शनिवार, ३ मार्च, २०१८

धनगराचे पारंपरिक विज्ञान





गोष्ट तशी जुनी आणि मौखिक आहे. महाबळेश्वरच्या थंडीच गुपितं उलघडण्यासाठी काही इंग्रज अधिकारी या भागात आले होते. तापमानाच्या नोंदी घेऊन अधिकारी त्या घनदाट जंगलात वेधशाळा कुठे स्थापित करायची यासाठी चाचपणी करत होते.

या जंगलात एक धनगर आपल्या मेंढ्या चारत होता. काही क्षणात पाऊस पडणार म्हणून तो धनगर आपल्या मेंढ्या घेऊन घराकडे निघाला. इंग्रजाने त्या धनगराला हटकले. "अरे, एवढ्या लवकर मेंढ्या घेऊन घराकडे का निघतोय?"यावर त्या धनगराने दिलेले उत्तर आजही चक्रावून टाकणारे आहे.

धनगर म्हणतो-"साहेब, घराकडे चला,आता जोराचा पाऊस पडणार आहे"

"तुला,कसं माहीत आता पाऊस पडणार? असं त्या इंग्रजांने धनगराला विचारले.

धनगर म्हणाल्या, "साहेब, माझी मेंढरं जमिनीच्या वासावरून, भवताल लक्षात घेतात आणि त्या नंतर मेंढरं एक होऊन गोळा होतात. मेंढरांना पावसाची चाहूल लक्षात येते. एवढचं काय? सगळ्या जित्रांबाना येणारं संकट लगेच कळतं.." काही वेळातच धो धो पाऊस सुरूवात होतो..

धनगराचे हे पारंपरिक ज्ञान पाहून ते इंग्रज हवामान तज्ज्ञ आवाक झाले. पुढे सर माल्कम यांनी महाबळेश्वरात हवामान खात्याची वेधशाळेची उभारणी केली. येथूनच आज आपल्याला भारतीय हवामानाची माहिती मिळते.

आज सर्व आठवण्याचे कारण की, आज जागतिक विज्ञान दिवस. विज्ञानामुळे आमची भौतिक प्रगती झाली; पण आमचे पारंपरिक ज्ञान नष्ठ झाले.

चातक पक्ष्याने संकेत दिला की पावसाला सुरुवात होणार हे आमच्या शेतकऱ्याच्या लक्षात येते. पूर्वी बि-बियाणे भोपळ्यात ठेवण्याची पध्दत होती. कारण भोपळ्याला कधीच कीड लागत नाही. आज भोपळ्याचा गुणधर्म लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवाय पारंपरिक ज्ञानसंकलन करून विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे.


© विकास पांढरे,९९७०४५२७६७

फोटो साभार - अंतरजाल

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

छत्रपती शिवाजी महाराज आणि कृषी धोरण



'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांचे आहे, महाराजांचे शेती, माती आणि माणसांविषयीचे विचार  आज्ञापत्र, बखरीमधून दर्शन होते.  स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आज ह्या महापुरूषाची जयंती संबंध मराठी मुलुखात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कृषी धोरणाचे घेतलेले दर्शन.

महापुरुषांचे विचार इतिहासाला पाठबळ देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचे दृष्टेपण वर्तमानात अंगीकारावी लागतात.साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजकीय, मुलकी,न्याय, आरमार, लष्कर, वतन आदी धारणाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण आजही वर्तमान आणि भविष्यकाळाला प्रेरक आहे.


महाराजांना जिंजीपासून ते सालेरी पर्यंत राज्य निर्माण करण्यासाठी मोगलांपासून ते स्वकीया पर्यंत संघर्ष करावा लागला. या महापुरुषांची इतकी चिकाटी होती की, स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेकांना पुरुन उरले,असो. खरेतर, महाराज ज्या काळात जन्माला आले,तो काळ राजकीय संघर्षाचा काळ समजला जातो. जसेजसे मोठे होऊ लागले, तसतशा त्यांच्या जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. एका मोठ्या सरदारांचा मुलगा कुणब्याच्या मुलांबरोबर खेळतोय, बागडतोय, शेती समजून घेतोय, गुरेढोरे राखतोय, गावगाड्यातील  अर्थशास्त्र समजून घेतोय हीच गोष्ट प्रजेसाठी आपुलकीची गोष्ट होती. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी आशा छोट्या छोट्या गोष्टींमधून रयतेची पायाभरणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. महाराज जमतेम ५० वर्षे जगले. त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रात विपुल असे प्रेरणादायी कार्य केले आहे. भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो. सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात. त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत. हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती. महाराजांच्या आदेशावर शत्रूवर तुटून पडत होती. महाराजांचेही प्रजेवर अतूट प्रेम होते.


शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. "शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी' हे सूत्र महाराजांना समजले होते. त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता. शिवाजी महाराजांनी कृषी,भूमी,जलसाठे सारख्या बाबींवर गहन विचार केला होता.पावसाचे पाणी आडवावे व वर्षभर पशुपालन आणि शेतीच्या विविध कामांसाठी त्याचा उपयोग करावा,असा त्यांचा आग्रह असे. पुणे शहरातील पर्वतीजवळ आंबील ओढा नावाच्या झऱ्याजवळ आणि कोंढवा येथे त्यांनीच बांध घातला होता,आजही हे बांध पाहणे जोगे आहेत.
कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शिवाजी महाराजांनी पावसाच्या काळात आपल्या मावळ्यांना शेती काम करण्यासाठी मुभा दिली होती.

महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम अभंगात म्हणतात, "मढे झाकूनिया करती पेरणी"  त्या काळात शेतीला किती महत्त्व होते, हे लक्षात येते. रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे, अशी पध्दत होत. आज शेतकऱ्यांनाच स्वतःच मढे होण्याची वेळ आलीय,असो.

 पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत. त्याकाळी नांगरणी, कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार, व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण एके ठिकाणी म्हणतात,

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली. प्रथम सन १६३९ मध्ये दादोजी कोंडदेवाच्या वेळी नतंर १६४९ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्याभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी १६७८ मध्ये स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले. बिघा, पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत. तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले, यालाच ‘पीक पाहणी’ असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे. ब्रिटिश शासनाने या पध्दतीची नक्कल केलेली आहे.

शिवरायांनी प्रत्येक जमिनीचा प्रतवारीनुसार शेतसारा म्हणजे महसूल आकारला जात असे. स्वराज्यात शेतसारा दोन प्रकारे स्वीकारला जात असे. एक नख्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरुपात. बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरुपात स्वीकारला जात असे. शिवाजी महाराजांचे सारा वसूल करणार्‍या अधिकार्‍यास कुलकर्ण्यास म्हणजे आजच्या तलाठ्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश असत. पत्रकाप्रमाणे सारा वसूल करावा. जादा ही नाही आणि कमीही नाही. सरकारी महसूल सरकारी खजिन्यात वेळेत जमा करण्यात यावा. चूक करणार्‍या अधिकार्‍यास तात्काळ शिक्षणा केली जात असे. त्यामुळे सहसा चूक होण्याचा संभवच नसे"
 वरील मतांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतीविषयक धोरण किती कल्याणकारी होते याची जाणीव होते.

छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला ५ सप्टेंबर १६७६ ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात ,"इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे " 
याच पत्रात ते पुढे म्हणतात,
"ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल, नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी "
छत्रपतींच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात. म्हणूनच संत रामदास स्वामी यांना शिवरायांच्या रूपाने 'जाणता राजा' दिसतो तर संत तुकाराम महाराज यांना शेतकऱ्यांचा कल्याण करणारा लोककल्याणकारी राजा नजरेस पडतो. महात्मा फुले यांना कुळवाडी भूषण दिसतो.

प्रा.डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी आज्ञापत्रातील एक आणखी एक दाखला दिला आहे, तो दाखला असा:-

 ‘दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस, अन्यथा उंदिर दिव्यातील पेटती ज्योत पळवतील. कडब्याच्या गंजी पेट घेतील. गुरा-ढोरांना चारा मिळणार नाही. गुरे-ढोरे दूध देणार नाहीत. माझ्या रयतेची बालके दुधापासून वंचित राहतील. माझा भावी महाराष्ट्र दुबळा होईल. तरी दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस’ यावरून शिवरायांची प्रजेबद्दलची काळजी पालकासारखी असल्याचे स्पष्ट होते. 

आपल्या राज्यातली रयत सुखी असेल तरच राजाही सुखी असेल, असा शिवरायांच्या राज्य कारभाराचा दस्तूर होता. कोणत्याही परिस्थितीत लष्कराने किंवा महसुली अधिकार्‍यांनी शेतकर्‍याकडून धान्य, भाजीपाला फुकट घेऊ नये, असे त्यांचे सक्त आदेश होते. चिपळूणच्या सुभेदाराला लिहिलेेल्या पत्रात, त्यांनी लष्कराची छावणी सध्या आपल्या भागात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घोड्यासाठी पुरेशी वैरण जमा करून ठेवावी. ती जपून ठेवावी. अन्यथा वैरणीची टंचाई झाल्यास तुम्ही रयतेकडून ती घ्याल. कुणी धान्य मागेल, कुणी भाजीपाला, कुणी लाकूडफाटा. रयतेलाच तोशिस पडेल. मग रयत म्हणेल, मोगल तो यापेक्षा वेगळे काय होते. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, ती केली नाही, तर मराठ्यांची इज्जत राहणार नाही, अशी जरबही त्यांनी दिली होती. गोव्यातल्या बारदेश भागातून स्वस्त मिठाची आयात सुरू झाल्यामुळे, कोकणातल्या मिठागारावर परिणाम व्हायला लागला. तेव्हा शिवरायांनी गोव्यातल्या मिठावर जबर कर बसवा आणि स्वराज्यापेक्षा ते महाग होईल, असे पहा, असा आदेश देतानाच, मिठाचा मामला लाख मोलाचा, असे लिहिले आहे. 

कोकणपट्टी स्वराज्यात आल्यावर आदिलशहाच्या सनदेनुसार चिंचवडच्या मोरया गोसावी संस्थानाचे लोक कोकणात भाताची स्वस्त खरेदी करण्यासाठी गेेले, तेव्हा स्वराज्याच्या अधिकार्‍यांनी त्यांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीत भाताच्या खरेदीला मनाई केली. हे प्रकरण शिवरायांच्यापर्यंत गेले. तेव्हा त्यांनी चिंचवडच्या संस्थानाला राज्याच्या कोठारातून उत्सवासाठी धान्य देणगीदाखल द्यावे, असे आदेश दिले. पण, रयतेच्या हिताचे रक्षण केले. केवळ स्वराज्यातल्याच नव्हे, तर शिवरायांचे लष्कर स्वार्‍यांवर शत्रूंच्या प्रदेशातून जात असताना, तिथल्या रयतेलाही त्रास देवू नये असा त्यांचा दंडक होता. पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी रयतेची काळजी घेतली त्यामुळेच ते सर्वार्थाने रयतेचे राजे झाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक विचार लक्ष विचारात घेण्याबरोबरच  राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा वेध घेणे आवश्यक आहे. महाराजांनी राज्यभिषेकासाठी ६ जुन ही तारीखच का निवडली ? ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस. कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस. देशात मृग नक्षत्र ७ जुनलाच सुरु होते.त्यात काहीच बदल नाही. महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात. म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासून सुरु होतात बळीराजाच्या सोयीचे जावे व त्याचा एक आनंदाचा क्षण ठरावा,म्हणून त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणून ६ जून हा दिवस निवडला गेला. त्याकाळी ६ जून १६७४ रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते,पाऊस नव्हता,शेतकऱ्यांना पण सोयीचे होते, याला म्हणतात दूरदृष्टीपणा, यालाच म्हणतात महापुरुष.

महाराजांच्या काळात सेंद्रीय शेती केली जात असे आज ती रासायनिक खतांच्या प्रभावाखाली आली आहे. त्याकाळात शेतकरी आत्महत्या होत नसत,आज शेतकरी आत्महत्येचा विषय गहन झाला आहे. जगात कापौरेट शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काही कंपन्यांनी भारतातील शेती गिळंकृत करण्यात डाव साधला आहे. जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना आपलं मूत्र प्राशन करण्याची वेळ आली. वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यास योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याची पाळी आली.


 एकूणच आजचे शेतीचे अर्थकारण बिघडलेले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. ही कर्जमाफी तत्कालीन काळासाठी आधार देणारी असली तरी 'शाश्वत' पर्याय असू शकत नाही. त्यामुळे ही दरी संपुष्टात आणण्यासाठी विदर्भ मराठवाड्यात सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. शेती मालास योग्य भाव मिळाला पाहिजे, पशुधन वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला शेतकरी सुखी होईल.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७


संदर्भ

१) प्रा.डॉ. शिवाजीराव चव्हाण -लेख शिवाजी महाराजांचे कृषी धोरण, दैनिक ऐक्य, ६ जून २०१७

२) आज्ञापत्र - अनंत सभासद


३) छत्रपती शिवाजी आणि सुराज्य -अनिल माधव दवे

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

शेतकरी चळवळ आणि मराठी साहित्य


शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा,जगाचा पोशिंदा शेतकरी दुःखी असतो, त्याचे प्रश्न, त्याच्या वेदना समजून घेतले नसल्यामुळे शेती अर्थव्यवस्थेचा चिरा ढासळत चालला आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वाधात महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवू पाहणारे लेखन केले. हाच शेतकऱ्यांचा मोठा एल्गार होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हरितक्रांती झाली पण त्याचे फ ळे शेतकऱ्यांना कधीच मिळाले नाहीत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, सरकारचा नाकर्तेपणामुळे आमचा शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच मारतो.हे चित्र बदलण्यासाठी शेतकरी चळवळी उभ्या राहिल्या.
मराठी साहित्यात शेतकऱ्यांचे दैन्याचे प्रतिबिंब उमटू लागले. शेतकरी चळवळीला वेग येऊ लागला. शेतकऱ्यांचे पोरं लिहिते होऊ लागले. काळाच्या ओघात शेतकरी चळवळी मंदावली, शेतीतील भयवाह वास्तवाचे चित्रण मराठी साहित्यात जोरकसेपणे पुढे येत नसल्याचे सध्याचे वास्तव आहे.

इथल्या प्रत्येक माणसांचा शेती आणि मातीशी संबंध आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगला आहे. १६ व्या शतकात पडलेल्या दुष्काळाचे चित्रण ते आपल्या अभंगातून करतात. ही परंपरा महात्मा फुल्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येते. १८६५ च्या कालखंडात सूंपर्ण भारत दुष्काळाने होरपळून निघाला होता. जमीनदारांचे पिळवणूक आणि ब्रिटिश सरकारचे जुलूमी कायद्यापुढे शेतकरी अधिकाधिक कंगाल होत चालला होता. महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकात कृषी अर्थव्यस्थेचे पडझडीचे चित्रण केले.



याविषयी डॉ. अशोक चौसाळकर म्हणतात, '' जोतीरावांच्या पुढे हा मुख्य प्रश्न होता की दिवसभर उन्हातान्हात घाम गाळणारा, जगाचा पोंशिदा शेतकरी दुःखी आणि सरकारचा कामचोर,लाचखाऊ नोकरशहा सुखी असे का व्हावे? अवयव आणि बुध्दी सारखीच असताना समाजात विषमता का आहे? हा प्रश्न त्यांना पडला होता. आपल्या 'गुलमागिरी', ' शेतकऱ्यांचा आसूड', 'इशारा' वगैरे पुस्तकांतून त्यांनी यासंबंधी आपले विचार मांडले.''(१)
महात्मा फुले यांनी आपले शेती विषयासंदर्भातील क्रांतिकारक विचार आपल्या पुस्तकांतून मांडून शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी श्रीकांत देशमुख यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, ते म्हणतात-'' महाराष्ट्रात नव्हे तर एकूण देशाच्या संदर्भात म.फुले हे शेतकरी आणि शेती प्रश्नाचे पहिले प्रवक्ते. शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण समाजरचनेचा कणा असून जोपर्यंत त्याची स्थिती सुधारित नाही तोवर कोणतेही मौखिक स्वरूपाचे सामाजिक परिवर्तन होण्याची शक्यता नाही, हे भाकित फुल्यांनी शंभर वर्षापूर्वी केले.आपल्या लेखनातून त्यांनी शेती आणि शेतकरी यासंबंधी जे विचारसूत्र मांडले त्याला प्रमाण मानूनच नंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात शेती प्रश्नाचा विचार होऊ लागला.''(२)

देशमुख यांच्या मतातून शेतकरी चळवळीच्या उदयाची पार्श्वभूमी लक्षात येते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या विविध भागांत शेतकरी चळवळीने आकार घ्यायला सुरूवात केली. त्यातूनच देशातील पाहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उद्यास आली. शहीद भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबचे शेतकरी एकत्र आले. या शेतकरी चळवळीच्या अनेक शहरात परिषदा झाल्या.

१९०७ साली मधील ल्यालपूर शेतकरी मेळाव्यात 'पगडी संभाल ओ जटृा'ही शेतकऱ्याला स्वाभिमनाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली.देशातील पहिले मोठे आंदोलन मात्र महाराष्ट्रात झाले. १८७५ मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव हे ते पहिले आंदोलन होय. दीडशे रूपयांच्या कर्जापायी काळूराम सावकाराने पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील करडे गावातील प्रतिष्ठित शेतकरी बाबासाहेब देशमुख यांची शेतीवाडी, स्थवर व जंगम मालमत्ता जप्त केली. सावकारांच्या जाचाविरूध्द पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हयांतील शेतकऱ्यांनी उठाव केला होता. करडे येथील घटनेची प्रतिक्रिया म्हणून ९ सप्टेंबर १८७५ रोजी पहिला संघर्ष झाला.

वि. रा. शिंदे यांनी शेतकरी वर्गाची हालखीची स्थिती लक्षात घेऊ न ती कशी सुधारावी यासाठी प्रयत्न केला. ही आस्था प्रमाण मानून वि.रा.शिंदे युरोपीय राष्ट्रात गेले तिथे त्यांनी शेतीची आणि शेतकरी वर्गाची अवस्था काय आहे याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी शेतकरी परिषदा घेतल्या. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली. १९२७ मध्ये गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी साराबंदीची अपूर्व चळवळ उभी केली. या चळवळीमुळे संबंध देशातील शेतकरी जागा झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूध व शेतमालाला योग्य दर आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी शेतकरी आंदोलने झाली. १९६० च्या दशकात देशात हरितक्रांती झाली. पंजाबपासून ते तामीळनाडूपर्यंतचा शेतकरी सुखू होत असल्याचे अभासी चित्र निर्माण केले. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेंधे, आण्णासाहेब शिंदे यांनी शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.

 १९७२ च्या दुष्काळात देशातील शेतकरी उध्दवस्त झाला. महाराष्ट्रात ही तिच परिस्थिती होती. जिथे पाणी आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला भाग अधिक संपन्न तर जिथे पाणी नाही असा विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कंगाल असल्याचे भौगोलिक चित्र निर्माण झाले. सुखी असलेला प.महाराष्ट्रातला शेतकरी ऊ साला भाव नाही म्हणून ओरडू लागला तर विदर्भ व मराठवाडयातला शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देत आहोत म्हणून आपला घसा कोरडा करू लागला. महाराष्ट्रात उरणचे आंदोलन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून चिरडले होते, विदर्भात, तेलंगणात भूमिहिनांचा, शेतकऱ्यांचा लढा झाला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे शेतकरी आंदोलन गाजले होते. १९९१-९२ साली आलेल्या जागतिकीकरणामुळे संबंध शेतकरी वर्ग यात भरडला गेला. सगळयाचे प्रश्न एकसारखेच झाले. १९७२ पासून ग्रामीण समाजात लोकप्रिय असलेले 'बळीराजा' हे पुण्याहून निघणारे शेतीविषयक मासिकाने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरूणाचे व्यासपीठ झाले. अनेक सुशिक्षित तरूण आपले शेतीविषयक अनुभूव या मासिकातून मांडू लागले. शेती,ग्रामीण समाज आणि साहित्य याबाबतचे प्रतिबिंब मासिकात उमटू लागले.या काळात शेतकरी चळवळ व ग्रामीण साहित्य चळवळीचे बळीराजा हे मासिक मुखपत्र बनले होते.

१९७२ च्या दुष्काळाने संपूर्ण ग्रामीण जीवनाकडे बघण्याकडे तरूण सुशिक्षितांचा दृष्टिकोन बदलला होता यातूनच फार मोठे स्थित्यंतर घडले. शेती, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण माणसांच्या जीवनासंबधी विचार होऊ लागला. व्यंकटेश माडगूळकर (बंडगरवाडी) रा.रं.बोराडे (पाचोळा,चारापाणी), विश्वास पाटील (झाडाझडती,पांगिरा), आनंद यादव (झोंबी), भास्कर चंदनशिव (लाल चिखल),सदानंद देशमुख (बारोमास,तहान), कृष्णात खोत (गावठाण), उत्तम बंडू तुपे (खुळी), द.ता.भोसले सारखे साहित्यिक शेतीचे भयावह वास्तव साहित्यातून प्रकट करू लागली. एकूणच मराठी साहित्याच्या क्षेत्रात ग्रामीण जीवन, साहित्य चळवळीविषयक एक पोषक वातावरण तयार झाले होते. गंभीरपणे शेती विषयांचे चिकित्सिकपणे चर्चा करणारे सुशिक्षित तरूण साहित्यिक पुढे येत होती.

याविषयी द.ता.भोसले म्हणतात,''आजच्या ग्रामीण साहित्यात भूक, द्रारिद्रय,अज्ञान,शोषण आणि उपेक्षा या गोष्टीतून उध्दवस्त झालेल्या जीवनाचे चित्रण येते आहे. या प्रेरक घटनांचा संदर्भ वेगळा असेल, भूक किंवा दारिद्रयाचे स्वरूप भिन्न असेल, त्याची तीव्रता कमी अधिक असेल, पण शेवटी त्या भावना म्हणून तशा एकच म्हणाव्या लागतील. या पाच बाबीचे चित्रण म्हणजे ग्रामीण साहित्य म्हणावे लागेल.''(3)

द.ता. भोसले यांच्या मताचा खोल विचार केल्यास खेडयातले बदलते जीवन, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक वास्तव साहित्यात उमटू लागले होते. शेती संदर्भात शेतकरी चळवळी उभी राहत होती. त्यातून नवे व वेगळे साहित्य जन्माला येत होते. १९८० च्या दशकात शेतकरी संघटनेचे प्रेणेते शरद जोशी यांनी ऊस, तंबाखू, कांदा, दूध, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून दर आंदोलन हाती घेतले. शरद जोशी यांच्या 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' या घोषणेने संबंध देशातील शेतकरी जागा झाला.

या चळवळीचे मूल्यमापन करताना श्रीकांत देशमुख म्हणतात,'' शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे ग्रामीण महाराष्ट्रात गतिमानता निर्माण झाली. लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेची अधिवेशने भरू लागली. शेतकरी संघटनेने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याच मुलभूत आर्थिक मागण्यावर भर दिला. सर्वच राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी धारणा शेतकऱ्यांत रूजवली. त्यामुळे शेतकऱ्यांत अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली. शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी, एवढया एका महासूत्रावर आधारित या चळवळीचे तत्वज्ञान आहे. त्यामुळे ही चळवळ अज्ञ, अडाणी, शेतकऱ्यांना सहज कळते, आपलशी वाटते.''(4)

शेती आणि शेतकरी याविषयी शरद जोशी यांनी आपल्या चळवळीतून अर्थशास्त्रीय भूमिका मांडली. आजपर्यंत तसा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या पिढीतील साहित्यिक ही वास्तव भूमिका घेउन लिहिते झाले. भूमि अधिग्रहण, सेझ, बाजारभाव हे सर्व विषय साहित्यातून येत राहिली. 1995-2015 अशा वीस वर्षाच्या काळ शरद जोशी यांनी आपल्या शेतकरी आंदोलनाचा दरारा कायम ठेवला होता. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात एकवाक्यता, एकजिनसीपणा असलेली शेतकरी चळवळीकडे पाहिले जात होते. शरद जोशी यांच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य अंधारात सापडले आहेत. पाशा पटेल, राजू शेटटी, सदाभाउ खोत, रघुनाथदादा पाटील अनेक जाणते हे स्वतंत्र चूल निर्माण केल्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मर्यादा पडत आहेत. नुकत्याच झालेल्या पुणतांबा शेतकरी आंदोलनावरून हे सिध्द होते.

शेतकरी चळवळीच्या भवितव्याविषयी गंगाधर मुटे म्हणतात,'' आज शेतकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये कुठेही एकवाक्यता नाही. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबाजावणीची मागणी करतो, कुणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, असा अजेंडा पुढे रेटू पाहतो, तर कुणी शेतकऱ्यांनी सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतीचे प्रश्न सुटणार नसल्याची हाकाटी पिटतो.शेतीचे अर्थशास्त्र समजून न घेताच बेताल वक्तव्ये करण्याचेही सध्या पेवच फुटलेले आहे. डॉ.आंबेडकरांच्या निधनानंतर रिपब्लिकन चळवळीच्या वाटयाला आला, तसाच भोग शेतकरी चळवळीच्या वाटयाला येतो की काय, असा संभ्रम होण्यासारखी स्थिती आहे.''(5)

मुटे यांचे मत विचारता घेता, एकीकडे शेतकरी चळवळीची अशी वाताहात होत असतानाच शेतीसमारेचे प्रश्न आणखी बिकट होत चालल्याचे दिसून येते. आज शेती चळवळ जशी मंदावली आहे तशीच शेती प्रश्नावर अधिक सकस व वास्तववादी लिखाण होताना दिसत नाही. या मर्यादा का आहेत याचा शोध शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व साहित्यिकांनी घेतला पाहिजे.

विदर्भ व मराठवाडयात शेती व शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याविषयी तीव्रपणे आंदोलन होताना दिसत नाही. केवळ कर्जमाफी देवून हा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे असे आमचे साहित्यिक का सांगत नाहीत. भाजपाचे सरकार येण्यापूर्वी सिंचन घोटाळा निघाला. तो शेतीशी निगडीत आहे. हा प्रश्न समजून घेवून आमचे साहित्यातून याचे चित्रण येणे आवश्यक होते, तसे होताना दिसत नाही.यवतमाळ जिल्हयात कपासावर फवारणी मारताना अनेक शेतकरी दगावली. अनेक जणांना कायमचे अंधत्व आले याचा शोध आमचे साहित्यिक घेताना दिसत नाहीत.

आजचा तरूण शेतकरी चळवळी पासून दूरावला गेला आहे तो का दुरावला गेला आहे ? हे साहित्यिक कधी समजून घेणार. साहित्य हा समाजजीवनचा आरसा समजला जातो, आज शेतकरी चळवळ मंदावली असली तरी साहित्यिक कमी नाहीत, त्यांनी हया गोष्टींचा विचार करून साहित्याचे दालन समृध्द करणे आवश्यक आहे. औरंगाबादचा सरदार जाधव हा 'दूध'याविषयावर कादंबरी लिहितोय. ही प्रकाशित झाल्यास मराठी सारस्वताना या कादंबरीची नोंद घ्यावी लागेल. ऊस दर आंदोलन, कापूस,तूर,सोयाबीन आंदोलन सरकारकडून दडपली जात आहेत,या मागाचा राजकीय हेतू लक्षात घेउन साहित्यकृती जन्माला येणे गरजेचे आहे.

विकास पांढरे,9970452767
'(सदर लेख सोलापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादासाठी लिहिला होता. काही तांत्रिक कारणांमुळे सदर परिसंवाद रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा लेख ब्लॉगवर वापरत आहे.)

संदर्भ :-

-1) डॉ.अशोक चौसाळकर, महात्मा फु ले री चळवळ, लोकवाड्ःमय गृह प्रकाशन.पृष्ठ क्रं.1

2) श्रीकांत देशमुख, ग्रामवेद संपादक गणेश देशमुख पृष्ठ क्रं.173

3) तैत्रव, पृष्ठ क्रं182

4) द.ता.भोसले, ग्रामीण साहित्य ः एक चिंतन, मेहता प्र.पृ.क्रं.111

5) गंगाधर मुटे, लेख शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने महाराष्ट्र टाइम्स, 2 डिसेंबर 2016

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

मरणकळा



 ना वेळ ना काळ...
तू चोरपावलासारखा येतोस
अन् सर्वस्व हिरावून घेतोस
तुझा कालचा गारपिटीचा मारा मात्र अस्वस्थ करणारा होता
उभं पिकं क्षणात आडवं तिडवं केलंस
थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा मारल्या
कुठं तासभरात काश्मीर अवतरलं
विदर्भ, मराठवाड्यात तसं नकारात्मक दिसतं,असो

तुझ्या येण्यानं कुठं माणसं मेली, कुठं जनावरे दगावली, कुठं गहू लोळला तर कुठं हरभरा भिजला, कुठं तुरीचं ढीग झालं, कुठं आब्याचं मोहोर गळलं, ज्वारीचं तर अथंरुणच झालं

मी मात्र गुडघ्यात डोकं घालून तासनतास एकटक बघत होतो
आता कुठे वर यायची स्वप्ने बघत होतो
दिवसरात्र राबराब राबून हाडाच काडं केलं होतं
वाटलं होतं यंदा तरी सुगीचे दिवस येतील ?
खळ्यावर टाकलेली ताडपत्री सांगत होती, गारपिटीच्या तडाख्यात आपलं स्वप्नंही झाकलेलं

चर्चेचा काटा ग्लोबल वाँर्मिगकडे वळतोय
मला मात्र विज्ञानतलं कुठं कळतंय, गारांचा पाऊस मात्र माझा जीवघेणा खेळ करतोय

या प्रवासात अनेक स्थित्यंतरे पाहिली
जुना भारत आणि नवा भारत
या दोन देशांना जोडणारा
पूल म्हणजे माझी पिढी

ग्लोबलायझेशनचा जन्म पाहिला
पुढे वर्षे उलटली
धक्के,चटके बसले,ते सोसले
मल्टी नँशनल कंपन्या उभ्या राहिल्या
वारूळातल्या कोट्यावधी मुंग्या बाहेर पडल्या, नजरेत नजर घालून पुढे जात होत्या
मी मात्र तसाच उभा होतो- बुजगावण्यासारखं
आजही तसाच...!

ना थंडीची,ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची
शेतीच्या संकटातून रोज नव्याने संधी शोधून होतो
आता तर वाटेवर गारपिट नावाचा ऋतूचा जन्म होतोय

आता सरकारी यंत्रणेकडून मोजदाद होईल
वरून खाली, खालून वर पाहिलं जाईल
राजकारणी मात्र नेहमीप्रमाणं डाव साधतील
शेतकरी हेच सत्तेचे सूत्र समजतील
सोबत बदलत्या हवामानाचा फैलाव आहेच..!

आता कोणत्या सृजनाची वाट पाहू ?
गारपीटसह इतर मरणकळा कुठवर सोसणार
आता मलाच बदलावे लागणार
ध्येयाची क्षितिजे मलाच बदलावी लागणार

कवी : विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७

( टीप : 'मरणकळा' ही माझी आजवरची दुसरी कविता. त्यामुळे कविता लेखनाचे तंत्र जमले असेल नसेल तरी त्यातील भाव लक्षात घ्यावा, आवडल्यास शेअर करावे,सोबत सुचनांचे स्वागत आहे.)

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

मुखवट्यांचे जग







ठिकाण तुळजापूर वेस,वार मंगळवार, सकाळची वेळ,  थोडीशी घाईबडीची, नोकरदार, कामगारांना कामांवर जाण्याची गडबड ... रस्त्यात एक चारचाकी बंद पडलेली...  अचानक दोन पोलिस येतात... गाडीला परवाना नाही... तुमच्याकडे लायन्सेस नाही, अटक व्हा नाहीतर लाच द्या... नाष्टा माझ्याकडे बील तुमच्याकडे.... मोबाईल नंबर 99 सतरा कुठेही उतरा... लोकसंख्या दीडशे पुढारी तीनशे..... दंगल झाली की चाललो घरला... अशा एकाहून एक हजरजबाबी विनोदाने तुळजापूर वेस मधील नागरिक पोटभरून हसत होते, बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद मिळत होती. हा प्रसंग दोन वर्षापूर्वीचा सोलापूर शहरातला आहे.

महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ४२जमाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या,पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजनातू प्रबोधन करणाऱ्या बहुरूपी समाजाच्या लोककलेला शिवकाळापासून मानाचे स्थान आहे. छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला.

हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजार असावी असा अंदाज आहे.

 छ.शिवाजी महाराज यांचा महत्वाचा शिलेदार असलेला बर्हिजी नाईक हा याच समाजातला
मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, नळदुर्ग शहराच्या बाजूला येडोळा गावात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतोय. उमरगा चौरस्ता वर समाजाचे दर्शन होते. सोलापूर शहरात समाजाचे वास्तव आहे. भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदाने करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचे धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे. बहुरूपी समाजातील महिलांचे स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येते पण चर्चेत सहभागी होता येत नाही.


बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता.

शिवशाही काळापासून आपल्या कलेमधून लोकांचे मनोरंजन करत असलेल्या बहुरूपी समाज आज दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वीची काळी अभंग, भारूड हे जरी यातून मनोरंजन होत असले तरी, यामध्ये अधात्म जास्त होत असे, त्यामुळे सर्वसामान्य, अडाणी लोकांना बहुरूपी समाजाचे विविध रूपे हेच मनोरंजनाचे मुख्य साधने होती. सकाळ, दुपार अन संध्याकाळची एखाद वेळ साधायची नि घराघरात, दुकानात थेट धडक द्याचयी, अन गावचा पोलीस पाटील,सरपंच, कारभारी यांना गोळा करून, उपस्थितांचे मनोरंजन करायचे, कधी हनुमान तर कधी वाघ, पोटात खुपसलेल्या सुरा आणि विविध मुखवटे धारण करणारा हा बहुरूपी खेडोपाडी लहानापासून ते मोठयापर्यंत लोकप्रिय होता. 
 बहुरूप्यांच्या सोंगाना तितकीच दाद मिळायची अन बिदागी ही.आज गाव असो, वा शहर बहुरूप्यांना सोंगाना कुणी विचारत नाही. कारण आजच्या आत्याधुनिक मनोरंजनाच्या दुनियेत बहुरूप्यांची पारंपारिक कला जवळजवळ लोप पावत असून, केवळ हा सोंगात बाद झाला नाही तर गावगाडयातील या समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. हा समाज फिरस्ता असला तरी, त्याला हक्काचे घर आहे ना जागा, पोटासाठी सतत स्थलांतर होत असल्याने, ना कुटुंबाकडे लक्ष देता येत ना मुलांच्या शिक्षणाकडे. उपजत कलागुणांचा कलाविष्कार असताना चित्रपट माध्यमकर्मींचे लक्ष ही त्यांच्याकडे जात नाही. त्यातच मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे बहुरूपी समाज आणि त्याच्या कलेकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


बहुरूपी सुदाम साळुंखे,संतोष शिंदे

शतकानुशतकापासून कलेवर पोट भरणाऱ्या बहुरूपी समाजाला आज अनेक संकटांना तोंड दयावं लागत आहे. स्वत:चे दु:ख लपवून लोकांचे मनोरंजन करणे ठीक आहे. या कलेतून पूर्वीसारखी बदागी मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे प्रश्न सोडवणे कठिण जात आहे. विशेष म्हणजे मुलं हुशार असूनही त्यांना म्हणावे तसे शिक्षण देता नाही अशी खंत बहुरूपी सुदाम साळुंखे यांनी व्यक्त केली.



बहुरूपी कलावंत सुदाम साळुंखे व संतोष शिंदेंच्या आदाकारीला तितकीच दाद 
  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाचे साधने वाढली असली तरी, आमच्या मुलांना पारंपारिक कला जिवंत राहावी यासाठी आम्ही त्याना धडे देत असतो, नवव्या पिढीपासून ही परंपरा जोपसण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया बहुरूपी संतोष शिंदे यांनी दिली.
 मागील ६५ वर्षापासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती.समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला पण यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला आहे.

© विकास पांढरे,९९७०४५२७६७
( सदर लेख सोलापूर तरुण भारत मध्ये दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेला आहे.)

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

मंगळवेढ्यात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची गरज


सध्या सोलापूरसह मराठवाड्यात हुरडा पार्ट्या दिसू लागल्यात. विशेष म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी असल्याने मुंबई पासून ते नागपूर पर्यंतचे खवय्ये या भागात येऊन हुरडा पार्टीचा आस्वाद घेताना दिसतात. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत मंगळवेढा तालुक्यात पाहुण्यांची वर्दळ असते. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला जीआय ( भौगोलिक) मानांकन मिळाले असले तरी याचा इथल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. विद्यमान सरकारने या भागात ज्वारी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे.
आपल्या देशात ११ टक्के जमिन क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर पुणे, नगर जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड, लातूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिध्द आहे.

जिल्ह्यात सोलापूर - हैदराबाद महामार्गावर मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले ) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सुरू आहे. त्यामुळे या भागात ज्वारी उत्पादनाचा विकास झाला आहे. १९८५ साली सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात रब्बी ज्वारीसाठी पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. त्यासाठी २५ टक्के बागायती व २० टक्के बागायती जमिन क्षेत्राचा विचार करून 'मालदांडी'व उन्नत 'स्वाती'चा समावेश केला गेला होता. बार्शी तालुक्यात शाळू जातीची ज्वारी उत्पादन घेतली जाते तिलाही राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे.
मंगळवेढा हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. येथील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. एकरी ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीत १५ ते २० आणि चांगल्या जमिनीत २५ ते ३० क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
ज्वारीचे आयुर्वेदात देखील खूप महत्व सांगण्यात येते. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवेढा ज्वारीला भौगोलिक मानांकन दिले आहे. यामुळे मंगळवेढ्याची ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करता येणार आहे. दोन वर्षापूर्वी या ज्वारीला जीआय (भौगोलिक)मानांकन मिळाले होते. याबाबतची सविस्तर बातमी मी सोलापूर तरुण भारत मध्ये दिली होती. या मानांकनामुळे मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी सातासमुद्रापार जाईल व उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशा आशयाची ती बातमी होती. या बातमीला येत्या मार्च २०१८ मध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. ना इथली ज्वारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली ना इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. जीआय मानांकनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो? हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या पंधरा वीस वर्षापासून राज्यात कधी दुष्काळ तर कधी सुकाळ असतो. त्यामुळे ज्वारी उत्पादनात कमालीची घट होत आहे. यास सोलापूर जिल्हा ही अपवाद नाही.
राज्यात ज्वारीचे क्षेत्र २४ ते ३२ लाख हेक्टर असून उत्पादन ७ ते २४ लाख टन आहे. सध्या रब्बी ज्वारीचे ८ ते १०लाख हेक्टरने क्षेत्र कमी झाली. शेती क्षेत्रात ही चिंताजनक बाब आहे. धान्य आणि कडबा ही दोन्ही महत्वाच्या गरजा आहेत. ज्वारीच्या शाश्वत वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यात मालदांडी, दगडी, ज्योती, परभणी मोती,यशोदा या जातींचे उत्पादन होते.मंगळवेढा तालुक्यात मालदांडी ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ज्वारी आणि कडब्यास दर मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी डाळिंब फळबागेकडे वळल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत गेले. ज्वारीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळाले असले तरी इथला शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी ज्वारी प्रक्रिया उद्योगाची दालने खुले करून देणे गरजेचे आहे. ज्वारीचे प्रक्रियायुक्त केलेले पीठ, लाह्या, पापड, पोहे,मोतीकरण, स्टार्च,ग्लुकोज पदार्थ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन असा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

आपल्या देशात ज्वारी पासून इथेनॉल उत्पादनासंबंधी केंद्र सरकार कमी पडत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या पुढाकाराने इथेनॉल उत्पादनासंबंधी प्रथम निर्णय झाला होता. आज देशात आणि राज्यात भाजपाची एक हाती सत्ता आहे. या सरकारने ज्वारी पासून इथेनॉल निर्मिती केले तर शेतकऱ्यांचे दारिद्रय संपल्याशिवाय राहणार नाही.
सप्टेंबर २०१७ मध्ये मंगळवेढ्यात वारी परिवार, कृषीक्रांती व आत्मा ( कृषी विभाग) संयुक्त विद्यमाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ज्वारी व मका महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढ्यात ज्वारीवर आधारित उद्योग सुरु करण्यात यावा,असा सूर निघाला होता. विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. देशमुख यांच्या कार्यकाळात ज्वारी प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर सोलापूर जिल्ह्यातील सहकार उद्योगाला आणखी झळाळी प्राप्त होईल.
© विकास पांढरे, मुंबई
९९७०४५२७६७

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

कहाणी एका शाकाहारी गावाची

 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्टयपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. आज आपण परंपरेने शाकाहारी राहिलेल्या गावाची ओळख करून घेणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात जोतिबाची वाडी हे गाव आहे. साधारण सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. वाचून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्याची ऐतिहासिक व आध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयांतल्या या जिल्ह्याच्या बातम्या माध्यमांत नेहमी वाचायला मिळतात.

जोतिबाची वाडी

जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथून 16 किलोमीटर अंतरावर वसले आहे. आत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. साधारण सतराशे लोकसंख्या. गावात जोतिबाचे जागृत मंदिर आहे. 95 टक्के समाज मराठा आहे. मातंग व गोसावी समाजाची चार घरे आहेत. गावात आठवीपर्यंत शाळा आहे. गावातील साठ तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. 

निसर्गाची साथ मिळत नसली, तरी इथला शेतकरी समाधानी आहे. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात. गावातले तंटयाचे/मतभेदाचे विषय गावातच मिटविले जातात. आजपर्यंत कुणीही तक्रार नोंदविण्यासाठी  पोलीस ठाण्यात गेले नाही. सर्व जण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. गावात देशी दारूचे व बिअरचे दुकान नाही. मटनाचे दुकानही कोसावर कुठे लावण्यात आले नाही. त्यामुळे हे गाव आजही गुण्यागोंविदाने नांदत असताना दिसते. या गावात जुन्या पध्दतीचा दगडी आड आहे. आडात बाराही महिने मुबलक प्रमाणात पाणी आहे. गावकरी याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. दुष्काळात या आडाचे कधीही पाणी आटले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नाही.
जोतिबाच्या वाडीतील चित्र

जागृत मंदिर व शाकाहाराची आख्यायिका

जोतिबाची वाडी हे गाव दोन कारणांसाठी प्रसिध्द पावले आहे. पहिले कारण म्हणजे येथील बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री जोतिबाचे जागृत मंदिर व दुसरे या मंदिरामुळे गावकऱ्यांची शाकाहारी राहण्याची परंपरा. मांसाहार करणे आरोग्यासाठी चांगले नाही या विचाराने गावकरी शाकाहारी राहिलेले नाहीत, तर गावाला असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते मांसाहार करत नाहीत. त्यामागे एक कहाणी आहे. ही कहाणी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नसली, तरी त्यातून मिळणारा बोध हा परंपरा व नवतेला जोडणारा सेतू आहे.

कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाणे म्हणून जोतिबाची वाडी येथील जागृत जोतिबा मंदिर देवस्थान ओळखले जाते. हे देवस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवास मांसाहार चालत नाही. दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावात मोठा उत्सव भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे माहात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. यात्रेला अहमदनगर, धाराशिव, बीडसह राज्यातील लाखो भाविक येतात.

 श्री जोतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. गावात अजूनही एकाही चुलीवर, गॅसवर व स्टोव्हवर मटन शिजलेले नाही. शाकाहारी राहण्याची ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे, याविषयी ज्येष्ठ नागरिक आबासाहेब पवार व शिक्षक शिवाजी भराटे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ''आम्ही वडिलांना व आजोबांना विचारले असता, जोतिबाचे जागृत मंदिर असल्यामुळे गावात कोणी आतापर्यंत कुणी कोंबडे व बकरे कापले नाही. जोतिबावर असलेली श्रध्दा ही आजपर्यंत चालत आली आहे.''

जोतिबाची वाडी निजाम राजवटीतले गाव. या परिसरातील गावांत रझाकाराच्या सैनिकांनी मोठा छळ केला. मात्र जोतिबाचे जागृत देवस्थान असल्यामुळे रझाकाराने या गावाला कधीही त्रास दिला नाही, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे व त्या श्रध्देपोटी गावकरी पिढयान्पिढया शाकाहारी राहिले आहेत. शाकाहाराची ही परंपरा दोनशे वर्षांपासून सुरू आहे, पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत.

रगावी जाऊन मांसाहार

संपूर्ण गाव शाकाहारी आहे. काही जण माळकरी आहेत. जे काही लोक आहेत, त्यापैकी मांसाहार करणारे दोन टक्के निघतील. त्यांना मटन खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. असे लोक आंघोळ करूनच गावात प्रवेश करतात. पुणे-मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

श्रावणमासातील तिसऱ्या रविवारी यात्रेचे स्वरूप

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जोतिबाच्या वाडीत श्री जोतिबाचे जागृत मंदिर असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरला जातो. या दवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केलीहोती . श्रावण महिन्यात जोतिबाच्या वाडीलाच यात्रेचे स्वरूप आलेले असते. अर्धा कोटीच्या लोकवर्गणीतून जोतिबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिर परिसर, मंदिराचे शिखर, सभामंडप आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

पंचक्रोशीत जोतिबाची वाडीचा लौकिक


जोतिबाची वाडी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने जरी लहान असले, तरी हे गाव शुध्द शाकाहारी गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. गावात व्यसनाचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. शिक्षणामुळे नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आबासाहेब पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल साठ तरुण भारतीय सैन्यदलात भरती झाले आहेत. या छोटयाशा गावातून एवढया मोठया संख्येने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आजूबाजूच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. पवार गेल्या वीस वर्षांपासून गावात दर वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. या निमित्ताने स्पर्धेकरिता उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, बारामती या परिसरातील खेळाडू या छोटयाशा गावात येतात. या स्पर्धेमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना वाव मिळाला आहे.

काळाच्या ओघात जोतिबाची वाडीच्या ग्रामस्थांनी शाकाहारी राहण्याचे वेगळेपण आजही जपलेच आहे, शिवाय पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचेही कार्य ते करत आहेत. जोतिबाची वाडीचे कार्य अनुकरणीय आहे.

विकास पांढरे

99970452767
 (सदर लेख साप्ताहिक विवेक, वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे.)

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...