शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

दीड एकरांतून घडविली क्रांती


धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली बाळासाहेब घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड एकरात मिश्र पीक पद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल उभे केले आहे. महिला शेतकर्‍यांना एकत्र आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची निर्मिती करून जणू क्रांती घडवून आणली आहे. शेती आधारित अन्य उपक्रमात व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे त्या अनेकींना आत्मनिरर्भरतेची प्रेरणा देत आहेत.

ही कहाणी आहे. जिद्दीची आणि मेहनतीची. अतिशय गरीब परिस्थिीतही शेतीतून प्रगती साधली, त्यासाठी आतोनात त्रास, अडचणी सहन केल्या, पण थांबल्या नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचल्या, अशा प्रगतशील महिला शेतकरी वैशाली बाळासाहेब घुगे यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे वैशालीताईंचे सासर. लग्नापूर्वी पुण्यात काकांच्या घरी वाढलेल्या, तिथेच नववीपर्यंत शिकल्या. सोळाव्या वर्षी त्याचं बाळासाहेबांशी लग्न झालं. नवरा (बाळसाहेब) पदवीधर असूनही त्याच्या हाताला काम मिळत नव्हते.  त्यातच संसाराच्या रहाटगाड्यात सासरांनी चार एकर शेती विकली. पुढे परिस्थितीत हतबल होत गेली. पुढे वैशालीताईंनी संसार सावरला. अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण  केले.
आत्मनिर्भरतेचा असा एक प्रवास
अतिशय हलाखीचे दिवस सहन करीत पुढे आलेल्या वैशालीताई जीवनातील अनुभव सांगताना म्हणाल्या,‘‘ घरात कुणीच कामाला जात नव्हते. त्यामुळं घरखर्च कसा करायचा? त्यात नवरा कमवता नव्हता, या विचारानं सासर्‍यानं दीड एकर शेत, एक म्हैस आणि चार पत्रे देऊन आम्हाला घराबाहेर (विभक्त केले) काढले. शेतात दगडाची खिळपट रचून आणि त्यावर पत्रे टाकून घर उभे केले. पदरात मूल होतं. नवरा कमवत नव्हता, पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. म्हैशीचे दूध व शेतातील भाजीपाला विकून संसाराला चार पैसे मिळत होते. अशातच काळोख्या रात्री, वादळी वार्‍यात घराववरचे पत्रे उडून गेले.
लहान बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत बाहेर पडले. या भीषण प्रसंगामुळं मी जगणं शिकले. खंबीर होऊन पुढे आले. संसार सांभाळला, शेतात भाजीपाला लावला, बाजारात, वस्तीवर, गल्लीत भाजी विकू लागले, घरंदाज, दिसायला चांगली रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचं पाहून आयाबाया माझ्याकडं टकमक बघायच्या, हसायच्या, बोलायच्या, माझ्यापुढं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, काही महिलांचं मार्गदर्शन मिळालं.. वस्तीवरच्या महिलांचा गट बनवला.. चार पैसे मिळत गेले, शेतीत सूर गवसू लागला. खर्‍या इथूनच माझ्या ‘आत्मनिर्भरते’ला सुरवात झाली.’’

मिश्र पिकांतून फुलवली शेती
शहरात वाढलेल्या वैशालीताईंना शेतीमातीचा कसलाही गंध नव्हता. शेती समजून घेण्यासाठी त्यांनी चार वर्ष खर्ची घालवली. वैशालीताई सांगतात,‘‘२०११-१२ पासून मी शेती करू लागले.  शेती समजून घेत होते. पहिल्यांदा शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात पूर्वांपार पासून पिकाची एक पद्धत होती. या पद्धतीत मी बदल केला. ऊस, सोयाबीन पिकांऐवजी मिश्र पीक पद्धत अंगीकारली. पहिल्यांदा घरच्यांनी विरोध दर्शवला. नंतर या पीक पद्धतीतून मिळालेल्या समाधनाकारक उत्पन्नातून विरोध मावळला.  उडीद,तूर,बाजारी, मूग,चवळी, सोयाबीन आदी कडधान्याच्या लागवडीतून दीड एकरांची शेती फुलवली आहे.’’
 कमी पाण्यात व कमी कालावधीत येणार्‍या पिकांची लागवड हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. कडधान्याबरोबर गहू, ज्वारी आदी देशी बियांणापासून समाधानकारक उत्पन्न काढतात. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेत घेतलेल्या शेती प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. यामुळे सभेत बोलू लागल्या, महिलांना, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करू लागल्या.
दुष्काळ निमुर्लनात सहभाग
२०१३, २०१४ आणि २०१५ हे सलग तीन वर्षे दुष्काळाचे होते. मराठवाड्यात चारापाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी आपले जनावरे चारा छावणीत पाठवित होते.  शासनाकडून दुष्काळ निर्मुलनासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू झाले होते. या अंतर्गत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘निकृष्ट चार्‍यातून उत्कृष्ट चारा निर्मिती’ कशी होते.  या संदर्भात वैशालीताईंना प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून त्यांनी आपल्या शेतात हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरवात केली. या चार्‍यातून त्यांनी स्वतःची १०जनावरे जगवली.  मुख्य म्हणजे वाड्या वस्त्यातील महिला शेतकर्‍यांना  कमी पाण्यातील चारा निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

गांडूळ खत निर्मिती
गांडूळ खत, गांडूळ कल्चर व गांडूळ पाणी या संदर्भातील विविध प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. हे प्रयोग करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या बाबत बोलताना वैशालीताई म्हणाल्या,‘‘२०१३ साली मी सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च ही माझ्या आवाक्याबाहेरचा होता. प्रशिक्षणानंतर गांडूळ खत बेड टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी अडीच हजार रूपये खर्च अपेक्षित होते. याला पर्याय म्हणून मी  जुने पोती (गोनी) फाडून व्यवस्थित बेड तयार केला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसायचे आणि पुढे जायचे. बेडमधील पहिला खात माझ्या शेतात टाकला. शेतातून चांगले उत्पन्न निघू लागले. पुढे गांडूळ खताचे बेड वाढवले. आज माझ्याकडे गांडूळाचे दहा बेड आहेत. गांडूळाचे व्हर्मीबेड वाढवले. त्यातून मिळणार्‍या व्हर्मीवाशची द्राक्ष व फळबागायतदारांकडून मागणी वाढली आहे. यातून वर्षांकाठी १०टन गांडूळ खत तयार होतोय. शून्य गुंतवूणकीतून मला वर्षाकाठी मी दीड लाख रूपये उत्पन्न मिळू लागले आहे.’’


शाश्वत शेतीचा पर्याय

शेतीला जोडधंदा म्हणून वैशालाताईंनी आपल्या शेतीपुढे गावरान कुक्कुटपालनाचा पर्याय ठेवला आहे. २०१४-१५ साली ९०हजारांची गुंतवणूक करून त्यांनी शंभर कोंबड्याचे शेड उभा केले. पहिल्या वर्षी त्यांना ३५हजार रूपयांचा नफा मिळाला. आज त्यांच्याकडे ४५० गावरान  कोंबड्या आहेत. यातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांनी  दोन हजार कोंबड्याचे शेड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
या शिवाय त्यांच्याकडे १४म्हशी व दोन देशी गायी आहेत. शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट बांधला आहे. गोमोत्रापासून जीवामृत तयार करतात.  बयोगॅस, मुरघास, कडबाकुट्टी, जीवामृत, नर्सरी, पिठाची मशिन अशा विविध शेतीपूरक उद्योगातून वर्षांला सात ते आठ लाखांचे उत्पन्न त्या मिळवितात.
विविध फळझाडांची लागवड
वैशालीताई आपल्या दीड एकरांच्या शेतात विविध प्रयोग करतात. फळबाग हा त्यातील एक भाग. पूर्वी त्यांच्याकडे केशर आंब्याचे ९ झाडे होती. यातून त्यांना वर्षांकाठी २५ते३० हजार रूपये उत्पन्न मिळते.  हे उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर गतवर्षी एक एकरांत केशर आंब्याची ३५० झाडे लावली आहेत.याशिवाय शेवगा १५, लिंबू २५, नारळ ५, पपई २, पेरू २, हदगा २, अशा झाडांची बाग त्यांनी तयार केली आहे. पिक व फळझाडांना आच्छादन, ठिंबकचा जास्तीत जास्त वापर त्या करतात.

विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची उभारणी
वैशालीताईंनी २०१७साली तुळजापूर तालुक्यातील २० गावातील महिला शेतकर्‍यांना एकत्रित आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीच्या १हजार महिला सभासद आहेत. कंपनीमार्फत महिला शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, बियाणे साठवण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक विषयी मार्गदर्शन केले जाते. कंपनीने शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेती पूरक व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्यावतीने भाजीपाला साठवण शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
डाळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी
कडधान्याची लागवड करणे व त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यासाठी  प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. उडीद, मूग,हरभरा डाळीवर काम होत असते. या अंतर्गत कंपनीकडून‘उरवा’ या ब्रॅडखाली केरळ येथे १०टन डाळ निर्यात करण्यात आली होती. डाळीपासून पापड निर्मिती तर हळदीपासून पावडर तयार करण्यात काम सुरू आहे.
एक लाख शेतकर्‍यांना प्रशिक्षण
वैशालीताई यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संस्था, पुणे) या संस्थेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २७ जिल्ह्यातील १लाखाहून अधिक शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती,गांडुळखत निर्मिती, विक्री, गांडुळ कल्चर, गांडुळपाणी, दाळ प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला लागवड आदी विषया संदर्भात प्रशिक्षण दिले आहे.

शेती, शेतीपूरक व्यवसायातील यशाचे गमक स्वतः पुरते मर्यादित न ठेवता इतरांना त्याचा लाभ मिळावा, या हेतूने त्यांनी २०१८ साली आपल्या शेतात वैशाली महिला शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी एकाच वेळी ५०प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात.अतिशय हलाखीतून शेती व्यवसायला सुरूवात केलेल्या आणि त्यात नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या वैशालीताईंची कहाणी सर्वांना प्ररेणा देणारी आहे.
-विकास पांढरे -९९७०४५२७६७
साभार : एकता मासिक (आत्मनिर्भर भारत विशेषांक- आँगस्ट २०२२)
संपर्क
वैशाली बाळासाहेब घुगे
मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव
मो.नं. : ७९७२८०६०५५
ईमेल : Vaishalighuge112@gmail.com


सोमवार, २० जून, २०२२

‘परिसांचा संग’-



सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी जी जी माणसे पाहिली, अनुभवली त्या माणसांच्या अंतरंगाचा पट ‘परिसांचा संग’ या पुस्तकात अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने रंगवला आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या साहित्याचा, समाज जीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे सर्वाथाने असणारे माणसांवरील प्रेम. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानता त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, जोडत आहेत.एकूणच  त्यांचा पिंडच ‘माणुसकी’ने भरलेला आहे.

 सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणसांबद्दलची ओढ यातून त्यांनी‘ परिसाचां संग’ या पुस्तकातून अनेकविध व्यक्तींचे दर्शन घडविले आहे. प्रभुणे यांची आत्मनिष्ठा ही निरामय, उत्कट व अविचल झालेली पहायला मिळते, त्यामुळे त्यांच्या या संग्रहात पुढील बाबी प्रकर्षांने जाणवतात.
१. व्यक्तींचे समाजातील स्थान व व्याप्ती
२. व्यक्तीचे समाजातील कार्य
३. व्यक्तीचा समाजावर होणारा परिणाम
४. व्यक्तीला सामाजिक दस्तऐवज म्हणून कसे पाहावे याचे दर्शन घडते.

प्रभुणे यांच्या जीवनात जी माणसे आली, मनावर अमीट असा ठसा उमठवला,त्या माणसाचे जीवन सौंदर्याचे ओळख करून देणे हाच या पुस्तकामागील मुख्य हेतू आहे. त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या विषयासाठी निवडलेल्या व्यक्ती या वेगवेगळ्या स्तरातल्या, विविध विचारधारेतल्या, पठडीतल्या निवडल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभुणे यांनी या संग्रहातील सर्व व्यक्तीचे बाह्यांगाचा परिचय करुन न देता अंतरंगाची ओळख करून दिलेली आहे. 

त्यापैंकी मोरोपंत पिंगळे, किशाभाऊ  पटवर्धन, दत्तोपंत ठेंगडी, नाना नवले, बाळासाहेब देवरस, डॉ.अशोक कुकडे, रमेश पतंगे, नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे, आर.आर.पाटील, डॉ.कालबाग, डॉ.देवदत्त दाभोळकर, नरेंद्र जाधव, सुनील देशपांडे, भीमराव गस्ती, धर्मपाल, कवी ग्रेस, गो.नी.दांडेकर, आनंद यादव, रवींद्र शर्मा,  शाहीर आसाराम कसबे, इंदुमती काटदरे अशा ४३ व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले लेख प्रस्तुत संग्रहात आहेत.

ही सारीच माणसं निर्विवादपणे मोठी आहेत. मात्र सगळ्यांच्याच कामाची हवी तशी दखल समाजाने घेतलेली नाही. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांच्या कामाची, त्यांच्यातल्या वेगळेपणाची माहिती असलेच, असे नाही. राजश्री काळे, सुजाता गणवीर, महादेव सरडे, रावसाहेब कुलकर्णी, डॉ.सुवर्णा रावळ, डॉ.कालबाग, शाहीर असाराम कसबे हे त्यातील ठळक उदाहरणे. पारधी समाजात जन्माला आलेल्या राजश्री काळे यांची कहाणी चित्तथरारक आहे. यमगरवाडीत त्यांना मिळालेली दिशा यातून राजश्री यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. आज त्या पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका आहेत. मूळच्या नागपूरच्या पण सध्या यमगरवाडीच्या मातीत रमून गेलेल्या सुजात गणवीर यांचे साधे-सरळ जगणे लेखकाला कसे आपलेसे वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. अनेेक गोष्टी शिकवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अवितरपणे काम करणारे असंख्य संघ स्वयंसेवक एक प्रकारे समाजऋण फेडत असतात. महादेवराव सरडे व रावसाहेब कुलकर्णी हे त्यापैंकीच एक. या दोन व्यक्तींनी यमगरवाडी प्रकल्पासाठी घेतलेले कष्ट, सोसलेला संघर्ष प्रभुणे आपल्या सिद्धहस्त लेखनीतून सांगतात.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी पाबळच्या टेकडीवर विज्ञान आश्रम् सुरू करणारे व दुष्काळी भागात कौशल्यावर आधारित शिक्षणाचे प्रयोग करणारे व ‘ विज्ञान आश्रम’   या आगळ्यावेगळ्या आधुनिक गुरूकुलाचे जनक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांच्याबद्दलही सामान्य वाचकाला फारशी मिाहती नाही. डॉ.कलबाग यांनी यमगरवाडीला दिलेला भेट आणि यातून निर्माण झालेला स्नेहाचा धागा याविषयाीचे चित्रण वाचायला मिळते.

समाजाप्रती समर्पण भावनेने काम करणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व आर.आर.पाटील यांच्याविषयी आठवणी प्रभुणे आपल्या पुस्तकातून सांगितलेल्या आहेत. ‘संघात न आलेला स्वयंसेवक ’या शीर्षकातून  आर.आर.पाटी यांच्या ऋजू स्वभावाचे दर्शन घडविले आहे. पक्ष-विचारधारा याविषयी कोणताही भेद न करता आर.आर.आबांना गुरूकुलम संस्थेच्या मान्यतेचा आग्रह धरला, याविषयी मनस्वी व्यक्तिमत्वाच्या आबांच्या स्वभावातले अनेक पैलू प्रभुणे यांनी अत्यंत सुरेखपणे उलगडून दाखविले आहेत. सतत आपल्या कामात बुडालेले आणि सतत समाजाच्या भल्यासाठी सतत धडपड करणारे आर.आर.पाटील हे संघात कधीही न आलेले, शाखेत न आलेला संघ स्वयंसेवक म्हणून आबांचे वर्णन केलेले आहे.

देवदत्त दाभोळकर हे तसे समाजवादी. पण त्यांच्या जगण्यात कुठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश नाही, विचारवंत असूनही अहंकाराचा कुठेही स्पर्श न झालेल्या या व्यक्तिमत्वाचे दर्शन प्रभुणे यांनी घडविले आहे. नितीन गडकरी, विनोद तावडे, लता मंगेशकर, सुनील देशपांडे, विष्णू वाकणकर, गो.नी.दांडेकर, सुभाष अवचट आदीं व्यक्तींचा मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न प्रभुणे यांनी केलेला आहे.

 नेटके आणि गोळीबंद लेखण करणारे प्रभुणे यांची लेखनशैली ओघवती, सच्ची, सुगम असल्याने, त्यांचे पुस्तक अगदी सामान्य वाचकाला आपलेसे करते. पुस्तकातील व्यक्तींचे रेखाचित्र आणि त्याला साजेशे शीर्षके हे पुस्तकाचे आणखीन एक बलस्थान. मराठी साहित्यात प्रथमच विविध विचारधारेतील, विषयांतील व्यक्तित्वाचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे. त्यामुळेच विषयाच्या वेगळेपणामुळे आणि अनुभवांच्या अस्सलपणामुळे, नेटक्या मांडणीमुळे हे पुस्तक सर्वांगानी उठून दिसते.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७

परिसांचा संग
लेखक : पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रकाशन : साप्ताहिक विवेक
पृष्ठ संख्या : २००
मूल्य : ३००/-
संपर्क : ९५९४९६१८५८

गोड उसाची कडू कहाणी

 


दरसाल उसाचा हंगाम सुरू झाला की दोन प्रश्न नेहमी ऐरणीवर येतात - पहिला ऊस दर आंदोलनाचा आणि दुसरा अतिरिक्त ऊस गाळपाचा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम संपूनही मराठवाड्यात एक ते दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना आहे. या समस्येला नेमके जबाबदार कोण? याचे मूळ शोधणे गरजेचे आहे.

‘ऊस’ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक. राज्यात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यात या पिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकतेमध्ये आणि साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल राहत आला आहे. महाराष्ट्रात एकूण 95 सहकारी आणि 93 खाजगी कारखाने आहेत, तर जवळपास 48 कारखाने बंद अवस्थेत आहेत. 1 जून 2022 अखेर राज्यात 1316.8 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 1369.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळते. उसाचा सर्वसाधारण बारा महिन्यांचा कालावधी संपूनही मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आदीसह काही जिल्ह्यांतील ऊस फडातच आहे.

ही समस्या केवळ बिगर सभासदांची नाही, तर जे कारखान्याचे सभासद आहेत, त्याचीही हीच गत आहे. या समस्येमुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतरही काही भागात साखर कारखाना ऊस नेत नाही म्हणून काहींनी ऊस पेटवून दिला. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत गेली. सध्या त्या त्या भागातील कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले, तरी मान्सून सुरू झाल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

अतिरिक्त ऊस गाळपासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून पडणार्‍या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 2022-23 या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढेल, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केलीे. एक कारखानदार म्हणून उसाखाली किती क्षेत्र आणायचे? बंद पडलेले साखर कारखाने कसे सुरू करायचे? याविषयी ते बोलणे आवश्यक होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी मूळ समस्येकडे दुर्लक्षच केले.



अतिरिक्त ऊस प्रश्न - एक अन्वयार्थ

सध्या प. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला असला, तरी मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला आहे. अवर्षणग्रस्ततेचा कायमचा शाप असलेल्या या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळेच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खात्रीचे उत्पन्न, उसाची ‘एफआरपी’ (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर) निश्चितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळत आहेत. 2021-22 हंगामात या विभागात सहा लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. या संपूर्ण उसाची भिस्त केवळ 58 कारखान्यांवर अवलंबून आहे.

यंदा सभासदांइतकीच बिगरसभासदांनी उसाच्या एकरी लागवडीत वाढ केली आहे. त्यामुळे कारखानदारांना ऊस तोडणीचे व गाळपाचे नियोजन करता आले नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. परिणामी, मजुराअभावी शेतकर्‍यांचा ऊस फडातच राहिला. वाढत्या तापमानात काळात उसाला तुरे फुटले. पावसामुळे शेतकर्‍यांसमोर उसाच्या शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उभा राहिला असला, तरी आता गोड ऊस ‘कडू’ वाटत आहे. संपूर्ण ऊस गाळप झाला, तरीही यातून उत्पादन खर्च निघेल की नाही, याविषयी शंका आहे.


घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नारायण देवकाते म्हणाले, “गोदावरी पट्ट्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे राजेटाकळी, भादली, मंगू जळगाव परिसरात जवळपास 25 हेक्टरहून अधिक ऊस गाळपाविना शिल्लक आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस नाही झाला, तर बर्‍याच प्रमाणात ऊस गाळप होईल.”

एकूणच, अतिरिक्त ऊस गाळपाचे चक्र पावसावर अवलंबून आहे. येत्या काळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, तर अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाला कालव्याने पाणी दिले. मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण, उसासाठी होणारा पाण्याचा अपव्यव लक्षात घेता, या भागातील शेतकर्‍यांनी उसाशिवाय इतर नगदी पिके कशी घ्यावी, याविषयी धोरणकर्त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

विकास पांढरे

https://www.evivek.com/Encyc/2022/6/14/Sweet-sugarcane-The-story.html

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

गाथा अखंड होळकरशाहीची

=

पत्रकार, लेखक उज्ज्वलकुमार यांनी माने आपल्या लिखित 'अखंड होळकरशाही' समग्र होळकरशाहीचा पट उभा केला आहे. विशेष म्हणजे या राजघराण्यातील व्यक्तींचे चरित्र, त्यांचे जीवन समजून घेणे आणि ते मोजक्या शब्दांत मांडणे तसे कठीणच आहे. हे कठीण कार्य लेखक माने यांनी लिलया पेलले आहे.

इतिहासाचा मानवी जीवनाशी अतिशय निकटचा संबंध आहे. गतकालीन मानवी जीवनाचा आरसा असतो. त्यातील महत्त्वपूर्ण लक्षवेधी घटनांचा इतिहास हा सामाजिक शास्त्राचा आलेख असतो. देशात व राज्यात अनेक व्यक्ती,घराणे आपल्या कार्याने महान झालेले आहेत. या महानतेमध्ये होळकरशाहीचा मोठा सहभाग आहे. या घराण्याचा आलेख सुसंगत व एकत्र मांडण्याचा प्रयत्न लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'अखंड होळकरशाही' या ग्रंथात मांडला आहे.

उज्ज्वलकुमार माने मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा गावचे. गेल्या दोन दशकापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यामुळे  त्यांना शब्दांची धार आणि मोजकेपणा अवगत आहे. 'रणरागिणी अहिल्यादेवी' या चरित्र पुस्तकातून माने यांनी आपल्या अभ्यासूपणाचे दर्शन घडवले आहे.

मराठेशाहीत होळकर घराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळकर घराण्यात अनेक पराक्रमी व्यक्ती होऊन गेले आहेत. ज्याला जे गवसले तसे ते त्याने दाखवले आहे. अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर यांच्यावर जितके विपुल संशोधन व लेखन झाले तितके मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर आदी व्यक्तींकडे इतिहासकाराचे दुर्लक्ष राहिले. होळकर राजघराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर, सरदार खंडेराव होळकर, मालेराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, सुभेदार काशीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, क्रांतिकारक भीमाबाई होळकर आदींचा अभ्यास करून, ऐतिहासिक पुरावे गोळा करुन, संदर्भ ग्रंथ वाचून, स्थळांना भेट देऊन उज्ज्वलकुमार माने यांनी अत्यंत सोप्या भाषेत होळकरशाहीची गाथा सांगणाऱ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

खरेतर, होळकर राजघराण्यातील व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना एका संचात बांधून वाचकांसमोर सादर करण्याचे अवघड कार्य आहे. हे एकच पुस्तक वाचून 'होळकरशाही' कळलेच असे नाही. त्यासाठी जाणकार ,अभ्यासू वाचकांनी त्यासाठी इतर ग्रंथाचा, ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करावा, ज्याला होळकर घराण्याचे मर्म समजून घ्यायचे आहे, अशा प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे या ग्रंथाची चिकित्सा करण्याइतपत लक्षणीय आहे.

हे पुस्तक का वाचावे?  मराठेशाहीत होळकर घराण्याचे काय स्थान आहे? योगदान दिले आहे?  हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचावे. मुख्य म्हणजे  या पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची गाथा वाचायला मिळतेच या शिवाय तुळसाबाई होळकर व भीमाबाई होळकर या रणरागिणीचा धगधगता इतिहास वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. इंदौर संस्थानात रेल्वेचे जाळे निर्माण करणारे, महापालिकेची स्थापना करणारे दुसरे तुकोजीराव होळकर, दुष्काळात धान्याचे कोठार लुटण्यास मुभा देणारे महाराजा शिवाजीराव होळकर, शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठ्याची सोय करणारे तिसरे तुकोजीराव होळकर, धनगर-मराठा यांच्यात रोटी-बेटी व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे दुसरे यशवंतराव होळकर यांच्या जीवनाची, कार्याची गाथा या ग्रंथात वाचायला मिळते.

माने यांनी आपल्या ग्रंथात होळकर घराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यातील यशस्वीपणाची,चढउताराची, मानवतावादी धोरणाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या घराण्यातील प्रत्येक पुरुष व स्त्री ही आदर्शवादी, उदारमतवादी आणि विधायक मार्गाने जाणाऱ्या आहेत हे पुस्तक वाचताना लक्षात येते.

चरित्र व्यक्तींचा इतिहास समजून घेताना माने यांनी शक्य आहे तिथे ऐतिहासिक घटनांचा, संदर्भ ग्रंथांचा दाखला दिला आहे. हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. एकूणच हे पुस्तक वस्तुनिष्ठ चरित्र ग्रंथ झाले आहे. या ग्रंथातील चरित्र नायकाची जीवन कार्याची माहिती पुराव्यानिशी देण्याचा प्रयत्न माने यांनी केला आहे. त्यामुळे होळकर घराण्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी, इतिहास संशोधकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

विकास पांढरे, ९९७०४५२७६७

अखंड होळकरशाही

लेखक : उज्ज्वलकुमार माने

पृष्ठसंख्या :३०४

मूल्य : ४०० रूपये

प्रकाशक :यशोदीप पब्लिकेशन,पुणे

संपर्क :९९२२४२४६९९,९०२८७३६०

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

गोष्ट मराठवाड्यातल्या ’रँचो’ शिक्षकाची


संशोधन करून तंत्रस्नेही शिक्षण देण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये क्षमता आहे, हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश खोसे यांनी सिद्ध केले आहे. मुलांना बंजारा बोली भाषेतून शिक्षण देण्याबरोबरच इंटरनेटशिवाय वापरता येतील अशा एक नव्हे, तर तब्बल 51 शैक्षणिक अ‍ॅप्सची निर्मिती करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकविध संकल्पना पंखांचे बळ दिले आहे. शिक्षण क्षेत्रातल्या या विशेष योगदानाबद्दल खोसे यांना मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे मराठवाड्यातील या ‘रँचोने ग्रामीण शाळांची शान वाढवली आहे.

शेती, उद्योग, आर्थिक क्षेत्रातील विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा तसा मागेच आहे, तसेच शालेय शिक्षणाबद्दलही म्हणता येईल. या भागावर स्वातंत्र्यापूर्वी निजामाचे राज्य होते. निजामाला शिक्षणाचे आणि संस्कृतीचे वावडे होते. निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर येथे शिक्षण अधिक गतिमान झाले. पण प. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये शैक्षणिक चळवळ सुरू व्हायला खूप उशीर झाला. या भागातील शालेय शिक्षण प्रकाशाच्या झोतात पहिल्यांदा आले ते दोन दशकांपूर्वीच्या ‘लातूर पॅटर्नमुळे. लातूरची मुले शालेय शिक्षणात सतत बाजी मारत असत. हे सकारात्मक चित्र उर्वरित जिल्ह्यात नव्हते.

आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रातील शैक्षणिक असमतोलाचाही सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. या समितीच्या अभ्यासानुसार पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर दहावीमध्ये पोहोचेपर्यंत मराठवाड्यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थी शाळा सोडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आजही उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतील शैक्षणिक गती संथच आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव निर्देशांक कमी असून, निती आयोगाने निवडलेल्या देशातील 115 आकांक्षित जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. या जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी आमूलाग्र विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे.

शाळा असून आणि त्यात शिकूनही शिक्षणापासून दूर पळणार्‍या मुलांना गरज आहे ती वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची, त्यांना अभ्यासाची गोडी लावण्याची. गेली अनेक वर्षे शैक्षणिक अ‍ॅप्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची गोडी लावणार्‍या उमेश खोसे सारख्या तंत्रस्नेही शिक्षकांची. लमाण तांड्यावरच्या मुलांना शिकवणार्‍या रँचोची महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्यात, पाड्यात, गरीब वस्त्यांमध्येही तेवढीच गरज आहे.

लातूर जिल्ह्यातील माटेफळ या गावापासून उमेश खोसे यांचा जीवनप्रवास सुरू झाला. उमरगा तालुक्यातील (जि.उस्मानाबाद) बेळंब येथील लमाण (बंजारा) तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून खोसे 2007मध्ये रुजू झाले. सध्या ते कडदोरा (ता. उमरगा) शाळेत कार्यरत आहेत. जेव्हा ते बेळंब तांड्यावरच्या शाळेत रुजू झाले, तेव्हा त्या तांड्यात पाचवीपर्यंत शाळा होती. पटसंख्या 50च्या आसपास होती. परंतु, उपस्थितीचा मोठा प्रश्न होता. मुलींच्या शिक्षणाबद्दल अनास्था होती. कारण शाळेत येणारे सर्व मुले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बंजारा जमातीतील होती. लोक कामासाठी बाहेरगावी स्थलांतर करायचे. ही परिस्थिती बदलण्यासाठी खोसे यांनी सहकार्‍यांच्या मदतीने गावातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कामासाठी बाहेरगावी जाताना आपली मुले आजी-आजोबांकडे ठेवायला, हंगामी वसतिगृहाची मदत घेऊन शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तांड्यावरची मुले -मुली नियमित शाळेत हजर राहू लागली.

बोलीभाषेतून शिक्षण

उमेश खोसे यांनी राबवलेला ‘बोलीभाषेतून शिक्षण हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला. शाळेत रुजू झाले, तेव्हा खोसे यांच्यासमोर भाषेचा मोठा प्रश्न उभा राहिला. मुख्य म्हणजे शाळाच महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेलगत असल्यामुळे मुलांवर बंजारा बोलीभाषेचा आणि मराठी-कानडी मिश्रित भाषेचा प्रभाव होता. यावर उपाय म्हणून सुरुवातीला मुलांकडूनच त्यांनी बंजारा बोलीभाषा शिकून घेतली. सहकारी शिक्षक सुभाष राठोड यांनी ही भाषा शिकण्यासाठी खोसे यांना मदत केली. त्यानंतर खोसे यांनी बंजारा बोलीभाषेतून इयत्ता पहिलीचे पुस्तक अनुवादित करून मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गुणवत्तावाढीमध्ये याचा फायदा झाला आहे. मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळाल्याने मुले आनंददायक पद्धतीने शिकू लागले. त्यांच्या या बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची ‘शिक्षणाची वारी या उपक्रमांमध्ये निवड होऊन त्यांना जवळपास लाखो शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासमोर सादरीकरणाची संधी मिळाली.

 51 ऑफलाइन अ‍ॅप्सची निर्मिती

खोसे यांची खासियत सांगायची झाली, तर वाड्या, वस्त्या, तांडा आणि पाड्यावरच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना इंटरनेटशिवाय ऑफलाइन हाताळता येतील अशा 51 ऑफलाइन अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. इ. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खोसे यांनी ही अ‍ॅप्स बनवली आहेत.

ऑफलाइन अ‍ॅप्सची संकल्पना कशी सुचली? याबाबत खोसे सांगतात, “ग्रामीण भागात काम करत असताना मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे म्हणून काय करता येईल हा विचार करत होतो. परंतु आमच्या शाळेमध्ये मोबाइलला रेंज येत नव्हती. अशा शाळेत मुलांना कृतियुक्त शिक्षण कसे द्यावे? हा विचार करत असताना ‘ऑफलाइन शिक्षणाची कल्पना माझ्या डोक्यात आली. मुलांना मोबाइलमधील गेम खेळण्यात जास्त आवड असते. तसेच आपण काय बनवले तर मुलांना शाळेची आवड निर्माण होईल व ते नियमित शाळेत येतील म्हणून ही निर्मिती हातात घेतली. यासाठी मला यूट्यूबवर गुगल यांच्या माध्यमातून माहिती मिळवून मी निर्मिती करण्यास सुरुवात केली. यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फ्री प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याच्या साह्याने मुलांना शाळेत ती अ‍ॅप्स दिली व मुले शाळेत रमू लागली.

प्राण्याची, फळांची नावे, चित्रकला, एकक रूपांतरण, पक्ष्यांची माहिती, रंगांची ओळख, फुलांचे वर्गीकरण, भौमितिक आकृत्या, अंकओळख, मुळाक्षरे, गीतमंच, परिपाठ, शिक्षक डायरी, शालेय वेळापत्रक, शालेय पोषण आहाराचा हिशेब करणारे अ‍ॅप, आठवणीतील कविता, मराठी सुविचार, इंग्लिश कविता अशी एकूण 51 अ‍ॅप्स विकसित केली आहेत. ही सर्व अ‍ॅप्लिकेशन्स इंटरनेटशिवाय चालतात. विशेष म्हणजे ही अ‍ॅप्स ज्ञानरचनावादास पूरक आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅप्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व अ‍ॅप्स डाउनलोड करता येतात. या सर्व अ‍ॅप्समध्ये चित्रांचा व शब्दांचा समावेश आहे. चित्रावर क्लिक केल्यास चित्र मोठे होते. एका तांड्यावरील शाळेत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातला वापर किती महत्त्वाचा ठरला आहे, हे खोसे यांनी दाखवून दिले आहे.

संकेतस्थळ व यूट्यूब चॅनेल

खोसे यांनी 2011 साली शाळेचे संकेतस्थळ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी जे साहित्य तयार केले होते, ते संकेतस्थळावर अपलोड केले. याशिवाय 2013 साली त्यांनी स्वत:ची यूट्यूब चॅनल सुरू केली. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून त्यातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. खोसे यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या लौकिकात वाढ झाली. आज बेळंब तांडा शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांत वाढ होऊन सातवीपर्यंत इयत्ता वाढली आहे. तसेच विद्यार्थिसंख्या 50च्या आसपास होती, ती आता शंभरच्यावर गेली आहे. त्या शाळेच्या केवळ पटसंख्येतच वाढ नाही, तर गुणवत्तेतसुद्धा वाढ दिसून आली.

 उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या काळात ज्या तांड्यावर मुली शिक्षण घेणे शक्य नव्हते, अशा तांड्यामध्ये आज मुली शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयामध्ये विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेल्या एकमेव जागेवर त्यांच्या शाळेतील सलग पाच वर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होत होती. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

शिक्षण संस्कार शिबिर व डिजिटल शाळा

सध्या कार्यरत असलेल्या जगदंबानगर, कडदोरा या शाळेमध्ये खोसे व त्यांचे सहकारी श्रीराम पुजारी यांनी राबवलेला शिक्षण संस्कार शिबिर हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे.

कडदोरा शाळेमध्ये शाळा बांधण्यासाठी जागा नव्हती, अशा वेळी शाळेला गावातील दानशूर व्यक्ती त्र्यंबक चौधरी यांनी दोन गुंठे जागा देऊन त्यावर ही शाळा भरलेली आहे. तसेच जय स्वामीनारायण ट्रस्ट यांनी 24 गुंठे जागा दान देऊन शाळेसाठी मैदान उभा केले आहे. गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या साह्याने शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कट्टा या माध्यमातून मुलांना अवांतर वाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामधून मुले निसर्गरम्य वातावरणामध्ये शाळेतील अवांतर वाचनासाठी पुस्तके घेऊन ती वाचतात, त्यातून मिळालेला बोध वर्गामध्ये सांगतात. तसेच या शाळेमध्येही शाळेची पटसंख्या 14वरून आज 30 झालेली आहे. या शाळेमध्ये मुले स्वत: संगणक वापरतात. टॅबवरून, टीव्हीवरून शिक्षण घेतात. तसेच पुढे त्या त्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोय करतात. मुले स्वत: साहित्य तयार करत आहेत. तसेच कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी स्वयंअध्ययन साहित्य तयार करून मुलांना स्वयंशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नक्कीच मुलांना आनंददायक व प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळत आहे.

 कोरोना काळात ऑनलाइन व ऑफलाइन शाळा

कोरोनाच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण बंद राहू नये यासाठी 365 दिवस ऑनलाइन व ऑफलाइन शाळा सुरू ठेवून मुलांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांचा निकाल लावणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वत: शाळेची वेबसाइट तयार करून मुलांचा दहावी आणि बारावीसारखा ऑनलाइन निकाल लागलेला आहे. कडदोरा ही ऑनलाइन निकाल लावणारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. आजही मुले दीक्षा अ‍ॅपच्या, तसेच इतर साधनांच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत.

लेखन व पुरस्कार

खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे खोसे यांनी ‘दीक्षा या केंद्र शासनाच्या अ‍ॅपवर ई-कंटेंट तयार केले आहे.

उमेश खोसे यांना आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील एवढ्या कमी वयामध्ये व कमी सेवेमध्ये जे शिक्षकासाठी मिळणारे सर्वोच्च दोन पुरस्कार आहेत, ते म्हणजे एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व दुसरा राष्ट्रीय पुरस्कार हे दोन्ही मिळालेले कमी वयातील एकमेव शिक्षक आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (2021), राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार (2018), जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार (2017 ), महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, राज्य तंत्रस्नेही पुरस्कारासह त्यांच्या बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमास राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

 

भविष्यातील नियोजन

 यापुढेही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण, आनंददायक व कृतियुक्त शिक्षण देण्याचा निरंतर प्रयत्न करीन, याशिवाय महाराष्ट्रात एक दिशादर्शक मॉडेल स्कूल स्थापन करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्याकडून जे काही शिक्षकांना मी मार्गदर्शन करता येईल येईल ते मार्गदर्शन करत राहीन. यापूर्वीही मी ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिन पॅनल या ग्रूपच्या माध्यमातून शिक्षकांना तंत्रस्नेही करण्यासाठी किंवा हा उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत आलो आहे. हे कार्य आता पुढील काळातही निरंतर करत राहीन असे खोसे यांनी सांगितले.

उस्मानाबादसारख्या अप्रगत जिल्ह्यात उमेश खोसे या तंत्रस्नेही शिक्षकाने राबवलेला उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक आहे. आतापर्यंतच्या सेवेमध्ये शाळा सिद्धिनिर्धारक, बालरक्षक (चळवळ), राज्य तंत्रस्नेही (शासकीय उपक्रम), तसेच दीक्षा अ‍ॅपवर साहित्यनिर्मिती अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम केले आहे. 50च्या वर शाळाबाह्य मुले होती, अशा मुलांना त्यांनी आतापर्यंत बालरक्षक मासिकाद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. बर्‍याच मुलांना वयानुरूप प्रवेश देऊन मुलांचे शिक्षण सुरू केले आहे. इयत्ता दुसरी वर्गाच्या पाठ्यक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग होता. अशा या उपक्रमशील शिक्षकास देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक व आयसीटी पुरस्कार मिळाल्याबद्दल खोसे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संकेतस्थळ -www.ukguruji.in

ब्लॉग -www.zppsjagdamabanagar.blogspot.com

यूट्यूब चॅनल -UK TECHNO TEACHER

https://www.evivek.com//Encyc/2021/9/6/Ideal-teacher-Umesh-Khose.html

विकास पांढरे  9970452767

 

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

'ट्री मॅन ऑफ इंडिया'

ज्याची ओळख फक्त वाळवंट अशीच आपल्याला भूगोलमधून मिळते असे राज्य म्हणजे राजस्थान. अशा या रखरखीत वाळवंटी प्रदेशात विष्णू लांबा या धरतीपुत्राने कोणत्याही सरकारी पाठिंब्याशिवाय ५ लाख झाडे भेट म्हणून दिली आहेत. त्याने आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे ५० लाख झाडे लावली आहेत, १३लाख झाडे तोडण्यापासून वाचवली आणि ११ लाख झाडे पूर्णपणे विनामूल्य वाटली आहेत. हे अतुलनीय कार्य लक्षात घेऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या तरूणास ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’ हे नवे दिले.
विष्णू लांबा याचा जन्म ३ जून १९८७ रोजी टोंक जिल्ह्यातील लांबा गावात झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून विष्णूने गुरेढोरे चारत असताना शेतात विविध प्रकारची झाडे लावायला सुरुवात केली. विष्णूला झाड लावयाचे इतके वेड जडले की कोणाच्याही घरातून झाडे चोरुन मोकळ्या जागेत लावत असे. त्याच्या सवयीने ग्रामस्थ आणि कुटुंब त्रस्त झाले. विष्णूची सवय बदलावी यासाठी त्याच्या परगावी (आत्याकडे ) पाठवले. पण निसर्गावर त्याचे प्रेम वाढतच गेले. यानंतर विष्णू नातलगासमवेत जयपूरला गेला तेव्हा तिथे त्याने जवाहर विभागाचे तत्कालीन जयपूर जिल्हाधिकारी श्रीमंत पांडे यांच्या निवासस्थानी असलेल्या नर्सरीमधील रोपटे चोरले.
वृक्षारोपण करताना
विष्णूची ही चोरी पकडली गेली. जिल्हाधिकारी समज देताना म्हणाले, " विष्णू, चोरी करणे वाईट आहे. मात्र झाडे लावणे चांगले आहे" असे म्हणून विष्णुला काही झाडे भेट दिली. वृक्ष प्रेमापोटी विष्णूंनी सात वर्षे घर सोडले. समवयस्क मिञ जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जेथे जाईल तेथून रोपटे चोरायची नंतर त्यांची कुठेतरी लागवड करायची. त्यामुळे गावकरी या तरुणाला 'पौधा चौर' म्हणून चिडवू लागले. लोक चेष्टा करू लागले. झाडे चोरून कुठे वृक्षसंवर्धन होते का? असं बोलणे विष्णूच्या कानी पडायचे. झाडावर त्याचे निरपेक्ष प्रेम होते.वसुंधरचे, पर्यावरणाचे, वृक्षाचे महत्त्व लोकांना पटवून देऊ लागला. जिथे जिथे पडीक जमीन दिसेल त्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण संवर्धन केले.
विष्णूच्या भावाचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा हुंड्याचा विषय गावात गाजला. मुलीकडील माणसं हुंडा द्यायला तयार होती;पण विष्णूचा सुधारणावादी विचार घरात ग्राह्य मानला जात. वडील बैठकीत म्हणाले, " विष्णू माझा मुलगा आहे, हुंड्याचं त्यालाच विचारा?"
विष्णू म्हणाला "आम्हाला हुंडा नको आहे. तुम्हाला जे काही द्यायचं आहे. त्याबदल्यात झाडे द्या, हाच हुंडा समजून आम्ही आनंदाने तुमच्या मुलीचा स्विकार करू"

राजस्थान सारख्या रूढी परंपरा प्रमाण मानणाऱ्या राज्यात असा नवा विचार ऐकून उपस्थित मंडळी अंचबित झाले. मुलींच्या मंडळींना होकार दिला. लग्न समारंभानिमित्ताने वधू-वराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.हळूहळू लोकांना विष्णूच्या निरपेक्ष वृक्ष प्रेमाचे महत्त्व लक्षात आले.
विष्णूची टीम
पर्यावरण संरक्षणासाठी 'श्री कल्पतरू संस्थान' ची स्थापना केली आहे. गेल्या २० वर्षांपासून ही संस्था वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित काम करत आहे. या संस्थेने देशातील शंभर गावे पर्यावरणदृष्ट्या आदर्श गावे (कल्प ग्राम) म्हणून देण्याचे वचन दिले असून त्यामध्ये तीन गावे विशेष नाविन्यपूर्ण माध्यमातून आदर्श ग्राम बनण्याच्या दिशेने आहेत. विशेष म्हणजे पाली जिल्ह्यातील जैतारणमध्ये हत्तींवर झाडांची मिरवणूक काढली आहे. तसेच,राजस्थानमध्ये पाचशेहून अधिक वृक्ष प्रेमींची परिषद आयोजित केली गेली होती, ज्यात केळीच्या पानांवर पारंपारिक भोजन दिले गेले.
राजस्थानातील उंट संवर्धनासाठी ही संस्था कार्य करीत आहे. राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार रोखण्यासाठी या संस्थेने महत्त्वाचे पाऊल उचलले. सिंदूरसारख्या दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले असून दोनशेपेक्षा जास्त दुर्मिळ प्रजाती त्यांच्या मूळ अधिवासात पोचवण्याचे काम केले आहे.विष्णूच्या या चळवळीत देशातील २२ राज्यांतील तरुण सहभागी झाले आहेत. तसेच जगभरातील पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे इतर देशांचे तरुण त्याच्याशी संपर्कात आहेत.
'पानसिंग तोमर' या चित्रपटापासून प्रेरित होऊन विष्णू लांबाने चंबळपासून ते राजस्थानमधील चित्रकूटपर्यंत सुमारे दोन वर्षे तळ ठोकला होता आणि माजी दस्यूंना त्यांच्या मोहिमेशी जोडले. जयपूर येथे माजी दस्यूंना एकत्रित आणून। त्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली.
माजी दस्यूंना कार्यात सहभागी करून घेताना
गेल्या पंधरा वर्षांपासून विष्णूंनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडी 'पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे' अभियान राबवून असंख्य पाण्याचे भांडी बसवले आहेत. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून विष्णू आणि त्यांचे स्वयंसेवक मकर संक्रांती निमित्ताने होत असलेल्या पतंग कार्यक्रमात चिनी मांझ्याने जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी नि: शुल्क वैद्यकीय शिबिर आयोजित करत असतात.
विष्णूचे कार्य एवढ्यापुरते सीमित नाही. आजपर्यंत त्याने २२ राज्याचा प्रवास करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची कुटुंबे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ५६हून अधिक क्रांतिकारकांच्या कुटूंबाचा शोध घेतला आहे. हुतात्माच्या समाधीस्थळ ठिकाणी जाऊन वृक्षारोपण केले आहे.

२०१२ साली काही निवडक वारसदारांना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. या हुता्म्यांना शोधून काढणारा मुलगा कोण, असे कुतुहलाने त्यांनी विचारले. महाराष्ट्रातील शहिद विष्णू पिंगळे यांचे वारसदार राजेंद्र पिंगळे यांनी प्रणव मुखर्जी यांना विष्णू लांबा यांची ओळख करुन दिली. या तरुणाला 'पौधा चोर' असे म्हटले जाते, असे पिंगळे यांनी सांगताच प्रणव मुखर्जी यांनी राग व्यक्त करत हा मुलगा पौधा चोर नाही 'ट्री मॅन ऑफ इंडिया'आहे असे उद्गार काढले. लांबा यांच्या पाठीवर हात फिरवत पर्यावरणाच्या कामाला वाहून दे. हे काम सोडू नकोस, असा आशीर्वाद त्यांनी दिला.
बदलते हवामान,जैवविविधता आणि सौर ऊर्जेसंदर्भात त्याचे विचार मौलिक आहेत. तो म्हणतो, "आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी वातावरण तयार करण्यात आपला देश यशस्वी होत आहे. सौर ऊर्जेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे. हवामान संकट हे वैज्ञानिक आणि पारंपरिक ज्ञान संकलातून सोडवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशातील जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे"
अभिनेता इरफान खानला वृक्ष भेट देताना
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन,अजय देवगण, सुभाष घई, अनुराग कश्यप,अभिषेक बच्चन आदी कलाकारांनी लांबा यांच्या अद्वितीय कार्याला सलाम ठोकले आहे.तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विष्णूच्या कार्याचा गौरव केला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखावा, वनाचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि वसुंधरेचे रक्षण व्हावे यासाठी राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात अतुलनीय कार्य करणाऱ्या विष्णू लांबाची ही कहाणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
© विकास पांढरे,९९७०४५२७६७

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

कोल्हापूरची रणरागिणी


कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंचलकरंजी इथल्या दिव्या मगदूम हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. नवऱ्याने सोडून दिलेली म्हणून तिची अवहेलना व्हायची.आज ती परित्यक्ता, कुमारी माता आणि घटस्फोटित महिलांसाठी मायेची सावली बनली आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या सुलतानी धोरणा विरोधात पंचगंगेत आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांच्या समस्यांना वाचा फोडणारी रणरागिणी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. रणरागिणी क्रांती सेना व छत्रपती शासन महिला आघाडीच्या माध्यमातून ती खंबीरपणे नेतृत्व करतीये.
दिव्या ऊर्फ शंकुतला ही वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावाची. गोरा रंग, चेहऱ्यावर तेज, करारी बाणा या गुणवैशिष्ट्यांमुळे ती सर्वांना आपली वाटते. पण तिच्या वाट्याला जे दु:ख आले; ते ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. ती शोषित असली तरी अन्याय सहन न करणारी आहे. ती एकटी असली तरी ती असंख्य एकल महिलेची साऊली आहे.भय,भीती,भोग,बाईपण हे सर्व तिने सोसले आणि भोगले आहे. या भयाला न डगमगता ती स्वतः च्या पायावर उभी आहे.
दिव्या आपली दिव्यकहाणी सांगताना म्हणाली, "घरची गरीबी. शाळा नीट शिकता आलं नाही. न्हानं आलं तवा बापानं लगीन लावून दिलं. तवा मी १४ वर्षाची असेन. २००२ साल असावं. माहेरात जे सुख मिळालं नाही ते नवऱ्याच्या घरात मिळेल या आशेवर सासर जवळ केलं. पाणावलेल्या डोळ्यांनी माहेर सोडलं; त्याच डोळ्यांच्या धारांनी पुन्हा माहेरी परतावं लागलं. सुखाचा संसार होईल असं वाटलं होतं. कशाच काय? माझं नशीबचं फुटकं. नवी नवरी म्हणून सासरी आली तवा ना नवऱ्याकडून, ना सासू सासऱ्याकडून चांगली वागणूक मिळाली. सर्व सोसत, दु:खाला हसतमुखाने कवटाळत राहिले. तीन-चार महिन्याचे गरोदर होते, तेव्हा नवऱ्यानं मला सोडून दिलं. आयुष्यात काहीही भोगायचं शिल्लक ठेवलं नाही ते भोग माझ्या वाट्याला आलं होतं.
आता जायचं कुठं? आईबापाचं अस्सं.. शेवटी मी घरी आले एकदाची. लहान मुलासारखे रडत बसायची. जवळ पैसे नव्हते.कधी कधी जीव देऊन मरुन जावं असं वाटायचं. पोटात गोळा वाढत होता. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. जीवन एकलकोडं होऊन गेलं होतं. मी अगदी ठरवून टाकले होते. जे काय संकट आहे ते आनंदाने स्विकारायचं.
आयुष्याच्या एका टप्प्यावर चांगली माणसं भेटत गेली. त्यांना मला भेटू दिलं. आता जगायचं तर आपल्या बाळासाठी! तेवढाच विरंगुळा. जीव जगण्यासाठी धडपडत होता, ओढ घेत होता.त्यावेळी 'सोडलेली बाई' म्हणून आयाबायाकडून मला हिणकस वागणूक मिळायची. पुरूषांच्या नजरा वाईट असायच्या..न डगमगता, सहन करत पुढे जात राहिले. 'अमन नागरी विकास' संस्थेच्या माध्यमातून बचत गटाचे काम करू लागले. सूर गवसला. पैशाची बचत होत गेली. विस्कटलेली घडी सावरू लागली.
तेराशे बचतगटांची स्थापना
महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण होते, हे दिव्याने अल्पावधीतच हेरले.


दिव्या म्हणाली, "बचत गटामुळं असंख्य महिला भेटल्या. माझ्यासारख्या समाजात अनेक महिला दिसल्या. या वाटेत अनेकजणी ओळखीच्या झाल्या. त्या माझ्याकडे येत. आपलं दु:ख सांगत. तिथून मी उठले. तिचे प्रश्न, वेदना समाजासमोर मांडू लागले. आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेराशे बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच ते सहा लाख महिला बचतगटाशी जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी असतो"
'जिव्हाळा'ने दिला जगण्याचा आधार
कोल्हापूर जिल्ह्यातील पीडित, शोषित, निराधार, घटस्फोटित महिलांना जगण्याचा आधार मिळावा म्हणून दिव्या मगदूम हिने २०१८साली खोतवाडी येथे जिव्हाळा आश्रमाची स्थापना केली. या माध्यमातून सुमारे तीस महिलांचे पालन केले.



वयोवृद्ध महिला,अपंग महिलांच्या आरोग्याचा प्रश्न स्वतःच्या खर्चातून सोडवण्याचे कार्य तिने केले. शिवाय आश्रमातील महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी लघुउद्योग सुरु केला. बचतगटाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था केली."आश्रम चालवणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी पुरेसा पैसा आणि शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. मला कोणाचेही मदत मिळाली नाही. आश्रम चालवण्या इतपत माझी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे मला आश्रम बंद करावा लागला. पण आश्रमातील सर्व महिलांना योग्य ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले आहे. या महिलांशी माझं जिव्हाळाशी नातं निर्माण झालं होतं पण परिस्थिती अभावी त्याचं पालन करू शकले नाही" अशी खंत दिव्या हिनी व्यक्त केली.
२२विवाहितेचा सुखाचा संसार उभा
दिव्या हिचं काम केवळ बचतगटापुरते मर्यादित नाही ती महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा पुकारते, संघर्ष करते, न्याय मिळवून देते.
दिव्या म्हणते, "पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढले,जनजागृती केली. महिलांना आत्मबल देण्यासाठी रणरागिणी क्रांती सेनेची स्थापना केली. या माध्यमातून २२ विवाहित महिलांचा सुखाचा संसार उभा केला. माझ्याकडं असंख्य महिला येत असतात, आपली गऱ्हाणी सांगतात. अशिक्षित, अल्पशिक्षित, गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या वाट्याला अनेक दु:खे येतात. त्यांना ना समाजाचे सहकार्य मिळते ना शासनाची मदत. या महिलांची घुसमट ओळखून मी रस्त्यावर उतरते"
दिव्याचे काम आज १३ जिल्ह्यात पसरले आहे. पिडीत, परित्यक्ता, घटस्फोटित आदी महिलांसाठी लढणारी रणरागिणी बनली आहे.
मायक्रो फायनान्स विरोधात लढा
२०१९ साली कोल्हापूर जिल्ह्याला महापूरचा मोठा फटका बसला. या संकटामुळं सर्वसामान्याचे जगणे मुश्कील झाले असताना मायक्रो फायनान्स या कंपनीने जिल्ह्यातील बचत गटातील महिलांकडून सक्तीचे कर्जाची वसुली केली. कंपनीच्या सुलतानी कारभारात विरोधात दिव्याने लढा उभारला आणि तो राज्यभर गाजला.
याबाबत सांगताना ती म्हणाली, " माझा हा लढा केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हता तर संपूर्ण राज्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचतगटांना नियमबाह्य कर्ज देऊन सक्तीची वसुली सुरू केली होती. गोरगरीब महिला माझ्याकडे येतं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहत होते. एकीकडे निसर्गाने दगा दिला होता तर दुसरीकडे फायनान्स कंपनी सूड उगवत होती. त्यामुळं मी याविरोधात आंदोलन केले. माझ्या महिला कार्यकर्तीनी पंचगंगेत उडी मारली. कार्यकर्त्यांच्या सजगतेने त्या वाचल्या. पालकमंत्री ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करून कंपनीची चौकशी सुरू आहे. यातून बचतगटातील महिलांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे"
छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना
दिव्या हिच्या कामाचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा तिचा लोकसंग्रह वाढू लागला. दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी तिला पक्षात स्थान देऊन मतांसाठी वापर करून घेतला. खुर्चीचा हव्यास, घाणेरड्या राजकारणाला कंटाळून तिने २०२० साली छत्रपती शासन महिला आघाडीची स्थापना केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १६८ शाखांत आघाडीचे काम सुरू आहे. जवळपास अडीच लाख महिला दिव्याच्या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.
छत्रपती शासन महिला बँकेची स्थापना
ग्रामीण महिला, शोषित, पीडित, घटस्फोटित, एकल महिलांना अधिकाधिक बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे आणि त्यातून स्वावलंबी बनव्यात यासाठी दिव्या मगदूम हिने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१३ एप्रिल२०२१) बचत गटातील महिलांना एकत्रित करून छत्रपती शासन महिला विकास क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आहे.
दिव्या सांगते, " बचत गट व छत्रपती शासन महिला विकास आघाडीच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध करुन देणं एवढेच माझं उद्दीष्ट नसून, त्यांना स्वावलंबनाकडं, आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा माझा उद्देश आहे"
कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीब कुटुंबाचे व वंचित समाजबांधवांचे हाल होऊ नयेत, म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.टाळेबंदीत सेवा बजावत असलेल्या पोलीस बांधव व अन्य घटकांना भोजन पुरवण्यात येत आहे, असे दिव्या हिने सांगितले.
कधीही आपल्या कामाविषयी प्रसिद्धी वा वाच्यता न करता कामावर निष्ठा ठेवणाऱ्या या रणरागिणीला सदिच्छा
© विकास पांढरे, ९९७०४५२७६७

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...