅन्सर झाल्याचा दावा मान्य करत कंपनीला सुमारे दोन हजार कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. एकूणच 'मोन्सॅन्टो' विरोधातील अमेरिकेतील ही दुसरी बातमी होती. आशा पद्धतीचे  कंपनी विरोधात अमेरिकेत चार हजाराहून अधिक खटले न्यायालयात चालू आहेत.

'मोन्सॅन्टो कंपनी U.S
"ग्लायफोसेट'  आधारित उत्पादन १६०हून अधिक देशात विकले जाते. एकट्या कॅलिफोर्निया राज्यातील शेतकरी २५०हून अधिक पिकांमध्ये या केमिकल्सचा वापर करतात. भारतीय शेतकर्‍यांना सजग करण्यासाठी हा एक पुरावा आपल्यासमोर आहे.
 दुसरी बातमी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने 'ग्लायफोसेट' मुळे कॅन्सरग्रस्त झालेल्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. आपल्या राज्यात वर्षाकाठी ३५लाख लिटर्स तणनाशकाचा वापर केला जातो, तर करोड रुपयांचे तणनाशक विकले जाते. हा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकार तणनाशक विरोधात पाऊल उचलताना दिसत आहे. कृषी आयुक्तालयाला ग्लायफोसेट आणि कॅन्सर बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट' मुळे कुणी कॅन्सरग्रस्त झाला आहे हे जरी अजून सिद्ध झाले नसले तरी किमान या विषयाकडे सरकार गांभीर्याने विचार करत आहे हे महत्त्वाचे आहे.आपल्या देशातील १८ कीटकनाशकांवर सन २०२०पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.या बंदीत बुरशीनाशक, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा समावेश आहे. ही बंदी १ जानेवारी २०१८ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत लागू होणार आहे. 'ग्लायफोसेट'वर पंजाब आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बंदी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले राज्य सरकार यावर बंदी आणेल, अशी अपेक्षा करूया. 

आपल्या राज्यात 'ग्लायफोसेट'  केमिकल्सचा वापर सर्रास केला जातोय. हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक असून या मागील भीषण वास्तव नागरिकांनी समजून घेणे आवश्‍यक आहे. दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळी आली होती. कीटकनाशक फवारणीच्या जीवघेण्या फासात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला जे घटक जबाबदार होते. त्यामध्ये बी. टी.अर्थात'मोन्सॅन्टो' या कंपनीकडे बोट दाखवण्यात आले होते. अखेर शेतकऱ्यांच्या,नागरिकांच्या जीवाशी आणि पर्यावरणाशी घातक खेळी खेळणार्‍या आणि ' शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलेल्या 'मोन्सॅन्टो' कंपनीचे महाकाय भूत वेळीच उतरवले पाहिजे.


ही कंपनी बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती जाती आणि तणनाशक केमिकल्स निर्माण केल्या आहेत.बीटी तंत्रज्ञानाने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही असा दावा कंपनीने केला होता. कंपनीच्या एका शास्त्रज्ञाने या संदर्भात सखोल संशोधन केल्या नंतर त्याच्या लक्षात आले की, जनुकांकरित अन्न खाऊन  उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे ते एक संशोधन होते. कंपनीच्या शास्त्रज्ञाने त्रुटी लक्षात आणून दिल्याने कंपनीने त्या शास्त्रज्ञाला कामावरून काढून टाकले. ह्यावरून कंपनी शेतकर्‍यांची घोर फसवणूक करते हे लक्षात येते. 

ह्याच कंपनीने राऊंड अप हे एक जहरी तणनाशक बाजारात आणले होते. तणनाशकाच्या फवारणीत पीक तग धरून राहील असा पुन्हा एक दावा केला. या राऊंड अपमुळे जमिनीतील पोषण मूल्य नष्ट होत आहेत, अशी शेतकर्‍यांनी ओरड केली होती. बीटी कपाशीवर बोंडअळी येत नाही असा कंपनीचा दावा होता.पण गेल्या पाच सहा वर्षांपासून बीटीवर कपाशीवर प्रारंभी मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी,मिलीबग यांचा प्रादुर्भाव होत आहे.सध्या कापसात ग्लायफोसेट हे तणनाशक वापरले जात नाही. इतर पिकांमध्ये विशेषतः फळबागांमध्ये ग्लायफोसेट देशभरात सर्रास वापरले जाते. कीटकनाशके, रासायनिक खते ही जमिनीच्या  उत्पादकतेला घातक ठरत आहेत. पर्यावरणवादी वंदना शिवा हे मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्‍याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. पोलखोल करूनही ही कंपनी बंद होत नाही.


सिंजेटा, केमचायना, बायर, डाऊ,  बास्फ, ड्यूपाँट अशा बड्या अँग्री केमिकल कंपन्या जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहेत. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न करोडोच्या घरात आहेत. हे उत्पन्न केवळ नि केवळ शेतकर्‍यांच्या बळावर कमविले जाते. 'एंडोसल्फान' हे घातक रसायन आहे. या रसायनाचा मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ७३ देशात बंदी असलेल्या या रसायनावर केरळ वगळता उर्वरित भारतात बंदी नाही, अशा प्रकारच्या जीवघेण्या रसायानांवर आपल्या देशात वेळीच बंदी घातली पाहिजे.

आज पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो हेक्टर जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत. या संदर्भात संशोधन केले जाणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा तालुका  भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.या भाजीपाल्यात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अंश असण्याची दाट शक्यता असल्याने या तालुक्यात कर्करोगाची संख्या वाढली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.हरित क्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर रुग्ण आहे. त्यामुळे पंजाबला 'Cancer Capital of India' असे म्हणू लागले आहेत. पंजाब राज्यातील भटिंडा, बटला परिसरात एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही. पंजाब सरकारने याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून हे निष्कर्ष काढले आहेत. या भागातील गावोगावी कर्करोगी आढळतात.भटिंडा ते बिकानेर धावणाऱ्या गाडीला नागरिकांनी 'कॅन्सर ट्रेन' हे नाव दिले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, देशात ब्रेस्ट कॅन्सरचे १ लाख ४५ हजार रुग्ण आढळून आले भारतातील आर्थिकदृष्ट्या मध्यम व अल्प उत्पन्न गटातील ५२ टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत.वाढते प्रदूषण, आधुनिक जीवनशैली, फळे व भाज्यांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. भविष्यात अन्न धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणे अयोग्य ठरेल, कारण रासायनिक खते आणि तणनाशकांतून विषच जन्माला येत आहे. असले विष जन्माला घालून आपण कोणते 'पुण्य' पदरात पाडून घेणार आहोत. देशात दुसरी हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जैविक शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७

रविवार, १० मार्च, २०१९

माझ्या जन्माची कहाणी -भाग २



माणसाचं आयुष्य हा फार कुतूहलाचा विषय असतो, हे सत्यच आहे. कारण ज्या गोष्टींच्या मागे असलेल्या रहस्यांची उकल आजवर होऊ शकलेली नाही, अश्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे अगदी साहजिकच आहे. एखाद्या वस्तूच्या मागे काही रोचक कथा आहे असे कळल्यानंतर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते,  जुन्या आठवणींचे गाठोडं डोळ्यांसमोरून जाता जात नाहीत. २६-२७वर्षांपूर्वीं घडलेली ही गोष्ट आहे.

एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.आम्ही चौघेजण भावडं.दोन बहिणी,दोन भाऊ आणि मी शेंडेफळ. शेतकरी असलेले आमचे वडील म्हणजे नाना फारच कष्टाळू. नाना आणि आईचे कष्ट बघत,अनुभवत आम्ही मोठे झालो. हणम्या आणि नाग्याची शेतात नांगर मारणारी बैलजोडी होती. सात एकराच्या बरड जमिनीत जे पिकेल त्यात समाधान मानून आमचा सुखाचा संसार सुरू होता. पाच चुलते, चुलत भावडं एकाच वाड्यात गुण्यागोविंदाने राहत होतो, शेरडं, म्हशी, गायी, कुत्र्यांनी वाडा भरून जायचा. झाडलोट करायला बायांना दुपार व्हायची. शेतात गेल्यावर रम्य वाटायचं, पावसाळ्यात लवनातून पाणी झुळझुळ वाहतं असायचं, रानात साळीचं पिकं डोलत राहायचं, असे रम्य आणि मनोहर वातावरणाचा हेवा वाटायचा. सारं काही ठीक असताना माझ्या बाबतीत नियतीनं वेगळचं लिहीलं होतं.

***

पावसाळी दिवस होते...  सतत कोसळणार्‍या पावसाने आमच्या घरात एक वादळ घेऊनच आलं,त्या पावसात माझा जन्म झाला.. त्या रात्री घरी कुणीच नव्हतं, आईनं सर्व कळा सोसून मला जन्म दिला. नव्याचे नऊ दिवस संपले होते. मी थोडा चालू लागलो होतो. धरती हिरवी शाल पांघरून पावसाची मजा लूटत होती.आमच्या घरातल्या माणसाच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

काय ओ?ऐकताय का? "राच्याला पोराचं अंग तापानं फणफणलं होतं. तरीबी सरकारी दवाखान्याल्या सिसटरीन बाईनं त्याला इंजेक्शन दिलं.तीन-चार वरसतल्या लेकरासनला इंजेक्शन करत नसत्यात म्हणं? तरीबी माझ्या पोराला तिनं इंजेक्शनचं डोस दिल. सवा,आंबा (माझे चुलत भावड-सविता आणि आंबा ऊर्फ अनिल) अन् गावतली पोरं बघा त्यासनी डोस देऊनही ठणठणीत हायती. माझचं पोरगंच का लुळ होऊन पडलयं?" अश्या आर्त स्वरात आई नानाला म्हणाली.

नाना खाली मान घालून विचार करत होता. अस काय झालं असावं?  पोरगं लुळ होऊन का पडलंय? कुणाची चुक झाली? याचं उत्तर शोधत होता.

"गरीब माणूस हा नियतीच्या जात्यात भरडला जातो असं म्हणतात ते खरंच आहे. ह्या गरीबीमुळेचं ज्यांनी मला डोस दिला 'त्या'
सिसटरीन बाईला बोलण्याची हिंमत नानाकडं नव्हती. शेवटी जी गोष्ट घडून गेली तिचे परिणाम जाणवत असताना मग दाद कुणाकडे मागयची?

माझ्या कपाळावर हात ठेवत नाना म्हणाला,"माझ्या पोरानं कोणतं पाप केलंय की देवानं त्याला लुळ केलयं?" घर, शेत  विकू अन् पोराला बरं करू", असा धीर देत नानांनी आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.

कणगीच्या बाजूला माचोळी होती. तिथं पोतं टाकून मला झोपवण्यात आलं होतं. माझा डावा पाय पूर्णपणे लुळा होऊन पडला होता. पायातली संवेदना संपली होती. आमचा वाडा वेशीत असल्यानं गावातल्या आयाबाया मला बघायचा यायच्या. कुणी पायाला हात लावलं तरी जाणीव होत नसायची.  ज्या त्या बाया माझ्या पायाला बघून डोळ्यातून पाणी काढायच्या. "पोराला दवाखान्यात दाखवा म्हणायच्या."

"काय ओ? तुमी दोन घास खा! अणदुर्‍याला सुभाष डॉक्टरकडं जावा. पोराला काय झालं इचारा."

"आई काळजीत नानाला बोलली."

नाना आईला होकार देत अणदूरला जायची तयारी करू लागला. नानाच्या खिश्यात पैशाची एक दमडी नव्हती. कोण हात उसणे पैसे द्यायला तयार होत नव्हतं. दुपार झाली होती. दिस माथ्यावर आला होता. नाना चितागत होऊन बसला होता. आईनं कुणाकडून तरी ३०रूपये आणले,तवा मग दवाखान्यात जाता आलं.

नानांनी मला उचलून खांद्यावर घेतलं. गावाच्या बसस्टॉपवर आलो, पण गाड्या थांबतच नव्हत्या. तासाभरानं एक गाडी थांबली. उमरग्याला जाणार्‍या माल ट्रकमध्ये बसून आम्ही अणदूरला आलो. अंगात मळकट शर्ट, दाढीचे खुंट वाढलेली, बारीक पांढरे केस, केविलवाणी डोळे, चेहर्‍यावरचा तणाव घेऊन डॉक्टर कस्तुरे ह्यांच्या समोर नाना उभा राहिला.

 दत्ता, कसं काय आलास? असं डॉक्टर सुभाष कस्तुरे म्हणाले.

डॉक्टर कस्तुरे आणि नानांची अगोदरची ओळख होती.
आमच्या गावातले बरेच लोक उपचारासाठी कस्तुरे डॉक्टरकडं येत. त्यामुळं डॉक्टर कस्तुरे हे बर्‍याच जणांना नावानिशी ओळखत.

पोरगं, "कालच्यापासनं लुळं होऊन पडलंय, डावा पाय उचलतच नाय, दोन पाऊल चाललं तर लगीच खाली पडतं. आमचा जीव भांड्यात पडलाय. काय करावं कायबी कळत नाय. माझं पोरगं चालेल पाहिजे,डॉक्टर? कितीबी खर्च येऊ द्या अगुदर पोरगं नीट करा?". असं नाना केविलवाण्या स्वरात डॉक्टरला बोलू लागला.

कधीपासून पोराचा पाय लुळा झाला? डॉक्टर कस्तुरे ह्यांनी माझ्या पायाला हात लावत नानाला विचारलं.

नाना गप्प.

नानाला काय बोलावं कळत नव्हतं. फक्त माझं पोरगं नीट करा?एवढचं पुटपुटत होता.

डॉक्टरानी मला तपासले, त्यांनी मला पोलिओ झाल्याचं सांगितलं. "ह्या आजारावर कुठलाच इलाज होत नाही. पोराला कायमच अपंगत्व आलंय. पण घाबरून जायची गरज नाही" असं डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांच्या उत्तरानं नानाचा चेहरा आणखीन उतरला. काय करावं? नानाला समजत नव्हतं. दुपारचं उन्हं तापत होतं.घसा कोरडा पडूनही नाना पाणी पीत नव्हता. माझ्या पोराचं कसं होईल? हाच प्रश्न नानाला छळत होता.

***

त्यादिवशी नाना उपाशीच होता. घराकडं आल्यावर रानातही गेला नाही. जनावरं दावणीला बांधली होती. चुलत्यानं चारापाणी केलं.

काय ओ? डोळे कशानं एवढं भरलं तुमचं?
काय झालं सांगा की,  डॉक्टरनी काय सांगितलं ? आई म्हणाली.

नाना शांत .

नाना दोन्ही पायात मुडकं घालून रडत होता. "आपला इक्याचा पाय नीट होणार न्हाय.कायमचा तो लुळाचं राहणार ह्याय" असं डॉक्टरनं सांगितलं. असं नाना रडक्या आवाजात आईला बोलू लागला.

सगळं आक्रीत घडल्याचं पाहून आईही ढसाढसा रडायला लागली. तिची वेदना कमी होत नव्हती, घरातला रडायचा आवाज ऐकून सगळ्या चुलत्या गोळा झाल्या. गावातली मालन आत्या आली. काल तरातरा चालणारं पोरगं, अचानक लुळं होऊन पडल्यानं त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.

आईला आधार देत सुभाकाकून डोळ्यांवरून पाणी शिंपडाला सांगितलं. बराच वेळ बाया-माणसं घरात बसली होती. नियतीच्या हातात हाय सगळं ?आपुण काय करावं? पोराच्या  वाट्याला आलेलं भोग हाय? असं आयाबाया बोलू लागल्या. अमुक करा, तमुक करा असं बाया एकमेकीत बोलत होत्या. मी ठिक व्हावं, खेळावं, चालावं ह्यासाठी आई आणि नाना पूर्णत: प्रयत्न करत होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी माझ्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले.

गावातल्याच एका वयोवृद्ध महिलेच्या सांगण्यावरून मला उकिरड्यात छातीपर्यंत पुरून ठेवण्यात आलं होतं. उकिरड्यातील ऊब पायाला चांगली असते ह्या समजुतीनं माझ्यावर काही दिवस हा प्रयोग सुरू होता. ह्या प्रयोगाचा माझ्या पायावर कसलाच असर झाला नाही शिवाय नीट चालूही शकत नव्हतो. माझा पाय नीट व्हावा यासाठी कुणी गाढवाचं दुध पाजा, कुणी डुकराचं तेल लावा असा सल्ला देऊ लागले. तेही प्रयत्न करून पाहिले, काही महिने माझ्या पायाला डुकराचं तेल लावण्यात होतं. मी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा यासाठी आईने अनेक रात्री जागून काढल्या होत्या. ती रात्रभर माझ्या पायाची मालीश करत बसायची, माझ्यामुळे तीन भावडांचे हाल झाले .

माझ्या अपंगत्वामुळं आई आणि नाना अधिकच चिंतेत पडले होते. आई शेताकडं जायची बंद झाली होती. शेतात काढणीला आलेलं हायब्रीड, बाजरी आणि तुरी नाना एकटाच काढायचा अन् रास घरी आणायचा. सगळं मिळून दोन तीन पोत्यांच्यावर धान्य निघायचं नाही. काही दिवस गेल्यानंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून मला सोलापूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे  दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण परिस्थिती माणसाला हतबल करते ह्याची जाणीव माझ्या कुटुंबाला होत गेली. कारण घरात नानाशिवाय कमवत कुणीच नव्हतं.शेतात जे पिकेलं,त्यावर सर्वांचे पोट भरायचं. धान्य विकून खाणार काय? तरीही माझ्यावर उपचार करण्यासाठी नानांनी कोणतीही कसर सोडली नाही.
***
(उर्वरीत कहाणी पुढच्या भागात)

©विकास पांढरे ,९९७०४५२७६७

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

उद्याचा दुष्काळ टाळण्यासाठी...



राज्यावर अस्मानी संकट उभे राहिले आहे.पिके करपली आहेत, पाणी आटले आहे, जनावरांचा चारा महागला आहे, दावणीचे गुरे सांभाळणे मुश्किल झाले आहे, शेतकऱ्यांचे मने कोमजली गेली आहेत. सरकारपुढे आव्हान उभे राहिले आहे. दुष्काळ सांगून येत नसला तरी तो आमच्याच वाट्याला का येतोय? यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. उत्तरे शोधली पाहिजेत, नाहीतर येणारा काळ आपणाला माफ करणार नाही.

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाची गडद छाया आहे. १८० तालुक्यात अस्मानी संकट उभे राहिले आहे. रब्बीची जमतेम पेरणी झाली आहे. खरीप हाताला लागणे कठीण आहे. मराठवाड्यात ही भीषणता अधिक आहे. काही गावात पाणीटंचाई सुरू आहे. परंड्यात पाच रूपयेला घागरभर पाणी मिळत आहे. राज्यात लातूरसारखी परिस्थिती उद्भभवू शकते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता उर्वरित जिल्ह्याला काही प्रमाणात दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात  फळबागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपडतोय. सध्याचा काळ कठीण असला तरी हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी शर्थीचे प्रयत्न करतोय. अशीच भीषणता एप्रिल-मे पर्यंत राहिली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार आहे. हे वर्ष उजाडले की लगेचच लोकसभा-विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे दुष्काळ हा राजकारणाचा मुद्दा बनेल.दुष्काळाला मूठमाती देण्यासाठी कुणाचेही लक्ष नसेल. आता सजग नागरिकांनी पुढे आले पाहिजे, दुष्काळावर विजय मिळवला पाहिजे.

आपल्याच वाटयाला दुष्काळ का येतोय?

 मानवी जीवाला जगण्यासाठी निसर्ग, पाणी व माती हे तीन घटक अतिशय महत्वाच्या असतात. नैसर्गिक घटक जिवंत असतील तर मानवी जीवन सुखकर असते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीतून वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचे महत्व विशद केले आहे.

नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी
महावने लावावी ! नानाविधे

१२व्या शतकात जे ज्ञानेश्वर महाराज यांनी कळले होते ते समजून घेण्यासाठी आपल्याला ८००वर्षे लागत आहेत. आज पाणी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.आपल्याकडील काही राज्यकर्त्यांनी लहान मोठ्या जलाशयांची, कालव्यांची, धरणांची, बारवांची सामाजिक गरजेनुसार निर्मिती केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीत १८६७साली स्वतंत्र पाटबंधारे विभागाची स्थापना झाली. १८७०मध्ये कृष्णा कालवा सिचंन कामाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील पहिले सिंचन प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात लहानमोठ्या मिळून ४००च्या आसपास नद्या आहेत. गोदावरी, तापीसारख्या नद्यावर धरणे उभारली गेली आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निम्यांहून अधिक धरणे आहेत. तरीही या राज्याच्या वाटयाला दुष्काळ असेल तर तो दुष्काळ अस्मानी नसून तर नियोजनाचा, सरकारी अनास्थेचा दुष्काळ आहे. गोदावरी नदीवरच केवळ दोनच ठिकाणी पाणी अडविले जाते. बाकीचे पावसाचे पाणी आंध्र -तेलंगणामध्ये जाते. कृष्णा आणि भीमा नदीचे हे असेच आहे. या नद्यांचे पाणी कर्नाटक जाते. उन्हाळा आला की महाराष्ट्र कोरडा असतो. त्यामुळे ना जनावरांना पाणी मिळते ना नागरिकांना. पुन्हा दुष्काळ जाहीर करावा लागतो, असे कित्येक वर्षांपासून चालत आले आहे. ना निसर्गाचे पाणी अडवता येते ना धरणातल्या पाण्याचे नियोजन करता येते.

आपल्या देशात सरासरी ५०से.मी पाऊस पडतो. बदलत्या हवामानांमुळे हे प्रमाण कमी झाली आहे, असो. इस्त्रायल हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षा खूप लहान देश आहे. या देशात केवळ १६से.मी इतकाच सरासरी पाऊस पडतो. तरीही हा देश अन्नधान्य आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. कृषि क्षेत्रात अव्वल तर दुध उत्पादनात अग्रेसर आहे. इतकेच नव्हेतर धान्य निर्यातही एक पाऊल पुढे आहे. भारतात पावसाचे प्रमाण सरासरी ५० से.मी म्हणजे इस्त्रालय देशाच्या पाचपट असूनदेखील आपल्याकडे दरसाल दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी इस्त्रायल धडपडत आहे. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून शेती क्षेत्रात अभिनव प्रयोग घडवून आणण्यात आहे. इस्त्रायल मध्येही दरसाल दुष्काळ पडतो. हा देश दुष्काळाचे राजकारण न करता शाश्वत सिंचनावर विचार करतात, त्यासाठी सर्व क्षेत्रातील जाणते एकत्र येतात, चर्चा करतात, कायदा करतात. आपल्याकडे असे का होत नाही?  एका अभ्यासाद्वारे असे लक्षात आले की, भारतात ४००दशलक्ष हेक्टर पाऊस पडतो व २०दक्षलक्ष पाऊस हेक्टर पाणी बाहेरून वाहून येते या ४२०दक्षलक्ष लिटरपैंकी नद्यांमध्ये १६०व ६७दक्षलक्ष हेक्टर लिटर पाणी भूजलाच्या रूपात आहे. २४७ दक्षलक्ष हेक्टर पाण्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याच्या वापराबद्दल व पाण्याच्या दुरूपयोगात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे पाणी वापराबाबत या देशात एकसारखा कायदा नाही.यावरुन आपण इस्त्रायलपेक्षा किती मागासलेले आहोत हे लक्षात येते. म्हणूनच आजपर्यंत भारत दुष्काळावर मात करू शकला नाही.

आपल्याकडे भूगर्भाताील पाणी उपसव्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच देशातील पाणी प्रश्न अधिक बिकट बनला आहे. आपल्यासारख्याच दक्षिण अफ्रिकेत दुष्काळ पडतो. या देशाने १९९८ साली नॅशनल वॉटर ऍक्ट तयार केला आहे. या ऍक्टनुसार गंभीर दुष्काळ पडला असला शेतीला पाणी वापरता येत नाही. लोकसंख्येच्या मागणीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येते. युनायटेट स्टेट्समधील राष्ट्रे पर्जन्यमान, पाणी वापर आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत खूप जागृत आहेत. हे देश दुष्काळी राज्यात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करतात.शेतीसाठी शाश्वत पाण्याचा शोध घेतात. नुसत्या सांडपाण्यावर ऑस्ट्रोलियात ४२०० हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. या सांडपाण्यावरच जनावरे पुसली जातात. ऑस्ट्रोलिया हा असा देश आहे  की  ७५टक्के पाण्याचा पुनर्रवापर करण्याचा प्रयत्न करतोय.

शेतीला शाश्वत सिंचनाची जोड हवीच

मराठवाडयात सिंचनाची सुविधा केवळ १८टक्के शेती क्षेत्राला उपलब्ध आहे. उर्वरित ८२टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्राचे ४८टक्के तर विदर्भाचे २८टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमीच आहे. सिंचन सुविधेच्या अपुऱ्या विकासामुळे विदर्भ-मराठवाडा हा भाग मागे आहे. आंध्रप्रदेश हा देशातील पहिले राज्य आहे की ज्या राज्याने भविष्यातील जलसिंचन संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणले. हिमाचल प्रदेशमध्ये 'कोहीली' शेतकऱ्यांमार्फत सिंचन व्यवस्था केली जाते. शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन केली जाणारी पध्दत हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिध्द आहे. हा पध्दतीत शेतकरी काम करतात. जवळजवळ एक शतकाहून अधिक काळ ही पध्दत रूढ आहे.

महाराष्ट्राला 'जाणते'नेते लाभूनही सिंचनात आपण स्वयंपूर्ण बनू शकलो नाही. राळेगणसिध्दी, शिरपूर, हिवरेबाजार, पळसखेडा, कडवंची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे पाणलोट कामात अग्रेसर आहेत. या गावांनी पाण्यातून प्रगती साधली आहे उर्वरित गावांचे काय? याकामात सरकार कमी पडत आहे की लोकांची इच्छाशक्ती. सिंचनासाठी आतापर्यंत ५आयोगांनी काम पाहिले आहे. आयोगाच्या शिफारशी राज्यकर्त्यांनी स्विकारल्या का? पाणलोट अंतर्गत जी कामे झाली ती बहुतेक ठिकाणी 'माथ्याकडून पायथ्यांकडे' या तत्वानुसार कामे न करता जिथे जागा मिळेल त्याठिकाणी कामे केली गेली आहेत. मृद व जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे याविषयी प्रभावी शिक्षण-प्रशिक्षण होण्याची गरज होती, ती गरज पूर्ण झाली नाही. रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या पाणलोट कामांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना ही तात्कालिक उपाययोजना ठरत आहे असे काही जलतज्ज्ञांचे मत आहे. हे वास्तव आहे.कारण जलयुक्त शिवार योजनेतून झालेली सर्व कामे ही लहानसहान नाला-ओढयांवर झालेली आहेत. एखाद्या वर्षात पाउस नाही पडला तर  ते पात्र कोरडे पडते. हे आजच्या दुष्काळावरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळावर रामबाण उपाय नाही.त्यामुळे सरकारला ठोस उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्यातील भौगोलिक रचना, पर्जन्यमान, भृपृष्ठ स्थिती, लोकांचे पाणी वापराचे नियोजन, बाष्पीभवनाचे नियोजन या घटकांचा विचार करून पाणी अडवा, पाणी जिरवा, माथा ते पायथा सारख्या कार्यक्रमांचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
चितळे आयोगाच्या अहवालानुसार ''राज्यातील लागवडी योग्य क्षेत्रांपैंकी १३टक्के क्षेत्र पाण्याच्या दृष्टिने अतितुटीचे,३२टक्के क्षेत्र तुटीचे ३४टक्के क्षेत्र सर्वसाधारण पाणी उपलब्धतेचे,६टक्के क्षेत्र विपूल पाणी असलेले तर १५ टक्के अति विपूल पाण्याचे आहे. अतितुटीच्या खोऱ्यात जास्तीचे पाणी असलेल्या खोऱ्यातील पाण्याचे वहन करण्याच्या योजना राबविण्याची गरज आहे.''

''राज्यातील कृषिक्षेत्र हे केवळ पावसावर अवलंबून न राहता, सिचंनाच्या आधारावर शेती केली जावी असे कौटिल्याचे मत होते. त्यासाठी तलाव बांधणे, सिंचन व्यवस्थांचे संरक्षण करणे, पाण्यानुसार पीक पध्दत आखणे.'' असे विचार कौटिल्याने मांडले होते.

रंगनाथन समितीच्या अहवालनानुसार मराठवाडयातील६९ टक्के भाग हा दुष्काळी आहे. सध्यास्थितीत १००हून अधिक प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. मराठवाड्याचा गोदावरी खोऱ्यात ८८टक्के भाग येतो तर कृष्णा खोऱ्यात १०टक्के भाग येतो. नैसार्गिक न्यायाने मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे, आजपर्यंत तसे झाले का? त्यामुळे दुष्काळ हा मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. एकूणच महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करायचे झाले तर शेतीसाठी शाश्वत पाणी शोधणे, नद्या वाचवणे, झाडे लावणे,
पाण्याचे समन्यायी वाटप करणे,  सिंचन विकास, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याचे ताळेबंद तयार करणे, ठिंबक सिंचनाचा प्रभावी वापर करणे,शेडनेटचा वापर करणे, आदींचा गंभीर विचार करणे आवश्यक आहे तरच उद्याचा दुष्काळ टळणार आहे.
-विकास पांढरे,९९७०४५२७६७



कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...