शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव

 


वाघ म्हणजे रुबाब, वाघ म्हणजे सौंदर्य, वाघ म्हणजे जंगलची शान. निसर्गाच्या अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे जगणे सुकर करण्यासाठी जंगलतोडीवर कडक निर्बंध आणणे क्रमप्राप्त आहे. आपले क्षेत्र सोडून वाघ दुसरीकडे अतिक्रमण करत नाही. या गोष्टी माणसासाठीही बोधप्रद आहेत.  महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पाविषयी थोडक्यात करून दिलेला हा परिचय.

२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून जगात आणि आपल्या देशात वाघाचे जतन व संवर्धन होण्यासाठी अनेक पावले उचलली गेली. आज वाघांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१०मध्ये पारंपरिक औषध तयार करण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आले. जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या जंगलाच्या राजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. सध्या भारतात ५० वाघ प्रकल्प आहेत. भारतात बंगाल टायगर्स ही सर्वाधिक आढळणारी वाघांची प्रजाती आहे. त्यांना रॉयल बंगाल टायगर्स असेही संबोधले जाते. जगातील सर्वात जास्त वाघ प्रजाती या भारतात आढळतात. २०१८च्या गणनेनुसार २१६७ वाघ भारतात होते. सध्याच्या घडीला (मार्च २०२१पर्यंत) भारतात '२९६७ इतकी वाघ लोकसंख्या' नोंदली गेली आहे.

महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट, ताडोबा -आंधारी, पेंच, नवेगाव, सह्याद्री, बोर या प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी इथला निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देश-विदेशी पर्यटक वाघ प्रकल्पात गर्दी करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय वाघ रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष वाघ दलाची स्थापना करण्यात आली आहे.

१) ताडोबा– आंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी प्रकल्प (जिल्हा चंद्रपूर) म्हणजे वाघांचे राज्य असलेली भूमी. येथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पाची निर्मिती झाली. या वाघ प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.

याठिकाणी वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. शिवाय वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही पहायला मिळतात.

२) मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प (जि.अमरावती) फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या वाघ प्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट वाघ प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे.

याठिकाणी पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील पहायला मिळतात.

३) पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प (जि.नागपूर) हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा जैवविविधतेने संपन्न प्रदेश आहे. याठिकाणी वाहत असणाऱ्या पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला वाघ प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.

या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यासारखे प्राणी बघायला मिळतात.

४) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा वाघ प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. २०१३ साली हा प्रकल्प अस्तित्वात आला. नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे.

या प्रकल्पात ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर आदी वन्यजीवांचे दर्शन होते.

५) बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्प हा बोर धरण यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोर व न्यू बोर अभयारण्याचा भाग असून हे वर्धा व नागपूर जिल्ह्यात व्यापलेले आहे. या प्रकल्प १३ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.किमी) क्षेत्रावर वसलेला आहे. बोर वाघ प्रकल्पाची सफारी करताना पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वले, रानडुकर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले-मांजराचे दर्शन होते.

६) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री वाघ प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्याद्री वाघ प्रकल्प तयार केला आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे १ हजार १६६ चौरस किलोमीटरचे सह्याद्री वाघ प्रकल्पाचे क्षेत्र आहे.

येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी नजरेस पडतात.

 आपण सर्वांनी जंगलाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय अवैध शिकार करणाऱ्यांवर कडक निर्बंध घालणे तसेच कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे.

- विकास पांढरे,९९७०४५२७६७ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...