‘सा.विवेक’ चे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ ( डॉ.हेडगेवार रूग्णालय) यांच्यावतीने दिला जाणारा डॉ.भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.
गुरुवार, ५ जानेवारी, २०२३
समरसतेचा वारकरी
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
दुष्काळी भागावर फळतेय ‘ड्रॅगन फ्रूट’ शेती
जत तालुक्यातील जालिहाळ ब्रद्रुक येथील ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या सामाजिक संस्थेतर्फे शेतकर्यांना कमी पाण्यात येणार्या ‘ड्रॅगन फ्रूट’ या विलायती फळाच्या माहितीसह लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात 750 एकरांवर ‘ड्रॅगन फ्रूट’चे क्षेत्र विस्तारले आहे. शेतीतला हा नवीन प्रयोग शेतकर्यांना ‘आर्थिक वरदान’ ठरत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याची ओळख कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी आहे. येथे ना पूर्णपणे फुललेली शेती पहायला मिळते, ना निसर्गरम्य वातावरण. आढळते ते दगड-गोटे, काटेरी खुरटी झाडी. एकूणच दुष्काळसदृश परिस्थिती. अशा या वातावरणात जीवन कंठत असणार्या शेतकर्यांच्या जीवनात आनंदाची पालवी फुटली ती ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ या संस्थेमुळे. 1972 सालच्या भीषण दुष्काळात संस्थेचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यांनीच एकत्र येऊन 1976 साली सांगली शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जालिहाळ बुद्रुक (ता. जत) या ठिकाणी ‘येरळा प्रोजेक्ट सोसायटी’ची स्थापना केली. सध्या ही संस्था जत तालुक्याच्या दुष्काळी भागातील 22 गावांत शेती, पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आदी क्षेत्रांत काम करीत आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या तीस एकर हलक्या पडीक जमिनीवर पथदर्शक पीक प्रात्यक्षिके होत असतात. कडधान्ये, फळबागा, ठिबक व तुषार सिंचन पद्धत, सौर ऊर्जा, हायड्रोपोनिक चारा याची प्रात्यक्षिके संस्था प्रथम आपल्या शेतात राबविते. त्यानंतर ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविले जाते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादकता कशी मिळेल यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.
ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग
डाळिंब आणि द्राक्ष या भागाची हुकमी पिके. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस आणि बागांवर पडणारे रोग यांमुळे इथला फळ बागायतदार मेटाकुटीला आला होता. दरम्यान, येरळा संस्थेचा पर्यावरणाला अनुकूल पर्यायी पीक-फळाचा अभ्यास सुरू होता. या संदर्भात अनुभव सांगताना संस्थेचे सचिव नारायण देशपांडे म्हणाले, “ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारे पीक समजले जाते. व्हिएतनाम, थायलंड, तैवान देशांत याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी खर्चात परवडणारे हे पीक आहे, शिवाय शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने जालिहाळ बुद्रुक येथील दीड एकरावर ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी सहा वर्षे संशोधन केले. 2014 साली प्रायोगिक तत्त्वावर ड्रॅगन फ्रूट शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकर्याकडून रोपे मागविण्यात आली. एका एकरात 550 पोल बसले. सहा बाय दहाचे अंतर करून प्रत्येक पोलवर चार रोपांची लागवड केली. एकरी 2800 रोपे लागली. रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला. त्यामुळे रोपांची एकसारखी वाढ होत गेली. जानेवारी ते मे या कालावधीत फळाला अतिशय कमी पाणी लागते. त्यामुळे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरू शकणारे आणि रोगप्रतिकारक्षम फळ असल्याचे आमच्या लक्षात आले. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. पहिल्या वर्षी रोपांची चांगली उगवण झाली. दुसर्या वर्षापासून फळधारणा सुरू होते आणि चौथ्या वर्षापासून एकरी जवळपास सहा ते सात टन उत्पादन निघाले.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही लागवड ते काढणीपर्यंतची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले. हजारो शेतकर्यांना ते वितरित करण्यात आले. संस्थेने स्वत: रोपवाटिका तयार करून रोपे उपलब्ध करून दिली आहेत. संस्थेच्या प्रक्षेत्रावरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर तो पाहण्यासाठी आले आणि बघता बघता जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील 750 एकर क्षेत्र ड्रॅग्रन फ्रूटखाली आले आहे. त्यासाठी ‘इंडियन ड्रॅगन फ्रूट ग्रोअरगट स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे 400 ड्रॅगन फ्रूट शेतकर्यांची नोंदणी झाली आहे.”
शेतकर्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन
संस्थेने सर्व शेतकर्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला आहे. ड्रॅगन फ्रूट हे नवीन पीक आहे. त्यामुळे या पिकांची सविस्तर माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. या पिकांची शास्त्रीय माहिती संस्थेने संकलित केली आहे. संस्थेचे अनुभवी शेतकरी नवीन शेतकर्यांना ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती देत असतात. संस्थेने फळाविषयीचे तंत्रज्ञान विकसित करून लागवडीपासून काढणी, छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन याविषयी शेतकर्यांना प्रशिक्षित केले आहे.
विक्री व्यवस्थापन
नारायण देशपांडे सांगतात, “या नवीन फळासाठी ग्राहक मिळविणे एक मोठे आव्हान होते. त्याचे आहारातील महत्त्व पटवून देणारी हजारो घडीपत्रके संस्थेने थेट किरकोळ फळविक्रेत्यांपर्यंत व ग्राहकांपर्यंत वितरित केली. सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई, वाशी येथील व्यापार्यांशी संपर्क साधून विक्रीचा प्रश्न सोडविला.”
विक्रमी उत्पादन व निर्यात
उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे संस्थेच्या शेतकर्यांनी दाखवून दिले आहे. 2018-19 या काळात 400 टन, 2019-20मध्ये 525 टन, तर 2020-21 साली 700 टन ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन एकट्या जत तालुक्यातून घेण्यात आले. यातून सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या वर्षी लागवडीचा खर्च साडेतीन लाख रुपये एकरी आला. खते, छाटणी, पाणी व्यवस्थापन याचा एकरी खर्च 32 हजार रुपये आला. सरासरी 80 ते 100 रु. किलो रुपये असा भाव मिळाला आहे. या भागातून युरोपमध्ये व अरब राष्ट्रात प्रथमच फळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.
उत्कृष्ट रोपवाटिका
महाराष्ट्राच्या विविध भागांत ड्रॅगन फ्रूटची लागवड होत असली, तरी बहुतांश ठिकाणी या फळाच्या रोपवाटिका उपलब्ध नाहीत, ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्कृष्ट सहा रोपवाटिका विकसित केल्या आहेत. यामुळे संस्थेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. वर्षभरातून एका रोपवाटिकेतून दहा हजारांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते.
शेतकरी समाधानी
कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 25 वर्षे नफा मिळवून देणारी ही शेती आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत.
लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी राजाराम देशमुख म्हणाले, “मी पूर्वी द्राक्ष व ऊस शेती करत होतो. नवीन पीकपद्धतीचा अभ्यास करून व येरळा संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर 2015 साली 25 गुंठ्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यातून 11 टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सरासरी आठ लाखाचे उत्पन्न मिळाले. 2020 साली पुन्हा ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढवले. सध्या मी दीड एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.”
तडसर (ता. कडेगाव) येथील शेतकरी व महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव पवार सांगतात, “2014 साली येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांचा फोन आला. पिलीव (ता. माळशिरस) येथील शेतकरी जाधव यांनी दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेतीतून 27 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन चर्चा करण्याची विनंती देशपांडे यांनी केली. पुढे आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीला भेट दिली. एक-दोन वर्षे या शेतीचा अभ्यास केला.
2016 साली मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. दोन ओळींतील अंतर 12 फूट व दोन रोपांतील अंतर 7 फूट अशी रचना करून 30 गुंठ्यांत लागण केली. प्रारंभी कमी पाणी दिल्यामुळे म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे 2017 साली कमी उत्पन्न - म्हणजे 400 किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत व जीवामृत यांचा वापर केला. 2018 साली 1309 किलो, 2019 साली 2460 व 2020 साली 7389 किलो व 2020-21 या काळात 8541 किलो उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता 6 लाख 44 हजार 145 रुपयांचे उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी 2021मध्ये 2 एकरांमध्ये रेड रेड व जंबो रेड या व्हरायटीची लागवड केली आहे. कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणारे हे नगदी पीक आहे. उसाएवढा खर्च केला, तरी उसाच्या दुप्पट उत्पन्न देणारे हे पीक आहे. शिवाय द्राक्षासारखी फार रिस्क घ्यावी लागत नाही.”
देशमुख व पवार या दोन्हीही शेतकर्यांनी प्रथमच दुबईला ड्रॅगन फ्रूट निर्यात केली आहे. या निर्यातीमुळे त्यांना 110 रुपये प्रतिकिलो किलो भाव मिळाला आहे.
आगामी योजना
ग्राहकांपर्यंत ड्रॅगन फ्रूटचे महत्त्व पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी शीतगृहातील साठवणक्षमता वाढवण्यासाठी परदेशी संस्थांशीदेखील संपर्क केला आहे. या फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सातासमुद्रापार पिकणार्या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती असा दुष्काळग्रस्त भागात फुलविला गेलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकर्यांसाठी नवा आदर्श ठरला आहे.
शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२
दीड एकरांतून घडविली क्रांती
धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली बाळासाहेब घुगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड एकरात मिश्र पीक पद्धतीचे उत्कृष्ट मॉडेल उभे केले आहे. महिला शेतकर्यांना एकत्र आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची निर्मिती करून जणू क्रांती घडवून आणली आहे. शेती आधारित अन्य उपक्रमात व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे त्या अनेकींना आत्मनिरर्भरतेची प्रेरणा देत आहेत.
ही कहाणी आहे. जिद्दीची आणि मेहनतीची. अतिशय गरीब परिस्थिीतही शेतीतून प्रगती साधली, त्यासाठी आतोनात त्रास, अडचणी सहन केल्या, पण थांबल्या नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचल्या, अशा प्रगतशील महिला शेतकरी वैशाली बाळासाहेब घुगे यांची ही कहाणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर हे वैशालीताईंचे सासर. लग्नापूर्वी पुण्यात काकांच्या घरी वाढलेल्या, तिथेच नववीपर्यंत शिकल्या. सोळाव्या वर्षी त्याचं बाळासाहेबांशी लग्न झालं. नवरा (बाळसाहेब) पदवीधर असूनही त्याच्या हाताला काम मिळत नव्हते. त्यातच संसाराच्या रहाटगाड्यात सासरांनी चार एकर शेती विकली. पुढे परिस्थितीत हतबल होत गेली. पुढे वैशालीताईंनी संसार सावरला. अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले.
आत्मनिर्भरतेचा असा एक प्रवास
अतिशय हलाखीचे दिवस सहन करीत पुढे आलेल्या वैशालीताई जीवनातील अनुभव सांगताना म्हणाल्या,‘‘ घरात कुणीच कामाला जात नव्हते. त्यामुळं घरखर्च कसा करायचा? त्यात नवरा कमवता नव्हता, या विचारानं सासर्यानं दीड एकर शेत, एक म्हैस आणि चार पत्रे देऊन आम्हाला घराबाहेर (विभक्त केले) काढले. शेतात दगडाची खिळपट रचून आणि त्यावर पत्रे टाकून घर उभे केले. पदरात मूल होतं. नवरा कमवत नव्हता, पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. म्हैशीचे दूध व शेतातील भाजीपाला विकून संसाराला चार पैसे मिळत होते. अशातच काळोख्या रात्री, वादळी वार्यात घराववरचे पत्रे उडून गेले.
लहान बाळाला पोटाशी धरून भयभीत अवस्थेत बाहेर पडले. या भीषण प्रसंगामुळं मी जगणं शिकले. खंबीर होऊन पुढे आले. संसार सांभाळला, शेतात भाजीपाला लावला, बाजारात, वस्तीवर, गल्लीत भाजी विकू लागले, घरंदाज, दिसायला चांगली रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचं पाहून आयाबाया माझ्याकडं टकमक बघायच्या, हसायच्या, बोलायच्या, माझ्यापुढं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, काही महिलांचं मार्गदर्शन मिळालं.. वस्तीवरच्या महिलांचा गट बनवला.. चार पैसे मिळत गेले, शेतीत सूर गवसू लागला. खर्या इथूनच माझ्या ‘आत्मनिर्भरते’ला सुरवात झाली.’’
मिश्र पिकांतून फुलवली शेती
शहरात वाढलेल्या वैशालीताईंना शेतीमातीचा कसलाही गंध नव्हता. शेती समजून घेण्यासाठी त्यांनी चार वर्ष खर्ची घालवली. वैशालीताई सांगतात,‘‘२०११-१२ पासून मी शेती करू लागले. शेती समजून घेत होते. पहिल्यांदा शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यात पूर्वांपार पासून पिकाची एक पद्धत होती. या पद्धतीत मी बदल केला. ऊस, सोयाबीन पिकांऐवजी मिश्र पीक पद्धत अंगीकारली. पहिल्यांदा घरच्यांनी विरोध दर्शवला. नंतर या पीक पद्धतीतून मिळालेल्या समाधनाकारक उत्पन्नातून विरोध मावळला. उडीद,तूर,बाजारी, मूग,चवळी, सोयाबीन आदी कडधान्याच्या लागवडीतून दीड एकरांची शेती फुलवली आहे.’’
कमी पाण्यात व कमी कालावधीत येणार्या पिकांची लागवड हे त्यांच्या शेतीचे सूत्र आहे. कडधान्याबरोबर गहू, ज्वारी आदी देशी बियांणापासून समाधानकारक उत्पन्न काढतात. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेत घेतलेल्या शेती प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. यामुळे सभेत बोलू लागल्या, महिलांना, शेतकर्यांना मार्गदर्शन करू लागल्या.
दुष्काळ निमुर्लनात सहभाग
२०१३, २०१४ आणि २०१५ हे सलग तीन वर्षे दुष्काळाचे होते. मराठवाड्यात चारापाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी आपले जनावरे चारा छावणीत पाठवित होते. शासनाकडून दुष्काळ निर्मुलनासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू झाले होते. या अंतर्गत तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘निकृष्ट चार्यातून उत्कृष्ट चारा निर्मिती’ कशी होते. या संदर्भात वैशालीताईंना प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून त्यांनी आपल्या शेतात हायड्रोपोनिक चारा बनवायला सुरवात केली. या चार्यातून त्यांनी स्वतःची १०जनावरे जगवली. मुख्य म्हणजे वाड्या वस्त्यातील महिला शेतकर्यांना कमी पाण्यातील चारा निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
गांडूळ खत, गांडूळ कल्चर व गांडूळ पाणी या संदर्भातील विविध प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. हे प्रयोग करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या बाबत बोलताना वैशालीताई म्हणाल्या,‘‘२०१३ साली मी सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च ही माझ्या आवाक्याबाहेरचा होता. प्रशिक्षणानंतर गांडूळ खत बेड टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी अडीच हजार रूपये खर्च अपेक्षित होते. याला पर्याय म्हणून मी जुने पोती (गोनी) फाडून व्यवस्थित बेड तयार केला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसायचे आणि पुढे जायचे. बेडमधील पहिला खात माझ्या शेतात टाकला. शेतातून चांगले उत्पन्न निघू लागले. पुढे गांडूळ खताचे बेड वाढवले. आज माझ्याकडे गांडूळाचे दहा बेड आहेत. गांडूळाचे व्हर्मीबेड वाढवले. त्यातून मिळणार्या व्हर्मीवाशची द्राक्ष व फळबागायतदारांकडून मागणी वाढली आहे. यातून वर्षांकाठी १०टन गांडूळ खत तयार होतोय. शून्य गुंतवूणकीतून मला वर्षाकाठी मी दीड लाख रूपये उत्पन्न मिळू लागले आहे.’’
शाश्वत शेतीचा पर्याय
शेतीला जोडधंदा म्हणून वैशालाताईंनी आपल्या शेतीपुढे गावरान कुक्कुटपालनाचा पर्याय ठेवला आहे. २०१४-१५ साली ९०हजारांची गुंतवणूक करून त्यांनी शंभर कोंबड्याचे शेड उभा केले. पहिल्या वर्षी त्यांना ३५हजार रूपयांचा नफा मिळाला. आज त्यांच्याकडे ४५० गावरान कोंबड्या आहेत. यातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांनी दोन हजार कोंबड्याचे शेड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
या शिवाय त्यांच्याकडे १४म्हशी व दोन देशी गायी आहेत. शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट बांधला आहे. गोमोत्रापासून जीवामृत तयार करतात. बयोगॅस, मुरघास, कडबाकुट्टी, जीवामृत, नर्सरी, पिठाची मशिन अशा विविध शेतीपूरक उद्योगातून वर्षांला सात ते आठ लाखांचे उत्पन्न त्या मिळवितात.
विविध फळझाडांची लागवड
वैशालीताई आपल्या दीड एकरांच्या शेतात विविध प्रयोग करतात. फळबाग हा त्यातील एक भाग. पूर्वी त्यांच्याकडे केशर आंब्याचे ९ झाडे होती. यातून त्यांना वर्षांकाठी २५ते३० हजार रूपये उत्पन्न मिळते. हे उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर गतवर्षी एक एकरांत केशर आंब्याची ३५० झाडे लावली आहेत.याशिवाय शेवगा १५, लिंबू २५, नारळ ५, पपई २, पेरू २, हदगा २, अशा झाडांची बाग त्यांनी तयार केली आहे. पिक व फळझाडांना आच्छादन, ठिंबकचा जास्तीत जास्त वापर त्या करतात.
विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची उभारणी
वैशालीताईंनी २०१७साली तुळजापूर तालुक्यातील २० गावातील महिला शेतकर्यांना एकत्रित आणून विजयालक्ष्मी महिला शेतकरी कंपनीची स्थापना केली. सध्या कंपनीच्या १हजार महिला सभासद आहेत. कंपनीमार्फत महिला शेतकर्यांना सेंद्रिय शेती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, बियाणे साठवण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक विषयी मार्गदर्शन केले जाते. कंपनीने शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेती पूरक व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्यावतीने भाजीपाला साठवण शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
डाळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी
कडधान्याची लागवड करणे व त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्टे आहे. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. उडीद, मूग,हरभरा डाळीवर काम होत असते. या अंतर्गत कंपनीकडून‘उरवा’ या ब्रॅडखाली केरळ येथे १०टन डाळ निर्यात करण्यात आली होती. डाळीपासून पापड निर्मिती तर हळदीपासून पावडर तयार करण्यात काम सुरू आहे.
संपर्क
वैशाली बाळासाहेब घुगे
मु.पो.अणदूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव
मो.नं. : ७९७२८०६०५५
ईमेल : Vaishalighuge112@gmail.com
सोमवार, २० जून, २०२२
‘परिसांचा संग’-
गोड उसाची कडू कहाणी
दरसाल उसाचा हंगाम सुरू झाला की दोन प्रश्न नेहमी ऐरणीवर येतात - पहिला ऊस दर आंदोलनाचा आणि दुसरा अतिरिक्त ऊस गाळपाचा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम संपूनही मराठवाड्यात एक ते दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना आहे. या समस्येला नेमके जबाबदार कोण? याचे मूळ शोधणे गरजेचे आहे.
‘ऊस’ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक. राज्यात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यात या पिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ऊस उत्पादकतेमध्ये आणि साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल राहत आला आहे. महाराष्ट्रात एकूण 95 सहकारी आणि 93 खाजगी कारखाने आहेत, तर जवळपास 48 कारखाने बंद अवस्थेत आहेत. 1 जून 2022 अखेर राज्यात 1316.8 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 1369.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळते. उसाचा सर्वसाधारण बारा महिन्यांचा कालावधी संपूनही मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आदीसह काही जिल्ह्यांतील ऊस फडातच आहे.
ही समस्या केवळ बिगर सभासदांची नाही, तर जे कारखान्याचे सभासद आहेत, त्याचीही हीच गत आहे. या समस्येमुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतरही काही भागात साखर कारखाना ऊस नेत नाही म्हणून काहींनी ऊस पेटवून दिला. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत गेली. सध्या त्या त्या भागातील कारखान्यांकडून तोडणीचे आश्वासन दिले जात असले, तरी मान्सून सुरू झाल्याने शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.
अतिरिक्त ऊस गाळपासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून पडणार्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 2022-23 या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढेल, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केलीे. एक कारखानदार म्हणून उसाखाली किती क्षेत्र आणायचे? बंद पडलेले साखर कारखाने कसे सुरू करायचे? याविषयी ते बोलणे आवश्यक होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी मूळ समस्येकडे दुर्लक्षच केले.
अतिरिक्त ऊस प्रश्न - एक अन्वयार्थ
सध्या प. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न संपला असला, तरी मराठवाड्यात हा प्रश्न गंभीर बनला आहे. अवर्षणग्रस्ततेचा कायमचा शाप असलेल्या या भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळेच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खात्रीचे उत्पन्न, उसाची ‘एफआरपी’ (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर) निश्चितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळत आहेत. 2021-22 हंगामात या विभागात सहा लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. या संपूर्ण उसाची भिस्त केवळ 58 कारखान्यांवर अवलंबून आहे.
यंदा सभासदांइतकीच बिगरसभासदांनी उसाच्या एकरी लागवडीत वाढ केली आहे. त्यामुळे कारखानदारांना ऊस तोडणीचे व गाळपाचे नियोजन करता आले नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. परिणामी, मजुराअभावी शेतकर्यांचा ऊस फडातच राहिला. वाढत्या तापमानात काळात उसाला तुरे फुटले. पावसामुळे शेतकर्यांसमोर उसाच्या शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उभा राहिला असला, तरी आता गोड ऊस ‘कडू’ वाटत आहे. संपूर्ण ऊस गाळप झाला, तरीही यातून उत्पादन खर्च निघेल की नाही, याविषयी शंका आहे.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नारायण देवकाते म्हणाले, “गोदावरी पट्ट्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे राजेटाकळी, भादली, मंगू जळगाव परिसरात जवळपास 25 हेक्टरहून अधिक ऊस गाळपाविना शिल्लक आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस नाही झाला, तर बर्याच प्रमाणात ऊस गाळप होईल.”
एकूणच, अतिरिक्त ऊस गाळपाचे चक्र पावसावर अवलंबून आहे. येत्या काळात बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, तर अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाला कालव्याने पाणी दिले. मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण, उसासाठी होणारा पाण्याचा अपव्यव लक्षात घेता, या भागातील शेतकर्यांनी उसाशिवाय इतर नगदी पिके कशी घ्यावी, याविषयी धोरणकर्त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
विकास पांढरे
https://www.evivek.com/Encyc/2022/6/14/Sweet-sugarcane-The-story.html
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
गाथा अखंड होळकरशाहीची
इतिहासाचा मानवी जीवनाशी अतिशय निकटचा संबंध आहे. गतकालीन मानवी जीवनाचा आरसा असतो. त्यातील महत्त्वपूर्ण लक्षवेधी घटनांचा इतिहास हा सामाजिक शास्त्राचा आलेख असतो. देशात व राज्यात अनेक व्यक्ती,घराणे आपल्या कार्याने महान झालेले आहेत. या महानतेमध्ये होळकरशाहीचा मोठा सहभाग आहे. या घराण्याचा आलेख सुसंगत व एकत्र मांडण्याचा प्रयत्न लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'अखंड होळकरशाही' या ग्रंथात मांडला आहे.
उज्ज्वलकुमार माने मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा गावचे. गेल्या दोन दशकापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना शब्दांची धार आणि मोजकेपणा अवगत आहे. 'रणरागिणी अहिल्यादेवी' या चरित्र पुस्तकातून माने यांनी आपल्या अभ्यासूपणाचे दर्शन घडवले आहे.
मराठेशाहीत होळकर घराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळकर घराण्यात अनेक पराक्रमी व्यक्ती होऊन गेले आहेत. ज्याला जे गवसले तसे ते त्याने दाखवले आहे. अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर यांच्यावर जितके विपुल संशोधन व लेखन झाले तितके मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर आदी व्यक्तींकडे इतिहासकाराचे दुर्लक्ष राहिले. होळकर राजघराण्यातील सुभेदार मल्हारराव होळकर, सरदार खंडेराव होळकर, मालेराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, सुभेदार काशीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी तुळसाबाई होळकर, क्रांतिकारक भीमाबाई होळकर आदींचा अभ्यास करून, ऐतिहासिक पुरावे गोळा करुन, संदर्भ ग्रंथ वाचून, स्थळांना भेट देऊन उज्ज्वलकुमार माने यांनी अत्यंत सोप्या भाषेत होळकरशाहीची गाथा सांगणाऱ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
खरेतर, होळकर राजघराण्यातील व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना एका संचात बांधून वाचकांसमोर सादर करण्याचे अवघड कार्य आहे. हे एकच पुस्तक वाचून 'होळकरशाही' कळलेच असे नाही. त्यासाठी जाणकार ,अभ्यासू वाचकांनी त्यासाठी इतर ग्रंथाचा, ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करावा, ज्याला होळकर घराण्याचे मर्म समजून घ्यायचे आहे, अशा प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे या ग्रंथाची चिकित्सा करण्याइतपत लक्षणीय आहे.
हे पुस्तक का वाचावे? मराठेशाहीत होळकर घराण्याचे काय स्थान आहे? योगदान दिले आहे? हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचावे. मुख्य म्हणजे या पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची गाथा वाचायला मिळतेच या शिवाय तुळसाबाई होळकर व भीमाबाई होळकर या रणरागिणीचा धगधगता इतिहास वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. इंदौर संस्थानात रेल्वेचे जाळे निर्माण करणारे, महापालिकेची स्थापना करणारे दुसरे तुकोजीराव होळकर, दुष्काळात धान्याचे कोठार लुटण्यास मुभा देणारे महाराजा शिवाजीराव होळकर, शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठ्याची सोय करणारे तिसरे तुकोजीराव होळकर, धनगर-मराठा यांच्यात रोटी-बेटी व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे दुसरे यशवंतराव होळकर यांच्या जीवनाची, कार्याची गाथा या ग्रंथात वाचायला मिळते.
माने यांनी आपल्या ग्रंथात होळकर घराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यातील यशस्वीपणाची,चढउताराची, मानवतावादी धोरणाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या घराण्यातील प्रत्येक पुरुष व स्त्री ही आदर्शवादी, उदारमतवादी आणि विधायक मार्गाने जाणाऱ्या आहेत हे पुस्तक वाचताना लक्षात येते.
चरित्र व्यक्तींचा इतिहास समजून घेताना माने यांनी शक्य आहे तिथे ऐतिहासिक घटनांचा, संदर्भ ग्रंथांचा दाखला दिला आहे. हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. एकूणच हे पुस्तक वस्तुनिष्ठ चरित्र ग्रंथ झाले आहे. या ग्रंथातील चरित्र नायकाची जीवन कार्याची माहिती पुराव्यानिशी देण्याचा प्रयत्न माने यांनी केला आहे. त्यामुळे होळकर घराण्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी, इतिहास संशोधकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
विकास पांढरे, ९९७०४५२७६७
अखंड होळकरशाही
लेखक : उज्ज्वलकुमार माने
पृष्ठसंख्या :३०४
मूल्य : ४०० रूपये
प्रकाशक :यशोदीप पब्लिकेशन,पुणे
संपर्क :९९२२४२४६९९,९०२८७३६००१
बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१
गोष्ट मराठवाड्यातल्या ’रँचो’ शिक्षकाची
संशोधन करून तंत्रस्नेही शिक्षण देण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये क्षमता आहे, हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश खोसे यांनी सिद्ध केले आहे. मुलांना बंजारा बोली भाषेतून शिक्षण देण्याबरोबरच इंटरनेटशिवाय वापरता येतील अशा एक नव्हे, तर तब्बल 51 शैक्षणिक अॅप्सची निर्मिती करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकविध संकल्पना पंखांचे बळ दिले आहे. शिक्षण क्षेत्रातल्या या विशेष योगदानाबद्दल खोसे यांना मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे मराठवाड्यातील या ‘रँचो’ने ग्रामीण शाळांची शान वाढवली आहे.
शेती, उद्योग, आर्थिक क्षेत्रातील विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा तसा मागेच आहे, तसेच शालेय शिक्षणाबद्दलही म्हणता येईल. या भागावर स्वातंत्र्यापूर्वी निजामाचे राज्य होते. निजामाला शिक्षणाचे आणि संस्कृतीचे वावडे होते. निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर येथे शिक्षण अधिक गतिमान झाले. पण प. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये शैक्षणिक चळवळ सुरू व्हायला खूप उशीर झाला. या भागातील शालेय शिक्षण प्रकाशाच्या झोतात पहिल्यांदा आले ते दोन दशकांपूर्वीच्या ‘लातूर पॅटर्न’मुळे. लातूरची मुले शालेय शिक्षणात सतत बाजी मारत असत. हे सकारात्मक चित्र उर्वरित जिल्ह्यात नव्हते.
आठ-दहा वर्षांपूर्वीची
गोष्ट आहे. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक
विकासाच्या प्रश्नांवरील उच्चस्तरीय समिती’ने महाराष्ट्रातील शैक्षणिक असमतोलाचाही
सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. या समितीच्या अभ्यासानुसार पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर
दहावीमध्ये पोहोचेपर्यंत मराठवाड्यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थी शाळा सोडत असल्याची
धक्कादायक बाब समोर आली होती. आजही उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतील
शैक्षणिक गती संथच आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव निर्देशांक कमी असून, निती
आयोगाने निवडलेल्या देशातील 115 आकांक्षित जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे.
या जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी आमूलाग्र विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी
‘शिक्षण’ हे महत्त्वाचे माध्यम आहे.
शाळा असून
आणि त्यात शिकूनही शिक्षणापासून दूर पळणार्या मुलांना गरज आहे ती वेगळ्या पद्धतीने
शिकवण्याची, त्यांना अभ्यासाची गोडी लावण्याची. गेली अनेक वर्षे शैक्षणिक अॅप्सच्या
माध्यमातून मुलांना शिक्षणाची गोडी लावणार्या उमेश खोसे सारख्या तंत्रस्नेही शिक्षकांची.
लमाण तांड्यावरच्या मुलांना शिकवणार्या रँचोची महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्यात,
पाड्यात, गरीब वस्त्यांमध्येही तेवढीच गरज आहे.
लातूर जिल्ह्यातील
माटेफळ या गावापासून उमेश खोसे यांचा जीवनप्रवास सुरू झाला. उमरगा तालुक्यातील (जि.उस्मानाबाद)
बेळंब येथील लमाण (बंजारा) तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून खोसे
2007मध्ये रुजू झाले. सध्या ते कडदोरा (ता. उमरगा) शाळेत कार्यरत आहेत. जेव्हा ते बेळंब
तांड्यावरच्या शाळेत रुजू झाले, तेव्हा त्या तांड्यात पाचवीपर्यंत शाळा होती. पटसंख्या
50च्या आसपास होती. परंतु, उपस्थितीचा मोठा प्रश्न होता. मुलींच्या शिक्षणाबद्दल अनास्था
होती. कारण शाळेत येणारे सर्व मुले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बंजारा
जमातीतील होती. लोक कामासाठी बाहेरगावी स्थलांतर करायचे. ही परिस्थिती बदलण्यासाठी
खोसे यांनी सहकार्यांच्या मदतीने गावातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कामासाठी
बाहेरगावी जाताना आपली मुले आजी-आजोबांकडे ठेवायला, हंगामी वसतिगृहाची मदत घेऊन शंभर
टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तांड्यावरची मुले -मुली नियमित
शाळेत हजर राहू लागली.
बोलीभाषेतून
शिक्षण
उमेश खोसे
यांनी राबवलेला ‘बोलीभाषेतून शिक्षण’ हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला.
शाळेत रुजू झाले, तेव्हा खोसे यांच्यासमोर भाषेचा मोठा प्रश्न उभा राहिला. मुख्य म्हणजे
शाळाच महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेलगत असल्यामुळे मुलांवर बंजारा बोलीभाषेचा आणि मराठी-कानडी
मिश्रित भाषेचा प्रभाव होता. यावर उपाय म्हणून सुरुवातीला मुलांकडूनच त्यांनी बंजारा
बोलीभाषा शिकून घेतली. सहकारी शिक्षक सुभाष राठोड यांनी ही भाषा शिकण्यासाठी खोसे यांना
मदत केली. त्यानंतर खोसे यांनी बंजारा बोलीभाषेतून इयत्ता पहिलीचे पुस्तक अनुवादित
करून मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या
उपस्थितीमध्ये आणि गुणवत्तावाढीमध्ये याचा फायदा झाला आहे. मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून
शिक्षण मिळाल्याने मुले आनंददायक पद्धतीने शिकू लागले. त्यांच्या या बोलीभाषा व तंत्रज्ञान
या उपक्रमाची ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमांमध्ये निवड होऊन त्यांना
जवळपास लाखो शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासमोर सादरीकरणाची संधी मिळाली.
51 ऑफलाइन अॅप्सची निर्मिती
खोसे यांची खासियत सांगायची झाली, तर वाड्या, वस्त्या, तांडा आणि पाड्यावरच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना इंटरनेटशिवाय ऑफलाइन हाताळता येतील अशा 51 ऑफलाइन अॅप्सची निर्मिती केली आहे. इ. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खोसे यांनी ही अॅप्स बनवली आहेत.
ऑफलाइन अॅप्सची
संकल्पना कशी सुचली? याबाबत खोसे सांगतात, “ग्रामीण भागात काम करत असताना मुलांना आधुनिक
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे म्हणून काय करता येईल हा विचार करत होतो.
परंतु आमच्या शाळेमध्ये मोबाइलला रेंज येत नव्हती. अशा शाळेत मुलांना कृतियुक्त शिक्षण
कसे द्यावे? हा विचार करत असताना ‘ऑफलाइन’ शिक्षणाची कल्पना माझ्या डोक्यात आली.
मुलांना मोबाइलमधील गेम खेळण्यात जास्त आवड असते. तसेच आपण काय बनवले तर मुलांना शाळेची
आवड निर्माण होईल व ते नियमित शाळेत येतील म्हणून ही निर्मिती हातात घेतली. यासाठी
मला यूट्यूबवर गुगल यांच्या माध्यमातून माहिती मिळवून मी निर्मिती करण्यास सुरुवात
केली. यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फ्री प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास सुरुवात
केली. त्याच्या साह्याने मुलांना शाळेत ती अॅप्स दिली व मुले शाळेत रमू लागली.
प्राण्याची,
फळांची नावे, चित्रकला, एकक रूपांतरण, पक्ष्यांची माहिती, रंगांची ओळख, फुलांचे वर्गीकरण,
भौमितिक आकृत्या, अंकओळख, मुळाक्षरे, गीतमंच, परिपाठ, शिक्षक डायरी, शालेय वेळापत्रक,
शालेय पोषण आहाराचा हिशेब करणारे अॅप, आठवणीतील कविता, मराठी सुविचार, इंग्लिश कविता
अशी एकूण 51 अॅप्स विकसित केली आहेत. ही सर्व अॅप्लिकेशन्स इंटरनेटशिवाय चालतात.
विशेष म्हणजे ही अॅप्स ज्ञानरचनावादास पूरक आहेत.
प्रायोगिक
तत्त्वावर या अॅप्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व अॅप्स डाउनलोड करता येतात.
या सर्व अॅप्समध्ये चित्रांचा व शब्दांचा समावेश आहे. चित्रावर क्लिक केल्यास चित्र
मोठे होते. एका तांड्यावरील शाळेत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना तंत्रज्ञानाचा
शिक्षण क्षेत्रातला वापर किती महत्त्वाचा ठरला आहे, हे खोसे यांनी दाखवून दिले आहे.
संकेतस्थळ व यूट्यूब चॅनेल
खोसे यांनी
2011 साली शाळेचे संकेतस्थळ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी जे साहित्य तयार केले
होते, ते संकेतस्थळावर अपलोड केले. याशिवाय 2013 साली त्यांनी स्वत:ची यूट्यूब चॅनल
सुरू केली. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून त्यातून मुलांना शिक्षण देण्याचा
प्रयत्न केला. खोसे यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या लौकिकात वाढ झाली. आज बेळंब तांडा
शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांत वाढ होऊन सातवीपर्यंत इयत्ता वाढली आहे.
तसेच विद्यार्थिसंख्या 50च्या आसपास होती, ती आता शंभरच्यावर गेली आहे. त्या शाळेच्या
केवळ पटसंख्येतच वाढ नाही, तर गुणवत्तेतसुद्धा वाढ दिसून आली.
उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या काळात ज्या तांड्यावर मुली शिक्षण घेणे शक्य नव्हते, अशा तांड्यामध्ये आज मुली शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयामध्ये विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेल्या एकमेव जागेवर त्यांच्या शाळेतील सलग पाच वर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होत होती. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
शिक्षण संस्कार
शिबिर व डिजिटल शाळा
सध्या कार्यरत असलेल्या जगदंबानगर, कडदोरा या शाळेमध्ये खोसे व त्यांचे सहकारी श्रीराम पुजारी यांनी राबवलेला शिक्षण संस्कार शिबिर हा उपक्रम राज्यस्तरावर नावाजला गेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे.
कडदोरा शाळेमध्ये
शाळा बांधण्यासाठी जागा नव्हती, अशा वेळी शाळेला गावातील दानशूर व्यक्ती त्र्यंबक चौधरी
यांनी दोन गुंठे जागा देऊन त्यावर ही शाळा भरलेली आहे. तसेच जय स्वामीनारायण ट्रस्ट
यांनी 24 गुंठे जागा दान देऊन शाळेसाठी मैदान उभा केले आहे. गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या
साह्याने शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कट्टा’
या माध्यमातून मुलांना अवांतर वाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामधून मुले निसर्गरम्य
वातावरणामध्ये शाळेतील अवांतर वाचनासाठी पुस्तके घेऊन ती वाचतात, त्यातून मिळालेला
बोध वर्गामध्ये सांगतात. तसेच या शाळेमध्येही शाळेची पटसंख्या 14वरून आज 30 झालेली
आहे. या शाळेमध्ये मुले स्वत: संगणक वापरतात. टॅबवरून, टीव्हीवरून शिक्षण घेतात. तसेच
पुढे त्या त्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोय करतात.
मुले स्वत: साहित्य तयार करत आहेत. तसेच कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी स्वयंअध्ययन साहित्य
तयार करून मुलांना स्वयंशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नक्कीच
मुलांना आनंददायक व प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळत आहे.
कोरोना काळात ऑनलाइन व ऑफलाइन शाळा
कोरोनाच्या काळामध्ये मुलांचे शिक्षण बंद राहू नये यासाठी 365 दिवस ऑनलाइन व ऑफलाइन शाळा सुरू ठेवून मुलांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांचा निकाल लावणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वत: शाळेची वेबसाइट तयार करून मुलांचा दहावी आणि बारावीसारखा ऑनलाइन निकाल लागलेला आहे. कडदोरा ही ऑनलाइन निकाल लावणारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. आजही मुले दीक्षा अॅपच्या, तसेच इतर साधनांच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत.
लेखन व पुरस्कार
खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे खोसे यांनी ‘दीक्षा’ या केंद्र शासनाच्या अॅपवर ई-कंटेंट तयार केले आहे.
उमेश खोसे
यांना आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील
एवढ्या कमी वयामध्ये व कमी सेवेमध्ये जे शिक्षकासाठी मिळणारे सर्वोच्च दोन पुरस्कार
आहेत, ते म्हणजे एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व दुसरा राष्ट्रीय पुरस्कार हे दोन्ही
मिळालेले कमी वयातील एकमेव शिक्षक आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (2021), राष्ट्रीय
आय.सी.टी. पुरस्कार (2018), जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार (2017 ), महाराष्ट्र गौरव
पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, राज्य तंत्रस्नेही पुरस्कारासह त्यांच्या बोलीभाषा व
तंत्रज्ञान या उपक्रमास राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
भविष्यातील नियोजन
“यापुढेही
मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण, आनंददायक व कृतियुक्त शिक्षण देण्याचा निरंतर
प्रयत्न करीन, याशिवाय महाराष्ट्रात एक दिशादर्शक मॉडेल स्कूल स्थापन करण्याचा माझा
प्रयत्न आहे. माझ्याकडून जे काही शिक्षकांना मी मार्गदर्शन करता येईल येईल ते मार्गदर्शन
करत राहीन. यापूर्वीही मी ‘महाराष्ट्र अॅडमिन पॅनल’ या ग्रूपच्या माध्यमातून शिक्षकांना
तंत्रस्नेही करण्यासाठी किंवा हा उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य
करत आलो आहे. हे कार्य आता पुढील काळातही निरंतर करत राहीन”
असे खोसे यांनी सांगितले.
उस्मानाबादसारख्या
अप्रगत जिल्ह्यात उमेश खोसे या तंत्रस्नेही शिक्षकाने राबवलेला उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी
निश्चितच दिशादर्शक आहे. आतापर्यंतच्या सेवेमध्ये शाळा सिद्धिनिर्धारक, बालरक्षक (चळवळ),
राज्य तंत्रस्नेही (शासकीय उपक्रम), तसेच दीक्षा अॅपवर साहित्यनिर्मिती अशा वेगवेगळ्या
स्तरांवर काम केले आहे. 50च्या वर शाळाबाह्य मुले होती, अशा मुलांना त्यांनी आतापर्यंत
बालरक्षक मासिकाद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. बर्याच मुलांना वयानुरूप प्रवेश
देऊन मुलांचे शिक्षण सुरू केले आहे. इयत्ता दुसरी वर्गाच्या पाठ्यक्रम निर्मितीत त्यांचा
सहभाग होता. अशा या उपक्रमशील शिक्षकास देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक व आयसीटी
पुरस्कार मिळाल्याबद्दल खोसे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
संकेतस्थळ
-www.ukguruji.in
ब्लॉग
-www.zppsjagdamabanagar.blogspot.com
यूट्यूब चॅनल
-UK TECHNO TEACHER
https://www.evivek.com//Encyc/2021/9/6/Ideal-teacher-Umesh-Khose.html
विकास पांढरे
9970452767
कुशल व्यवस्थापक
असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
साहेबराव :- हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय... सरकार : ......




















