पद्मश्री गिरीश प्रभुणे काका महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. भटके विमुक्त चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा या व्यक्तिमत्वाच्या अनेक मनोज्ञ छटा रवींद्र गोळे लिखित ' गिरीश प्रभुणे जसे कळले तसे' या चरित्रात वाचायला मिळतात.
२०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष. याचवेळी एका स्वयंसेवकाचा अमृतमहोत्सव सुरू आहे. हे स्वयंसेवक म्हणजे गिरीश प्रभुणे काका. त्यांची (प्रभुणे काका)उंच शिडशिडीत शरीरयष्टी व पांढरी शुभ्र दाढी पाहून आपणांस एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व नजरेस पडते. होय, समाज परिवर्तनाच्या वाटेतील ते एक पथिक आहेत. त्यांचे भटके विमुक्त विषयावरचे कार्य आणि जीवन उलगडून वाचायला लागलो की एका क्षणात आपण त्या विषयाकडे खेचलो जातो. 'लाटांखाली संथ पाणी', 'पारधी' व 'पालांवरचं जिणं' 'लोक आणि संस्कृती' हे साहित्यलेखन त्यांच्या व्यासंगाची झलक दाखवणारी आहेत.
गिरीश प्रभुणे काका शांत, उपेक्षितांचे अंतरंग समजून घेणारे व संवेदनशीलतेचे अपूर्व वरदान लाभलेले स्वयंसेवक आहेत. बारामतीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जडणघडणीचा काळ चिपळूणमध्ये गेला. सहाव्या वर्षी त्यांना संघाचा परिसस्पर्श झाला. संघशाखेत त्यांची सामाजिक दृष्टी विकसित झाली.अठरापगड जाती जमाती म्हणजे काय? गावगाडा कसा चालतो? अशा गोष्टी त्यांनी आपल्या निरीक्षणातून शिकून घेतल्या. 'क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती', श्री.ग. माजगावकर यांच्या 'ग्रामयान' ची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावगाड्याशी आंतरिक धागा घट्ट होत गेला. पुढे 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' ते 'सामाजिक समरसता मंचा'च्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष साधतात.
रवींद्र गोळे गिरीश प्रभुणे यांचे जीवनचरित्र मांडले खरे, पण यासाठी त्यांनी वाङ्मयीन आकृतिबंध वापरला नाही. या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे चरित्र प्रभुणे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत नाही; तर भटक्या विमुक्त समाजाचे हुंदके, आक्रोश आणि परिवर्तनाचे प्रतिबिंब मटविणारे हे पुस्तक आहे.
साधारणतः अडीच दशकांपूर्वी गोळे गिरीश प्रभुणे या विभूतीच्या संपर्कात आले. या पंचवीस वर्षांत प्रभुणे जसे त्यांना कळले, अनुभवले याचा सहजस्फूर्त आविष्कार म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. या पुस्तकातून साध्या, सहज सोप्या शब्दात प्रभुणे आपल्याला कळतात.
प्रभुणे यांचा पारधी, वडार, बेलदार, कुंभार, लोहार, शिकलगार, घिसाडी, ओतारी, लमाण, वैदू समाजाशी संबंध आला. या उपेक्षित समाजाचे मन व मत जुळविताना त्यांनी केलेला संघर्ष, जिद्द, अनंत ध्येयासक्ती विलक्षण आहे.त्यामुळेच त्यांच्या मनात समतेचा व समरसतेचा विचार दृढ झाला.
या संदर्भात त्यांची मुलगी मनस्विनी यांनी एक प्रसंग सांगितला आहे. "चिंचवड गावात चापेकर चौकात जुना बस स्टॅण्ड होता. या बस स्टँडच्या मागे मनपा शाळेच्या भिंतीला टेकून एक म्हातारे आजोबा, तिथेच आडोसा घेऊन एकटे राहायचे. चप्पल शिवून देणे हे त्यांचे काम. बहुतेक वेळा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर यायची. चिंचवड गावात चप्पल शिवून देणारे ते एकमेव होते. त्यामुळे बहुतेक सर्व जण त्यांच्याकडून चप्पल शिवून घेत. पण ते बऱ्याच वेळा उपाशी पोटी झोपतात, हे फक्त बाबांच्या लक्षात आले. त्यानंतर बाबा त्यांना रोज पोळी-भाजी देऊ लागले. मी आणि मुकेश मनपा शाळेत जाऊ लागलो आणि पोळी-भाजी पोहोचवण्याचे काम आमच्याकडे आले. आम्ही ते काम करत असू. एक दिवस माझ्या वर्गातील मुलीने मला विचारले, "ते तुमचे कोण आहेत?" मी ठामपणे सांगितले, "ते आमचे आजोबा आहेत." आणि अख्ख्या वर्गात बातमी पसरली - 'रस्त्यावर राहणारे, चप्पल शिवणारे मनस्विनीचे आजोबा आहेत.' हे चप्पल शिवणारे गृहस्थ आपले कुणीच नाहीत, असे त्या वयात कधी वाटले नाही. बाबा त्यांना रोज पोळी-भाजी द्यायला सांगतात म्हणजे ते नक्कीच आपले आहेत, हा भाव मनात निर्माण झाला होता. कोण होते ते आजोबा ? आमचे आणि त्यांचे काय ऋणानुबंध ? जातीच्या चौकटीपलीकडचा विचार आणि कृती करण्याचा संस्कार बाबांनी नकळत आमच्या मनात रुजवला होता." (पृष्ठ क्र.२२)एखाद्या कादंबरीत शोभेल असा हा उतारा आहे. समजा , काही कारणाने हे संपूर्ण पुस्तक वाचणे तुम्हाला शक्य झाले नाही, तर किमान एवढा उतारा जरी वाचला तरी अंत:करणात समता व समरसतेचा भाव जागा होईल.
अनेकदा कठीण परिस्थितीशी सामना करताना प्रभुणे यांनी स्वतः च्या व्यक्तिमत्वात नकारात्मकता येऊ दिली नाही, विपरीत परिस्थितीतूनही ऊर्जा स्वीकारली आणि तिचे सकारात्मक परिवर्तन केले. 'असिधारा' नियतकालिकाचा आतबट्ट्याचा प्रयोग असो की, क्रांतिवीर चापेकर वाड्यातील समाजविघातक प्रवृत्तीकडून झालेली तोडफोड किंवा मिनार एक्स्प्रेस दरोडा प्रकरणात दाखविलेला धीरोदात्तपणा प्रेरणा देणारा आहे .
समाजाने गावकुसाबाहेर कुजत ठेवलेल्या पारधी समाजावरील अन्यायाविरुद्ध प्रभुणे उभे राहतात, परिणामी, प्रश्नांचा गुंता ही सोडवतात. (उदाहरणार्थ- आझाद मैदानावर पारधी आंदोलन, नागपूर येथील पारधी धर्मांतर प्रकरण.)
यमगरवाडी व चिंचवडमधील 'पुनरूत्थान समरसता गुरूकुलम' आज एक यशस्वी संस्था म्हणून नावारूपाला येत आहेत, त्यांचे मुख्य कारण म्हणजे प्रभुणे यांनी घेतलेली मेहनतीची, कामाची, परिश्रमाची आणि दूरदृष्टीची पोचपावती आहे. निमगाव म्हाळुंगी येथील 'ग्रामायन' चा प्रयोग यशस्वी करण्यात प्रभुणे यांनी बहुमोल योगदान दिले आहे. हे व इतर कार्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
शेवटी हे पुस्तक कशासाठी..? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शतकांपूर्वीचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिले आहेत. अनेकांचा उपेक्षित, भटक्या सारखे जीवन जगणाऱ्या समाजाशी व लोकांशी दूरान्वयाने सुद्धा संवाद झाला नाही, अशांनी या समाजाचे अंतरंग समजून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.
- विकास पांढरे,९९७०४५२७६७
चौकट
गिरीश प्रभुणे
जसे कळले तसे
लेखक : रवींद्र गोळे
प्रकाशन : साप्ताहिक विवेक
आवृत्ती: प्रथम (एप्रिल २०२५)
पृष्ठ संख्या :११२
मूल्य: रू.२२५/-
उत्तर द्याफॉरवर्ड करा |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा