मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

काठावर किती काळ असं बसायचं?


विकास पांढरे
आजचा ग्रामीण तरुण आळशी झालाय, तो शेती करत नाही, बायकोला मस्तपैकी कामाला लावून आपण मात्र स्टँडवर गप्पा मारत पत्ते खेळत बसतोय, अशी सध्या सोशल मीडियात साधकबाधक चर्चा होताना दिसतेय. यामध्ये ग्रामीण युवकांविषयी काही आशेची, विश्वासाची चार-सहा वाक्यंही वाचायला मिळतात. सारेच तरुण आळशी, चैनी, व्यसनी आहेत असं नाही. आज लाखो तरुण स्वतःच्या पायवर उभं राहून शेती-मातीच्या प्रश्नांना भिडताहेत, दुधासारख्या जोडधंद्यात चार पैसे कमवून आपलं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे असंख्य तरुण कमालीचे आळशी बनत चालले आहेत, त्यांना शेती कामाची लाज वाटतेय. आजचा ग्रामीण युवक मोबाइल युगात आकंठ बुडालाय असं चित्र जरी असलं, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे.
त्रिं.ना. अत्रे यांचा 'गाव-गाडा' हा महाराष्ट्रीय ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय दस्तऐवज असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याला आता शतकभराचा काळ लोटून गेलाय. या ग्रंथातला गावगाडा आज राहिला नाही. बदलत्या काळानुसार गावगाडयात राजकारण, शेती व्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राहणीमान यात स्थित्यंतरं होत गेली. पूर्वीची आलुतदार, बलुतेदार मंडळी आता दिसत नाहीत. जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय तोटयात येऊ लागला. शहरातली व्यापारी मंडळी गावात येऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून नफा मिळवून देणारी शेती करताहेत. काही तरुण गावगाडयात राहून शेती करताहेत, काही तरुण शहरांकडे धाव घेऊ लागलेत, तर काही तरुण आळशी होत चालले आहेत. या तरुणाचं टोळकं सदोदित स्टँडवर, पारावर बसून बाष्कळ गप्पा मारतानाचं चित्र नजेरस पडतं.
सोशल मीडियातला ग्रामीण आळशी युवक
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून सोशल मीडियाकडे अर्थात समाज माध्यमांकडे पाहिलं जातंय. अनेकांना वेगवेगळया विषयांवर अभिव्यक्त होण्याची संधी मिळतेय, अभिव्यक्त झालेल्यांना चटकन प्रतिसादही मिळतोय, ही एक सकारात्मक बाब आहे. सोशल मीडियातून ग्रामीण तरुणांवर चर्चा होताना दिसते आहे. ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चालला असून तो फक्त फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर रात्रंदिन पडीक असतो, तोंडात तंबाखू, मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, बॅनरवरची पब्लिसिटी आणि नेत्याचा खांद्यावर हात असावा याला ग्रामीण युवक भविष्य म्हणून पाहतोय, घरातील स्त्री शेतावर राबत असताना हा आत्मा स्टँडवर उभा राहून आपल्या मानसन्मानाच्या गप्पा झोडत असतो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या यात तो गुंग असतो, शेतात काम कर म्हटलं की नाक मुरडायला लगेच तयार असतो, अशा पोस्ट्स वाचायला मिळताहेत. यावरून ग्रामीण भागातील तरुण पिढी कशी बिघडत चालली आहे, हे लक्षात येतं. खरंच, ही पोस्ट सुसंगत आहे. सध्या गावगाडयात असंच काहीसं चित्र आहे. आज अनेक तरुण स्वतःचं सत्त्व हरवून बसलेत, व्यसनी बनले आहेत, शिवाय नेतेमंडळी तरुणांचा चांगला उपयोग करून घेताना दिसताहेत. ग्रामीण तरुणांची होणारी वाताहत चिंताजनक आहे. तरुणांच्या आळशीपणाला कोण जबाबदार आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, यांचा संशोधनात्मक अभ्यास करताना कोणी नजरेस पडत नाहीत.
ग्रामीण युवकांची दुसरी बाजू
जागतिकीकरण, शेतीवरचं अस्मानी संकट, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे गावगाडा ठप्प होतोय. यामुळे छोटा शेतकरी नव्हे, तर अगदी मोठा शेतकरीही अडचणीत येतोय. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठया प्रमाणावर बेरोजगार होतोय. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागलेत. त्यामुळे खेडयापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनत चाललीय. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून वेळेवर न पडल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. मान्सून ठीक तर गावगाडा नीट असतो. मात्र काही दशकांपासून असं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण गावगाडयाचं स्वरूप बदलून गेलंय. काही शेतकरी काळया आईची इमानेइतबारे सेवा करताना दिसताहेत. पण पेरणीसाठी जेवढे पैसे खर्च झाले, तेवढे पैसे त्याच्या पदरात पडत नाहीत. त्यामुळे शेती हा आतबट्टयाचा व्यवहार झालाय. मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, घर-संसार कसा सांभाळायचा म्हणून असंख्य जीव झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करताहेत. हे दुःख उरात ठेवून आजचा तरुण वाममार्गाला लागतोय. स्टँडवर गप्पा मारणारे तरुण बहुतांशी सधन घरातले आहेत. प्रादेशिक भागाचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडयात गावंच्या गावं ओस पडलेली दिसतील. पोटासाठी सर्वांची धाव शहराकडे लागली आहे. जिथे मोठी धरणं आहेत, तेथे आणि साखरपट्टा समजल्या जाणाऱ्या प. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आळशी तरुणांचं टोळकं नजरेस पडेल. याच भागात आटपाडी, माण, खटाव, जत, सांगोला व मंगळवेढा भागात दुपारी गेला तर माणूसही नजरेस पडणार नाही. शेतकऱ्याचं सहा-सात वर्षाचं पोरगंसुध्दा शाळेच्या वेळेपर्यंत रानात बापाबरोबर राबताना दिसतं. शेर्डीकर्डीला गवत काडी आणतं. या सगळया गोष्टी बघायला गावात जावं लागतं. शहरात बसून चार-दोन टाळक्यांचं वर्णन करून संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोराचं वर्णन करणं चुकीचं आहे. खेडयातला कोंबडा शहरात आरवत नसतो. तसं करायचं झालं, तर शहरातील पोरांबाबतही करावं लागेल. त्यामुळे सगळीच पोरं आळशी आहेत असं नाही. आजचा तरुण शेतकरी निसर्गाशी झुंज देत डाळिंब, द्राक्ष, संत्रे, आंबा अशा फळबागा पिकवत आहे. मात्र बाजारात बसलेल्या चोरांमुळे त्यांच्या घामाचा दाम चोरला जातोय. उधारीवर आणलेल्या कीडनाशकांचे व खतांचे पैसे देण्याइतपत त्याला या बागेतून मिळत नाहीत, तरीही तो आलेल्या संकटांशी सामना करतोय.
आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून
दुष्काळी नव्हे, तर बागायती भागातही तरुणांची परवड होते आहे. आज अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरीअभावी गावगाडयात खितपत पडताहेत. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्यांना खात्री आहे. त्यांना शेती करणं कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला? अशी त्यांची मानसिकता बनत चाललीय. मराठवाडयातल्या माझ्या एका मित्राची शेती आणि त्याचं शिक्षण बघून त्याला शेजारच्या गावातील मुलगी दिली, पण शेतीत त्याचं मन रमत नव्हतं. नोकरीसाठी सगळीकडे अर्ज करत होता. प्रत्येक वेळी संस्थाचालकांकडून डोनेशनची मागणी होत होती. शेवटी सततचा दुष्काळ, द्रारिद्रय आणि बेरोजगारी यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. अशा असंख्य तरुणांच्या व्यथा आहेत. नोकरी लागत नाही म्हणून हताश झालेल्या चांगदेव गित्ते या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी इथल्या तरुणाने चक्क फार्मसीची पदवी विकायला काढल्याची बातमी मध्यंतरी प्रसिध्द झाली होती. त्याची घरची परिस्थिती जेमतेम होती. शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने ती तोटयात आली होती. तरीही शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च केला. मात्र शिक्षण घेऊन घरचा भार उचलता येत नाही, म्हणून हताश झालेल्या चांगदेवने डिग्री विकायला काढल्याची बातमी वाचनात आली होती. आजच्या घडीला असंख्य ग्रामीण तरुणांना नोकरी मिळत नाही. अनेक युवक आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करताहेत. परंतु एवढं शिकूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांची समाजात अवहेलना होते. त्यामुळे तरुणांमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय. काही तर जीवनयात्रा संपवताहेत. ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण शिकलेल्या मुलींना जोडदार मात्र खेडयातला तरुण शेतकरी नकोय. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्टयाचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. त्यामुळे गावगाडयातल्या मुलीला शेतकरी नवरा नकोसा झालाय. आपला नवरा एखाद्या कंपनीत कमी पगारात काम करत असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशी मुलींची आणि पालकांची मानसिकता बनत चालली आहे. एका सर्वेक्षणाच्या पाहणीतून सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात शेकडो तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावात तिशी उलटलेल्या तरुणांनी विवाहाची आशाच सोडून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये तब्बल 3 हजारांपेक्षा जास्त तरुणांचे विवाह रखडले आहेत. हे सर्व तरुण शेतीसंबंधित काम करताहेत आणि खेडयात राहतात म्हणून मुलींनी त्यांना नकार दिल्याचं समोर आलंय. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही दिसून येतंय. यातील अनेक तरुणांच्या कहाण्या काळजाच्या चिंध्या करणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य काय? या तरुणांचा आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि सरकारी व्यवस्था यांनी साथ नाही दिली, तर असंख्य ग्रामीण तरुणांची कशी वाताहत होतेय, याचं वास्तव चित्र यावरून स्पष्ट होते.
नवनवीन शिकाल तरच टिकाल
सरकार रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप यासारख्या नवीन उद्योग प्रणाली तरुणांना आकर्षित करताहेत. प्रत्येक ग्रामीण तरुणाने काळाप्रमाणे बदल करून बदलत्या जगाप्रमाणे आपणही अपडेट राहायला शिकलं पाहिजे, नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तरच आपला निभाव लागणार आहे. आज नवनवीन कन्सेप्ट्स उदयाला येताहेत, त्या आत्मसात करायला शिकलं पाहिजे. गावात बसून शेतीपूरक व्यवसाय करता येतो, अशीही उदाहरणं आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांनी आळस झटकून नवा इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे की, 'काठावर किती काळ असं बसायचं? त्यापेक्षा पोहणं शिकून घ्या. होडीचं कुणी सांगावं? ती परतेल, न परतेल....' ग्रामीण तरुणांनो, आळसाच्या काठावर किती काळ बसणार आहात? आता जागतिकीकरणाच्या समुद्रात पोहायला शिका, नाहीतर संकट आ वासून उभं राहील.
99970452767
विवेक मराठी  04-Sep-2017

मराठवाडयाचे इस्रायल - 'कडवंची' गाव

मराठवाडा म्हटले की सततचा दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दोन गोष्टी प्रकर्षाने डोळयासमोर येतात. या भागात ज्या ज्या वेळी जलव्यवस्थापनाचा विषय निघतो, तेव्हा इस्रायल देशाचे उदाहरण समोर ठेवले जाते. आश्चर्याची गोष्ट अशी की, शासन व जनता यांच्या एकजुटीने गावाचा कसा कायापालट होतो आणि 'मराठवाडयाचे इस्रायल' म्हणून गावाची ओळख कशी निर्माण होऊ शकते, याचे उदाहरण जालना जिल्ह्यातच आहे. मृद्संधारण आणि जलसंधारण या दोन्हीच्या आधारे या गावाचा अविश्वसनीय कायापालट करण्यात आला आहे. 'कडवंची' असे त्या गावाचे नाव. त्याची ही यशोगाथा.
 गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाडयात यंदाच्या पावसाने दिलासादायक चित्र निर्माण केले असले, तरी मार्चच्या पुढे हे चित्र असे दिसेलच असे नाही. उन्हाळयात पुन्हा पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. यास जालना जिल्हाही अपवाद नाही. या जिल्ह्यात वार्षिक सरासरी 650 ते 750 मि.मी. पावसाचे प्रमाण असले, तरी 350 ते 450 मि.मी. इतकाच पाऊस पडतो. इथून गोदावरी नदी वाहत असली, तरी तिचा फायदा दक्षिणेच्या सीमेलगतच्या गावांना होतो. दुधना, कुंडलिका, पूर्णा या उपनद्या या जिल्ह्यात असल्या, तरी दुष्काळामुळे त्या कोरडयाच असतात. अंबड, घनसांगवी, मंठा व जालना तालुक्यात पाण्याचे क्षेत्र जेमतेम असल्याने मोसंबीच्या बागा पाहायला मिळतात. उर्वरित जिल्ह्यात पावसाळयानंतर ओसाड माळरान नजरेस पडते. अशा जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रस्त्यावर कडवंची गावच्या हद्दीत प्रवेश केल्यावर मात्र आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळेल.
साधारण तीन हजार लोकसंख्येचे हे गाव. मराठा, धनगर, माळी, कुंभार व मातंग समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. वीस वर्षापूर्वीपर्यंत कडवंची हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते. या वर्षीचा अपवाद वगळता या गावात आतापर्यंत 300 मि.मीटरच्यावर कधी पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस आणि तूर या पिकांवर अवलंबून असणारे येथील शेतकरी उन्हाळयात पोटापाण्यासाठी शहराकडे स्थलांतर करत असत. गावात बेकार तरुणांचे थवे पाहायला मिळत. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. शिक्षणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे गावात परिवर्तन घडवू पाहणारे नेतृत्व उदयास आले नव्हते. अज्ञानाच्या अंधारात अडकलेल्या इथल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा राहत होता. या अनुभवामुळे अनेक कुटुंबांचा शेतीवरचा विश्वास उडाला होता. असे हे गाव शेतीच्या माध्यमातून समृध्द होण्यासाठी 1993 साली, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची येथे मराठवाडा शेती साहाय्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी जलसंधारणाच्या प्रकल्पाची तयारी करण्यात आली. 1994 साली शासनाच्या वतीने जालना कृषी विज्ञान केंद्राने मृद्संधारणाचे काम हाती घेतले. याचा पहिला प्रयोग कडवंची गावात सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे 1.36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे विजय बोराडे यांनी हे काम 1.22 कोटीत पूर्ण केले. या प्रयोगशील कामासाठी पंडित वासरे या कर्तव्यदक्ष कृषी अभियंत्याची निवड झाली. वासरे यांना शेतीविषयी आत्मीयता असल्याने त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मृदेच्या व पाणलोटाच्या कामाविषयी शेतकरी उदासीन होते. नंतर कृषीभूषण विजयअण्णा बोराडे व कृषी अभियंता वासरे यांनी कडवंचीच्या ग्रामस्थांना मृदा आणि जल यांच्या संधारणाचे महत्त्व पटवून दिले आणि या गावाचे रूप पालटले.

मृदा व जल यांच्या संधारणाच्या कामांची फलश्रुती
गेल्या चाळीस वर्षांत मराठवाडयात दुष्काळ निवारणाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चा कार्यक्रम झाला. मात्र या कामाची फलश्रुती काय? याचे उत्तर सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या परस्पर सहकार्यातून गाव सुजलाम् सुफलाम् कसे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाडयातलेच कडवंची हे गाव. मृद्संधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे 200 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, हे कडवंची गावाने दाखवून दिले आहे. जालना कृषी विज्ञान केंद्राने इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात काम सुरू केले. माथा ते पायथा उपचारामध्ये सुरुवातीला मृद्संधारणासाठी डोंगरमाथ्यावरून पाणलोटाच्या पायथ्याकडे कामे केली. पुढे पडिक जमिनीवर सलग समतल चर, खासगी वहिती जमिनीवर बांधबंदिस्ती केली. नॅशनल ब्युरो ऑॅफ सॉईल सर्व्हे ऍंड लँड यूज प्लॅनिंग या संस्थेने जमिनीची धूप झाल्याने पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यानुसार प्रतिहेक्टरी सरासरी 25 टन माती दर वर्षी वाहून जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही माती जमिनीचा वरचा थर असल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य घटक (नत्र, स्फुरद, पालाश) वाहून घेऊन जाते व त्याचा परिणाम जमिनीच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे पिकांचे उत्पादन 25-40 टक्क्यांनी कमी होते. या सर्व नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून कडवंची पाणलोट क्षेत्रात प्रचलित पध्दतीतील निव्वळ तांत्रिक निकष न वापरता शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे तांत्रिकदृष्टया योग्य शेत बांधबंदिस्ती करण्यात आली. शेतबंदिस्ती सरासरी 300 मीटर प्रतिहेक्टर करून जास्तीचे पाणी सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी प्रत्येक बांधाला पाईपचे व दगडाचे सांडवे करण्यात आले आहेत. अशा प्रकारची बांधबंदिस्ती 1500 हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे. मृद्संधारणातून साध्य होणाऱ्या जलसंधारणाबरोबरच कडवंची गावात लहान-मोठे दगडी आणि 705 सिमेंटचे नालाबंधारे बांधण्यात आले, तर 700 समतल चर घेण्यात आले. गावाच्या चारही बाजूंनी झाडे लावण्यात आली. याचा परिणाम म्हणजे कडवंची गावातील माती वाहून जाण्याचे थांबले, शिवाय पाणी पातळीतही वाढ झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांना मृद्संधारण व पाणलोट कामांविषयी विश्वास वाढला. आता या गावात गेल्या चार वर्षांपासून गावातील 206 विहिरींतील पाण्याची पातळी वाढली आहे.


विशेष म्हणजे या वर्षीचा पावसाचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत या भागात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यातही जालना तालुक्यातील कडवंची गावात यापेक्षाही कमी पाऊस झाला होता. पण जलसंधारणाचे काम शास्त्रशुध्द पध्दतीने झाल्यामुळे कडवंची गावावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नाही. पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब गावाच्या क्षेत्राबाहेर वाहून जाणार नाही, त्याबरोबर मातीचा कणही धुऊन बाहेर जाणार नाही याची योग्य काळजी घेतल्याने कडवंची गावाला गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्काळाची झळ लागलेली नाही. अलीकडे 2012, 2013 व 2016 साली जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. कडवंचीच्या आजूबाजूची अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागले. पण कडवंची गाव त्या दुष्काळाच्या वणव्यातही हिरवेगार होते. ही किमया फक्त मृद् व जलसंधारणाच्या कामामुळे झाली. पाणलोट विकासामुळे गावातील बागायती क्षेत्र वाढून शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. मृद्संधारणामुळे गावातील जवळपास अठराशे हेक्टर पडीक जमीनही लागवडीखाली आली आहे. हंगामी व बारमाही सिंचनक्षेत्रात वाढ झाल्याने पिकांच्या उत्पादनात व उत्पन्नातही भरीव वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात सरकारी योजनेद्वारे कधी पाण्याचा एकही थेंब पुरवठा होत नव्हता. आता हेच गाव पाणीदार झाले आहे. वर्षाचे बाराही महिने हे गाव इस्रायलसारखे हिरवेगार असते. या 1800 हेक्टरवर निसर्गाची अवकृपाची असायची. 20 ते 25 इंच पाऊस हाच या गावाच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा जिरवता येईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला सुरुवात केली.
पिकांचे योग्य नियोजन व विकासाचे मॉडेल
गावकऱ्यांची एकजूट, पाणलोटाच्या कामाची फलश्रुती यामुळे कडवंची गावात कमी पाण्यातही शेतकऱ्यांनी आपली बाग फुलवली आहे. वीस वर्षांपूर्वी ऊस, केळी, मोसंबी ही पिके घेणारे शेतकरी आता कमी पाण्यात येणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंब पिकांकडे वळले आहेत. पिकांचे शास्त्रीय नियोजन करून कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नामुळे पीक रचनेत बदल झाला. मृद् व पाणलोट प्रकल्प सुरू होण्यापूर्वी या गावात फक्त 3 हेक्टर क्षेत्रावर असलेली फळबाग आज 600 हेक्टर क्षेत्रावर पसरली झाली आहे. यामध्ये 480 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. 200 शेतकरी डाळिंबाकडे वळले आहेत. आले 12 हेक्टर व भाजीपाला 120 हेक्टरवर घेतला जात आहे. कडवंचीच्या द्राक्षांना प्रामुख्याने विदर्भात व मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. येथील शेतकरी माल घेऊन विक्रीसाठी बाजारात कधीच जात नाही, तर स्वत: व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाया जात नाहीत. शेतकऱ्यांना शेतात बसूनच नगदी पैसा मिळू लागल्याने त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
नापिकी, बाजारभाव, दुष्काळ या कारणांमुळे गेल्या वीस वर्षांत कडवंची येथे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. यापूर्वी या गावात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत हे विशेष आहे. या गावातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळाला नाही म्हणून कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. उलट या गावाच्या मुली ज्या गावात दिल्या आहेत, त्या गावात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यात येते. पाणलोटापूर्वी कडवंची गावचे वार्षिक उत्पन्न 75 लाखांपर्यंत होते. पाणलोटानंतर आज या गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला जवळपास 55 कोटीपर्यंत पोहोचले आहे. आज गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत द्राक्षाच्या हिरव्यागार बागा नजरेस पडतात. गावात प्रत्येक वर्षी सरासरी फक्त 200 ते 350 मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे द्राक्षासारखे नगदी पीक घेणे ही जोखीम असतानाही येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून द्राक्षाच्या बागा फुलवल्या आहेत. अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. सर्वांच्या हाती नगदी पैसा खेळत आहे. पुरेसा पाऊस पडो अथवा न पडो, येथील शेततळी नेहमी भरलेली असतात. पारंपरिक शेतीच्या पध्दतीचा अवलंब न करता, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेटमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांना शासनाचा व इतर सामाजिक संस्थांचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. शेतीमुळे आपल्या जीवनात बदल झाला आहे. काळया आईची रात्रंदिन सेवा करता यावी, यासाठी 80 टक्के शेतकरी शेतात कायमचे राहायला गेले आहेत. त्यामुळे गावाच्या शिवारात अनेक टुमदार बंगले पाहायला मिळतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरांसमोर पर्जन्यमापक यंत्र बसविल्याचे चित्र नजरेस पडते. पावसाचे प्रमाण व आर्द्रता शेतकरी शेतात बसूनच पाहतात. पाण्याने भरलेली शेततळी, शेडनेटमधील विविध भाजीपाला, घरासमोर शेतात ट्रॅक्टर, दुभती जनावरे पाहून आपण दुष्काळी भागात आलो आहोत यावर विश्वास बसत नाही.
गावात आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेचा   परिसर जसा स्वच्छ आहे, तसाच विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास घडविण्यासाठी शिक्षक कष्ट घेत असतात. गावात तीन-चार वस्तिशाळा आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे पालकांचे व शिक्षकांचे लक्ष असते. मुख्य शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिकविला जातो व इंग्लिश शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकले आहेत, हे शाळेत लावण्यात आलेल्या पारितोषिक पदकांवरून लक्षात येते. आज या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मुले पुढील शिक्षणासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर शहरात आहेत. गावात एकही तरुण बेरोजगार दिसत नाही. त्यामुळे या गावाचे नाव शेतीबरोबर शिक्षणातही अग्रेसर झाले आहे. विशेष म्हणजे पैसा हातात आला म्हणून केवळ मौजमजा करणारे तरुणांचे टोळकेही गावात नजरेस पडत नाही. प्रत्येक तरुण आपापल्या शेतात काम करताना नजरेस पडतो. महिला मजुरांना गावातच बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. दुपारच्या वेळी गावात फक्त वृध्द नागरिक नजेरस पडतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतला किलबिलाट तेवढाच ऐकू येतो. ''नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे कडवंची गावाचा शाश्वत विकास झाला आहे'' असे शेतकरी रमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
''माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्या वेळी शहरात जाऊन छोटी-मोठी नोकरी करण्याची इच्छा झाली. पण घरची सात एकर शेती होती. गावात मृद् व पाणलोट क्षेत्राखाली अनेकांची शेती आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसत होते. त्यामुळे मी शहरात जाण्याचा निर्णय बदलला. आज माझ्या शेतात द्राक्षाचे नगदी पीक घेतल्याने माझे आर्थिक जीवनमान उंचावले आहे'' असे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले.
''आमच्याकडे आठ एकराचे कोरडवाहू शेत होते. वीस वर्षांपूर्वी या शेतातून कोणतेच धान्य पिकत नव्हते. त्यामुळे आम्ही मेंढपाळाचा आमचा पारंपरिक व्यवसाय करत या गावाहून त्या गावात स्थलांतर करत असू. आज गावाचे चित्र बदलले आहे. आम्हीही भटकंतीचा मेंढपाळाचा व्यवसाय बंद करून कोरडवाहू शेतात द्राक्षाचे व डाळिंबाचे नगदी पीक घेत आहोत. यात चांगला नफा मिळत गेल्याने शेतात चांगले घर बांधले आहे. शेतीकामात समाधानी आहोत'' अशी प्रतिक्रिया अनिरुध्द झारे यांनी दिली.
''मी उन्हाळयात पाण्याचे काटेकर नियोजन करून विविध पिके घेतो. विशेषत: द्राक्ष पिकास आम्ही पसंती देतो. या पिकांतून भरघोस उत्पन्न मिळते. शिवाय व्यापारीही द्राक्ष खरेदीसाठी आमच्याकडे येतो. भाव योग्य मिळाला तर द्राक्षाची विक्री करतो,'' असे शेतकरी भगवान कायंदे यांनी सांगितले.
 कडवंची गावाची प्रगती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चढाओढ लागली आहे. युनियन बँकेने गावात शाखा उघडली आहे. 1996 ते 2000 या सालात पाणलोट अंतर्गत शेतात बांधबंदिस्तीतून मृद्संधारणाची कामे केल्याचा हा परिणाम आहे. कडवंची गावाने योग्य पाणी व्यवस्थापन करून दुष्काळातही आदर्श शेती नावारूपाला आणली. आज कडवंची हे गाव विकासाचे मॉडेल म्हणून उदयाला आले आहे. हैदराबाद येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर या संस्थेने कडवंची येथील मृद् व पाणलोट कामाचे मूल्यांकन करून अहवालामध्ये प्रशंसा केली आहे.

पाण्याचे आदर्श व्यवस्थापन
कडवंची गावात पाण्याची मुबलकता असली, तरी सर्व शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी 100 टक्के ठिबक सिंचनाचा अवलंब करतात. केळी, ऊस व मोसंबी या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना हद्दपार करण्यात आले आहे. शेतात पाटपाणी देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. पाणलोट विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन गावकऱ्यांनी पाणलोट विकास समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शेतकरी भगवानराव क्षीरसागर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या समितीत सात सदस्य असून समितीच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचा काटेकोर वापर करून कमी पाण्यात जास्त नफा मिळवून देणारी पिके घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे शेतकरी जास्त पाण्याचे पीक घेत होते, त्या शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल करायला सुरुवात केली आहे. आज सर्व शेतकरी या पध्दतीचा अवलंब करतात. उन्हाळयात बागांना पाणी मिळण्यासाठी शेततळे घ्यावे लागते. त्यासाठी कडवंची पाणलोटामध्ये 550 शेततळी आहेत. गेल्या चार वर्षांत सातत्याने दुष्काळ पडून या गावातील कृषी उत्पादनाचा आलेख मात्र वाढताच राहिला आहे. गावच्या परिसरात 26 शेडनेट, जवळपास 206 विहिरी आहेत. यापैकी बहुतांश विहिरींमध्ये उन्हाळयात पाणी असते.
आदर्शवत वाटचाल
राज्यात मराठवाडा व विदर्भ येथील अवर्षणसदृश परिस्थितीचा परिणाम विकासावर होत आहे. दुष्काळ व नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकार विविध पायलट प्रकल्प राबवीत आहे. पण स्थानिक जनतेच्या उदासीनतेमुळे यातले अनेक प्रकल्प अयशस्वी झाले आहेत. परिणामी सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येते. हे निसर्गाचे लहरी चक्र लक्षात घेऊन, शासन व जनता यामध्ये सुसंवाद साधला गेला तर शेतीचा स्वयंपूर्ण विकास करता येतो, हे आपण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावावरून पाहिले आहे. जलसंधारणाचे आदर्श गाव म्हणून हिवरेबाजाराचा उल्लेख केला जातो. आता हिवरेबाजाराच्या पंक्तीत कडवंची गाव येऊन बसले आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागातील कडवंची गावाचा आज कायापालट झाला आहे. मृद्संधारणाचे व जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल कडवंची गावामध्ये पाहायला मिळाले असून दुष्काळाशी सामना कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण कडवंचीने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. आता जलव्यवस्थापनाचा धडा शिकण्यासाठी इस्रायलला जाण्याची गरज नाही. इस्रायलचे प्रतिरूप शोभावे असे गाव महाराष्ट्र राज्यातील मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात आहे हे पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांनी या गावास भेट देऊन आपल्या शेतीच्या पध्दतीत बदल केला पाहिजे.
2017च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करताना सरकारने शेतकरी, गावे, गरीब, दलित आणि समाजातील अविकसित गटाचे कल्याण कसे होईल याला प्राधान्य दिले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पाणलोट विकास या क्षेत्रांमध्ये खूप मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे. 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शेती क्षेत्राचे चित्र पालटण्यासाठी कडवंचीसारखे पायलट प्रोजेक्ट करण्याकरिता सरकारने 50 गावांची निवड करून ही गावे समृध्द करणे गरजेचे आहे.
गावाच्या विकासाचे पंचसूत्र - पंडित वासरे
''पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय शेतीची उत्पादकता वाढणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कडवंची गावाच्या विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आला. पहिला माथा ते पायथा कार्यक्रम, दुसरा मृद्संधारणातून जलसंधारण राबविणे, तिसरा शास्त्रीय पध्दतीने पीक पध्दतील बदल, चौथा शासनाच्या योजने अंतर्गत शेततळे घेणे आणि शेवटचा पाचवा शंभर टक्के ठिंबक सिंचनाचा वापर करणे या पंचसूत्रीचा वापर केल्यामुळे कडवंचीसारखे कोरडवाहू गाव आर्थिकदृष्टया संपन्न बनले आहे,'' असे जालना कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान- चंद्रकांत क्षीरसागर 

''आज कडवंची गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, याचे श्रेय जालना येथील कृषी विज्ञान केंद्रास जाते. या गावात एप्रिल, मे व जून महिन्यांत शेततळयातून बागांना पाणी देण्यात येते. याच तीन हजार लोकसंख्येच्या गावात 550 शेततळी आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. आज आमच्या गावात कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यामुळे कडवंची गावात सुख, शांती व समृध्दी नांदत आहे,'' असे कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांनी संगितले.
9970452767
 विवेक मराठी  16-Dec-2017


मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

गोष्ट एका शिक्षकाच्या चांगुलपणाची

सध्या शिक्षकांमधील चांगुलपणा,सामाजिक भान हरवत चालला आहे, अशी ओरड होत असते.पण काही शिक्षक समाजासमोर दीपस्तंभासारखे काम करताहेत.आदिवासी भागात जन्माला आलेल्या एका तरुण शिक्षकाने नोकरी लागल्यापासून समाजसेवक बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' संस्थेच्या संलग्नित महारोगी सेवा समितीला हजार रूपये पाठवून चांगुलपणा जपला आहे. त्यामुळे इतर शिक्षकांनी हा आदर्श घेण्यासारखा आहे.

एकनाथ रामकिसन नैताम असे त्या शिक्षकाचे नाव आहे. काटगाव ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.किनवट तालुक्यातील शामपूर (मिनकी) या आदिवासी पाड्यात एकनाथ यांचा जन्म झाला. आजही या पाड्यात त्यांचे आई-वडील,भाऊ राहतात. आदिवासी पाड्यात आजही ना शिक्षणाची सोय आहे ना कोणत्या सेवा सुविधा. जंगल हेच त्यांचे विश्व. एकनाथ नैताम हे त्यातील एक घटक. हालाखीच्या परिस्थितीमुळे एकनाथ यांना लहानपणी गाई,गुरे ,बकऱ्या चरण्याठी रानात घेऊन जावं लागे. रानमोळ हिंडताना किनवट च्या घनदाट जंगलाचे दर्शन होत असे. सोबत ते बाराखडीचे पुस्तक घेऊन जात. यातून त्यांना मुळाक्षराची ओळख झाली. बाराखडीच्या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टी ते वाचू लागले. शिक्षणाचा लळा लागू लागला पण घरात कुणीच शिकलेले नव्हते. त्यात अठराविश्व दारिद्रय. ना भाऊ,ना,वडील,ना काका शिकलेला होता. अशा अंधारकमय जीवनात प्रकाशाची वाटा पाहणाऱ्या एकनाथ यांच्या अडाणी आई-वडिलांनी आपल्या मुलाला शिकवून मोठे करण्याचा खूणगाठ बांधली. जमेल तसे एकनाथांच्या धडपडीला साथ देऊ लागले. आई-वडिलांच्या अथक प्रयत्नामुळे एकनाथांना तलाईगुंडा (ता.किनवट) येथील शासकीय आदिवासी आश्रमात प्रवेश मिळाला. आश्रमात राहून एकनाथ यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यापुढचा मार्ग त्यांना निवडाचा होता. आपल्या कुटुंब व बांधवांना नवी दिशेने न्यायचे असेल तर पुढील शिक्षण घेणे आवश्यक होते. दहावीनंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी डीएडचा मार्ग पत्करला. पैशाअभावी हे शिक्षण पूर्ण करणे अवघड होते. डीएडची प्रवेश फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. वैजापूर जि.औरंगाबाद येथील अध्यापक विद्यालयात अत्यंत हालखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१२ साली इटकळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले.
शिक्षक एकनाथ नैताम
नोकरीला लागल्यापासून 'आनंदवना'ला का?पैसे पाठवत आहे. याविषयी सांगताना एकनाथ म्हणाले,"माझी घरची परिस्थिती बेताची होती,संस्कार काय असतात हे मला माहीत नाहीत. आश्रमात शिक्षणासाठी आलो तेव्हा लाजरा होतो, आपल्यापेक्षा काही लोक अधिक पटीने सुधारले आहेत याची जाणीव झाली. तिथे माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले.आम्ही सर्व आदिवासी मुलं-मुली एकत्र भावडांप्रमाणे राहायचो. इथे घरच्याप्रमाणे वागणूक दिली गेली. समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांनी आदिवासी पाड्यात केलेल्या कामामुळे हा  सामाजिक बदल घडून येतोय हे हळूहळू कळत गेले. त्यामुळेच आमटे कुटुंबिय माझे आयडॉल आहेत. लहानपणी आदिवासी मुलांचे पाहिलेले दु:ख,वेदना मनात टोचत होत्या. आपण प्रवाहाबरोबर असल्याची जाणीव होत होती. पण आमच्या समाजात आमुलाग्र बदल घडवणारे डॉ.बाबा आमटे हे आमचे दैवत आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' पुस्तकाने आणखीन प्रभावित झालो. आदिवासींच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असलेले समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्यामुळे आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षण मिळाले. त्यामुळे आपण शिकून शिक्षक होऊ शकलो. शिक्षक झाल्यापासून न चुकता महारोगी सेवा समिती वरोरा जि.चंद्रपूर या संस्थेला आर्थिक मदत देण्याची जबाबदारी स्वीकारली. अविरतपणे ही मदत चालू ठेवणार असल्याचे एकनाथ नैताम यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात एकनाथ यांच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती दिली होती. हा संदेश पै-पाहुण्यांना आवडला होता. एकनाथ हे शाळेच्या कामातही आघाडीवर आहेत. ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून इटकळ येथे ठसा उमठवला आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध परिक्षेत गुणवान ठरले आहेत.


देवभूमी केरळमध्ये प्रलयंकारी जलसंकट आले. आपत्तीग्रस्त बांधवांना मदत म्हणून जि.प. प्रा .शाळा काटगाव ता. तुळजापूर येथील इ.३री तुकडी (ब )मधील विद्यार्थांनी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मूल्यवर्धन या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांसाठी काहीतरी सहकार्य करावे या भावनेतून खारीचा वाटा उचलला आहे. यामध्ये  वर्गशिक्षक श्री. एकनाथ नैताम यांनी १ हजार रूपये व सर्व विद्यार्थ्यांनी मिळून २०० रु असे एकूण १२०० रुपयांची मदतनिधी केरळ सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन निधी म्हणून पाठवले आहे. विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना समजावी व त्यांनी एकमेकांना नेहमी सहकार्य करावे,हा आपला हेतू असल्याचे नैताम यांनी सांगितले.

एका साध्या शिक्षकाने आपण जे भोगलो, ते भोग आपल्या बांधवांना येऊ नये, या संवेदनेतून एकनाथ नैताम यांनी उचलेले पाऊल कौतुकास्पद तर आहेच शिवाय अनुकरणीय देखील सुध्दा आहे.
©विकास पांढरे,९९७०४५२७६७

एकनाथ नैताम - ९५५२००५२७२
( सदर लेख १२ जानेवारी २०१७ रोजी दैनिक पुढारी, सोलापूर मध्ये प्रसिद्ध झाला आहे. शेवटचा मुद्दा नाव्याने भर घातला आहे.)

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

जलव्यवस्थापनाच्या नंदादीप - अहिल्यादेवी होळकर




  • महापुरुष हे जीवनदायी मेघाप्रमाणे असतात.  त्यातील एक महापुरुष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. आपल्या अल्पायुषी जीवनात अहिल्यादेवींनी धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कामे केली. 'जलव्यवस्थापन' हा एक त्यांच्या कामाचा बिंदू होता. या कार्याकडे इतिहासकारांनी दुर्लक्षच केले आहे, असो. काळाच्या ओघात त्यांनी निर्माण केलेल्या विहिरी, तलाव, कुंड आणि घाटाचे अस्तित्व टिकून आहे आणि स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. असे म्हटले जाते की, अहिल्यादेवी जर इंग्लड किंवा अमेरिकेत जन्माला आल्या असत्या तर त्या जागतिक किर्तीच्या पहिल्या जलव्यवस्थापक ठरल्या असत्या, जलव्यवस्थापनाच्या मुख्य सूत्रधार बनल्या असत्या, त्या  राष्ट्रांच्या मूर्तिमंत उदाहरण ठरल्या असत्या, असो, भारतातील प्रत्येक जण अहिल्यादेवींच्या सत्यस्वप्नांचा, ध्येयाची पूजा करेलच असे नाही. कदाचित त्यांच्या कामाचा विसरही पडला असेल.गेल्या पाच सहा वर्षांपासून जलसंधारणाच्या कामाला वेग वाढला आहे. सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत पण जलव्यवस्थापनाच्या कामात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नंदादीप आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाही. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य फार मोठे आहे.  त्यांनी केवळ ३० वर्षे कारभार केला. पंढरपूरपासून ते काशीपर्यंत, उज्जैनपासून परळी-वैजनाथपर्यंत, महेश्वरपासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत, अयोध्या पासून ते नाशिक पर्यंत त्यांनी सामान्य जनतेच्या सोयीसाठी बारव (विहीर),तलाव, कुंड,घाट,धर्मशाळा, देवालयाची निर्मिती केली. भगवान शंकरावर त्यांची जशी अफाट श्रध्दा होती तशीच श्रध्दा प्रजेवर होती. 'जल' या क्षेत्रात त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. 'पाणी' हे लोकांसाठी, जनतेसाठी आहे, याची जाणी त्यांनी निरंतरपणे ठेवली. केवळ भाविकांसाठी पाण्यावर हक्क नाही,तर या पाण्याचा उपभोग घेणाऱ्या समाजातील प्रत्येक नागरिकांचा आहे, आहिरे-नाहिरे वर्ग सुद्धा आपली तहान भागवू शकतात, इतका उदात्त हेतू या निर्मिती मागील होता. अहिल्याबाईंच्या निधनानंतर भयाण दुष्काळात अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या बारव आणि तलावातून जनतेची तहान भागली,अशा नोंदी सापडतात. बारव, कुंड, तलाव आणि घाट यातील पाण्यावर जसा भाविकांचा हक्क आहे तसाच सामान्य जनतेला आपली तहान भागवता येत असे. हे पाणी सर्वांसाठी होते, आहिरे-नाहिरे सुध्दा पाणी वापरत,शेतकरी शेतीसाठी पाणी वापरत. 

अहिल्यादेवींचे गुणगौरव करताना थोर विचारवंत आचार्य विनोबा भावे म्हणतात, "आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे त्या त्या भूप्रदेशातील लोकांकडून आम्ही अहिल्याबाईंची स्तुती ऐकली, शस्त्रबलाने दुनियेला जिंकणारे अनेक राजे, महाराज होऊन गेले पण प्रेमाने आणि धर्मशक्तीने भारतातील सर्व प्रांताना जिंकणार्‍या अहिल्यादेवी ह्या एकमेव महाराणी होत्या."


                         तलाव

अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर बारव,कुंड,तलाव, घाट यांची निर्मिती केली.  या विषयाकडे धार्मिक अंगाने न पाहता जलव्यवस्थापनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहणे आवश्यक आहे. 'तलाव निर्मिती' हा त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अद्भभुत नमुना होता. हा नुमना आपणास विविध ठिकाणी पहायला मिळतो. अहिल्यादेवींनी त्र्यंबकेश्वर येथे भाविक व स्थानिक नागरिकांसाठी तलाव बाधंला आहे. हा तलाव मोती तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण तलाव दगडी आहे. चांदवड हे होळकरांच्या जाहगिरीचे मुख्य ठिकाण. या गावात तलाव बांधला आहे. या तलावाची लांबी ४७०००मीटर व रूंदी २८६ आहे. दुष्काळात या तलावाचा फायदा झाला होता. स्थानिक नागरिक आजही तलावाचा पाण्यासाठी वापर करतात. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे तलाव बांधला आहे. तलावाच्या चारी बाजूने दगडी बांधकाम आहे. हा तलाव जामघाट नावाने ओळखला जातो. सध्या हा तलाव अहिल्यादेवी होळकर नावाने ओळखला जातो.



 अहिल्यादेवी होळकर यांच्या स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे जेजुरी येथील तलाव. या तलावास 'मल्हार-गौतमेश्वर तलाव'नावाने ओळखले जाते .१७७० साली अहिल्यादेवींनी या तलावाची निर्मिती केली. १८ एकर मध्ये पसरलेला हा तलाव आजही मजबूत स्थितीत आहे.

 या तलावात उतरण्यासाठी पाच ठिकाणी पायऱ्या आहेत. आज या तलावातील पाण्याचा शेतीसाठी वापरला जातो. तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला दोन चौकोनी आकारच्या बारव आहेत. या बारवातील पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो. परळी वैजनाथ येथे तलावाची निर्मिती केली आहे. हा तलाव आजही सुस्थितीत आहे.

                           बारव

भारतीय जलसंस्कृतीचा अभिमान वाटावा, असा हजारो वर्षाचा बारव इतिहास आणि वारसा आहे. बारव म्हणजे आजच्या परिभाषेत विहीर. अहिल्यादेवी होळकर यांनी बारवांचे महत्त्व ओळखून काही बारवांचे पुनरुज्जीवन केले. अहिल्यादेवींनी शास्त्रशुद्ध पद्धतीने बारवा बांधल्या आहेत. धार्मिक व लोकोपयोगासाठी लोकोपयोगी विहीर बांधल्या आहेत. वाफगाव (जि.पुणे )गावात दोन विहीरी बांधल्या आहेत. एक विहीर होळकर वाडयात आहे. या विहीरीला ७० पायऱ्या असून आजही स्थानिक नागरिक पाण्यासाठी वापर करतात. दुसरी विहीर विष्णू मंदिराच्या पाठिमागे बांधली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर ठिकाणी एक रेखीव दगडाची विहीर बांधली आहे. या विहीरीत उतरण्यासाठी ५५ पायऱ्या बांधल्या आहेत. विहीरीत एक गोमुख तीर्थ आहे. त्यातून सतत पाणी पडत असते. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे एक सुंदर विहीर बांधली आहे.या विहीरीला १५० पायऱ्या आहेत व १३ अप्रितम कमानी आहेत. नाशिक जिल्हयातील सकरगाव, नगर जिल्हयातील कसबे ओझर, जामनेर तालुक्यातील पाळधी, जेजुरी, उज्जैन, भीमाशंकर, वेरूळ येथे विहीरी बांधल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा  येथे भव्य बारव बांधली. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राणी अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी निर्माण केलेली विहिर आहे. ही विहीर नातेपुते-शिंगणापूर मार्गावर स्थित आहे. सातारा जिल्ह्यातील गुरसाळे गावात रामलिंग बारवची निर्मिती होळकरांनी केली. स्थापत्य शैलीचा अद्भभूत नमुना या बारवेत आहे.  जालना, वेरुळ, अंबाजोगाई याठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी विहिरीची निर्मिती केली.
चांदवड येथील रंगमहाल - होळकर वाड्यातील विहिरीतून १९७२च्या दुष्काळात ८०खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता,अशी माहिती मिळते.

 आपल्या देशात बारव बांधकामाची परंपरा अहिल्यादेवी होळकर यांच्यापर्यंत टिकून राहिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी काशीमार्गावर पांथस्थ अन्‌ प्राण्यांसाठी बारवांची निर्मिती केली. ही निर्मिती धार्मिक आहे तशीच सामाजिक देखील आहे. काळाच्या ओघात काही बारवांचे अस्तित्व नष्ट होत आहे. अनेक बारवांचे बांधकाम ढासळले आहे. चिरेबंदी भिंतीत झाडे-झुडुपे फुटल्याने निखळत चालल्या आहेत. त्यातील पाणी वापरले जात नसून दुर्गंधीचे अन्‌ रोगराईचे स्रोत बनलेत. नागरिक कचरा टाकत आहेत. अशा बारवांचे वैभव जतन आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

                           घाट व कुंड

अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापन कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविध तीर्थक्षेत्र ठिकाणी पाणी अडवून केलेली घाट निर्मिती केली. महेश्वर राजधानीच्या ठिकाणी अहिल्यादेवींनी नर्मदा नदीच्या काठावर २८ घाट बांधले आहेत. पेशवा हा घाट आकाराने सर्वात मोठा आहे. त्याची लांबी १२१ फूट व रूंदी १५० फूट  आहे. पूर्वेला नर्मदानदीचा प्रवाह असून त्याला अडवण्याचे काम या घाटाने केले आहे. या घाटावर जायला एक मोठे महाद्वार व प्रवेशद्वार आहे.
उज्जैन येथील क्षिप्रा नदीच्या काठावर तर बऱ्हाणपूर येथील तापी नदीवर, ब्रहमक्षेत्र पुष्कर , दक्षिणेतील गया येथे आकर्षक व सुंदर घाट निर्मिती अहिल्यादेवींनी केले. त्यास गयातीर्थ नाव आहे. अयोध्या येथे शरयू नावाचा घाट बांधला.मथुरा येथील चीरहरण घाट व कालीदेह घाट बंधला. हरिद्वार येथे कुशवार्त घाट, प्रयाग येथील फाल्गुन घाट, कुरूक्षेत्र येथे एक घाट बांधला. चौंडी येथील सीना नदीवर सुंदर घाट निर्मिती केली आहे. काळया दगडाचा हा घाट ६८ फूट लांब ३८ फूट रूंद आहे. पैठण येथे गोदावरी नदीवर सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेल्या नागघाटाची अहिल्यादेवींनी पुनर्बांधणी केली.वर्तमान घाट बांधला आहे. नागपंचमीला या घाटावर यात्रा भरते.  बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर एक घाट आहे. या घाटाचे जीर्णोद्वार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. असा उल्लेख सापडतो. नाशिक येथील घाट, पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या काठावर घाट बांधला आहे. या घाटास २८ पायऱ्या आहेत. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवर घाट बांधला आहे. काशी येथील गंगा नदीवर मनकर्णिका व दशाश्वमेध घाट बांधला आहे. या ठिकाणी विहीरी बांधल्या आहेत. 

काशी व पुणतांबा येथील घाट स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. या सर्व घाटाच्या ठिकाणी धार्मिक विधी होत असतात शिवाय पुरापासून गावांचे संरक्षण होत असे. उन्हाळयात या घाटात पाणी मिळत असल्याचे पुरावे सापडतात. अहिल्यादेवींनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाण्याचे कुंड निर्मिती केली. रावेर येथील केशव कुंड, घृष्णेश्वर येथील वेरूळ कुंड, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ येथील हरिहर कुंड, सप्तशृंगी येथील शिवकुंड, जळगाव जिल्हयातील म्हसवे येथील कुंड अशा अनेक कुंडाची निर्मिती देखील अहिल्यादेवींनी केली आहे. 

अहिल्यादेवींचे शेती व जलव्यवस्थापनाचे मूलतत्वे

१) अहिल्यादेवींनी आपल्या जलकार्याचा फायदा शेतीसाठी करून घेतला.  बंधारे बांधून अडविलेले पाणी कालव्याद्वारे सिंचनासाठी वळविले गेले. सिंचनाखालील क्षेत्राचे चार भाग करून प्रत्येक भागाच फड तयार केला. एका फडामध्ये अनेक लाभधारक शेतकरी असत.एका फडामध्ये मात्र एकच प्रकारचे पीक घेतले जात असे. पहिल्या फडामध्ये बारमाही दुसऱ्या फडामध्ये दुहंगामी आणि तिसऱ्या फडामध्ये हंगामी तर चौथ्या फडामध्ये पाणी उपलब्ध असेल तर पीक घेतले जाई. अशी सिंचन व्यवस्थापनातील  आदर्श फड पद्धत होळकर यांच्या कारकिर्दीत सुरू झाली.

२) शेतकर्‍यांना प्राधान्य लक्षात घेऊन बि-बियाणे वाटप करणे, दुष्काळ पडला असेल तर शेतसारा माफ करणे. 

३) पावसाचे पाणी जास्तीत जास्त शिवारात अडवणे.

४) लहानपक्षी व चिमण्यांकरिता दरवर्षी पिकलेले शेत राखीव ठेवत. 

५) प्रत्येक शेतकर्‍याने किमान २०झाडे लावली पाहिजेत. (चिंच,औदुंबर,पिंपळ आदी देशी झाडांचा समावेश होता.)  डोंगराळ भागात भिल्ल, रामोशी यांच्यामार्फत ही झाडे लावण्यात येत असत.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जलव्यवस्थापन कार्याचे मूल्यमापन करताना डॉ. रा.श्री. मोरवंचीकर एके ठिकाणी म्हणतात,-
"जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतामध्ये जे कार्य केले तशा तोडीचे कार्य अन्य कोणत्याही एका व्यक्तीने, इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात यापूर्वी व यानंतर केल्याच्या नोंदी सापडत नाहीत. जनकल्याण, धर्मपरायणता व स्त्रियाविषयी वाटणारी अनुकंपा यामधून देवीनी भारतभर अनेक दुर्गम ठिकाणी नद्यांना घाट बांधले,पूरनियंत्रण, भूस्खलन प्रतिबंध आणि पाणवठ्याची सोय व या भूमिकेतून अहिल्यादेवींनी शेकडो घाट बांधले, ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची दुरुस्ती करून त्या ठिकाणी बुडाची बारव निर्मिती केली. वेरूळच्या घृष्णेश्वराजवळ उभारलेली बारव आणि घृष्णेश्वराचे मंदिर या कालखंडातील स्थापत्य व त्यांचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. वेरूळ येथील अहिल्यादेवींनी उभारलेल्या बारवेची गणना भारतातील उत्तम बारव स्थापत्यात केली जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिगत संपत्तीमधून,तसेच लोकांना आवाहन करून मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग घेऊन ही निर्मिती केली होती. आजही त्यांनी उभारलेल्या जलव्यवस्थापन पध्दतीपैंकी ९० टक्के उपयोगात आहेत."
 
भविष्याचा वेध

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरी आपण जलव्यवस्थापनात आपले काम अपुरी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या अवघ्या ३०वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण भारतभर जलव्यवस्थापनाचे महान कार्य केले. त्यांच्या राजवटीत नंतर देशात असा राजा होऊन गेला नाही.  आपल्या राज्याचे पाण्याचे नियोजन चुकीच्या मापदंडावर किंवा चुकीच्या तथ्यांवर, गृहितकांवर आणि ठोकताळ्यांवर केले गेल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनंतरही पाण्याच्या प्रश्‍नाने आपली पाठ सोडली नाही. हे वास्तव आहे.

आज पृथ्वीवर पाण्याचा साठा मर्यादित आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार २०२५ सालापर्यंत जगातील निम्या लोकसंख्येला प्यायला पाणी मिळणार नाही, त्यासाठी प्रत्येकाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

१)शासनाने नव्या जलस्रोतांचा शोध घेण्याबरोबरच होळकरकालीन जलस्त्रोतांचा उपयोग करून घेणे. 

२) होळकरकालीन तलाव, विहिर, कुंड, घाटातील गाळ काढणे, त्यासाठी लोकसहभागाचा वापर करून घेणे.


अहिल्यादेवी होळकरानंतर विश्वेश्वरय्या, छत्रपती शाहू महाराज, जमशेटजी टाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माधवराव चितळे, पोपटराव पवार सारख्या पाणीदार माणसांनी जलव्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा उचलला तसाच वाटा प्रत्येक भारतीय नागरिकांनी उचलला पाहिजे.

-© विकास पांढरे-९९७०४५२७६७


मंगळवार, १० जुलै, २०१८

पुणतांब्याच्या पाऊलखुणा...!


एक गाव मनात घर करून राहिले आहे. ते मनातून जाता जात नाही. तिथला निसर्ग, तिथले ऐतहासिक,धार्मिक वैभव पाहताना सुखद अनभुव येतो. काही दिवसांपासून या गावाविषयी लिहावे असे  मनात घोळत होते,पण की-बोर्डवर उतरत नव्हते, या गावाला आपण विसरून तर गेलो नाही ना? असा भास झाला. आज पुन्हा त्या गावाची आठवण आली आणि लिहायला बसलो. आजच्या 'ग्लोबल' युगातले हे गाव काळाच्या ओघात आपल्या पाऊलखुणा जपत आहे. होय, मी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा ( ता.कोपरगाव जि.नगर) या गावाविषयी बोलतोय!

सा.'विवेक'च्या कामानिमित्त जानेवारी (सन २०१८)महिन्यात नगर जिल्ह्यात प्रवास करता आला. या प्रवासात 'पुणतांबा' या गावात जाणे झाले. अलीकडच्या काळात शेतकरी आंदोलनामुळे हे गाव प्रसिध्द पावले. माध्यमांतून या गावातल्या शेतकरी संपाविषयी, आंदोलनाविषयी बातम्या वाचायला मिळत होत्या. या गावात जाता येईल, असे वाटले नव्हते. जेव्हा या गावात उतरलो तेव्हा इथला शेतकरी कसा असेल? पीक-पाणी कसे असेल याविषयी मनात प्रश्न उभे राहिले. पण आंदोलनाविषयी कोणी बोलत नव्हते.

शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. रेल्वे मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाची उत्तम सोय आहे. गावाच्या अंतरंगात शिरू लागलो. तेव्हा पडझड झालेल्या तटबंदी दिसू लागल्या. संपूर्ण पुणतांबा गावाला तटबंदी आहे. ठिकठिकाणी वेशी दिसू लागल्या. या तटबंदी,वेशी आपल्या जुन्या आठवणी सांगत होत्या. अकरा वेशीने बनलेले हे गाव असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. माझ्या नजरतले असे हे पहिलेच गाव. गोदातरी वसलेल्या या गावाची कहाणी मला अधिक भावत गेली. मनात घर करत राहिली. बालकवींनी शब्दबध्द केलेल्या 'औदुंबर' कवितेची आठवण झाली. हिरवेगार शेतमळे, नागमोडी वळणे घेत घाट, मंदिराकडे जाणारी गोदामाईची पायवाट पाहताना मनात चैतन्य खळाखळते.  काळाश्या डोहात पाय ठेवताना मन पवित्र होते. गोदामाईचे पाणी गोड आहे. या गोडव्यामुळे या गावाला वैभव प्राप्त झाले असावे.
गोदातीर
 प्रतिष्ठित नागरिक सुभाष वहाडणे यांनी पुणतांब्याची सफर घडवली. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आणि गोदातीरावर हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे या गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी राजा विक्रमादित्य यांची राजधानीचे हे गाव होते. अशी मौखिक माहिती मिळते. चांगदेव महाराजांची समाधी मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, मामा-भाच्याचे मंदिर, खंडोबा मंदिर,कालभैरव मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, संत गंगागीर महाराज मंदिर असे गावात जवळपास ४००पेक्षा जास्त पुरातन मंदिरे आहेत. संत साईबाबा व संत जनार्दन स्वामी यांचे काही वर्षे पुणतांब्यात वास्तव होते. पेशवाईच्या काळात या गावाला वैभव प्राप्त झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट व मंदिराची उभारणी करून गावाला धार्मिक वैभव प्राप्त करून दिले. आजही हे घाट व मंदिर सुस्थितीत आहे.

गावात आलुतेदार-बलुतेदार पूर्वीपासून गुण्यागोंविदाने राहतात. धनगरवाडा, कुंभारवाडा, बामणवाडा अशा वेगवेगळया आळया आढळतात. काळाच्या ओघात जीवनपध्दती बदलत गेल्यामुळे आळया ( गल्ली) हा प्रकार राहिला नाही. पुणतांबेकर, वहाडणे, शेंडगे, चितळकर, मुळे, रोकडे, कुलकर्णी अशा विविध आडनावाचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या २० हजारपेक्षा जास्त असली तरी शहराचे रूप गावाने पाघरले नाही. सका-सकाळी शेताकडे गुरे-ढोरे घेऊन जाणारे पशुपालक- शेतकरी नजरेस पडतात. गावात राष्ट्रीय व शेडयूल बँका आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्याची शाळा आहे. व्यापारी संकुल देखील आहे. सायंकाळी गावात भाजीपाल्याचा बाजार भरतो. भाजी विकण्यासाठी आसपासच्या गावातील शेतकरी पुणतांब्यात येतात.

पुणतांबा व्यापारी संकुल


पुणतांबा - भाजीपाला बाजार

मी पहिल्यांदा श्री.खड्गधारी खंडेराय मंदिरात गेलो. झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' मलिकेत या मंदिराचा उल्लेख आला होता. त्यामुळे या मंदिराविषयी उत्सुकता होती. मंदिर छोटेच आहे.

कृत युगात पुरातन काळी मनी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी ऋषी मुनींचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनिचल पर्वतावर मोठे युध्द केले त्या युध्दात मनी दैत्य शरण आले आणि मल्ल दैत्याचा वध झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या अवतरला मल्हारी मार्तंड असे नाव मिळाले. ती विजय तलावर (खड्ग) देवाने भक्तांसाठी पुणतांबा गावास भेट दिली आहे. त्यात त्यांचा अंश आहे. अशी अख्यायिका असल्याची माहिती पुजारी शेंडगे यांनी दिली.
खंडोबा मंदिरातील विजयी तलवार समवेत मी आणि सुभाष वहाडणे
गोदावरी नदीत मल्हारी मार्तंड अंघोळीसाठी गेले असता तिथे ही विजयी तलवार त्यांनी पाण्यात फिरवली. आज त्या ठिकाणी चौकानी आकाराचा खड्डा पडला आहे. खरेच, अशा प्रकारचा खड्डा गोदावरी नदीत पहायला मिळतो. मी जेव्हा विजयी तलवार हातात घेतलो ती खूपच जड होती. दोन्ही हाताने उचलावी लागली. तलावर उंची ७ ते ८ फूट असावी.

गोदातीराच्या बाजूला अंबाबाईचे पुरातन मंदिर आहे. एखाद्या राजवाडयासारखे दिसणारे हे मंदिर पर्यटकांना मोहित करते. मंदिराची इनामी शेती आहे. शेतीत विविध पीके घेतली जातात. मंदिराच्या जीर्णोद्वाराची माहिती एका शिलालेखाद्वारे मिळते. मंदिराची आतील बाजू तितकीची चांगली दिसत नसली तरी बाहेरून हे मंदिर बघण्याजोगे आहे.
देवी मंदिर
मंदिराच्या इनामी जमीनीत बहरलेले गव्हाचे पीक

नदीच्या तीरावर कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. अहिल्यादेेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला. घडीव व कोरीव दगडाचे हे मंदिर आहे.मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही, त्याचे काही धार्मिक कारणे आहेत पण त्रिपुरारी र्पोर्णिमा व कृतिका नक्षत्रांत महिलांना देवाचे दर्शन घडते.  मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला नवग्रह मंदिराचे दर्शन घडते. काशीविश्वेश्वरांचे मंदिर ही सुस्थितीत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भलीमोठी पिंड आहे. नदीपात्रातील या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविक गर्दी करत असतात. दूरवरून ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलेला  दगडी पुल दिसतो. आजही हा पुल भक्कम स्थितीत आहे.
कार्तिक स्वामी मंदिर


काशी विश्वेश्वर मंदिर
पुरातन पिंड

ब्रिटिश कालीन रेल्वे पुल

पुणतांबा गावातच महायोगी चांगदेव महाराजांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज या गावातून गेले होते असे असल्याचे सांगण्यात आले. चांगदेवानी ज्यांना गुरू केले त्या संत मुक्ताबाईचे मंदिर इथेच आहे. या गावात मामा- भाच्याचे एक मंदिर आहे. मामा-भाचे या दोघांच्या प्रेमाची कहाणी इथे सांगितले जाते. देशात मामा-भाचे एक मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही.आगळेवगळे मंदिर असावे. सध्या या मंदिराची दुरावस्था झाली आहे. मंदिरातील मूर्त्या अडगळीला पडल्या आहेत. नंदीबैलाच्या मूर्तीची नासधूस झाली आहे. मंदिराची देखभाल करायला कोणी नाही.
चांगदेव मंदिर
समाधी दर्शन
मामा-भाचे मंदिर

अडगळीत पडलेली मूर्ती

मूर्तीची दुरावस्था

गावाची आध्यात्मिक परंपरा लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदातीरी घाट बांधला आहे. हा घाट आजही उत्तम स्थितीत असून घाटावर उभारून गोदातीराचे विलोभनीय दर्शन घडते. घाटावर अनेक धार्मिक होतात. गावातच होळकरांचा मोठा वाडा आहे. आज या वाडयाची मोठी पडझड झाली आहे. होळकरांच्या वंशजांनी हा वाडा दुसऱ्या एका व्यक्तीला विकला असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले.

होळकर वाड्याची दुरावस्था


घाट

या गावाचे आणखीन वैशिष्टय म्हणजे दिवंगत संगीतकार सी.रामचंद्र, स्व.माजी खा.सूर्यभान वहाडणे, स्व.जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावातीलच होती. संगीतकार सी.रामचंद्र यांचे बालपण या गावतच झाले. ते ज्या वाडयात राहत होते. तो वाडा आजही सुस्थितीत आहे. आज या वाडयात त्यांचे पुतणे राहतात. माजी खा.सूर्यभान वहाडणे यांनी आपले कुलदैवत खंडेरायाचे मंदिर स्वतःच्या जागेत स्थापन केले आहे.

संगीतकार सी.रामचंद्र यांचा वाडा

सी.रामचंद्र यांच्या पुतण्यासमवेत


वहाडणे कुटुंबियांचे खंडोबा मंदिर

पुणतांबा गावाला जे वैभव प्राप्त झाले आहे. त्या वैभवाचे जतन व संवर्धन करणे आपली व सरकारची जबाबदारी आहे. पुणतांबा गावाचा विकास होण्यासाठी सरकारने हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आणले  पाहिजे. कारण इथला सर्व भाग हा पर्यटनाने व्यापला आहे. पुणतांब्याचे हे वैभव पर्यटकांना आकर्षित करील, हे मात्र नक्की.

-विकास पांढरे,९९७०४५२७६७

सोमवार, २१ मे, २०१८

स्मरण एका महानायकाचे..!



तारुण्यात उत्साह आणि जोश असतो. याकाळात जीवनाची टेकडी चढताना समोर मृत्यू दिसत नसतो. तो पलीकडच्या बाजूला पायथ्याशी असतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाबतीत असेच घडले. राजीवजीच्या मृत्यूला २५ वर्षे उलटली तरी त्याचे कार्य आजही उपयोगी पडते आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृती दिन.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची पैलू उलगडून दाखवणारा हा लेख.

स्वातंञ्योत्तर भारतीय राजकारणातील चाणाक्ष नेते, विज्ञानाचे पुरस्कर्ते, परराष्ट्र धोरणाचे अचूक ज्ञान, जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लाभलेल्या राजीव गांधी यांना आपल्या देशातील सर्वाधिक तरूण पंतप्रधान म्हणून पंतप्रधान होण्याचा मान मिळविला. जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हा ते चाळीस वर्षाचे होते. त्यांची हत्या झाली तेव्हा ते ४६ वर्षाचे होते. इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी विविध कार्य करून देशाला नवी दिशा आणि आशा प्राप्त करून दिली. त्यामुळेच ते अजब रसायन ठरतात. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी आयुष्यात जे मिळवले ते आठवण्याचा दिवस. राजीवजी भूतकाळात रमणारे पंतप्रधान नव्हते. भविष्याकडे आशेने पाहत बसणारे ते एक चिरतरुण पंतप्रधान होते. राजीवजी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा देशाची सद्यस्थिती व वर्तमानकाळ केविलवाणा होता. 

 १९८७-८८ च्या काळामध्ये देशांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी 'भारतीय माकडाच्या लष्कराला हाकलून लावा' हा "पीपल्स लिबरेशन फ्रण्ट"चा लोकप्रिय नारा होता. सिंहल लोक भारताकडे वाकड्या नजरेने पहात होते. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे संपूर्ण पंजाब आगीत भडकून निघाले होते. भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी धर्मत्याग करून दहशतवाद स्वीकारला होता. अशा परिस्थितीत राजीव गांधी यांनी चाणाक्षपणाने पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख नेते संत हरचंद सिंग लाँगवाले यांच्या सहमतीने उग्रवाद्यांसोबत सामंजस्य करार केला. परंतु, संत लाँगवाले यांच्या हत्येमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. पण राजीवजी शीख नेत्यांचे समर्थन जिंकण्याचा प्रयत्नात होते. अशा अंदाधुंदीच्या काळात राजीव गांधी यांना २१ व्या शतकाचा सुवर्णकाळ स्वस्थ बसू देत नव्हता. या तरूण पंतप्रधानाने आपले लक्ष नवनिर्मितीकडे वळवले. त्या प्रकाशात व आशेवर ते जगत होते.

ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सॅम पिञोदा एका लेखात म्हणतात." राजीव गांधी यांच्याकडे दूरदृष्टी होतीच. परंतु त्याशिवाय त्यांचाकडे उत्कृष्टता देखील होती. त्यांना राजकारणाविषयी आत्मविश्वास होता. भारताला २१ व्या शतकात नेण्याची दूरदृष्टी आणि आपल्या देशातील गरज आणि आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत त्यांना खूप चांगली समज होती. जेव्हा कोणीही या गोष्टीचा विचार देखील करत नव्हता. भारतासारख्या विकसनशील देशात तंञज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावेल, हे त्यांच्या लक्षात आले. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान प्रमुख भूमिका बजावेल याबाबत ते आश्वस्त झाले होते. दूरसंचार ही विकासाची किल्ली ठरणार हे त्यांना समजले होते. कॉम्प्युटर उपयोगासाठी मुख्य प्रवाहात त्यांनीच आणले. सरकारच्या व्यवस्थापन पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून देखील त्यांनीच आणले. नवीन उपकरणांच्या मदतीने ते बैठका घेऊ लागले. संपूर्ण व्यवस्थापनामध्ये त्यांनी बदल घडवून आणलेल्या परिवर्तनामध्ये आधुनिक विचार आणि नवीन गोष्टी होत्या." यावरून राजीवजीच्या दूरदृष्टीची कल्पना लक्षात येते. एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला.

एक नमूद करण्यासारखे योगदान म्हणजे त्यांनी वैश्विक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी योजना तयार केली होती. 'राजनैतिक' बाबतीत बोलायचे झाले तर राजीव गांधी यांनी यांची १९८८ सालची चीनची भेट महत्त्वाची ठरली. दौर्‍यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध चिघळलेले होते. अशा परिस्थितीत राजीवजींना स्वस्थ बसू वाटत नव्हते. बीजिंगमध्ये राजीव गांधी यांनी देंग झायोपिंग यांची भेट घेतली. यावेळी जोरदार वाटाघाटी आणि चर्चा केल्यामुळे संघर्ष आटोक्यात आला. त्यातून देशाला नव्या संधी उपलब्ध झाल्या. राजीव गांधी यांनी हा वाटाघाटीचा मार्ग तयार केल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीन भेट यशस्वी होऊ शकली. एवढेच नव्हे तर राजीव गांधी यांची सार्क परिषदेवर विशेष छाप होती.  कठीण प्रसंगात आणि प्रश्नांमध्ये सहभागी होण्याची आणि ते हाताळण्याची त्यांची  तयारी असायची. वंशिक प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेचे जे.आर.जयवर्धने यांच्याशी बोलणी केली होती. पण फारसे यश मिळाले नाही. 
राजीव गांधी यांच्या काळात भारतात दूरदर्शन संच घराघरात पोहोचला. त्यांनी दूरदर्शन आणि माहिती व प्रसारण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन पारंपरिक दर्शन घडवले आणि समाजातील चांगल्या मूल्यांचे कार्यक्रम तयार करण्याची सूचना दिल्यामुळे 'रामायण आणि महाभारत' सारख्या लोकप्रिय मालिकाची निर्मिती होऊ शकली. 

देशात उच्चस्तरीय आणि आधुनिक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी १९८६ साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचे जीवन उंचावण्यासाठी आणि त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारची संस्था असलेली जवाहर नवोदय विद्यालय पध्दत त्यांनी सुरू केली. देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञ डॉ. मधु दडवंते यांचे मार्गदर्शन घेत. विकासासाठी येणाऱ्या एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे खर्च केले जातात हा अंदाज व्यक्त केला होता. आज भारतात जो तांत्रिक विकास झाला तो राजीवजींनी केलेल्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे.

राजीवजीच्या काळात एका स्विडीश कंपनी कडून बोफोर्स बंदूक खरेदीसाठी देण्यात आलेल्या कंञाटामुळे राजकीय सत्तेला धक्का बसला होता. जनतेच्या मनात चूकीची भावना झाली होती. त्यातच राष्ट्रपती गियानी सिंग यांच्याशी वाद घातल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शाहबानो प्रकरणात पारंपरिक मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हिंदुत्व असलेली जनता भडकली आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांनी राम मंदिराचा मुख्य गाभारा खुला करून रामलल्लाचे दर्शन घडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजीवींजीना जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दक्षिणेकडे गेले असताना एका महिला (एलटीटीईने )आत्मघातकी बाॅम्बरने राजीवजींचा जीव घेतला. भारताला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणाऱ्या महानायकाचा शेवट असा झाला असला तरी त्यांनी देशाला नवा राजमार्ग तयार करून दिला. याच मार्गावरून भारताचा प्रवास सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरात ' विरोधी दहशतवाद दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवजात विरूद्ध असणाऱ्या प्रत्येक प्रवृत्ती विरूद्ध सर्वांनी पुढे येऊन उभे राहिले पाहिजे. हाच या दिनाचा संदेश होय.
©विकास पांढरे,९९७०४५२७
( सदर लेख दैनिक सुराज्य,सोलापूर मध्ये २१ मे २०१५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...